शनिवार, ४ मे, २०२४

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला: वर्ष तिसरे

आव्हानात्मक जल-अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरसंधी मुबलक: विनय कुलकर्णी

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत 'आविष्कार जल-अभियांत्रिकीचा' या विषयावर बोलताना अभियंते विनय कुलकर्णी.

(श्री. विनय कुलकर्णी यांचे सविस्तर व्याख्यान येथे ऐका.)


कोल्हापूर, दि. ४ मे २०२४: जल-अभियांत्रिकीचे क्षेत्र हे आव्हानात्मक असले तरी करिअरच्या मुबलक संधीही या क्षेत्रात उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी या क्षेत्राचा जरुर विचार करावा, असे आवाहन टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि. कंपनीचे उप-सरव्यवस्थापक विनय कुलकर्णी यांनी आज केले. आलोकशाही वाहिनीच्या वतीने आयोजित डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ते आविष्कार जल-अभियांत्रिकीचा!’ या विषयावर बोलत होते. तिसऱ्या वर्षीचे द्वितिय व अंतिम पुष्प त्यांनी गुंफले.

श्री. कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानामध्ये जल-अभियांत्रिकीच्या क्षेत्रामधील आव्हानांची, आवश्यक क्षमतांची, ज्ञानाची आणि करिअर संधींची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, जल-अभियांत्रिकी क्षेत्राचा आवाका अतिशय मोठा आहे. अभियांत्रिकीच्या पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात त्यासंदर्भातील विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. फ्लुईड मॅकेनिक्स विषयात पाण्याच्या वर्तनाचा सविस्तर अभ्यास आहे. हायड्रॉलॉजीमध्ये पावसासह जमिनीवरील आणि भूगर्भातील पाण्याचा अभ्यास आहे. पाण्याचे पृथ्वीवरील वितरण आणि त्याची हालचाल याविषयी अभ्यास करता येतो. हायड्रॉलिक्समध्ये कालव्यांची निर्मिती, त्यांची संरचना, पाईपलाईन्स, पूरसंरक्षक संरचना तसेच पाण्याच्या यांत्रिक गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये शाश्वत जलव्यवस्थापनाचा विचार, विकास आणि नियोजन समाविष्ट असते. कोस्टल/मरिन (तटीय) अभियांत्रिकीमध्ये समुद्रकिनाऱ्यांवरील प्रकल्प विकासाचा अभ्यास असतो. पर्यावरणीय अभियांत्रिकीमध्ये पाणी, हवा, माती यांच्या गुणवत्तेचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि सांडपाणी शुद्धीकरण आदींचा विचार असतो. त्याचप्रमाणे वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अभियांत्रिकीमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प, सिंचन आदींचा अभियांत्रिकीय दृष्टीकोनातून अभ्यास असतो. हा अभ्यास करीत असताना त्याच्या जोडीने भूशास्त्राचा अभ्यासदेखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामधून भूस्तराच्या संरचनेचा सखोल अभ्यास करावा लागतो, जेणे करून कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये भक्कम बांधकामाची उभारणी करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे रिमोट सेन्सिंग, जीआयएस या नवतंत्रज्ञानात्मक शाखांचा अभ्यासही उपयुक्त ठरतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केंद्र तसेच राज्य शासनाच्या पाटबंधारे, कृषी, जलसंपदा, महापालिका प्रशासन आदी ठिकाणी अभियंता म्हणून करिअरच्या संधी आहेत. सेंट्रल वॉटर कमिशन, ओशनोग्राफी केंद्र, रिमोट सेन्सिंग एजन्सी, नॅशनल वॉटर अकॅडमी, भारतीय हवामान विभाग अशा अनेक विभागांमध्ये संशोधक, अभियंता म्हणून संधी आहेत. खाजगी क्षेत्रात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तर भरपूर संधी आहेत. अपार कष्ट आणि परिश्रम करावे लागत असले तरी त्यातून उभे राहणारे सृजनशील अभियांत्रिकी काम हे मोठे समाधान देणारे असते, असेही कुलकर्णी म्हणाले.

विनय कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये जल-व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीच्या इतिहासाचाही थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले, पाणी व्यवस्थापन हा मानव उत्क्रांतीच्या इतकाच जुना घटक आहे. दहा हजार वर्षांपूर्वी धान्य विकासाच्या पद्धती बदलत असताना मानवाने नदीच्या किनारी वसाहती वसविण्यास सुरवात केली. तेव्हापासूनच सिंचन, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचे वहन अशा गोष्टी तो शिकला. इसवी सनाच्या चौथ्या शतकातच रोमन अभियंत्यांनी तेथील नगरांसाठी शेकडो मैलांवरुन जमिनीखालून तसेच कालव्यांद्वारे पाणी वाहून आणण्याची किमया केली. भारतात थरच्या वाळवंटानजीक असलेल्या चाँदबावडी या दहाव्या शतकातील सुमारे शंभर फूट खोल बांधीव विहीरीतून आजतागायत पाणीपुरवठा सुरू आहे. सिंधु संस्कृतीमध्ये पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचे दाखले प्राप्त झाले आहेत. आधुनिक काळात १८८०मध्ये पहिला काँक्रिट आर्च (कमानीच्या आकाराचा) डॅम बांधण्यात आला. चीनमधील यांगझी नदीवर थ्री गॉर्जेस हे महाकाय धरण उभारण्यात आले. भारतातील भाक्रा-नानगल धरण हा देशातील पहिला १५०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प ठरला. टाटांनीही खाजगी क्षेत्राकडून धरणबांधणी व ऊर्जानिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी मुळशी, भुशी, भिरा, वळवण, ठोकरवाडी आदी धरणे बांधली. सर एम. विश्वेश्वरय्या, डॉ. वीरभद्रन् रामनाथन, डॉ. जॉन ब्रिस्को, डॉ. राजेंद्रसिंह राणा आदी संशोधक आणि जलतज्ज्ञांमुळे भारताचे जल अभियांत्रिकी व व्यवस्थापन क्षेत्र समृद्ध झाले, असेही त्यांनी सांगितले. वाढते शहरीकरण, त्या शहरी विकासाचे नियोजन, तापमानवाढ, बदलते पर्जन्यमान आदी सर्व बाबींची शाश्वत विकासाशी सांगड घालणे आवश्यक असून शक्य त्या ठिकाणी पर्यावरणपूरक बांधकामे करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मतही विनय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आलोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला, तसेच आभार मानले.

शुक्रवार, ३ मे, २०२४

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला: वर्ष तिसरे

हरित रसायनशास्त्र हा डॉ. भालचंद्र काकडे यांच्या संशोधनाचा गाभा: डॉ. माणिकराव साळुंखे

 

आ'लोकशाही प्रस्तुत डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत 'हरित रसायनशास्त्र' या विषयावर बोलताना माजी कुलगुरू व ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे

(डॉ. माणिकराव साळुंखे यांचे संपूर्ण व्याख्यान येथे ऐका)


कोल्हापूर, दि. ३ मे २०२४: डॉ. भालचंद्र काकडे यांचे संशोधन शाश्वत विकासकेंद्रित होते. हरित रसायनशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा गाभा होता. त्यांच्या निधनामुळे देश एका आश्वासक वैज्ञानिकाला मुकला आहे, अशी भावना ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ तथा माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज व्यक्त केली.

डॉ. भालचंद्र काकडे यांच्या तृतीय स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आलोकशाही या वाहिनीच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये डॉ. साळुंखे हरित रसायनशास्त्र या विषयावर बोलत होते.

डॉ. साळुंखे म्हणाले,  डॉ. भालचंद्र काकडे यांच्याशी व्यक्तीगत पातळीवर माझा कधी संबंध आला नसला तरी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील त्यांचे मार्गदर्शक डॉ. विजय मोहन यांच्याशी मात्र माझा चांगला परिचय राहिला. डॉ. काकडे यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये हाती घेतलेले संशोधन आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांतून सादर केलेल्या शोधनिबंधांचे स्वरुप पाहता त्यांचे संशोधन हे पूर्णतः पर्यावरणपूरक होते, असे म्हणता येते. आज आपण शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये घेऊन संशोधन करण्यासाठी संशोधकांना प्रेरित करतो आहोत, तथापि तत्पूर्वीच डॉ. काकडे यांनी शाश्वत विकासाचे संशोधन होती घेतल्याचे दिसून येते. पाण्यावर रेल्वे चालविण्याचे अतिशय महत्त्वाकांक्षी संशोधन त्यांनी हाती घेतले होते. हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने ते खरोखरीच खूप महत्त्वाचे असे होते. त्यांच्या अचानक निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, हरित रसायनशास्त्र म्हणजे जास्तीत जास्त रासायनिक प्रक्रिया, अभिक्रिया या जास्तीत जास्त पर्यावरणपूरक पद्धतीने घडवून आणणे होय. आज मोठमोठ्या उद्योगांमध्ये विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी ज्या काही रासायनिक प्रक्रिया घडवून आणल्या जातात, त्या अतिउच्च तापमानाला आणि विविध रसायनांच्या वापराद्वारे घडवून आणल्या जातात. त्यामधून बाहेर पडणारी उप-उत्पादने ही सुद्धा पर्यावरणासह मानवी आरोग्यालाही घातक असतात. त्यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जन आणि हवा-पाण्याचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. या उलट निसर्गामधील प्रक्रियांचे असते. निसर्गातील प्रत्येक प्रकारची रसायननिर्मिती ही पर्यावरणपूरक पद्धतीने घडविली जाते. हरित रसायनशास्त्राचे उत्तम उदाहरण म्हणजे मानवी शरीर होय. मानवी शरीरातील अभिक्रिया आपल्याला खूप काही शिकविणाऱ्या आहेत. शरीरातील सर्व अभिक्रिया या सर्वसामान्य तापमानामध्ये होतात. इतर कोणत्याही नव्हे, तर पाण्यासारख्या द्रावणामध्ये होतात. त्याचप्रमाणे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी पद्धतीने न होता उदासीन पद्धतीने होतात. त्यामधून कोणतेही घातक उपपदार्थ निर्माण होत नाहीत. त्याचप्रमाणे ते नैसर्गिकरित्या विघटनशीलही असतात. सध्या तरी आपल्याकडे मानवी शरीराइतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही. मात्र, आपण त्या दिशेने संशोधनाच्या दिशा केंद्रित करणे आवश्यक आहे. आपण औद्योगिक, व्यावसायिक पातळीवर घडवून आणत असलेल्या अभिक्रियांमधील उप-उत्पादनांचे आणि प्रदूषकांचे प्रमाण कमी कमी करीत नेण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढे टप्प्याटप्प्याने असे घातक पदार्थ निर्माणच होणार नाहीत किंवा जे निर्माण होतील ते नैसर्गिकरित्या विघटनशील असावेत, याकडे कटाक्ष असावा. सध्या आपण रासायनिक अभिक्रियांसाठी अनेकविध हानीकारक रसायने वापरतो. पण, पुढे या अभिक्रिया पाण्यातच घडविता येतील का, या दिशेनेही विचार व संशोधन करणे गरजेचे आहे. पुनर्वापरक्षम कच्चा माल, नवनिर्मितीक्षम उत्पादने आणि त्यांचे तत्काळ विश्लेषण करण्याची सुविधा यांचाही या संशोधनामध्ये समावेश करायला हवा. त्या पद्धतीच्या साधनसुविधांची निर्मिती, उद्योग संरचना विकसित करण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी यांच्या हिंद स्वराज संकल्पनेमध्येही निसर्गाला ओरबाडू नका, असाच संदेश आहे. मानवी समुदायाचे भवितव्य उज्ज्वल बनवायचे असेल, तर पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासक्षम हरित रसायनशास्त्राला पर्याय नाही, असा संदेश डॉ. साळुंखे यांनी दिला.

कार्यक्रमात आलोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत करून परिचय करून दिला, तसेच आभार मानले. डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत उद्या (दि. ४ मे) सायं. ७ वाजता टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि. कंपनीचे उप-सरव्यवस्थापक विनय कुलकर्णी यांचे आविष्कार जल अभियांत्रिकीचा!’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.