 |
| कोल्हापुरात गोविंदराव टेंबे सभागृहात 'कीर्तावणी'चा प्रयोग रंगला. सादरकर्ते ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे. |
('कीर्तावणी'मधील एक सादरीकरण.)
‘कीर्तावणी-
वारी आडवाटंच्या विठोबाची!’ या
अतिशय नितांत सुंदर अशा सांगितिक प्रयोगाबद्दल एका वाक्यात सांगायचे झाल्यास, आजच्या
समाजाच्या नरडीला लागलेल्या विविध प्रकारच्या प्रक्षिप्ततेच्या विषमुळीवर जालीम प्रबोधनडोस
देणारा हा सर्वांगसुंदर सांगीतिक प्रयोग आहे, असे
मी म्हणेन.
माझे युवा मित्र स्वामीराज भिसे यांनी
हा प्रयोग करण्याची घोषणा केल्यापासूनच तो पाहण्याची मला मनापासून इच्छा होती.
कारण आजच्या काळात प्रबोधनासाठी तळमळीने झटणारा हा तरुण वाचनसंस्कृतीपासून
वक्तृत्वसंस्कृतीपर्यंत विविध उपक्रमांद्वारे नव्या पिढीत जागृती निर्माण करण्याचे
काम करत आहे. अशा अनेक उपक्रमांत वेळोवेळी सहभागी होण्याची संधी त्याने मला दिली
आहे. त्याखेरीज सचिन परब यांच्या ‘रिंगण’साठी रिपोर्ताज लिहीण्याच्या निमित्ताने
स्वामीराजने अनेक संतांच्या कार्यक्षेत्रांचा देशभरात फिरून धांडोळा घेतलेला आहे. त्यामुळेच
‘कीर्तावणी’मध्ये तो नेमके काय नवीन आणि अभिनव सादर करतो, याविषयी
उत्सुकता होती. इचलकरंजी येथील प्रयोग काही कारणांमुळे पाहता आला नव्हता; मात्र
कोल्हापुरातील शुभारंभाचा प्रयोग पाहण्याची काल संधी मिळाली. हर्षोल्हासाने मन
भरून आले अन् ऊर अभिमानाने दाटून आला.
आपल्या संतपरंपरेने महाराष्ट्रासह भारतभूमीला
दिलेले जे मूल्यसंपन्न देणे आहे, त्याचे नेमके स्वरूप या प्रयोगातून
प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबारायांपर्यंत सर्वच
संतांच्या शिकवणीचे साररुप जणू सादरकर्ते श्रोत्यांच्या काना-मनांत ओतप्रोत
भरण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्यांच्या मनावर गारुड करणाऱ्या चमत्कारप्रधान
संकल्पनांचेही वैज्ञानिक पद्धतीने निरूपण करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न या प्रयोगात
दिसतो. त्यामुळे हा प्रयोग खरोखरच वेगळ्या धाटणीचा ठरतो.
यात स्वामीराज यांना लेखिका-दिग्दर्शिका
ऋचिका खोत यांची केवळ साथ नाही, तर या प्रयोगाचा तोल सांभाळण्याची
मोलाची भूमिका अत्यंत दमदारपणे केली आहे. कीर्तन आणि बतवणी यांचा सुंदर संगम
साधत ही ‘कीर्तावणी’ प्रेक्षकांसमोर साकार होऊ लागते. त्यामध्ये रोध, अवरोध, प्रतिरोध
आणि गतिरोध यांचा विचारपूर्वक मेळ घालून संतपरंपरेचे महत्त्व विषद करणारा एक
प्रशस्त विचारमार्ग उभा केला आहे. ऋचिका खोत यांनी लेखन, दिग्दर्शन
आणि सादरीकरण या तिन्ही स्तरांवर कमाल केली आहे. त्यांच्या सादरीकरणातील वैविध्य, व्हॉइस
मॉड्युलेशन, नृत्य, गायन आणि प्रभावी वक्तृत्व
यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.
स्वामीराज आणि ऋचिका यांच्यातील ‘गिव्ह
अँड टेक’सह मंचावरील ऊर्जाभारित वावर विशेष उल्लेखनीय आहे. स्वामीराज यांनी आपल्या
बाळसेदार देहासह जोमदार उर्जेने केलेले नृत्य-गायनाचे लयबद्ध सादरीकरण पाहून थक्क
व्हायला होते. विशेष म्हणजे, भर उन्हाळ्यात पाण्याचा थेंबही न घेता
इतक्या ताकदीने हा प्रयोग सलग दोन तास सादर करणे हेच माझ्या दृष्टीने कौतुकास्पद
आहे. त्यामुळे कीर्तावणीसाठी ‘हॅट्स ऑफ’ याशिवाय दुसरा शब्द सुचत नाही.
‘कीर्तावणी’च्या निमित्ताने ऋषिकेश
देशमाने यांचेही विशेष कौतुक करावेसे वाटते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या किरण माने
यांच्या ‘स्टोरी
शिवराज्याभिषेकाची’सारख्या
विविध प्रयोगशील उपक्रमांमध्ये त्यांचा वाढता सक्रिय सहभाग असून, कोल्हापूरचे एक
आश्वासक संगीतदिग्दर्शक म्हणून ते पुढे येत आहेत, ही माझ्यासाठी आश्वासक बाब आहे.
प्रचंड पोटॅन्शियल आहे त्यांच्यात. त्याचे ते निश्चित चीज करतील, अशी अपेक्षा आहे.
प्रयोगाबद्दल अधिक तपशीलात लिहून
त्याची मजा कमी करावी, असे वाटत नाही; मात्र
प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा, असे निश्चितपणे सांगावेसे वाटते. आपण
वारकरी परंपरेचे अनुयायी असाल किंवा नसाल, तरीही
‘कीर्तावणी’चा अनुभव एकदा तरी घ्यावाच.
येथे मला विनायक होगाडे याचीही आठवण
येते. त्यांच्या ‘तुकोबा’
किंवा ‘विठोबा
मिसिंग’सारख्या कादंबऱ्यांतून त्यांनी संतपरंपरेचा आधुनिक संदर्भात घेतलेला वेधही असाच
नितांतसुंदर उल्लेखनीय आहे. या नव्या पिढीकडून होणारे हे प्रयोगशील ‘एक्सप्लोरेशन’
अत्यंत महत्त्वाचे आहे. जुन्या परंपरेला नव्या पद्धतीने सादर करताना त्यातील
ताजेपणा, सुसंगतता आणि आजच्या काळाशी ते घालू
पाहात असलेली सांगड खूप महत्त्वाची आहे.
समकालीन वास्तव कितीही गुंतागुंतीचे
असले, तरी स्वामीराज, ऋचिका
आणि विनायक यांसारखी तरुण मंडळी माणुसकीचा आणि मूल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत
पोहोचवण्याचे काम ताकदीने करत आहेत, हे किती मोलाचे!
काल ‘कीर्तावणी’चा २९ वा प्रयोग सादर झाला असला, तरी
पुढे याचे अनेक प्रयोग व्हावेत आणि अधिकाधिक लोकांनी हा अनुभव घ्यावा, अशी
अपेक्षा आहे. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर
अंतर्मुख करणारा, विचारप्रवर्तक असा हा गंभीर प्रयोग आहे. त्यामुळे प्रत्येकाने
आवर्जून ही ‘कीर्तावणी’ अनुभवावी, असे
आवाहन मी निश्चितपणे करेन.