गुरुवार, २६ मार्च, २०२६

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने प्रेमळ पित्याला आंचवलो...




सुखाच्या लहरींना मात देण्यासाठी दुःखाची एक लाट पुरेशी ठरते. काल पुरस्काराचा आनंद सर्वांसोबत शेअर करीत असतानाच आज आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या निधनाची बातमी यावी, यापरते मोठं दुःख ते काय?

डॉ. जयसिंगराव पवार यांचं जाणं ही सामाजिक आणि इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी आहेच, पण व्यक्तिगत पातळीवर ही माझी सुद्धा खूप मोठी हानी आहे. माझ्यावर अगदी पुत्रवत प्रेम करणारा एक प्रेमळ पिता आज मी गमावला आहे, अशी माझी भावना आहे. काही व्यक्तिगत कारणानं बाहेरगावी असल्यानं या पित्याचं अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. याची खंत वाटते आहेच; पण त्याही पलीकडे त्यांच्या अनेक आठवणी या प्रसंगी मनामध्ये उचंबळून येत आहेत. अनेक आठवणी आहेत त्यांच्या. विद्यापीठात आले की प्रेमाने हातात हात घेऊन चालणारे, अगदी विश्वासाने खांद्यावरती हात टाकणारे, अत्यंत सस्मित वदनाने स्वागत करणारे, बोलणारे, आपुलकीने संशोधनाची, लेखनाची चौकशी करणारे असे पवार सर मला सतत भेटत राहिले. त्यांचा हसतमुख चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतो आहे आणि तितक्या वेळा डोळे पाण्यानं डबडबताहेत. 

 मी जेव्हा पीएचडी झालो, तेव्हा माझा एकमेव जाहीर सत्कार हा आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांनी आणि माझे गुरु डॉ. अशोक चौसाळकर यांनी शाहू स्मारक भवनमध्ये केला. नुसता सत्कार केला नाही तर 'शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर पत्रकारिता' या विषयावर सविस्तर व्याख्यान देण्याची संधी त्यांनी मला दिलेली होती. पवार सर स्वतः अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी माझ्या मांडणीचं कौतुक तर केलं होतंच, पण आता आपले संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी असे तरूण संशोधक पुढे येताहेत, ही समाधानाची बाब असल्याचे उद्गारही काढले होते.

गेल्या वर्षी माझ्या दोन पुस्तकांचा प्रकाशन झालं. ती पुस्तकं द्यायला मी सरांच्या घरी गेलो. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर आदरणीय माईंनी आणि सरांनी अतिशय आपलेपणानं माझं अभिनंदन तर केलंच;  त्याशिवाय अगदी  अनपेक्षितपणे माझा या दोघांनी सत्कारही केला. साक्षात डॉ. जयसिंगराव पवार सरांनी सत्कार करावा, यापेक्षा आयुष्यामध्ये अन्य कुठलीही गोष्ट मोठी असू शकेल, असं मला वाटत नाही. महत्त्वाचं म्हणजे सरांचं पंचखंडात्मक चरित्र लेखनाचं कार्य सुरू असतानाही त्यांनी ही दोन्ही पुस्तकं वाचली आणि मला आवर्जून फोन केला. 'ब्लॅक व्हाईट अन् ग्रे' मधल्या 'डिकास्ट व्हावं कसं?' या लेखानं ते अस्वस्थ झाले होते. त्या विषयावर आम्ही सुमारे पाऊण तास बोललो. 'माझ्या ८५ वर्षांच्या आयुष्यात तुमच्यासारखा खऱ्या अर्थानं डिकास्ट झालेला माणूस प्रथमच मला भेटला,' हे सरांचे कौतुकोद्गार आजही जसेच्या तसे कानात गुंजताहेत आणि जबाबदारीची जाणीवही करून देताहेत.

त्यानंतर  माझ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकाचा मसुदा पाहून सरांनी त्यातील काही संदर्भ नवीन आहेत, असे निरीक्षण नोंदवले आणि अनेक मौलिक सूचना या संदर्भाने मला केल्या.  त्या अंमलात आणायच्या की नाही, याचा निर्णय तुम्ही घ्या, असं इतक्या निर्व्याजपणाने सरांनी मला सांगितलं होतं. सरांच्या सूचनांबरहुकूम आता पुस्तकाची रचना झालेली आहे. अशा किती आठवणी सांगाव्यात सरांच्या. 

या क्षणी पूर्ण ब्लँक व्हायला होतंय ते यासाठी की सरांनी शाहू महाराजांचा वारसा ज्या पद्धतीने पुनरुज्जीवित केला, शाहूंच्या बदनामीची सगळी प्रकरणं, सगळ्या गोष्टी अगदी प्रचंड अभ्यासांती पुरावे गोळा करून सरांनी शाहूंची प्रतिमा ज्या पद्धतीने उजळवली.  केवळ देशातच नव्हे, राज्यातच नव्हे तर जगाच्या पातळीवर सरांनी शाहूंचं नाव पोहोचवलं. पवार सरांचं सगळ्यात मोठं काम हे शाहूंच्या संदर्भातलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं, त्याला अजिबात तोड नाही. त्यांच्यामुळे शाहू महाराजांशी आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने, आत्मीय भावाने जोडले गेलो. शाहू महाराज यांचं दैवतीकरण न करता त्यांना आत्मसात करणं ही आवश्यक बाब आहे, हे सातत्याने ते प्रत्येक तरुणाच्या मनावर बिंबवत राहिले. मला वाटतं ही गोष्ट फार फार मोलाची आणि महत्त्वाची आहे. मात्र आता होतंय असं की, ज्या कोल्हापूरमध्ये महाराजांनी काम केलं आणि जयसिंगराव पवार सरांनी महाराजांचा वारसा पुनरुज्जीवित करण्याचं आणि जिवंत ठेवण्याचं काम केलं; त्या कोल्हापूरमध्ये शाहू विचार संपवण्यासाठीची एक वेगळी चळवळ मूळ धरू पाहते आहे. तशा स्वरूपाच्या बाबी, घटना होऊ लागलेल्या आहेत. त्यांच्या पुरोगामित्वाला हरताळ फासणाऱ्या गोष्टी घडवल्या जात आहेत. 'आता कोल्हापूर पुरोगामी राहिलं नाही,' असं शाहूंच्या पुतळ्याच्या साक्षीनं अभिमानानं सांगणारे तथाकथित नेते उभे राहताहेत. त्यामुळं मला असं वाटतं की शाहूंना जपणं, शाहूंचा वारसा खऱ्या अर्थानं जपणं आणि वृद्धिंगत करणं हीच आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या जीवनकार्याला खरी आदरांजली ठरेल!


बुधवार, २५ मार्च, २०२६

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला

वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार जाहीर

 

कोल्हापूर, दि. २५ मार्च: येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या समाज आणि माध्यमं या वैचारिक लेखसंग्रहाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे यांनी ही घोषणा केली आहे.

डॉ. जत्राटकर यांच्या ब्लॅक व्हाईट अन् ग्रे या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने उत्कृष्ट ललित संग्रहासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर आता समाज आणि माध्यमं या पुस्तकाला महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वैचारिक साहित्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये ६,००० रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वर्धा येथील स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक व 'उपरा'कार लक्ष्मण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ करण्यात येईल, असे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहूल भस्मे, जिगिषा नारायणे यांनी कळविले आहे.

बुधवार, १८ मार्च, २०२६

सर्जनशीलतेची कमाल: यंग शेरलॉक



जगातील सर्वात लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक म्हणजे शेरलॉक होम्स. जो कधी जन्मलाच नाही, पण ज्याच्या अस्तित्वाच्या स्मृती जग आज त्याच्या साहित्यिक जन्माच्या दोनेक शतकांनंतरही जपतं, साजरं करतं, असा हा वल्ली. अगदी आधुनिक काळातील तंत्रज्ञान हाताशी आल्यानंतरही त्याचा तपास कशा पद्धतीचा असू शकेल, या दिशेनेही लेखन आणि मालिकांची निर्मिती झाली. त्या दर्शकप्रियही झाल्या. तथापि, शेरलॉक होम्स या पात्राची निर्मिती करताना सर आर्थर कॉनन डॉयल यांनी त्याच्या संपूर्ण आयुष्याचे तपशीलवार चरित्र लिहिले नाही. उलट त्यांनी विविध कथांमध्ये फक्त काही सूचक उल्लेख केले, जणू एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळाचे छोटे-छोटे तुकडे. या तुकड्यांमधून होम्सच्या पूर्वायुष्याची केवळ झलक मिळते. परंतु याच झलकांवर आधारित एक संपूर्ण साहित्यिक विश्व उभे करण्याचे काम लेखक ॲंन्ड्र्यू लेन यांनी केलं आहे. ते विश्वासार्ह वाटतं, खरं वाटतं, ही खरी त्यांच्या सर्जनशीलतेची कमाल आहे.
त्यांच्या लेखनावर आधारित 'यंग शेरलॉक' ही मालिका केवळ साहसकथा नाही; ती मूळ होम्स विश्वाचा सर्जनशील विस्तार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती मूळ कथांचा आदर राखत, त्यातील सूचक धाग्यांचं कल्पक रूपांतर करते.
डॉयल यांच्या कथांमध्ये होम्सच्या भूतकाळाबद्दल काही महत्त्वाचे संकेत वेगवेगळ्या कथांत विखुरलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास 'द ॲडव्हेंचर ऑफ ग्लोरिया स्कॉट' या कथेत होम्स आपल्या विद्यापीठातील दिवसांची आठवण सांगतो. त्याचा मित्र व्हिक्टर ट्रॅव्होर आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित घडलेल्या रहस्यामुळे होम्सला आपली विश्लेषणशक्ती गुन्हे तपासासाठी वापरता येते हे जाणवते. ही घटना त्याच्या गुप्तहेर कारकिर्दीची सुरुवात ठरते.
त्याचप्रमाणे 'अ स्टडी इन स्कार्लेट'मध्ये होम्स रसायनशास्त्राचे प्रयोग करताना दिसतो. यावरून त्याची वैज्ञानिक वृत्ती आणि प्रयोगशीलता दिसून येते. नंतरच्या कथांमध्ये त्याची निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास यांचा वारंवार उल्लेख येतो.
कुटुंबाबद्दलचा आणखी एक धागा म्हणजे त्याचा भाऊ मायक्रॉफ्ट होम्स. तो अत्यंत बुद्धिमान आणि सरकारी गुप्त यंत्रणेशी संबंधित असल्याचे सूचित केले आहे. या उल्लेखांमुळे होम्सचे बौद्धिक वातावरण कसे असेल, याची कल्पना येते.
या सर्व धाग्यांतून होम्सच्या पूर्वायुष्याचा एक आराखडा तयार होतो. एक विलक्षण बुद्धिमान, पण सामाजिकदृष्ट्या थोडा अलिप्त तरुण, ज्याची वैज्ञानिक जिज्ञासा आणि निरीक्षणशक्ती पुढे त्याला जगातील महान गुप्तहेर बनवते.
या सूचक उल्लेखांवर आधारित पूर्ण कथा उभारणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु लेखक ॲंन्ड्र्यू लेन यांनी ते अत्यंत कल्पकतेने केले आहे. 'यंग शेरलॉक' मालिकेत आपण होम्सला किशोरवयीन अवस्थेत पाहतो, जो अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही, मात्र त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेची चिन्हे येथे दिसताहेत.
मालिकेत त्याचे शिक्षण, त्याच्या आयुष्यात येणारे मार्गदर्शक, आणि त्याला भेटणारी धोकादायक साहसे यांचे चित्रण आहे. या अनुभवांमधून त्याची निरीक्षणशक्ती विकसित होते, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो, आणि गुन्हे उलगडण्याची आवड वाढते. मूळ कथांमध्ये दिसणाऱ्या प्रौढ होम्सच्या व्यक्तिमत्त्वाची बीजे या मालिकेत विकसित होताना दिसतात.
मालिकेतील सर्वात इंटरेस्टिंग कल्पना म्हणजे होम्स आणि त्याचा भविष्यातील शत्रू जेम्स मॉरियार्टी यांच्यातील संबंध. मूळ कथांमध्ये मोरीआर्टी हा गुन्हेगारी जगाचा अत्यंत बुद्धिमान सूत्रधार म्हणून दिसतो. परंतु या मालिकेत त्याला सुरुवातीला शेरलॉकचा मित्र म्हणून दाखवले आहे.
ही कल्पना साहित्यिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ती दाखवते की दोन असामान्य बुद्धिमत्ता वेगवेगळ्या दिशांनी कशी विकसित होऊ शकतात- एक न्यायाच्या मार्गावर आणि दुसरी सत्तेच्या आणि लोलुपतेच्या मार्गावर. अशा प्रकारे नायक आणि खलनायक यांच्या संघर्षाची बीजे त्यांच्या तरुणपणातच पेरली जातात.
यंग शेरलॉक होम्स मालिकेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील मानसशास्त्रीय सखोलता. मूळ कथांमध्ये होम्स अत्यंत तर्कप्रधान आणि भावनांपासून दूर दिसतो. मालिकेत या स्वभावामागील अनुभव दाखवून कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे वाचकाला प्रौढ होम्सच्या व्यक्तिमत्त्वाचा उगम समजतो. मालिकेने या व्यक्तिरेखेचा विकास दाखवला आहे.
या मालिकेचे मोठे यश म्हणजे ती दोन स्तरांवर अनुभवली जाऊ शकते. एका बाजूला ती किशोरवयीनांसाठी रोमांचक साहसकथा आहे. दुसऱ्या बाजूला मूळ होम्स साहित्याशी परिचित असलेल्या वाचकांसाठी ती एक प्रकारची साहित्यिक पुनर्रचना आहे.
मूळ कथांतील लहान-लहान संकेत, जसे की निरीक्षणशक्ती, वैज्ञानिक प्रयोग, मायक्रॉफ्टचा प्रभाव आणि मोरीआर्टीसोबतचा संघर्ष यांना लेखकाने विस्तृत कथानकात रूपांतरित केले आहे. त्यामुळे ही मालिका मूळ होम्स विश्वाचा आदर राखत त्याचा सर्जनशील विस्तार करते.
थोडक्यात, शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये आर्थर कॉनन डॉयल यांनी जाणीवपूर्वक किंवा नकळत दिलेले सूचक धागे जणू एका मोठ्या कथानकाची बीजे आहेत आणि त्या आधारे ॲंन्ड्र्यू लेन यांनी त्या बीजांपासून एक समृद्ध आणि रोमांचक विश्व निर्माण केले आहे.
म्हणून ही मालिका केवळ लोकप्रिय साहसकथा नाही; तर मूळ साहित्याशी संवाद साधणारी, त्याचा अर्थविस्तार करणारी आणि शेरलॉक होम्स या अमर पात्राच्या घडणीच्या अनुषंगाने नवा दृष्टीकोन देणारी एक आवर्जून पाहावी, अशी सर्जनशील निर्मिती आहे. त्यासाठी क्रिएटर मॅथ्यू पार्कहिल, दिग्दर्शक पीटर हार्नेस आणि गाय रिची यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे...
(ओटीटी: ॲमेझॉन प्राईम)

मंगळवार, १० मार्च, २०२६

कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीतील तारकादळ विद्यापीठात अवतरते तेव्हा...

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत (डावीकडून) प्रिया सरीकर, आरजे स्नेहा, आरजे रसिका, डॉ. आलोक जत्राटकर, शुभांगी तावरे, अनुराधा सरनाईक-कदम, इंदुमती गणेश आणि श्रद्धा जोगळेकर.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाच्या मुशीतून घडलेलं कोल्हापूर. इथं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं यशाची कमान निर्माण करणाऱ्या आणि उंचावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी नाही. स्त्री-सन्मान, स्त्रियांना समतापूर्ण सौहार्द लाभावा, यासाठी अनेक कायदेकानू करून तिची प्रतिष्ठा कायम करणाऱ्या या राजर्षींच्या वारशामुळं आजही कोल्हापुरात स्त्रिया आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालताना दिसतात. कोल्हापूरची वृत्तपत्रसृष्टी सुद्धा त्याला अपवाद नाही. फिल्डवर पुरूषांच्या बरोबरीनं आत्मविश्वासानं वावरणाऱ्या, किंबहुना कित्येकदा त्यांच्याहून काकणभर सरस कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारांची इथं कमी नाही. आज फिल्डवर, डेस्कवर आणि डिजीटल अशा मिळून साधारण पन्नासेक महिला, मुली कोल्हापूर शहरात कार्य़रत असतील. यातील अनेकींची कारकीर्द २० वर्षांहून अधिक काळची सुद्धा आहे. तसे पाहता कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीत स्वयंतेजाने तळपणाऱ्या या अशा तारका आहेत ज्या आजच्या युवा वर्गासाठी सच्च्या आयडॉल ठराव्यात.
सध्या शिवाजी विद्यापीठात प्रभारी प्र-कुलगुरूपदाची धुरा ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव यांच्याकडं आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठाला महिला प्र-कुलगुरू लाभलेल्या आहेत. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं या महिला पत्रकारांना विद्यापीठात आमंत्रित करावं आणि प्र-कुलगुरू मॅडमचा त्यांच्याशी औपचारिक, अनौपचारिक संवाद घडवून आणावा, अशी एक आंतरिक इच्छा मनी होती. ती १० मार्चच्या सायंकाळी फलद्रुप झाली. पत्रकारितेमध्ये ‘ड्युटी फर्स्ट’ हाच मूलमंत्र जपावा लागत असल्यानं अनेक महिला पत्रकार त्यांच्या असाईनमेंट्स, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळं उपस्थित राहू शकल्या नाहीत. तथापि, काही जणी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिल्या. नावंच सांगायची झाल्यास, इंदुमती गणेश, अनुराधा कदम-सरनाईक, प्रिया सरीकर, शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर, आरजे रसिका आणि आरजे स्नेहा. यातल्या प्रत्येकीनं स्वतःच्या कामाचा ठसा कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. तसं पाहता, त्या या फिल्डमधल्या खऱ्या स्टार आहेत. इंदुमती गणेश या मैत्रिणीच्या धाडसी पत्रकारितेला सलाम करीत असताना मी यापूर्वी स्वतंत्र पोस्ट लिहील्याचं आपल्याला स्मरत असेलच. तिच्यासह अनु, प्रिया, शुभांगी, श्रद्धा या प्रत्येकीचा पिंड वेगळा, कामाची पद्धत वेगळी असं असलं तरी सिन्सिरिटीच्या बाबतीत त्या साऱ्या सरस आहेत, कदाचित पुरूषांपेक्षाही अधिक. त्यामुळं त्यांच्या बायलाईन बातम्या आवर्जून वाचणारे वाचक आढळतात. तीच परिस्थिती आरजे रसिका आणि स्नेहा यांची. स्थानिक एफएम वाहिनीच्या माध्यमातून या दोघींचे आवाज प्रत्येक रेडिओ श्रोत्याला अतिशय चिरपरिचित असलेले. अतिशय संयमी, अभ्यासू आणि संदर्भांनी परिपूर्ण असे अनेक कार्यक्रम त्या सादर करतात. या निमित्ताने त्याही प्रथमच विद्यापीठात आल्या. या सर्वांमध्ये आणखी एक महत्त्वाचा धागा होता, तो म्हणजे त्या सर्व जणी शिवाजी विद्यापीठाच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे या चर्चेला एक वेगळीच आपुलकीची किनार होती.
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी या संवादासाठी साधारण अर्धा तासाची वेळ दिलेली होती. पण त्यांच्यात आणि या सर्व पत्रकार मैत्रिणींमध्ये संवाद असा काही रंगला की दीड तास कधी उलटून गेला, तेही समजले नाही. गंमतीचा भाग म्हणजे या साऱ्या जणींना मॅडमच्या संशोधनाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते, तर मॅडमना पत्रकारिता करीत असताना त्यांना येणारी आव्हाने, भेडसावणाऱ्या समस्या, समाज आणि सहकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक इत्यादी गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे होते. आणि त्या पद्धतीने अत्यंत अनौपचारिकपणे हा संवाद घडत गेला, उलगडत गेला. अंती साऱ्यांच्याच चेहऱ्यावर एक उत्तम भेट झाल्याचा आनंद झळकला. आणि मला लाभले एक चांगला संवाद घडवून आणल्याचे समाधान!!!

सोमवार, ९ मार्च, २०२६

समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती या विषयावर बोलताना...





परिसंवादादरम्यान डॉ. आलोक जत्राटकर यांच्या विविध भावमुद्रा

(डॉ. आलोक जत्राटकर यांचे सविस्तर व्याख्यान येथे ऐका.)


ईश्वरपूर इथं झालेल्या ३० व्या साहित्य संमेलनात आमचे मार्गदर्शक मित्र आणि मराठी अधिविभागाचे डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 'आजचे साहित्य, समाजमाध्यमे आणि वाचनसंस्कृती' या विषयावरील परिसंवादात सविस्तर मांडणी करण्याची संधी लाभली. सोबत समुपदेशक अर्चना मुळ्ये याही सहपरिसंवादक होत्या.
आज समाजमाध्यमांनी साहित्याच्या प्रसारात मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक, ब्लॉग आणि ऑनलाइन वाचनगटांमुळे साहित्यिक चर्चा अधिक व्यापक झाल्या आहेत. पूर्वी साहित्यिक चर्चा मुख्यतः नियतकालिके, परिसंवाद किंवा साहित्य संमेलनांपुरत्या मर्यादित असत. आज मात्र कोणताही वाचक सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू शकतो. यामुळे साहित्याभोवती लोकशाही स्वरूपाचा संवाद निर्माण झाला आहे.
नव्या डिजीटल युगात वाचनाचे स्वरूप बदलते आहे. नव्या पिढीचे वाचनाचे फॉर्म्स आणि रूची वेगळी आहे. मात्र, ती वाचत नाही, असे म्हणता येणार नाही. पुस्तक मेळ्यांमधील लाखो रूपयांची उलाढाल, लिट-फेस्टसारख्या उपक्रमांना तरूणांचा लाभणारा प्रतिसाद हे त्याचेच निदर्शक आहे.
पारंपरिक मुद्रित पुस्तकांबरोबरच डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. आज अनेक लोक दीर्घ कादंबऱ्यांपेक्षा लघुलेखन वाचणे पसंत करतात. वाचन ही आज सामूहिक चर्चेची प्रक्रिया बनली आहे. यातूनही अनेक सृजनात्मक साहित्यकृती निर्माण होत आहेत.
लेखन-वाचनापूर्वी अस्तित्वात असणारी श्रवण संस्कृती ही आता डिजीटल युगात पुनरुज्जीवित झाली असून स्टोरीटेल, ऑडिबल, कुकू इत्यादी प्लॅटफॉर्मवर आता पुस्तके ऐकण्याकडे कल वाढला आहे. जागतिक १५० अब्ज डॉलरच्या पुस्तक बाजारात १० अब्ज डॉलर इतका वाटा या ऑडिओ बुक्सचा आहे. या श्रवण संस्कृतीमध्ये स्मरण संस्कृतीचा मात्र ऱ्हास होत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे.
आज वाचनसंस्कृती एका संक्रमणाच्या टप्प्यात आहे. परंपरागत मुद्रित पुस्तकांची परंपरा अजूनही जिवंत आहे, परंतु डिजिटल माध्यमांमुळे वाचनाचे नवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. म्हणून आजचा प्रश्न “वाचनसंस्कृती टिकेल का?” असा नाही. खरा प्रश्न असा आहे—आपण वाचनसंस्कृतीला नव्या तंत्रज्ञानाशी कसे जोडणार? जर आपण परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधू शकलो, तर वाचनसंस्कृती अधिक व्यापक आणि समृद्ध होईल.
वाचन ही केवळ सवय नाही; ती संस्कृती आहे. वाचन ही केवळ माहिती नाही; ती विवेकी विचारांची निर्मिती आहे.
आणि विवेकवादी विचार करणारा समाजच आपल्या भविष्याचा खरा शिल्पकार असतो.
उपरोक्तप्रमाणे साधारणतः चाळीसेक मिनिटे मांडणी केली. समाजमाध्यमांवर सुरू असलेले वाचनसंबंधित उपक्रम, प्रत्यक्ष फिल्डवर सुरू असणारे उपक्रम यांचाही वेध घेतला.
महत्त्वाचे म्हणजे माझ्या या मांडणीचे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्रज्ञा दया पवार यांनीही कौतुक केले, ही माझ्यासाठी 'ट्रॅक'वर असल्याची पोचपावती. अनेक श्रोत्यांनीही स्वागत केले.
एकूणच, परिसंवाद चांगला रंगला आणि एका चांगल्या उपक्रमात सहभागाचे समाधानही देऊन गेला.

रविवार, ८ मार्च, २०२६

बाबा भारती यांच्या स्मृतींना पुरस्कार अर्पण!




माझे अण्णा ए.दा. कांबळे (गुरूजी), भन्ते दीपंकर आणि बाबा भारती.


(पुरस्कार प्रदान समारंभाची लघुचित्रफीत)



ईश्वरपूर (इस्लामपूर) येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या मराठी साहित्य संमेलनात काल (दि. ८ मार्च) संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते माझ्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित संग्रहाला लोकनेते राजारामबापू राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार-२०२५ प्रदान करून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी उद्घाटक सु. धों. मोहिते, स्वागताध्यक्ष प्रा. शैलजा यादव-पाटील, कार्यकारिणी अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी, प्रा. सुनील पाटील, सुभाष खोत, दशरथ पाटील, धर्मवीर पाटील आदींसह ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील, एकनाथ पाटील, रमजान मुल्ला, डॉ. शामसुंदर मिरजकर, चित्रकार अन्वर हुसैन, माझे मित्र डॉ. मुजफ्फर मुल्ला, विनायक ठोंबरे आदी उपस्थित होते.
हा पुरस्कार अत्यंत विनम्रतापूर्वक स्वीकारतानाच तो मी इस्लामपूरचे बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक कालकथित जगन्नाथ विष्णू तथा बाबा भारती यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण केला. बाबा भारती हे माझ्या आण्णांचे (आजोबा) अत्यंत जवळचे मित्र होते. दोघेही ‘राष्ट्र भाषा रत्न’ होते. त्यांच्या या स्नेहामुळे माझ्यासाठी ते ‘इस्लामपूरचे भारती आजोबा’च होते. त्यांचा पाली-मराठी शब्दकोष हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आला असून पाली भाषेच्या विशेषतः बौद्ध साहित्याच्या अभ्यासकांच्या तो आवर्जून संग्रही आहे. त्याखेरीज बाबा भारती यांनी समग्र बौद्ध संस्कार विधी सर्वसामान्य लोकांना समजावेत म्हणून अत्यंत गेयतापूर्ण मराठीत सादर केले. धम्मपदाचेही त्यांनी अत्यंत रसाळ आणि ओघवत्या मराठीत पद्यानुवाद केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशक माझे आजोबा आहेत. तर, त्याचे प्रकाशन इस्लामपूरमध्येच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
पाली भाषेच्या शब्दकोषाचे काम सुरू असताना दर शनिवारी शाळा सुटली की, भारती आजोबा सांगलीत आण्णांकडे येत. तेव्हा मी सांगलीतच शिकायला होतो. आजोबा आले की, जेवून हे दोघे पुस्तकाविषयी चर्चा करायला बसत. सायंकाळपर्यंत चर्चा चाले. शनिवारी सांगलीचा आठवडी बाजार असे. दोघे आवरुन बाजारात जात. भाजीपाला खरेदी करून त्या पिशव्यांसह जो कोणता नवा चित्रपट त्यावेळी लागलेला असेल, तो चित्रपट पाहात. चित्रपट पाहून झाला की घरी येत. जेवण झाले की पुन्हा रात्री उशीरापर्यंत चर्चा करीत बसत. रविवारी आईबाबा, मावश्या, मावसभाऊ वगैरे येत असत. बहुतेकदा सामिष भोजनाचा बेत असे. बरोबर बाराच्या भोंग्याला जेवायला बसत सारे. तासाभरात जेवण झाले की हे दोघे मित्र पुन्हा पुस्तकावर सायंकाळपर्यंत पुन्हा चर्चा करीत. पाच वाजता भारती आजोबा इस्लामपूरला परत जात आणि आजोबा बाजारात. अनेकदा मी त्यांच्या या चर्चांचा साक्षीदार झालो आहे. फारसं काही समजण्याचं ते वय नव्हतं, मात्र एखाद्या विषयावर, शब्दावर हे दोघे तासंतास कसे काय बरे चर्चा करू शकतात, याचे मला कुतूहल, त्याहूनही अधिक मौज वाटे. मी आण्णांच्या नाही तर भारती आजोबांच्या मांडीवर बसूनच ऐकत असे. रात्री त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतही असे. या दोन आजोबांचा सहवास मला खूप प्रिय होता. ते माझे लाडही खूप करायचे. त्यांच्याबरोबर मी अनेक चित्रपट पाहिले होते. एकदाच फक्त एक सस्पेन्स चित्रपट पाहिला होता. (बहुधा, ‘कब? क्यूँ? और कहाँ?’ असावा.) खूप घाबरलो होतो. त्यापुढचे दोन तीन आठवडे मी काही त्यांच्याबरोबर बाजारात गेलो नव्हतो.
पुढे मी कागलला आईवडिलांकडे आलो. तथापि, भारती आजोबा तिकडेही आम्हाला भेटायला येत. सांगलीइतक्या सातत्यानं भेटी होत नसल्या तरी भारती आजोबांविषयीचं प्रेम मात्र कायम मनात आणि सोबत राहिलं. आम्ही निपाणीचं घर बांधायला काढलं तेव्हा भूमीपूजनाला ते उपस्थित होते. मात्र, बांधून पूर्ण होण्याआधीच भारती आजोबांचं निधन झालं.
त्यांच्या अनेक स्मृती मनात आहेत. आजोबांच्या जलदान विधीनंतर प्रथमच काल मी इस्लामपूरला आलो होतो. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. ‘बाबा भारती सदन’ असे नाव दिले आहे घराला. त्यांचे पुतणेच केवळ भेटले. मुले बाहेरगावी असल्याने भेट होऊ शकली नाही. कालचा दिवस आजोबांच्या स्मरणरंजनात गेला. त्यांचे साहित्य, त्यांच्या आठवणी सोबत आहेत, हेच आयुष्यातील एक महत्त्वाचे संचित आहे. म्हणूनच त्या भूमीतील पुरस्कार त्यांच्या स्मृतींना अर्पण करीत असताना मनाला अतीव समाधान वाटते आहे.
(पुरस्कार छायाचित्र सौजन्य: विनायक ठोंबरे, मोतीराम पौळ)

पुरस्कार प्रदान समारंभाचा व्हिडिओ: https://youtu.be/xpxJKKl-wvc


मंगळवार, ३ मार्च, २०२६

माझ्या संस्कृतमाता ‘जेपीके’ मॅडम!

 

ज्योती प्रकाश कुलकर्णी

मित्र-मैत्रिणींनो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक अस्वस्थ दिवसांपैकी एक. याचे कारण म्हणजे ज्यांनी माझ्यावर निरतिशय प्रेम केले, त्या माझ्या संस्कृतच्या शिक्षिका, नव्हे, माझ्या संस्कृतमाता आदरणीय ज्योती प्रकाश कुलकर्णी अर्थात आम्हा विद्यार्थ्यांच्या लाडक्या जेपीके मॅडम यांचे अचानकपणे निधन झाल्याची वार्ता आज माझे काळीज चिरुन गेली. वयाच्या ७० व्या वर्षी तशी कोणतीही हिस्टरी नसताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्या गेल्या. आज दिवसभरात मॅडमच्या सान्निध्यातील अनेक स्मृती मनात गर्दी करून उभ्या आहेत. त्या कागदावर उतरल्याखेरीज या दुःखाचा भार हलका होणे नाही. म्हणून हा लेखनप्रपंच.

मॅडमचा मुलगा, माझा वर्गबंधू किरण याला गेल्या वर्षी मी माझे निखळ: जागर संवेदनांचा हे पुस्तक भेट दिले. ते घरी गेल्यावर त्याने मॅडमना दाखवले, तर मॅडमनी ते रात्रीत वाचून काढले आणि दुसऱ्याच दिवशी मला व्हिडिओ कॉल केला. खूप वेळ गप्पा मारल्या. नेहमीसारख्या प्रसन्नचित्त होत्या, जणू काही कालच निवृत्त झाल्या असाव्यात. माझं त्यांनी खूप कौतुक केलं, अभिमान व्यक्त केला आणि भेटायला ये निवांत एकदा, असं म्हणाल्या. मी खरंच खूप गांभीर्यानं हो म्हणालो, पण ते जमवू शकलो नाही. अवघं पाऊण तासाचं अंतर मी वर्षभरात कापू शकलो नाही. आज मॅडम गेल्यानंतर मात्र तितक्याच वेळात किरणला भेटायला पोहोचलो. मित्रांनो, माझं एकच सांगणं की, आपण या अनिश्चिततेच्या जगात आपल्या आपुलकीच्या माणसांना भेटत राहिलं पाहिजे. अन्यथा, आयुष्यभराची बोच सोबत घेऊन जगावं लागतं- जी मला आज सलते आहे.

जेपीके मॅडम यांच्याशी माझं खूप वेगळं नातं होतं. मोहनलाल दोशी विद्यालयात त्या माझ्या संस्कृतच्या गुरू खऱ्याच; पण, त्याही आधी त्या माझ्या लतामावशी होत्या. याचं कारण असं की, कागल विद्यालयाच्या (सध्याचं यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल) तत्कालीन मुख्याध्यापिका डिंगणकर बाई यांच्या त्या कन्या. आई त्या शाळेत शिक्षिका. बाईंमुळं जेपीके मॅडमची आणि आईची मैत्री. घरी येणं-जाणं. त्यामुळं त्या लहान वयात त्या माझ्या लतामावशी. पुढं अनेक वर्षांनी निपाणीत माझ्या शिक्षिका झाल्या. पण, त्यांचं माझ्यावरचं प्रेम मात्र तसंच.

नववीला मी निपाणीच्या मोहनलाल दोशी विद्यालयात प्रवेश घेतला. तिथं संस्कृत विषय आठवीपासून होता. पण माझ्या पूर्वीच्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये संस्कृत विषय नसल्याने माझा हिंदी विषय होता. इथे संस्कृत आहे म्हटल्यावर पूर्ण शंभर गुणांचे संस्कृत शिकायची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. पण मागील वर्षी काहीच न शिकल्याने हिंदी-संस्कृत असा प्रत्येकी ५० गुणांचा जोडविषय घेतला. माझी ही संस्कृतची ओढ लक्षात आल्यानं जेपीके मॅडमनी माझे आठवीचे संस्कृत तीन महिन्यांत करवून घेण्याचे ठरविले. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जायचो. स्वयंपाकपाणी करता करता त्यांनी मला मोफत संस्कृत शिकविले, व्याकरणाचा पाया पक्का करून घेतला. दोनेक महिन्यांतच त्यांनी मला इतरांच्या बरोबरीने आणून ठेवले. पुढेही दहावीपर्यंत आम्ही किती तरी मुलं त्यांच्या घरी शिकायला जायचो. पण, मॅडमनी कधी आमच्याकडून एक पैही शुल्क घेतले नाही. इतक्या निरलसपणाने त्यांनी संस्कृत भाषेची सेवा केली. आजच्या शिक्षकांच्या दृष्टीनं मोफत शिकविणाऱ्या जेपीके मॅडम वेड्याच ठराव्यात. पण मॅडमनी तसं वेडं असणं स्वीकारलं होतं. मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. त्यापोटी त्यांची सारी धडपड होती. शाळेच्या चार भिंतींच्या पलिकडलं शिक्षण देण्यासाठी आसुसलेलं मन त्यांच्याकडं होतं. त्यांच्या या शिकवण्यामुळंच पुढं बारावीपर्यंत शंभर मार्कांचं संस्कृत घेण्याचं धाडस मनी निर्माण झालं. त्या अर्थानं त्या माझ्या संस्कृतमाताच होत्या.

त्यांनी केवळ मला संस्कृत शिकवलं, असं नाही. तर, शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून सहभागी होण्याबरोबरच त्यांचं संचालन करण्याची संधीही त्यांनी त्या दोन वर्षांत मला दिली. अगदी गॅदरिंगच्या सूत्रसंचालनाचीही. त्या काळात त्यांनी नाटक, काव्यवाचन, गीतगायन यांसह मला तर कथाकथन करण्यासाठीही प्रोत्साहन दिलं. शंकर पाटील यांच्या दोन कथा त्यांनी माझ्याकडून बसवून घेतल्या आणि शाळेत त्या कथाकथनाचा एक स्वतंत्र कार्यक्रमही घडवून आणला होता. या साऱ्या प्रेरणा आजही माझ्या आत कुठंतरी सातत्यानं जिवंत आहेत. कारणीभूत केवळ जेपीके मॅडम.

सदैव हसतमुख, कधी कोणावर चिडणं नाही, रागावणं नाही की ओरडणं नाही. अगदी त्यांना एखाद्याला रागे भरावंसं वाटलं तरी तो राग लटकाच ठरे. फार काळ न टिकणारा. हसणं अगदी दिलखुलास आणि मनमुराद. निर्मळ आणि वात्सल्यानं ओतप्रोत. हे प्रेम पुढंही आम्हाला लाभत राहिलंच. माझ्या लग्नानंतर आम्हा नवदांपत्याला आवर्जून घरी बोलावून त्यांनी स्नेहभोजनाचा बेत रंगवला. प्रकाशकाका सुद्धा अत्यंत हसतमुख आणि दिलखुलास माणूस. थट्टामस्करी, क्वचित थोडे उपरोधिक चिमटे घेत पण बोचणार नाही असं बोलणं. या दोघांसोबत बसलं की, बोलणं कमी आणि पोटभर हसणंच होत असे. ते पुढच्या भेटीपर्यंत निश्चित पुरत असे.

इथून पुढं मात्र त्यांचं हसणं, असणं हे सारं आता स्मृतींच्या स्वरुपातच जपायचं. अशी माणसं आपल्याला दीर्घकाळ हवी असतात. काळाकडे मात्र त्या दीर्घाची लांबी कमीअधिक करण्याची ताकद असते. म्हणून माणसं असतानाच त्यांचं अस्तित्व साजरं करणं महत्त्वाचं असतं. अन्यथा, दुःखाखेरीज पदरी काही पडत नाही. काळच त्यावर औषध, पण अशा जखमांच्या खुणा मनावर कायम राहतात. त्याला कोणी काही करू शकत नाही. अशी माणसं, असे शिक्षक आता पुन्हा होणे नाहीत.

जेपीके मॅडमना भावपूर्ण श्रद्धांजली!