मंगळवार, १० मार्च, २०२६

कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीतील तारकादळ विद्यापीठात अवतरते तेव्हा...

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत (डावीकडून) प्रिया सरीकर, आरजे स्नेहा, आरजे रसिका, डॉ. आलोक जत्राटकर, शुभांगी तावरे, अनुराधा सरनाईक-कदम, इंदुमती गणेश आणि श्रद्धा जोगळेकर.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाच्या मुशीतून घडलेलं कोल्हापूर. इथं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं यशाची कमान निर्माण करणाऱ्या आणि उंचावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी नाही. स्त्री-सन्मान, स्त्रियांना समतापूर्ण सौहार्द लाभावा, यासाठी अनेक कायदेकानू करून तिची प्रतिष्ठा कायम करणाऱ्या या राजर्षींच्या वारशामुळं आजही कोल्हापुरात स्त्रिया आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालताना दिसतात. कोल्हापूरची वृत्तपत्रसृष्टी सुद्धा त्याला अपवाद नाही. फिल्डवर पुरूषांच्या बरोबरीनं आत्मविश्वासानं वावरणाऱ्या, किंबहुना कित्येकदा त्यांच्याहून काकणभर सरस कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारांची इथं कमी नाही. आज फिल्डवर, डेस्कवर आणि डिजीटल अशा मिळून साधारण पन्नासेक महिला, मुली कोल्हापूर शहरात कार्य़रत असतील. यातील अनेकींची कारकीर्द २० वर्षांहून अधिक काळची सुद्धा आहे. तसे पाहता कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीत स्वयंतेजाने तळपणाऱ्या या अशा तारका आहेत ज्या आजच्या युवा वर्गासाठी सच्च्या आयडॉल ठराव्यात.
सध्या शिवाजी विद्यापीठात प्रभारी प्र-कुलगुरूपदाची धुरा ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव यांच्याकडं आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठाला महिला प्र-कुलगुरू लाभलेल्या आहेत. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं या महिला पत्रकारांना विद्यापीठात आमंत्रित करावं आणि प्र-कुलगुरू मॅडमचा त्यांच्याशी औपचारिक, अनौपचारिक संवाद घडवून आणावा, अशी एक आंतरिक इच्छा मनी होती. ती १० मार्चच्या सायंकाळी फलद्रुप झाली. पत्रकारितेमध्ये ‘ड्युटी फर्स्ट’ हाच मूलमंत्र जपावा लागत असल्यानं अनेक महिला पत्रकार त्यांच्या असाईनमेंट्स, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळं उपस्थित राहू शकल्या नाहीत. तथापि, काही जणी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिल्या. नावंच सांगायची झाल्यास, इंदुमती गणेश, अनुराधा कदम-सरनाईक, प्रिया सरीकर, शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर, आरजे रसिका आणि आरजे स्नेहा. यातल्या प्रत्येकीनं स्वतःच्या कामाचा ठसा कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. तसं पाहता, त्या या फिल्डमधल्या खऱ्या स्टार आहेत. इंदुमती गणेश या मैत्रिणीच्या धाडसी पत्रकारितेला सलाम करीत असताना मी यापूर्वी स्वतंत्र पोस्ट लिहील्याचं आपल्याला स्मरत असेलच. तिच्यासह अनु, प्रिया, शुभांगी, श्रद्धा या प्रत्येकीचा पिंड वेगळा, कामाची पद्धत वेगळी असं असलं तरी सिन्सिरिटीच्या बाबतीत त्या साऱ्या सरस आहेत, कदाचित पुरूषांपेक्षाही अधिक. त्यामुळं त्यांच्या बायलाईन बातम्या आवर्जून वाचणारे वाचक आढळतात. तीच परिस्थिती आरजे रसिका आणि स्नेहा यांची. स्थानिक एफएम वाहिनीच्या माध्यमातून या दोघींचे आवाज प्रत्येक रेडिओ श्रोत्याला अतिशय चिरपरिचित असलेले. अतिशय संयमी, अभ्यासू आणि संदर्भांनी परिपूर्ण असे अनेक कार्यक्रम त्या सादर करतात. या निमित्ताने त्याही प्रथमच विद्यापीठात आल्या. या सर्वांमध्ये आणखी एक महत्त्वाचा धागा होता, तो म्हणजे त्या सर्व जणी शिवाजी विद्यापीठाच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे या चर्चेला एक वेगळीच आपुलकीची किनार होती.
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी या संवादासाठी साधारण अर्धा तासाची वेळ दिलेली होती. पण त्यांच्यात आणि या सर्व पत्रकार मैत्रिणींमध्ये संवाद असा काही रंगला की दीड तास कधी उलटून गेला, तेही समजले नाही. गंमतीचा भाग म्हणजे या साऱ्या जणींना मॅडमच्या संशोधनाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते, तर मॅडमना पत्रकारिता करीत असताना त्यांना येणारी आव्हाने, भेडसावणाऱ्या समस्या, समाज आणि सहकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक इत्यादी गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे होते. आणि त्या पद्धतीने अत्यंत अनौपचारिकपणे हा संवाद घडत गेला, उलगडत गेला. अंती साऱ्यांच्याच चेहऱ्यावर एक उत्तम भेट झाल्याचा आनंद झळकला. आणि मला लाभले एक चांगला संवाद घडवून आणल्याचे समाधान!!!

सोमवार, ९ मार्च, २०२६

समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती या विषयावर बोलताना...





परिसंवादादरम्यान डॉ. आलोक जत्राटकर यांच्या विविध भावमुद्रा

(डॉ. आलोक जत्राटकर यांचे सविस्तर व्याख्यान येथे ऐका.)


ईश्वरपूर इथं झालेल्या ३० व्या साहित्य संमेलनात आमचे मार्गदर्शक मित्र आणि मराठी अधिविभागाचे डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 'आजचे साहित्य, समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती' या विषयावरील परिसंवादात सविस्तर मांडणी करण्याची संधी लाभली. सोबत समुपदेशक अर्चना मुळ्ये याही सहपरिसंवादक होत्या.
आज समाजमाध्यमांनी साहित्याच्या प्रसारात मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक, ब्लॉग आणि ऑनलाइन वाचनगटांमुळे साहित्यिक चर्चा अधिक व्यापक झाल्या आहेत. पूर्वी साहित्यिक चर्चा मुख्यतः नियतकालिके, परिसंवाद किंवा साहित्य संमेलनांपुरत्या मर्यादित असत. आज मात्र कोणताही वाचक सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू शकतो. यामुळे साहित्याभोवती लोकशाही स्वरूपाचा संवाद निर्माण झाला आहे.
नव्या डिजीटल युगात वाचनाचे स्वरूप बदलते आहे. नव्या पिढीचे वाचनाचे फॉर्म्स आणि रूची वेगळी आहे. मात्र, ती वाचत नाही, असे म्हणता येणार नाही. पुस्तक मेळ्यांमधील लाखो रूपयांची उलाढाल, लिट-फेस्टसारख्या उपक्रमांना तरूणांचा लाभणारा प्रतिसाद हे त्याचेच निदर्शक आहे.
पारंपरिक मुद्रित पुस्तकांबरोबरच डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. आज अनेक लोक दीर्घ कादंबऱ्यांपेक्षा लघुलेखन वाचणे पसंत करतात. वाचन ही आज सामूहिक चर्चेची प्रक्रिया बनली आहे. यातूनही अनेक सृजनात्मक साहित्यकृती निर्माण होत आहेत.
लेखन-वाचनापूर्वी अस्तित्वात असणारी श्रवण संस्कृती ही आता डिजीटल युगात पुनरुज्जीवित झाली असून स्टोरीटेल, ऑडिबल, कुकू इत्यादी प्लॅटफॉर्मवर आता पुस्तके ऐकण्याकडे कल वाढला आहे. जागतिक १५० अब्ज डॉलरच्या पुस्तक बाजारात १० अब्ज डॉलर इतका वाटा या ऑडिओ बुक्सचा आहे. या श्रवण संस्कृतीमध्ये स्मरण संस्कृतीचा मात्र ऱ्हास होत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे.
आज वाचनसंस्कृती एका संक्रमणाच्या टप्प्यात आहे. परंपरागत मुद्रित पुस्तकांची परंपरा अजूनही जिवंत आहे, परंतु डिजिटल माध्यमांमुळे वाचनाचे नवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. म्हणून आजचा प्रश्न “वाचनसंस्कृती टिकेल का?” असा नाही. खरा प्रश्न असा आहे—आपण वाचनसंस्कृतीला नव्या तंत्रज्ञानाशी कसे जोडणार? जर आपण परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधू शकलो, तर वाचनसंस्कृती अधिक व्यापक आणि समृद्ध होईल.
वाचन ही केवळ सवय नाही; ती संस्कृती आहे. वाचन ही केवळ माहिती नाही; ती विवेकी विचारांची निर्मिती आहे.
आणि विवेकवादी विचार करणारा समाजच आपल्या भविष्याचा खरा शिल्पकार असतो.
उपरोक्तप्रमाणे साधारणतः चाळीसेक मिनिटे मांडणी केली. समाजमाध्यमांवर सुरू असलेले वाचनसंबंधित उपक्रम, प्रत्यक्ष फिल्डवर सुरू असणारे उपक्रम यांचाही वेध घेतला.
महत्त्वाचे म्हणजे माझ्या या मांडणीचे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्रज्ञा दया पवार यांनीही कौतुक केले, ही माझ्यासाठी 'ट्रॅक'वर असल्याची पोचपावती. अनेक श्रोत्यांनीही स्वागत केले.
एकूणच, परिसंवाद चांगला रंगला आणि एका चांगल्या उपक्रमात सहभागाचे समाधानही देऊन गेला.

रविवार, ८ मार्च, २०२६

बाबा भारती यांच्या स्मृतींना पुरस्कार अर्पण!




माझे अण्णा ए.दा. कांबळे (गुरूजी), भन्ते दीपंकर आणि बाबा भारती.


(पुरस्कार प्रदान समारंभाची लघुचित्रफीत)



ईश्वरपूर (इस्लामपूर) येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या मराठी साहित्य संमेलनात काल (दि. ८ मार्च) संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते माझ्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित संग्रहाला लोकनेते राजारामबापू राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार-२०२५ प्रदान करून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी उद्घाटक सु. धों. मोहिते, स्वागताध्यक्ष प्रा. शैलजा यादव-पाटील, कार्यकारिणी अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी, प्रा. सुनील पाटील, सुभाष खोत, दशरथ पाटील, धर्मवीर पाटील आदींसह ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील, एकनाथ पाटील, रमजान मुल्ला, डॉ. शामसुंदर मिरजकर, चित्रकार अन्वर हुसैन, माझे मित्र डॉ. मुजफ्फर मुल्ला, विनायक ठोंबरे आदी उपस्थित होते.
हा पुरस्कार अत्यंत विनम्रतापूर्वक स्वीकारतानाच तो मी इस्लामपूरचे बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक कालकथित जगन्नाथ विष्णू तथा बाबा भारती यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण केला. बाबा भारती हे माझ्या आण्णांचे (आजोबा) अत्यंत जवळचे मित्र होते. दोघेही ‘राष्ट्र भाषा रत्न’ होते. त्यांच्या या स्नेहामुळे माझ्यासाठी ते ‘इस्लामपूरचे भारती आजोबा’च होते. त्यांचा पाली-मराठी शब्दकोष हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आला असून पाली भाषेच्या विशेषतः बौद्ध साहित्याच्या अभ्यासकांच्या तो आवर्जून संग्रही आहे. त्याखेरीज बाबा भारती यांनी समग्र बौद्ध संस्कार विधी सर्वसामान्य लोकांना समजावेत म्हणून अत्यंत गेयतापूर्ण मराठीत सादर केले. धम्मपदाचेही त्यांनी अत्यंत रसाळ आणि ओघवत्या मराठीत पद्यानुवाद केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशक माझे आजोबा आहेत. तर, त्याचे प्रकाशन इस्लामपूरमध्येच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
पाली भाषेच्या शब्दकोषाचे काम सुरू असताना दर शनिवारी शाळा सुटली की, भारती आजोबा सांगलीत आण्णांकडे येत. तेव्हा मी सांगलीतच शिकायला होतो. आजोबा आले की, जेवून हे दोघे पुस्तकाविषयी चर्चा करायला बसत. सायंकाळपर्यंत चर्चा चाले. शनिवारी सांगलीचा आठवडी बाजार असे. दोघे आवरुन बाजारात जात. भाजीपाला खरेदी करून त्या पिशव्यांसह जो कोणता नवा चित्रपट त्यावेळी लागलेला असेल, तो चित्रपट पाहात. चित्रपट पाहून झाला की घरी येत. जेवण झाले की पुन्हा रात्री उशीरापर्यंत चर्चा करीत बसत. रविवारी आईबाबा, मावश्या, मावसभाऊ वगैरे येत असत. बहुतेकदा सामिष भोजनाचा बेत असे. बरोबर बाराच्या भोंग्याला जेवायला बसत सारे. तासाभरात जेवण झाले की हे दोघे मित्र पुन्हा पुस्तकावर सायंकाळपर्यंत पुन्हा चर्चा करीत. पाच वाजता भारती आजोबा इस्लामपूरला परत जात आणि आजोबा बाजारात. अनेकदा मी त्यांच्या या चर्चांचा साक्षीदार झालो आहे. फारसं काही समजण्याचं ते वय नव्हतं, मात्र एखाद्या विषयावर, शब्दावर हे दोघे तासंतास कसे काय बरे चर्चा करू शकतात, याचे मला कुतूहल, त्याहूनही अधिक मौज वाटे. मी आण्णांच्या नाही तर भारती आजोबांच्या मांडीवर बसूनच ऐकत असे. रात्री त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतही असे. या दोन आजोबांचा सहवास मला खूप प्रिय होता. ते माझे लाडही खूप करायचे. त्यांच्याबरोबर मी अनेक चित्रपट पाहिले होते. एकदाच फक्त एक सस्पेन्स चित्रपट पाहिला होता. (बहुधा, ‘कब? क्यूँ? और कहाँ?’ असावा.) खूप घाबरलो होतो. त्यापुढचे दोन तीन आठवडे मी काही त्यांच्याबरोबर बाजारात गेलो नव्हतो.
पुढे मी कागलला आईवडिलांकडे आलो. तथापि, भारती आजोबा तिकडेही आम्हाला भेटायला येत. सांगलीइतक्या सातत्यानं भेटी होत नसल्या तरी भारती आजोबांविषयीचं प्रेम मात्र कायम मनात आणि सोबत राहिलं. आम्ही निपाणीचं घर बांधायला काढलं तेव्हा भूमीपूजनाला ते उपस्थित होते. मात्र, बांधून पूर्ण होण्याआधीच भारती आजोबांचं निधन झालं.
त्यांच्या अनेक स्मृती मनात आहेत. आजोबांच्या जलदान विधीनंतर प्रथमच काल मी इस्लामपूरला आलो होतो. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. ‘बाबा भारती सदन’ असे नाव दिले आहे घराला. त्यांचे पुतणेच केवळ भेटले. मुले बाहेरगावी असल्याने भेट होऊ शकली नाही. कालचा दिवस आजोबांच्या स्मरणरंजनात गेला. त्यांचे साहित्य, त्यांच्या आठवणी सोबत आहेत, हेच आयुष्यातील एक महत्त्वाचे संचित आहे. म्हणूनच त्या भूमीतील पुरस्कार त्यांच्या स्मृतींना अर्पण करीत असताना मनाला अतीव समाधान वाटते आहे.
(पुरस्कार छायाचित्र सौजन्य: विनायक ठोंबरे, मोतीराम पौळ)

पुरस्कार प्रदान समारंभाचा व्हिडिओ: https://youtu.be/xpxJKKl-wvc


मंगळवार, ३ मार्च, २०२६

माझ्या संस्कृतमाता ‘जेपीके’ मॅडम!

 

ज्योती प्रकाश कुलकर्णी

मित्र-मैत्रिणींनो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक अस्वस्थ दिवसांपैकी एक. याचे कारण म्हणजे ज्यांनी माझ्यावर निरतिशय प्रेम केले, त्या माझ्या संस्कृतच्या शिक्षिका, नव्हे, माझ्या संस्कृतमाता आदरणीय ज्योती प्रकाश कुलकर्णी अर्थात आम्हा विद्यार्थ्यांच्या लाडक्या जेपीके मॅडम यांचे अचानकपणे निधन झाल्याची वार्ता आज माझे काळीज चिरुन गेली. वयाच्या ७० व्या वर्षी तशी कोणतीही हिस्टरी नसताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्या गेल्या. आज दिवसभरात मॅडमच्या सान्निध्यातील अनेक स्मृती मनात गर्दी करून उभ्या आहेत. त्या कागदावर उतरल्याखेरीज या दुःखाचा भार हलका होणे नाही. म्हणून हा लेखनप्रपंच.

मॅडमचा मुलगा, माझा वर्गबंधू किरण याला गेल्या वर्षी मी माझे निखळ: जागर संवेदनांचा हे पुस्तक भेट दिले. ते घरी गेल्यावर त्याने मॅडमना दाखवले, तर मॅडमनी ते रात्रीत वाचून काढले आणि दुसऱ्याच दिवशी मला व्हिडिओ कॉल केला. खूप वेळ गप्पा मारल्या. नेहमीसारख्या प्रसन्नचित्त होत्या, जणू काही कालच निवृत्त झाल्या असाव्यात. माझं त्यांनी खूप कौतुक केलं, अभिमान व्यक्त केला आणि भेटायला ये निवांत एकदा, असं म्हणाल्या. मी खरंच खूप गांभीर्यानं हो म्हणालो, पण ते जमवू शकलो नाही. अवघं पाऊण तासाचं अंतर मी वर्षभरात कापू शकलो नाही. आज मॅडम गेल्यानंतर मात्र तितक्याच वेळात किरणला भेटायला पोहोचलो. मित्रांनो, माझं एकच सांगणं की, आपण या अनिश्चिततेच्या जगात आपल्या आपुलकीच्या माणसांना भेटत राहिलं पाहिजे. अन्यथा, आयुष्यभराची बोच सोबत घेऊन जगावं लागतं- जी मला आज सलते आहे.

जेपीके मॅडम यांच्याशी माझं खूप वेगळं नातं होतं. मोहनलाल दोशी विद्यालयात त्या माझ्या संस्कृतच्या गुरू खऱ्याच; पण, त्याही आधी त्या माझ्या लतामावशी होत्या. याचं कारण असं की, कागल विद्यालयाच्या (सध्याचं यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल) तत्कालीन मुख्याध्यापिका डिंगणकर बाई यांच्या त्या कन्या. आई त्या शाळेत शिक्षिका. बाईंमुळं जेपीके मॅडमची आणि आईची मैत्री. घरी येणं-जाणं. त्यामुळं त्या लहान वयात त्या माझ्या लतामावशी. पुढं अनेक वर्षांनी निपाणीत माझ्या शिक्षिका झाल्या. पण, त्यांचं माझ्यावरचं प्रेम मात्र तसंच.

नववीला मी निपाणीच्या मोहनलाल दोशी विद्यालयात प्रवेश घेतला. तिथं संस्कृत विषय आठवीपासून होता. पण माझ्या पूर्वीच्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये संस्कृत विषय नसल्याने माझा हिंदी विषय होता. इथे संस्कृत आहे म्हटल्यावर पूर्ण शंभर गुणांचे संस्कृत शिकायची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. पण मागील वर्षी काहीच न शिकल्याने हिंदी-संस्कृत असा प्रत्येकी ५० गुणांचा जोडविषय घेतला. माझी ही संस्कृतची ओढ लक्षात आल्यानं जेपीके मॅडमनी माझे आठवीचे संस्कृत तीन महिन्यांत करवून घेण्याचे ठरविले. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जायचो. स्वयंपाकपाणी करता करता त्यांनी मला मोफत संस्कृत शिकविले, व्याकरणाचा पाया पक्का करून घेतला. दोनेक महिन्यांतच त्यांनी मला इतरांच्या बरोबरीने आणून ठेवले. पुढेही दहावीपर्यंत आम्ही किती तरी मुलं त्यांच्या घरी शिकायला जायचो. पण, मॅडमनी कधी आमच्याकडून एक पैही शुल्क घेतले नाही. इतक्या निरलसपणाने त्यांनी संस्कृत भाषेची सेवा केली. आजच्या शिक्षकांच्या दृष्टीनं मोफत शिकविणाऱ्या जेपीके मॅडम वेड्याच ठराव्यात. पण मॅडमनी तसं वेडं असणं स्वीकारलं होतं. मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. त्यापोटी त्यांची सारी धडपड होती. शाळेच्या चार भिंतींच्या पलिकडलं शिक्षण देण्यासाठी आसुसलेलं मन त्यांच्याकडं होतं. त्यांच्या या शिकवण्यामुळंच पुढं बारावीपर्यंत शंभर मार्कांचं संस्कृत घेण्याचं धाडस मनी निर्माण झालं. त्या अर्थानं त्या माझ्या संस्कृतमाताच होत्या.

त्यांनी केवळ मला संस्कृत शिकवलं, असं नाही. तर, शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून सहभागी होण्याबरोबरच त्यांचं संचालन करण्याची संधीही त्यांनी त्या दोन वर्षांत मला दिली. अगदी गॅदरिंगच्या सूत्रसंचालनाचीही. त्या काळात त्यांनी नाटक, काव्यवाचन, गीतगायन यांसह मला तर कथाकथन करण्यासाठीही प्रोत्साहन दिलं. शंकर पाटील यांच्या दोन कथा त्यांनी माझ्याकडून बसवून घेतल्या आणि शाळेत त्या कथाकथनाचा एक स्वतंत्र कार्यक्रमही घडवून आणला होता. या साऱ्या प्रेरणा आजही माझ्या आत कुठंतरी सातत्यानं जिवंत आहेत. कारणीभूत केवळ जेपीके मॅडम.

सदैव हसतमुख, कधी कोणावर चिडणं नाही, रागावणं नाही की ओरडणं नाही. अगदी त्यांना एखाद्याला रागे भरावंसं वाटलं तरी तो राग लटकाच ठरे. फार काळ न टिकणारा. हसणं अगदी दिलखुलास आणि मनमुराद. निर्मळ आणि वात्सल्यानं ओतप्रोत. हे प्रेम पुढंही आम्हाला लाभत राहिलंच. माझ्या लग्नानंतर आम्हा नवदांपत्याला आवर्जून घरी बोलावून त्यांनी स्नेहभोजनाचा बेत रंगवला. प्रकाशकाका सुद्धा अत्यंत हसतमुख आणि दिलखुलास माणूस. थट्टामस्करी, क्वचित थोडे उपरोधिक चिमटे घेत पण बोचणार नाही असं बोलणं. या दोघांसोबत बसलं की, बोलणं कमी आणि पोटभर हसणंच होत असे. ते पुढच्या भेटीपर्यंत निश्चित पुरत असे.

इथून पुढं मात्र त्यांचं हसणं, असणं हे सारं आता स्मृतींच्या स्वरुपातच जपायचं. अशी माणसं आपल्याला दीर्घकाळ हवी असतात. काळाकडे मात्र त्या दीर्घाची लांबी कमीअधिक करण्याची ताकद असते. म्हणून माणसं असतानाच त्यांचं अस्तित्व साजरं करणं महत्त्वाचं असतं. अन्यथा, दुःखाखेरीज पदरी काही पडत नाही. काळच त्यावर औषध, पण अशा जखमांच्या खुणा मनावर कायम राहतात. त्याला कोणी काही करू शकत नाही. अशी माणसं, असे शिक्षक आता पुन्हा होणे नाहीत.

जेपीके मॅडमना भावपूर्ण श्रद्धांजली!

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला

राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

डॉ. आलोक जत्राटकर
 
ब्लॅक व्हाईट अन् ग्रे पुस्तकाचे मुखपृष्ठ


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय-२०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी यांनी नुकतीच पुरस्कारांची घोषणा केली.

डॉ. जत्राटकर यांचा ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे हा ललित लेखसंग्रह कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये मानवतावादाच्या सूत्रामध्ये गुंफलेल्या निवडक ३० लेखांचा समावेश आहे. व्यापक जागतिक समुदायामध्ये मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा आग्रह या लेखनामागे आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.

डॉ. जत्राटकर यांची निखळ: जागर संवेदनांचा, समाज आणि माध्यमं ही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि ध्यास फाऊंडेशन, पलूस आदी संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कारही लाभले आहेत.









मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

कंघा बुढा हो गईल बा..!

माझ्या लाडक्या राऊंडरला 'एआय'नं अशी छान बॅकग्राऊंड दिलीय.


गेल्या ३५ वर्षांची त्याची माझी साथ... मी जिथे जाईन, तिथे या सर्व काळात तो माझ्यासोबत आहेच. त्याचा मला आणि माझा त्याला स्पर्श झाला नाही, आम्ही एकमेकांकडे पाहिले नाही, असा एकही दिवस गेला नाही. माझ्या बऱ्यापैकी दिसण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा. मात्र, आता त्याच्या आयुष्याची उतरण सुरू झालीय. त्याचे केस आता पिकू लागलेत, गळू लागलेत, विरळ होऊ लागलेत. त्याच्या म्हातारपणाच्या चाहुलीने जीव अस्वस्थ झालाय. त्याची जागा घेईल, असा दुसरा जोडीदार मला यापुढील काळात लाभेल की नाही, अशी शंका अस्वस्थता वाढवतेय. त्याच्यापेक्षा भारी मिळतील कदाचित, पण त्याच्यासम भेटण्याची शक्यता फारच कमी वाटते आहे. त्यामुळेच त्याच्या वृद्धापकाळाने मी अधिक अस्वस्थ झालो आहे. त्याची साथसंगत जितकी लांबविता येईल, तितकी त्याचा प्रेमभराने सांभाळ करून वाढविण्याचा माझा प्रयत्न आहेच, पण विरहाचा तो दिवस कधी तरी येणारच, हा विचार क्लेषकारक आहे.

मित्र-मैत्रिणींनो, १९९२ साली माझ्या आयुष्यात आलेल्या राऊंडर-कम्-कंगव्याच्या दुराव्याच्या असहनीय कल्पनेपोटी वरील वाक्ये मनात येताहेत. आताच्या जेन-झी किंवा त्या आधीच्या एक-दोन पिढ्यांमध्ये मूव्ह-ऑनचा ट्रेंड असल्यानं त्यांना आम्हा एक्सवाल्यांची ही तगमग लक्षात येणार नाही. एका नजरेमध्ये प्रेम आणि एखाद्या वॉट्सअप मेसेजवर ब्रेकअप आणि पुन्हा भेटून ते ब्रेकअप सेलिब्रेट करण्याच्या काळामध्ये आम्हा गयागुजऱ्या पिढीची भावनिक गुंतवणूक पराकोटीची असते, याची कदाचित कल्पना तुम्हाला येणार नाही. अगदी प्रियकर-प्रेयसी ही खूपच मोठी गोष्ट झाली, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये (कदाचित विनाकारणही) जीव गुंतवून बसण्याची, जीव लावण्याची सवय (किंवा खोड) हा आमच्या पिढीचा अंगभूत गुण असावा, असं वाटतं. त्या काळात प्रेमात यशापेक्षा प्रेमभंगाचंच शल्य वाट्याला अधिक येत असे, त्यावेळी तू नहीं तो और सही, म्हणत बसण्यापेक्षा त्या प्रेमभंगाचं दुःख कुरवाळत बसण्यात, तिच्या अगर त्याच्या आठवणींत रमण्यात आम्हाला अधिक आनंद (?) वाटे. त्या जखमेवरची खपली सतत काढून त्या बोचऱ्या वेदना पुनःपुन्हा अनुभवण्यामध्ये अधिक सुख वाटे. तसंच आयुष्यात आलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या भौतिक-अभौतिक गोष्टींमध्येही जीव गुंतवण्यात आम्हाला कोण आनंद असे. म्हणजे सायकलच्या कीचेनपासून ते अखंड सायकलपर्यंत, एखाद्या शर्टापासून ते अगदी कंगव्यापर्यंत!

तर, अशाच माझ्या आयुष्यात एका अवचित क्षणी दाखल झालेल्या कंगव्याची ही गोष्ट. आजकाल मुलांचे केस लहानपणापासूनच लांब ठेवण्याकडे बहुतांश आईवडिलांचा कल दिसून येतो. पण, हमारे जमाने में... बाबा दर पंधरा दिवसांनी केस कापायला घेऊन जायचेच. कागलमध्ये असताना शिवाजी आणि शहाजी या बंधूंकडे तर नंतर निपाणीत नामांकित नामा यांच्याकडे... म्हणजे अगदी कसाबसा भांग पडेल, इतकेच, केस डोईवर असत. त्यामुळं केस लांब वाढवण्याचं एक प्रकारचं ऑब्सेशन मनात होतं. पण, धाडस होत नव्हतं. अखेरीस नववी-दहावीच्या टप्प्यावर अभ्यासाचं कारण पुढं करून पंधरा दिवसांचं कटिंग महिनाभरापर्यंत लांबवण्यात यश मिळवलं. आता या वाढत्या केसांची निगा राखायची तर एखादा राऊंडर हाताशी असावा, अशी भावना मनात मूळ धरून होती. त्यावेळी निपाणीत नव्यानं सुरू झालेल्या जनता बझारमध्ये एका ट्रेमध्ये मला हवा तसा राऊंडर दिसलाही. पण, इतर कंगवे एक-दोन रुपयांना मिळत असताना सतरा रुपये ही त्याची किंमत खूपच जास्त होती. त्यामुळं बाबांना विचारायचं धाडस होत नव्हतं. असेच अनेक दिवस गेले.

त्यानंतर झालं असं की, बाबांना जोधपूर-राजस्थानला २१ दिवसांच्या रिफ्रेशर कोर्सला जायचं होतं. त्यामुळं त्या कालावधीत घरी लागणारं वाणसामान तसंच इतर घरखर्चासाठी बाबांनी काही रक्कम माझ्याकडं देऊन ठेवली. आईची शाळा कागलला असल्यामुळं तिला अप-डाऊन करावं लागत असे. त्यामुळं तिला घरी यायला उशीर होईल. तशात अनुपही लहान होता. त्याचं आजारपण, दवाखाना कधीही उद्भवत असे. असा सारा विचार करून बाबांनी ही खर्चाची जबाबदारी माझ्याकडं सोपवलेली. मी सुद्धा अगदी इमानदारीत खर्च केलेल्या प्रत्येक पै न पैचा हिशोब एका डायरीत अगदी दिवसनिहाय मांडून ठेवत असे. बाबांचा परत येण्याचा दिवस जवळ आला, तसा त्या पैशातून थोडा स्वार्थ साधण्याचा विचार माझ्या मनात आला. आणि १९९२ मधल्या फेब्रुवारीमध्ये जनता बझारमधला १७ रुपयांचा पॉलिश्ड लाकडी चौकोनी मुठीचा तो राऊंडर माझ्या वाणसामानासोबत घरी आला. आणि हो, आपण इमानदारीत त्याची नोंद हिशोबात केली सुद्धा बरं! बाबा परतल्यानंतर त्यांच्यासमोर हिशोबाची वही सादर केली, शिल्लक रक्कम त्यांच्या हाती परत दिली आणि या राऊंडरच्या खरेदीची बाबही त्यांना सांगितली. त्यावर त्यांनी १७ रुप्पयाचा कंगवा!’ एवढीच प्रतिक्रिया दिल्याचं आठवतंय. बाकी काही बोलले नाहीत. ते समाजशास्त्राचे असल्यामुळं असावं, पण पोर आता वयात येतंय, अशा गोष्टी होणार, हे त्यांनी गृहित धरलं असावं.

तर, अशा तऱ्हेनं हे राऊंडर महोदय, माझ्या आयुष्यात दाखल झाले. तेव्हापासून आजतागायत माझ्या केशभूषेची समग्र जबाबदारी त्यांनी एकहाती लीलया पेललेली आहे. आजवर आयुष्यात खोबरेल तेलाखेरीज इतर कुठलंही प्रसाधन मी वापरलेलं नाही. मात्र, आंघोळीनंतर पहिली केशभूषा या राऊंडरनं केल्याशिवाय मला केस विंचरल्यासारखं वाटतच नाही. गेली पस्तीसेक वर्षे हा राऊंडर माझा साथीदार म्हणून माझ्यासोबत सर्वत्र संचारकर्ता आहे. पुण्याला आयआयटीच्या क्लासला गेलो, तिथं सोबत होताच, कोल्हापूरला हॉस्टेलवर माझ्यासह अनेक मित्रमंडळींच्या डोक्यावर याचा मायेचा हात फिरलेला आहे. मुंबईला गेलो, तिथेही हा सोबत होताच, पुन्हा आता करवीरनगरीतही सोबत आहेच. माझ्या अगदी एखाद्या दिवसाच्या दौऱ्यामध्येही हा मला सोबत लागतोच. त्याशिवाय, अस्वस्थ व्हायला होतं.

मध्ये एकदा सम्यकच्या हातून पडून त्याच्या मुठीचे दोन तुकडे झाले. पण तोवर फेव्हीक्विक नावाचं जालीम अडेजिव्ह बाजारात आलेलं होतं. त्यामुळं लगोलग त्याची मलमपट्टी केली आणि पुन्हा तंदुरुस्त केलं याला. आणि हा माझा सेवेकरी पुन्हा सेवेसाठी सज्ज झाला.

आता मात्र, त्याचे डार्क ब्राऊन केस हळूहळू रंग सोडू लागले आहेत, ग्रे होऊ लागलेत. काही मोडून पडू लागलेत, तर काही मुळातून निसटू लागले आहेत. प्रत्येक गोष्टीला अंतःकाळ हा असतोच, या कंगव्यालाही तो नियम लागू आहेच. केवळ किंमतीवरुनच मोल करायचं, तर त्याच्यावर खर्च केलेले १७ रुपये कधीच फिटलेत. पण, मोहाचं काय करायचं? बाजारात अलिकडच्या काळात मी आता त्याला त्याच्यासारखा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक ब्रँडेड कंपन्यांचे भारीभारी राऊंडर बाजारात आहेत. त्यातला माझ्या बायको-मुलीकडंही आहे. पण, याच्यासारखा राऊंडर मात्र मला कुठं मिळत नाहीय, हे मात्र खरं! आताच्या राऊंडरचे ब्रिस्टल्स एकदम खरखरीत, डोक्याच्या त्वचेला घासून काढणारे आणि मग केसांना वळण लावणारे असतात. हा मात्र पहिल्यापासूनच अगदी हळुवार. कधीही खरखर नाही की रखरख. एकदम छानपैकी इमानेइतबारे आपलं काम करणारा! आता त्याच्या वयोमानाप्रमाणं तो निरोप घेण्याच्या अवस्थेकडं वाटचाल करतो आहे, पण त्याच्या आयुष्याचं हे अंतिमपर्व जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न मी करतोय- कदाचित आणखी काही वर्षे तरी!

  

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

कोळशाच्या जीवाला आगीचा ‘आधार’...

'सुधागड ०७' चित्रपटाचे पोस्टर

दिलीप रायण्णावर



(माझे मित्र दिलीप रायण्णावर यांनी आपल्या शासकीय सेवेतील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच ‘सुधागड ०७’ हा चित्रपट बनवला आहे. कोळशाच्या भट्टीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या शोषणाला वाचा फोडणारा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साद घालणारा हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास अद्याप काही अवधी जाणार आहे. कारण सध्या तो विविध चित्रपट महोत्सवांतून फिरतो आहे. पुरस्कार मिळवतो आहे. दिलीपनं, ज्याला मी प्रेमानं दिल्पा म्हणतो, मला हा चित्रपट खाजगीरित्या पाहण्यासाठी पाठवला. आज तो पाहिला. त्या निमित्तानं माझ्या भावना अनावृत पत्रस्वरुपात इथं व्यक्त करीत आहे.)

प्रिय दिल्पा,
मित्रा, आज तुझा चित्रपट ‘सुधागड-०७’ पाहिला. खरं सांगतो, अगदी स्पीचलेस झालोय. त्याहूनही सुन्न झालोय. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट हृदयाला हात घालणारा तर झालाच आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अत्यंत थरारक, रोमांचक बनला आहे.
मला ती संध्याकाळ आठवते आहे, जेव्हा तू या स्क्रीप्टचा पहिला मसुदा फायनल केला होतास आणि थेट कोल्हापूरला माझ्या ऑफिसमध्ये पोहोचला होतास. त्या संध्याकाळी सहाच्या पुढे जवळजवळ दोनेक तास तू मला स्टोरी सांगत होतास आणि मी तल्लीन आणि थक्क होऊन तुझं नॅरेशन ऐकत होतो. सगळ्या लोकेशन्ससह तू मला हा चित्रपट 'ऐकवला' होतास. तेव्हा तू सांगतोयस तसा हा चित्रपट झाला तर जबरदस्त होईल, असं मी तुला म्हणालो होतो. प्रत्यक्षात चित्रपट त्याहूनही अधिक जबराट आणि देखणा झाला आहे, यासाठी तुझं मनापासून अभिनंदन!
इथं एका गोष्टीची कबुली मला द्यायला हवी, ती अशी की, जेव्हा तू हे सारं मला सांगत होतास, तेव्हा मित्र म्हणून तुझ्या आत्मविश्वासाचा अभिमान वाटत असला तरीही एक प्रकारची साशंकताही माझ्या मनात होती, ती म्हणजे, तुझी दिग्दर्शकीय पाटी कोरी असल्यानं आणि चित्रपटाच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे अनेक घटक असल्यानं कशा प्रकारचं प्रोडक्ट असेल, अशी भीती वाटत होती. वेळोवेळी तू चित्रपटाच्या प्रगतीविषयी कळवित होतास, खूष होतास, पण तरीही चित्रपटाची गाणी पाहीपर्यंत माझ्या मनातली शंका कायमच होती. पण गाणी पाहिली, त्यांचे लिरिक्स ऐकले, टेकिंग पाहिलं आणि चित्रपटाविषयीच्या आशाअपेक्षा पुन्हा पल्लवित झाल्या. आज पिक्चर बघितला आणि तुला सांगतो, एकटाच असूनही डोळ्यांत अश्रू उभे राहिले. एक तर, तुझ्या हातून एक उत्तम कलाकृती साकार झाली आहे, याचा मित्र म्हणून अभिमान दाटून आल्यानं आलेले अश्रू होते आणि दुसरे अश्रू तुझ्या कलाकृतीसाठी होते. कारण, शोषणातिरेकाच्या ज्या विश्वाचं दर्शन तू घडवलं आहे, त्यापासून आपला समाज केवळ अन् केवळ अनभिज्ञच नव्हे, तर खूप दूर आहे. त्या विश्वाशी दुरान्वयेही आजच्या समाजाला काही देणंघेणं नाही. समाजाच्या एका व्यापक घटकाचं शोषण करणारी एक यंत्रणा कशी पद्धतशीरपणे आपल्या भोवतालातच काम करते आणि ते विश्व, ती यंत्रणा आपल्या आसपास असूनही आपल्याला त्याचं काही वाटत नाही. मग तू दाखवलंस त्याप्रमाणं आदिवासींचं कोळशासाठीचं शोषण असेल, किंवा ऊसतोड मजुरांचं जीणं असेल. त्यांच्या जगण्याशी, जीवनमरणाशी कसलंही देणं घेणं नसलेला उदासीन, आत्ममग्न समाज सर्वव्याप्त आहे.
या पार्श्वभूमीवर, मित्रा, तुझ्यासारखा वरिष्ठ महसुली अधिकारी समाजाच्या शोषणदुःखानं अस्वस्थ होतो आणि त्याला वाचा फोडण्यासाठी, त्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एका अत्यंत देखण्या कलाकृतीच्या माध्यमातून समाजाला साद घालण्यासाठी सिद्ध होतो, यातूनच तुझ्या उदात्त सामाजिक जाणिवेची प्रचिती येते.
मला महत्त्वाचं काय वाटतं, सांगू? शोषणाची व्याप्ती आणि खोली दाखवून देत असतानाच व्यवस्थेमधील चांगुलपणावरचा, माणूसपणावरचा आणि सांविधानिक मूल्यांवरचा विश्वास तू कोठेही ढळू दिलेला नाहीस. आज हिंसा किती पराकोटीची असते, हे दाखवण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांची चढाओढ लागलेली असण्याच्या काळात तुझं हे वेगळेपण ठसठशीतपणे उठून दिसणारं आहे. कथेवरची पकड कोठेही सुटू न देता, एका विशिष्ट गतीनं चित्रपटाला पुढे नेत असताना त्यातली थरारकता अखेरपर्यंत टिकवून ठेवण्यात तू यशस्वी झालेला आहेस. डॉ. मिलींद शिंदे वगळता बऱ्यापैकी सारेच नवखे कलाकार आहेत. अशा रॉ कलाकारांकडून अभिनय करवून घेणं आणि आवश्यक परिणाम मिळवणं, ही बाब मोठी अवघड असते. पण एका कसलेल्या दिग्दर्शकाप्रमाणं तू ते साध्य केलं आहेस, याचं मला कोण कौतुक वाटतं! स्क्रीनप्लेसाठी तुला ज्येष्ठ लेखक सन्मित्र विद्यासागर अध्यापक आणि सुषमाताई शितोळे यांची उत्तम साथ लाभलेली दिसते. बप्पी लहरी यांचं संगीत लाभलेला हा कदाचित अखेरचाच चित्रपट असेल. त्यांचे चिरंजीव बाप्पा यांनीही संगीताचा गोडवा आणि पार्श्वसंगीताचा थरार अतिशय उत्तम जमवून आणला आहे. भावाच्या पिक्चरसाठी सोनू निगमनं गाणं म्हटलंय, याचाच मोठा आनंद आहे. ते त्यानं भारीच म्हटलंय. प्रत्येक गाण्याचे बोल आशयपूर्ण आणि चित्रपटाच्या कथेला साजेसे, पुढे घेऊन जाणारे आहेत. पोलीस अधीक्षक सन्मित्र महेश सरतापे यांचे तुझ्या चित्रपटात सुखद दर्शन झाले. त्यांना पाहूनही छान वाटलं. तुमच्यासारखे मित्र व्यवस्थेमध्ये सजग मानवतावादी भावनेतून योगदान देत आहेत, आपल्या परीघाबाहेर जाऊन कला, संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक न्याय, प्रबोधन जाणिवा विकसित करण्यासाठी काम करत आहेत, याचाही खूप अभिमान वाटतो.
बऱ्याच वर्षांनी असं कोणाला तरी पत्र लिहीतोय. अलीकडं एका शब्दाच्या अगर ओळीच्या पलिकडं आपण मित्राला सोडूनच दे, आईबापालाही लिहीत नाही. ते तुला लिहीतोय. फार संवेदनशीलतेनं तू ‘सुधागड ०७’ तयार केला आहेस. त्याला महोत्सवीय यश मिळेलंच. पण, चित्रपटगृहांतूनही त्याला उत्तम प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो. आपला मराठी प्रेक्षक तितका सुजाण आणि चोखंदळ निश्चितच आहे.
दिल्पा, पदार्पणातच तू ठोकलेल्या शड्डूचा आवाज चित्रपटसृष्टीत निश्चितपणानं घुमणार आहे, याची खात्री बाळग. जिकलाईस भावा...
तुझाच,
आलोक