रविवार, ३० जून, २०१३

निखळ-१२: एन्जॉईंग द प्रोसेस..!




('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत सोमवार, दि. १ जुलै २०१३ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख...) 
परवाच मुलीचं नव्या शाळेत ॲडमिशन केलं. पहिल्या दिवशी तिला सोडायला गेलो होतो. आधीची शाळा मला फारशी पसंद न पडल्यानं तिला नव्या ठिकाणी सोडताना कदाचित थोडी साशंकता माझ्या चेहऱ्यावर असावी. तिच्या क्लास टीचर समोरुन आल्या. त्यांना मी माझी, मुलीची ओळख करून दिली. त्यांनीही स्वतःचा परिचय सांगितला. कदाचित माझा चेहरा त्यांनी वाचला असावा. त्या म्हणाल्या, यू प्लीज डोंट वरी. आय ॲश्युअर ऑन माय साइड दॅट युवर डॉटर विल एन्जॉय ॲन्ड लव्ह द प्रोसेस ऑफ लर्निंग. त्यांच्या या वाक्यासरशी माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं (त्या क्षणापुरतं का होईना!) हलकं झाल्यासारखं वाटलं.  आजच्या काळात शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनविण्याची भाषा करणारा शिक्षक कधी-कुठे भेटेल, अशी अपेक्षा मला अजिबात नव्हती. तरीही माझ्या मुलीला तशी टीचर मिळाली, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकेल? नाही तर, पालकांनी फक्त मुलांच्या डायरीवर दररोज नजर ठेवून राहायचं. अमूक मुदतीपर्यंत तमूक इतकी रक्कम ढमूक कारणासाठी भरा. विलंब झाल्यास दररोज ५० ते ५०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. अशी सूचना वाचली की फटाफट जोडणा करायची आणि धाडकन ती रक्कम भरून उसासा टाकायचा, एवढाच काय तो मुलांच्या शाळेशी पालकांचा संबंध राहिलाय. भरपूर फी आकारणाऱ्या शाळांतून मुलांना घातलं की, आपण त्यांना क्वालिटी एज्युकेशन देतो आहोत, अशी पालकांची सरसकट भावना बनलेली असते. त्यामुळं शिक्षणाच्या त्या फॅक्टरीत आपला कच्चा माल घालायचा, आणि त्याला पैशांचं इंधन पुरवत राहिलं की, एन्ड प्रोडक्ट चांगलंच निघणार, अशी त्यांची धारणा असते. मात्र या सर्व घोळात शिक्षणाच्या प्रक्रियेकडं मात्र कुणाचंच लक्ष नसतं. ना शिक्षकांचं, ना पालकांचं; मुलांचं लक्ष असण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांना त्यांच्या दैनंदिन होमवर्क-असाइनमेंटमधून डोकं वर काढायला संधीच कुठंय?
खरंच, बघा ना! आपण मुलांना शाळेत घालतो शिकण्यासाठी. पण नेमकं काय शिकण्यासाठी, याचा विचार आपण करतच नाही. परीक्षेतील मार्क हाच पाया धरून त्याला आपण केवळ परीक्षार्थी म्हणूनच घडवणार असलो तर विद्यार्थी म्हणून त्याच्याकडून विद्यार्जनाची आणि शिक्षकांकडून तरी अध्यापनाची अपेक्षा आपण बाळगूच शकणार नाही. तथापि, व्यावहारिक जगामध्ये सक्षमपणे वावरण्यासाठी विद्यार्थ्यांची मूलभूत तयारी करवून घ्यायची झाल्यास त्यांना शिक्षणाच्या एकूणच प्रक्रियेविषयी प्रेम वाटलं पाहिजे, त्याचा आस्वाद त्यांना घेता आला पाहिजे. तितकी स्पेस, तेवढी मोकळीक त्यांना या व्यवस्थेमध्ये उपलब्ध करून देणं आपणा सर्वांचं कर्तव्य आहे.
भावी आयुष्यात विद्यार्थी त्याला जे बनायचं, ते बनेल; पण शिक्षणाच्या या प्रक्रियेविषयी त्याच्या मनात आस्था निर्माण झाली पाहिजे. आज आपण विद्यार्थ्यांना अगदी मॅकेनिकल पद्धतीनं घडविण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाला एकाच साच्यात आकार देण्याचे आपले प्रयत्न आहेत. या प्रत्येकाचा साचा वेगळा आहे, आकार वेगळा आहे, आवाका वेगळा आहे, क्षमता वेगळ्या आहेत, ही साधी गोष्टही आपण लक्षात घ्यायला तयार नाही. त्यातूनच शिक्षणव्यवस्थेविषयीचे अनेक प्रश्न आजघडीला निर्माण होत आहेत. पण मूलभूत गोष्टींपेक्षा आजूबाजूंच्या गोष्टींकडंच आपलं अधिक लक्ष आहे आणि तिथंच चुकतं आहे.
केवळ शिक्षणच नाही, तर प्रत्येक बाबतीमध्ये निर्मितीची, जडणघडणीची प्रक्रियाच ही खरी आनंददायी असते. हिमालय सर करणं हे साध्य झालं, पण त्या ध्येयप्राप्तीपर्यंत घेऊन जाणारा, आठ वेळा अपयश दाखविणारा आणि यशाचा मार्ग अधिकाधिक अधोरेखित करणारा मार्गच शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांना त्या शिखरापर्यंत घेऊन गेला. एडिसननं बल्ब बनविला खरा! पण एक बल्ब बनविण्यापूर्वी तो बल्ब अन्य ७०० प्रकारांनी बनविता येऊ शकत नाही, हा शोधही त्याला लागला, ते केवळ त्या निर्मिती प्रक्रियेमधील त्याच्या आस्वादामुळंच. या प्रक्रियेमधील प्रत्येक अपयशानं त्याला यशाच्या अधिकाधिक जवळच तर नेलं ना!
सृजनाचा, नवनिर्मितीचा आनंद तर आणखीच वेगळा. ठोकळेबाज थिअरी आणि प्रॅक्टीकलच्या जोरावर उद्याच्या भारताचे आशादायी संशोधक, नेतृत्व घडेल, ही समजूत खुळचटपणाची आहे. आणि त्या वाटेचा स्वीकार करण्यात, त्या वाटेनं आपली पोरं गुरासारखी पिटाळण्यात मात्र आपल्याला उलट मोठेपणाच वाटतो. अशा वेळी त्यांच्याकडून कुठल्या सृजनाच्या, नवनिर्मितीच्या, नवकल्पनेच्या आविष्काराची अपेक्षा करणार आहोत आपण? रुजण्याच्या वयात जर या कल्पनांची बीजं त्यांच्या सुपीक मनाच्या भूमीवर पडलीच नसतील, आपण ती पडूच दिली नसतील, तर फळाची अपेक्षा कुठल्या तोंडानं करायची?
मुळात मुलांनी काही वेगळं करावं, असं वाटणारे आणि तसं त्यांना करू देणारे पालक आज फार कमी आहेत. तसं त्यांना घडविणारे, मोल्ड करणारे, तयार करणारे शिक्षक थोडे फार असतीलही. पण त्यापेक्षा त्यांनी, मुलांना केवळ तेच ते आणि तेच ते शिकवून तयार करावं, अशा अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल तर खुलेपणानं, मोकळेपणानं मुलांना त्यांचं विश्व शोधायला ते कसे काय मदत करू शकतील?
आणि आजकाल मिडियामधून तर काय? केवळ गाणी म्हणणं आणि नाच करणं, या दोन गोष्टी म्हणजेच टॅलंट असा एक सरसकट निष्कर्ष दर्शकांच्या मनावर थेट बिंबवून रिकामे झालोत आपण. पण त्या व्यतिरिक्तही अन्य ६२ कला आपल्या संस्कृतीत आस्तित्वात आहेत, त्यांच्या आस्तित्वाची पुसटशीही जाणीव ना आपण ठेवली, ना पुढच्या पिढीला करून देतो आहोत. अशी काहीशी अर्धवट अवस्था आपल्या जगण्याची झाली आहे. तेच जगणं, तीच लाइफस्टाइल आपण पुढच्या पिढीवर लादतो आहोत. ठीक आहे, आपलं जसं असेल ते असो, पण त्यांना तरी ही शिकण्याची प्रक्रिया अनुभवू द्या, तिचा आनंद लुटू द्या. कधी तरी ते आपलं नाव काढतील- आईबापानं नुसतंच ओझ्याचा बैल केला नाही आपला, ते ओझं वाहण्यातला आनंद लुटायलाही शिकवलं, म्हणूनच आपलं जगणं सुसह्य झालं गड्या!’

गुरुवार, २७ जून, २०१३

निखळ-११ : विश्वासार्हतेचा ‘टायर बर्स्ट’!



('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत प्रकाशित झालेला माझा लेख...)

गेल्या रविवारी रात्री अलिबागहून कोल्हापूरकडे परतत असताना साताऱ्याच्या थोडं पुढे आमची कार पंक्चर झाली. नुसती पंक्चर नव्हे तर टायरच आडवी कापली जाऊन फुटली आणि आमचे वाघमोडे आण्णा अनुभवी ड्रायव्हर म्हणूनच कार अगदी सराईतपणे रस्त्याकडेला घेऊन अर्ध्या तासाच्या आत त्यांनी टायर बदलली सुद्धा. मोठ्या प्रवासामध्ये अशी गोष्ट स्वाभाविक असल्यानं झाल्या घटनेचा आम्ही फारसा विचार केला नाही. रात्रीच्या दोन वाजता नवी टायर फुटल्याबद्दल तोपर्यंत मनातल्या मनात कंपनीलाही दोष देऊन झाला होता. टायर बदलून आम्ही त्या ठिकाणापासून अर्धा-एक किलोमीटर आलो असू, त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला एका पंक्चर काढण्याच्या दुकानासमोरची लाइट सुरू असल्याचं दिसलं आणि आणखी दोन मोटारी त्या दुकानासमोर उभ्या असलेल्या दिसल्या. एकीचं पंक्चर काढण्याचं काम सुरू होतं, तर दुसरी प्रतीक्षेत. त्याचवेळी आणखी एक इनोव्हा आणि थोड्या वेळानं एक लक्झरी बस तशाच फटफटत आम्हाला पास करून गेल्या. तेव्हा मात्र हा पंक्चरचा प्रकार नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचं आमच्या ध्यानात आलं. दुकानापासून पलिकडं साधारण दीड-दोन किलोमीटरच्या अंतरावर काँक्रिटच्या खाचेत मोळे आणि पत्राच उभा रोवून ठेवला तर स्पीडमध्ये असलेली मोटार पंक्चर होऊन आपसूक आपल्यापासून जवळच येऊन थांबेल आणि पंक्चर काढून, नाइट चार्ज लावून महामार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांची लूट करता येईल, असा थेट विचार त्या पंक्चरवाल्यानं केलेला दिसला. आमच्याकडे स्टेपनी नसती तर आम्हीही त्याच्या दुकानासमोरचे तिसरे असणार होतो. मला त्याची तुलना एखाद्या दरोडेखोराशीच करावीशी वाटली. विश्वासार्हता तर गेलीच पण सचोटी, प्रामाणिकपणा या गोष्टींना पैशांसमोर काही महत्त्व उरलेलं आहे की नाही, असा प्रश्न मला पडला.
त्याचवेळी माझ्या मनात कोल्हापूरच्या शिरोली पुलाजवळच्या केरळी आण्णाची आठवण ताजी झाली. कोरगावकर पेट्रोल पंपाला लागून एक छोटंसं खोपटं होतं आण्णाचं- पंक्चर काढून देण्याचं. राहायचाही तिथंच, एकटाच. त्यावेळी आम्ही शिरोली एमआयडीसीमधल्या सकाळ ऑफिसमध्ये कामाला जायचो. रात्रीच्या वेळी एखाद्याच्या बाईकमधली हवा गेली किंवा पंक्चर झालं, तरी आण्णाचा आधार असायचा. त्या खोपटासमोर उभं राहून आण्णाआण्णा...अशा एक-दोन हाकांमध्येच आण्णाची आतून ..’ ऐकू यायची. झोपेला टाटा करतच आण्णा टॉर्च घेऊन बाहेर यायचा. समोरच्या बाईकची वास्तपुस्त होऊन त्यानं लगेच पाण्याची पाटी घेऊन काम सुरूही केलेलं असायचं. झटक्यात पंक्चर काढून टायरीत हवा भरून हो गया.. असं हसतमुखानं सांगून नेमकेच पैसे घेऊन आण्णा त्याच्या त्या सहा बाय सहाच्या गुहेत गडपही झालेला असायचा. त्याच्यासाठी हे रोजचंच असलं तरी त्या रात्रीच्या वेळी आण्णा संबंधिताला देवासारखा वाटायचा. २००५च्या मुसळधार पावसात पंचगंगेला महापूर येण्याच्या आदल्या रात्री आण्णानं तशा प्रचंड पावसात भिजत माझ्या बाईकचं पंक्चर काढून दिल्याची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. दुसऱ्या दिवशी त्या महापुराच्या पाण्यात आण्णाचं ते खोपट सुद्धा पाण्याखाली गेलं होतं. आण्णा आता कुठं गेला माहीत नाही. पण त्याच्या चांगल्या स्वभावाची, सहकार्याच्या भावनेबद्दल कृतज्ञतेची भावना इतक्या वर्षांनंतर (मी पैसे मोजले असून सुद्धा!) मला व्यक्त करावीशी वाटते.
या पार्श्वभूमीवर जेव्हा गेल्या आठवड्यातल्या घटनेकडं मी पाहतो, तेव्हा मनावर निराशेचं सावट येतं. पैशाचा मोह, लालूच माणसाला काहीही करायला भाग पाडते आणि मग त्यापायी सारासार विचारही तो करू शकत नाही की काय? मग पुढचा प्रश्नही मला पडतो- असा दुसऱ्याला फसवून वाममार्गानं (वाममार्गच तो!) मिळवलेला पैसा माणसाला लाभत असेल काय? त्याला, त्याच्या कुटुंबाला समाधान मिळत असेल काय? एखादं चुकून सापडलेलं पेनही असाच कोणीतरी बँकेतला अनोळखी माणूस आपल्याकडून मागून घेतो आणि खिशाला लावून गायबही होतो, असा अनुभव आपल्याला येतोच. मला शाळेच्या ग्राऊंडवर सापडलेला एक बीआरआयबॉल सुद्धा मॅच खेळताना शॉट मारल्यावर सापडला तसाच कुठं तरी गेला. मग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा लाभेलच कसा?
मी कल्याणला राहात असतानाचा प्रसंग. घर विकत घेण्यासाठी काही नवी जुनी घरं एजंटसोबत पाहात फिरत होतो. एक घर मला आवडलं सुद्धा. पण ठराविक किंमतीचा आणि ठराविक मुदतीत व्यवहार करण्याचा त्यांचा आग्रह आहे, असं एजंटकडून समजलं. घराचा कर्ता भेटला नाही पण, घरात त्या गृहिणीसोबत तिचा छोटा निरागस मुलगाही होता, टीव्ही पाहात बसलेला. घर पाहून परतताना एजंटला विचारलं, यांना तितकीच किंमत का हवीय? आणि इतक्या तातडीनं का व्यवहार करायचाय?’ त्यावर त्यानं जे सांगितलं, त्यानं मी सुन्न झालो. घरचा कर्ता ट्रॅफिकमध्ये होता. वरकमाईचे सर्व मार्ग धुंडाळून त्याच पैशातून घर घेतलेलं. पण आता घरात जो छोकरा आहे, त्याच्या हृदयाला छिद्र आहे आणि त्याचं तातडीनं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना घर विकायचंय. त्याचवेळी असलंघर न घेण्याचा निर्णय मी घेतलाच, पण त्या परिस्थितीतही मला आश्चर्य वाटलं. जो पैसा जसा आला, त्यानं आपली वाट शोधली होती. यात त्या बालकाचा काहीच दोष नव्हता, पण त्याला माध्यम करून त्या गृहकर्त्याला अद्दल घडवायचं नियतीनं ठरविलेलं दिसलं. पण, यातून तो शहाणा झाला तर ठीक, नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या! आणि पुन्हा त्याला अद्दल घडविण्यासाठी नियतीला नवे मार्ग धुंडाळावे लागणार, हे ओघानं आलंच.
माणसाची नीती, चारित्र्य आणि हेतू शुद्ध असले तर कदाचित त्याला कमी पैसा (हां, आता तुलना कोणाशी करता, हा मुद्दाही आहेच.) मिळेल, पण तो गरजा पूर्ण होण्याइतका निश्चित असेल आणि त्यामध्ये समाधान असेल, सुखाची झोप असेल, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच घरातली तुळशी कोमेजल्यानं मनी प्लँटच्या कुंडीत अगरबत्ती पेरणाऱ्या माझ्या बायकोच्या कृतीकडं काणाडोळा करणं, मला सहजगत्या जमतं.

रविवार, १६ जून, २०१३

भरगच्च प्रतिसाद लाभलेली उत्कृष्ट कार्यशाळा!




('दै. कृषीवल'तर्फे आयोजित पहिल्या स्तंभ विचार परिषदेच्या अनुषंगाने अलिबाग येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेविषयी रविवार, दि. १६ जून २०१३ रोजीच्या 'कृषीवल मोहोर' पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला माझा लेख वाचकांसाठी सादर करीत आहे.)

दै. कृषीवलचा ७६वा वर्धापनदिन अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. दैनिकाचे मुख्य संपादक संजय आवटे यांनी कृषीवलच्या सर्व स्तंभलेखकांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरविले आणि अगदी दोन दिवसांत पहिल्या स्तंभ विचार परिषदेची संकल्पना आकाराला आली. दोन दिवसांचा अतिशय भरगच्च कार्यक्रम आणि त्यामध्ये प्रा. हरी नरके, न्या. डॉ. यशवंत चावरे, प्रा. जी.एस. भोसले आदी मान्यवरांसह सर्व नवे-जुने स्तंभलेखक सहभागी झाले. परिषदेची व्याप्ती कदाचित या सहभागींपुरतीच मर्यादित राहिली असती, जर तिला रायगड जिल्हास्तरीय बातमीदारांच्या कार्यशाळेची जोड मिळाली नसती तर! आवटे सरांबरोबरच कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांची भूमिकाही त्यामध्ये खूप महत्त्वाची ठरली. रायगड जिल्ह्यातील बातमीदारांची कार्यशाळा याचा अर्थ आम्ही रायगड जिल्ह्यातील केवळ कृषीवलच्या बातमीदारांची कार्यशाळा असा घेतला होता. तथापि, प्रत्यक्षात कृषीवलव्यतिरिक्तही जिल्ह्यातील प्रत्येक बातमीदारासाठी ही कार्यशाळा खुली होती, हे या कार्यशाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले, असे मला वाटते. आणि जिल्ह्यातील सुमारे ७९ बातमीदार या कार्यशाळेला उपस्थित राहिले, यावरुन कार्यशाळेचे महत्त्व आणि कृषीवलचे जिल्ह्यातील आदराचे स्थान या दोन्ही गोष्टी अधोरेखित झाल्या.
चित्रलेखा पाटील यांनी तर आपल्या मनोगतामध्ये कृषीवल माझा असला तरी जिल्ह्यातील कोणत्याही दैनिकाच्या बातमीदाराविषयी आपल्याला तितकीच आत्मियता असल्याचे स्पष्ट केले. यावरुन व्यावसायिक धोरणांच्या पलिकडे जाऊन कृषीवलचे व्यवस्थापन आजघडीलाही विचार करते आहे, पाहते आहे, याचे प्रत्यंतर आले.
सदरची कार्यशाळा पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि बातमीदारांची तयारी या विषयावर झाली. त्यामध्ये एकूण चार सत्रांमध्ये बातमी कशी लिहावी, काय लिहावी?, ग्रामीण वृत्तांकन, बदलणारी ग्रामीण पत्रकारिता, ऑनलाइन माध्यमे आणि नवे जग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मराठीत अचूक व प्रभावी कसे लिहावे?, पत्रकार आणि कायदे आणि माहिती अधिकार कायदा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयांवर अनुक्रमे शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव आलोक जत्राटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार, अहमदनगरचे लोकसत्ताचे वरिष्ठ बातमीदार अशोक तुपे, प्रहार ऑनलाइनचे संपादकीय प्रमुख जयकृष्ण नायर, आरसीएफ, अलिबागचे जनसंपर्क उपव्यवस्थापक धनंजय खामकर, पत्रकार-लेखिका स्मिता पाटील वळसंगकर, अधिपरीक्षक (पुस्तके व प्रकाशने) हर्षवर्धन पवार आणि राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार-लेखक-विचारवंत प्रा. जी.एस. भोसले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या सत्रामध्ये एबीपी माझाचे अँकर प्रसन्न जोशी यांनी 'बदलणारी माध्यमे- इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विशेष संदर्भात' या विषयावर विवेचन केले तर समारोप लोकमत मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर यांच्या हस्ते झाला. याखेरीज कार्यशाळेला संपादक सतीश धारप, प्रफुल्ल पवार, जयंत धुळप, बळवंत वालेकर, नागेश कुलकर्णी, सुभाष म्हात्रे, उमाजी केळुसकर, हर्षद कशाळकर, सुवर्णा दिवेकर, किशोर सूद, महेश पोरे, मोहन जाधव, सचिन पाटील आदी वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते. अलिबागमध्ये पत्रकारांसाठी इतकी मोठ्या प्रमाणात भरविण्यात आलेली आणि मुख्य म्हणजे पत्रकारांकडून इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेली ही अलिकडच्या काळातील सर्वाधिक यशस्वी व एकमेव कार्यशाळा ठरली असल्याचे एका सहभागी ज्येष्ठ पत्रकारानी सांगितले.
पत्रकारितेच्या क्षेत्राच्या माध्यमातून सर्वत्र वावरत असताना बातमीदारांमध्ये सर्वज्ञतेच्या भावनेचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे हे आता काय नवीन सांगणार?’ अशी भावनाही मध्येच डोके वर काढण्याचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना या कार्यशाळेस उपस्थित राहावेसे वाटले, ही त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती अद्याप कायम असल्याचे निदर्शक होती. जिल्हा पातळीवर किंवा ग्रामीण स्तरावर बातमीदारी करत असताना बातमीदारांमध्ये पत्रकारितेच्या मूळ प्रवाहांपासून एक प्रकारचे तुटलेपण येण्याची, गरज नसतानाही आवाका विनाकारण संकुचित होण्याची शक्यता असते. आज महाराष्ट्राच्या शहरीकरणाचा वेग ५० टक्क्यांहून अधिक आहे. या पार्श्वभूमीवर खेडी शहरीकरणाकडे तर शहरे मेगा-शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे शहरी-ग्रामीण सीमारेषा तितक्याच वेगाने पुसट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण बातमीदारांनी शहरीकरणाचे, विशेषतः पत्रकारितेमध्ये शहरीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या अनुषंगाने होत चाललेले बदल अभ्यासून ते आत्मसात करण्याची आजघडीला तीव्र गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने कृषीवलने आयोजित केलेली कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरली, असे म्हणता येईल.
उद्घाटनाच्या सत्रामध्ये उद्घाटक प्रा. भोसले यांनी पत्रकारितेमध्ये नवनवे प्रवाह, बदल येत गेले असले तरी मूलभूत सामाजिक दृष्टीकोन बदलता कामा नये, असे मत मांडले तर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाचा वाढता वरचष्मा आणि मनोरंजनाच्या झंझावातामध्ये बातमीचे घसरणारे मूल्य चिंताजनक असल्याचे सांगितले. प्रसन्न जोशी यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करत असताना सांभाळावी लागणारी अष्टावधाने आणि त्यामधून २४x७ बातमी देण्याचे हमखास बंधन यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील बातम्यांना इन्फोटेनमेंटचे स्वरुप आल्याचे सांगितले. त्या तुलनेत मुद्रित माध्यमांमध्ये बातमीची शहानिशा आणि अधिक तपशील देण्यासाठी उपलब्ध वेळ यामुळे या माध्यमाची विश्वासार्हता आणि वार्तामूल्ये अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळली जातात, असे सांगितले.
त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बातमीलेखनाविषयी मी मार्गदर्शन केले. केवळ शहरी भागात काम करण्याची संधी न मिळणे म्हणून ग्रामीण हा शिक्का पत्रकारांवर बसतो, तथापि, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगिकाराने ही दरी कमी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भारताच्या विकासासाठी केंर्द व राज्य शासनाच्या स्तरावर ज्या काही अनेकविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्यांच्या योग्य अंमलबजावणीचा आग्रह धरणे, त्यावर लक्ष ठेवणे आणि त्यासंदर्भात फीडबॅक देणे, अशा विकासात्मक जबाबदारी या पत्रकारांवर आहे. त्या दृष्टीने आपण सारे ग्रामीण नव्हे, तर विकास पत्रकार आहात, अशी भावना बाळगण्यास सांगितले.
यानंतर भगवान दातार सरांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून बातमी करण्याची संधी कशी डोकावत असते, फक्त आपण ती साधणे पत्रकारितेत किती महत्त्वाचे असते, ते उदाहरणांसह स्पष्ट केले. पुढच्या सत्रामध्ये स्मिता पाटील-वळसंगकर यांनी प्रभावी पत्रकारितेसाठी मराठी शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे महत्त्व मौलिक असल्याचे सांगितले. भाषा समृद्धीच्या दृष्टीने आणि व्यासंगी  पत्रकारितेच्या दृष्टीने पत्रकारांनी चौफेर, डोळस वाचन आणि प्रयोगशील लेखणी या दोन गोष्टींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जगदीश मोरे यांनी माहिती अधिकार कायद्यामुळे पत्रकारांच्या हातामध्येही माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त अस्त्र प्राप्त झाले असून त्याचा समाजहितासाठीच वापर करावा, असे आवाहन केले. केंद्र व राज्य निवडणूक आयोगांची कार्यप्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनजागृतीच्या कामी पत्रकारांचे योगदान कसे मोलाचे ठरते, याचे विवेचन त्यांनी केले. हर्षवर्धन पवार यांनी पुस्तके व प्रकाशने विभागाचे महत्त्व आणि पत्रकारांकडून, संपादकांकडून शासनाच्या अपेक्षा याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. अशोक तुपे यांनी पत्रकारितेच्या आजच्या बदलत्या स्वरुपामध्ये ग्रामीण पत्रकारांचे योगदान आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार असून त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण वार्तांकनावर त्यांनी भर देणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. धनंजय खामकर यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि पत्रकारितेचे साहचर्य अतिशय अत्यावश्यक असून पत्रकारांच्या योग्य सहकार्याखेरीज कोणताही जनसंपर्क यशस्वी होऊच शकणार नाही, असे मत मांडले. जयकृष्ण नायर यांनीही ऑनलाइन माध्यमाचा स्वीकार ही काळाची गरज असून सर्वच बातमीदारांनी त्या दृष्टीने आवश्यक बदलांचा अंगिकार केला पाहिजे, असे मत मांडले.
समारोपाच्या सत्रामध्ये लोकमत, मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीमध्ये स्थानिक बातमीदारांनी बदलत्या प्रवाहांचे भान स्वीकारून त्यांना अनुरुप असे बदल स्वतःच्या कार्यशैलीमध्ये करावेत, असा मौलिक सल्ला दिला. त्याचप्रमाणे पत्रकारितेमध्ये व्यवस्थापनाचे महत्त्व वाढण्याची कारणमीमांसा करत असतानाच तशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी आणि भान राखून पत्रकारिता करता येऊ शकते, हे अनेक उदाहरणांसह पटवून दिले.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील एकूणच बदलत्या प्रवाहांचा समान धागा घेऊन पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे कशी जोपासता येतात, याविषयी सर्वच मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. श्री. आवटे आणि श्रीमती पाटील यांनी अवघ्या एका दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये किमान चार दिवसांच्या कार्यशाळेइतक्या माहितीचा खजिना रायगड जिल्ह्यातील बातमीदारांना उपलब्ध केला. केवळ व्याख्यानांच्या स्वरुपातच नव्हे तर लेखी टिपण, मुद्देही उपलब्ध केले, जेणे करून या कार्यशाळेतील मूलभूत माहिती सदैव त्यांच्या हाताशी राहील, याची दक्षता आयोजकांनी घेतली. या अतिशय नेटक्या, आटोपशीर कार्यशाळेला मिळालेला भरगच्च प्रतिसाद पाहता आम्हा मार्गदर्शकांनाही एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे समाधान लाभले.