सोमवार, ४ मे, २०२६

विज्ञानवादाशिवाय सामाजिक परिवर्तन अशक्य: डॉ. प्रकाश पवार

 

डॉ. प्रकाश पवार



कोल्हापूर, दि. ४ मे: विज्ञानवादी विवेकनिष्ठ विचारसरणीचा प्रसार हा सामाजिक परिवर्तनासाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार आज केले. 

लोकशाही वाहिनीवरील डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत ते ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयावर बोलत होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी भारतीय समाजातील अंधश्रद्धा, परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील संघर्ष अधोरेखित केला.

महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या विचारांमधून विज्ञानवादी परंपरेचा विकास त्यांनी स्पष्ट केला. विवेकनिष्ठा, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगमच भारताच्या प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

डॉ. प्रकाश पवार यांनी भारतीय समाजरचनेतील विचारपरंपरा आणि वैज्ञानिक दृष्टी यांचा सखोल परामर्श घेतला. त्यांनी सांगितले की, विज्ञानवाद म्हणजे केवळ तांत्रिक प्रगती नसून ती एक जीवनदृष्टी आहे, जी तर्क, प्रयोग आणि पुराव्यावर आधारलेली असते. भारतीय समाजात आजही अंधश्रद्धा, रूढी आणि अवैज्ञानिक विश्वास यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणे गरजेचे आहे. समाजातील शिक्षण, माध्यमे आणि सार्वजनिक संवाद यामध्ये विज्ञानवादी विचार रुजविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्याख्यानादरम्यान त्यांनी विज्ञानवाद आणि मानवी मूल्ये यांचा संबंध स्पष्ट करताना, वैज्ञानिक दृष्टिकोन हा लोकशाही, समानता आणि मानवतावाद यांना बळकटी देणारा घटक असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञानवादी विचारसरणी स्वीकारणे अपरिहार्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला.

यावेळी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला आणि आभार मानले.

--

सविस्तर व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

https://youtu.be/z1CPpm8lL2k?si=vUxwl-DkuF15AOlQ

कीर्तावणी: पुनःपुन्हा अनुभवावी अशी सर्वांगसुंदर सांगितिका!

कोल्हापुरात गोविंदराव टेंबे सभागृहात 'कीर्तावणी'चा प्रयोग रंगला. सादरकर्ते ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे.

('कीर्तावणी'मधील एक सादरीकरण.)


 

कीर्तावणी- वारी आडवाटंच्या विठोबाची!’ या अतिशय नितांत सुंदर अशा सांगितिक प्रयोगाबद्दल एका वाक्यात सांगायचे झाल्यास, आजच्या समाजाच्या नरडीला लागलेल्या विविध प्रकारच्या प्रक्षिप्ततेच्या विषमुळीवर जालीम प्रबोधनडोस देणारा हा सर्वांगसुंदर सांगीतिक प्रयोग आहे, असे मी म्हणेन.

माझे युवा मित्र स्वामीराज भिसे यांनी हा प्रयोग करण्याची घोषणा केल्यापासूनच तो पाहण्याची मला मनापासून इच्छा होती. कारण आजच्या काळात प्रबोधनासाठी तळमळीने झटणारा हा तरुण वाचनसंस्कृतीपासून वक्तृत्वसंस्कृतीपर्यंत विविध उपक्रमांद्वारे नव्या पिढीत जागृती निर्माण करण्याचे काम करत आहे. अशा अनेक उपक्रमांत वेळोवेळी सहभागी होण्याची संधी त्याने मला दिली आहे. त्याखेरीज सचिन परब यांच्या रिंगणसाठी रिपोर्ताज लिहीण्याच्या निमित्ताने स्वामीराजने अनेक संतांच्या कार्यक्षेत्रांचा देशभरात फिरून धांडोळा घेतलेला आहे. त्यामुळेच कीर्तावणीमध्ये तो नेमके काय नवीन आणि अभिनव सादर करतो, याविषयी उत्सुकता होती. इचलकरंजी येथील प्रयोग काही कारणांमुळे पाहता आला नव्हता; मात्र कोल्हापुरातील शुभारंभाचा प्रयोग पाहण्याची काल संधी मिळाली. हर्षोल्हासाने मन भरून आले अन् ऊर अभिमानाने दाटून आला.

आपल्या संतपरंपरेने महाराष्ट्रासह भारतभूमीला दिलेले जे मूल्यसंपन्न देणे आहे, त्याचे नेमके स्वरूप या प्रयोगातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबारायांपर्यंत सर्वच संतांच्या शिकवणीचे साररुप जणू सादरकर्ते श्रोत्यांच्या काना-मनांत ओतप्रोत भरण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्यांच्या मनावर गारुड करणाऱ्या चमत्कारप्रधान संकल्पनांचेही वैज्ञानिक पद्धतीने निरूपण करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न या प्रयोगात दिसतो. त्यामुळे हा प्रयोग खरोखरच वेगळ्या धाटणीचा ठरतो.

यात स्वामीराज यांना लेखिका-दिग्दर्शिका ऋचिका खोत यांची केवळ साथ नाही, तर या प्रयोगाचा तोल सांभाळण्याची मोलाची भूमिका अत्यंत दमदारपणे केली आहे. कीर्तन आणि बतवणी यांचा सुंदर संगम साधत ही ‘कीर्तावणी’ प्रेक्षकांसमोर साकार होऊ लागते. त्यामध्ये रोध, अवरोध, प्रतिरोध आणि गतिरोध यांचा विचारपूर्वक मेळ घालून संतपरंपरेचे महत्त्व विषद करणारा एक प्रशस्त विचारमार्ग उभा केला आहे. ऋचिका खोत यांनी लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण या तिन्ही स्तरांवर कमाल केली आहे. त्यांच्या सादरीकरणातील वैविध्य, व्हॉइस मॉड्युलेशन, नृत्य, गायन आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.

स्वामीराज आणि ऋचिका यांच्यातील ‘गिव्ह अँड टेक’सह मंचावरील ऊर्जाभारित वावर विशेष उल्लेखनीय आहे. स्वामीराज यांनी आपल्या बाळसेदार देहासह जोमदार उर्जेने केलेले नृत्य-गायनाचे लयबद्ध सादरीकरण पाहून थक्क व्हायला होते. विशेष म्हणजे, भर उन्हाळ्यात पाण्याचा थेंबही न घेता इतक्या ताकदीने हा प्रयोग सलग दोन तास सादर करणे हेच माझ्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. त्यामुळे कीर्तावणीसाठी ‘हॅट्स ऑफ’ याशिवाय दुसरा शब्द सुचत नाही.

‘कीर्तावणी’च्या निमित्ताने ऋषिकेश देशमाने यांचेही विशेष कौतुक करावेसे वाटते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या किरण माने यांच्या स्टोरी शिवराज्याभिषेकाचीसारख्या विविध प्रयोगशील उपक्रमांमध्ये त्यांचा वाढता सक्रिय सहभाग असून, कोल्हापूरचे एक आश्वासक संगीतदिग्दर्शक म्हणून ते पुढे येत आहेत, ही माझ्यासाठी आश्वासक बाब आहे. प्रचंड पोटॅन्शियल आहे त्यांच्यात. त्याचे ते निश्चित चीज करतील, अशी अपेक्षा आहे.

प्रयोगाबद्दल अधिक तपशीलात लिहून त्याची मजा कमी करावी, असे वाटत नाही; मात्र प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा, असे निश्चितपणे सांगावेसे वाटते. आपण वारकरी परंपरेचे अनुयायी असाल किंवा नसाल, तरीही ‘कीर्तावणी’चा अनुभव एकदा तरी घ्यावाच.

येथे मला विनायक होगाडे याचीही आठवण येते. त्यांच्या ‘तुकोबा किंवा विठोबा मिसिंग’सारख्या कादंबऱ्यांतून त्यांनी संतपरंपरेचा आधुनिक संदर्भात घेतलेला वेधही असाच नितांतसुंदर उल्लेखनीय आहे. या नव्या पिढीकडून होणारे हे प्रयोगशील ‘एक्सप्लोरेशन’ अत्यंत महत्त्वाचे आहे. जुन्या परंपरेला नव्या पद्धतीने सादर करताना त्यातील ताजेपणा, सुसंगतता आणि आजच्या काळाशी ते घालू पाहात असलेली सांगड खूप महत्त्वाची आहे.

समकालीन वास्तव कितीही गुंतागुंतीचे असले, तरी स्वामीराज, ऋचिका आणि विनायक यांसारखी तरुण मंडळी माणुसकीचा आणि मूल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ताकदीने करत आहेत, हे किती मोलाचे! काल ‘कीर्तावणी’चा २९ वा प्रयोग सादर झाला असला, तरी पुढे याचे अनेक प्रयोग व्हावेत आणि अधिकाधिक लोकांनी हा अनुभव घ्यावा, अशी अपेक्षा आहे. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर अंतर्मुख करणारा, विचारप्रवर्तक असा हा गंभीर प्रयोग आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून ही कीर्तावणी अनुभवावी, असे आवाहन मी निश्चितपणे करेन. 

शनिवार, २ मे, २०२६

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार

डॉ. भालचंद्र काकडे

डॉ. प्रकाश पवार


कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता ‘आ’लोकशाही’ (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून हे व्याख्यान प्रसारित होणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ. आलोक जत्राटकर यांनी दिली.

दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा पाचवा स्मृतिदिन असून त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयातून डॉ. पवार विज्ञाननिष्ठ विचारसरणी, समाजजीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय परंपरेतील विवेकनिष्ठ प्रवाह यांचा परामर्श घेणार आहेत.

डॉ. प्रकाश पवार हे महाराष्ट्रातील प्रख्यात राजकीय विश्लेषक असून त्यांनी राज्यातील सामाजिक-राजकीय घडामोडींवर सखोल अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील त्यांचे चरित्रग्रंथ विशेष गाजले आहेत. विविध माध्यमांमधून ते सातत्याने प्रबोधनपर लेखन व व्याख्याने देत असतात. समकालीन राजकारण, इतिहास आणि समाजरचना यांचा परस्परसंबंध उलगडून सांगण्याची त्यांची शैली अभ्यासकांमध्ये लोकप्रिय आहे.

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही विज्ञान विषयाला वाहिलेली असून गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षवेधक व्याख्याने या व्याख्यानमालेत झाली आहेत. ही व्याख्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी प्रतिसाद देऊन ऐकली आहेत. सदर व्याख्यानमाला ‘आ’लोकशाही’ या युट्यूब वाहिनीवरून प्रसारित होणार असून प्रेक्षकांना @alokshahi या वाहिनीवर जाऊन त्यामध्ये सहभागी होता येईल. अगर पुढील लिंकद्वारेही सहभागी होता येईल.

https://youtu.be/z1CPpm8lL2k?si=78zLC8UgX225Eagw


बौद्ध स्थापत्य वारशाचे जतन व संवर्धन अत्यावश्यक: डॉ. कपिल राजहंस

डॉ. कपिल राजहंस


कोल्हापूर, दि. २ मे: बौद्ध स्थापत्य हा भारतीय सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा असून त्याचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. कपिल राजहंस यांनी केले. डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या वाहिनीद्वारे आयोजित बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत बौद्ध स्थापत्य कला या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. राजहंस यांनी आपल्या भाषणात बौद्ध स्थापत्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना सांगितले की, स्तूप, चैत्यगृह आणि विहार ही केवळ धार्मिक स्थळे नसून बौद्ध तत्त्वज्ञान, समाजरचना आणि ज्ञानपरंपरेची साक्ष देणारी केंद्रे आहेत. या स्थापत्य रचनांमध्ये प्रतीकात्मकता, भूमितीय अचूकता आणि पर्यावरणाशी सुसंगत नियोजन दिसून येते. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध स्थापत्याला मोठी चालना मिळाली असून देशभर उभारण्यात आलेले स्तूप आणि शिलालेख हे त्या वैभवाचे द्योतक आहेत. या वारशामुळे भारताची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या काळात नागरीकरण, दुर्लक्ष आणि अपुऱ्या संवर्धनामुळे अनेक बौद्ध वारसा स्थळे धोक्यात आली आहेत, याबाबत डॉ. राजहंस यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासन संस्था, पुरातत्त्व विभाग, संशोधक आणि स्थानिक नागरिक यांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

नव्या पिढीमध्ये या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश करणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून संवर्धनाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्ध स्थापत्य हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून मानवी मूल्ये, शांती आणि सहअस्तित्वाचा संदेश देणारा जिवंत वारसा आहे, असेही राजहंस यांनी सांगितले.

डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला आणि आभार मानले. 

--

(सविस्तर व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. - https://youtu.be/CM8X4haMvqo?si=DWgIGkE0IpjTEBb2)


रविवार, २६ एप्रिल, २०२६

प्रतिष्ठेचा नारायणे पुरस्कार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या स्मृतींना अर्पण!

वर्धा येथे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात येणारा वैचारिक साहित्यासाठीचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार 'उपरा'कार पद्मश्री डॉ. लक्ष्मण माने यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) स्नेहलता नारायणे, डॉ. प्रदीप नारायणे, डॉ. सखाराम डाखोरे, डॉ. सूरज चौगुले, विलासराव देशमुख, प्रदीप दाते, दिवाकर आचार्य आणि स्मिता दातार.











वर्धा येथे काल (शनिवार, दि. २५ एप्रिल) मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय वैचारिक साहित्याचा वाङ्मय पुरस्कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते स्वीकारण्याचा सन्मान मला लाभला.
हा पुरस्कार प्रदान सोहळा अत्यंत भव्य, दिमाखदार आणि मनात दीर्घकाळ ठसा उमटवणारा ठरला. वर्ध्यातील बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात, मूळ आसनक्षमतेपलीकडे अतिरिक्त व्यवस्था करूनही, आणि त्याही पुढे उभ्या राहून कार्यक्रम ऐकणाऱ्या रसिकांच्या उपस्थितीत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी दिलेला प्रतिसाद खरोखरच उल्लेखनीय होता.
आम्ही केवळ पाच पुरस्कार विजेते असताना, आमच्या सन्मानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणे, हीच नारायणे प्रतिष्ठानची खरी कमाई आहे, असे मला मनापासून वाटते. अवघ्या पाच वर्षांत या प्रतिष्ठानने निर्माण केलेला विश्वास आणि सामाजिक सन्मान विशेष उल्लेखनीय आहे.
या सोहळ्याच्या यशामागे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे आणि कार्यकारिणीतील प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहुल भस्मे, जिगीषा नारायणे यांच्यासह पुरस्कार संयोजन समितीचे श्रीकांत पेटकर, डॉ. संदीप भेले, किशोर पेटकर, सूर्यकांत पाटील यांचे परिश्रम अत्यंत मोलाचे आहेत.
विशेषतः, पुरस्कार विजेत्यांसाठी राहण्यापासून ते सेवाग्राम आणि आनंदवन दर्शनापर्यंतची केलेली आदरपूर्वक व्यवस्था हा एक वेगळाच आणि प्रेरणादायी अनुभव होता. केवळ पुरस्कार देणे नव्हे, तर पाहुणचाराची ही समृद्ध परंपरा जपण्याचा त्यांचा दृष्टिकोन निश्चितच अनुकरणीय आहे.
या सर्व अनुभवांमुळे हा पुरस्कार आज राज्यभरात एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानबिंदू बनत असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
हा सन्मान स्वीकारताना माझ्या मनात आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ इतिहासकार आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या स्मृती तेवत होत्या. या भावनेतून हा पुरस्कार मी त्यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करीत आहे.
या सन्मानासाठी आणि प्रेमासाठी मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!
या निमित्ताने मित्रवर्य मंगेश वरकड, बुद्धदेव मिरगे यांची बऱ्याच कालावधीनंतर आनंददायी भेट झाली, हेही महत्त्वाचे!

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

'समाज आणि माध्यमं': नवमाध्यमनिर्मित प्रश्नांना वाचा फोडणारा वैचारिक आवाजग्रंथ


वर्धा इथे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन चळवळीत अग्रेसर असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानने 'समाज आणि माध्यमं' या ग्रंथाला वैचारिक साहित्यासाठीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार - २०२६ प्रदान करीत असताना ज्या शब्दांत या साहित्यकृतीचा गौरव केला आहे, तो निश्चितच प्रेरणादायी आहे.


या सन्मानपत्रात म्हटले आहे की,
"मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान, वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा मारोतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार-२०२६ आपल्या अक्षर दालन प्रकाशन, कोल्हापूर द्वारा प्रकाशित 'समाज आणि माध्यमं' या वैचारिक लेखसंग्रहाला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.
चिकित्सक आणि संशोधक वृत्तीचे पत्रकार, परखड वक्ते, माणसे जोडणारे उत्तम संघटक, बुद्धिवादाचा पुरस्कार करणारे लेखक, सातत्यपूर्ण लेखन करणारे ब्लॉगलेखक आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आपली ओळख आहे. 'समाज आणि माध्यमं' हा आपला वैचारिक लेखसंग्रह बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सिद्ध झालेला समाजऐवज आहे.
'समाज आणि माध्यमं' हा वैचारिक ग्रंथ नव्या माध्यमांच्या प्रवेशानंतर समाजामध्ये झालेल्या उलथापालथींचा नेमकेपणाने वेध घेतो. या पुस्तकात डिजिटल युगातील स्मार्ट एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण, सोशल मिडियातील उलाढाली, समाजमाध्यमे आणि ट्रोलिंग, भारतातील टेलि-कम्प्युटर क्रांती, विश्वव्यापी माध्यमांतर, लिव्ह इन, पोर्नग्रस्त पौगंड, निवडणुका आणि प्रसारमाध्यमे, आयुष्याचा गेम करणाऱ्या गेम्स, अनसोशल षडयंत्राचा पर्दाफाश, या आजच्या समाजातील अत्यंत संवेदनशील मुद्द्‌द्याचा आपण परिणामकरीत्या वेध घेतलेला आहे. नवमाध्यमांनी निर्माण केलेल्या नवनवीन प्रश्नांना वाचा फोडणारा एक वैचारिक आवाजग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करता येईल. महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. यात सुधारणावादी आणि परिवर्तनवादी विचारवंतांनी वैज्ञानिक दृष्टीने लेखन करून सातत्याने समाजामध्ये जागृतीचे कार्य केले आहे. आपल्या या पुस्तकामुळेसुद्धा जागृतीचे मोठे कार्य होणार आहे यात दुमत नाही. हा समाज विचारशील व्हावा आणि लोकांच्या मनांमध्ये विवेकनिष्ठ जाणिवांची बिजे रोवली जावी हा प्रामाणिक प्रयत्न आपण अशा पुस्तकांच्या माध्यमातून सातत्याने करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
या पुस्तकाची भाषा अत्यंत सुगम आहे. सोपी उदाहरणे देऊन आपण हा विषय अत्यंत सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितला आहे. वाढत्या नवमाध्यमांनी समाजासमोर काही आव्हाने उभी केलेली आहेत. अशा काळात आपले समाज आणि माध्यम हे आपले वैचारिक पुस्तक निश्चितच समाज जागृतीचे कार्य करेल, अशी आम्हाला खात्री आहे.
आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी समाज आणि माध्यम या पुस्तकासाठी मारोतराव नारायणे स्मृति राज्यस्तरीय वैचारिक साहित्य पुरस्कार 2026 आपणास आम्ही सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत.
पुढील उज्वल वाङमयीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!"
... जबाबदारी वाढली आहे, या जाणीवेसह नारायणे प्रतिष्ठानचे आभार मानायला हवेत!

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

डॉ. श्रीकृष्ण महाजन: फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा इंटेलेक्चुअल मार्गदर्शक

(शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी अपघातात जखमी झाल्याने उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!)




शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या अकाली निधनामुळे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा समकाळातील एक अत्यंत महत्त्वाचा असा इंटेलेक्चुअल मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
डॉ. महाजन यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विविध मंचांवरून आपल्या मुख्य विषयाबरोबरच चळवळीच्या संशोधन संदर्भानेही फार महत्त्वपूर्ण काम केले. डॉ. महाजन आंबेडकरी विचारांचे सच्चे पाईक होते. त्यांनी केंद्राच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम विषयांवर प्रख्यात तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा , परिषदा आयोजित करण्यासह विविध विषयांवरील महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि संविधानाविषयी जनजागृतीपर अनेक उपक्रम राबविले. विद्यापीठासह महाविद्यालयांत 'संविधान दूत' उपक्रम ही त्यांचीच संकल्पना. संविधानविषयक अभ्यासक्रम, संविधान प्रश्नमंजुषा, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले. या सर्व उपक्रमांत मलाही अतिशय हक्काने सामावून घेतले, हे त्यांचे प्रेम!
महाजन सरांसमवेत कोणत्याही विषयावर चर्चा करणे हा इंटेलेक्चुअल एनरिचमेंटचा भाग असे. अनेक नवे मुद्दे त्यांच्याकडून माहिती होत असत. अनेक शंकांचे निरसन होत असे. अतिशय शांत, संयत आणि नेमकेपणाने ते आपले म्हणणे मांडत असत. चेहऱ्यावर सदैव एक हलकेसे स्मित असे त्यांच्या. कामाचा कितीही व्याप असो, कधीही त्यांना संत्रस्त झालेले पाहण्यात आले नाही. अनेक क्लिष्ट विषयांच्या अनुषंगानेही त्यांच्याकडे स्पष्टता असे. म्हणजे आकलन आणि विश्लेषण या बाबतीत ते खूपच पुढे असायचे. बरे, केवळ शैक्षणिक, संशोधकीय अगर प्रशासकीय बाबींतच नव्हे, तर विविध सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही त्यांचा लक्षवेधी वावर असे. ते स्वतः एक कवी होते. त्यामुळे भोवतालाकडे अत्यंत तरल आणि संवेदनशीलपणे पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. वेगवेगळे मुखवटे चढवून जगाला प्रत्यक्षाहूनी वेगळाच चेहरा दाखविणाऱ्यांची मांदियाळी आसपास वाढत असतानाच्या काळात प्रामाणिक चेहऱ्याने वावरणारा चळवळीचा आणि माझाही एक सच्चा मार्गदर्शक गेल्याचे हे दुःख फार फार मोठे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!