शनिवार, १७ मे, २०१४

गोपाळ बोधे: द फोटोग्राफर विथ हेवनली व्ह्यू!



गोपाळ बोधे
काही क्षणांपूर्वी फेसबुक उघडलं आणि सतीश लळित सरांच्या एका पोस्टमुळं अक्षरशः मोठ्या धक्क्यात गेलो... काल नैनिताल इथं ज्येष्ठ हवाई छायाचित्रकार गोपाळ बोधे सरांचं निधन झाल्याची वार्ता त्यांनी दिलीय... ही बातमीच इतकी अनपेक्षित आणि सरांचं निधनही इतकं अकाली झालंय की त्यावर विश्वास ठेवणंच जड जातंय.. लळित सर कामात प्रचंड बिझी असतील, कालच्या लोकसभा निवडणूक निकालाच्या विश्लेषणाच्या जबाबदारीत गुंग असतील, ही जाणीव असूनही त्यांना फोन करून ही दुःखद बातमी कन्फर्म केली.. आणि दुर्दैवानं शेवटी त्यावर विश्वास ठेवावाच लागला... ज्येष्ठ विधिज्ञ व छायाचित्रकार अधिक शिरोडकर यांचं नुकतंच निधन झालं.. त्यांच्यापाठोपाठ बोधे सरांचं असं जाणं चटका लावणारं आहे.
बोधे सरांच्या नजरेतून मुंबई.
मुंबईमध्ये, मंत्रालयात बोधे सरांसोबत त्यांच्या छायाचित्रणाविषयी, राज्यातील अनमोल ठेव्यांविषयी, कास पठाराच्या जतनाविषयी अशा अनेकविध विषयांवर रंगलेल्या गप्पांच्या आठवणी मनात जागल्या आहेत. मी मुंबई सोडून निघताना अगदी अखेरच्या दिवशी मला आवर्जून भेटून कोल्हापूरला चालला आहेस, म्हणून खास भेट घेऊन आलोय, असं म्हणून त्यांनी महालक्ष्मीच्या छायाचित्रांचं आणि सोबत महाराष्ट्र व मुंबईच्या हवाई छायाचित्रांची त्यांची पुस्तकं मला भेट दिली होती तेव्हा त्यांच्या त्या अकृत्रिम प्रेमाच्या जिव्हाळ्यानं मी गहिवरुन गेलो होतो. गोपाळ बोधे यांच्या जाण्यानं भारताच्या इतिहासातला अग्रणी हवाई छायाचित्रकार तर काळाच्या पडद्याआड गेला आहेच, पण व्यक्तिशः मी सुद्धा माझा छायाचित्रणातील पितामह गुरू गमावला आहे.
गेटवे ऑफ इंडिया
गोपाळ बोधे यांना मी पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, ते माझे पितामह गुरू आहेत. याचं कारण म्हणजे मी बीजेसीला असताना फोटोग्राफी हा विषय घेतला होता. तेव्हा शशिकांत मुळ्ये सर आम्हाला तो विषय शिकवायचे. स्वतः उत्तम इंडस्ट्रीयल आणि कॅसेट कव्हर फोटोग्राफर असलेल्या मुळ्ये सरांनी आम्हाला देशातल्या, जगातल्या वेगवेगळ्या छायाचित्रकारांचा परिचय करून दिला. त्या दरम्यान, बेटर फोटोग्राफीमध्ये गोपाळ बोधे यांच्या हवाई छायाचित्रांविषयी विशेष आर्टिकल वाचनात (विशेषतः पाहण्यात) आलं. भारतातल्या परिचित ठिकाणांची हवाई छायाचित्रं पाहिली आणि नेहमीच्या गोष्टींकडं पाहण्याच्या एका अभिनव विहंगम दृष्टीकोनाशीही आमचा प्रथमच नव्यानं परिचय झाला. गेटवे ऑफ इंडियाच्या तीन घुमटांचं हवाई छायाचित्र त्यावेळी जणू मनावर कोरलंच गेलं होतं.
राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहात असताना बोधे सर एकदा माझ्या कार्यालयात आले. रवींद्रमध्ये मुंबईच्या हवाई छायाचित्रांचं प्रदर्शन त्यांना भरवायचं होतं आणि उद्घाटक म्हणून त्यांना मंत्री महोदय हवे होते. ज्याची केवळ कामगिरी पाहून मी भारावलो होतो, ती व्यक्ती साक्षात माझ्यासमोर उभी होती. मी गोपाळ बोधे, असं त्यांनी उच्चारताच मी चटकन माझ्या जागेवरुन उठलो आणि सारे प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांना वाकून नमस्कार केला. हा त्यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. 
सरकारी कार्यालयातील एखाद्या अधिकाऱ्याकडून अशी वर्तणूक त्यांना पूर्णतः अनपेक्षित असावी. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, गेल्या पंधरा वर्षांपासून मी त्यांच्या कामगिरीचा भक्त आणि चाहता आहे. माझ्या गुरूंकडून आपला परिचय झाल्यामुळं आपण माझे पितामह गुरू आहात. त्यांनीही हसतमुखानं माझ्या बिरुदाचा स्वीकार केला आणि म्हणाले, माझं काम झालं नाही तरी चालेल, पण तुझ्यासारख्या चाहत्याची भेट झाली, हे महत्त्वाचं!’ सुदैवानं, त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मी भुजबळ साहेबांना घेऊन जाऊ शकलो आणि गंमत म्हणजे त्याठिकाणी तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर सरांचा त्यावेळी एक छायाचित्रकार म्हणून नव्यानं परिचय झाला. ते या उद्घाटनाला आवर्जून आणि गळ्यात कॅमेरा लटकावूनच उपस्थित होते. अधिक शिरोडकर यांच्यासारखे अनेक दिग्गज छायाचित्रकार तिथं आले होते. बोधे सरांच्या छायाचित्रकारितेच्या वर्तुळाचा तेव्हा पहिल्यांदाच परिचय झाला.
'मुंबई: एक विहंगावलोकन' या छायाचित्र प्रदर्शनावेळी मुंबईचे एक विहंगम छायाचित्र छगन भुजबळ यांना भेट देताना गोपाळ बोधे. शेजारी अधिक शिरोडकर.
त्यानंतर बोधे सर जेव्हा कधीही मंत्रालयात येत, आवर्जून मला भेटत. वेळ असला की खूप गप्पा मारत. त्यांचा स्वभावच मुळी अतिशय लाघवी होता. व्यक्तिमत्त्व अतिशय विनम्र. इतका मोठा माणूस पण वागण्या-बोलण्यात एक विशिष्ट विनम्रता असे. कामाच्या बाबतीत मात्र ते आग्रही आणि आक्रमक असत. सतीश सोनी सरांकडं एकदा बसले असताना कासच्या पठाराच्या संरक्षणाचा मुद्दा खूप आर्जवानं आणि तळमळीनं मांडत होते. त्यांचं सामाजिक आणि पर्यावरणीय भान त्यातून डोकावत होतं. कासच्या बचावासाठी कार्यरत गटामध्येही त्यांचा सहभाग होता. राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे ते सदस्यही होते. त्या मंडळामधील सदस्यही त्यांची तळमळ पाहून प्रभावित होत असत. महाराष्ट्र आणि गोवा शासनासाठी त्यांनी छायाचित्रणाच्या अनेक मोहीमा केल्या. लक्षद्वीपची त्यांची कामगिरीही लक्षणीयच. कोयना व्याघ्र प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅप लावणं असो की, जीपीएस तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं राज्यातील पुरातत्त्व संरक्षित इमारतींचं संरक्षण करण्याचा मुद्दा असो, त्याबाबतीत बोधे सरांची तळमळ खूप मनापासून असे. त्यासाठी शासनाकडं पाठपुरावा करण्यासाठी ते सतत फेऱ्या मारत. महाराष्ट्रात पर्यटनाच्या इतक्या संधी आहेत, पण त्यांचा लाभ उठविण्यात आपण अजूनही कमी पडतो आहोत, असं त्यांना वाटत असे. आणि त्यात तथ्यही आहे.
बोधे सरांसोबत कासची सफर करण्याचा माझा मनोदय आता कधीच प्रत्यक्षात येणार नाहीय. २०१२मध्ये कोल्हापूरला जॉईन झाल्याच्या पुढल्याच महिन्यात त्यांचा कासला येतोय, तूही ये.असा फोन आला होता, पण मीच म्हटलं सर, यंदा शक्य होईलसं वाटत नाही. पुढल्या वर्षी नक्की.२०१३मध्ये आम्ही विद्यापीठातले सहकारी मिळून गेलो, तेव्हा बोधे सरांना फोन केला होता, पण ते दिल्लीत असल्यानं येऊ शकले नाहीत. तेव्हा ते पुढल्या वर्षी नक्की असं म्हणाले होते... पण आता ते पुढचं वर्ष कधीच येणार नाही, , ही खंत आयुष्यभर मनात राहणार आहे.
जंजिरा
अलीकडंच त्यांनी हवाई छायाचित्र काढणारं मिनीएचर हेलिकॉप्टर घेतलं होतं. त्याचा डेमोही कधी तरी दाखवतो म्हणाले होते... शिवाजी विद्यापीठात त्यांनी एखादं एक्झिबिशन किंवा वर्कशॉप घ्यावं, अशी माझी इच्छा होती... कधीही बोलव.. मी आहेच.. असं ते म्हणाले होते... या आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला करायच्या होत्या... पण आता त्या कधीच प्रत्यक्षात येऊ शकणार नाहीत.
आज सॅटेलाइटपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं एरियल फोटोग्राफी हा तसा काही फारसा अवघड प्रांत राहिलेला नाही.. पण मूळचे नेव्ही ऑफिसर असलेल्या बोधे सरांना त्या काळात एरियल फोटोग्राफीची कल्पना कशी सुचली असेल आणि त्यानंतर झपाटल्याप्रमाणं त्यांनी या क्षेत्रात जी काही अतुल्य कामगिरी करून ठेवलीय, त्याला तोड नाही. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी हे पॅशन जपलं.. मुंबई: अ व्ह्यू फ्रॉम हेवन्स, महाराष्ट्र: अ व्ह्यू फ्रॉम हेवन्स, पोर्ट्रेट ऑफ इंडियाज् लाइटहाऊसेस, बर्ड्स आय व्ह्यू: फोर्ट्स, लक्षद्वीप: अ व्ह्यू फ्रॉम हेवन्स, प्लेसेस ऑफ वरशीप, गॉडेस महालक्ष्मी टेंपल ॲट कोल्हापूर: ‘शक्तीपीठ, कास प्लॅटू: महाराष्ट्राज् व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अशी अनेक पुस्तकं त्यांच्या या पॅशनची साक्ष देतात. अशाच एका मोहिमेवर असताना त्यांचं निधन व्हावं, यापेक्षा मोठा दैवदुर्विलास तो कोणता?
एका वाक्यात बोधे सरांचं वर्णन करायचं तर अ फोटोग्राफर विथ हेवनली व्ह्यू असंच करावं लागेल. केवळ छायाचित्रकार म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून जीवनाकडं पाहण्याची त्यांची दृष्टीही खूप व्यापक आणि सजग होती. ते केवळ भारताचे पहिले एरियल फोटोग्राफर नव्हते, तर त्यांच्याच प्रयत्नानं खरं तर भारतात एरियल फोटोग्राफीची सुरवात झाली, असं म्हणता येईल. त्यांच्या जाण्यानं हवाई छायाचित्रणाच्या क्षेत्रात अफाट आणि अचाट कामगिरी करून भारताचा लौकिक वृद्धिंगत करणारा महान पायोनिअर एरियल फोटोग्राफर देशानं गमावला आहे.. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

शुक्रवार, ९ मे, २०१४

पांडुरंग पाटील यांचे अकाली जाणे धक्कादायक



(विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे जनसंपर्क अधिकारी आणि माझे एक वरिष्ठ सहकारी मित्र पांडुरंग पाटील यांचं मंगळवार, दि. ६ मे २०१४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं अकाली निधन झालं. हा खूप मोठा धक्का आहे. त्यांच्याविषयीच्या माझ्या भावना आपणा सर्वांसोबत शेअर करीत आहे. - आलोक जत्राटकर)
 
Pandurang Patil
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे जनसंपर्क अधिकारी पांडुरंग पाटील यांचं अचानक जाणं मनाला चटका लावणारं आहे. एक सहृदयी, हसतमुख आणि सदैव मदतीसाठी तत्पर असणारा कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्याहून एक चांगला माणूस म्हणून ज्या पांडुरंग पाटलांचा विधान भवन परिसरात लौकिक होता, त्यांना मॉर्निंग वॉकनंतर इतका तीव्र हृदयविकाराचा झटका यावा आणि उपचारांची थोडीही संधी न देता त्यांचे निधन व्हावे, ही खूप क्लेशदायक घटना आहे.
मंत्रालयात सहायक संचालक म्हणून रुजू झालो, तेव्हा आम्हा काही अधिकाऱ्यांना आमचे लाडके शिवाजी सोंडुलकर आणि आकाश जगधने हे आम्हाला पांडुरंग पाटील यांना भेटायला म्हणून घेऊन गेले. त्या बॅचमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले आम्ही तिघे जण असल्याचे पाहून पांडुरंग पाटलांना झालेला आनंद आठवतोय आज. आपल्या भागातली मुलं बाहेर पडायला तयार नसतात, तुम्ही इथं आलात, याचा अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना मांडल्या होत्या. त्याचप्रमाणं सभापतींची वेळ घेऊन त्यांनी देशमुख साहेबांची आणि आमची भेटही घडवून आणली होती. आपल्या भागातली मुलं आहेत, असं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. कुठलीही, काहीही अडचण आली तरी अगदी बिनधास्तपणे माझ्याकडं यायचं. काहीही काम असलं तरी बिनदिक्कतपणे सांगायचं, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आणि या शब्दाला ते जागतही राहिले कारण आम्ही अगदी आमच्या रेल्वे रिझर्वेशनच्या फॉर्मपासून अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांच्याकडं जात राहिलो आणि ते सुद्धा अगदी प्रेमळपणाने मदत करत राहिले.
पांडुरंग पाटलांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वागण्या-बोलण्यात अजिबात अभिनिवेश नसे. वागणं-बोलणं एकदम मनमोकळं आणि आपुलकीचं! कितीही कामात असले आणि तुम्ही त्यांच्याकडं गेलात तर त्यांचा चेहरा त्रासिक झालाय, असं कधीही घडत नसे. हातातलं काम बाजूला ठेवून आणि महत्त्वाचं असेल, तर तसं सांगून ते आलेल्याला वेळ देणार म्हणजे देणारच! विधान भवनात गेल्यानंतर तीन व्यक्तींची मी हमखास भेट घ्यायचो- एक म्हणजे पांडुरंग पाटील, दुसरे विधानभवनाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने आणि तिसरे म्हणजे ग्रंथपाल बा.बा. वाघमारे! या सर्वांशी अनोखं मैत्र जुळलं गेलं. पांडुरंग पाटील साहेबांशी तर जरा जास्तच. याचं श्रेय आमच्यापेक्षा त्यांना जास्त होतं. कारण त्यांचा स्वभावच इतका मोकळा होता की, सिनिअर-ज्युनिअरच्या किंवा वयाच्या भिंती त्यांच्यासोबत असताना कधी विरघळल्या गेल्या, याचा पत्ताच लागला नाही.
नागपूरच्या हिंवाळी अधिवेशनादरम्यान कितीही व्यग्र असले तरी मुंबईपेक्षा एकमेकांशी सुसंवाद अधिक वाढवण्याचा तो कालखंड असे. त्यातही नागपूर विभागाचे माजी माहिती संचालक भि.म. कौशल साहेबांच्या वार्षिक स्नेहभोजनामध्ये तर हा सुसंवादाचा सोहळा अधिकच वृद्धिंगत होत असे. त्याठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे आम्ही सारे अधिकारी-कर्मचारी सहभोजनाचा आस्वाद तर घ्यायचोच, पण त्यापेक्षाही कार्यालयापलिकडलं व्यक्तिमत्त्व त्याठिकाणी माहिती व्हायचं. अनफॉर्मल बातचीत व्हायची. जाता जाता शासनातले, शासनाबाहेरचे अपडेट्स मिळायचे.. असे एक ना अनेक लाभ तिथंत असतं. त्याठिकाणी पाटील साहेबांचं आणि माझं दरवर्षी, न चुकता बऱ्याच विषयांवर बोलणं व्हायचं. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू आपसूक समजायचे. विशेषतः प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आणि मानवतावादी असे. शिवाजीराव देशमुख यांच्याविषयीचा आदर त्यांच्या बोलण्यातून डोकावायचा. देशमुख साहेबांच्या सामाजिक जाणिवेचा आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक, सहानुभूतीच्या दृष्टीने पाहण्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यात येत असे. त्यांच्या प्रकृतीविषयीही ते चिंतेत असत. अशा नेत्यांची वानवा राज्यात हळूहळू निर्माण होत चालल्याची खंतही डोकावत असे. पण, आपण शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापलं काम चांगलं केलं, तर अंतिम फलनिष्पत्ती चांगलीच होईल, असा विश्वासही त्यांच्या मनी असे. विधानभवनातील शोकसभेत पांडुरंग पाटील यांच्या निधनाने माझ्या व्यक्तिगत जीवनात खूप मोठी हानी झाली आहे, हे शिवाजीराव देशमुखांचे उद्गार बरंच काही सांगून जातात.
पाटील साहेबांच्या अशा एक ना अनेक आठवणी मनात उसळताहेत. त्यांच्या निधनाचा धक्का हा आम्हा सहकाऱ्यांबरोबरच पत्रकार बंधू-भगिनींनाही सहज पचवता येण्यासारखा नाही. पण, एक मात्र खरं, की विधानभवनातला सभापती दालनाशी जोडणारा एक दुवा जसा त्यांच्या जाण्यानं हरपला आहे, तसंच विधान भवनातला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा पूलसुद्धा पांडुरंग पाटील यांच्या जाण्यानं कोसळला आहे. माझ्या या प्रेमळ सहकाऱ्याला माझी अगदी मनापासून श्रद्धांजली!

बुधवार, ७ मे, २०१४

महान्यूज आणि मी!

(माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम असलेल्या 'महान्यूज' या वेबपोर्टलला नुकताच उत्कृष्ट ई-प्रशासनासाठीचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. या निमित्ताने दि. ५ मे २०१४ रोजी 'महान्यूज' वेबपोर्टलवर प्रकाशित झालेला माझा लेख ब्लॉग वाचक मित्रांसाठी शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)
 
'महान्यूज आणि मी' या विषयावर लेख देण्यासंदर्भात काल महान्यूज शाखेतून  फोन आला आणि त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एका ध्यासपर्वाच्या स्मृतींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. 'महान्यूज' या वेब पोर्टलची निर्मिती ही जितकी महत्त्वाकांक्षी योजना होती, तितकीच ती निर्मिती प्रक्रिया खूप जिकीरीची आणि तरी सुद्धा एक समृद्ध अनुभव देणारी होती. साधारण सहा-एक महिन्यांचा तो कालखंड खूप भारावलेपणाचा होता. आमच्या कार्यक्षमतेची परीक्षा आणि कामाचा कस पाहणारा असा होता. आम्हा शासकीय अधिकाऱ्यांना अतिशय प्रोफेशनली काम करण्याची संधी आणि स्वातंत्र्य देऊन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची कॉर्पोरेट प्रतिमा इस्टॅब्लिश करण्यात 'महान्यूज'चा अतिशय मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासनातील घडामोडींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून राज्यातील वृत्तपत्रांसाठी अधिकृत आणि अपडेट शासकीय माहितीचा खजिना खुला करण्याचं काम महान्यूजनं केलं. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना हवी असणारी अनेक योजनांची माहिती त्यांना मिळू लागली आणि देशातील व जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या लोकहितैषि उपक्रमांची माहिती देऊन त्यांना शासनाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा महान्यूज बनलं. रोजगार संधी शोधणाऱ्या युवकांसाठी सार्वजनिक, शासकीय, निमशासकीय क्षेत्रांत उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती रोजच्या रोज अपडेट करून एका क्लिकवर देण्याचं फार महत्त्वाचं काम महान्यूज करत आहे. आणि त्यामागं तत्कालीन महासंचालक आणि आताच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची तळमळ आणि संचालक श्रद्धा बेलसरे व प्रल्हाद जाधव यांच्या सक्रिय मार्गदर्शनाचाही वाटा आहे.
'महान्यूज' या वेबपोर्टलची संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि दि. 19 सप्टेंबर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांच्या हस्ते या पोर्टलचं लोकार्पण होण्यापूर्वी साधारणपणे दोन ते अडीच वर्षे म्हैसकर मॅडम यांनी महासंचालनालयातील अधिकाऱ्यांची शासकीय चौकटबद्ध कार्यपद्धती बदलण्यासाठी केलेली मशागत ही खऱ्या अर्थानं भरीव पायाभरणी करणारी होती. 'केवळ खुलासे काढणारा आणि कळकट कागदावर मळकट बातम्या देणारा विभाग' (हे मॅडमचे शब्द!) अशी वृत्तपत्र प्रतिनिधींच्या मनातली महासंचालनालयाची सन 2006 पूर्वीची प्रतिमा तोपर्यंत पुसण्यात यश आलं होतं. सन 2006मध्ये मिडियामध्ये काम केलेल्या साधारण वीस सहाय्यक संचालकांची आमची नवी बॅच महासंचालनालयात दाखल झाली होती. या ताज्या दमाच्या टीमच्या जोरावर आणि पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाच्या बळावर म्हैसकर मॅडमनी विभागाचा चेहरामोहरा पालटण्याचा ध्यास घेतला. त्यातून विभागीय संपर्क कक्षातून उत्तम प्रकारच्या निर्दोष प्रेस नोट, प्रासंगिक लेख, माहिती यांचा ओघ वाढीस लागला. ब्लॅक ॲन्ड व्हाईट 'लोकराज्य'चं संपूर्ण फोर कलर 'न्यू लूक लोकराज्य'मध्ये रुपांतर झालेलं होतं आणि त्याचं समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत झालेलं होतं. गरज नसताना पण स्वतःला चाचपण्याच्या दृष्टीनं 'लोकराज्य' ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी)लाही सामोरं गेलं आणि देशातील विविध शासकीय मुखपत्रांमध्ये सर्वाधिक खपाचं (3,45,997) तर खाजगी मासिकांमध्ये 'वनिता' (मल्याळम) आणि 'मेरी सहेली' (हिंदी) यांच्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक खपाचं मासिक होण्याचा बहुमान 'लोकराज्य'नं पटकावला होता. या यशानं प्रेरित होऊन 'ऊर्दू लोकराज्य'चंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दणक्यात लोकार्पण करण्यात आलं होतं. त्याचीही यशस्वी आगेकूच सुरू झालेली होती. मुद्रित माध्यमांमध्ये अशी मोहोर उमटवित असतानाच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही आकाशवाणीवरील 'दिलखुलास' आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील 'जय महाराष्ट्र' हे कार्यक्रम लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करत होते. या यशाला आता नवमाध्यमाचं परिमाण मिळवून देण्याचा विचार म्हैसकर मॅडम यांच्या डोक्यात घोळत होता. त्या दृष्टीनं इंटरनेटवर वेबपोर्टल तयार करून राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिक वाचकांशी जोडण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनी होती. त्यातून त्यांनी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांमधून डॉ. गणेश मुळे यांची टीम लीडर म्हणून तर त्यांच्या जोडीला डॉ. किरण मोघे, मनीषा पिंगळे आणि तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी मयुरा देशपांडे, अरविंद जक्कल आणि आर्टिस्ट सुनील डुंभेरे यांची निवड केली होती. ही टीम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कामालाही लागली होती. त्यावेळी मी 'लोकराज्य'चा सहसंपादक म्हणून काम पाहात होतो. साधारण मे 2008मध्ये म्हैसकर मॅडमनी मला बोलावून 'महान्यूज टीममध्ये काम करणार का?' असं विचारलं. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कारण त्यापूर्वीही मॅडमनी मला अगदी विश्वासानं मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका, युरोप आणि दाव्होस दौऱ्याचं वार्तांकन, समन्वयन आणि अहवाल तयार करण्याचं काम माझ्यावर सोपवलं होतं. ते मी यशस्वीपणे केलं होतं. अतिशय महत्त्वाच्या अशा उद्योग, ऊर्जा या विभागांच्या विभागीय संपर्क अधिकारी पदाची जबाबदारी दिली होती. ती व्यवस्थितपणानं पार पाडली होती. 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र'साठी वेळोवेळी आदेशानुसार योगदान देत होतो. त्याचप्रमाणं 'लोकराज्य'च्या टीममध्येही अतिशय मनापासून काम करीत होतो. त्यामुळं मॅडमच्या कार्यपद्धतीची मला अगदी जवळून जाणीव झाली होती. त्यांना कन्टेंन्ट नेमका कसा हवा आहे, हे लक्षात येऊन हव्या त्या पद्धतीनं देण्यात माझा हातखंडा झाला होता, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कदाचित त्यामुळंच 'महान्यूज'च्या कन्टेन्टवर काम करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती. मीही त्यांच्या आदेशाबरहुकूम महान्यूज टीमला जॉईन झालो. काम प्रचंड होतं. राज्यभरातून दररोज यशकथांच्या अक्षरशः शेकडो इ-मेल्स प्राप्त होत होत्या. त्यामुळं त्यातील मजकूर डाऊनलोड करून घेणं आणि त्यांचं विभागनिहाय, विषयनिहाय सॉर्टिंग करणं ही जबाबदारी प्रामुख्यानं मी, मोघे सर आणि पिंगळे मॅडम यांच्यावर होती. बेलसरे मॅडम, मुळे सर हे प्रशासकीय तर देशपांडे मॅडम, जक्कल आणि तांत्रिक सल्लागार संजीव लाटकर हे तांत्रिक बाजू सांभाळत होते.
अनेक चर्चा, बैठकांमधून 'महान्यूज'मध्ये सुरवातीलाच एकूण तेरा सदरं आणि त्या दिवशीच्या राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या पाच बातम्या असाव्यात, असं नियोजन होतं. सदरांमध्ये महाइव्हेंट, ई-बातम्या, साक्षात्कार (मुलाखती), महासंस्कृती, शलाका, तारांकित (यशकथा), चौकटीबाहेर, आलेख (शासकीय योजनांची तपशीलवार माहिती), फर्स्ट पर्सन, गॅलरी (छायाचित्रे), महाऑप (रोजगार संधी), हॅलो (वाचक प्रतिक्रिया), लोकराज्य (कर्टन रेझर), दिलखुलास व जय महाराष्ट्र (मुलाखतींचे शब्दांकन) यांचा समावेश होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सदरं आम्हाला रोजच्या रोज अपलोड करावयाची होती- अगदी रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुद्धा! हे म्हणजे एक स्वतंत्र दैनिक चालविल्याप्रमाणंच होतं. त्यामुळं कितीही मजकूर आला तरी या 'महान्यूज' नामक महाराक्षसाच्या पोटात तो लगेच गडप होईल, याची जाणीव आमच्या सर्व टीमला होतीच. त्यामुळंच आम्ही कन्टेन्ट जनरेशनवर खूप मेहनत घेत होतो. दैनंदिन बातम्या वगळता किमान पहिले दोन ते तीन महिने तरी सदरांचा मजकूर व्यवस्थित पुरला पाहिजे आणि त्या कालावधीत पुढल्या तीन महिन्यांचा मजकूर उभा करावयाचा, असं आमचं नियोजन होतं. त्यानुसार आम्ही कामाला सुरवात केली होती.
राज्यभरातून आलेला मजकूर ई-मेलवरून डाऊनलोड करून घेण्याच्या प्रक्रियेत असतानाच मनिषा पिंगळे मॅडमच्या इनबॉक्समध्ये आलेल्या एका स्पॅम-मेलनं त्यातल्या सर्व इ-मेल्स अक्षरशः करप्ट झाल्या. शेकडो इ-मेल्समधला सारा मजकूर नाहीसा झाला. हा एक मोठा धडा आम्हाला सुरवातीच्या टप्प्यातच मिळाला. तरीही त्यापूर्वीच्या नोंदी आम्ही घेतलेल्या असल्यामुळं पुन्हा सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी बोलून दोन दिवसांत सारा डाटा जनरेट करण्यात आम्हाला यश आलं. त्यावेळी बाजारात उपलब्ध असलेलं सर्वात प्रभावी ॲन्टीव्हायरस सॉफ्टवेअर आमच्या संगणकांवर तातडीनं इन्स्टॉल करण्यात आलं.
सर्व डाटा डाऊनलोड करून सॉर्ट करण्याचं काम आम्ही साधारण तीन आठवड्यांत संपवलं असेल. त्यानंतर आमचं महत्त्वाचं काम सुरू झालं, ते म्हणजे त्या संपूर्ण मजकुराचं संपादन करण्याचं! ऑनलाइन मिडियावरील मजकुरासाठीची महत्त्वाची पूर्वअट म्हणजे तो शॉर्ट बट स्वीट आणि क्रिस्पी असला पाहिजे. वाचकाला जास्त स्क्रोल न करावे लागता संपूर्ण स्टोरी आशयासह समजली पाहिजे. या आणि आणखी व्यवधानांसाठी डॉ. मुळे यांनी एक स्टाइलबुकच तयार केलं. त्यामुळं कन्टेन्टच्या आमच्या टीमवर जबाबदारी होती- ती प्रत्येक स्टोरीला शॉर्ट पण आशयसंपन्न बनवण्याची. राज्यभरातून आलेला मजकूर हा प्रिंटच्या साच्यातला असल्यामुळं एक हजार ते अडीच हजार इतक्या शब्दसंख्येचा प्रत्येक लेख होता. आम्ही त्या साऱ्या यशकथा वाटून घेऊन संपादनाचं काम सुरू केलं. कितीही शब्दसंख्येचा लेख असला तरी त्याला पाचशे ते आठशे शब्दांत बसवण्याचं काम आम्ही पत्रकारितेमधला सारा संपादनाचा अनुभव पणाला लावून करत होतो. पण, पुढं गंमत अशी झाली की, महान्यूजची ट्रायल पेजेस तयार झाली, तेव्हा त्यामध्ये आम्ही संपादित केलेला मजकूर एका सिंगल स्क्रोलमध्येच बसत होता. त्यामुळं आमच्या अपेक्षेपेक्षा तो खूपच शॉर्ट वाटत होता. म्हैसकर मॅडमनाही ते पटलं आणि आम्ही पुन्हा ते सारे लेख बाराशे ते दीड हजार शब्दांचे केले. मूळचे लेख माहीत असल्यामुळं ते फारसं अवघड गेलं नसलं तरी हे वाढीव कामही आम्ही तातडीनं पूर्ण केलं.
लाटकर सरांनी डमी साइट आमच्या हवाली केली. त्यावर काम सुरू झालं. साइटमधल्या त्रुटी जशा लक्षात येतील, तशा आम्ही आमच्या तांत्रिक टीमला आणि वरिष्ठांना सांगत होतो. त्यावर काम केलं जात होतं. ऑफिसमध्ये दररोज दिवसातून तीनवेळा आमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन व्हायचं ते बेलसरे मॅडमच्या केबीनमध्ये. पहिलं सकाळी कार्यालयात आल्या आल्या- त्यात दिवसभराचं नियोजन केलं जायचं. दुपारी तीनच्या बैठकीत त्या नियोजनाचा फॉलोअप आणि स्टेटस पाहिला जायचा. आवश्यक तिथं ॲडिशन, डिलीशन व्हायचं आणि संध्याकाळी पाचच्या बैठकीत मजकुरावर अंतिम हात फिरवला जायचा. कामाची एक कॉर्पोरेट स्टाइल ठरुन गेली. दरम्यानच्या काळात वर्षा फडके-आंधळे या नव्या महिला अधिकाऱ्यासह बी.के. झंवर, संजय ओरके व नव्यानं निवड झालेले नंदकुमार वाघमारे, संतोष तोडकर, अंजू कांबळे, मंगेश वरकड आणि प्रमोद धोंगडे ही ताज्या दमाच्या माहिती अधिकाऱ्यांची फळीही महान्यूज टीमला जॉइन झाली आणि कामाचा झपाटा आणखीच वाढला. महान्यूज टीम त्यावेळी महासंचालनालयाच्या (चांगल्या अर्थाने) हेव्याचा विषय होती. कारण आम्ही सारे जण नेहमीच एकत्रित आणि युनिक राहण्याचा प्रयत्न करत असू. म्हैसकर मॅडम आणि बेलसरे मॅडमही हौशी! त्यामुळं महान्यूज टीमनं ठरविलेल्या ड्रेसकोडमध्ये त्याही सामील होत असत. किंबहुना, तो ठरविण्यात त्यांचाही पुढाकार असे.
असं असताना कामाचा ताणही होता. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उद्घाटनासाठी दिलेली 19 सप्टेंबर 2008 ही तारीख जवळ येईल, तसतसा आमचा उत्साह आणि मनावरचा तणाव वाढतच होता. त्या काळात सकाळच्या सत्रात बेलसरे मॅडमनी त्यांच्या केबीनमध्ये आमच्यासाठी योगाची सेशनही घेतली आहेत.
उद्घाटनासाठी आमच्या प्रत्येक टीम मेंबरनं काही घोषवाक्यही तयार केली होती. त्यावर चर्चा होऊन त्यातल्या काही निवडक घोषवाक्यांचे स्टँडी तयार करून उद्घाटनाच्या ठिकाणी लावण्याचं ठरलं. 'वर्षा' बंगल्यावर सकाळी उद्घाटन होणार होतं. त्यासाठी वेगळं काय करता येईल, यावर विचारमंथन सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी फ्लॅशमध्ये एक प्रोग्राम तयार करून मुख्यमंत्र्यांनी माऊस क्लिक करताच अगदी चौघडे, ढोलताशांच्या गजरासह (हे सारं व्हर्च्युअलच!) एक महाद्वार उघडते आणि त्यातून महान्यूजचा लोगो सामोरा येतो आणि लगेच पोर्टलचे होम पेज उघडते, अशी कल्पना मांडली. महासंचालकांनी ती उचलून धरली आणि अष्टपुत्रे सरांनी तसा प्रोग्राम तयार करवूनही घेतला.
या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांना पोर्टलबद्दल लाइव्ह प्रेझेंटेशन देण्याचेही ठरले होते. त्यासाठी नॅरेशनला म्हैसकर मॅडम आणि प्रेझेंटेशनच्या लॅपटॉपवर मी बसावे, असे ठरले होते. या ठिकाणीही मॅडमच्या क्राइसिस मॅनेजमेंटच्या व्यवधानाची प्रचिती आली. समजा, पोर्टल ऐनवेळी ऑनलाइन उघडले नाही, तर प्लॅन ए, बी आणि सी अशी तयारी करण्यात आली. 'प्लॅन ए'मध्ये पोर्टलची एचटीएमएल पेजेस लॅपटॉपवर सेव्ह करण्यात आली. ऑनलाइन पोर्टल नाही उघडले तर ही पेजेस 'ॲज इट इज' दाखवायची. तोही प्लॅन वर्क नाही झाला तर, 'प्लॅन बी'मध्ये पोर्टलच्या सर्व पेजेसचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार केले गेले. आणि 'प्लॅन सी'मध्ये त्या प्रेझेंटेशनची हँड-आऊट्सही तयार ठेवण्यात आली. प्लॅन सी पर्यंत जावे लागणे शोभादायक नव्हते, पण ती तयारी आम्ही ठेवली होती. उद्घाटनाच्या दिवशी क्रीम कलरच्या ड्रेसकोडमध्ये महान्यूज टीम 'वर्षा' बंगल्यावर पोहोचली. उद्घाटन समारंभ अगदी झोकात पार पडला. मुख्यमंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी या प्रकल्पाबद्दल अतिशय समाधान व्यक्त केले आणि त्याच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. म्हैसकर मॅडमचे नॅरेशन आणि माझे प्रेझेंटेशन यांचं ट्युनिंग अगदी उत्तम जमलं. त्यामुळं दुपारी मंत्रालयाच्या मिनी-थिएटरमध्ये पत्रकार परिषदेमध्येही त्यांच्यासमवेत प्रेझेंटेशनला मीच उपस्थित राहिलो. अशाच पद्धतीनं मग राजभवनवर तत्कालीन राज्यपाल एस.सी. जमीर आणि मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही प्रेझेंटेशन देण्यात आले. राज्यपालांनी त्यावेळी एक मार्मिक प्रश्न उपस्थित केला होता, "या तुमच्या उपक्रमाचा माझ्या चंद्रपुरातल्या आदिवासी बांधवांना काय लाभ होणार?" त्यावर म्हैसकर मॅडमनीही खूप प्रभावी उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "सर, आम्ही त्यांच्यासाठीच्या साऱ्या योजनांची माहिती या पोर्टलवर देणार आहोत, जेणे करून त्याठिकाणी कार्यरत असलेल्या शासकीय, अशासकीय व्यक्ती, संस्थांना त्यांची माहिती होईल आणि सरकारी दफ्तरातून त्यासंदर्भात थेट मदत मिळवून देता येईल किंवा काम करता येईल. भविष्यात त्यांच्यापर्यंत सहज पोहोचण्याचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय असेल. तंत्रज्ञानाचे लाभ तिथपर्यंत पोहोचविण्यासाठीच हा उपक्रम आम्ही आरंभला आहे." आज त्यांच्या या विधानाची प्रचिती आपल्याला येते आहेच.
उद्घाटन झालं, पण आता महान्यूज टीमची जबाबदारी वाढली होती. पहिल्या तीन दिवसांतच दहा हजारांहून अधिक हिट्स पोर्टलला मिळाल्या. यावरुन लोकांचं पोर्टलवर बारकाईनं लक्ष आहे, हे दिसत होतं. माझ्याकडं त्यावेळी तारांकित हे यशकथांचं आणि आलेख हे विविध शासकीय योजनांची माहिती देणारं सदर आणि लोकराज्य यांची जबाबदारी होती. त्याशिवाय, अन्य साऱ्या सदरांचा आणि सर्व बातम्यांचा मजकूर प्रूफरिडींगसह फायनल करण्याची जबाबदारीही माझ्यावर होती. खूप काटेकोरपणे काम करावं लागत असे. एक चूकही महागात पडेल, असा तो नाजूक कालखंड होता. टीममधल्या सर्वांनाच याची जाणीव होती, म्हणून कित्येकांनी आपल्या कितीतरी सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्यांचा स्वखुशीनं बळी दिला होता. मी स्वतःही चार-पाच महिन्यांहून अधिक काळ एकही दिवस सुटी न घेता अखंडितपणे काम केले.
म्हैसकर मॅडमनाही आमच्यावरील या दडपणाची जाण होती. त्यामुळंच महान्यूजला एक महिना पूर्ण झाल्याच्या दिवशी त्यांनी सर्व टीमला एक मस्तपैकी पार्टी दिली आणि त्याचवेळी सर्वांच्या कामाचं कौतुक करणारी प्रशस्तीपत्रंही प्रदान केली. हा आम्हा साऱ्यांसाठी एक अनपेक्षित आणि सुखद धक्का होता.
या ॲप्रिसिएशननं भारावलेली महान्यूज टीम पुन्हा नव्या जोमानं कामाला लागली ती अगदी आजतागायत अथकपणे कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात म्हैसकर मॅडम मुंबई महानगरपालिकेत गेल्या. मी सुद्धा उपमुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी झालो, एमटीडीसीत मॅनेजर, पर्यटन व सार्वजनिक बांधकाम मंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी, रायगड जिल्ह्याचा माहिती अधिकारी आणि आता शिवाजी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी झालो, तरी माझ्या महान्यूज टीमच्या प्रगतीवर मी नेहमीच नजर ठेवून असतो. अलीकडं पोर्टलनं नवं रुप धारण केलं, ऑनलाइन मिडियामध्ये असे कालसुसंगत बदल करणं आवश्यकही आहे. आता तर ई-प्रशासनाच्या सुवर्ण पुरस्काराची मोहोरही महान्यूज टीमच्या कामगिरीवर उमटली आहे. यावेळी पुन्हा म्हैसकर मॅडमच माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव आहेत, ही सुद्धा अत्यंत योगायोगाची गोष्ट. त्यामुळंही महान्यूज टीमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला असल्यास नवल नाही. मी आज त्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नाही, पण या साऱ्या आठवणी उचंबळून येत असताना किती लिहू अन् काय लिहू, असं मला झालं आहे. महान्यूज टीमच्या कामगिरीचा मला निरतिशय अभिमान आहे. सुवर्ण पुरस्कार प्राप्त महान्यूजच्या पायोनिअर टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला काम करता आलं, अशी अभिमानाची भावना मनी दाटून येते आहे. शेवटी आपलं लेकरू ते आपलंच, हेच खरं!