शनिवार, ४ मे, २०१३

‘असेल माझा हरी...’


('शेती-प्रगती' मासिकाच्या 'मे' २०१३च्या ताज्या अंकात प्रकाशित झालेला माझा लेख...)  


दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर साडेनऊच्या बातम्यांत काही दिवसांपूर्वी एक मुलाखत पाहण्यात आली. लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झालेले मूळचे महाराष्ट्रीय असलेल्या सुनील नारकर यांची ती मुलाखत होती. सुनील नारकर हे अमेरिकेत एक उद्योजक म्हणून चांगले सुस्थापित आहेत. तिथल्या टीव्हीवर मॉडेल, अँकर म्हणून त्यांनी चांगला लौकिक मिळवला आहे. चित्रपट अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी चांगल्या लक्षवेधी चित्रपटांची, लघुपटांची निर्मिती केली आहे. पण, केवळ त्यामुळंच माझं लक्ष या मुलाखतीकडं वेधलं गेलं, असं नाही तर या मुलाखतीत श्री. नारकर जी माहिती देत होते, त्या माहितीमुळं मी तिकडं आकर्षित झालो.
नारकर हे मूळचे राजापूर तालुक्यातल्या पडवे गावचे. अमेरिकेत स्थायिक असले तरी गावी मुलाबाळांसह अधूनमधून येत-जात असतात. त्यांच्या मुलीचं नाव संजना तर मुलाचं नाव श्री. एका उन्हाळ्याच्या सुटीत असेच गावी आले असता, एक गोष्ट संजनाच्या लक्षात आली ती म्हणजे गावात केवळ त्यांच्याच घरच्या विहीरीला पाणी असल्यानं गावकऱ्यांची तिथून पाणी नेण्यासाठी अखंड गर्दी असायची. नारकरही त्यांना कधी अडवायचे नाहीत.
अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या नारकरांच्या मुलांना मात्र त्यामागचं पाणीटंचाईचं, दुष्काळाचं भीषण वास्तव माहिती असण्याचं कारण नव्हतं. या स्थानिकांची पाण्यासाठी ही वणवण करण्यामागचं कारण त्यांनी आपल्या वडलांना विचारलं. तेव्हा नारकरांनी त्यांना पाणीटंचाईविषयी सांगितलं. तेव्हा तुम्ही या लोकांना विहीरी बांधून देऊ शकत नाही का, असा बाळबोध प्रश्न त्यांच्या मुलांनी त्यांना केला. तेव्हा त्यासाठी खूप पैसे हवेत, असं नारकरांनी सांगितलं. त्यावर अतिशय चिवटपणानं त्या मुलांनी त्यांना विचारलं, समजा, आम्ही तुम्हाला पैसे जमवून दिले तर तुम्ही कराल का?’ यावर नारकरांनीही त्याला सहजपणे होकार दिला.
गावाहून हे कुटुंब अमेरिकेला परत गेले, पण मुलांच्या डोक्यातून हा विषय गेला नव्हता. त्यांनी डेव्हलपमेंट ऑफ रुरल महाराष्ट्र (www.dormindia.org) या नावानं एका एनजीओची स्थापना केली. स्वतः गाड्या धुणे, आइस्क्रीम विकणे अशी कामे करून त्यांनी निधी उभारलाच. शिवाय, आपले मित्रमंडळी, फेसबुकवरील फ्रेंड्स यांच्याकडूनही निधी जमा केला. किमान १ डॉलर ते कमाल ५ डॉलर अशा पद्धतीनं त्यांनी जवळ जवळ दोन लाख रुपयांचा निधी जमवला. सन २००८मध्ये राजापूर तालुक्यातल्या सोगमवाडीत त्यांनी एक विहीर खोदून दिली. आणि गेल्या महिन्यात (एप्रिल २०१३) पडवे- टुकरुलवाडी या टंचाईग्रस्त गावात एक विहीर बांधून देण्याचं काम या भावंडांनी केलं. त्यांच्या वडिलांनी या कामी त्यांना पूर्ण प्रोत्साहन दिलं आणि स्थानिक पातळीवर आवश्यक त्या मंजुरींची पूर्तता करवून घेण्यासाठी प्रयत्न केले. एका एनआरआय कुटुंबाच्या प्रयत्नांतून, सामाजिक बांधिलकीतून दोन गावांची तहान भागली.
या प्रकल्पाच्या यशामुळं आनंदित झालेल्या नारकर भावंडांनी आता तीव्र दुष्काळग्रस्त विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विहीरी खोदून देण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्धार केला आहे.
सुनील नारकर यांनी आपला व्याप सांभाळत मुलांच्या सामाजिक जाणिवेला ज्या पद्धतीनं जपलं आहे, ती अगदी स्पृहणीय अशीच आहे. पण इथं विहीर खोदण्यासाठी केवळ पैसे असून भागत नाही, तर अन्य शासकीय सोपस्कारही पार पाडावे लागतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर कोणी पुढं आलं तर आपण त्यांना मदत करू, असं नारकर यांनी या मुलाखतीत सांगितलं. विदर्भ-मराठवाड्यातून अशा प्रकारे विहीरी खोदण्यासाठी निधीची मागणी करणारी सात ते आठ प्रपोजल आपल्याकडं आल्याचंही त्यांनी सांगितलं आणि त्या सर्वांना एकदम शक्य झालं नाही, तरी टप्प्याटप्प्यानं का असेना, न्याय देण्याची, मदत करण्याची आपली भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नारकर यांच्या सकारात्मक भूमिकेविषयी दुमत असण्याचं कारण नाही. पण त्यांची ही मुलाखत ऐकल्यानंतर, विशेषतः शेवटचं वाक्य ऐकल्यानंतर माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं. एकीकडे दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून हजार कोटी, दोन हजार कोटींची पॅकेजेस जाहीर होत असताना, अखंड राज्यभरातून मदतीचा ओघ वाहात असताना गावपातळीवर नागरिकांचे टंचाईमुळं होणारे हाल थांबलेले नाहीत, त्यांना दिलासा मिळालेला नाही, असा अर्थ यातून काढायचा काय? शासन मदतीसाठी तत्पर असताना एनआरआय व्यक्तीकडं मदतीसाठी याचना करण्याची वेळ त्यांच्यावर का यावी? एकीकडं रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅग ताशेरे ओढत असताना विहीर बांधून देण्याची ठोस हमी आणि खात्री नारकर कुटुंबियांकडून अधिक वाटते आहे का? तसं असेल तर ते कोणाचं अपयश?
दुसरी गोष्ट म्हणजे १९७२चा दुष्काळ पडला, तेव्हा आम्ही या भूतलावर आवतीर्ण झालेलो नव्हतो, पण वाडवडिलांच्या सांगण्यानुसार त्यावेळी राजा आणि रंक एकमेकांमधली सामाजिक दरी विसरून एकाचवेळी दुष्काळी कामांवर जात राहिले. आणि त्यावेळी झालेल्या या एकीमुळं आणि लोकशक्तीच्या संघटनामुळंच खऱ्या अर्थानं त्या दुष्काळावर मात करता आली. पण आता तशी परिस्थिती राहिली आहे का? कितीही दुष्काळ पडला तरी आज दुष्काळी कामं निघत नाहीत, निघाली तरी तिथं कोणी जात नाही. असं का होऊ लागलंय? कोणतीही आपत्ती, संकट कोसळलं तरी प्रत्येक गोष्टीसाठी सरसकट सरकारला जबाबदार धरण्यात येऊ लागलंय. सरकारनं पाहून घ्यावं, किंवा ती सरकारची जबाबदारी आहे’, इथंपासून ते सरकार काय झोपा काढतं आहे का?’ एवढं म्हणत रस्त्यावर उतरलं की तिथं आपली सामाजिक जबाबदारी संपते. पुढचं सरकारनं पाहून घ्यावं, अशी भावना जनमानसात खोलवर रुजली आहे किंवा रुजविण्यात येते आहे. सरकारकडं पाहण्याचा असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी असा आपला दृष्टीकोन बनला आहे. तो मुळातच चुकीचा आहे. मुळात सरकार म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून आपणच आहोत, ही गोष्टच आपण विसरून चाललो आहोत की काय, असं मला वाटू लागलं आहे. सरकारवर सारी जबाबदारी ढकलण्याच्या नादात आपल्याला आपल्या क्रयशक्तीचाच विसर पडू लागला आहे की काय, असाही दुसरा प्रश्न मला पडला आहे.
आज आपण विहीरीला निधी मिळावा म्हणून नारकरांकडं हात पसरतो आहोत. नारकरांनीही दिलदारपणानं हातचं न ठेवता मदतीची तयारी ठेवली आहे, प्रत्यक्ष कृतीतही उतरवलं आहे. पण मला असं वाटतं, समजा गावपातळीवर ग्रामस्थांनीच एकत्र येऊन श्रमदानातून विहीर खोदायची ठरवली, तर अशक्य आहे काय? नक्कीच नाही. पण अलीकडच्या काळात तसं क्वचितच घडताना दिसतं आहे. रोजगार हमी योजनांमध्ये बनावट लाभार्थी दाखवून भ्रष्टाचार होत असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय. रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची टक्केवारी एक तृतिअंशाहून (३०%) खाली आली आहे. याचं कारण काय? या दोन्ही गोष्टींना कारणीभूत आपणच आहोत. कारण हल्लीच्या काळात श्रमप्रतिष्ठेच्या मूल्याची खूपच घसरण होऊ लागली आहे. गावाकडंही उपलब्ध साधनसामग्रीमध्ये सोफिस्टिकेटेड म्हणजे थोडक्यात अंगाला काही लावून न घेता राहण्याची चैनीखोरी बळावू लागली आहे. राजकीय लाभापोटी त्यांच्या या सवयीला खतपाणी घालण्याचं कामही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होऊ लागलं आहे. त्यामुळं आपण मात्र आपल्या शक्तीची जाणीव विसरून जातो आहोत. हे भविष्याच्या दृष्टीनं खूप घातक आहे. यंदाचा दुष्काळ ही तर येणाऱ्या अतिगंभीर भविष्यकाळाची एक चुणूक आहे. पुढंपुढं असे गंभीर दुष्काळ येतच राहणार आहेत, पण त्यांना सामोरं जाण्याची, त्यांचा मुकाबला करण्याची आपली उपजत, नैसर्गिक प्रवृत्ती मात्र आपण हरवून बसणार आहोत. त्यातून ही तीव्रता अधिकच भासत राहणार आहे. त्यामुळं आपण वेळीच आपल्या क्षमतेची जाणीव कायम ठेवून जनसहभागातून अशा नैसर्गिक वा कृत्रिम संकटांचा सामर्थ्यानं मुकाबला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून नारकरांसारख्या उदात्त भावनेनं मदत करणाऱ्या लोकांनाही हुरूप येईल आणि अशा हजारो नारकरांचे हात मदतीसाठी पुढं सरसावतील. तेव्हाच सुनील नारकर आणि त्यांच्या मुलांच्या कष्टाचं आपण खऱ्या अर्थानं चीज केल्यासारखं होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा