गुरुवार, २७ जून, २०१३

निखळ-११ : विश्वासार्हतेचा ‘टायर बर्स्ट’!



('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत प्रकाशित झालेला माझा लेख...)

गेल्या रविवारी रात्री अलिबागहून कोल्हापूरकडे परतत असताना साताऱ्याच्या थोडं पुढे आमची कार पंक्चर झाली. नुसती पंक्चर नव्हे तर टायरच आडवी कापली जाऊन फुटली आणि आमचे वाघमोडे आण्णा अनुभवी ड्रायव्हर म्हणूनच कार अगदी सराईतपणे रस्त्याकडेला घेऊन अर्ध्या तासाच्या आत त्यांनी टायर बदलली सुद्धा. मोठ्या प्रवासामध्ये अशी गोष्ट स्वाभाविक असल्यानं झाल्या घटनेचा आम्ही फारसा विचार केला नाही. रात्रीच्या दोन वाजता नवी टायर फुटल्याबद्दल तोपर्यंत मनातल्या मनात कंपनीलाही दोष देऊन झाला होता. टायर बदलून आम्ही त्या ठिकाणापासून अर्धा-एक किलोमीटर आलो असू, त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला एका पंक्चर काढण्याच्या दुकानासमोरची लाइट सुरू असल्याचं दिसलं आणि आणखी दोन मोटारी त्या दुकानासमोर उभ्या असलेल्या दिसल्या. एकीचं पंक्चर काढण्याचं काम सुरू होतं, तर दुसरी प्रतीक्षेत. त्याचवेळी आणखी एक इनोव्हा आणि थोड्या वेळानं एक लक्झरी बस तशाच फटफटत आम्हाला पास करून गेल्या. तेव्हा मात्र हा पंक्चरचा प्रकार नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचं आमच्या ध्यानात आलं. दुकानापासून पलिकडं साधारण दीड-दोन किलोमीटरच्या अंतरावर काँक्रिटच्या खाचेत मोळे आणि पत्राच उभा रोवून ठेवला तर स्पीडमध्ये असलेली मोटार पंक्चर होऊन आपसूक आपल्यापासून जवळच येऊन थांबेल आणि पंक्चर काढून, नाइट चार्ज लावून महामार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांची लूट करता येईल, असा थेट विचार त्या पंक्चरवाल्यानं केलेला दिसला. आमच्याकडे स्टेपनी नसती तर आम्हीही त्याच्या दुकानासमोरचे तिसरे असणार होतो. मला त्याची तुलना एखाद्या दरोडेखोराशीच करावीशी वाटली. विश्वासार्हता तर गेलीच पण सचोटी, प्रामाणिकपणा या गोष्टींना पैशांसमोर काही महत्त्व उरलेलं आहे की नाही, असा प्रश्न मला पडला.
त्याचवेळी माझ्या मनात कोल्हापूरच्या शिरोली पुलाजवळच्या केरळी आण्णाची आठवण ताजी झाली. कोरगावकर पेट्रोल पंपाला लागून एक छोटंसं खोपटं होतं आण्णाचं- पंक्चर काढून देण्याचं. राहायचाही तिथंच, एकटाच. त्यावेळी आम्ही शिरोली एमआयडीसीमधल्या सकाळ ऑफिसमध्ये कामाला जायचो. रात्रीच्या वेळी एखाद्याच्या बाईकमधली हवा गेली किंवा पंक्चर झालं, तरी आण्णाचा आधार असायचा. त्या खोपटासमोर उभं राहून आण्णाआण्णा...अशा एक-दोन हाकांमध्येच आण्णाची आतून ..’ ऐकू यायची. झोपेला टाटा करतच आण्णा टॉर्च घेऊन बाहेर यायचा. समोरच्या बाईकची वास्तपुस्त होऊन त्यानं लगेच पाण्याची पाटी घेऊन काम सुरूही केलेलं असायचं. झटक्यात पंक्चर काढून टायरीत हवा भरून हो गया.. असं हसतमुखानं सांगून नेमकेच पैसे घेऊन आण्णा त्याच्या त्या सहा बाय सहाच्या गुहेत गडपही झालेला असायचा. त्याच्यासाठी हे रोजचंच असलं तरी त्या रात्रीच्या वेळी आण्णा संबंधिताला देवासारखा वाटायचा. २००५च्या मुसळधार पावसात पंचगंगेला महापूर येण्याच्या आदल्या रात्री आण्णानं तशा प्रचंड पावसात भिजत माझ्या बाईकचं पंक्चर काढून दिल्याची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. दुसऱ्या दिवशी त्या महापुराच्या पाण्यात आण्णाचं ते खोपट सुद्धा पाण्याखाली गेलं होतं. आण्णा आता कुठं गेला माहीत नाही. पण त्याच्या चांगल्या स्वभावाची, सहकार्याच्या भावनेबद्दल कृतज्ञतेची भावना इतक्या वर्षांनंतर (मी पैसे मोजले असून सुद्धा!) मला व्यक्त करावीशी वाटते.
या पार्श्वभूमीवर जेव्हा गेल्या आठवड्यातल्या घटनेकडं मी पाहतो, तेव्हा मनावर निराशेचं सावट येतं. पैशाचा मोह, लालूच माणसाला काहीही करायला भाग पाडते आणि मग त्यापायी सारासार विचारही तो करू शकत नाही की काय? मग पुढचा प्रश्नही मला पडतो- असा दुसऱ्याला फसवून वाममार्गानं (वाममार्गच तो!) मिळवलेला पैसा माणसाला लाभत असेल काय? त्याला, त्याच्या कुटुंबाला समाधान मिळत असेल काय? एखादं चुकून सापडलेलं पेनही असाच कोणीतरी बँकेतला अनोळखी माणूस आपल्याकडून मागून घेतो आणि खिशाला लावून गायबही होतो, असा अनुभव आपल्याला येतोच. मला शाळेच्या ग्राऊंडवर सापडलेला एक बीआरआयबॉल सुद्धा मॅच खेळताना शॉट मारल्यावर सापडला तसाच कुठं तरी गेला. मग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा लाभेलच कसा?
मी कल्याणला राहात असतानाचा प्रसंग. घर विकत घेण्यासाठी काही नवी जुनी घरं एजंटसोबत पाहात फिरत होतो. एक घर मला आवडलं सुद्धा. पण ठराविक किंमतीचा आणि ठराविक मुदतीत व्यवहार करण्याचा त्यांचा आग्रह आहे, असं एजंटकडून समजलं. घराचा कर्ता भेटला नाही पण, घरात त्या गृहिणीसोबत तिचा छोटा निरागस मुलगाही होता, टीव्ही पाहात बसलेला. घर पाहून परतताना एजंटला विचारलं, यांना तितकीच किंमत का हवीय? आणि इतक्या तातडीनं का व्यवहार करायचाय?’ त्यावर त्यानं जे सांगितलं, त्यानं मी सुन्न झालो. घरचा कर्ता ट्रॅफिकमध्ये होता. वरकमाईचे सर्व मार्ग धुंडाळून त्याच पैशातून घर घेतलेलं. पण आता घरात जो छोकरा आहे, त्याच्या हृदयाला छिद्र आहे आणि त्याचं तातडीनं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना घर विकायचंय. त्याचवेळी असलंघर न घेण्याचा निर्णय मी घेतलाच, पण त्या परिस्थितीतही मला आश्चर्य वाटलं. जो पैसा जसा आला, त्यानं आपली वाट शोधली होती. यात त्या बालकाचा काहीच दोष नव्हता, पण त्याला माध्यम करून त्या गृहकर्त्याला अद्दल घडवायचं नियतीनं ठरविलेलं दिसलं. पण, यातून तो शहाणा झाला तर ठीक, नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या! आणि पुन्हा त्याला अद्दल घडविण्यासाठी नियतीला नवे मार्ग धुंडाळावे लागणार, हे ओघानं आलंच.
माणसाची नीती, चारित्र्य आणि हेतू शुद्ध असले तर कदाचित त्याला कमी पैसा (हां, आता तुलना कोणाशी करता, हा मुद्दाही आहेच.) मिळेल, पण तो गरजा पूर्ण होण्याइतका निश्चित असेल आणि त्यामध्ये समाधान असेल, सुखाची झोप असेल, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच घरातली तुळशी कोमेजल्यानं मनी प्लँटच्या कुंडीत अगरबत्ती पेरणाऱ्या माझ्या बायकोच्या कृतीकडं काणाडोळा करणं, मला सहजगत्या जमतं.

सोमवार, १७ जून, २०१३

भरगच्च प्रतिसाद लाभलेली उत्कृष्ट कार्यशाळा!




('दै. कृषीवल'तर्फे आयोजित पहिल्या स्तंभ विचार परिषदेच्या अनुषंगाने अलिबाग येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेविषयी रविवार, दि. १६ जून २०१३ रोजीच्या 'कृषीवल मोहोर' पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला माझा लेख वाचकांसाठी सादर करीत आहे.)

दै. कृषीवलचा ७६वा वर्धापनदिन अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. दैनिकाचे मुख्य संपादक संजय आवटे यांनी कृषीवलच्या सर्व स्तंभलेखकांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरविले आणि अगदी दोन दिवसांत पहिल्या स्तंभ विचार परिषदेची संकल्पना आकाराला आली. दोन दिवसांचा अतिशय भरगच्च कार्यक्रम आणि त्यामध्ये प्रा. हरी नरके, न्या. डॉ. यशवंत चावरे, प्रा. जी.एस. भोसले आदी मान्यवरांसह सर्व नवे-जुने स्तंभलेखक सहभागी झाले. परिषदेची व्याप्ती कदाचित या सहभागींपुरतीच मर्यादित राहिली असती, जर तिला रायगड जिल्हास्तरीय बातमीदारांच्या कार्यशाळेची जोड मिळाली नसती तर! आवटे सरांबरोबरच कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांची भूमिकाही त्यामध्ये खूप महत्त्वाची ठरली. रायगड जिल्ह्यातील बातमीदारांची कार्यशाळा याचा अर्थ आम्ही रायगड जिल्ह्यातील केवळ कृषीवलच्या बातमीदारांची कार्यशाळा असा घेतला होता. तथापि, प्रत्यक्षात कृषीवलव्यतिरिक्तही जिल्ह्यातील प्रत्येक बातमीदारासाठी ही कार्यशाळा खुली होती, हे या कार्यशाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले, असे मला वाटते. आणि जिल्ह्यातील सुमारे ७९ बातमीदार या कार्यशाळेला उपस्थित राहिले, यावरुन कार्यशाळेचे महत्त्व आणि कृषीवलचे जिल्ह्यातील आदराचे स्थान या दोन्ही गोष्टी अधोरेखित झाल्या.
चित्रलेखा पाटील यांनी तर आपल्या मनोगतामध्ये कृषीवल माझा असला तरी जिल्ह्यातील कोणत्याही दैनिकाच्या बातमीदाराविषयी आपल्याला तितकीच आत्मियता असल्याचे स्पष्ट केले. यावरुन व्यावसायिक धोरणांच्या पलिकडे जाऊन कृषीवलचे व्यवस्थापन आजघडीलाही विचार करते आहे, पाहते आहे, याचे प्रत्यंतर आले.
सदरची कार्यशाळा पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि बातमीदारांची तयारी या विषयावर झाली. त्यामध्ये एकूण चार सत्रांमध्ये बातमी कशी लिहावी, काय लिहावी?, ग्रामीण वृत्तांकन, बदलणारी ग्रामीण पत्रकारिता, ऑनलाइन माध्यमे आणि नवे जग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मराठीत अचूक व प्रभावी कसे लिहावे?, पत्रकार आणि कायदे आणि माहिती अधिकार कायदा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयांवर अनुक्रमे शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव आलोक जत्राटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार, अहमदनगरचे लोकसत्ताचे वरिष्ठ बातमीदार अशोक तुपे, प्रहार ऑनलाइनचे संपादकीय प्रमुख जयकृष्ण नायर, आरसीएफ, अलिबागचे जनसंपर्क उपव्यवस्थापक धनंजय खामकर, पत्रकार-लेखिका स्मिता पाटील वळसंगकर, अधिपरीक्षक (पुस्तके व प्रकाशने) हर्षवर्धन पवार आणि राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार-लेखक-विचारवंत प्रा. जी.एस. भोसले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या सत्रामध्ये एबीपी माझाचे अँकर प्रसन्न जोशी यांनी 'बदलणारी माध्यमे- इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विशेष संदर्भात' या विषयावर विवेचन केले तर समारोप लोकमत मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर यांच्या हस्ते झाला. याखेरीज कार्यशाळेला संपादक सतीश धारप, प्रफुल्ल पवार, जयंत धुळप, बळवंत वालेकर, नागेश कुलकर्णी, सुभाष म्हात्रे, उमाजी केळुसकर, हर्षद कशाळकर, सुवर्णा दिवेकर, किशोर सूद, महेश पोरे, मोहन जाधव, सचिन पाटील आदी वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते. अलिबागमध्ये पत्रकारांसाठी इतकी मोठ्या प्रमाणात भरविण्यात आलेली आणि मुख्य म्हणजे पत्रकारांकडून इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेली ही अलिकडच्या काळातील सर्वाधिक यशस्वी व एकमेव कार्यशाळा ठरली असल्याचे एका सहभागी ज्येष्ठ पत्रकारानी सांगितले.
पत्रकारितेच्या क्षेत्राच्या माध्यमातून सर्वत्र वावरत असताना बातमीदारांमध्ये सर्वज्ञतेच्या भावनेचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे हे आता काय नवीन सांगणार?’ अशी भावनाही मध्येच डोके वर काढण्याचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना या कार्यशाळेस उपस्थित राहावेसे वाटले, ही त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती अद्याप कायम असल्याचे निदर्शक होती. जिल्हा पातळीवर किंवा ग्रामीण स्तरावर बातमीदारी करत असताना बातमीदारांमध्ये पत्रकारितेच्या मूळ प्रवाहांपासून एक प्रकारचे तुटलेपण येण्याची, गरज नसतानाही आवाका विनाकारण संकुचित होण्याची शक्यता असते. आज महाराष्ट्राच्या शहरीकरणाचा वेग ५० टक्क्यांहून अधिक आहे. या पार्श्वभूमीवर खेडी शहरीकरणाकडे तर शहरे मेगा-शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे शहरी-ग्रामीण सीमारेषा तितक्याच वेगाने पुसट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण बातमीदारांनी शहरीकरणाचे, विशेषतः पत्रकारितेमध्ये शहरीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या अनुषंगाने होत चाललेले बदल अभ्यासून ते आत्मसात करण्याची आजघडीला तीव्र गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने कृषीवलने आयोजित केलेली कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरली, असे म्हणता येईल.
उद्घाटनाच्या सत्रामध्ये उद्घाटक प्रा. भोसले यांनी पत्रकारितेमध्ये नवनवे प्रवाह, बदल येत गेले असले तरी मूलभूत सामाजिक दृष्टीकोन बदलता कामा नये, असे मत मांडले तर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाचा वाढता वरचष्मा आणि मनोरंजनाच्या झंझावातामध्ये बातमीचे घसरणारे मूल्य चिंताजनक असल्याचे सांगितले. प्रसन्न जोशी यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करत असताना सांभाळावी लागणारी अष्टावधाने आणि त्यामधून २४x७ बातमी देण्याचे हमखास बंधन यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील बातम्यांना इन्फोटेनमेंटचे स्वरुप आल्याचे सांगितले. त्या तुलनेत मुद्रित माध्यमांमध्ये बातमीची शहानिशा आणि अधिक तपशील देण्यासाठी उपलब्ध वेळ यामुळे या माध्यमाची विश्वासार्हता आणि वार्तामूल्ये अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळली जातात, असे सांगितले.
त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बातमीलेखनाविषयी मी मार्गदर्शन केले. केवळ शहरी भागात काम करण्याची संधी न मिळणे म्हणून ग्रामीण हा शिक्का पत्रकारांवर बसतो, तथापि, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगिकाराने ही दरी कमी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भारताच्या विकासासाठी केंर्द व राज्य शासनाच्या स्तरावर ज्या काही अनेकविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्यांच्या योग्य अंमलबजावणीचा आग्रह धरणे, त्यावर लक्ष ठेवणे आणि त्यासंदर्भात फीडबॅक देणे, अशा विकासात्मक जबाबदारी या पत्रकारांवर आहे. त्या दृष्टीने आपण सारे ग्रामीण नव्हे, तर विकास पत्रकार आहात, अशी भावना बाळगण्यास सांगितले.
यानंतर भगवान दातार सरांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून बातमी करण्याची संधी कशी डोकावत असते, फक्त आपण ती साधणे पत्रकारितेत किती महत्त्वाचे असते, ते उदाहरणांसह स्पष्ट केले. पुढच्या सत्रामध्ये स्मिता पाटील-वळसंगकर यांनी प्रभावी पत्रकारितेसाठी मराठी शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे महत्त्व मौलिक असल्याचे सांगितले. भाषा समृद्धीच्या दृष्टीने आणि व्यासंगी  पत्रकारितेच्या दृष्टीने पत्रकारांनी चौफेर, डोळस वाचन आणि प्रयोगशील लेखणी या दोन गोष्टींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जगदीश मोरे यांनी माहिती अधिकार कायद्यामुळे पत्रकारांच्या हातामध्येही माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त अस्त्र प्राप्त झाले असून त्याचा समाजहितासाठीच वापर करावा, असे आवाहन केले. केंद्र व राज्य निवडणूक आयोगांची कार्यप्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनजागृतीच्या कामी पत्रकारांचे योगदान कसे मोलाचे ठरते, याचे विवेचन त्यांनी केले. हर्षवर्धन पवार यांनी पुस्तके व प्रकाशने विभागाचे महत्त्व आणि पत्रकारांकडून, संपादकांकडून शासनाच्या अपेक्षा याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. अशोक तुपे यांनी पत्रकारितेच्या आजच्या बदलत्या स्वरुपामध्ये ग्रामीण पत्रकारांचे योगदान आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार असून त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण वार्तांकनावर त्यांनी भर देणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. धनंजय खामकर यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि पत्रकारितेचे साहचर्य अतिशय अत्यावश्यक असून पत्रकारांच्या योग्य सहकार्याखेरीज कोणताही जनसंपर्क यशस्वी होऊच शकणार नाही, असे मत मांडले. जयकृष्ण नायर यांनीही ऑनलाइन माध्यमाचा स्वीकार ही काळाची गरज असून सर्वच बातमीदारांनी त्या दृष्टीने आवश्यक बदलांचा अंगिकार केला पाहिजे, असे मत मांडले.
समारोपाच्या सत्रामध्ये लोकमत, मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीमध्ये स्थानिक बातमीदारांनी बदलत्या प्रवाहांचे भान स्वीकारून त्यांना अनुरुप असे बदल स्वतःच्या कार्यशैलीमध्ये करावेत, असा मौलिक सल्ला दिला. त्याचप्रमाणे पत्रकारितेमध्ये व्यवस्थापनाचे महत्त्व वाढण्याची कारणमीमांसा करत असतानाच तशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी आणि भान राखून पत्रकारिता करता येऊ शकते, हे अनेक उदाहरणांसह पटवून दिले.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील एकूणच बदलत्या प्रवाहांचा समान धागा घेऊन पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे कशी जोपासता येतात, याविषयी सर्वच मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. श्री. आवटे आणि श्रीमती पाटील यांनी अवघ्या एका दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये किमान चार दिवसांच्या कार्यशाळेइतक्या माहितीचा खजिना रायगड जिल्ह्यातील बातमीदारांना उपलब्ध केला. केवळ व्याख्यानांच्या स्वरुपातच नव्हे तर लेखी टिपण, मुद्देही उपलब्ध केले, जेणे करून या कार्यशाळेतील मूलभूत माहिती सदैव त्यांच्या हाताशी राहील, याची दक्षता आयोजकांनी घेतली. या अतिशय नेटक्या, आटोपशीर कार्यशाळेला मिळालेला भरगच्च प्रतिसाद पाहता आम्हा मार्गदर्शकांनाही एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे समाधान लाभले.

सोमवार, १० जून, २०१३

‘गुरूमित्रा’चं यश!



Sunjay Awate

Alok Jatratkar
 मित्र हो, यंदाचा वीकेंड हा गेल्या वर्षभरातला माझा सर्वाधिक अविस्मरणीय असा ठरला. या शनिवारी-रविवारी (दि. ८/९ जून) मी अलिबागला (रायगड) गेलो होतो... नाही... तुम्हाला वाटलं तसं फिरायला नव्हे तर माझे गुरू आणि मित्र (गुरूमित्रसंबोधन मस्त वाटेल ना!) संजय आवटे सरांनी दै.कृषीवलच्या ७७व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दोन दिवसांच्या पहिल्या स्तंभ विचार परिषदेचे आयोजन केलं होतं. कृषीवलचे बरेचसे स्तंभलेखक या परिषदेला उपस्थित राहिले आणि प्रा. हरी नरके सर, न्या. डॉ. यशवंत चावरे, ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार आदी मान्यवरांच्या सान्निध्यात अप्रतिम अशी वैचारिक मेजवानीच मिळाली. बरोब्बर वर्षभरानंतर पुन्हा अलिबागला गेलो तरी यंदा अलिबागचा किल्लाच काय, पण किनाराही पाहता आला नाही. पण त्याचं शल्य बिल्कुल नाही कारण या वैचारिक लाटांच्या तुषारांनीच आम्ही सारे चिंब चिंब झालो. या विचार सागराच्या किनाऱ्यावर बसलेल्यांनाही कळालं नाही की, आवटे सरांनी केव्हा त्यांना या प्रवाहात खेचलं आणि त्यात डुंबण्याचा आनंद मिळवून दिला. आमच्या या गुरुमित्रानं अवघ्या दोन दिवसांमध्ये केवळ स्नेहमेळावा म्हणता म्हणता इतका अप्रतिम आणि नेटका कार्यक्रम आयोजित केला की आम्ही (सारे) खरोखरीच त्यांच्या नियोजन कौशल्यानं प्रभावित झालो. (गडी बिनधास्त; त्याला अभ्यास अन् आत्मविश्वासाची जोड! मग यश मिळेल नाही तर काय?)
शनिवारी सायंकाळी ५ वाजता न्या. चावरे, प्रा. नरके यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं आणि पुढे रात्री अकरापर्यंत अलिबागच्या पीएनपी सभागृहात सलग सहा तास एक नितांतसुंदर वैचारिक, सांस्कृतिक मैफलच जमली. प्रा. नरके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एकूणच पत्रकारितेतील प्रवाहांचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत असताना वृत्तपत्रीय लेखनाची सर्वंकष चिकित्सा केली. समाजाभिमुख विचारांची मांडणी वृत्तपत्रीय स्तंभलेखनातून होण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच दै. कृषीवलने या क्षेत्रामध्ये द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राच्या आदर्शाबरहुकूम वाटचाल चालविली असल्याचे गौरवोद्गारही काढले.
आवटे सरांनी यावेळी ही जात का जात नाही?’, ’लिहील्यानं काय फरक पडतो?’ आणि माझी.. बाई माणसाची कहाणी!’ अशा तीन अतिशय वेगळ्या परिसंवादांचंही आयोजन केलं. कृषीवलच्या स्तंभलेखकांनी या तीन परिसंवादात सहभाग घेतला. पहिल्या परिसंवादामध्ये माझा आणि माझे मित्र जगदीश मोरे यांचा सहभाग होता. जात ही मनात खोलवर रुजलेली गोष्ट आहे, व्होट बँक म्हणून तिला मिळणारे राजकीय पाठबळ ही चिंतेची बाब आहे. आंबेडकरांनी दिलेल्या स्त्री-पुरूष समानता, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह, धर्मचिकित्सा आणि लोकशिक्षण या पंचसूत्रीची अंमलबजावणी जोपर्यंत सार्वत्रिक प्रभावी रितीने होणार नाही, तोपर्यंत ती नष्ट होण्याची अपेक्षा करता येणार नाही, असा सूर या परिसंवादात व्यक्त झाला.
लिहिल्यानं काय फरक पडतो?’ या परिसंवादात अन्य मान्यवरांबरोबरच माझे मित्र युवराज पाटील सहभागी झाले होते. लिहिणं ही वैयक्तिक अभिव्यक्तीबरोबरच आत्मानंद देणारी आणि वैयक्तिक अनुभवांना वैश्विक समावेशनाचा अर्थ देणारी बाब आहे. वैयक्तिक आणि सामाजिक अभिव्यक्ती आणि अभिसरणाच्या दृष्टीनं लिहीण्याचं महत्त्व या परिसंवादात अधोरेखित झालं.
अखेरच्या माझी... बाईमाणसाची कहाणी!’ या परिसंवादात कृषीवलच्या समस्त स्त्री स्तंभलेखकांनी सहभाग घेतला. हा परिसंवाद अतिशय वेगळा ठरला. सहभागी लेखक महिलांचं अनुभवविश्व, कार्यक्षेत्र वेगवेगळं होतं. त्यामुळं बाई म्हणून आणि माणूस म्हणून समाजात वावरताना आलेले त्यांचे अनुभव वेगवेगळे असले तरी उपस्थितांना अंतर्मुख करून विचार करायला लावणारे होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही बाईचं माणूसपण नाकारलं जातंय, याची जाणीव अधोरेखित झाली. पण त्याचवेळी आयुष्यात आलेल्या अडचणींना सामोरे जात त्यांचा कणखरपणे मुकाबला करणाऱ्या अश्विनी सातव-डोके आणि स्मिता पाटील- वळसंगकर यांचे अनुभव प्रेरणादायी होते, आशा पल्लवित करणारे होते.
त्यानंतर झालेल्या काव्य संमेलनामध्ये तर तरुणांपासून अलिबागमधील वयस्कर महिलांपर्यंत साऱ्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या, त्या पाहून साऱ्या सभागृहात चैतन्याचा प्रवाहच जणू वाहू लागला. यामध्ये आमचा मनस्वी चिंतक मित्र हर्षवर्धन पवार यानंही नागरीकरणासंदर्भातली कविता वाचली. गझलकार दिलीप पांढरपट्टे यांचा गझलेचा अभ्यास आणि दांडगा व्यासंग यांचंही दर्शन यावेळी झालं. भारीच!
या काव्य संमेलनानंतर छोटेखानी लघुपट महोत्सव झाला. पुण्याच्या प्रथमेश इनामदार याच्या लाइफ सर्कल या लघुपटाचा प्रिमियर शो सुरवातीला झाला. मूल दत्तक घेण्यायासंदर्भात आजही समाजामध्ये असलेल्या जाणीवेचा अभाव आणि रक्ताच्या नात्यापलिकडल्या नातेसंबंधावर प्रकाश टाकण्याचा त्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य होता. दादू.. एक निःशब्द हुंदका हा अलिबागच्या किरण साष्टे याचा लघुपट अतिशय सर्वांगसुंदर होता. एका मुक्या गरीब कोळ्याची, मुलीच्या वाढदिवसाला केवळ तिच्या शाळेत चॉकलेट वाटण्यासाठीच्या खर्चाची तजवीज करण्यासाठीची धडपड याची ही कथा. अतिशय नेटकं दिग्दर्शन, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि भावस्पर्शी कथानक यामुळं खरंच हृदयाचा ठाव घेणारा लघुपट अलिबागच्या मुलांनी साकारला आहे. यानंतर माझे बंधू अनुप जत्राटकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वसुंधरा चित्रपट महोत्सवात नावाजल्या गेलेल्या पंचगंगा: द जर्नी फ्रॉम संगमा टू संगमा या ४० मिनिटांच्या लघुपटाचा १० मिनिटांचा शॉर्ट-व्हर्जन प्रदर्शित करण्यात आला. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या अनुषंगानं एकूणच जलप्रदूषणाच्या समस्येवर प्रकाश टाकणारा हा लघुपट आहे. या प्रत्येक कार्यक्रमाच्या अध्येमध्ये अलिबागचा एक उत्कृष्ट तरुण नकलाकार प्रतीम सुतार यानं त्याच्या विविध नकलांनी अक्षरशः धमाल आणली.
पहिल्या दिवसाचं हे सत्र रात्री अकरा वाजता संपलं, तरी उपस्थितांचा उत्साह कायम होता. त्याच उत्साहात किहीम बीचवरील रिसॉर्टच्या दिशेनं साऱ्यांनी कूच केलं. गरमागरम चवदार जेवणाचा आस्वाद घेत तिथं पुन्हा साऱ्यांची एक अतिशय अनौपचारिक मैफल रंगली. आणि रात्री रुममध्ये जगदीश, युवराज, हर्षा आणि मी, अशी मैफलीनंतरची मैफल, उत्तररात्रीपर्यंत रंगली. बऱ्याच दिवसांनी आम्ही असे निवांत मोकळेपणी भेटत होतो, बोलत होतो. थँक्स टू संजय आवटे सर!
पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी रायगड जिल्ह्यातील पत्रकार मित्रांसाठी आयोजित पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि बातमीदारांची तयारीया विषयावरील कार्यशाळेसाठी आम्ही पीएनपी सभागृहात आलो. ७९ पत्रकारांची नोंदणी हा रायगडच्या इतिहासातील विक्रम होता, असं सरांनी सांगितलं. ज्येष्ठ लेखक विचारवंत प्रा. जी.एस. भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झालं. एबीपी माझाचा प्रसन्न जोशी याची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्यानं त्याच्या नेहमीच्या तडाख्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि मुद्रित माध्यमांसंदर्भात तुलनात्मक बदलांचा आढावा घेतला. त्यानंतर बातमी कशी लिहावी?’ या विषयाबाबत सांप्रत लेखक महोदयांनी (म्हणजे मीच!) मार्गदर्शन केलं. टेक्निकल आणि बेसिक गोष्ट असल्यानं रटाळपणाची झलक त्यात होती, तरीही नेटानं रेटलं. बातमीदारी करत असताना बातमीचं लेखन या मूलभूत गोष्टीकडं बरेचदा काणाडोळा होण्याचा धोका असतो, तो उलगडून दाखविण्याचा माझा प्रयत्न बराचसा यशस्वी झाल्याचं संपादक महोदयांनी सांगितलं. त्यामुळं होस्ट खूष तो आपुन भी खूष, अशी भावना मनी दाटली. कोसळत्या पावसाचा मुकाबला करत कोल्हापूर नगरीला परत फिरावयाचं असल्यानं स्मिता वळसंगकर आणि जगदीश यांची दोन लेक्चर ऐकून आम्ही निघालो. तत्पूर्वी वरिष्ठ पत्रकार अशोक तुपे, जयंत धुळप यांची भेट झाली. निघता निघता विनायक पात्रुडकर सरही दारातच भेटले. बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट झाल्यानं आनंदही वाटला.
अशा प्रकारे एक उत्साहित करणारा वीकेंड आवटे सरांनी अतिशय कष्टपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक घडवून आणला, नव्हे आम्हाला गिफ्टच केला. जुन्या मित्रांना भेटण्याचा योग होताच, पण बरेच नवे मैत्रीचे धागेही या परिषदेच्या निमित्तानं जुळून आले, ही त्यातली आमची फार मोठी कमाई. या स्नेहमेळ्याचं आयोजन करण्यासाठी आमच्या गुरूमित्राचं यश ही त्यातली माझ्यासाठी सर्वाधिक आनंददायी बाब ठरली. आगे बढिए, सर। हम तुम्हारे साथ है!