| (एआय संपादित प्रतिमा) |
©आलोक 'प्रियदर्शन'
©Dr. Alok Jatratkar डॉ. आलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन!
| (एआय संपादित प्रतिमा) |
©आलोक 'प्रियदर्शन'
![]() |
| ('दै. सकाळ'चे ६ मे २०२६ रोजीचे संपादकीय पृष्ठ) |
सहा मे हा दिवस माझ्यासाठी नेहमीच शोकदिन राहिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हा स्मृतिदिन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या परंपरेत वाढलेल्या माणसासाठी केवळ स्मरणाचा नव्हे; तर, महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतानाच सामाजिक न्याय, समता आणि विवेक या मूल्यांना जागवण्याचाही दिवस असतो.
या दिवसाला आता आणखी एका वेदनेची किनार
लाभली आहे. कालच्या ६ मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ‘सकाळ’ उघडला. पहिलं, तिसरं पान पाहून झालं
अन् संपादकीय पान उघडलं. या पानावर दररोज पहिल्यांदा ब्रिटीश नंदी यांचं ‘ढिंगटांग’ वाचायचं,
त्यानंतर लगेच अग्रलेख पाहायचा अशी सवय- अनेक वर्षांपासूनची! या दिवशी मात्र नेहमीच्या जागी अग्रलेख दिसला
नाही, लेआऊटही बदललेला. ढिंगटांगही न वाचता पुढची सगळी पानं एकदा, दोनदा नव्हे,
तीनदा उलटीपालटी करून पाहिली. अग्रलेख कुठेच नाही. लेआऊट असा की, अग्रलेख चुकून
राहिला असावा अगर मागे ठेवला असावा, असं दिसत नव्हतं. खूप अस्वस्थ वाटलं. ज्या
वृत्तपत्रामध्ये मी घडलो, मनापासून काम केलं, माझ्या यशाचं श्रेय निःसंशय
ज्या दैनिकाचं; त्या दैनिकामध्ये अग्रलेख येणे बंद होणं, हे माझ्या अस्वस्थतेमागील
मोठं कारण.
कदाचित व्यवस्थापनाचा हा निर्णय
भविष्यात अनेकांसाठी ‘दिशादर्शक’ही ठरेल; पण,
आज तरी अग्रलेख वाचणाऱ्यांसाठी ते धक्कादायक ठरलं आहे. कदाचित पहिल्या
दृष्टीक्षेपात ही बाब काहींना किरकोळही वाटेल. “अग्रलेख किती लोक वाचतात?” असा
प्रश्नही उपस्थित केला जाईल. आम्ही विद्यार्थी असतानाही हे प्रमाण २ ते ५ टक्के
इतकंच सांगितलं जायचं. पण तरी अग्रलेख म्हणून त्याचं स्थान शीर्षस्थ होतं. हा
प्रश्न वाचकसंख्येचा नाहीच मुळी; प्रश्न वृत्तपत्राच्या आणि अधिक
स्पष्टपणे सांगायचं तर संपादकाच्या आत्मभूमिकेचा असतो.
एखाद्या दैनिकाचा अग्रलेख त्याची
वैचारिक धडधड असते. तो त्या वृत्तपत्राचा विवेक असतो. त्या माध्यमाची भूमिका, त्याची
सामाजिक जाणीव, त्याचा काळाशी संवाद — हे सगळं
अग्रलेखातून अभिव्यक्त होत असतं. तुम्ही कोणती भूमिका घेता याहीपेक्षा तुम्ही
भूमिका घेता, ही गोष्ट लाखमोलाची असते. कारण ती भूमिका वाचकांच्या संवेदनशीलतेला
सतत जागं ठेवण्याचं काम करत असते.
अग्रलेखाच्या जागेकडं केवळ एक ‘स्पेस’ म्हणून
पाहणं खचितच योग्य नव्हे. जाहिरातीची जागा अडवणारे ठिकाण म्हणून त्या जागेवर तिरका
डोळा ठेवणं, हेही रास्त नव्हे. तिच्याकडे फक्त कमर्शियल दृष्टिकोनातून पाहणं
म्हणजे पत्रकारितेच्या मूलभूत आत्म्यालाच नाकारणं होय.
अर्थात, हा अग्रलेख
न छापण्याचा निर्णय नेमक्या कोणत्या भूमिकेतून घेतला गेला, याविषयी
वाचक म्हणून आपण सारेच अनभिज्ञ आहोत. त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही.
तो व्यवस्थापनाच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग असू शकतो. हेही खरं आहे की, आजचा
एखादा प्रभावी व्यंगचित्रकार अनेकदा संपादकापेक्षाही कमी शब्दांत अधिक नेमकी
भूमिका मांडतो. पण म्हणून अग्रलेखाची जागाच व्यंगचित्राला देणं आणि संपादकीय
परंपरेला हद्दपार करणं, स्वीकारार्ह वाटत नाही. पूर्वी हुशार
प्रधानाच्या जागी राजानं चतुर विदुषकाला नेमल्याच्या गोष्टी सांगितल्या जात, तसं काहीसं
झालं हे!
आजच्या काळात भूमिका घेण्याची गरज अधिक
तीव्र आहे. समाजात गोंधळ, ध्रुवीकरण, दिशाभ्रम
करणाऱ्या अपमाहितीचा महापूर वाढत असताना विवेकी मार्गदर्शनाची गरज वाढलेली आहे.
अशा वेळी जवळपास शतकभराची परंपरा असलेल्या वृत्तपत्राने अग्रलेख बंद करणं, ही केवळ
संपादकीय बदलाची बाब नाही; तर एका वैचारिक संस्कृतीच्या ऱ्हासाची
नोंद आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांच्यावर अर्धवट, फेक, बनावटी
माहितीचा ओघ प्रचंड वाढत असण्याच्या काळात प्रिंट मीडियाकडं विश्वासार्ह माहितीचा
स्रोत म्हणून आशेनं पाहिलं जातं. त्यामुळं आज वाचकांना वस्तुनिष्ठ माहिती आणि
त्याआधारे योग्य मतनिर्मितीसाठी त्यांना मदत करणं, हे फार मोठ्या जबाबदारीचं काम
मुद्रित माध्यमांकडं आहे. अशा काळात अग्रलेख बंद होणं वेदनादायी आहे.
आम्ही पत्रकारितेत काम करत असताना
उद्याचा अग्रलेख कोणत्या विषयावर असावा, यावर
संपादकीय बैठकीत गंभीर चर्चा व्हायची. कोणती बातमी केवळ ‘न्यूज’ न राहता ‘भूमिका’
मागते, याचा विचार केला जायचा. उद्याच्या अग्रलेखाच्या
शक्यतेतूनच एखाद्या वृत्तपत्राचा वृत्तनिवडीचा दृष्टिकोन तयार होत असे. आमच्यासारख्या
उदयोन्मुख पत्रकारांसाठी तो एक जिवंत वस्तुपाठ असायचा. अग्रलेख
लिहीण्याच्या प्रक्रियेत “बिटविन द लाइन्स” आणि “बियॉन्ड द लाइन्स” मांडणी करत
भविष्याचा वेध घेत वाचकांची मनोभूमिका त्या दृष्टीनं तयार करणं हे संपादकाचं खरं कसब.
त्या दृष्टीनं अग्रलेखाचं महत्त्व अनमोल. तेव्हापासूनच एडिट पेज, ऑप-एड पेज
वाचण्याची सवय आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.
माध्यमे आज कोणत्या प्रकारच्या ट्रांझिशन
फेजमधून जात आहेत, हे काही लपून नाही. कालच्याच पोस्टमध्ये ‘मीडिया विस्तारतोय, पत्रकारिता आक्रसतेय...’ हे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचं
स्टेटमेंट दिलं आहेच. त्यामुळं आपल्या विस्तार प्रसरणाच्या प्रक्रियेमध्ये
पत्रकारितेचा अवकाश संकुचित करण्याची आवश्यकता नाही. पण तरीही ते घडते आहे. माध्यमे
आज कोणाची ना कोणाची बाजू उचलून धरतात, हे वास्तव आहे. तटस्थ, त्रयस्थ किंवा
संतुलित भूमिकांचा काळ मागे पडलाय. पण, भूमिका घेण्याची आपली हक्काची जागा आज आपण
स्वतःहून गमावण्याचे कारण नाही. मात्र ते घडलं आहे. विवेकशील समाजाला दिशादर्शनाची
गरज असण्याच्या काळात अग्रलेखाच्या अस्तित्वाला नख लावलं जाणं, वेदनादायक आहे.
पत्रकारितेच्या अभ्यासात आणीबाणीच्या
काळातील एक प्रसंग विशेष आवर्जून सांगितला जायचा. काही वृत्तपत्रांनी आणीबाणीचा
आणि विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचाचा निषेध म्हणून अग्रलेखाची जागा
कोरी ठेवून अंक प्रकाशित केले. हजारो शब्दांनी जेजो विरोध नोंदविता आला नसता, तो नोंदविण्याचं
काम त्या कोऱ्या अग्रलेखांनी केलं होतं. ती कोरी जागा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या
गळचेपीविरुद्धची सर्वात प्रभावी संपादकीय भूमिका ठरली. आज असे
आदर्श इतिहासजमा झाले आहेत.
इतर दैनिकंही ना-अग्रलेखाच्या दिशेनं मार्गक्रमण करतील की काय, अशीही शक्यता वाटते. म्हणूनच आज केवळ अग्रलेखाच्या नसण्याचं दुःख नाही; तर, एखाद्या वृत्तपत्राचा संपादक ओळखला जातो, तोच मुळी अग्रलेखावरुन आणि त्यामध्ये त्याने मांडलेल्या भूमिकेवरुन अन् भूमिकेसाठी! आज जर अंकात अग्रलेखच नसेल, तर संपादकाचं त्या वृत्तपत्रामधील अस्तित्व काय? म्हणजे ही घटना केवळ अग्रलेखाचं अस्तित्वलोपन नाही, तर वृत्तपत्र जगतातील संपादकाच्या स्थानाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. भूमिका नसणारा संपादक हा मग या क्षेत्रातील केवळ कन्टेन्ट मॅनेजरच असेल काय, अशीही चिंता भेडसावते. माझी हळहळ अन् अस्वस्थता ही त्यापायीच आहे.
![]() |
| (ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर) |
कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये काल (दि. ६ मे २०२६) अनंत दीक्षित
स्मृती पुरस्कार आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कार यांचे वितरण झाले. ज्येष्ठ
पत्रकार पी. साईनाथ आणि युवा पत्रकार अभिजीत करंडे यांना अनुक्रमे हे पुरस्कार
प्रदान करण्यात आले. या समारंभाचा होस्ट म्हणून काम करण्याची संधी अनंत दीक्षित
स्मृती समितीने माझ्यावर सोपविली होती. या निमित्ताने पी. साईनाथ यांचे जे
व्याख्यान झाले, ते मी आजवर ऐकलेल्या भाषणांमधील सर्वोत्तम असावे. एक महान पत्रकार
जगाकडे, आपल्या भोवतालाकडे, त्या भोवतालामधील वंचित, शोषित, कष्टकऱ्यांच्या जगण्याकडे
कोणत्या दृष्टीने पाहतो, किंबहुना समाजाने कसे पाहावे, हे दाखविणारे मूर्तीमंत
उदाहरण म्हणजे साईनाथ सर. पत्रकाराने सरकारी पुरस्कार स्वीकारला, तर त्या सरकारचे
अंकित ठरून त्यांचे त्रुटीनिर्देश, चुका दाखविण्याच्या कामामध्ये कुचराई होऊ शकेल,
यामुळे आजवर एकही सरकारी पुरस्कार न स्वीकारणारा- म्हणजे अगदी पद्म
पुरस्कारही नाकारणारा हा पत्रकार. मात्र, पत्रकारांनी एका पत्रकार-संपादकाच्या
स्मरणार्थ पत्रकारांचा गौरव करण्यासाठी सुरू केलेला पुरस्कार म्हणून अनंत दीक्षित
पुरस्कार स्वीकारणारा अगदी प्रांजळ असाही हा पत्रकार!
माध्यमांच्या अनुषंगाने साईनाथ यांनी फार चांगली
निरीक्षणे नोंदविली आणि उपस्थित पत्रकारांना प्रोत्साहितही केले. मीडिया अँड
एन्टरटेनमेंट इंडस्ट्री आणि जर्नालिझम या दोन स्वतंत्र गोष्टी एकच असल्याचे
मानल्यामुळे आताच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मीडिया क्षेत्र प्रचंड गतीने
विस्तारत असताना त्या अवकाशामध्ये पत्रकारिता मात्र आक्रसत चालली असल्याची खंत
त्यांनी व्यक्त केली. मीडिया व एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीचा आजचा विस्तार हा २.७८
ट्रिलियन रुपये इतका प्रचंड आहे आणि ७ टक्के दराने त्याची वृद्धी होत आहे. एकीकडे
या उद्योगांत संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत, मात्र त्याचवेळी सन २०२० ते
२०२५ या पाच वर्षांच्या कालखंडात सुमारे २० हजार पत्रकार वेगवेगळ्या कारणांनी
बाहेर पडले किंवा काढले गेले. पत्रकारांनी भाट म्हणून काम करणे व्यवस्थेच्या हिताचे
असते. त्यासाठी सर्व तऱ्हेचे खेळ खेळले जातात. माध्यमे त्याला बळी पडल्याचे चित्र
एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे त्याचवेळी आजही ग्रामीण स्तरावर अनेक पत्रकार
वंचितांना आवाज प्रदान करण्यासाठीची पत्रकारिता करीत आहेत, फक्त मीडियाच्या
गदारोळात त्यांच्या आवाजाला मिळणारे स्थान नगण्य आहे. त्यामुळे तो दबला जातो. जर्नालिझममधील
‘जे’ हा जस्टीसचा आहे, सामाजिक न्यायाचा आहे.
त्यामुळे व्यापक समाजाला त्याला त्याच्या वाटणीचा न्याय मिळवून देण्यासाठी
पत्रकारितेने काम करीत राहायला हवे. ‘How do I sell my labour without
selling my soul?’ हा आजच्या पत्रकारांसमोरील कळीचा प्रश्न असला
तरी ते त्यातून निश्चित वाट काढत राहतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
साईनाथ यांचे आणखी एक वैशिष्ट्य मला भावले, ते
म्हणजे ते केवळ व्यवस्थेवर दोषारोपण करण्यात वेळ घालवत नाहीत. तर, वर्षातले २७०
दिवस शेतकरी, कष्टकऱ्यांत फिरून गावखेड्याचे, ग्रासरुटवरील वास्तव आकडे,
पुराव्यानिशी समोर ठेवतात. करेक्शन नेमके कुठे करण्याची गरज आहे, हे सांगत राहतात.
मग त्या आड येणाऱ्या धोरणांवर सडकून टीका करतात. या पद्धतीची आदर्श पत्रकारिता
आजही ते करीत असल्यामुळे ते आपल्या भाषणातून श्रोत्यांना संपूर्ण देशभरातील
शोषितांच्या वेदनांमधून फिरवून आणतात. त्यांच्या वेदना शमविण्यासाठी आपल्या
स्तरावर आणि शासकीय स्तरावर आवश्यक उपाययोजनांचे सूचन करतात. त्या सूचनामागे
त्यांची फार मोठी कळकळ शब्दाशब्दांतून पाझरत राहते आणि आपल्या हृदयाला हात घालते.
त्यातून आपल्यातला संवेदनशील माणूस जागा झाला, तर या पत्रकाराची ही कष्टकऱ्यांप्रतीची
तळमळ सार्थकी लागलेली असते. त्यांनी समाजाकडून अपेक्षा बाळगणे सार्थच आहे, पण
म्हणून तेवढ्यावरच न थांबता ते पुन्हा या आपल्या गावखेड्यांतल्या बांधवांच्या
वेदना वाटून घेण्यासाठी, त्यावर अभ्यास, संशोधन करून आपल्या पत्रकारितेच्या
माध्यमातून वेशीवर टांगण्यासाठी पुढे मार्गस्थ होतात. हीच बाब त्यांना समकाळातला
महान पत्रकार ठरविते.
(पी. साईनाथ यांनी काल ४५ मिनिटांचे भाषण केले. सभागृह अगदी स्तब्ध होऊन त्यांचे बोल कानात आणि हृदयात साठवत होते. मी तर इतका नादावून गेलो की, समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने त्यांना धन्यवादाचा प्रणिपात केला. कार्यक्रमानंतरही त्यांच्याशी काही वेळ हितगूज करण्याची संधी मिळाली. तेच हे क्षण आमचे ‘भाईजान’ डॉ. विनोद कांबळे यांनी कॅमेराबद्ध केले आहेत.)
| डॉ. प्रकाश पवार |
कोल्हापूर, दि. ४ मे: विज्ञानवादी विवेकनिष्ठ विचारसरणीचा प्रसार हा सामाजिक परिवर्तनासाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार आज केले.
आ’लोकशाही
वाहिनीवरील डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत ते ‘भारताचा विज्ञानवाद’ या
विषयावर बोलत होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतीय समाजातील अंधश्रद्धा, परंपरा
आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील संघर्ष अधोरेखित केला.
महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, राजर्षी
शाहू महाराज, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या
विचारांमधून विज्ञानवादी परंपरेचा विकास त्यांनी स्पष्ट केला. विवेकनिष्ठा, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगमच भारताच्या
प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
डॉ. प्रकाश पवार यांनी भारतीय
समाजरचनेतील विचारपरंपरा आणि वैज्ञानिक दृष्टी यांचा सखोल परामर्श घेतला. त्यांनी
सांगितले की, विज्ञानवाद म्हणजे केवळ तांत्रिक
प्रगती नसून ती एक जीवनदृष्टी आहे, जी
तर्क, प्रयोग आणि पुराव्यावर आधारलेली असते. भारतीय समाजात आजही अंधश्रद्धा, रूढी
आणि अवैज्ञानिक विश्वास यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे खऱ्या
अर्थाने प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणे गरजेचे आहे.
समाजातील शिक्षण, माध्यमे आणि सार्वजनिक संवाद यामध्ये
विज्ञानवादी विचार रुजविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्याख्यानादरम्यान त्यांनी विज्ञानवाद
आणि मानवी मूल्ये यांचा संबंध स्पष्ट करताना, वैज्ञानिक
दृष्टिकोन हा लोकशाही, समानता आणि मानवतावाद यांना बळकटी
देणारा घटक असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताच्या सर्वांगीण विकासासाठी
विज्ञानवादी विचारसरणी स्वीकारणे अपरिहार्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला.
यावेळी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला आणि आभार मानले.
--
सविस्तर व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
![]() |
| कोल्हापुरात गोविंदराव टेंबे सभागृहात 'कीर्तावणी'चा प्रयोग रंगला. सादरकर्ते ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे. |
‘कीर्तावणी-
वारी आडवाटंच्या विठोबाची!’ या
अतिशय नितांत सुंदर अशा सांगितिक प्रयोगाबद्दल एका वाक्यात सांगायचे झाल्यास, आजच्या
समाजाच्या नरडीला लागलेल्या विविध प्रकारच्या प्रक्षिप्ततेच्या विषमुळीवर जालीम प्रबोधनडोस
देणारा हा सर्वांगसुंदर सांगीतिक प्रयोग आहे, असे
मी म्हणेन.
माझे युवा मित्र स्वामीराज भिसे यांनी
हा प्रयोग करण्याची घोषणा केल्यापासूनच तो पाहण्याची मला मनापासून इच्छा होती.
कारण आजच्या काळात प्रबोधनासाठी तळमळीने झटणारा हा तरुण वाचनसंस्कृतीपासून
वक्तृत्वसंस्कृतीपर्यंत विविध उपक्रमांद्वारे नव्या पिढीत जागृती निर्माण करण्याचे
काम करत आहे. अशा अनेक उपक्रमांत वेळोवेळी सहभागी होण्याची संधी त्याने मला दिली
आहे. त्याखेरीज सचिन परब यांच्या ‘रिंगण’साठी रिपोर्ताज लिहीण्याच्या निमित्ताने
स्वामीराजने अनेक संतांच्या कार्यक्षेत्रांचा देशभरात फिरून धांडोळा घेतलेला आहे. त्यामुळेच
‘कीर्तावणी’मध्ये तो नेमके काय नवीन आणि अभिनव सादर करतो, याविषयी
उत्सुकता होती. इचलकरंजी येथील प्रयोग काही कारणांमुळे पाहता आला नव्हता; मात्र
कोल्हापुरातील शुभारंभाचा प्रयोग पाहण्याची काल संधी मिळाली. हर्षोल्हासाने मन
भरून आले अन् ऊर अभिमानाने दाटून आला.
आपल्या संतपरंपरेने महाराष्ट्रासह भारतभूमीला
दिलेले जे मूल्यसंपन्न देणे आहे, त्याचे नेमके स्वरूप या प्रयोगातून
प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबारायांपर्यंत सर्वच
संतांच्या शिकवणीचे साररुप जणू सादरकर्ते श्रोत्यांच्या काना-मनांत ओतप्रोत
भरण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्यांच्या मनावर गारुड करणाऱ्या चमत्कारप्रधान
संकल्पनांचेही वैज्ञानिक पद्धतीने निरूपण करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न या प्रयोगात
दिसतो. त्यामुळे हा प्रयोग खरोखरच वेगळ्या धाटणीचा ठरतो.
यात स्वामीराज यांना लेखिका-दिग्दर्शिका
ऋचिका खोत यांची केवळ साथ नाही, तर या प्रयोगाचा तोल सांभाळण्याची
मोलाची भूमिका अत्यंत दमदारपणे केली आहे. कीर्तन आणि बतवणी यांचा सुंदर संगम
साधत ही ‘कीर्तावणी’ प्रेक्षकांसमोर साकार होऊ लागते. त्यामध्ये रोध, अवरोध, प्रतिरोध
आणि गतिरोध यांचा विचारपूर्वक मेळ घालून संतपरंपरेचे महत्त्व विषद करणारा एक
प्रशस्त विचारमार्ग उभा केला आहे. ऋचिका खोत यांनी लेखन, दिग्दर्शन
आणि सादरीकरण या तिन्ही स्तरांवर कमाल केली आहे. त्यांच्या सादरीकरणातील वैविध्य, व्हॉइस
मॉड्युलेशन, नृत्य, गायन आणि प्रभावी वक्तृत्व
यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.
स्वामीराज आणि ऋचिका यांच्यातील ‘गिव्ह
अँड टेक’सह मंचावरील ऊर्जाभारित वावर विशेष उल्लेखनीय आहे. स्वामीराज यांनी आपल्या
बाळसेदार देहासह जोमदार उर्जेने केलेले नृत्य-गायनाचे लयबद्ध सादरीकरण पाहून थक्क
व्हायला होते. विशेष म्हणजे, भर उन्हाळ्यात पाण्याचा थेंबही न घेता
इतक्या ताकदीने हा प्रयोग सलग दोन तास सादर करणे हेच माझ्या दृष्टीने कौतुकास्पद
आहे. त्यामुळे कीर्तावणीसाठी ‘हॅट्स ऑफ’ याशिवाय दुसरा शब्द सुचत नाही.
‘कीर्तावणी’च्या निमित्ताने ऋषिकेश
देशमाने यांचेही विशेष कौतुक करावेसे वाटते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या किरण माने
यांच्या ‘स्टोरी
शिवराज्याभिषेकाची’सारख्या
विविध प्रयोगशील उपक्रमांमध्ये त्यांचा वाढता सक्रिय सहभाग असून, कोल्हापूरचे एक
आश्वासक संगीतदिग्दर्शक म्हणून ते पुढे येत आहेत, ही माझ्यासाठी आश्वासक बाब आहे.
प्रचंड पोटॅन्शियल आहे त्यांच्यात. त्याचे ते निश्चित चीज करतील, अशी अपेक्षा आहे.
प्रयोगाबद्दल अधिक तपशीलात लिहून
त्याची मजा कमी करावी, असे वाटत नाही; मात्र
प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा, असे निश्चितपणे सांगावेसे वाटते. आपण
वारकरी परंपरेचे अनुयायी असाल किंवा नसाल, तरीही
‘कीर्तावणी’चा अनुभव एकदा तरी घ्यावाच.
येथे मला विनायक होगाडे याचीही आठवण
येते. त्यांच्या ‘तुकोबा’
किंवा ‘विठोबा
मिसिंग’सारख्या कादंबऱ्यांतून त्यांनी संतपरंपरेचा आधुनिक संदर्भात घेतलेला वेधही असाच
नितांतसुंदर उल्लेखनीय आहे. या नव्या पिढीकडून होणारे हे प्रयोगशील ‘एक्सप्लोरेशन’
अत्यंत महत्त्वाचे आहे. जुन्या परंपरेला नव्या पद्धतीने सादर करताना त्यातील
ताजेपणा, सुसंगतता आणि आजच्या काळाशी ते घालू
पाहात असलेली सांगड खूप महत्त्वाची आहे.
समकालीन वास्तव कितीही गुंतागुंतीचे असले, तरी स्वामीराज, ऋचिका आणि विनायक यांसारखी तरुण मंडळी माणुसकीचा आणि मूल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ताकदीने करत आहेत, हे किती मोलाचे! काल ‘कीर्तावणी’चा २९ वा प्रयोग सादर झाला असला, तरी पुढे याचे अनेक प्रयोग व्हावेत आणि अधिकाधिक लोकांनी हा अनुभव घ्यावा, अशी अपेक्षा आहे. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर अंतर्मुख करणारा, विचारप्रवर्तक असा हा गंभीर प्रयोग आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून ही ‘कीर्तावणी’ अनुभवावी, असे आवाहन मी निश्चितपणे करेन.
![]() |
| डॉ. भालचंद्र काकडे |
![]() |
| डॉ. प्रकाश पवार |
कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
आणि निपाणीचे सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त
‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आली
आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे ‘भारताचा
विज्ञानवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. ४ मे २०२६
रोजी सायंकाळी ७.०० वाजता ‘आ’लोकशाही’ (@alokshahi)
या युट्यूब वाहिनीवरून हे व्याख्यान प्रसारित होणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ. आलोक जत्राटकर यांनी
दिली.
दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे
यांचा पाचवा स्मृतिदिन असून त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे.
‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयातून डॉ. पवार विज्ञाननिष्ठ विचारसरणी, समाजजीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय
परंपरेतील विवेकनिष्ठ प्रवाह यांचा परामर्श घेणार आहेत.
डॉ. प्रकाश पवार हे महाराष्ट्रातील
प्रख्यात राजकीय विश्लेषक असून त्यांनी राज्यातील सामाजिक-राजकीय घडामोडींवर सखोल
अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती
शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील त्यांचे चरित्रग्रंथ विशेष
गाजले आहेत. विविध माध्यमांमधून ते सातत्याने प्रबोधनपर लेखन व व्याख्याने देत
असतात. समकालीन राजकारण, इतिहास
आणि समाजरचना यांचा परस्परसंबंध उलगडून सांगण्याची त्यांची शैली अभ्यासकांमध्ये
लोकप्रिय आहे.
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही विज्ञान विषयाला वाहिलेली असून गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षवेधक व्याख्याने या व्याख्यानमालेत झाली आहेत. ही व्याख्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी प्रतिसाद देऊन ऐकली आहेत. सदर व्याख्यानमाला ‘आ’लोकशाही’ या युट्यूब वाहिनीवरून प्रसारित होणार असून प्रेक्षकांना @alokshahi या वाहिनीवर जाऊन त्यामध्ये सहभागी होता येईल. अगर पुढील लिंकद्वारेही सहभागी होता येईल.
https://youtu.be/z1CPpm8lL2k?si=78zLC8UgX225Eagw
कोल्हापूर, दि. २ मे: बौद्ध स्थापत्य हा भारतीय सांस्कृतिक वारशाचा
अमूल्य ठेवा असून त्याचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक
असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. कपिल राजहंस यांनी केले. डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आ’लोकशाही या वाहिनीद्वारे आयोजित बुद्ध जयंती
ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत ‘बौद्ध
स्थापत्य कला’ या
विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. राजहंस यांनी आपल्या भाषणात बौद्ध
स्थापत्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना सांगितले की, स्तूप, चैत्यगृह
आणि विहार ही केवळ धार्मिक स्थळे नसून बौद्ध तत्त्वज्ञान, समाजरचना
आणि ज्ञानपरंपरेची साक्ष देणारी केंद्रे आहेत. या स्थापत्य रचनांमध्ये
प्रतीकात्मकता, भूमितीय अचूकता आणि पर्यावरणाशी सुसंगत
नियोजन दिसून येते. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध स्थापत्याला मोठी चालना मिळाली
असून देशभर उभारण्यात आलेले स्तूप आणि शिलालेख हे त्या वैभवाचे द्योतक आहेत. या
वारशामुळे भारताची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याच्या काळात नागरीकरण, दुर्लक्ष
आणि अपुऱ्या संवर्धनामुळे अनेक बौद्ध वारसा स्थळे धोक्यात आली आहेत, याबाबत
डॉ. राजहंस यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासन संस्था, पुरातत्त्व
विभाग, संशोधक आणि स्थानिक नागरिक यांनी समन्वयाने काम
करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नव्या पिढीमध्ये या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल
जागरूकता निर्माण करणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश
करणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून संवर्धनाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी
सांगितले. बौद्ध स्थापत्य हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून मानवी मूल्ये, शांती
आणि सहअस्तित्वाचा संदेश देणारा जिवंत वारसा आहे, असेही
राजहंस यांनी सांगितले.
डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला आणि आभार मानले.
--