शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला

राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

डॉ. आलोक जत्राटकर
 
ब्लॅक व्हाईट अन् ग्रे पुस्तकाचे मुखपृष्ठ


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय-२०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी यांनी नुकतीच पुरस्कारांची घोषणा केली.

डॉ. जत्राटकर यांचा ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे हा ललित लेखसंग्रह कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये मानवतावादाच्या सूत्रामध्ये गुंफलेल्या निवडक ३० लेखांचा समावेश आहे. व्यापक जागतिक समुदायामध्ये मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा आग्रह या लेखनामागे आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.

डॉ. जत्राटकर यांची निखळ: जागर संवेदनांचा, समाज आणि माध्यमं ही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि ध्यास फाऊंडेशन, पलूस आदी संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कारही लाभले आहेत.









मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

कंघा बुढा हो गईल बा..!

माझ्या लाडक्या राऊंडरला 'एआय'नं अशी छान बॅकग्राऊंड दिलीय.


गेल्या ३५ वर्षांची त्याची माझी साथ... मी जिथे जाईन, तिथे या सर्व काळात तो माझ्यासोबत आहेच. त्याचा मला आणि माझा त्याला स्पर्श झाला नाही, आम्ही एकमेकांकडे पाहिले नाही, असा एकही दिवस गेला नाही. माझ्या बऱ्यापैकी दिसण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा. मात्र, आता त्याच्या आयुष्याची उतरण सुरू झालीय. त्याचे केस आता पिकू लागलेत, गळू लागलेत, विरळ होऊ लागलेत. त्याच्या म्हातारपणाच्या चाहुलीने जीव अस्वस्थ झालाय. त्याची जागा घेईल, असा दुसरा जोडीदार मला यापुढील काळात लाभेल की नाही, अशी शंका अस्वस्थता वाढवतेय. त्याच्यापेक्षा भारी मिळतील कदाचित, पण त्याच्यासम भेटण्याची शक्यता फारच कमी वाटते आहे. त्यामुळेच त्याच्या वृद्धापकाळाने मी अधिक अस्वस्थ झालो आहे. त्याची साथसंगत जितकी लांबविता येईल, तितकी त्याचा प्रेमभराने सांभाळ करून वाढविण्याचा माझा प्रयत्न आहेच, पण विरहाचा तो दिवस कधी तरी येणारच, हा विचार क्लेषकारक आहे.

मित्र-मैत्रिणींनो, १९९२ साली माझ्या आयुष्यात आलेल्या राऊंडर-कम्-कंगव्याच्या दुराव्याच्या असहनीय कल्पनेपोटी वरील वाक्ये मनात येताहेत. आताच्या जेन-झी किंवा त्या आधीच्या एक-दोन पिढ्यांमध्ये मूव्ह-ऑनचा ट्रेंड असल्यानं त्यांना आम्हा एक्सवाल्यांची ही तगमग लक्षात येणार नाही. एका नजरेमध्ये प्रेम आणि एखाद्या वॉट्सअप मेसेजवर ब्रेकअप आणि पुन्हा भेटून ते ब्रेकअप सेलिब्रेट करण्याच्या काळामध्ये आम्हा गयागुजऱ्या पिढीची भावनिक गुंतवणूक पराकोटीची असते, याची कदाचित कल्पना तुम्हाला येणार नाही. अगदी प्रियकर-प्रेयसी ही खूपच मोठी गोष्ट झाली, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये (कदाचित विनाकारणही) जीव गुंतवून बसण्याची, जीव लावण्याची सवय (किंवा खोड) हा आमच्या पिढीचा अंगभूत गुण असावा, असं वाटतं. त्या काळात प्रेमात यशापेक्षा प्रेमभंगाचंच शल्य वाट्याला अधिक येत असे, त्यावेळी तू नहीं तो और सही, म्हणत बसण्यापेक्षा त्या प्रेमभंगाचं दुःख कुरवाळत बसण्यात, तिच्या अगर त्याच्या आठवणींत रमण्यात आम्हाला अधिक आनंद (?) वाटे. त्या जखमेवरची खपली सतत काढून त्या बोचऱ्या वेदना पुनःपुन्हा अनुभवण्यामध्ये अधिक सुख वाटे. तसंच आयुष्यात आलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या भौतिक-अभौतिक गोष्टींमध्येही जीव गुंतवण्यात आम्हाला कोण आनंद असे. म्हणजे सायकलच्या कीचेनपासून ते अखंड सायकलपर्यंत, एखाद्या शर्टापासून ते अगदी कंगव्यापर्यंत!

तर, अशाच माझ्या आयुष्यात एका अवचित क्षणी दाखल झालेल्या कंगव्याची ही गोष्ट. आजकाल मुलांचे केस लहानपणापासूनच लांब ठेवण्याकडे बहुतांश आईवडिलांचा कल दिसून येतो. पण, हमारे जमाने में... बाबा दर पंधरा दिवसांनी केस कापायला घेऊन जायचेच. कागलमध्ये असताना शिवाजी आणि शहाजी या बंधूंकडे तर नंतर निपाणीत नामांकित नामा यांच्याकडे... म्हणजे अगदी कसाबसा भांग पडेल, इतकेच, केस डोईवर असत. त्यामुळं केस लांब वाढवण्याचं एक प्रकारचं ऑब्सेशन मनात होतं. पण, धाडस होत नव्हतं. अखेरीस नववी-दहावीच्या टप्प्यावर अभ्यासाचं कारण पुढं करून पंधरा दिवसांचं कटिंग महिनाभरापर्यंत लांबवण्यात यश मिळवलं. आता या वाढत्या केसांची निगा राखायची तर एखादा राऊंडर हाताशी असावा, अशी भावना मनात मूळ धरून होती. त्यावेळी निपाणीत नव्यानं सुरू झालेल्या जनता बझारमध्ये एका ट्रेमध्ये मला हवा तसा राऊंडर दिसलाही. पण, इतर कंगवे एक-दोन रुपयांना मिळत असताना सतरा रुपये ही त्याची किंमत खूपच जास्त होती. त्यामुळं बाबांना विचारायचं धाडस होत नव्हतं. असेच अनेक दिवस गेले.

त्यानंतर झालं असं की, बाबांना जोधपूर-राजस्थानला २१ दिवसांच्या रिफ्रेशर कोर्सला जायचं होतं. त्यामुळं त्या कालावधीत घरी लागणारं वाणसामान तसंच इतर घरखर्चासाठी बाबांनी काही रक्कम माझ्याकडं देऊन ठेवली. आईची शाळा कागलला असल्यामुळं तिला अप-डाऊन करावं लागत असे. त्यामुळं तिला घरी यायला उशीर होईल. तशात अनुपही लहान होता. त्याचं आजारपण, दवाखाना कधीही उद्भवत असे. असा सारा विचार करून बाबांनी ही खर्चाची जबाबदारी माझ्याकडं सोपवलेली. मी सुद्धा अगदी इमानदारीत खर्च केलेल्या प्रत्येक पै न पैचा हिशोब एका डायरीत अगदी दिवसनिहाय मांडून ठेवत असे. बाबांचा परत येण्याचा दिवस जवळ आला, तसा त्या पैशातून थोडा स्वार्थ साधण्याचा विचार माझ्या मनात आला. आणि १९९२ मधल्या फेब्रुवारीमध्ये जनता बझारमधला १७ रुपयांचा पॉलिश्ड लाकडी चौकोनी मुठीचा तो राऊंडर माझ्या वाणसामानासोबत घरी आला. आणि हो, आपण इमानदारीत त्याची नोंद हिशोबात केली सुद्धा बरं! बाबा परतल्यानंतर त्यांच्यासमोर हिशोबाची वही सादर केली, शिल्लक रक्कम त्यांच्या हाती परत दिली आणि या राऊंडरच्या खरेदीची बाबही त्यांना सांगितली. त्यावर त्यांनी १७ रुप्पयाचा कंगवा!’ एवढीच प्रतिक्रिया दिल्याचं आठवतंय. बाकी काही बोलले नाहीत. ते समाजशास्त्राचे असल्यामुळं असावं, पण पोर आता वयात येतंय, अशा गोष्टी होणार, हे त्यांनी गृहित धरलं असावं.

तर, अशा तऱ्हेनं हे राऊंडर महोदय, माझ्या आयुष्यात दाखल झाले. तेव्हापासून आजतागायत माझ्या केशभूषेची समग्र जबाबदारी त्यांनी एकहाती लीलया पेललेली आहे. आजवर आयुष्यात खोबरेल तेलाखेरीज इतर कुठलंही प्रसाधन मी वापरलेलं नाही. मात्र, आंघोळीनंतर पहिली केशभूषा या राऊंडरनं केल्याशिवाय मला केस विंचरल्यासारखं वाटतच नाही. गेली पस्तीसेक वर्षे हा राऊंडर माझा साथीदार म्हणून माझ्यासोबत सर्वत्र संचारकर्ता आहे. पुण्याला आयआयटीच्या क्लासला गेलो, तिथं सोबत होताच, कोल्हापूरला हॉस्टेलवर माझ्यासह अनेक मित्रमंडळींच्या डोक्यावर याचा मायेचा हात फिरलेला आहे. मुंबईला गेलो, तिथेही हा सोबत होताच, पुन्हा आता करवीरनगरीतही सोबत आहेच. माझ्या अगदी एखाद्या दिवसाच्या दौऱ्यामध्येही हा मला सोबत लागतोच. त्याशिवाय, अस्वस्थ व्हायला होतं.

मध्ये एकदा सम्यकच्या हातून पडून त्याच्या मुठीचे दोन तुकडे झाले. पण तोवर फेव्हीक्विक नावाचं जालीम अडेजिव्ह बाजारात आलेलं होतं. त्यामुळं लगोलग त्याची मलमपट्टी केली आणि पुन्हा तंदुरुस्त केलं याला. आणि हा माझा सेवेकरी पुन्हा सेवेसाठी सज्ज झाला.

आता मात्र, त्याचे डार्क ब्राऊन केस हळूहळू रंग सोडू लागले आहेत, ग्रे होऊ लागलेत. काही मोडून पडू लागलेत, तर काही मुळातून निसटू लागले आहेत. प्रत्येक गोष्टीला अंतःकाळ हा असतोच, या कंगव्यालाही तो नियम लागू आहेच. केवळ किंमतीवरुनच मोल करायचं, तर त्याच्यावर खर्च केलेले १७ रुपये कधीच फिटलेत. पण, मोहाचं काय करायचं? बाजारात अलिकडच्या काळात मी आता त्याला त्याच्यासारखा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक ब्रँडेड कंपन्यांचे भारीभारी राऊंडर बाजारात आहेत. त्यातला माझ्या बायको-मुलीकडंही आहे. पण, याच्यासारखा राऊंडर मात्र मला कुठं मिळत नाहीय, हे मात्र खरं! आताच्या राऊंडरचे ब्रिस्टल्स एकदम खरखरीत, डोक्याच्या त्वचेला घासून काढणारे आणि मग केसांना वळण लावणारे असतात. हा मात्र पहिल्यापासूनच अगदी हळुवार. कधीही खरखर नाही की रखरख. एकदम छानपैकी इमानेइतबारे आपलं काम करणारा! आता त्याच्या वयोमानाप्रमाणं तो निरोप घेण्याच्या अवस्थेकडं वाटचाल करतो आहे, पण त्याच्या आयुष्याचं हे अंतिमपर्व जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न मी करतोय- कदाचित आणखी काही वर्षे तरी!

  

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

कोळशाच्या जीवाला आगीचा ‘आधार’...

'सुधागड ०७' चित्रपटाचे पोस्टर

दिलीप रायण्णावर



(माझे मित्र दिलीप रायण्णावर यांनी आपल्या शासकीय सेवेतील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच ‘सुधागड ०७’ हा चित्रपट बनवला आहे. कोळशाच्या भट्टीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या शोषणाला वाचा फोडणारा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साद घालणारा हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास अद्याप काही अवधी जाणार आहे. कारण सध्या तो विविध चित्रपट महोत्सवांतून फिरतो आहे. पुरस्कार मिळवतो आहे. दिलीपनं, ज्याला मी प्रेमानं दिल्पा म्हणतो, मला हा चित्रपट खाजगीरित्या पाहण्यासाठी पाठवला. आज तो पाहिला. त्या निमित्तानं माझ्या भावना अनावृत पत्रस्वरुपात इथं व्यक्त करीत आहे.)

प्रिय दिल्पा,
मित्रा, आज तुझा चित्रपट ‘सुधागड-०७’ पाहिला. खरं सांगतो, अगदी स्पीचलेस झालोय. त्याहूनही सुन्न झालोय. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट हृदयाला हात घालणारा तर झालाच आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अत्यंत थरारक, रोमांचक बनला आहे.
मला ती संध्याकाळ आठवते आहे, जेव्हा तू या स्क्रीप्टचा पहिला मसुदा फायनल केला होतास आणि थेट कोल्हापूरला माझ्या ऑफिसमध्ये पोहोचला होतास. त्या संध्याकाळी सहाच्या पुढे जवळजवळ दोनेक तास तू मला स्टोरी सांगत होतास आणि मी तल्लीन आणि थक्क होऊन तुझं नॅरेशन ऐकत होतो. सगळ्या लोकेशन्ससह तू मला हा चित्रपट 'ऐकवला' होतास. तेव्हा तू सांगतोयस तसा हा चित्रपट झाला तर जबरदस्त होईल, असं मी तुला म्हणालो होतो. प्रत्यक्षात चित्रपट त्याहूनही अधिक जबराट आणि देखणा झाला आहे, यासाठी तुझं मनापासून अभिनंदन!
इथं एका गोष्टीची कबुली मला द्यायला हवी, ती अशी की, जेव्हा तू हे सारं मला सांगत होतास, तेव्हा मित्र म्हणून तुझ्या आत्मविश्वासाचा अभिमान वाटत असला तरीही एक प्रकारची साशंकताही माझ्या मनात होती, ती म्हणजे, तुझी दिग्दर्शकीय पाटी कोरी असल्यानं आणि चित्रपटाच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे अनेक घटक असल्यानं कशा प्रकारचं प्रोडक्ट असेल, अशी भीती वाटत होती. वेळोवेळी तू चित्रपटाच्या प्रगतीविषयी कळवित होतास, खूष होतास, पण तरीही चित्रपटाची गाणी पाहीपर्यंत माझ्या मनातली शंका कायमच होती. पण गाणी पाहिली, त्यांचे लिरिक्स ऐकले, टेकिंग पाहिलं आणि चित्रपटाविषयीच्या आशाअपेक्षा पुन्हा पल्लवित झाल्या. आज पिक्चर बघितला आणि तुला सांगतो, एकटाच असूनही डोळ्यांत अश्रू उभे राहिले. एक तर, तुझ्या हातून एक उत्तम कलाकृती साकार झाली आहे, याचा मित्र म्हणून अभिमान दाटून आल्यानं आलेले अश्रू होते आणि दुसरे अश्रू तुझ्या कलाकृतीसाठी होते. कारण, शोषणातिरेकाच्या ज्या विश्वाचं दर्शन तू घडवलं आहे, त्यापासून आपला समाज केवळ अन् केवळ अनभिज्ञच नव्हे, तर खूप दूर आहे. त्या विश्वाशी दुरान्वयेही आजच्या समाजाला काही देणंघेणं नाही. समाजाच्या एका व्यापक घटकाचं शोषण करणारी एक यंत्रणा कशी पद्धतशीरपणे आपल्या भोवतालातच काम करते आणि ते विश्व, ती यंत्रणा आपल्या आसपास असूनही आपल्याला त्याचं काही वाटत नाही. मग तू दाखवलंस त्याप्रमाणं आदिवासींचं कोळशासाठीचं शोषण असेल, किंवा ऊसतोड मजुरांचं जीणं असेल. त्यांच्या जगण्याशी, जीवनमरणाशी कसलंही देणं घेणं नसलेला उदासीन, आत्ममग्न समाज सर्वव्याप्त आहे.
या पार्श्वभूमीवर, मित्रा, तुझ्यासारखा वरिष्ठ महसुली अधिकारी समाजाच्या शोषणदुःखानं अस्वस्थ होतो आणि त्याला वाचा फोडण्यासाठी, त्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एका अत्यंत देखण्या कलाकृतीच्या माध्यमातून समाजाला साद घालण्यासाठी सिद्ध होतो, यातूनच तुझ्या उदात्त सामाजिक जाणिवेची प्रचिती येते.
मला महत्त्वाचं काय वाटतं, सांगू? शोषणाची व्याप्ती आणि खोली दाखवून देत असतानाच व्यवस्थेमधील चांगुलपणावरचा, माणूसपणावरचा आणि सांविधानिक मूल्यांवरचा विश्वास तू कोठेही ढळू दिलेला नाहीस. आज हिंसा किती पराकोटीची असते, हे दाखवण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांची चढाओढ लागलेली असण्याच्या काळात तुझं हे वेगळेपण ठसठशीतपणे उठून दिसणारं आहे. कथेवरची पकड कोठेही सुटू न देता, एका विशिष्ट गतीनं चित्रपटाला पुढे नेत असताना त्यातली थरारकता अखेरपर्यंत टिकवून ठेवण्यात तू यशस्वी झालेला आहेस. डॉ. मिलींद शिंदे वगळता बऱ्यापैकी सारेच नवखे कलाकार आहेत. अशा रॉ कलाकारांकडून अभिनय करवून घेणं आणि आवश्यक परिणाम मिळवणं, ही बाब मोठी अवघड असते. पण एका कसलेल्या दिग्दर्शकाप्रमाणं तू ते साध्य केलं आहेस, याचं मला कोण कौतुक वाटतं! स्क्रीनप्लेसाठी तुला ज्येष्ठ लेखक सन्मित्र विद्यासागर अध्यापक आणि सुषमाताई शितोळे यांची उत्तम साथ लाभलेली दिसते. बप्पी लहरी यांचं संगीत लाभलेला हा कदाचित अखेरचाच चित्रपट असेल. त्यांचे चिरंजीव बाप्पा यांनीही संगीताचा गोडवा आणि पार्श्वसंगीताचा थरार अतिशय उत्तम जमवून आणला आहे. भावाच्या पिक्चरसाठी सोनू निगमनं गाणं म्हटलंय, याचाच मोठा आनंद आहे. ते त्यानं भारीच म्हटलंय. प्रत्येक गाण्याचे बोल आशयपूर्ण आणि चित्रपटाच्या कथेला साजेसे, पुढे घेऊन जाणारे आहेत. पोलीस अधीक्षक सन्मित्र महेश सरतापे यांचे तुझ्या चित्रपटात सुखद दर्शन झाले. त्यांना पाहूनही छान वाटलं. तुमच्यासारखे मित्र व्यवस्थेमध्ये सजग मानवतावादी भावनेतून योगदान देत आहेत, आपल्या परीघाबाहेर जाऊन कला, संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक न्याय, प्रबोधन जाणिवा विकसित करण्यासाठी काम करत आहेत, याचाही खूप अभिमान वाटतो.
बऱ्याच वर्षांनी असं कोणाला तरी पत्र लिहीतोय. अलीकडं एका शब्दाच्या अगर ओळीच्या पलिकडं आपण मित्राला सोडूनच दे, आईबापालाही लिहीत नाही. ते तुला लिहीतोय. फार संवेदनशीलतेनं तू ‘सुधागड ०७’ तयार केला आहेस. त्याला महोत्सवीय यश मिळेलंच. पण, चित्रपटगृहांतूनही त्याला उत्तम प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो. आपला मराठी प्रेक्षक तितका सुजाण आणि चोखंदळ निश्चितच आहे.
दिल्पा, पदार्पणातच तू ठोकलेल्या शड्डूचा आवाज चित्रपटसृष्टीत निश्चितपणानं घुमणार आहे, याची खात्री बाळग. जिकलाईस भावा...
तुझाच,
आलोक

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

तोच हा राजा, तोच हा छत्रपती...


अंधारात पेटवी मशाल जो,

रयतेच्या मनी जागवी स्वाभिमान जो,

तोच हा राजा, तोच हा छत्रपती,

गाती गाथा तयाची, चौदिशा अन् आसमंतही!

शिवजयंतीच्या पूर्वप्रभातीला (दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी) उगवतीच्या सूर्याने अवघ्या काही क्षणांसाठी आसमंत असे भगव्या, नारंगी रंगात रंगवून काढले. या लालिमेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा. (छायाचित्र- डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)






दै. जनप्रवास

लोकमत

पुढारी



सिंधुदुर्ग समाचार

टाइम्स ऑफ इंडिया





शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

सूर्यप्रतापी राजा शिवछत्रपति, तेज तुझे अमर दिव्य ज्योती...

शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची काही नयनरम्य छायाचित्रे काढली. त्यांना बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी व्यापक प्रसिद्धी दिली. त्यातील काही निवडक छायाचित्रे पुढे देत आहे...


मकरसंक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू आहे. या उत्तरायण प्रवासादरम्यान कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या पाठी मावळतीच्या सूर्याने तेजांकित प्रभामंडळ प्रदान केले आहे. त्याची आजची काही छायाचित्रे... (छायाचित्र- डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)




(लोकमत)




 

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

सरला माहेश्वरी आणि दूरदर्शनच्या आठवणी...

सरला माहेश्वरी

शम्मी नारंग आणि रिनी खन्ना

निती रविंन्द्रन, गीतांजली अय्यर, मीनू तलवार आणि सलमा सुल्तान




दूरदर्शनच्या न्यूज अँकर सरला माहेश्वरी यांचं काल ७१ व्या वर्षी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहात असताना त्या कालखंडातील अनेक आठवणी मनी जागू लागल्या. सरला माहेश्वरी हे नाव आजच्या पिढीला तितकंसं माहिती असण्याचं कारण नसलं तरी दूरदर्शनवरील सोज्वळ प्रज्ञाशील चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. आजच्या कर्कश्य आणि नकोशा वाटणाऱ्या अँकरिंगच्या पार्श्वभूमीवर त्यांचं शांत, सस्मित असं बातम्यांचं वाचन हा दूरदर्शनच्या बातमीपत्रांना नवी उंची प्राप्त करून देणारा होता. हिंदीवर प्रकांड म्हणावं, असं प्रभुत्व असणारं हे व्यक्तीमत्त्व त्यांच्या शालीनतेमुळं वेगळं उठून दिसायचं. आजकाल लोकांना स्क्रीनला खिळवून ठेवण्यासाठी अँकरला नाना गोष्टी कराव्या लागतात. ती आजच्या २४x७ वाहिन्यांच्या जमान्यात कदाचित गरजही आहे. तथापि, केवळ आपल्या शब्दफेकीतून आणि आवाजाच्या आवश्यक तितक्या चढउतारांमधून बातमीचं महत्त्व आणि मूल्य अधोरेखित करण्याचं कौशल्य त्यांच्याकडं होतं. एनडीटीव्हीच्या निधी कुलपतींना पाहिलं की मला माहेश्वरींची हटकून आठवण यायची. कुलपतीही नुकत्याच निवृत्त झाल्यात. माहेश्वरी यांच्या निमित्तानं त्या काळच्या दूरदर्शनमधील अनेक न्यूज अँकर मला त्यांच्या नावानिशी आठवू लागले, याचं माझं मलाही आश्चर्य वाटू लागलं.
यात पहिल्या आठवल्या त्या सलमा सुल्तान! मुस्लीम समाजातील सलमा याही टापटीपतेचा आणि व्यावसायिकतेचा मोठा आदर्श होत्या, असं म्हणायला हवं. परवीन बाबीसारखा हेअरकट, केसांत व्यवस्थित खोवलेले गुलाबाचे फूल आणि साडी गळ्यावरुन अगदी परफेक्ट कोनात दुमडलेली. अखेरपर्यंत त्यांच्या या नीटनेटकेपणात काहीही फरक पडला नाही. आज तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, सलमा या हसत नाहीत, यावरुन त्या काळी देशभरात जशा चर्चा घडल्या, तसंच त्यांनी एकदा स्माईल दिलं, तर त्याच्याही बातम्या झालेल्या. म्हणजे, हे न्यूज रीडर बातमीपत्राच्या अखेरीस जय हिंद.. शुभ रात्री... असं म्हणाले की कॅमेऱ्याकडं पाहून एक हलकंसं स्माईल द्यायचे. पुरूष अँकरही त्याला अपवाद नव्हते. मात्र सलमा त्याला अपवाद होत्या. सलमा इतरांसारख्या हसत नाहीत, याचा माझ्या आईलाही खूप त्रास होई. माध्यमांतच कार्यरत असल्याने आपल्याबद्दलची ही देशभरातील प्रतिक्रिया सलमा यांच्यापर्यंत पोहोचली असावी. आणि एके दिवशी त्या चक्क हसल्या.... मात्र, त्या हसल्या, त्या दिवशी आई ‘ही बया आज कशी काय हसली बरं?’ असं आश्चर्य आणि कौतुकमिश्रीत उद्गारली. हे आश्चर्य देशभरात सार्वत्रिक होतं.
त्या खालोखाल आठवतात ते शम्मी नारंग. एकदम भारदस्त पर्सनॅलिटी आणि आवाजही तसाच. बातमीपत्र कसं वाचावं, हिंदी कसं असावं, याचा उत्तम नमुना म्हणजे शम्मी नारंग यांचं वार्तापत्र सादरीकरण. त्यावेळी त्यांच्यासोबतच रिनी खन्ना या इंग्रजी बातमीपत्र सादर करीत. दिल्ली दूरदर्शननंतर अलिकडं हे दोघे दिल्ली मेट्रोचा आवाज बनलेले आहेत. दिल्ली मेट्रोच्या हिंदी उद्घोषणा व सूचना शम्मी यांच्या, तर इंग्रजी उद्घोषणा रिनी यांच्या आवाजात केल्या जातात.
गीतांजली अय्यर, मीनू तलवार आणि दाढीवाले पण एकदम पॉलिश्ड असे सुनीत टंडन या तिघांना मी विसरू शकणार नाही. हे इंग्रजी वार्तापत्र सादर करायचे. तेव्हा इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी त्यांच्या इंग्रजी बातम्यांचे सादरीकरण आईबाबा लक्षपूर्वक ऐकायला सांगायचे. यातल्या प्रत्येकाची शैली वेगळी तसेच भाषेचे आणि व्यक्तीमत्त्वाचे प्रत्येकाचे अपीलही स्वतंत्र ठसा उमटविणारे असे होते. बातमी कोणती आहे, चांगली आहे, वाईट आहे, यानुसार त्यांचं सादरीकरण बदलायचं. माझं इंग्रजी सुधारण्यामध्ये आईच्या बरोबरीने या अँकर मंडळींचंही श्रेय मान्य करायला पाहिजे. म्हणजे या लोकांनी बातम्या सांगण्यापलिकडं जाऊन एका पिढीच्या व्यक्तीमत्त्व विकासातही काही हातभार लावला आहे. हे त्यांचे ऋण मान्य करायला हवेत.

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

देसाई, हे बरं नाही केलंत...

संजय देसाई


माझे सकाळमधील ज्येष्ठ छायाचित्रकार मित्र संजय देसाई यांचे काल अकाली आणि अचानकपणे निधन झाले. या क्षणापर्यंत ही वार्ता खोटी ठरावी, असे वाटत राहिले आणि त्यामुळेच श्रद्धांजलीपर पोस्ट लिहायला मन धजावत नव्हते. गेल्या शुक्रवारीच आम्ही सारे पूर्वाश्रमीचे सकाळवासी विश्वास पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एकत्र आलो होतो. देसाईही आले होते. सकाळमधून मुदतपूर्व निवृत्ती घेतल्यानंतरही छायाचित्रणापासून मात्र ते दुरावले नव्हते. मुक्तपणे फिरणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होणे, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांशी संपर्क राखणे अशा सर्व गोष्टी त्यांच्या सामाजिकतेची साक्ष देणाऱ्या होत्या. मुलांच्या प्रगतीचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून पाझरत असे. आमचा काही ना काही कारणाने नित्य संपर्क असे. अगदी गेल्या ३० डिसेंबरलाही प्रेस क्लबमध्ये पुरस्कार निवड समितीसाठी आम्ही एकत्र होतो. अगदी शेजारी बसून सकाळमधील कामाच्या आठवणी आम्ही जागवल्या होत्या. विशेषतः 'सकाळ टुडे' पुरवणी लॉन्चिंगच्या कालखंडात देसाई, चेचर यांच्या साथीने फोटोजर्नालिझमचे अनेक प्रयोग केले होते. त्या आठवणीही त्यांनी काढल्या. त्या काळात आमचे हे दोन फोटोग्राफर म्हणजे सकाळचे दोन डोळेच होते जणू, इतकं अप्रतिम योगदान त्यांनी दिलंय. आता देसाई यांच्या जाण्यानं हा एक डोळा कायमचा मिटला गेला आहे... देसाई ६३ हे काही आपल्यासारख्याचे जाण्याचे वय नव्हे... पण, तुम्ही गेलात... हे काही बरे नाही केलेत... आपणास भावपूर्ण श्रद्धांजली!