सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

‘निर्भया’.. पुन्हा न होण्यासाठी...!


(नवी दिल्ली येथील 'निर्भया' प्रकरणाला आज, दि. १६ डिसेंबर रोजी एक वर्ष होत आहे. या निमित्तानं दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीनं 'माय पुणे' पुरवणीत या विषयाला समर्पित विशेष लेख प्रकाशित केले आहेत. संपादक मित्रवर्य संजय आवटे यांनी तीत माझा लेख आवर्जून प्रकाशित केला. त्यांना मनापासून धन्यवादासह हा लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)


 निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणे हा या प्रकरणाचा पूर्णविराम नाही, तर ती एका नव्या पर्वाची सुरवात असली पाहिजे. मुळातच या पाशवी प्रवृत्तींना चाप बसण्यासाठी यापुढे आपली भूमिका काय असणार आहे, कोणती कृती आपण करणार आहोत, हा खरा प्रश्न आहे.  यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे आज आपल्या देशात पुरूष जसे त्यांची सुरक्षा गृहित धरून सर्वत्र वावरतात, तसंच महिलांनाही त्यांची सुरक्षितता गृहित धरून वावरता येईल, असं निर्भय वातावरण निर्माण होण्यासाठी काही तरी करणं, हे खरं सोल्यूशन ठरेल.
स्त्री-पुरूषांमध्ये स्वतःच्या तसेच परस्परांच्या शरीरांविषयी आदरभाव निर्मिती, लैंगिक शिक्षण, स्त्री-पुरूष समानतेच्या भावनेची प्रस्थापना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री-भ्रूण हत्येस प्रतिबंध, ती करणाऱ्यांना कडक शासन या मुद्यांवर गांभीर्यपूर्वक काम केले गेले, तर अशा घटनांना आवर घालता येऊ शकेल, असे माझे मत आहे.
एकोणीसाव्या शतकामध्ये महात्मा फुले यांनी स्त्री-शिक्षणाचा, स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार केला. पण आपण त्यांचे विचार एकविसाव्या शतकापर्यंत सुद्धा अंमलात आणू शकलेलो नाहीत. स्त्रीकडे उपभोग्य वस्तू (Commodity) म्हणून पाहण्याचा पुरूषी दृष्टीकोन या शतकातही अधिक प्रखरपणे घट्ट करण्यात येतो आहे. जाहिरातींची आणि माध्यमांची त्यामध्ये खूप मोठी कळीची भूमिका आहे. एकमेकांविषयी आदर, समानतेची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत स्त्रीकडे पाहण्याचा निम्न दृष्टीकोन बदलणं अशक्य आहे. शारीर पातळीवरही हा आदराचा दृष्टीकोन प्रस्थापित होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक जन्माला आलेल्या मुलाला, मुलीला स्वतःच्या शरीराचा आदर करायला शिकवलं पाहिजे. लिंग, योनी, गुदद्वार हे आपल्या शरीराचे महत्त्वाचे अवयव आहेत. प्रजोत्पादन आणि मलनिस्सारणाचं अतिशय महत्त्वाचं काम ते करतात, तरीही त्यांच्याकडं पाहण्याचा आपला दृष्टीकोन हा घृणास्पद असतो. लहानपणापासूनच तसे संस्कार आपल्यावर बिंबवले जातात. प्रकृती (निसर्ग)विषयक जाणीवांतूनच खरं तर आपली संपूर्ण संस्कृती निर्माण झाली आहे, तथापि, तिच्याविषयीच्या अनावश्यक निर्बंधांतून विकृती निर्माण होते आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आपल्या अवयवांविषयी असा कलुषित किंवा अतिकुतुहलाचाही दृष्टीकोन निर्माण होणं या दोन्ही गोष्टी धोक्याच्या आहेत. खजुराहो हे आमचं सांस्कृतिक वैभव आहे, असं मोठ्या गर्वानं सांगणाऱ्यांच्या या देशात शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण हा विषय ठेवण्याला प्रखर विरोध केला जाणं, हीच खरं तर लाजीरवाणी गोष्ट आहे. लैंगिक शिक्षण देणं म्हणजे केवळ शरीरसंबंधांचं शिक्षण देणं, इतका मर्यादित अर्थ काढून त्याला विरोध केला जातो आहे. (खरं तर, विरोध करणाऱ्यांचीही चूक आहे, असं म्हणता येणार नाही. कारण लैंगिक हा शब्द जरी उच्चारला तरी तो केवळ सेक्सशी- शरीरसंबंधाशी रिलेटेड आहे, असंच त्यांच्याही मनावर बिंबलं गेलंय. याचं कारणही लैंगिक शिक्षणाचा अभाव हेच आहे.) पौगंडावस्थेत, समंजसपणाच्या वयात आल्यावर मुलामुलींमध्ये त्यांच्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांचं मोठं कुतूहल असतं. तसंच, योग्य वेळी योग्य माहिती मिळाली नाही, तर त्याचं रुपांतर गोंधळात व्हायला वेळ लागत नाही. नेमक्या या वयातच त्यांना या सर्व गोष्टींची शास्त्रीय माहिती देऊन त्यांचा सामाजिक आणि नैतिक पाया घट्ट करण्याची खूप गरज आहे. शरीरातील नैसर्गिक बदलांमुळं निर्माण होणाऱ्या लैंगिक भावनांवर नियंत्रण, त्यांचं नियमन, प्रसंगी दमन कसं करावं, याची त्यांना शास्त्रशुद्ध माहिती मिळाली तर पुढच्या आयुष्यातले असे अनेक प्रसंग आपोआपच त्यांच्याकडून टाळले जातील. (अन्यथा, पिवळ्या पुस्तकांतून तशी कित्येक प्रकारची अशास्त्रीय माहिती पौंगंडावस्थेत वाचली जाते आणि तिचा पगडा पुढं संपूर्ण आयुष्यभर मनावर राहतो. आता तर इंटरनेटमुळं अशा माहितीचंही भांडार (?) युवापिढीसमोर खुलं आहे. त्याला कसं रोखणार? लैंगिकतेविषयी अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणं, हा सुद्धा लैंगिक शोषणाचाच एक प्रकार नव्हे काय?) या पार्श्वभूमीवर, प्रत्येक व्यक्ती आपल्या आणि समोरच्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा आदर करू लागली तर एकूणच स्त्री-पुरूष सहजीवन सौहार्दपूर्ण होऊन जाईल.
स्त्री-पुरूष समानतेच्या भावनेचा विकास हा सुद्धा या प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांचे दशकागणिक घटते प्रमाण हा आपल्या देशाच्या चिंतेचा विषय आहे. एकीकडे मुलीचे ओझे नको म्हणून स्त्री-भ्रूण हत्या करायची आणि दुसरीकडे मुलांना उपवर मुली मिळत नाहीत म्हणून लग्नासाठी मुली अक्षरशः विकत आणायच्या, हे आपल्या देशातलं विदारक वास्तव आहे. हे सत्र असंच चालू राहिलं तर माणसापरास जनावरं बरी असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आल्याखेरीज राहणार नाही. बलात्कार ही त्यावेळी ब्रेकिंग न्यूज असणार नाही तर भयाण वास्तव असेल. कारण शेवटी लैंगिक भावनांचं दमन करण्यालाही मर्यादा आहेत. प्रत्येक पुरूष हा काही मर्यादापुरूषोत्तम नाही. त्यामुळं स्त्री भ्रूण हत्या रोखणं, ती करणाऱ्यांना सज्जड शासन करणं आणि स्त्री-पुरूष गुणोत्तरात सुधारणा करणं हा एककलमी कायमस्वरुपी कार्यक्रम आपण हाती घ्यायला हवा. वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक शिक्षण देऊन समतेची, समानतेची भावना त्यांच्या मनात रुजवायला हवी. मुली-महिलांकडं पाहण्याचा तुच्छतेचा दृष्टीकोन बदलायला हवा. एकमेकांकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन जितका निर्मळ होईल, तितकं अशा अत्याचारांच्या घटनांचं प्रमाण आपोआपच कमी होत जाईल.
सदरच्या बलात्कार प्रकरणातील संशयितांना शिक्षा होणं म्हणजे या प्रकरणाची इतिश्री होणं नव्हे, तर ती सुरवात असली पाहिजे बलात्काराच्या मानसिकतेला, भावनेला सुरूंग लावण्याची! अत्याचाराचा विचार करणाऱ्यांच्या मनात कायद्याचं भय निर्माण झालंच पाहिजे. एखादं चुकीचं पाऊल उचलण्यापूर्वीच या भयानं त्या विचारापासून परावृत्त केलंच पाहिजे. पण मित्रहो, आपल्या पुरूषप्रधान देशामध्ये विवाहानंतरही घरच्या स्त्रीशी मनाविरुद्ध शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली जाते, हे वास्तव आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये किंवा घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये लैंगिक असमाधान किंवा अत्याचार या कारणांचं प्रमाण मोठं आहे. हाही एक प्रकारचा बलात्कारच आहे. इथं घरोघरी असे बलात्कार होत असताना आपण केवळ विशिष्ट अपराध्यांवर दगड मारतो आहोत. येशू ख्रिस्तानं सांगितलं आहेच, ज्यानं कधीच पाप केलं नाही, त्यांनं पुढं होऊन दगड मारावा.सद्सद्विवेक जागृत असेल, तर खरं सांगतो, अशा आंदोलनात एकही माणूस उतरू शकणार नाही. त्यामुळं महिलांकडं ‘weaker sex’ म्हणून पाहणाऱ्या पुरूषी अहंकाराच्या मानसिकतेला उध्वस्त करणं, हेच या समस्येवरचं खरं सोल्युशन आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा