(दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी संत संमेलनाविषयी प्रसिद्ध झालेले वृत्त.)
हंचिनाळ, ता. १२ (बातमीदार) : 'आत्मनिवेदन म्हणजे देव आणि
भक्ती यांच्यातील एकरुपता होय,' असे विचार निर्मलानंद
महास्वामी यांनी व्यक्त केले.
येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या
पाचव्या दिवशी आज पहिल्या सत्रात विविध संतांची 'आत्मनिवेदन व भक्ती'
या विषयावर प्रवचने झाली. संमेलनात आज तिघा जणांना संन्यस्त जीवनाची
दीक्षा देण्यात आली. यात एका सहा वर्षांच्या मुलाचा समावेश होता. आज सदाशिव
महास्वामी (म्हैसूर), निर्मलानंद' महास्वामी
(विजापूर), सेवानंद महाराज (भांदवले), विनयानंदजी
महास्वामी (मौजे वडगाव), शिवगंगाधर स्वामी (शिंदगी) यांची
प्रवचने झाली.
निर्मलानंद महास्वामी म्हणाले,
"आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता.
आत्मनिवेदन भक्तीमुळे देव व भक्त यांच्यात अंतर राहत नाही. ईश्वरस्वामी प्रतिगाडगे
महाराज आहेत."
विनयानंद महाराज म्हणाले,
"मनामध्ये निर्मल भावना ठेवून भक्ती केल्यास यश प्राप्ती होते.
आसक्ती संपविण्यासाठी विवेक व वैराग्य यांची गरज असते. विवेक, वैराग्य, षड्संपत्ती, ममत्त्व
या चार गोष्टी आत्मज्ञान संपादन करण्यास आवश्यक असतात. संकुचितपणा म्हणजे मृत्यू व
व्यापकता म्हणजे जीवन."
सेवानंद महाराज म्हणाले,
"भोगासाठी जीवन नाही, ते मुक्तीसाठी
असते. अध्यात्माचा संबंध हा मनाशीच असतो. ग्रहण करणे याला जीवनात महत्त्व आहे.
शरणागतीचा भाग म्हणजे नम्र जीवन. गुरुमंत्राच्या जपाने जीवन सफल होते."
सदाशिव महास्वामी म्हणाले,
"भक्ती म्हणजे हृदयातील मधु भाव. अहंकारमुक्त केलेली भक्ती
सर्वश्रेष्ठ असते. आत्मा-परमात्म्याला समर्पित करणे म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती
होय."
शिवगंगाधर स्वामी म्हणाले,
"मोक्षासाठी भक्ती गरजेची असते. आत्मियतेने केलेली भक्ती भगवंताला आवडते.
भक्तीमुळे माणसाच्या आयुष्यात सन्मार्ग येण्यास मदत होते."
दरम्यान, शुक्रवारी रात्री उषा मंगेशकर यांचा 'रंग उषेचा'
हा गीत-संगीताचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात उषा मंगेशकर यांचा
प.पू. शिवरात्री देशीकेंद्र सुत्तूर संस्थान मठ म्हैसूर यांच्या हस्ते सत्कार
झाला. बाळासाहेब देवनाळ यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन संजय दामले
यांनी केले. उषा मंगेशकर यांनी गणेशवंदना करून कार्यक्रमाची सुरवात केली. यात
त्यांनी माझी रेणुका माऊली..., 'मेंदीच्या पानावर.... 'ऐरणीच्या देवा..., 'पाऊस पहिला बरसून गेला... अशी
भक्तिगीते व भावगीते सादर केली.
'शालू हिरवा पाचूनी मढवा... हे बहारदार
गीतही सादर केले. 'ऐ मेरे वतन के लोगो...' या देशभक्तिपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राहुल देशपांडे व पुरुषोत्तम
गोणावर यांनी त्यांना गायनात साथ केली. या कार्यक्रमाला सुमारे एक लाखाहून अधिक
श्रोते उपस्थित होते. राजू जावळकर यांनी उत्कृष्ट ढोलकीवादन केले. जगद्गुरु
ईश्वरानंदजी महास्वामी यांच्या हस्ते उषा मंगेशकर यांचा सत्कार झाला.
तिघांना दीक्षा
या कार्यक्रमात जगद्गुरू शिवरात्री
देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते ओंकार कृष्णा चौगुले (वय ६, रा. टाकवडे, ता. शिरोळ), सतीश
रावसाहेब पाटील (वय ११, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ), शंकर कृष्णा आण्णा (वय २४, भक्ती योगाश्रम) यांना दीक्षा देण्यात आली आणि त्यांचे अनुक्रमे ओंकारानंद,
सत्यानंद व धर्मानंद स्वामीजी असे नामकरण करण्यात आले.
महास्वामीजींनी त्यांना कन्नडमधून दीक्षा व नियम-संहिता दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा