रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

'फेसबुक'चा संशयकल्लोळ!

 

 ('दै. पुढारी'च्या आज, दि. २३ ऑगस्ट २०२० रोजीच्या 'बहार' साप्ताहिक पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेली कव्हर स्टोरी माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे 'दै. पुढारी'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)



गेल्या काही वर्षांतील जागतिक घडामोडींवर नजर टाकली तर, जिथे तिथे फेसबुकचे नाव सामोरे येते आहे, हा केवळ योगायोग नाही. फेसबुक कंपनीकडून तिच्या वापरकर्त्यांचा डाटा, माहिती व्यापारी कंपन्यांना देण्याची प्रकरणे जागतिक पटलावर सातत्याने सामोरी आली आहेत. समाजमाध्यमांमुळे माहितीचे लोकशाहीकरण होते आहे, असे सरधोपट विधान केले जाते. पण, लोकांना गैर माहितीच खरी म्हणून सादर केली जात असेल आणि बहुतांश लोकांना ती सत्य वाटत असेल, तर तो अपभ्रंशित सत्याचा आभास आहे. त्याचा धोका वेळीच ओळखायला हवा.

--- 

सोशल मीडिया क्षेत्रातली जायंट कंपनी फेसबुकने भारतात फेक न्यूज आणि हेट स्पीचच्या संदर्भात भाजपधार्जिणे धोरण स्वीकारले आहे, असा गौप्यस्फोट अमेरिकेतील आघाडीच्या वॉल स्ट्रीट जर्नलने केला. वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकमधीलच काही सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आणि त्यामध्ये संशयाची सुई फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी प्रमुख आँखी दास यांच्याकडे राहिली. सत्तारुढ पक्षाच्या विरोधी धोरण स्वीकारले, तर कंपनीच्या देशातील व्यवसायावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांची वक्तव्ये पेजवरुन हटवण्याबाबत सबुरीचे धोरण ठेवा, असे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बजावल्याचे म्हटले आहे.

विरोधी पक्षांनी त्याची गंभीर दखल घेऊन कारवाईची मागणी करण्यास सुरवात केली, तर सत्तारुढ पक्षाकडूनही त्यांच्या कार्यकाळातील प्रकरणांचे दाखले देऊन त्यांची तोंडे गप्प करण्याचा प्रयत्न सुरू झाला. तिकडे फेसबुकच्या आँखी दास यांना धमकीचे, शिवीगाळीचे फोन सुरू झाले. अन्य प्रकरणांप्रमाणेच या प्रकरणाचे अवघे राजकारण सुरू झाले. राजकारण होणे स्वाभाविक असले तरी या प्रकरणाचे इतर पदर उलगडून दूरगामी परिणाम आणि धोके लक्षात घेऊन या संदर्भात केंद्रीय पातळीवर कार्यवाही होण्याची मोठी गरज आहे.

फेसबुक ही मार्क झुकरबर्ग याची खासगी कंपनी आहे. फेसबुकवरील वापरकर्त्यांची केवळ संख्या लक्षात घेतली, तर फेसबुक हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरेल आणि फेसबुकसह तिच्या वॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची एकत्रित संख्या विचारात घेतली, तर तो कधीच पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. या गोष्टी एव्हाना सर्वांना ठाऊक आहेत. तथापि, ज्याप्रमाणे कोणतीही खासगी कंपनी ही नफा डोळ्यांसमोर ठेवूनच आपली धोरणे निर्धारित करीत असते, त्याप्रमाणेच फेसबुकने स्थापनेपासूनची वाटचाल केली आहे आणि म्हणूनच ती तिच्या क्षेत्रात सातत्याने अग्रणी आहे, फायद्यात आहे आणि वर्षागणिक तिचा नफा व नफेखोरी वाढतेच आहे. केवळ भारताचाच विचार केला तर गेल्या आर्थिक वर्षात फेसबुकचा निव्वळ नफा १०५ कोटी रुपये होता. यात कंपनीने विक्रमी ८४ टक्क्यांची वृद्धी नोंदविली. कंपनीने ८९२ कोटींचा महसूल प्राप्त केला, तो आधल्या वर्षीपेक्षा ७१ टक्क्यांनी अधिक राहिला. यावरुन भारताच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की, इथला महसूल, नफा आणि वर्षागणिक वाढत असणारी वापरकर्त्यांची संख्या या गोष्टी कोणत्याही कंपनीला सेफ गेम खेळण्यासाठी पुरेशा आहेत. आपला कारभार निर्वेधपणे पार पडून निर्धोकपणे नफ्यात खेळत राहायचे असेल, तर सत्तेशी हातमिळवणी करणे कधीही हिताचेच, असा सूज्ञ विचार कोणताही भांडवलशहा करणारच. त्याला फेसबुक अगर तिचा मालक कसा अपवाद असेल? आणि सोशल मीडिया क्षेत्रातला इतका मोठा मासा त्याच्या लाभापायी आपल्या मदतीसाठी इतका तत्पर आहे, हे दिसून आल्यानंतर कोणती सत्ता त्याची मदत नाकारण्याची चूक करेल? त्यामुळे हे केवळ आत्ताचेच साटेलोटे आहे आणि इतर भांडवलदार, व्यापारी कंपन्या त्याला अपवाद आहेत, असे कसे बरे म्हणता येईल? फेसबुकने भारतातील आघाडीच्या रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीत ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा एप्रिलमध्ये केली, हा आणखी एक पदरही या प्रकरणाला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली राजसत्ता आणि अर्थसत्तेच्या अभद्र युतीची जागतिक परंपरा या प्रकरणात पाळली गेली आहे, इतकेच या संदर्भात म्हणता येईल. मात्र...

मात्र... गेल्या काही वर्षांच्या जागतिक घडामोडींवर नजर टाकली, तर जिथे तिथे फेसबुकचे नाव सामोरे येते आहे, हा मात्र निश्चितच केवळ योगायोग नाही. फेसबुक कंपनीकडून तिच्या वापरकर्त्यांचा डाटा, माहिती व्यापारी कंपन्यांना देण्याची प्रकरणे जागतिक पटलावर सातत्याने सामोरी आली आहेत. केंब्रिज अॅनालिटिका हे त्यातले गाजलेले प्रकरण.

केंब्रिज अॅनालिटिका:

संशोधक डॉ. अलेक्झांडर कोगन आणि त्यांच्याजी.एस.आर. या कंपनीने फेसबुकच्या वापरकर्त्यांसाठी एक व्यक्तीमत्त्व चाचणी (क्विझ) विकसित केली. आपण कोणत्या व्यक्तीमत्त्वाचे आहात?’ ही चाचणी त्यांनी फेसबुकच्या वापरकर्त्यांसाठी सन २०१४मध्ये प्रसारित केली. या चाचणीत फेसबुकचे सुमारे तीन लाख पाच हजार वापरकर्ते सहभागी झाले. त्यांच्यासह त्यांच्या मित्र यादीतील मिळून अशा सुमारे ८७ दशलक्ष व्यक्तींची व्यक्तीगत माहिती त्यांच्या अपरोक्ष गोळा करण्यात आली आणि ती केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला विकण्यात आली. या कंपनीने ही माहिती अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राजकीय जाहिरातींसाठी वापरली, असा ठपका ठेवण्यात आला. केंब्रिज अॅनालिटिकाकडून मात्र कोणताही कायदेभंग केल्याचा अगर अशी कोणतीही माहिती वापरल्याचा इन्कार करण्यात आला. तथापि, या प्रकरणात फेसबुक मात्र तोंडघशी पडले. आपल्या वापरकर्त्यांच्या व्यक्तीगत माहितीच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी योग्य खबरदारी कंपनी घेत नसल्याचा बभ्रा जगभरात झाला.

हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबले नाही, तर यु.के.मध्ये डाटा सुरक्षेचे काम पाहणाऱ्या इन्फॉर्मेशन कमिशनर कार्यालयाकडून फेसबुकवर न्यायालयीन दावा ठोकण्यात आला. तिथे फेसबुकला सुमारे पाच लाख पौंडांचा दंड ठोठावण्यात आला आणि फेसबुकने हा दंड भरला सुद्धा!

जर्मनीमध्येही या प्रकरणातच फेसबुकला कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागले. जर्मनीच्या फेडरल कार्टेल कार्यालयाने फेसबुक कंपनी तिच्या मालकीच्या वॉट्सअॅप, इन्स्टाग्राम या कंपन्यांसह थर्ड पार्टी अॅप्लीकेशन्ससह गेमिंग व अन्य वेबसाइट वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती सुद्धा ट्रॅक करीत असल्याचा गंभीर ठपका ठेवला. त्यामुळे फेसबुकच्या जर्मनीमधील अॅक्टीव्हिटींवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले.

अमेरिकन सिनेटमध्ये कानउघाडणी:

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध उसळलेल्या वांशिक दंग्यांदरम्यान हेट स्पीच प्रसृत करणाऱ्यांना वेळीच आळा न घातल्यामुळे या प्रकरणाला दंगेखोरांइतकेच झुकरबर्ग तुम्ही सुद्धा जबाबदार आहात, अशा शब्दांत अमेरिकन सिनेटमध्ये कानउघाडणी करण्यात आली. वरमाँटचे सिनेटर पॅट्रिक लिहाय यांनी म्यानमारमध्ये फेसबुकवर प्रसारित झालेल्या एका पोस्टचे पोस्टरच सभागृहात प्रदर्शित केले. रोहिंग्या दंगलीचे वार्तांकन करणाऱ्या मुस्लीम पत्रकारांना ठार मारण्याची भाषा त्यात होती. रोहिंग्या दंगलीच्या संदर्भात विखंडित माहिती (डिसइन्फॉर्मेशन) प्रसृत करण्यात फेसबुकने कळीची भूमिका बजावल्याचा ठपका त्यांनी ठेवला. तो मान्य करतानाच म्यानमारमध्ये तिथल्या भाषेचा जाणकार स्टाफ वाढवण्याचे, तसेच तेथील धोरणांत बदल करण्याचे आश्वासन झुकरबर्गला द्यावे लागले. तसेच, या देशात सामाजिक विद्वेष फैलावण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल त्याने माफीही मागितली.

... मग भारताबाबत मौन का?

युके, जर्मनीमध्ये कायदेशीर कारवाई केल्यानंतर दंड भरणारी, अमेरिकी सिनेटसमोर माफी मागणारी फेसबुक आणि झुकरबर्ग हे भारतातही दैनंदिन पातळीवर फेक न्यूज, हेट स्पीच आणि मिसइन्फॉर्मेशन व डिसइन्फॉर्मेशन प्रसृत करण्यामध्ये मोठा वाटा उचलत आहेत. भारतात मॉब लिंचिंग, पुतळ्यांच्या विटंबनेच्या वार्ता, रेव्ह पार्ट्यांची निमंत्रणे अशा अनेक गोष्टींच्या प्रसाराला फेसबुक आणि वॉट्सअॅप जबाबदार आहेत. असे असतानाही येथे मात्र त्यांना भारतीयांची माफी मागावीशी वाटत नाही. याचे कारण आपल्याकडे राजकीय व सामाजिक अशा कोणत्याच पातळीवर त्याविरोधात जनमत संघटित होत नाही. या व्यासपीठांचे तात्कालिक लाभ साऱ्यांनाच हवेहवेसे वाटत असतात. त्यापोटी देशाच्या भविष्यावर जे दूरगामी परिणाम होऊ घातले आहेत, त्याकडे काणाडोळा करणे आपल्याला खचितच परवडणारे नाही.

कोऑर्डिनेटेड इनऑथेंटिक बिहॅव्हियर (सी.आय.बी.):

आपण करीत असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने कोऑर्डिनेटेड इनऑथेंटिक बिहॅव्हियर ही बाब समजून घेणे आवश्यक आहे. हे प्रकरण फेक न्यूजच्या पुढचे पाऊल आहे. एका अर्थाने ही समाजमाध्यमांवरील संघटित गुन्हेगारीच आहे. यामध्ये ज्या शक्तींना फेक न्यूज प्रसृत करावयाच्या आहेत, ते अशा वार्तांसाठी वृत्तपत्रे अगर चॅनल्सच्या नावाशी साधर्म्य असणारी पोर्टल, वेबसाईट यांची निर्मिती करतात. त्यावर फेक न्यूज, त्याच्या पुष्ट्यर्थ मॉर्फिंग केलेली बनावट छायाचित्रे, बनावट व्हिडिओ असे सारे मटेरिअल ठेवले जाते. त्याचवेळी फेसबुक व अन्य समाजमाध्यमांवरही अनेक पृष्ठे तयार केली जातात. त्या पृष्ठांवर आणि अन्य माध्यमांतून मूळ फेक न्यूजच्या लिंक फिरविल्या जातात. हा मजकूर विविध माध्यमांतून व्हायरल केला जातो. जेव्हा एखादा त्याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा विविध व्यासपीठांवर त्याला तीच माहिती दिसते. साहजिकच ती त्याला खरी वाटते आणि त्यावर विश्वास ठेवून तो सुद्धा ती पुढे फॉरवर्ड करतो.

ही बाब अतिगंभीर स्वरुपाची आहे. हिटलरने ज्यूंचे शिरकाण केलेच नाही, अशा स्वरुपाची माहिती जगभर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात ठाऊक झाले. भारतातही अलिकडे फेक न्यूज पसरवणाऱ्या प्रवृत्ती या पद्धतीचा अवलंब सर्रास करीत आहेत. याबाबत जगभरातून दबाव वाढल्यानंतर फेसबुकने सी.आय.बी. प्रकरणांचेही मॉनिटरिंग सुरू केले आणि आता त्यांच्या वेबसाईटवरुन केलेल्या कारवाईची माहितीही देण्यात येते आहे. तथापि, भारताच्या संदर्भात अशी कारवाई झाल्याचे अद्याप तरी वाचनात आलेले नाही.

माहितीचे लोकशाहीकरण! पण, खऱ्या की खोट्या?

भारतामध्ये समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य नागरिकाच्या हाती माहितीच्या चाव्या एकवटल्यामुळे माहितीचे लोकशाहीकरण होते आहे, झाले आहे, असे सरधोपट विधान केले जाते. पण, उपरोक्त प्रकरणे पाहिली की, या विधानातील अर्धसत्यतेचीच प्रचिती येते. माहिती ही लोकांचा अधिकार आहे. पण, त्या लोकांना अर्धवट, प्रक्रिया केलेली, चुकीची, विखंडित अगर सर्वस्वी गैर माहितीच खरी म्हणून सादर केली जात असेल आणि नव्या पिढीसह बहुतांश लोकांना ती सत्य वाटत असेल, तर तो अपभ्रंशित सत्याचा आभास आहे. त्यामुळेच समाजमाध्यमे ही आपल्या देशात सद्यस्थितीत निष्क्रिय समाजमानस घडविण्याचे आणि सहभागात्मक लोकशाहीचा आभास निर्माण करण्याचे काम करीत आहेत. अभिव्यक्तीची दुकानदारी थाटणाऱ्या कंपन्या त्या लोकशाहीचे नफेखोर एजंट म्हणून काम पाहू लागल्या आहेत, असे खेदाने म्हणावे लागते. या एजंटगिरीला वेळीच आळा घालण्यासाठी पुढे सरसावणार कोण आणि कधी, हाच आजघडीचा कळीचा मुद्दा आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याच्या शशी थरुर यांच्या मागणीकडे आपण त्या दृष्टीने पाहायला हवे.

--- 

समाजमाध्यमांतला नवा विस्तारवाद

माहिती तंत्रज्ञानाच्या, विशेषतः समाजमाध्यमांच्या क्षेत्राला केवळ एकच नियम लागू होतो, तो म्हणजे, द ओन्ली कॉन्स्टंट इज चेंज’! वापरकर्त्याला नवे असे जर काही तुम्ही देऊ शकला नाहीत, तर तो त्याच-त्या पणाला कंटाळून दुसरीकडे जाऊ शकतो. नेमकी हीच बाब हेरून फेसबुकने गेली सोळा वर्षे सातत्याने स्वतःला अपडेट ठेवले आहे.

कितने आए, कितने गए तरीही फेसबुकचे स्थान, त्याची लोकप्रियता गेल्या सोळा वर्षांत सातत्याने कायम आहे. यामागे फेसबुकने जाणीवपूर्वक स्वीकारलेले बदलांचे धोरण सर्वाधिक कारणीभूत आहे. इंटरनेटचे, सोशल नेटवर्किंगचे जग आभासी आहे. प्रत्यक्ष जीवनात तोच-तो पणाचा आपल्याला कंटाळा येतो, तेच तत्त्व आभासी जगतालाही लागू आहे, कदाचित प्रत्यक्षाहूनही अधिक प्रकर्षाने! त्यामुळे झुकरबर्गने फेसबुकचे रुप अगदी सुरवातीपासून कमीअधिक प्रमाणात सातत्याने बदलते ठेवले आहे; कधी दृश्य स्वरुपात, तर कधी युझर फ्रेंडलीनेसच्या स्वरुपात. त्यामध्ये प्रामुख्याने वॉलची निर्मिती, विद्यापीठांबरोबरच हायस्कूलपर्यंतही सेवेचा विस्तार, १३ वर्षांवरील सर्वांना फेसबुकवर येण्याची संधी आणि न्यूज फीड या सर्वाधिक लोकप्रिय सेवेची सुरवात, प्रोग्रामर डेव्हलपर्ससाठी प्लॅटफॉर्मची निर्मिती, फेसबुक चॅट, लाइक सेवा, लोकेशन फीचर, टाइमलाइनची निर्मिती, जाहिरातदारांना स्टेटस, फोटो, मेसेज अपडेट करण्याची संधी, फोटो आणि प्रोफाइल सर्च करणारे ग्राफ सर्च, लव्ह फीचर, जीआयएफ्स, इमोजी, युवर स्टोरी, मेसेंजर अॅप लॉक यांपासून ते अगदी लॉकडाऊन कालखंडातील मेसेंजर रुम्स आणि तेथून गो लाइव्हची सुविधा आदींचा समावेश आहे. याखेरीज मेसेंजर, इन्स्टाग्रामसह डायरेक्ट, बूमरँग ही अॅप्लीकेशन्स, बोनफायर, फेसबुक मेन्शन्स, फेसबुक शॉप्स, स्पार्क एआर स्टुडिओ, ऑडियन्स नेटवर्क, फेसबुक बिझनेस टुल्स आदी उत्पादनेही सादर केली. यावरुन वापरकर्त्यांसाठी या सुविधांची निर्मिती करत असतानाच कंपनी म्हणूनही फेसबुकने आपला विस्तार कौशल्याने वाढवल्याचे दिसून येते. नॅसडॅकमध्ये लिस्टेड कंपनी म्हणून पब्लीक होण्याबरोबरच इन्स्टाग्रामसारखी कंपनी टेकओव्हर करण्यासारख्या अनेक समयोचित निर्णयांचा त्यामध्ये समावेश आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जायंट होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या कंपन्यांनी स्टार्टअप कंपन्यांच्या मर्जर आणि ॲक्विझिशनचा मार्ग अवलंबला. या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येकी जवळपास २५० कंपन्या खरेदी केल्या आहेत. फेसबुकनेही आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी त्यांचाच कित्ता गिरवला आहे.

फेसबुकने आजपर्यंत ८० हून अधिक वेगवेगळ्या कंपन्या खरेदी केलेल्या आहेत. त्या बहुतांश अमेरिकेतील आणि सॅन फ्रॅन्सिस्को बे एरियातीलच आहेत. अलिकडच्या काळात स्वीत्झर्लंड, यु.के., स्पेन, जर्मनीतील कंपन्याही त्यांनी लाखो डॉलर मोजून खरेदी केल्या आहेत. या मर्जर व ॲक्विझिशनच्या बाबतीत निर्णय घेताना गुगलचे लॅरी पेज त्या व्यवहाराला टूथब्रश टेस्ट लागू होते का, ते पाहतात. म्हणजे काय तर, असे उत्पादन जे लोक दिवसातून किमान एक-दोनदा तरी वापरतात आणि जे त्यांच्यासाठी नियमितपणे उपयुक्त ठरेल, ते! लॅरी म्हणतात, ही टूथब्रश टेस्ट उत्तीर्ण होणारे उत्पादन आणि तेही माहिती तंत्रज्ञानाशी निगडित असेल, तर त्यामध्ये मला रस असतो.

मार्क झुकरबर्गचे या बाबतीतले तत्त्वज्ञान थोडे वेगळे आहे. तो म्हणतो, मी कंपनी घ्यायची म्हणून घेत नाही, तर त्या कंपनीमधले टॅलेंट मला हवे असते. त्या तज्ज्ञ लोकांसाठी खरे तर मी या कंपन्या घेतो. झुकरबर्गचे म्हणणे खरे आहे कारण त्याने टेकओव्हर केलेल्या वॉट्सॲप व इन्स्टाग्राम वगळता सर्व कंपन्या मूळ फेसबुक कंपनीतच विलीन करण्यात आल्या. वॉट्सॲपसाठी सुमारे १९ अब्ज डॉलर मोजताना फेसबुकने वॉट्सॲपच्या एका वापरकर्त्यासाठी जवळजवळ ४० डॉलर मोजले, असे म्हणता येईल. फेसबुकचे सोशल मीडियामधील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कनेक्टयू या बंद पडलेल्या कंपनीसह एफबी डॉट कॉम हे डोमेनही खरेदी करायला मागेपुढे पाहिले नाही. फ्रेंडस्टर या स्पर्धक कंपनीकडून बौद्धिक संपदा हक्क मिळविण्यासाठी ४० दशलक्ष डॉलर्स मोजले. इन्स्टाग्रामसाठी ४०० दशलक्ष मोजले, तर गेल्या वर्षी अमेरिकेतल्या कंट्रोल-लॅब्जच्या खरेदीचा व्यवहार हा विक्रमी ५०० दशलक्ष ते १ अब्ज डॉलर या दरम्यान झाल्याचे सांगितले जाते. हीच सेवा फेसबुकने फेसबुक रिॲल्टी लॅबच्या नावाने सादर केली. या खेरीज फेसबुकमध्ये नित्यनवे बदल घडविण्यासाठी, नवी व्हेंचर्स हाती घेण्यासाठी अनेक स्टार्टअप कंपन्या खरेदी केल्या. त्या कंपन्यांच्या माध्यमातून कितीतरी टॅलेंटेड, प्रयोगशील अभियंते फेसबुकमध्ये दाखल झाले. यामध्ये ब्लॅक रॉस, जो हेवीट (पॅराकी), पॉल बुशेट, ब्रेट टेलर (फ्रेंडफीड), चार्ल्स लीन, ॲड्रियन ग्रॅहम (नेक्स्टस्टॉप), निकोलस फेल्टन (डे-टम), माईक मेटास (पुश पॉप प्रेस), चार्ल्स जॉली (स्ट्रोब), जेन कोअम (वॉट्सअप), पामर ल्युकरी, ब्रेंडन आयरीब व जॉन डी. कार्मेक (ऑक्युलस व्हीआर) अशा दिग्गज सीईओ व अभियंत्यांची फौज फेसबुकमध्ये त्यांच्या त्यांच्या कंपन्यांसोबत दाखल झाली. महत्त्वाचे म्हणजे संजीव सिंग (फ्रेंडफीड), गोकुळ राजाराम व गिरी राजाराम (चाय लॅब्ज), नीलेश पटेल (लाइटबॉक्स डॉट कॉम), अविचल गर्ग (स्पूल) अशा अनेक भारतीय वंशाच्या अभियंत्यांचाही यात समावेश आहे.

मोठा मासा छोट्या माशांना खाऊन अधिक मोठा, अधिक बलशाली होतो, या नैसर्गिक सत्याचाच आधार घेऊन फेसबुक ही आज जगातली एक बलाढ्य कंपनी बनलेली आहे.


सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

चांगल्याचं बोचकं बांधणारा ‘माणूस’

 (शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व प्राचार्य डॉ. अशोक भोईटे नुकतेच पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. भोईटे सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या सेवा गौरव विशेषांकासाठी लिहीलेला लेख वाचकांसाठी शेअर करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर 'दै. लोकमत'च्या कार्यालयास आम्ही सदिच्छा भेट दिली, त्यावेळचे छायाचित्र.


प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांचे नाव प्रथमतः मी ऐकले तेच मुळी त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी निवड झाल्याची बातमी आली, तेव्हा! त्यापूर्वी केवळ कवी अशोक भोईटे यांना वाचून-ऐकून होतो. त्यावेळी हे कवी आणि प्राचार्य एकच तर नव्हेत, असाही प्रश्न माझ्या मनात आला. पण माहिती घेतल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये अतिशय समर्पित भावनेने योगदान देणारे प्राचार्य भोईटे हे वेगळे असल्याचे समजले. प्र-कुलगुरूपदाची सूत्रे घेण्यासाठी भोईटे सर हजर होत असताना शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात आणले होते. मुले काही कोणासाठीही ढोलताशे वाजवत नाहीत. ज्या व्यक्तीवर ते प्रेम करतात, तिथेच त्यांची ही उत्स्फूर्तता ओसंडून वाहात असते. त्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमातच डॉ. भोईटे यांच्या लोकसंग्रहाची मला पुरेपूर कल्पना आली. केवळ रयत शिक्षण संस्थेतीलच नव्हे, तर समाजातल्या विविध स्तरांतील मंडळी त्यांच्या स्वागतासाठी तेथे उपस्थित होती.

पुढे सरांनी चार्ज घेतला आणि कामाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात जाणे येणे सुरू झाले. तेव्हापासून या माणसाच्या विविध गुणांची, कार्यक्षमतेची वेळोवेळी प्रचिती येत राहिली. भोईटे सर हे रसायन खूप वेगळे आहे. कर्मवीर अण्णांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर प्रचंड पगडा आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीमधून, निर्णयामधून ते दिसून आले. इथे आपण कोणासाठी आहोत? तर, विद्यार्थ्यांसाठी!  मग, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत असताना कोणी कितीही आडवे पडण्याचा प्रयत्न केला, अडथळे आणले, तरी त्याची फिकीर न करता संबंधित निर्णयावर ठाम राहात त्यावर कार्यवाही ते करीत. जे सहकारी काम करतात, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारा, जे कमी पडतात, त्यांना प्रोत्साहित करणारा आणि काम टाळणाऱ्यांचे कान पिळणारा एक कर्तव्यकठोर प्रशासक म्हणूनही मी त्यांच्याकडे पाहतो. आपण जर एखादे काम चांगल्या भावनेने, शुद्ध हेतूने हाती घेतले आहे; कदाचित जे कोणासाठी अडचणीचे देखील असू शकते, अशा वेळी आपण कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ते काम तडीस नेण्यासाठी प्रयत्नशील राहिलेच पाहिजे. अशी ठाम भूमिका त्यांची असते. प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले असते, यावर त्यांचा विश्वास आहे. म्हणून प्रत्येकामधल्या त्या चांगूलपणाला आवाहन करीत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे.

भोईटे सरांच्या सहवासातील सुमारे अडीच वर्षे ही खरेच अत्यंत आनंददायी स्वरुपाची होती. कधी रागावणे नाही की आरडाओरड नाही; पण, फालतूपणाला थारा सुद्धा नाही, असे त्यांचे रुप मी बरेचदा अनुभवले. एकदा एक मराठवाड्यातल्या विद्यार्थी संघटनेचा नेता इथल्या मुलांचे जे प्रश्न नाहीत, अशाच गोष्टी घेऊन त्यांच्या केबीनमध्ये बराच वेळ त्यांच्याशी तंडत होता. परीक्षा नियंत्रकांपासून सारे अधिकारी हवालदिल होऊन बसले होते. भोईटे सरही त्याची खूप प्रेमाने समजून घालण्याचा प्रयत्न करीत होते, तरीही तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यावेळी सरांनी त्याला निर्वाणीचे निक्षून सांगितले, मी इतका वेळ तुमचे ऐकून घेतो आहे, समजून सांगतो आहे; पण तुम्ही ऐकून घेत नाही आहात. प्र-कुलगुरूंना इतर काही कामे नाहीत, असा जर तुमचा समज असेल, तर तसे नाही. तुम्ही जी भूमिका घेऊन इथे आला आहात, तिला माझे स्थानिक विद्यार्थी थोडीफारही भीक घालणार नाहीत. तुम्ही आताच्या आता माझ्या केबीनमधून निघा आणि काय करायचे ते करा. त्याला सरांनी जवळजवळ हाकलूनच लावला. धुसफूस करीत तो तथाकथित नेता तिथून बाहेर पडला. आणि तो खरेच इथल्या विद्यार्थ्यांमध्ये थोडीही फूट पाडू शकला नाही. नंतर तो कधीही विद्यापीठाकडे फिरकला नाही की त्याचा इथे काही नामोनिशाण उरला. ही कठोरता, मुत्सद्देगिरी, विद्यार्थ्यांवरील विश्वास या साऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. आता तसे फार क्वचित दिसते. संघटना नेते आले म्हटले की उगीचच त्याची दहशत घेऊन त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला जातो आणि मुद्देविहीन राजकारणाला शैक्षणिक क्षेत्रात चालना प्राप्त होते. मात्र, भोईटे सरांसारखे प्रशासक असल्यानंतर तसे होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून त्यांची उणीव आणि त्यांच्यासारख्या माणसाची गरज प्रशासनाला नित्य भासत असते.

भोईटे सरांचे आणि माझे नाते अधिक जवळिकीचे होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे त्यांच्या आई- ज्यांना ते ताई म्हणतात. एकदा सरांनी थोड्या निवांत क्षणी मला केबीनमध्ये बोलावले आणि आखीव तावांची काही पाने हातात ठेवली. त्यावर सरांच्या अक्षरात बऱ्याच ओव्या लिहीलेल्या होत्या. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शंकरराव भोईटे या जात्यावर बसल्यानंतर ओव्या म्हणत असत. गावी आईकडे गेल्यानंतर सरांनी तिच्याशेजारी बसून त्या ओव्या टिपून घेतल्या होत्या. बहिणाबाईंच्या नंतर इतक्या अप्रतिम ओव्या मी प्रथमच वाचत होतो. मी थक्क झालो. मी म्हटलं, सर, हा किती मोठा लोककलेचा ऐवज आहे, आपण तो प्रकाशित का करीत नाही?’ त्यावर सर उत्तरले, त्यासाठीच तर तुम्हाला बोलावलंय. तुमची प्रतिक्रिया काय ते आजमावायची आणि एखाद्या दैनिकात त्यावर काही लेख वगैरे देता येईल का पाहा.’ ‘ठीक आहे, असं म्हणून ते कागद घेऊन मी बाहेर पडलो. रात्री घरी गेल्यानंतर शांत चित्ताने पुन्हा साऱ्या ओव्या वाचून काढल्या. इतक्या ओव्या होत्या की, नुसत्या ओव्या जरी एकाखाली एक लिहील्या तरी कोणतेही दैनिक त्या मोजक्या जागेत छापू शकले नसते. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. एकच लेख छापण्याऐवजी याची मालिका केली तर मजा येईल. मी लगोलग शेतीप्रगती मासिकाचे संपादक मित्रवर्य रावसाहेब पुजारी यांना फोन लावला आणि त्यांना विषय सांगितला. ओव्यांचा विषय ऐकल्यानंतर ते जणू वेडावूनच गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते विद्यापीठ कार्यालयात दाखल झाले आणि मी त्यांना घेऊन सरांकडे गेलो. सरांना म्हटलं, सर, एका लेखासाठी या ओव्या खूपच आहेत. त्यामुळे त्याची मालिका आपण शेतीप्रगतीमध्ये दरमहा प्रसिद्ध करू या. सहा-सात भाग झाले तरी हरकत नाही. पुजारी सर तर हा ऐवज वाचक शेतकरी बंधूभगिनींपर्यंत पोहोचविण्यासाठी एका पायावर तयारच होते. पुढील महिन्यापासून ताईंच्या ओव्या ही लेखमाला शेतीप्रगतीमध्ये सुरू करण्याचे ठरले.

आता माझी जबाबदारी वाढली होती. मी ओव्यांचे वर्गीकरण केले. पांडुरंगाच्या ओव्या वेगळ्या, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेगळ्या, बहिण-भावाच्या वेगळ्या, सामाजिक संदेशाच्या वेगळ्या, नव-परिवर्तनाच्या वेगळ्या अशा अनेक विषयनिहाय त्यांचं वर्गीकरण केलं. मग सरांच्या आणि माझ्या बैठका सुरू झाल्या. ताईंच्या ओव्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास आम्ही घेतला. आणि माय माझी बहिणाबाई, मी तिचा सोपान या पहिल्या भागापासून सुरवात झाली. सोपानदेवांनी जशा बहिणाबाईंच्या ओव्या टिपून घेऊन तो ठेवा जगासमोर आणला, तेच काम नेमकं भोईटे सरांनी केलं, म्हणून त्यांनी तिथपासूनच सुरवात केली. ताईंची विठ्ठलावर प्रचंड भक्ती, त्यामुळं एका बैठकीत मी सरांना विचारलं, सर, ताई दरवर्षीच वारीला जात असतील नाही का?’ त्यावर सर हसले आणि उत्तरले, आलोक, माझी आई एकदाही वारीला अगर पंढरपूरला गेलेली नव्हती. हा माझ्यासाठी खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. ज्या माऊलीच्या ओठी

जाते मी पंढरीला, गरुड खांबाला दिली पाठ।

देवा माझ्या विठ्ठलाची, सुरत सगळी दिसे नीट।

संसार परपंच, सर्वा गंगेला वाहिला।

प्रितीचा पांडुरंग, माझ्या हृदयी राहिला॥

 

अशी ओवी येते, तिच्या सर्जनशीलतेबद्दल माझ्या मनात अतीव आदर दाटून आला. वारीला जाऊन आलेल्या बायाबापड्यांकडून पंढरपूरचं, सावळ्या विठुरायाचं केवळ वर्णन ऐकून पंढरीला प्रत्यक्ष गेल्याचीच भावना जिच्या मनात झरते, त्या माऊलीचं हृदय किती कोमल, संवेदनशील असेल, या कल्पनेनंच मी थरारून गेलो आणि मी त्या ओव्यांच्या अधिकच प्रेमात पडलो. अशा माऊलीच्या पोटी जन्मलेले भोईटे सर सुद्धा तसेच कोमलहृदयी असावेत, यात आश्चर्य ते काय बरे? ताईंच्या ओव्या मालिकेचे केवळ सहा सात भाग होतील, असे जे मला वाटत होते, ते सपशेल चुकीचे ठरले. तब्बल पंधरा भाग म्हणजे सुमारे सव्वा वर्षे ही मालिका चालली. भोईटे सरांनी आपल्या माऊलीप्रती कृतज्ञताच जणू या माध्यमातून व्यक्त करण्याचे काम केले. या दरम्यान जणू मी ताईमय आणि विठ्ठलमयच होऊन गेलो होतो, इतका आनंद त्यांचे शब्दांकन करताना मला लाभला. पुढे आम्ही ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. विश्वनाथ शिंदे यांना त्या ओव्या आणि त्यांचे निरुपण दाखविले. त्यांचा अभ्यास केल्यानंतर यातील सुमारे ९० टक्के ओव्या या ओरिजिनल आहेत, असा अभिप्राय त्यांनी दिला. अर्थात, ताईंच्या ओव्या या स्वरचित अधिक होत्या. अन्य ओव्यांचा प्रभाव त्यांवर कमीत कमी आहे. ही तर त्या माऊलीबद्दलचा आदर दुणावणारी बाब होती. या ओव्यांचे पुस्तक करण्याचे पुजारी सरांनी योजिले आहे. आता निवृत्तीनंतरच्या कालखंडात भोईटे सरांनी त्याकडे लक्ष द्यावे, एवढे आमचे मागणे आहे.

या साऱ्या बाबी इतक्या सविस्तरपणे सांगण्याचे कारण एवढेच की, भोईटे सर आणि मी यांना जोडणारा फार महत्त्वाचा सांधा म्हणजे ताईंच्या ओव्या आहेत. त्या माऊलीप्रती कृतज्ञता म्हणूनच अत्यंत निरपेक्ष भावनेने झपाटून आम्ही हे काम केले आणि त्याद्वारे आमची मनेही खूप जवळ आली. भोईटे सरांमधला माणूस, सहृदय सुपुत्र मला सातत्याने अनुभवता आला. आईविषयीचा ओलावा, नात्यांमधील हळुवारपणा या साऱ्याच गोष्टींच्या बाबतीतला भोईटे सरांचा हळवेपणा मी जवळून पाहिला आहे. पुढे भोईटे सर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू सुद्धा झाले. पण, मी मात्र जोडला गेलो, ते त्यांच्यातल्या माणसाशी. ताई सरांना नेहमी सांगत असत की, चांगल्याचं बोचकं बांधावं नि वाईट गंगार्पण करावं. सरांनी त्यांच्या आयुष्यभर ताईंचं हे तत्त्व प्राणपणाने जपलं, म्हणूनच जिथे जाईल तिथे चांगल्या माणसांचा घोळका त्यांच्याभोवती गोळा होत राहिला आणि नेहमीच त्यांच्यासोबत राहिला. सरांच्या त्या चाहत्यांच्या गर्दीतलाच मीही एक आहे. सरांनी त्यांच्या उत्तरायुष्यातही हे चांगल्याचं बोचकं अधिक समृद्ध आणि संपन्न करीत जावं. चांगल्याचं ओझं कधीच होत नाही; उलट त्यात वृद्धीच होत राहते. या चांगल्याचं बोचकं बांधत जाणाऱ्या आणि अशी बोचकी लादण्यासाठी डोकी तयार करणाऱ्या सहृदयी माणसाला माझा मनःपूर्वक सलाम!


अस्तित्वशोध...

 


 

तू पड बाहेर शोधार्थ स्वतःच्या,

का हताश आहेस?

तुझ्या अस्तित्वशोधाची

काळालाही आस आहे।।

 

पिढ्यापिढ्यांच्या या बेड्यांना,

समजू नको तू दागिना,

या बेड्यांनाच वितळवून

बनव त्यांचे शस्त्र तू।।

 

चरित्र इतुके पवित्र जरी,

लांच्छन का तुजवरी,

काय हक्क या पाप्यांना,

परीक्षा घेण्या तुझी? ।।

 

जाळुनि भस्म कर त्या

क्रूरतेच्या महाजालाला,

तू आरतीची ज्योत नव्हेस,

क्रोधाची मशाल आहेस।।

 

फडकावुनि पदर ध्वजासम

गगनालाही कंपवुनि सोड,

पदर तुझा हा पडता खाली,

धरणीकंप निश्चित आहे।।

 

तू पड बाहेर शोधार्थ स्वतःच्या

का हताश आहेस,

तू चालत राहा,

तुझ्या अस्तित्वशोधाची,

काळालाही आस आहे।।

 

मूळ कविता- तन्वीर गाजी

अनुवाद- आलोक प्रियदर्शन