मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

राजा ढाले: उपेक्षेचा प्रज्ञावंत धनी

राजा ढाले (Image Copyright: Indian Express)


राजा ढाले यांचं निर्वाण झालं आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तसंच त्यांचं जहालपण न झेपणाऱ्या अशा साऱ्यांनाच उमाळा फुटला. त्या उमाळ्याच्या दिशा वेगवेगळ्या होत्या. त्यातून राजाभाऊंची होणारी प्रतिमानिर्मिती विस्कळित स्वरुपाची होती. रंगबिरंगी काचेचे तुकडे जमिनीवर विखरावेत, मात्र त्यातून एकच एक अशी प्रतिमा हाती न लागावी, असं या साऱ्या माहौलाचं स्वरुप. ज्या राजाभाऊंनी प्रस्थापित व्हायचं नाही, या भूमिकेतून प्रस्थापितांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आणि त्यातून त्यांचं प्रस्थ निर्माण केलं, त्या साऱ्याच गोष्टींना नकार दिला. त्यामुळं खरं तर चळवळीबरोबरच समाजाचंही मोठं नुकसान झालं. त्यामुळंच राजाभाऊंच्या वाङ्मयाचं, त्यांच्या हरेक निर्मितीचं डॉक्युमेंटेशन हे त्यांच्या अखेरच्या काळात सुरू झालं. त्यामध्ये मग त्यांच्या समग्र वाङ्मयाचा पहिला खंड असो, मंगेश नारायणराव काळे यांच्या खेळचा विशेषांक असो, असे मोजके निर्विवाद महत्त्वाचे प्रयत्न झाले. त्यांची दखल घेणं आवश्यक. अलिकडेच गौतमीपुत्र कांबळे यांनी सेक्युलर व्हिजनचा राजा ढाले विशेषांक काढला, तोही महत्त्वाचाय. नुकताचमाणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने राजा ढाले स्मृतिविशेषांक प्रकाशित करण्यात आलाय, तो अद्याप पाहायचाय.
या पार्श्वभूमीवर एका अत्यंत महत्त्वाच्या त्रैमासिकात राजाभाऊंना श्रद्धांजली म्हणून एक लेख छापून आलाय. हा लेख वाचल्यानंतर माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की, ही खरंच श्रद्धांजली आहे की संभावना? आधुनिक स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य, संस्कृती, समाज व राजकारण यांतील एक अपरिहार्य पात्र’’ असं राजाभाऊंचं वर्णन या लेखात करण्यात आलंय. राजाभाऊंना अपरिहार्य पात्र म्हणणं यासारखा दुसरा त्यांच्यावर अन्याय होणार नाही. ज्या माणसानं संपूर्ण दलित पँथर चळवळीला आपल्या अभ्यासाचं, विद्वत्तेचं अधिष्ठान देऊन तिला एक विशिष्ट उंची प्राप्त करून दिली; ज्यानं आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनानं महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातलं राजकारण चव्हाट्यावर आणलं, ज्यानं आंबेडकरी साहित्याला प्रतिष्ठेची किनार प्राप्त करून दिली, ज्यानं आंबेडकरी पत्रकारितेला अभ्यासाचे, संशोधनाचे आयाम दिले, त्या राजाभाऊंची अपरिहार्य पात्र म्हणून संभावना करणं पूर्णतः चुकीचं आहे. यू लव्ह हिम ऑर हेट हिम, यू कॅननॉट इग्नोर हिम इतकं सरळसाधं अस्तित्व राजाभाऊंचं नव्हतं. त्याहूनही अधिक काटेकोर आणि तडफदार आणि इथल्या हरेक प्रस्थापित व्यवस्थेची शल्यचिकित्सा करून तिच्यावर उपचार करण्यास सिद्ध असलेला हा या समकाळातला एक महत्त्वाचा नेता होता. त्यानं साऱ्या प्रस्थापितांना फाट्यावर मारण्याचं धोरण कायमच सांभाळलं, पण तितक्या सहजतेनं हा समाज राजाभाऊंना फाट्यावर मारू शकत नाही, हेही तितकंच खरं. संबंधित लेखात नामदेव ढसाळ यांच्या सान्निध्यात आठेक वर्षे काम केल्यानंतर त्यांच्याच परिप्रेक्ष्यातून राजाभाऊ माहित असलेल्या या व्यक्तीनं त्यांचं काहीही न वाचता किंवा त्यांच्याविषयी काहीही जाणून न घेता अवघ्या एका भेटीच्या बळावर त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचं जे दंभयुक्त मूल्यमापन केलं आहे, ते मला व्यक्तीशः स्तरहीन वाटतं. पुढं त्यांनी त्यांच्या लेखनाबद्दल वगैरे काही साहित्यिक मूल्यमापन वगैरे केलं आहे, तेही पूर्वग्रहबाधितच. पहिल्या भागानं सारीच माती केलीय एवढं खरं. श्रद्धांजली कशी असू नये, याचा हा एक उत्तम वस्तुपाठ या निमित्तानं मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक परीघामध्ये दलित-बौद्ध समाजाला जर कोणतं उच्चविद्याविभूषित, विद्वान नेतृत्व लाभलं असेल तर ते म्हणजे राजाभाऊच होय. बाबासाहेबांप्रमाणेच सप्रमाण बोलणं अन् लिहीणं, निर्भिडपणा, निडरपणा, अभ्यास, व्यासंग, सामाजिक-राजकीय चिकित्सा, परखड व वस्तुनिष्ठ धार्मिक विश्लेषण आणि त्यापुढं जाऊन देखणं कॅलिग्राफिक अक्षर, कलासक्तता, जागतिक संस्कृतीचा काटेकोर अभ्यास, साहित्य व काव्यक्षेत्रातला सजग वावर असे अनेक पैलू राजाभाऊंच्या व्यक्तीमत्त्वाला होते.
व्यक्तीगत स्तरावर सांगायचं झाल्यास मी राजाभाऊंचे एकूण तीन कार्यक्रम केले. जयसिंगपूरची धम्म परिषद आणि सांगली व कोल्हापूर येथील एकेक व्याख्यान. विशेष म्हणजे या तीनही कार्यक्रमांत त्यांनी धम्माचं विश्लेषण केलेलं होतं. इतकं नितांतसुंदर विश्लेषण मी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. खरं सांगायचं, तर राजाभाऊंमुळे मला धम्म समजून घेण्याची प्रेरणा निर्माण झाली. धम्मातील विवेकवाद, विज्ञाननिष्ठा यांविषयी मनात जाणीवा निर्माण झाल्या. त्यानंतर बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्याचा धम्म समजून घेणं मला थोडं सोपं गेलं. अशा व्याख्यानांतून राजभाऊंना मी ऐकलं, प्रत्यक्ष वन टू वन भेट मात्र कधीही झाली नाही. त्यापूर्वी धम्मलिपीच्या लेखांमधून त्यांच्या परखड स्वभावाची जाणीव झालेली होती. एखादी गोष्ट तार्किकतेच्या व पुराव्यांच्या कसोटीवर पारखून घेऊन तिचे तीक्ष्ण व सूक्ष्म विश्लेषण करण्याची हातोटी हे राजाभाऊंचे अविच्छिन्न वैशिष्ट्य. अशा विश्लेषणाची पखरण धम्मलिपीच्या अंकांमधून त्यांनी केलेली आहे. बाबासाहेब जसे समतेच्या विरोधकांवर अगर जातिभेदाच्या समर्थकांवर प्रहार करीत असताना बोचरी टीका करायला कमी करीत नाहीत, तेच वैशिष्ट्य राजाभाऊंच्या लेखणीतही आढळते. त्यांच्या अतिप्रसिद्ध सत्यकथेची कथा आणि काळा स्वातंत्र्यदिन या लेखांमधून त्याची प्रचिती येतेच. समग्र वाङ्मयातले त्यांचे सर्वांगीण, चौफेर लेखन वाचल्यानंतर या माणसाच्या प्रतिभेची चुणूक आपल्याला दिसते. अगदी पळसदरीवरला ललितलेख जरी वाचला, तरी त्यांच्या चिकित्सक अन् कुशाग्र बुद्धीची जाणीव होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही पुरावे, दाखले देऊनच लिहिण्या-बोलण्याची सवयच जणू त्यांनी स्वतःला लावून घेतलेली होती. त्यांच्या प्रत्येक लेखातून ती झळकत राहते. आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक नेता-कार्यकर्त्याला प्रस्थापित व्यवस्थेच्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत असतात. त्याच्या स्वतःसमोरही अनेक प्रश्नांचे मोहोळ उठलेले असते, तेही शमवायचे असते. आणि मगच त्याचा काही पावलं पुढं जाण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यावेळी ही व्यासंगाची सवय ज्याने लावून घेतली असेल, तोच पुढे पाऊल टाकू शकेल, अन्यथा ही व्यवस्था तुम्हाला तिच्यासमोर नतमस्तक व्हायला भाग पाडते. त्याचवेळी तुमच्या चळवळीची वा आंदोलनाची भविष्यातील वाटचालही निश्चित झालेली असते- अंधाराच्या दिशेने.
राजाभाऊंच्या कार्याविषयी आपल्या समाजात किती अनास्था होती, याचं एक उदाहरण दिल्याखेरीज राहवत नाही. सत्तरच्या दशकात पँथर चळवळ गाजविलेले राजाभाऊ महाराष्ट्रालाच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही माहिती झालेले होते. या पार्श्वभूमीवर, माणगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने माणगाव परिषदेचा ६१वा स्मृती महोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. महोत्सवाचा समारोप परिसंवादाने झाला. यावेळी जोगेंद्र कवाडेंच्या इंदिरा गांधी व काँग्रेसवरील हल्ल्याने आयोजक घायाळ व हवालदिल झाले. ते असो! पण, या परिसंवादाच्या वार्तांकनामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या बातमीदाराने यावेळी राजा ढाले या अन्य दुसऱ्या एका दलित नेत्याचेही प्रक्षोभक भाषण झाले. असे एकाच वाक्यात त्यांना संपविले आहे. यातला दुसऱ्या हा शब्द माझ्यासाठी अधिक वेदनादायी आहे. खरे तर कवाडेंच्याही आधी आंबेडकरी चळवळीच्या प्रथम फळीत स्थान असलेल्या या नेत्याची ही संभावना प्रस्थापित माध्यमांनी अशीच अखेरपर्यंत चालविली, हे जितके खरे, तितकेच राजाभाऊंनीही त्यांच्या या वर्तनाची बिलकुल भीडभाड ठेवली नाही, अगर त्यांच्या लांगुलचालनाचे धोरण स्वीकारले नाही, हे त्याहून खरे!
राजाभाऊंच्या विषयी अनेक प्रवाद आहेत. काही खरे आहेत, काही जाणीवपूर्वक पसरवले गेलेले आहेत. तो एका स्वतंत्र चर्चेचाच विषय आहे. तथापि, प्रा. विनय कांबळे या त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी मित्राने त्यांच्याविषयी एक किस्सा सांगितला, तो येथे देतो म्हणजे राजाभाऊ काय होते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता भासू नये. प्रा. कांबळे सांगतात की, राजाभाऊंना कधीही भेटायला जायचे झाले किंवा ते कधी येणार म्हटले की मोठे दडपण यायचे. आम्ही विक्रोळीला त्यांच्या घरी गेलो की दार उघडून गालातल्या गालात स्मित करीत ते या म्हणायचे. आत जाऊन बसलो की, पहिला प्रश्न, कधी आलात?, पुढचा प्रश्न, कुठे उतरलात? आणि त्यापुढचा प्रश्न- काही खाल्लंत की तसेच आहात? या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक असेल तर घरात किंवा समोरच्या हॉटेलात आधी खायला घालत. आणि यानंतरचा जो प्रश्न असायचा, ज्याचं आमच्यावर दडपण असायचं, ते म्हणजे आपल्या गेल्या भेटीपासून ते आजपर्यंत काय वाचलंत?’ या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागायचं. ते दिल्यानंतर आणखी एक पुढचा प्रश्न असे, याचा आपल्या चळवळीला, आपल्या समाजाला काय उपयोग? मग त्यावर राजाभाऊंसमवेत आमची तपशीलवार चर्चा व्हायची. मग ते आपण काय वाचलं ते सांगायचेच, शिवाय नवीन काही वाचनासाठी सुचवायचे. नवीन काही लिहीलेलं वाचायला द्यायचे. अगदी इंग्रजीमधील दर्जेदार साहित्याशीही आमच्यासारख्या मराठीच्या माणसांना जोडण्याचं काम राजाभाऊंनी केलं.
प्रा. विनय कांबळे यांच्या या एका अनुभवातून राजाभाऊंची तळमळ आपल्या लक्षात आल्याखेरीज राहात नाही. राजाभाऊंची ही ध्येयनिष्ठा लक्षात घेतली तर बाकी साऱ्या वाद-प्रवादांना आपण फाट्यावर मारायला हरकत नाही. राजाभाऊंच्या बाबतीत एक गोष्ट राहून राहून वाटते, ती म्हणजे प्रस्थापितांना नकार देताना स्वतःलाही प्रस्थापित होण्यापासून रोखण्याचं अजब असाध्य राजाभाऊंनी साध्य केलं होतं. ही गोष्ट सोपी नाही. मात्र, त्याचमुळे आंबेडकरोत्तर कालखंडातला दुसरा आंबेडकर होण्याची शक्यता सुद्धा याचमुळे लयाला गेली. किंबहुना, बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम धर्मांध, जातीय शक्तींशी महान लढा उभारला, तो त्यांनी आपली आपल्या प्रखर विद्वत्ता आणि प्रज्ञेची उंची व प्रतिभा वाढविल्यामुळेच! बाबासाहेब या बाबतीत कुठे जराही कमी पडले असते, तर भारतीय समाजाने त्यांचे काय केले असते, याचे राजा ढाले हे उत्तम उदाहरण ठरावे!

श्री शाहू समाधीस्थळ झाले; त्यामागचा उद्देशही जपू या!



श्री शाहू समाधीस्थळ, नर्सरी बाग, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराज यांच्या अंतिम इच्छेनुसार कोल्हापूरच्या नर्सरी बागेत सुमारे शंभर वर्षानंतर का असे ना, पण श्री शाहू समाधीस्थळ देखण्या स्वरुपात साकार झाले. त्याच वेळी आपण शाहूरायांपेक्षा शंभर वर्षे मागे आहोत, किंवा शाहू महाराज त्यांच्या काळाच्या शंभर वर्षे पुढे होते, हेही लक्षात आणून देणारी ही घटना आहे.
शाहू महाराजांच्या इच्छेनुसार गंगाराम कांबळे यांनी २ एप्रिल १९२५ साली श्री शाहू स्मारक सोमवंशी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून राजर्षींचे एक छोटे स्मारक नर्सरी बागेमध्ये उभे केले होते. दरवर्षी शाहू सप्ताह साजरा करून त्यांच्या स्मृती जागविल्या जात असत. सन १९३२मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या स्मारकाला भेट देऊन शाहू महाराजांप्रती आपल्या आदरभावना व्यक्त केल्या होत्या. तथापि, कालौघात हे सारे उपक्रम आणि आठवणी लुप्त झाल्या होत्या. सन २०१४पासून पुन्हा या स्मारकाच्या कामाकडे नागरिकांनी लक्ष वेधले आणि खऱ्या अर्थाने समाधीस्थळाच्या पुनरुज्जीवनाला सुरवात झाली. आज हे काम पूर्णत्वाला गेले आहे. आणखीही सुशोभीकरणाची कामे करण्याचे राज्यकर्त्यांनी ठरविले आहे. या बाबी होत राहतीलच; पण, शाहू महाराजांना आपली समाधी नर्सरी बागेतच का हवी होती, तो उद्देश जपला जाण्यासाठीही सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे. एक तर, या बागेत श्री बयासाहेब महाराज, श्री राधाबाई साहेब नं.१, श्री. जयसिंगराव घाटगे, श्री राधाबाई साहेब महाराज, श्री ताईसाहेब महाराज, श्री रावसाहेब सरलष्कर, श्री कमलजा बाईसाहेब आदी राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी आहेत. (दै. सकाळ, दि. १८ जानेवारी २०२०) पण, राजघराण्याचे समाधीस्थळ म्हणून केवळ इथे आपली समाधी व्हावी, एवढाच मनसुबा महाराजांचा नव्हता, तर त्या पलिकडे अत्यंत उदात्त विचार त्यांच्यासारख्या सहृदयी राजाने केलेला होता- तो म्हणजे ज्या अस्पृश्य समाजाला त्यांनी अत्यंत ममतेने हृदयाशी कवटाळले, ज्यांच्यासाठी प्रस्थापित समाजव्यवस्थेशी उघड संघर्ष केला, त्यांना शिक्षण व सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत कर्तव्यकठोरपणाने कायदेकानून केले आणि ज्या समाजाचे महाराजांना अतीव प्रेम लाभले, त्या समाजाच्या सान्निध्यात आपण कायमस्वरुपी राहावे, लोकांनी त्याच्या आठवणी जागवाव्यात आणि आपले जिवितकार्य पुढे अखंडित चालू राखावे, अशी भावना महाराजांची असल्याचे दिसते. प्रिन्स शिवाजी यांच्या मृत्यूनंतर राजपूतवाडीच्या कॅम्पवर अत्यंत संन्यस्त वृत्तीने राहणारे महाराज जेव्हा कधीही आपल्या खडखड्यातून राजवाड्याच्या दिशेने जायला निघत, तेव्हा त्यांचा पहिला थांबा या अस्पृश्य वस्तीजवळ असे. इथल्या नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून गंगाराम यांच्या हाटेलात सोबत्यांसह चहापान करून मगच स्वारी पुढे वाड्याकडे रवाना होत असे. इतका जिव्हाळा या समाजासमवेत महाराजांचा जुळला होता. समता आणि करुणेचा महासागर असलेल्या शाहू महाराजांच्या मनात अस्पृश्यतेविषयी, जातिभेद किंवा कोणत्याही भेदाभेदाविषयी कमालीची चीड होती. त्यांनी व्यक्तीगत जीवनात अशा कोणत्याही भेदाला थारा दिला नाही. समतेच्या विचारांचा इतका कृतीशील पाईक त्या काळात दुसरा सापडणे अशक्यच होते. याच्यासम हाच! त्यामुळे नर्सरी बागेतील स्मारक हे या राजाच्या समतेच्या विचारांचे, समताधिष्ठित कृतीशीलतेचे संदेशवहन करणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून महाराजांच्या या समतेच्या विचाराला देशभरात कृतीशीलतेचे परिमाण देऊन अंमलात आणले, त्यामुळे आजच्या समाजाच्या सार्वजनिक आचरणात जातीयता, अस्पृश्यता दिसत नाही; तथापि, जातिभेदाला खतपाणी घालून मनीमानसी रुजविण्याचे, जातीच्या बळकटीकरणाचे पद्धतशीर प्रयत्नही आजच्या भोवतालात सुरू आहेत, हे नाकारण्यात तरी काय हशील? त्यामुळे राजर्षी शाहू समाधीस्थळ हे केवळ एक चित्ताकर्षक पर्यटनस्थळ अथवा निर्जीव स्मारक होऊन उपयोग नाही. हयातभर समतेचा अखंड जागर करणारा एक महातपस्वी राजर्षी येथे चिरनिद्रा घेत आहे, त्या समतेच्या जागराची प्रेरणा देणारे हे ठिकाण आहे; ही भारताची समताभूमी आहे, या जाणीवेची सर्वदूर रुजवात होणे, हे श्री शाहू समाधीस्थळाचे प्रयोजन असायला हवे!

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

जीवनवेधी कवितांचा आशयगर्भ वेध: ‘श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातील कविता’





(कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी अधिविभाग प्रमुख प्रा. रघुनाथ कडाकणे यांच्या श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातील कविता या काव्यसंग्रहाचे शुक्रवारी (दि. १० जानेवारी) शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत प्रकाशन झाले. त्या निमित्ताने 'दै. सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीमधील 'साहित्यरंग' पुरवणीत प्रकाशित झालेला विशेष लेख 'सकाळ'च्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे...)


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निपाणीशेजारच्या बुदलमुख गावातून शहरात शिकण्यासाठी आलेला एक युवक, ज्याच्यासाठी निपाणी हे निमखेडे सुद्धा मेट्रो शहराहून कमी नाही. असा युवक देवचंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपल्या शिक्षणाच्या, जगण्याच्या साऱ्या शक्यता, साऱ्या व्याप्ती माणूसपणाभोवती गोळा करतो आणि संपूर्ण शक्तीनिशी अत्यंत उभारीने भरारी घेतो, आपली कारकीर्द शिक्षणी पेशातच उभी करतो आणि सातत्याने माणूसपणाच्या जाणीवा अधोरेखित आणि वृद्धिंगत करीत राहतो, त्या युवकाच्या हातून एक जाणीवसमृद्ध कलाकृती उभी राहते, जी पुन्हा एकदा सामाजिक जाणीवांचे भान अन् अस्तित्व अधोरेखित करते पुन्हा नव्याने, त्या साहित्यिकाचे नाव आहे प्रा. रघुनाथ कडाकणे आणि त्याच्या या कलाकृतीचे नाव आहे, श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातील कविता.
Dr. Raghunath Kadakane
प्रा. कडाकणे हे लौकिकार्थाने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी व मराठी अधिविभागांचे प्रमुख असले तरी तो त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय झाला. खरे तर, प्रा. कडाकणे हे एक अत्यंत जाणीवसमृद्ध अन् सजग अशा प्रकारचे समाजाचे जागल्याच आहेत. त्यांनी आजपर्यंत माझे मिथ्याचे प्रयोग ही एक आगळीवेगळी कादंबरी आणि इन कम्पॅरिझन भालचंद्र नेमाडेज कोसला अँन्ड जे.डी. सॅलिंजर्स दि कॅचरइन द राय’’ हा संशोधन ग्रंथ सिद्ध केला आहे. त्यानंतर त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह असलेल्या श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातल्या कविता हा संग्रह मराठी काव्यरसिकांच्या सेवेत दाखल होतो आहे. एक अत्यंत वेगळ्या प्रकारची, प्रवाही अस्तित्ववादी, रोमँटिक आणि जाणीवानिर्देश करणारी कविता प्रा. कडाकणे यांनी मराठी रसिकांना सादर केली आहे. इंग्रजी साहित्याचे उत्तम व्यासंगी अभ्यासक असलेल्या प्रा. कडाकणे यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्वही तितकेच असामान्य स्वरुपाचे आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या या नूतन काव्य संग्रहाचा विचार करणे आवश्यक आहे.
या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये ज्येष्ठ समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी म्हटले आहे की, कडाकणे यांच्या या संग्रहातील कविता विविध भावसंवेदनांचा आविष्कार करणारी कविता आहे. स्वआणि जीवनाकडे पाहण्याची त्यांची विशिष्ट अशी दृष्टी आहे. स्वग्राम आणि भवताल’, ‘अंतर आणि स्थित्यंतर’, ‘समकालीन संदर्भ वगैरे’, ‘सृजनेंद्रियाच्या प्रत्यारोपणानंतर’, ‘निर्वात पोकळीत निःसंदर्भया प्रमेयसूत्रातून त्यांनी जीवनाचे दर्शन घेतले आहे. एका अर्थाने पंचमहाभुताच्या जीवनरंगांनी व्यापलेली ही कविता आहे. मानवी अस्तित्व, भोवताल, सृष्टी आणि कलानिर्मितीच्या रहस्यभेदाने पछाडलेली ही कविता आहे. पंचेद्रियांच्या या अनुभवसूत्रांमध्ये आंतरिक संगतीदेखील आहे. त्यातून प्रकटणाऱ्या अनुभवसंवेदनांच्या फांद्या एकमेकांत मिसळलेल्या आहेत किंवा मिसळून परस्परांना छेद देऊन साकारल्या आहेत. कडाकणे यांच्या कवितांमधून वास्तववादी, रोमँटिक व अस्तित्ववादी जाणीव प्रेरणांची सरमिसळ झालेली आहे. या तिहेरी गुंफणीतून ते जगाचा, जीवनानुभवाचा प्रत्यय घेत आहेत.
खरे तर, या प्रस्तावनेमध्येच या संपूर्ण कवितासंग्रहाचे सार एकवटले आहे. एकीकडे सकारात्मक परंपरांचा स्वीकार करीत असतानाच त्यांमधील रुढीवादाला नकार देणारी अशी ही कविता आहे. जन्म आणि मृत्यू अशा दोन श्वासांमधील जीवन नावाचे अंतर कापत असताना जे जीवनानुभव, जी आसक्ती आपल्या सामोरी येते, तिला आपण कसे भिडतो, याचा वेध घेणारी, धांडोळा घेणारी आणि त्याचा लेखाजोखा मांडणारी प्रा. कडाकणे यांची ही कविता आहे. गावातील भौतिक गोष्टींपासून सुरू होणारी त्यांची ही काव्ययात्रा तारुण्याच्या नवथर अनुभव व अनुभूती पार करीत केव्हा आदिभौतिकाच्या मार्गाचे क्रमण करू लागते आणि कधी त्या अनुभवांच्या पार निर्वात पोकळीत विसावण्यास सिद्ध होते, हे लक्षातही येत नाही. नेमके हेच या कविता संग्रहातील प्रत्येक कवितेचे यश आहे, असे म्हणावे लागते. प्रत्येक काव्यरसिकाने त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे, इतक्या प्रत्ययकारी स्वरुपाच्या या कविता आहेत.