सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

भुजबळ नावाचा ‘माणूस’!


(राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री श्री. छगन भुजबळ यांचा उद्या मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस! जनसंपर्क अधिकारी म्हणून भुजबळ साहेबांसोबत सुमारे साडेतीन वर्षे काम करण्याचा योग आला. मुलुखमैदानी तोफ, झंझावात अशी विशेषणे लाभलेल्या भुजबळ साहेबांची कार्यपद्धती या काळात अगदी जवळून पाहता आली. वादळं तर नेहमीच त्यांच्याभोवती निर्माण होत राहिली, पण तरीही एक 'माणूस' म्हणून त्यांचं मोठेपण वादातीत आहे. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं रहस्य मला जाणवतं. माझ्या या ब्लॉग रुपी व्यासपीठावरुन भुजबळ साहेबांचं वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन!- आलोक जत्राटकर)
हा प्रसंग आहे साधारण सन १९८४-८५मधला. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराचं वारं जोरात वाहात होतं. आणि त्या काळात टीव्ही या माध्यमाचं नव्यानंच आगमन झालेलं असल्यानं आजच्यासारखं घरोघरी टीव्ही असं चित्र नव्हतं. आमच्या घरी सुद्धा फक्त रेडिओ होता. मी तेव्हा दुसरी-तिसरीत होतो आणि टीव्हीच्या सेटचं कधी दुरुनही दर्शन घेतलेलं नव्हतं. अशा परिस्थितीत मी वडिलांसोबत कोल्हापूरला त्यांच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी टेबलवर विराजमान झालेला टीव्ही मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. त्या आयताकार बुश कंपनीच्या ब्लॅक ॲन्ड व्हाइट टीव्हीच्या स्क्रीनवर निळी काच लावून रंगीत बनविलेला आणि त्या घरासाठी तो एक अतिशय (साहजिकच) प्रेस्टीजचा मुद्दा बनलेला होता. त्याविषयी ते बाबांना सांगत असताना माझं लक्ष स्वाभाविकपणे त्या टीव्हीच्या पडद्यावरुन हटत नव्हतं. बाहेर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं माहीत असलेल्या मला त्या घरातल्या थिएटरची भुरळ पडली. त्याचवेळी त्या पडद्यावर शिवसेनेचे निवडणूक प्रचारक-प्रवक्ता म्हणून एका नेत्याचं भाषण सुरू झालं. गोल चेहरा, कमावल्यासारखी देहयष्टी आणि भेदक डोळे अशी वैशिष्ट्यं नजरेत भरली. त्याच वेळी पडद्यावर त्यांचं नाव झळकलं- श्री. छगन भुजबळ! माणसाच्या वक्तृत्वासारखाच त्यांच्या नावातही फोर्स होता. त्यापूर्वी हे नाव माझ्या ऐकण्यात येण्याचं कारण नव्हतं. पण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेला टीव्ही आणि त्या टीव्हीवर प्रथमच पाहिलेला भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा आणि तितक्याच भारदस्त नावाचा व्यक्ती या दोन्ही गोष्टी माझ्या कायम स्मरणात कोरल्या गेल्या. पुढं याच व्यक्तीचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची, वावरण्याची संधी आपल्याला मिळणार आहे, याची त्यावेळी माझ्या बालमनाला कल्पना असण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण.. तसं झालं खरं..!
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये सन २००५ साली मी सहाय्यक संचालक (माहिती) या पदावर रुजू झालो. आणि २००९च्या जुलैमध्ये उप-मुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली आणि तेव्हापासून मी छगन भुजबळ साहेबांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलो. त्यापूर्वी विविध बैठका, कार्यक्रम तसेच विधीमंडळाची अधिवेशनं यांच्या कव्हरेजच्या निमित्तानं भुजबळ साहेबांची भाषणं ऐकण्याचा योग आलेला होता; पण, प्रत्यक्ष बातचीत वगैरे अशी काही झाली नव्हती. मात्र, जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत असताना या माणसाच्या विविध पैलूंचा मला खूप जवळून अनुभव घेता आला. उप-मुख्यमंत्री आणि अधिकारी म्हणून आमच्या दोघांमध्ये मी नेहमीच अंतर राखून राहात होतो; पण, एक चांगला व्यक्ती म्हणून, सहृदयी माणूसम्हणून माझं त्यांच्याशी जे बाँडिंग झालं, ते माझ्या दृष्टीनं खूप मोलाचं आहे.
भुजबळ साहेबांच्या विषयी लोकोपवाद, मतप्रवाह बरेच आहेत. त्यांच्या आक्रमक आणि संघर्षशील स्वभावामुळं त्यांच्याविषयी सातत्यानं नवनवे वाद-प्रवाद जन्माला येत असतात, घातले जात असतात. पण, इतक्या साऱ्या संघर्षांच्या प्रसंगांना तोंड देऊन, अनेक जीवघेण्या प्रसंगांतून वाचून, अनेक आरोप-प्रत्यारोप पचवून हा माणूस पुनःपुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणं यशस्वीपणानं आकाशात उड्डाण करीत राहिला आहे. साहेबांसोबतच्या उण्यापुऱ्या साडेतीन वर्षांच्या सहवासात मला त्यांच्या या संघर्षशील वृत्तीचा अनेकदा प्रत्यय घेता आला. माझ्या मते, या साऱ्याचं रहस्य त्यांच्या माणूसपणातच दडलेलं आहे.
भाजी मंडईत भाजी विकून शालेय शिक्षण पूर्ण करून पुढं इंजिनियर होण्यापर्यंत मजल मारणाऱ्या, चाळीस-पन्नास वर्षांची राजकीय कारकीर्द यशस्वीपणे घडविणाऱ्या, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या छगन भुजबळांनी आजही आपल्या रुट्सचा विसर पडू दिलेला नाही. कितीही भराऱ्या ते मारत असले तरी जमिनीशी नातं आणि इमान त्यांनी सुटू दिलेलं नाही. जिथून ते आले, जिथं घडले त्या माझगावला तिथल्या लोकांना आजही साहेबांच्या मनात आणि परिवारात अगदी घरच्यासारखं स्थान आणि मान आहे. तिथली गोकुळाष्टमी, गणेशोत्सव असो की कुठलाही छोट्यात छोटा कार्यक्रम असू दे, साहेब आपला सारा मानपान विसरून त्यात सहभागी झाल्याचं मी पाहिलं आहे. सकाळी साडेसहा- सात वाजल्यापासूनच परिसरातल्याच नव्हे, तर राज्याच्या आणि अलिकडे तर देशाच्या विविध ठिकाणांहून भुजबळ साहेबांना भेटण्यासाठी बंगल्यावर लोकांची रीघ असते. या लोकांना अगत्यानं बसवून चहापाणी देण्याचा रिवाज त्यांनी अगदी सुरवातीपासून कटाक्षानं सांभाळला आहे. आलेल्या माणसाचं काम होईल न होईल, पण तो समाधानानं परत गेला पाहिजे, याकडं साहेबांचा कटाक्ष असतो आणि त्यांनी तो अखंडपणे सांभाळला आहे. पडणाऱ्याला सावरणं, रडणाऱ्याला सांभाळणं आणि विनाकारण रडणाऱ्याला खडसावणं या साऱ्याच गोष्टी भुजबळ साहेबांना एकाच वेळी कशा काय जमू शकतात, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. पण माणसांची कदर आणि पारख करणाऱ्या या माणसाचं हेच वैशिष्ट्य तर लोकांना आवडतं, ही गोष्ट लक्षात घेतली की त्यांच्याविषयी मग कोणताच प्रश्न पडत नाही.
भुजबळ साहेबांच्या बाबतीत त्यांच्या ज्येष्ठ पत्रकार मित्रांचा एक आक्षेप नेहमी असतो की, त्यांना माणसं कळत नाहीत आणि ती माणसं त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि काम झालं की निघून जातात. ही गोष्ट साहेब हसण्यावारी घालवत असले तरी त्यात तथ्य आहे. तथ्य हे आहे की, साहेब त्यांच्यासोबत असणाऱ्या साऱ्यांवरच खूप मनापासून प्रेम करतात. जो आला तो आपला, आणि गेला तोही आपलाच!’ असं त्यांचं त्यांच्याभोवतीच्या लोकांच्या बाबतीतलं सरळसोट समीकरण आहे, हे मला अनुभवांती लक्षात आलं. राजकीय विरोध सोडला तर भुजबळ साहेब हे अजातशत्रूच म्हणायला हवेत. अगदी शत्रू जरी दारी आला, तरी त्याचं हसतमुखानं स्वागत करण्याइतक्या दर्यादिल स्वभावाचा हा माणूस आहे. एखादा माणूस त्यांच्यापासून दूर गेला, जाऊ लागला तर आजही ते कासावीस होतात. हा माणूस दुरावण्यात आपला तर काही दोष नाही ना?, असं ते स्वतःला पुनःपुन्हा विचारतात; संबंधितालाही विचारतात. मग जाणाऱ्या व्यक्तीचाच त्यात काही अन्य हेतू असला तर तो समजून घेऊन अगदी मनापासून शुभेच्छा देतात. याचा अनुभव प्रत्यक्ष मलाही आला. माझी जेव्हा शिवाजी विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव पदी निवड झाली, तेव्हा मी त्यांना माहिती व जनसंपर्क विभाग सोडत असल्याचं सांगितलं, तेव्हा ते क्षणभर स्तब्ध झाले. पण लगेच खरंच जाणार का?’ या त्यांच्या प्रश्नानं माझं मनही क्षणभर विचलित झालं. पण ही नवी संधी माझ्या शैक्षणिक क्षेत्रातल्या कारकीर्दीसाठी मला महत्त्वाची वाटत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी तितक्याच मोकळ्या मनानं परवानगी दिली.
भुजबळ साहेबांच्या माझ्यावरील प्रेमाचं एक उदाहरण दिल्यावाचून राहावत नाही. मध्यंतरी काही राजकीय घडामोडींमुळं अजितदादा पवार उप-मुख्यमंत्री झाले आणि भुजबळ साहेबांकडं सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागांच्या मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा त्यांनी मला रामटेकवर बोलावलं आणि तू माझ्यासोबत काम करावंस, अशी माझी इच्छा आहे, असं म्हणाले. वसंत पिटके साहेब आणि हरी नरके सर साक्षीदार आहेत, या प्रसंगाचे! 'तू माझ्याबरोबर काम कर रे', असा आदेशही ते देऊ शकले असते, पण त्यांच्या या अतिशय सौहार्दपूर्ण वाक्यानं मी हेलावलो. मी तसा कोण होतो त्यांच्यासमोर? चाळीस वर्षांहून अधिक- अतिशय संस्मरणीय आणि वादळी राजकीय कारकीर्द असलेल्या भुजबळ साहेबांसमोर तसं माझं काय मोठं आस्तित्व होतं? जेमतेम सहा वर्षांची पत्रकारितेतली आणि चार वर्षांची शासनातली नोकरी. पण त्यांच्या सन्मानपूर्वक बोलण्यामुळं मी त्यांना होकार दिला. खोटं सांगत नाही, दुसऱ्या दिवशी 'रामटेक'वर जेव्हा पर्यटन सचिव, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, सह-व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक झाली, त्यावेळी 'एमटीडीसी'वर व्यवस्थापक (जनसंपर्क) या पदावर माझी नियुक्ती करण्याबाबतच्या पत्रावर साहेबांनी पहिली सही केली. इतकं त्यांचं प्रेम होतं.
भुजबळ साहेबांसोबत काम करताना खूप मजा आली. रात्री बारा बारा वाजेपर्यंत कित्येकदा भाषणं तयार करत बसलो मंत्रालयात. पण त्यावेळीही ऑफिसबाहेर पडताना एक उत्तम भाषण आपल्या हातून तयार झाल्याचं समाधान असायचं. भुजबळांसारख्या वक्तृत्वावर प्रचंड प्रभुत्व असणाऱ्या मुलुखमैदानी तोफेला शब्दरुपी दारुगोळ्याची रसद पुरवण्याची संधी मला मिळाली आणि माझे शब्द त्यांच्यासारख्या मास-लीडरच्या तोंडून लाखोंच्या जनसमुदायाला नादावून सोडताहेत, हे दृश्य कित्येकदा पाहण्याचं भाग्य मला मिळालं. भुजबळ साहेबांशी कामाचं ट्युनिंगही खूप उत्तम प्रकारे जमलं होतं. एखाद्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर केवळ 'जत्राटकर' असं लिहून खाली सही करून ती माझ्याकडं आली, की त्याचं काय करायचं ते मला क्लिअर व्हायचं. अगदी महत्त्वाचा विषय असला की मी त्यांना काय मुद्दे अपेक्षित आहेत, त्याची चर्चा करायचो आणि त्यांच्या सूचनेनुरुप भाषण तयार करायचो. कित्येकदा वेळेअभावी सभेच्या मंचावर गेल्यावरच साहेबांना भाषणाची कॉपी वाचायला मिळायची आणि ते डायरेक्ट भाषण करायचे. इतका त्यांचा विश्वास माझ्यावर होता. भुजबळ साहेबांचा हा विश्वास मला जिंकता आला आणि त्याला कधीही धक्का देण्याचं काम माझ्याकडून झालं नाही, ही त्यांच्यासोबतच्या कारकीर्दीतली फार मोठी उपलब्धी वाटते मला. विश्वास जिंकणं सोपं असतं, पण त्याला क्षणात तडा जाऊ शकतो. सुदैवानं माझ्या विश्वासार्हतेला कधीही तडा जाणार नाही, याची सातत्यानं दक्षता घेतली. 'डीजीआयपीआर'मधून रिलिव्ह होत असताना मी भुजबळ साहेबांसोबत आणि त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा जेव्हा आढावा घेतला, तेव्हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी मिळून सुमारे साडेतीनशे भाषणं, साधारण तितक्याच बातम्या आणि त्याखेरीज सप्लीमेंटरी आर्टिकलच्या स्वरुपातल्या सतराशेहून अधिक फाइल्स इतका डाटा रेकॉर्ड मला आढळून आला. एरव्ही ठरवलं असतं तरी इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर लिखाण होणं, ही अशक्यप्राय गोष्ट होती माझ्यासाठी! ती भुजबळ साहेबांसारख्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाच्या सान्निध्यामुळं शक्य झाली.
दि. 21 जून 2012 रोजी मी रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. दुर्दैवानं त्याच दिवशी दुपारी मंत्रालयाला अग्नीप्रलयानं वेढलं. त्यामुळं इमर्जन्सी ड्युटी म्हणून दोन दिवसांत पुन्हा भुजबळ साहेबांसोबत दाखल झालो. त्यांच्या कामाचा झपाटा, प्रचंड आवाका, आत्मविश्वास आणि ठरवलं ते तडीस नेण्याच्या वृत्तीचा अनुभव मला या काळात घेता आला. संपूर्ण मंत्रालयाच्या इमारतीमध्ये त्यांनी तीन दिवसांत संपूर्ण मजले किती वेळा चढून-उतरून पाहणी केली, याची गणतीच नाही. ठरवल्याप्रमाणं तीन दिवसांत मंत्रालय पूर्ववत सुरू करून त्यांनी त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची प्रचितीच साऱ्या जगाला आणून दिली. त्यावेळी मनोमन मी त्यांना शेकडो सलाम केले असतील.
व्यापक सामाजिक हिताची जाणीव हा सुद्धा भुजबळ साहेबांचा मला भावलेला वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. समाजाच्या तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नांकडं संवेदनशीलपणानं पाहण्याची दृष्टी आज राज्यात शरद पवार यांच्या बरोबरीनं केवळ भुजबळ साहेबांमध्येच आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेऊन राजकारणातून समाजकारणाचं जे ध्यासपर्व भुजबळ साहेबांनी आरंभलं आहे, त्याला तोड नाही.
नातेसंबंधांच्या बाबतीत भुजबळ साहेब हे अतिशय भावनाप्रधान, हळवे व्यक्ती आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व नारळासारखं आहे- वरुन कठोर आणि आतून मऊ अन् मधुर. म्हणूनच तर जो त्यांच्या सान्निध्यात आला, तो त्यांचाच होऊन गेला. कुटुंबियांच्या बाबतीत त्यांचं हळवेपण पराकोटीचं आहेच, पण जोडलेल्या माणसांच्या बाबतीतही ते तितकंच टोकाचं आहे. साहेब उप-मुख्यमंत्री असताना त्यांचे एक खूप जवळचे पत्रकार मित्र निवृत्त झाले, त्यावेळी त्यांना बंगल्यावर बोलावून साहेब त्यांचा सत्कार करू शकले असते. पण, तसं न करता त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना निवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सहृदयतेचे असे अनेक प्रसंग माझ्या पाहण्यात आले.
भुजबळ साहेबांना प्रसारमाध्यमांचीही खूप तीव्र जाण आहे. आपली कारकीर्द घडविण्यामध्ये प्रसारमाध्यमांचा आणि माध्यम प्रतिनिधींचा मोलाचा वाटा आहे, याची जाणीव त्यांच्या मनात नेहमीच असते. त्यामुळंच मिडियामध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत. बरं, हे मित्र आहेत म्हणून भुजबळांच्या विरोधात लिहायचे नाहीत, असं नव्हतं. ते लिहीत असत आणि साहेब त्यांचं लिखाण गांभिर्यानं वाचून त्यावर आत्मपरीक्षण करत असत. आजही त्यांची ही चिंतनाची प्रक्रिया नेहमी सुरूच असते. पण, विनाकारण आणि आपली बाजू समजून न घेता माध्यमांतून केल्या जाणाऱ्या आरोपांनी मात्र ते अस्वस्थ होतात. केलं असेल तर केलं म्हणून सांगण्याची, स्वीकारण्याची तयारी असणाऱ्या माणसाला अशा गोष्टींची चीड येणं स्वाभाविक आहे. पण, शेवटी या मिडियाची अपरिहार्यता लक्षात घेण्याचीही सक्षमता त्यांच्याकडं आहे. त्यामुळं या गोष्टी ते मोठ्या प्रयत्नपूर्वक पाठीवर टाकून रिकामे होतात. ही सोपी गोष्ट नाहीय. त्यामुळंच साहेबांसोबत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत असताना प्रसारमाध्यमांनाही अधिक वेगळ्या पद्धतीनं मला समजावून घेता येऊ शकलं.
भुजबळ साहेबांच्या बाबतीत सांगण्यासारखं बरंच आहे. नुकतेच एका स्थानिक निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं कोल्हापूरच्या विमानतळावर ते उतरले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मी जेव्हा गेलो, तेव्हा मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं स्मितहास्य मी कधीच विसरू शकणार नाही. आपुलकीनं कसं चाललंय तुझं? खूष आहेस ना  इथं?’ अशी त्यांनी विचारपूस केली.आपला माणूस आठवण ठेवून भेटायला आला, याचं समाधान त्यातून झळकत होतं. नाही तर, त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमधलाच मी एक होतो. त्यांच्यासारखंच यंत्रवत त्यांनी माझ्या स्वागताचा स्वीकार केला असता तरी बिघडलं नसतं. पण आफ्टरऑल ते भुजबळ आहेत.
दातृत्व, गरजू व्यक्तीला सढळ हस्ते आणि निरपेक्ष भावनेनं मदत करण्याची वृत्ती, पराकोटीची सहृदयता बाळगून असणाऱ्या या माणसानं आयुष्यात अनेक चढउताराचे प्रसंग पाहिले, निराशेचे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले, पण कोणत्याही परिस्थितीसमोर ते हतबल झाले नाहीत, डगमगले नाहीत. साऱ्या आघातांचा अतिशय निर्धारानं, धीरोदात्तपणे सामना करत, ते संकटांवर सातत्यानं मात करीत आले आहेत. इतक्या प्रचंड संघर्षामध्ये दुसऱ्या एखाद्याच्या काळजाचा पत्थर झाला असता. पण भुजबळांनी मात्र आपल्या हृदयातला माणुसकीचा निर्मळ झरा आटू दिलेला नाही, हे त्यांचं सर्वात मोठं स्वभाववैशिष्ट्य आहे. कोट्यवधींच्या गर्दीत तेच त्यांचे वेगळेपण आहे. मला जर कोणी सहा वर्षांच्या शासकीय नोकरीत मी काय मिळवलं, असं विचारलं, तर भुजबळ साहेबांच्या डोळ्यांमध्ये तरळलेले आपुलकीचे भाव आणि दोन थेंब अश्रू मिळवून आलो आहे, असं मी कृतज्ञतापूर्वक सांगेन.

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

निखळ-१९: इन्व्हेस्टमेंट!




माणसाला आयुष्यात सर्वाधिक कोणत्या गोष्टीची गरज असते?, असं जर विचारलं, तर सत्ता, पैसा, संपत्ती अशी मनी, मसल, पॉवर या भौतिक दृष्टीकोनातून बरीचशी उत्तरं येतील किंवा अगदीच दुसऱ्या टोकाची म्हणजे आत्मिक समाधान, शांती अशी अध्यात्मवादी उत्तरं येतील. आपली दैनंदिन निकड भागविण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या गोष्टींची गरज नाकारता येत नाही; तथापि, आयुष्य समाधानात जाण्यासाठी माणसाला माणसाचीच गरज असते, असं माझं या प्रश्नावर उत्तर राहील. मानव हा समाजशील प्राणी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या समाजशीलतेचं प्रत्यंतर दैनंदिन जीवनानुभवामध्ये येत असतं. सामाजिक बहिष्कृततेची शिक्षा ही म्हणूनच एखाद्या फाशीच्या शिक्षेपेक्षाही प्रभावी ठरते, असं म्हटलं जातं, ते त्यामुळंच. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा तर खऱ्याच, पण त्याही पेक्षा त्याची महत्त्वाची भूक आहे ती संवादाची. एक वेळ रागावलं, मारलं तरी एखादा मनुष्य खपवून घेईल, पण त्याच्याशी बोलणं टाकलं की त्याचा जो मानसिक, भावनिक कोंडमारा होतो, तो त्या मारण्यापेक्षाही खूप तीव्र ठरतो. संवादशास्त्रामध्ये संवादाच्या विविध प्रकारांबरोबरच आत्मसंवादालाही खूप महत्त्वाचं स्थान आहे. अगदी कोणीच नसेल बोलायला तरीही मनुष्याचा स्वतःशी संवाद सुरूच असतो. मेडिटेशन ही विधायक आत्मसंवादाची वरची पायरी मानली जाते. असो!
तर, विषय होता तो म्हणजे माणसाला माणसांचीच सर्वाधिक गरज असते आयुष्यात. आणि आपल्यासोबत, आपल्या पाठीशी आणि आपल्यासाठी इतके लोक उभे राहू शकतात, राहतात, यातून मिळणारं समाधान आणि जबाबदारीचं भान या दोन्ही गोष्टी आपल्या सर्वंकष वाटचालीमध्ये खूप मोलाच्या ठरत असतात. हे प्रकर्षानं जाणवण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात या सहृदय माणुसकीचा मलाच अनुभव घेता आला. माझे बंधू अनुप जत्राटकर यांच्या स्त्री-भ्रूण हत्येच्या विषयावर आधारित द प्रॉमिस.. या सायको-शॉकर लघुपटाचा कोल्हापुरात प्रिमीअर झाला. (कृषीवलतर्फे आयोजित पहिल्या स्तंभलेखक परिषदेतील लघुपट महोत्सवात अनुप यांचा जलप्रदूषणावर आधारित पंचगंगा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला होता.) या प्रिमिअरसाठी समाजातील विविध स्तरांमधील नागरिकांना तसंच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या आमच्या मित्र परिवाराला निमंत्रित करण्यासाठी आम्ही दोघे बंधूच फिरत होतो. प्रिमिअरच्या आधीचे दोन दिवस निव्वळ नियोजन आणि निमंत्रण वाटप या दोन एनसाठीच आम्ही घालविले. दसरा चौकातील चारशे आसन क्षमतेच्या राजर्षी शाहू सभागृहात २५०-३०० लोक आले तरी आपला कार्यक्रम यशस्वी होईल, अशी आम्हा दोघांत चर्चा झाली. पण, रविवारची सकाळ असूनही लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला की जवळपास सहाशे दर्शक उपस्थित राहिले आणि बसायला जागा मिळाली नाही, तरी जागा मिळेल तिथे- अगदी दरवाजात सुद्धा उभे राहून त्यांनी लघुपटाचा आस्वाद घेतला. हा हाऊसफुल्ल प्रतिसाद आम्हालाच नव्हे, तर मिडियातल्या मित्र-मैत्रिणींसाठीही अनपेक्षित अन् अनोखा होता. त्यामुळं लघुपटालाही हाऊसफुल्ल गर्दी होऊ शकते, याचं प्रत्यंतर द प्रॉमिस..च्या प्रिमिअरमुळं आलं, अशा शब्दांत कौतुकाचा वर्षाव माध्यमांनी केला. माझे गुरू व ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर सरांचा मला आवर्जून फोन आला. ते म्हणाले, तुम्ही कार्यक्रम तर छानच नियोजनबद्ध पार पाडलात; फिल्मही आवडली. पण, मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते ती इतका मोठा लोकसंग्रह तू करू शकलास याची. हीच तुझी खरी कमाई आहे. केवळ याच गोष्टीबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी फोन केलाय.मीही सरांना मनापासून धन्यवाद दिले आणि म्हणालो, सर, इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी आमच्या प्रेमाखातर येणं, हा माझ्यासाठीही खरंच खूप सुखद धक्का ठरला. आयुष्याच्या शेवटी यातले चार खांदे पुढं सरसावले, तरीही खूप समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना माझ्या मनात असेल.
खरंच आहे ना! पैसा ओतून जमणाऱ्या गर्दीपेक्षा प्रेमाखातर जमणाऱ्या गर्दीचं मोल कुठल्या तराजूत करणार? जनसंपर्काच्या क्षेत्रात काम करत असतानाही मी नेहमीच माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला आणि नेहमी त्या सद्भावनांनाच साद घालण्याचं काम करत राहिलो. पैसा ओतला की सारं मॅनेज करणं सहज शक्य होतं, असं मत असणाऱ्यांचाही या क्षेत्रात वावर आहेच. पण, पैशामुळं येणारा माणूस हा तुमच्याकडं किंवा तुमच्यासाठी येत नाही, तो पैशासाठीच येतो. त्याचा ओघ थांबला की तो तुमच्यासोबत राहील, याची शाश्वती राहात नाही. त्यामुळं त्या गोष्टींना फाटा देऊन मी माझं काम शांत चित्तानं करत राहिलो. ज्या व्यक्तीसाठी, संस्थेसाठी, शासनासाठी काम करायचं, त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं. आणि या प्रामाणिक कामाच्या बळावरच माझा समाजातला आणि विशेषतः मिडियामधला मित्रसंग्रह मला जोडता आला. मिडियामधल्या लोकांशी मैत्री करत असताना त्यांना जपलं पाहिजे, यापेक्षा त्यांच्यापासून जपलं पाहिजे’, ही भावना लोकांच्या मनात अधिक असते. कशाला त्यांच्या वाटेला जा अन् दुखवा, अशी भावनाही असते. माझ्या बाबतीत मात्र या भावनेला थारा नाही. माझे मिडियात मित्र आहेत आणि माझे अनेक मित्र मिडियात आहेत, या दोन्ही प्रकारच्या मित्रांमध्ये मैत्रभावनेला सर्वोच्च स्थान असल्यामुळंच त्यांच्याशी अतिशय सद्भावनापूर्ण संबंध जोपासता येऊ शकलेले आहेत. आमच्या संबंधांमध्ये निखळ मैत्रीखेरीज अन्य कुठलाही हितसंबंधगुंतलेला नसल्यामुळंच मैत्रीतली गुंतवणूकच सर्वश्रेष्ठ आणि दूरगामी ठरली आहे. आयुष्यातली महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट हीच ठरली आहे आणि कमाईसुद्धा!