गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

माझे वैचारिक मार्गदर्शक प्रा. हरी नरके

 

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या 'निखळ: जागर संवेदनांचा' या ललितलेख संग्रहाच्या प्रकाशन समारंभास प्रा. हरी नरके प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संग्रहित छायाचित्र. 

प्रा. हरी नरके यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर

(ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे बुधवार, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी अकाली निधन झाले. हा आमच्यावर खूप मोठा दुःखाचा आघात आहे. या निमित्ताने नरके सरांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख सन्मित्र मोहसीन मुल्ला यांनी लिहवून घेऊन 'पुढारी ऑनलाईन'वर प्रकाशित केला. हा लेख दै. पुढारीच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

आयुष्यात असे काही प्रसंग येतात की जे तुम्हाला स्तब्ध, निःशब्द करून टाकतात. कालचा, ९ ऑगस्टचा दिवस माझ्या आयुष्यात असाच उगवलेला. ऑगस्ट क्रांतीदिनाच्या भरगच्च कार्यक्रमांचे वार्तांकन करण्याचे मनात नियोजन करीत घरातून बाहेर पडलो; तेवढ्यात दिनेश कुडचे याचा हरी नरके सर गेल्याचा तीन शब्दांचा संदेश प्राप्त झाला. सुन्न झालो. त्याच अवस्थेत ऑफिसमध्ये पोहोचलो. आमच्या कॉमन मित्रांपैकी एखाद्याला फोन करून वृत्ताची शहानिशा करावी, असंही वाटेना. तोवर सर्वच माध्यमांतून हे भयावह वृत्त खरे असल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे कार्यालयीन कामांचा यांत्रिकपणे निपटारा करीत असताना दुसरीकडे सरांच्या आठवांचा कल्लोळ मनात उसळलेला होता. सरांविषयी लिहावं, असे काही माध्यमकर्मी मित्रमंडळींचे फोनही आले, पण रात्री घरी परतल्यानंतरही सरांच्या आठवणींनी मनात इतकी प्रचंड गर्दी केली की काय लिहावं अन् काय नको, अशी अवस्था होऊन गेली. मनातला कोलाहल वाढलेलाच होता. अस्वस्थता मनभर पसरलेलीच होती. अशाच अवस्थेत रात्री उशीरा कधी तरी झोप लागली.

हरी नरके सरांचं माझ्या आयुष्यात वैचारिक मार्गदर्शकाचं स्थान होतं. माझ्याच काय, एकूणच महाराष्ट्राचेही ते वैचारिक दिग्दर्शक होते. आम्हा दोघांमधील संवाद हा अत्यंत कम्फर्टेबल असायचा. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला वैचारिक आणि संशोधकीय अधिष्ठानाच्या बळावर पुढे घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी अंगिकारलेलं होतं आणि अत्यंत निष्ठापूर्वक त्यांनी ही धुरा त्यांच्या खांद्यावर अखेरच्या क्षणापर्यंत वाहिली. ५६ पुस्तकांबरोबरच त्यांच्या अगणित दैनंदिन पोस्टमधून त्यांचा हा संशोधकीय विचारवंताचा पैलू अत्यंत झळाळून आपल्यासमोर सिद्ध झालेला आहे.

सरांची व्याख्यानं ऐकणं आणि त्यांना बोलताना पाहणं, हा एक समृद्ध करणारा आनंदानुभव असायचा. सुरवातीला श्रोता म्हणूनच मी त्यांच्याशी जोडला गेलेलो होतो. मुळातच सर एक पट्टीचे वक्ते असल्यानं समोरच्या श्रोत्यांना खिळवून कसं ठेवायचं, याची उत्तम हातोटी त्यांना साधलेली होती. सातत्यपूर्ण वाचनामुळं त्यांच्याकडं विविध विषयांच्या संदर्भांची खाण असायची. या संदर्भांची आपल्या भाषणामध्ये पखरण करताना श्रोत्यांना ते बोजड न वाटता सहजपणानं लक्षात राहतील, अशा पद्धतीनं त्यांची पेरणी ते करत. भाषणात आक्रमकता असायची, पण ती मुद्द्यांवाटे सामोरी यायची. कित्येकदा टोकदार उपरोधानं समोरच्याला ते आत्मपरीक्षणाला भाग पाडत. त्यावेळी मंद हसत, डोळे बारीक करून हळूच मिचकावण्याची त्यांची शैलीही लाजवाब असायची. अशा वेळी त्यांच्या गालावर पडणारी खळी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला लोभसपणा प्राप्त करून द्यायची. श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या मित्रपरिवाराचं नाव घेऊन संबोधण्याची त्यांची स्टाईलही युनिक होती.

प्रांजळपणा आणि परखडपणा या परस्परविरोधी गुणांचाही अत्यंत संतुलित संगम त्यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये होता. लोकांशी बोलताना कोणताही अभिनिवेश ते बोळगत नसत. साधेपणाने आणि आपुलकीने मिठ्ठास बोलत ते समोरच्याला आपलेसे करीत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाबतीत कोणी वस्तुनिष्ठता सोडू लागला की अत्यंत कठोरपणाने ते त्यांचे मुद्दे खोडून काढत. टेल्कोतील नोकरी सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवर आल्यानंतर पहिले वेतन २७ महिन्यांनी मिळाले आणि दुसरे आणखी वर्षभराने, हे त्यांनी त्यांच्या संपादकीय टिपणीत स्पष्टपणे नोंदविले. वसंत मून गेले, तेव्हा त्यांचेही दोन वर्षांचे वेतन थकलेले होते, हेही त्यांनी परखडपणे लिहीले. अशा परिस्थितीतही आपल्या कुटुंबियांनी आपल्याला सांभाळून घेतले, याची प्रांजळ नोंदही त्यांनी त्यात केली.

फुले-शाहू-आंबेडकरांचे अनेक संदर्भ त्यांना मुखोद्गत असत. त्यांची स्मरणशक्ती अचाट होती. मी वेळोवेळी काही शंका अगर संदर्भांच्या अनुषंगानं त्यांना फोन करीत असे. त्यावेळी ते संदर्भांची मालिका त्याच फोनवर सांगायला चालू करत. पाहून ठेवतो, थोड्या वेळानं फोन कर,’ वगैरे कधीच त्यांनी सांगितलं नाही. त्या अर्थानं फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा ते चालताबोलता कोश होते, हे मी माझ्या अनुभवातून ठामपणानं सांगू शकतो. मंत्रालयात असतानाच्या काळात कधी काही शेअरिंग करायचं असलं की त्यांचं बॅरेक्समधलं कार्यालय हे माझं आनंदनिधान असायचं. वेळ मिळाला की तिथं जाऊन नरके सरांशी गप्पा मारणं आणि त्या गप्पांतून आपसूक मिळणारे नवीन वाचनासाठीचे संदर्भ, फुले-आंबेडकरांच्या कार्याच्या त्यांच्या संशोधनातून सामोरी आलेली नवी माहिती, त्यांचं नवीन लिखाण अशा अनेक बाबींवर चर्चा होत. माझ्या पीएच.डी. संशोधनादरम्यान तर माझी सर्वाधिक चर्चा ही नरके सरांशीच होत होती. त्यातून आमच्या वयातलं अंतर पार होऊनही एक आगळं मैत्र आमच्यात जोडलं गेलं. त्यामध्ये माझ्यापेक्षा त्यांचं प्रेम, आपुलकी आणि सौजन्य यांचा वाटा अधिक होता. विशेष म्हणजे हे मैत्र मी कोल्हापुरात आल्यानंतर सुद्धा अबाधित राहिलं. त्यांचा कोल्हापूर दौरा असला की, संबंधित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि उतरण्याचं ठिकाण याची माहिती ते आवर्जून पाठवायचे. त्यांचं व्याख्यान शक्यतो मी कधी चुकवायचो नाही कारण दरवेळच्या भाषणातून काही नवे संदर्भ निश्चितपणानं मिळायचे. अगदीच शक्य नाही झालं तर सकाळच्या अगर संध्याकाळच्या सत्रात आम्ही भेटायचो. छान गप्पा व्हायच्या, शक्य असल्यास आम्ही एकत्र नाश्ता अथवा भोजन घ्यायचो. वेळ असेल तर घरी जायचो. त्यांचं आतिथ्य करायला माझ्या पत्नीलाही आवडायचं कारण ताटातला अन्नाचा कण अन् कण टिपून खाऊन तृप्त होणारा हा एक समाधानी माणूस होता. त्या एकेका दाण्यासाठी आपला समाज कसा आसुसलेला असायचा आणि आज तो मिळत असताना त्याप्रती कृतज्ञभाव बाळगणं आवश्यक आहे, ही आम्हा दोघांचीही धारणा असल्यानं हा कौटुंबिक जिव्हाळाही सरांनी खूप आत्मियतेनं जपला. या व्यक्तीगत जिव्हाळ्यातूनच माझ्या पहिल्या निखळ: जागर संवेदनांच्या या ललितसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिलेच, शिवाय, माझ्याविषयी आणि पुस्तकाविषयीही अगदी भरभरून बोलले. त्यांचे हे शब्दच आता सोबत राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी माझा आतेभाऊ नितीन याच्या हातचा तांबडा-पांढरा चाखलेला होता. त्याचे ते चाहतेच बनले होते. अगदी अलिकडेही एकदा त्यांनी त्याची आठवण काढली होती.

सरांच्या अखेरच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी माझ्या लेकीसह मी त्यांची भेट घेतली. स्विनीची अतिशय ममत्वानं चौकशी करीत त्यांनी तिला तोंडभरून आशीर्वाद दिले. गप्पांच्या दरम्यान त्यांच्या समग्र आजारपणाविषयी आणि उपचारांविषयी ते सांगत होते. चेहऱ्यावरील आणि अंगावरील सूज लपत नव्हती, पण ती किती तरी कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. जीभेवर मणामणाचं ओझं असल्याप्रमाणं ती उचलली जात नव्हती. हे ऐकताना तर अंगावर काटाच उभा राहिला. आताही बोलताना जीभेमुळं त्यांचा आवाज थोडा बदलला होता, पण लोकांचं प्रेम आणि आग्रह यामुळं आपलं सारं आजारपण बाजूला ठेवून ते व्याख्यानाला उभे राहात असत. आम्ही त्यावेळी पोहे खात होतो. सर म्हणाले, आलोक, तुला हे जितके तिखट किंवा खारट लागताहेत ना, त्याच्या किमान चौपटीने अधिक त्या चवी मला झोंबतात. म्हणजे त्यांच्या अगदी खाण्यावरही अशा प्रकारचे निर्बंध आले होते. उष्टे राखायचे नाही, म्हणून घेतानाच ते कमी अन्न घेत असत. यानंतर मात्र एकदा-दोनदा फोनवर बोलणं होऊन प्रकृतीची विचारपूस झाली, त्यापलिकडं भेट नाही. आणि सर असे अचानक निघून जातील आणि त्यांच्यावर स्मृतीलेख लिहीण्याची वेळ येईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण, तसं झालंय खरं.

सरांविषयी किती लिहावं... भेटल्यावर प्रेमानं हात हातात घेऊन चौकशी करणं, कधी आठवण आली की मिस्ड कॉल करणं (बैठकीत वगैरे असल्यास डिस्टर्ब नको म्हणून), फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा नॉनसेन्स खपवून न घेणं आणि त्याचा हिरीरीनं सप्रमाण प्रतिवाद करणं, ट्रोलधाडींना तोडीस तोड प्रत्युत्तर देणं, आरोग्य कितीही बिघडलेलं असलं तरी सातत्यानं लिहीत राहणं, लोकांना चांगल्या कार्यास प्रेरित करीत राहणं अशा एक ना अनेक गोष्टी आठवताहेत. त्यांच्या जाण्यानं एका ज्येष्ठ सहृदयी सन्मित्राला मुकल्याची भावना मनात दाटून राहिली आहे.

नरके सर कुटुंबवत्सल होते. आमच्या समानधर्मींच्या संमेलनामध्ये ते आदरणीय संगीता वहिनींना आणि प्रमितीला आवर्जून घेऊन यायचे. या दोघींविषयीही अपार प्रेम व वात्सल्यानं त्यांचं हृदय ओथंबलेलं असायचं. प्रमिती अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःच्या बळावर यशाचा एकेक टप्पा सर करीत चालली आहे, त्याचं आणि त्याहूनही अधिक तिच्या प्रयोगशीलतेचं कोण अप्रूप त्यांना असायचं. प्रमितीही आमच्या घरात पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही तिघं राहतो, असं सांगत वडिलांच्या पुस्तकप्रेमाचं अभिमानानं कौतुक करायची. या तिघांचं एक वेगळं विश्व होतं. त्या विश्वाचा एक कोन सरांच्या रुपानं लोपला आहे, ही त्यांची फार मोठी हानी आहे. आमच्याच आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही. त्यांच्या तरी कशी निघावी? त्यांना सावरण्याचं बळ लाभो, एवढीच भावना या क्षणी मनात आहे.

मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करवून देणं, फुले-आंबेडकरी चळवळींचं लोकशाही प्रस्थापनेसाठीचं महत्त्व सातत्यानं अधोरेखित करीत राहणं, ओबीसी समाजामध्ये जनजागृतीसह प्रबोधनाचं कार्य गतिमान करणं आणि भारतीय समाजाची जडणघडण संविधानाला अभिप्रेत अशी समताधिष्ठित करणं, ही आद्यकर्तव्यं घेऊन नरके सर मिशनरी भावनेतून अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. त्यांची ही अंगिकृत कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहणं, हीच हरी नरके यांच्या कार्याप्रती खरी आदरांजली ठरेल.


(पुढारी ऑनलाईनवर प्रकाशित लेखाची लिंक अशी- आंबेडकरी चळवळीला पुढे नेणारे लेखक हरपले | पुढारी (pudhari.news))

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

बाबासाहेबांच्या समग्र चळवळींचे नेटके दस्तावेजीकरण

 (डॉ. भगवान माने यांच्या नूतन पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख दै. लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये आज, रविवार दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आला. हा लेख दै. लोकमतच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)




शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे माजी प्राध्यापक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे माजी संचालक डॉ. भगवान माने लिखित व संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचा अन्वयार्थ: साऊथबरो कमिशन ते धम्मचक्र प्रवर्तन हे एक महत्त्वाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात सन १९१९पासून ते १९५६ पर्यंत सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी केलेल्या चळवळींचे समग्र दस्तावेजीकरण करण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.

बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या सर्व चळवळींच्या मुळाशी सामाजिक-आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापनेचे तत्त्व होते. अगदी धम्मक्रांतीच्या मुळाशीही सामाजिक-राजकीय परिवर्तन साध्यतेचा हेतू होता. विषमता हाच स्थायीभाव असलेल्या भारतीय समाजाला लोकशाही मूल्यांचा परिचय करून देऊन मूल्याधारित समता व सामाजिक न्यायासाठी आग्रही चळवळींचे बीजारोपण खऱ्या अर्थाने या भूमीमध्ये बाबासाहेबांनी केले. साऊथबरो फ्रॅंचाईज कमिशनसमोरील साक्षीपासूनच बाबासाहेबांचा हा मूल्याग्रह प्रकर्षाने सामोरा येत राहतो. तो पुढे टप्प्याटप्प्ने अधिकाधिक टोकदार होत गेलेला आहे. सायमन कमिशनसमोरील साक्षीपासून पुढे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, महाडचा सत्याग्रह, अंबादेवी मंदिर सत्याग्रह, मनुस्मृती दहन, पर्वती मंदिर सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, तीनही गोलमेज परिषदांतील कामगिरी, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना आणि धम्मचक्र प्रवर्तन या चळवळींचा सर्वंकष आढावा घेऊन त्यांचा अन्वयार्थ समजावून देण्याचा प्रयत्न येथे दिसतो. त्याच बरोबर त्यांच्या प्रस्तुततेच्या अनुषंगानेही चर्चा केली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भांडवली विकासाचे आधुनिकीकरणाचे नेहरू प्रारूप आपण स्वीकारले. त्यामध्ये समाजवादाचा विचार अभिप्रेत होता. सन १९९२पासून नवीन आर्थिक धोरणाचे पर्व सुरू झाले. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणामुळे बेरोजगारी, खाजगी उद्योगधंदे, राखीव जागांच्या विरोधी धोरण, गरीब, वंचित वर्गाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. दलित पँथरने नुकतीच पन्नाशी पूर्ण केली, परंतु त्या अगोदरच धगधगत्या चळवळीचा ऱ्हास झाला. मार्क्सवादी आणि गांधीवादी चळवळी आंबेडकरी चळवळीत दुही निर्माण करतात आणि मूळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धांच्या विचारात संभ्रम निर्माण करतात. याचा बोध आंबेडकरी चळवळींच्या अन्वयार्थातून घेतला पाहिजे. नव्या संरचनेत बाबासाहेबांच्या विचारधारेवरील चळवळी गतिमान केल्या पाहिजेत आणि आंबेडकरी चळवळी गटाचे ऐक्य ही काळाची गरज आहे.असे नेमके विश्लेषण डॉ. माने यांनी केले आहे.

बाबासाहेबांनी केलेल्या चळवळी या विद्यार्थ्यांसह चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभ्यासपूरक आहेत. त्यासाठी त्यांचे संकलन केले आहे. वेगळे काही केलेले नाही, असे डॉ. माने प्रांजळपणे सांगतात. तथापि, बाबासाहेबांचे जीवनकार्य, त्यांच्या चळवळी यांचा कालसुसंगत अन्वयार्थ लावत असतानाच त्यांच्या प्रस्तुतता सातत्याने अधोरेखित करीत राहणे, ही आजघडीची महत्त्वाची गरज आहे. हे अधोरेखन सदर पुस्तक पुन्हा नव्याने करते, म्हणूनच त्याची नोंद आवश्यक ठरते.

 

पुस्तकाचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचा अन्वयार्थ: साऊथबरो कमिशन ते धम्मचक्र प्रवर्तन

लेखन व संपादन     : प्रा. डॉ. भगवान माने

प्रकाशन             : रुपी पब्लिकेशन्स प्रा.लि., गडहिंग्लज

पृष्ठसंख्या         : २२४

किंमत               : रु. २५०/-

रविवार, ११ जून, २०२३

... शहर में शायद दंगा होने वाला है।



(मुंबईस्थित 'दै. नवशक्ति'च्या रविवार, दि. ११ जून २०२३ रोजीच्या अंकात 'दखल' या सदरांतर्गत प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रसारित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)

भारतीय संविधान या देशातील नागरिकांना आम्ही म्हणायला शिकविते. आम्ही, भारताचे लोक या शब्दांनी संविधानाची सुरवात होते. त्यात एकत्व, एकराष्ट्रीयत्वाची ठाम भावना आहे. ती जातधर्मादी अशी कोणत्याही प्रकारच्या भेदांहून निरपेक्ष आहे. त्यामध्ये कोठेही आम्ही आणि तुम्ही किंवा आम्ही आणि ते अशा सापत्न, भेदसूचक भावनांना थारा नाही. असे असले तरी व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रवृत्ती आणि विकृती असतातच. अशाच काही विकृतींची कीड या सांविधानिक भावनेला जाणीवपूर्वक ग्रासू लागल्याच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार सामोऱ्या येत आहेत. काही प्रवृत्तींचे हेतूच जणू कट्टरतावाद आणि सामाजिक, जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या बळावर पोसलेले असते. त्यांना त्यांच्या स्वार्थापुढे सलोख्याशी काही देणेघेणे नसते. समाज सातत्याने अशांत, अस्वस्थ कसा राहील, या दिशेनेच अशा प्रवृत्तींचे समग्र प्रयत्न एकवटलेले असतात. त्या अर्थाने ते एक्स्ट्रीमिस्टच (अतिरेकी) म्हणायला हवेत. अतिरेकी म्हणजे काही कोणी तुमच्या छातीवर एक-४७ रोखूनच उभारायला हवा, असे नसते. इथे एक अप्रत्यक्ष स्युडो-नॅशनॅलिझमचे अस्त्र संपूर्ण सामाजिक शांतता, सौहार्द आणि सलोख्यावर डागण्यात आलेले असते, ज्याद्वारे जनमानस भयभीत होऊन त्यांच्या दुर्हेतूंची पूर्तता करण्याकडे समाजाचा कल झुकू लागतो. जोपर्यंत हा सामाजिक फुटीरतेचा हेतू साध्य होत नाही, तोवर असे प्रयत्न वारंवार केले जात राहतात; समाजातली, समाजमानसातली दरी वाढवत नेली जाते आणि ज्या क्षणी ते साधले जाते, तेव्हा समाज पूर्णतः दोन टोकांवर दुभंगावस्थेत लोंबकळू लागल्याचे आपल्याला दिसते.

आजकाल अशा फुटीरतावादी प्रवृत्ती अनेकविध बाबींचे मॅग्नीफिकेशन करून समाजमानस परस्परांप्रती कलुषित करण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहेत. भारत-पाकिस्तान करता करता आता हा अजेंडा लव्ह जिहादपर्यंत येऊन ठेपला आहे. द केरला स्टोरी याचे उत्तम उदाहरण ठरावे. केरळमध्ये असे अवघे तीन प्रकार नोंद झाले. मात्र, चित्रपटात त्या तीनाचे तीस हजार करून दाखविण्यात आले. चित्रपटाच्या निर्मात्याने हायकोर्टामध्ये मान्य केलेले हे तथ्य आहे. म्हणजे या मॅग्निफिकेशनचे प्रमाण एक-दोन नव्हे, तर तब्बल तीस हजार पट अधिक आहे. हेतूपुरस्सर, फूस लावून होणारी प्रकरणे होत नसतील, असे अजिबातच नाही. पण, त्यांचे जे प्रमाण इथे वर्धित करून सांगितले जाते, ते घातक आहे. प्रेमात पडण्याच्या वयात माणूस जात, धर्म वगैरे थोडेच पाहातो? एखादी व्यक्ती आवडते आणि तिच्या साथीत एखाद्याला राहावेसे वाटते. मात्र, यातील एक परधर्मीय असेल, तर ती व्यक्ती लव्ह जिहादी ठरते, मग त्याला लव्ह जिहाद माहिती असो अगर नसो!

पूर्वी सामाजिक अशांतता बिघडवायची म्हटलं की, हिंदू-मुस्लीमांत तेढ पसरवायची आहे की, सवर्ण-दलितांत दंगल माजवायची आहे, त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापैकी एकाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे प्रकार घडवून आणल्याची उदाहरणे आहेत. अगदी आजही कुठे-कुठे या घटना जाणीवपूर्वक घडविल्या जाताना दिसतात. मात्र, आज या दंगली पसरविण्याचे काम आणखीच सोपे बनले आहे. फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटसवर कोण, काय लिहीतो, कोणाचा फोटो पोस्ट करतो, यावरुनच आता दंगली घडवून आणल्या जात आहेत. मुळात ते स्टेटस ठेवणाऱ्याचे स्टेटस काय, ते पाहणारा समुदाय किती, ते स्टेटस या विरुद्ध गोटापर्यंत पोहोचते कसे, या गोष्टींचा विचार येथे होत नाही. मात्र, त्याचा आधार घेऊन कोट्यवधींचे नुकसान येथे केले जातेच, पण विशिष्ट समाजघटकांना लक्ष्य करून ज्या गोष्टी केल्या जातात, त्यातून समाजस्वास्थ्याचे मात्र दूरगामी नुकसान होते. एखादा कोणी तरी अविवेकी व्यक्ती काही तरी स्टेटस लावतो म्हणून संपूर्ण समाजच त्याला जबाबदार कसा असू शकतो? मात्र, ती जबाबदारी या ध्रुवीकरणोत्सुक प्रवृत्तीच निश्चित करीत असून त्यासाठी पाठीराख्यांची मोठी फौज घेऊन रस्त्यावर उतरून सामाजिक-धार्मिक असंतोष, विखारी विद्वेष निर्माण करीत आहेत.

मध्यंतरी कोल्हापूरमध्ये एका बिर्याणी सेंटरमध्ये बादशहा बहादूरशाह जफर यांचे पोस्टर लावले होते. केवळ बिर्याणीशी देणेघेणे न राखता काही युवकांनी औरंगजेबाच्या वंशजाचे पोस्टर लावले म्हणून त्या सेंटरची मोठी तोडफोड केली. आता बहादूरशहा जफर यांचे १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात किती महत्त्वाचे योगदान होते, हे त्यांना कोणी सांगावे? बहादूरशहा आणि त्याच्या अपत्यांना याची किती मोठी किंमत चुकवावी लागली, हे तरी कोण लक्षात घेणार? बहादूरशहाला इंग्रजांनी रंगूनला नजरकैदेत ठेवले, तेथेच त्याचा मृत्यू झाला. शाही खानदानातल्या २९ युवकांची हत्या करण्यात आली. पळून जाण्यात यशस्वी झालेल्या त्याच्या दोन शहजाद्यांना उदयपूर आणि टोंक इथं भिकाऱ्याचं जीणं वाट्याला येऊन त्याच अवस्थेत मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं. हा बहादूरशहाचा भारतीय स्वातंत्र्यासाठीचा त्याग नव्हे काय? मात्र, तो औरंगजेबाच्या घराण्यातील औलाद म्हणून केवळ इथे तिरस्कारास पात्र ठरतो. मग, अकबराचं काय करणार आहोत आपण? दीन-ए-इलाहीसारखा सर्वधर्मसमभावाधिष्ठित धर्म जगाला सांगणारा हा बादशहा लवकरच औरंगजेबासारख्याचा बापजादा म्हणून या देशात आपण तिरस्करणीय ठरविणार काय?

कोलाहल, गोंगाट इतका वाढवित न्यायचा की कोणालाही काहीही समजेनासे झाले पाहिजे. गोंधळ निर्माण झाला पाहिजे. जनमानस संभ्रमित झाले पाहिजे. अशा संभ्रमितांचा गदारोळ निर्माण करून आपले हेतू त्या लाटेवर साध्य करून घ्यायचे, असा हा सारा माहौल आपल्या सभोवताली वावटळीसम गरगरविला जातो आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामित्वाला हरताळ फासण्याच्या प्रक्रियेची सुरवात शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे आणि ही आग शांत न होता, धुमसत, धुमसत तिचे राष्ट्रव्यापी असंतोषात रुपांतर करण्यासाठी या ध्रुवीकरणवादी प्रवृत्तींची जी धडपड सुरू आहे, ती योग्य नाही. एखाद्या समाजाला दैनंदिन पातळीवर त्याची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागणे, त्याला अतिरेकी, लव्ह जिहादी, देशद्रोही ठरविणे यातून एखाद्या क्षणी त्या समाजामध्ये तसेच वर्तन करून दाखविण्याची ऊर्मी उसळी मारुन वर आली, तर तो क्षण या फुटीरतावादी प्रवृत्तींच्या विजयाचा असेल. त्यामुळे भारताची सामाजिक-धार्मिक सौहार्दाची घडी विस्कटवण्याच्या प्रयत्नांना भीक न घालता एकी कायम ठेवण्याचा संदेश देशभरात पाठवणे, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत राहणे, हीच आजघडीची मोठी गरज आहे. शायर परविंदर शोख़ यांनी आपल्याला इशारा देऊन ठेवलाच आहे की-

नाम पे मज़हब के जमघट है लोगों का,

शहर में शायद दंगा होने वाला है


मंगळवार, ३० मे, २०२३

नितळ-११: ‘युनि’फॉर्म!




(मुंबई येथील 'दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेअंतर्गत आज, दि. ३० मे २०२३ रोजी प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे शेअर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


फार नाही, अवघ्या तीस वर्षांपूर्वीपर्यंत केवळ म्युनिसिपालिटी, जिल्हा परिषदा अर्थात शासकीय संस्थांच्या मार्फत शाळा चालविल्या जात असत, तेव्हा सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांसाठी पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि काही ठिकाणी डोक्यावर गांधी टोपी तर विद्यार्थिनींसाठी पांढरा ब्लाऊज आणि निळा किंवा गुलाबी स्कर्ट असा गणवेश असे. कित्येक स्पर्धांच्या निमित्ताने आम्ही विविध शाळांमध्ये जायचो, मात्र सारी मुलं याच युनिफॉर्ममध्ये असायची. त्यामुळं त्या ठिकाणी जमलेली सर्व मुलं ही विद्यार्थी म्हणून एक असायची.

आज या गोष्टीकडं मागं वळून पाहताना तत्कालीन शैक्षणिक धोरणकर्त्यांविषयी विलक्षण कौतुक मनी दाटून येतं. सर्व शाळांमध्ये गणवेश एकसारखा असावा, गणवेशामध्ये युनिफॉर्मिटी असावी, यासाठी त्यांनी किती सखोल चिंतन, विचार केला असेल, हे जाणवते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सामाजिक, आर्थिकदृष्ट्या अजिबातच एकजिनसी नसलेल्या किंवा प्रचंड विषम अवस्थेत असलेल्या स्तरित भारतीय समाजामधील अनेक समाजघटक प्रथमच शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील होत होते. त्यांना परवडेल असा कपडा हा गणवेशाचा भाग असला पाहिजे, असा विचार त्यामागे होता. मग खादीचा जाडाभरडा पांढरा कपडा आणि खाकी पाटलोणाचा कपडा हा समाजातल्या अगदी खालच्या स्तरातील लोकांनाही परवडू शकतो, असा विचार पुढे आला असावा. आता गणवेश तरी कशाला?, तर शाळा म्हणून काही एक शिस्त या मुलांमध्ये असावी, केवळ यासाठीच. अन्यथा कर्मवीर भाऊराव पाटलांपासून ते कित्येक शिक्षकांनी मुलांना त्यांच्या दारातून उचलून कडेवरुन आणि खांद्यावरुन शाळेत नेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याची अनेक उदाहरणे मागल्या पिढीत आहेत. तर, मुद्दा होता गणवेशाचा. समाजातल्या सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातली मुले शाळेत येत असताना त्यांच्या राहणीमानावरुन, विशेषतः पेहरावावरुन त्यांच्यात एकमेकांप्रती उच्चनीचतेची भावना उद्भवू नये, विद्यार्थी म्हणून त्यांनी शाळेमध्ये एका समान पातळीवर राहावे, या दृष्टीने हा एक साधा निर्णय फार महत्त्वाचा होता, असे माझे मत आहे.

मात्र, पुढे शाळांचे वेगवेगळे प्रकार जसजसे वाढीस लागले, तसतसे त्यांचे युनिफॉर्मही वेगवेगळे, रंगबिरंगी होऊ लागले. मराठी शाळांच्या पलिकडे कॉन्व्हेंट, सीबीएसई, आयसीएसई, इंग्लीश मीडियम, सेमी-इंग्लीश मीडियम, प्रायव्हेट, रेसिडेन्शियल, इंटरनॅशनल असे शाळांचे नानाविध प्रकार अवतरू लागले आणि तितकेच वेगवेगळ्या युनिफॉर्मचे लोणही फोफावले. या शाळांच्या विविध प्रकारांनी युनिफॉर्ममधली युनिफॉर्मिटी पूर्णतः संपुष्टात आणली. आपण शिक्षणाच्या व्यावसायीकरणाच्या नादामध्ये या देशातल्या विद्यार्थ्यांमधील समतेच्या भावनेला हरताळ फासतो आहोत, हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यांनी हे जाणीवपूर्वक केले, असे नक्कीच म्हणायचे नाही. आपापले वेगळेपण निर्माण करण्याच्या नादात त्यांच्या हातून हे पातक झाले, हे मात्र खरे.

विद्यार्थी एकमेकांच्या युनिफॉर्मवरुन एकमेकांना जोखू लागली. कॉन्व्हेंटची मुलं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागली. मराठी आणि म्युनिसिपालिटीच्या शाळांतील विद्यार्थी त्यांच्या दृष्टीनं शूद्र बनली. नवी शिक्षणव्यवस्था शिक्षणाच्या क्षेत्रात एका नव्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जन्म देती झाली. इंटरनॅशनल स्कूल, कॉन्व्हेंटची मुलं या व्यवस्थेतले नवब्राह्मण आहेत. सीबीएसईवाली मुलं क्षत्रिय आहेत. इंग्लीश, सेमी-इंग्लीशवाली वैश्य आहेत तर म्युनिसिपालिटीच्या मराठी शाळांतली मुलं शूद्र आहेत. शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरची मुलं तर कायमच अतिशूद्र आहेत.

एकदा अंधेरी ते कुर्ला बेस्टनं प्रवास करत होतो. वाटेत एका स्टॉपवर दोन अशाच हाय-क्लास शाळेतल्या मुली चढल्या. सहावी-सातवीतच असतील, फार तर. मी बसलो होतो, त्याच्या पुढच्या बाकावर त्या येऊन बसल्या. त्यांच्यात त्या स्टॉपवर उभ्या असलेल्या अशा शूद्र विद्यार्थिनींबद्दल बोलणं सुरू होतं. त्यांच्या इंग्रजीत सुरू असलेल्या चर्चेचा सूर थट्टेचाच, नव्हे तर कुचेष्टेचा होता. त्यांची शाळा, त्यांचा युनिफॉर्म, त्यांचं दिसणं, त्यांचं एकमेकींशी मराठीतून संवाद साधणं, या साऱ्याच बाबी या दोन मुलींच्या दृष्टीनं लो-क्लास होतं. त्या मुली आता नव्हत्या त्यांच्यासमोर, पण त्यांचं वर्णन करीत त्या एकमेकींना टाळ्या देत फिदीफिदी हसत होत्या. माझ्या मनात त्या खालच्या दोघींविषयी नव्हे, तर समोरच्या या तथाकथित हायक्लास मुलींविषयी आणि एकूणच शिक्षणव्यवस्थेविषयी करुणा दाटून येत होती. कारण या देशातल्या सामाजिक वास्तवापासून त्या कोसो दूर फेकल्या गेल्या होत्या. शिक्षणानं माणसामध्ये समतेची, समानतेच्या भावनेची रुजवात करायला हवी, बहुसांस्कृतिक भारताच्या प्रत्येक संस्कृतीविषयी आदरभाव रुजवायला हवा, मात्र प्रत्यक्षात शाळांच्या या नवनव्या प्रकारांनी हा नव्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जन्म दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून परस्परांप्रती विषमतेची भावना अधिक फोफावू लागली आहे.

युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी हे खरं तर आपल्या देशाचं वैशिष्ट्य. प्रत्यक्षात शाळांचा युनिफॉर्म मात्र विषमतेला कारणीभूत ठरल्याचं वर केवळ एक प्रत्यक्षदर्शी उदाहरण दिलं. प्रत्यक्षात याहूनही अधिक गंभीर परिस्थिती आहे. भारत आणि इंडिया ही जी सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक आणि अगदी डिजीटल दरी निर्माण होते आहे, त्याला हे शिक्षणातील बहुस्तरितीकरण कारणीभूत ठरत आहे. गगनचुंबी टॉवरमध्ये राहणाऱ्या समुदायाला आपल्या शेजारी असणारी झोपडपट्टी नकोशी असते- त्या झोपडपट्टीतूनच त्यांच्या कामवाल्या, झाडूवाल्या, अगदी सुरक्षा रक्षक येत असून सुद्धा. या घटकांच्या जगण्या-मरण्याशी कोणतंही नातं, हे टॉवर जोडू पाहात नाहीत. त्याचं दुखणं समजून घेण्याचा ते प्रयत्नही करत नाहीत. कारण ते जिथं शिकले, तिथल्या शिक्षणानं त्यांच्यामध्ये ही आस्था कणव निर्माणच केलेली नसते. सन्माननीय अपवाद गृहित धरल्यानंतर सुद्धा हे प्रमाण खूपच नगण्य असतं.

केवळ युनिफॉर्म बदलल्यानं ही विद्यार्थ्यांची, विविध समाजघटकांची एकमेकांकडं विषमतेच्या भावनेनं पाहण्याची दृष्टी लगोलग बदलेल, असं मुळीच म्हणायचं नाही; मात्र, समतेचा दृष्टीकोन निर्माण करण्याची ताकदही युनिफॉर्ममध्ये असते, हेही तितकंच खरं!

मंगळवार, १६ मे, २०२३

नितळ-१०: ... ये तो नहीं, किसी पे भरोसा किया न जाए।


('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


हर-चंद ऐतबार में, धोके भी हैं मगर,

ये तो नहीं, किसी पे भरोसा किया न जाए।।

गेल्या आठवड्यापासून जाँ निसार अख़्तर साहेबांचा हा शेर सारखा सारखा आठवतो आहे; अस्वस्थ करतो आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असणारी राष्ट्रीय नीट अर्थात नॅशनल इलिजिबिलिटी तथा एन्ट्रन्स टेस्ट नुकतीच पार पडली. यावेळी ती काही फारशी नीट पार पडली नाही, असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्रातील सांगली आणि पश्चिम बंगालमधील हिंदमाता केंद्रावर या परीक्षेला बसलेल्या बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर ऐनवेळी कपडे उलटे परिधान करून संपूर्ण परीक्षा द्यावी लागली. या अतिशय लाजीरवाण्या प्रसंगाला विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्याविषयी कोणालाही कसल्याही प्रकारचा अधिकृत खुलासा करावासा वाटत नाही, हे अधिक वेदनादायक आहे.

नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून आधीच वस्त्रे परिधान करण्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या बाह्यांचे शर्ट किंवा टी शर्ट, पारंपरिक पॅंट तसेच बारीक सोलचे सँडल किंवा चप्पल घालावयाचे आहेत. त्यांनी कुर्ता-पायजमा, लांब बाह्यांचे, बारीक नक्षीकामाचे (एंम्ब्रॉयडरी), डिझाईनर बटणांचे अथवा चेन्सचे, मोठ्या खिशांचे असे कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करावयाचे नसतात. बूट तर त्यांनी घालायचेच नाहीत. विद्यार्थिनींनीही फॅशनेबल कपडे, मोठ्या बटणांचे, लांब बाह्यांचे कपडे, जीन्स, पलाझ्झो, लेगिंग्ज, हाय हील्स किंवा जाड सोलच्या चपला, दागिने असे काहीच घालावयाचे नाहीत. शीख आणि मुस्लीम विद्यार्थ्यांना त्यांचे पारंपरिक कपडे परिधान करण्यास, आधी उपस्थित राहून तपासणी करण्याच्या अटीस अधीन राहून मान्यता आहे.

मुळात ही सारी प्रक्रियाच किती मोठ्या अविश्वासाच्या पायावर उभी आहे, हे पाहून वाईट वाटते. जी मुलं वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छित असतात, त्यामध्ये इतक्या टोकाची कॉपी करणारे विद्यार्थी असतील, हे पटणारे नाही. जरी काही मोजकी असतील, तर ती त्यांच्या अंतिम ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचणार नाहीत. शिवाय, त्यांना शोधून काढण्यासाठी कॉपी प्रतिबंधक यंत्रणा सक्षम असायला हवी, इतकी अपेक्षा तरी बाळगायला हरकत नाही. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही तशी राष्ट्रीय स्तरावरील पहिलीच परीक्षा. त्या परीक्षेचे दडपण विद्यार्थी आणि पालकांवर अगदी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासूनच असते. वेगवेगळे क्लास, पॅटर्न यांचा पालक-विद्यार्थी कसोशीने अभ्यास करून त्या त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. त्यानंतर नीट’, सीईटी, जेईई अशा महत्त्वाच्या अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षांना अवतीर्ण होत असतात. अशा वेळेला ही मुलं आणि त्यांचे पालक कॉपी करण्याला प्राधान्य देत असतील, की अभ्यास करण्याला?, याचा परीक्षा घेणाऱ्यांनी विचार करायला हवा. आजकाल बूट, जीन्स, लेगिंग्ज, हाय हील्स वगैरे पोशाख, वेशभूषा ही सर्वसामान्य म्हणावी इतकी प्रचलित झालेली आहे. ती परिधान करण्यापासून विद्यार्थ्यांना रोखणं, चुकीचं आहे. परीक्षकांना, सुपरवायझरना शंका आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची मुभा त्यांना असते. सापडल्यास विहीत कठोर कारवाईचीही नियमावलीत तरतूद असतेच. असे असतानाही विद्यार्थ्यांचा विनयभंग होईल, इतक्या अपमानास्पद पद्धतीने त्यांना वागवण्याचा कोणालाही अधिकार नाही. विद्यार्थिनींच्या बाबतीत नाहीच नाही, पण विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारे कोणी त्रास देता कामा नये. त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी अतिशय मोठ्या मानसिक तणावाखाली असतात. त्यावेळी त्यांना परीक्षेखेरीज इतर काहीही सुचत नसते. नेमक्या अशा वेळी त्यांचे चित्त विचलित होईल आणि परीक्षेला त्यांना योग्य पद्धतीने सामोरे जाता येणार नाही, असे वर्तन जर परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडूनच झाले आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी या यंत्रणा आणि त्यांमधील घटक घेणार आहेत का? याचे उत्तर निश्चितच नकारात्मक असेल. तसे असल्यास अशा चुकीच्या पद्धती निर्माण करून कोणाही विद्यार्थ्याच्या कारकीर्दीशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही.

सांगलीतील घटनेच्या तपशीलामध्ये शिरल्यास तेथे विद्यार्थिनींना त्यांच्या अंतर्वस्त्रांसह कपडे उलटे घालण्यास भाग पाडण्यात आले. बंगालमध्ये काही विद्यार्थिनींनी त्यांच्या आयांचे कपडे अदलाबदली केले. असे असताना या महाविद्यालयाच्या परिसरात त्यांच्यासाठी योग्य आडोसाही नव्हता. त्या अर्थाने सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना कपडे बदलावयास लावणे अथवा उलटे करून घालावयास लावणे हा त्यांच्या विनयभंगाचा किंवा त्याही पुढे जाऊन लैंगिक शोषणाचा प्रकार आहे, असे म्हणण्यास वाव आहे. आणि पुढे अशा उलटे कपडे घातलेल्या अवस्थेत विद्यार्थिनींना तीन तास परीक्षा द्यावयास लावणे, हा तर अमानुषपणाचा कळस आहे, असेच म्हणावे लागेल.

आता महिला आयोग वगैरेंनी त्याविरोधात आवाज उठवला आहे. त्याचे पुढे काय व्हायचे ते होईल. पण, मुळात प्रश्न असा उद्भवतो की, आपण इतके व्यवस्थाशरण झालो आहोत का, की जे काही होते आहे, ते जर नैतिकदृष्ट्या अयोग्य असेल, तर आपण त्याविरोधात आवाजही उठवू शकत नाही. एकाही पालकाला अगर विद्यार्थ्याला होत असलेल्या गैरप्रकाराला प्रतिरोध, विरोध करावासा वाटत नाही. वैद्यकीय प्रवेशापुढे सारी नितीमत्ता, मानवता आपल्याला फिकी वाटते. शिक्षणाने माणसामध्ये स्वाभिमान निर्माण होतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिक्षण ही माणूस घडविण्याची महत्त्वाची प्रक्रिया आहे, असे स्वामी विवेकानंद सांगतात. हे त्यांचे सांगणे प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आपल्या शिक्षण व्यवस्थेची पावले पडणार की नाही, हा आजघडीचा कळीचा प्रश्न आहे. अन्यथा व्यवस्थेच्या वरच्या थरात बसलेले लोक त्यांच्या पद्धतीने नियमांचा अर्थ लावत राहणार आणि खालच्या स्तरातल्या लोकांचे शोषण करीत राहणार. प्रत्यक्षात शिक्षणाने शोषणाची जाणीव शोषितांमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षा तर इथे फलद्रुप होताना दिसत नाहीच, उलट आपण आपल्या तात्कालिक लाभाच्या काही बाबींसाठी शोषकांना शोषणाची संधी उपलब्ध करून देत आहोत, असेच चित्र सामोरे आले आहे. शोषणाविरुद्धचा किमान एक हुंकार तरी समाजाने भरायला हवा. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तेवढी तरी अपेक्षा करणे रास्तच आहे, नाही का?


मंगळवार, २ मे, २०२३

नितळ-९: विरासत को नजरअंदाज न कर...


अजिंठा येथील १७व्या क्रमांकाच्या लेणीमधील इंद्र (सन २००८ मध्ये घेतलेले छायाचित्र)

अजिंठा येथील १७व्या क्रमांकाच्या लेणीमधील इंद्र (सन २०२२ मध्ये घेतलेले छायाचित्र)

अजिंठा येथील १० व्या क्रमांकाच्या लेणीमधील स्तंभांवरील चित्रे. (सन २०१२)

अजिंठा येथील १० व्या क्रमांकाच्या लेणीमधील स्तंभांवरील चित्रे. (सन २०२२)

('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



भारताला समृद्ध कला-संस्कृतीचा इतिहास लाभला आहे. तो या देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरला आहे. मात्र, आपण भारतीय लोक आपला समृद्ध वारसा जतन करण्याच्या बाबतीत करंटे आहोत, हे या आधीही कित्येकदा सिद्ध झाले आहे आणि यापुढेही आपण ते हिरीरीने सिद्ध करीत राहणार आहोत. आपल्यात जाणिवांचा अभाव इतका तीव्र आहे की, आपल्या शेजारी असलेल्या वारशाचे जतन, संवर्धन करण्याची आवश्यकता आपल्या मनाला स्पर्शदेखील करीत नाही.

गेल्या तीन दशकांत सरासरी दहा वर्षांच्या अंतरानं अजिंठ्याच्या लेण्यांना भेट दिली. अजिंठा लेण्यांमधील शिल्पकला तर अप्रतिम आहेच, पण येथील भित्तीचित्रे ही या लेण्यांना इतर लेण्यांहून वेगळी आणि सर्वश्रेष्ठ ठरवितात. म्हणूनच त्यांचा समावेश युनेस्कोच्या महत्त्वाच्या जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला आहे. अजिंठ्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आहे. त्याचप्रमाणे परिसरातील वनसंपदेचे जतन व संवर्धन वन विभागाकडे आहे. अजिंठ्याला दर वर्षी जगभरातील लाखो पर्यटक भेट देत असतात. दिवाळी आणि उन्हाळी सुटीच्या कालावधीत तसेच डिसेंबर-जानेवारीमध्ये या लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची तसेच विविध शालेय, महाविद्यालयीन सहलींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तथापि, पर्यटकांमधील जाणिवांच्या अभावाचा फटका अजिंठ्याच्या वारशाला जबर बसतो आहे, हे लक्षात आणून देण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे.

प्रस्तुत लेखकाने डिसेंबर २०१२ आणि डिसेंबर २०२२ आणि तत्पूर्वी मार्च २००८मध्ये या लेण्यांना भेट दिली. अवघ्या दशक-दीडदशकाच्या कालावधीमध्ये या लेण्यांमधील भित्तीचित्रांची अपरिमित हानी झाल्याची बाब यावेळी लक्षात आली. पुरातत्त्व विभाग आपल्या मनुष्यबळाच्या मर्यादेमध्येही संवर्धनाचे काम करीत असल्याचे दिसत असले तरी बेफिकीर पर्यटकांमुळे आणि अनास्थेमुळे अजिंठ्याचा हा अनमोल वारसा आणखी काही वर्षांत पूर्णतः लुप्त होऊन जाईल, अशी साधार भीती वाटते.

दशकभरापूर्वी अजिंठ्याच्या कन्व्हेन्शन सेंटरपासून लेण्यांपर्यंत पर्यावरणपूरक बसने पर्यटकांना वाहून नेले जात असे. ही बस प्रदूषणविरहित होती. मात्र, डिसेंबर २०२२मध्ये मात्र त्यांच्या जागी एसटीच्या डिझेलचा धूर ओकणाऱ्या बस पाहून आश्चर्यात भर पडली. अनास्थेची सुरवात इथंपासूनच. लेण्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पर्यटकांच्या गर्दीचा महापूर. त्यात शालेय सहलींचे प्रमाण तर विचारता सोय नाही. अजिंठ्याची भित्तीचित्रे ही पूर्णपणे नैसर्गिक माती, चुना आणि पानाफुलांच्या भुकटीच्या रंगलेपनातून साकारलेली आहेत. श्वासोच्छवासामुळे गुहांमधील आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वातावरण दमट, ओलसर होऊन त्या चित्रांमध्ये बुरशीसह वेगवेगळे विषाणू वाढतात आणि चित्रांची हानी होण्यास सुरवात होते. म्हणून या गुहांमधील पर्यटकांची संख्या ही मर्यादित करण्याची मोठी आवश्यकता आहे. दिवसाला ठराविकच पर्यटक लेण्यांकडे सोडले जावेत. त्यातही निवडक गंभीर, अभ्यासक पर्यटकांनाच सोडले जावे. बाकीच्यांना पायथ्याशी उभारलेल्या लेण्यांच्या प्रतिकृती दाखवून वाटेला लावायला हवे. शालेय सहली घेऊन येणाऱ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही या लेण्यांचे फारसे गांभीर्य दिसत नाही. मोठमोठ्याने दंगा करीत, आरडाओरड करीत पळापळ करत लेणी पाहतात. परतण्याचीही घाई असते. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांमागे नुसती गडबड करीत असतात. यामुळे साहजिकच श्वासोच्छवास आणि गुहांमधील आर्द्रता यांचे प्रमाण वाढते. तशात पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अत्यधिक वाढते. त्यामुळे भित्तीचित्रे ओली होतात. उन्हाळ्याचा तडाखा वाढत जाईल, तसतसे या भित्तीचित्रांमधील बाष्प बाहेर पडण्यासाठी वाट शोधते आणि अचानक वाळल्याने या चित्रांचे पोपडे पडू लागतात. या भित्तीचित्रांच्या ऱ्हासाला ही नैसर्गिक बाब कारणीभूत असली तरी मानवी हस्तक्षेप अधिक जबाबदार आहे.

या भित्तीशिल्पांवर कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचाही विपरित परिणाम होतो. त्यामुळे येथे फ्लॅश न वापरता फोटो काढणे अभिप्रेत असते. मात्र, लेण्या पाहण्यापेक्षा हल्ली सेल्फीश लोकांचे प्रमाण वाढल्याने या बाबीकडेही दुर्लक्ष होताना दिसते. याचा परिणाम असा झाला आहे की, या अवघ्या दशकभरातच या भित्तीशिल्पांची खूप हानी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी जी चित्रे बऱ्यापैकी दिसून येत होती, ती आता शोधावी लागत आहेत. छतांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम आणि चित्रे ही आज धुसर, धूरकट होत निघाली आहेत. आणखी दशकभराने ती दिसतील किंवा कसे, याविषयी साशंकता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. चैत्यगृहामधील स्तंभांवरील आणि छतावरील चित्रांचीही स्थिती काही वेगळी नाही. अजिंठ्यातील ही सारी भित्तीचित्रे आज अस्तंगत होण्याच्या सीमारेषेवर आहेत. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते पाचवे- सहावे शतक अशा दोन कालावधींमध्ये हा बौद्ध वारसा साकार झाला. काळाच्या उदरात गडप होऊनही पुन्हा झळाळून या देशाला त्याच्या समृद्ध बौद्ध परंपरेची जाणीव करून देता झाला. हा वारसा आता पुन्हा एकदा कायमस्वरुपी काळाच्या उदरात गडप करण्याची सिद्धता जणू आपण सारे मिळून करतो आहोत. अशा वेळेला त्याचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी कोणी तरी पुढे सरसावेल, याच्या प्रतीक्षेत अजिंठ्याची भित्तीचित्रे आहेत. या मृत्यूच्या छायेतून कोणी वाचवेल का त्यांना?

अपनी विरासत को नजरअंदाज न कर आलोक,

आगे चलकर तुझे भी तो इतिहास रचना है।



(सर्व छायाचित्रे डॉ. आलोक जत्राटकर यांनी फ्लॅश न वापरता नियम पाळून काढलेली आहेत.)