बुधवार, १५ एप्रिल, २०२६

सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी जातिनिर्मूलन आवश्यक: डॉ. आलोक जत्राटकर

कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रमात बोलताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर डॉ. शरद गायकवाड आणि प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी.





कोल्हापूर, दि. १५ एप्रिल: भारतात खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी संपूर्ण जातिनिर्मूलन आणि एकमेकांकडे केवळ माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन अंगिकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी आज येथे केले.

येथील महावीर महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “फुले–आंबेडकर यांच्या विचारकार्याची प्रस्तुतता” या विषयावर विशेष व्याख्यान देताना ते बोलत होते.

फुले–शाहू-आंबेडकर ही केवळ नावे नसून या देशाच्या प्रबोधनपर्वाची ती एक व्यापक मूल्यव्यवस्था असल्याचे सांगून डॉ. जत्राटकर म्हणाले, आजच्या समाजात जातीयवाद, राजकीय स्वार्थ आणि सामाजिक विसंगती यांचे प्रमाण अतिरेकी वाढले आहे. फुले–शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार करूनच समाज अधिक समताधिष्ठित आणि प्रगत होऊ शकतो. या त्रयीचे कार्य केवळ एका घटकापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची मूल्ये देणारे आहे. आपण या महामानवांना पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित ठेवतो; मात्र त्यापलिकडे त्यांच्या विचारांचा अभ्यास आणि आचरण ही काळाची गरज आहे.

ते म्हणाले, महात्मा फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले, तसेच त्यांनी विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक सुधारणांचे व्यापक आंदोलन उभे केले. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले संघर्ष हे केवळ एका समाजघटकासाठी नव्हते, तर संपूर्ण भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी होते. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला त्यांनी समान हक्क, प्रतिष्ठा आणि न्याय दिल्याचे नमूद केले. 

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी म्हणाले, समोरच्या प्रत्येक व्यक्तीकडे केवळ जातीच्या दृष्टीने पाहणे आता सोडून दिले पाहिजे. प्रत्येकाने माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांच्या चरित्रांचे, विचारकार्याचे सतत वाचन, चिंतन आणि अनुसरण करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी डॉ. शरद गायकवाड यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि परिचय करून दिला. डॉ. संध्या जाधव आणि डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. हेमंत पाटील यांनी आभार मानले. यावेळी नामदेवराव कांबळे, डॉ. शिरीष शितोळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे मित्र नवल भथेना

 (सन्मित्र प्रकाश लिंगनूरकर यांच्या 'दै. वार्ता सम्राट'मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध झालेला विशेष लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


नवल भथेना यांचे १९७० च्या दशकातील छायाचित्र (मूळ छायाचित्र कृष्णधवल होते, त्यावरुन रंगीत केले आहे.)


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान कार्यामुळे त्यांना जगभरात अक्षरशः कोट्यवधी अनुयायी लाभले. त्यांच्या हयातीमध्ये त्यांना अत्यंत प्रामाणिक अनुयायी लाभलेच, पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही आजतागायत त्यांच्या विचारकार्याने प्रभावित होऊन त्यांचे वैचारिक अनुयायित्व पत्करणाऱ्यांची संख्याही जगभरात वाढतेच आहे. कोट्यवधी अनुयायी लाभले तरी मित्र, सखा म्हणावा, अशी ओलाव्याची, स्नेहाची ठिकाणं त्यांच्या आयुष्यात फार कमी आली. मित्र म्हणावेत असे अगदी अत्यल्प स्नेही त्यांना लाभले. नवल भथेना हे त्यापैकी एक फार महत्त्वाचं नाव, जे खऱ्या अर्थानं मित्र या अतिव्याप्त संकल्पनेचे मूर्तीमंत स्वरुप बाबासाहेबांच्या आयुष्यात होते. अत्यंत निस्वार्थ, निर्मळ आणि आपल्या मित्राच्या मदतीसाठी सदैव तत्पर असं हे व्यक्तीमत्त्व होतं.

नवल भथेना यांच्याविषयी सर्वप्रथम वाचलं ते धनंजय कीर यांनी लिहीलेल्या बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये. त्यानंतर आदरणीय विजय सुरवाडे सरांनीही त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात भथेना यांच्याविषयी छोटं चरित्रात्मक टिपण लिहीलंय. या व्यतिरिक्त भथेना यांच्याविषयी फारसे काही हाती लागत नाही. अगदी अलिकडे मुंबईतील मिड-डे या टॅब्लॉईड दैनिकामध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्याविषयी एक छान लेख प्रसिद्ध करण्यात आला. सनोबर कीश्वर यांनी लिहिलेल्या त्या लेखामध्ये प्रथमच मला भथेना यांच्या कुटुंबाविषयी वाचावयास मिळाले. १९५६ मध्ये आंबेडकरांच्या निधनानंतर, या दोन्ही कुटुंबांमधील संपर्क तुटला. भथेना यांना रोशनी नावाची एक मुलगी होती. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांची पत्नी मोतीबाई यांचेही निधन झाले. या दोन्ही कुटुंबांमधील संपर्क सन २०२४मध्ये पुन्हा प्रस्थापित झाला. मुंबईत बाबासाहेबांची नात रमा आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली. पुण्याचे पत्रकार आणि दलित कार्यकर्ते केशव वाघमारे यांनी भथेना यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून कीश्वर यांचा संपर्क परवीन सोहेल जरीवाला यांच्याशी झाला; त्या रोशनी यांच्या एकुलत्या कन्या असून, सध्या सुरत येथे वास्तव्यास आहेत. त्या विधवा असून त्यांना एक मुलगी आहे. ही नवी माहिती कीश्वर यांनी या लेखात दिली आहेच; पण, महत्त्वाचे म्हणजे नवल भथेना यांचे १९७०च्या दशकातील एक दुर्मिळ छायाचित्रही या लेखामध्ये त्यांनी छापले आहे. भथेना यांच्याविषयी लिहीण्यापूर्वी ज्यांनी बाबासाहेबांशी असणारे त्यांचे मैत्र अधोरेखित करून नोंदविले, त्यांच्याविषयी कृतज्ञभाव सुरवातीलाच व्यक्त करणे मला अगत्याचे वाटते.

भीमराव रामजी आंबेडकर हे जेव्हा कोणीच नव्हते, म्हणजे डॉक्टर, बाबासाहेब, घटनाकार किंवा मंत्रीही नव्हते, तिथपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत अत्यंत निरलस मैत्रभावातून त्यांच्यासोबत सातत्याने राहणारे असे त्यांचे एकमेव मित्र म्हणजे नवल भथेना. ते बाबासाहेबांचे अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातील सहाध्यायी होते. बडोद्याच्या छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराजांच्या शिष्यवृत्तीमुळे भीमराव अमेरिकेला उच्चशिक्षणासाठी गेले. तेथे त्यांची भेट भथेना यांच्याशी झाली. २१ जुलै १९१३ रोजी न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर ते कोलंबिया विद्यापीठाच्या हार्टले हॉल डॉर्मेटरी या वसतिगृहात साधारणतः आठवडाभर राहिले होते. मात्र तेथील अर्धेकच्चे अन्न आणि बहुतांश पदार्थ गोमांसाचे असल्याने त्यांना ते काही मानवले नाही. प्रकृती बिघडल्याने त्यांनी भारतीय विद्यार्थी राहात असलेल्या कॉस्मोपॉलिटन क्लब येथे आपला मुक्काम हलवला. तेथूनही पुढे ते लिव्हिंगस्टन हॉल डॉर्मेटरीमध्ये राहायला गेले. या ठिकाणी त्यांची नवल भथेना यांच्याशी प्रथम भेट झाली. भथेना हे उपयोजित रसायनशास्त्र (इंडस्ट्रीयल केमिस्ट्री) या विषयाचे विद्यार्थी होते, तर भीमराव राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांच्यात चर्चेसाठी सामायिक असे विषय नसले तरी तेथील इतर महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत भथेना यांचे बाबासाहेबांशी चांगले मैत्र जमले होते. भथेना हे पारशी असल्यामुळे हिंदूंमधील जातिभेदाच्या भावनेपासून ते अलिप्त होते. त्यामुळेही कोणत्याही पूर्वग्रहाविना भीमरावांना त्यांनी आपलेसे मानले. भथेना सुखवस्तू पारशी कुटुंबातील असले तरी अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान अंशकालीन नोकरी करीत. भीमरावांना मात्र प्रचंड अभ्यास करावयाचा असल्याने ते शिष्यवृत्तीमधील ८० रुपये घरी पाठवल्यानंतर उरलेल्या रकमेत काटकसरीने आपला खर्च चालवत. त्यातही वाचन आणि पुस्तक खरेदीची भूक अधिक असल्याने प्रसंगी पोट मारून ते या दोन गोष्टी करीत. बहुतेकदा त्यांना मांसाचा तुकडा, पाव आणि एखादी कॉफी यावरच दिवसभराची भूक भागवावी लागे. भथेनाही त्यांच्यासोबत असत.

या मैत्रीचे आणखी एक कारण म्हणजे भथेना यांच्या राजकीय विचारांशी जुळलेले भीमरावांचे सूर. भथेना हे त्यांच्या समाजातील अशा एका लहान गटाचे प्रतिनिधित्व करत होते — ज्याचे नेतृत्व दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता आणि दिनशा वाच्छा आदी महत्त्वाचे नेते करत होते आणि ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या नेत्यांना याची तीव्र जाणीव होती की, पारशी लोकांनी आपली मूळ वांशिक ओळख कायम राखूनही भारतीय अस्मितेशी एकरूप होणे, हे केवळ तेव्हाच शक्य होईल, जोपर्यंत नव्याने आकार घेत असलेले भारतीय राष्ट्र हे हिंदूंच्या सामाजिक-धार्मिक प्रभावापासून अलिप्त राहील. भथेना हे त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस'कडे आकर्षित झाले होते आणि पुढे वाच्छा हेच त्यांचे मार्गदर्शक बनले.

एच.पी. मोदी यांचे एक पुस्तक आंबेडकरांच्या वाचनात आले. त्याने ते भारावून गेले. त्या पुस्तकाचे लेखक हिंदू आहेत की पारशी याविषयी त्यांना जाणून घ्यावयाचे होते, म्हणून त्यांच्या वतीने भथेना यांनी सर दिनशा वाच्छा यांना पत्र लिहीले. या काळात या उभय मित्रांचा वाच्छा यांच्याशी उत्तम पत्रव्यवहार प्रस्थापित झाला. भथेना जेव्हा मुंबईला परतले, तेव्हा वाच्छा यांनी त्यांना त्यांच्या औद्योगिक केमिस्टच्या व्यवसायात त्यांना मदत केली. आंबेडकरांविषयीही त्यांना कुतूहल होते. पुढे आंबेडकर जेव्हा सिडन२हॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या जागेसाठी खटपट करीत होते, तेव्हा वाच्छा यांनीही त्या कामी त्यांना मदत केली होती.

बडोदा सरकारने उच्च परदेशी शिक्षणासाठी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या कराराची मुदत संपल्याने लंडनमधील विद्याभ्यास अर्धवट सोडून बाबासाहेबांना भारतात परतावे लागले. आणि करारानुसार ते बडोदा सरकारच्या सचिवालयात महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नोकरीत रूजू झाले. पण, तेथे जातीभेदामुळे त्यांना पावलोपावली अवहेलना आणि अपमान सहन करावा लागला. बडोद्यात त्यांना राहावयासही कोणी जागा देई ना. अखेरीस जहांगीरजी धनजीभाई हॉटेलवाला या पारशी गृहस्थाच्या हॉटेलात त्यांना अडगळीच्या खोलीत रात्री पाठ टेकण्यापुरती जागा मिळाली, तेही एदलजी सोराबजी असे पारशी नाव धारण केल्यानंतर. मात्र, तेथेही बिंग फुटले आणि काही पारशी गृहस्थानी हातात काठ्या घेऊन त्या हॉटेलवर आंबेडकरांविरोधात हुल्लड माजविली. अखेरीस गिऱ्हाईक तुटण्याच्या भितीने त्या मालकाने त्यांना जागा सोडण्यास सांगितले. आंबेडकरांनी त्यांच्याकडून आठ तासांची मुदत मागितली. मात्र, त्या कालावधीत काहीच व्यवस्था होऊ न शकल्याने मोठ्या व्यथित अंतःकरणाने त्यांनी बडोदा सोडले आणि सप्टेंबर १९१७मध्ये मुंबईस परतले.

चार वर्षांत उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी आंबेडकरांना लंडनला परत जायचे होते. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे गरजेचे होते. यावेळीही भथेना त्यांच्या मदतीला धावून आले. तोवर भथेना यांनी मुंबईत सात रस्ता येथे एक रासायनिक कारखाना काढला होता. त्याचप्रमाणे ते शेअर बाजाराचा व्यवसायही करीत असत. डॉ. आंबेडकरांचा चरितार्थ चालावा म्हणून भथेना यांनी त्यांना काही पारशी विद्यार्थ्यांच्या शिकवण्या मिळवून दिल्या. तसेच त्यांची बाटलीबॉय इन्स्टिट्यूट ऑफ अकाऊंटन्सीमध्ये नेमणूक करण्याच्या कामीही मदत केली. श्री. बाटलीबॉय हे भथेना यांचे चुलतबंधू होते. त्याच वेळी बाबासाहेबांनी स्टॉक्स अँड शेअर्स धंड्यातील लोकांना सल्ला देणारी एक कंपनी काढली. मात्र, त्यांची जात समजताच कन्सल्टन्सी उत्तम असूनही ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर एका धनिक पारशी गृहस्थाचा पत्रव्यवहार आणि हिशेब यांवर देखरेख ठेवण्याचे आणखी एक काम त्यांनी पत्करले. ही सर्व कामे मिळवून देण्यात भथेना यांचा मोलाचा वाटा होता. त्याच वेळी सिडनहॅम कॉलेजात एका हंगामी प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. तेव्हा नोकरी करून पैसा उभा करावा व आपला राहिलेला अभ्यासक्रम लंडनला जाऊन पुरा करता यावा म्हणून डॉ. आंबेडकरांनी अर्ज केला. मुंबई राज्याचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी या नोकरीसाठी खटपट केली. त्यातही भथेना यांचे दिनशा वाच्छांमार्फत केलेले प्रयत्नही कारणीभूत होते आणि भीमराव १२ नोव्हेंबर १९१७ रोजी प्राध्यापक पदी रुजू झाले. या काळात भथेना यांच्याशी त्यांच्या वारंवार भेटीगाठी होत. दोघे एकत्र भोजन घेत, चर्चा करीत असत. बाबासाहेबांना सिडनेहॅम कॉलेजमध्ये ४५० रुपये इतके वेतन मिळत असे. त्यापैकी ३५० रुपये ते दरमहा बाजूला काढत आणि अवघ्या १०० रुपयांत घरखर्च व स्वतःचा खर्च भागवित असत. आपले वाचवलेले पैसे साठवण्यासाठी ते भथेना यांच्याकडेच देत असत. अशा काटकसरीतून पैशांची जमवाजमव करून डॉ. आंबेडकर लंडनला राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ५ जुलै १९२० रोजी निघाले, तेव्हाही वचनचिठ्ठीवर (Promisory Note) ५००० रुपयांचे कर्ज नवल भथेना यांनीच त्यांना दिले. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीही यावेळी आंबेडकरांना आर्थिक मदत केली होती.

१९२०मध्ये शाहू महाराजांच्या सहकार्यातून बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाच्या प्रकाशनाला प्रारंभ केला. त्यावेळी मूकनायकला गोदरेज कंपनीच्या तिजोरीच्या जाहिराती मिळवून देण्यासाठीही भथेना यांनी प्रयत्न केले होते. या जाहिरातींचे पैसे मिळवून देण्याबरोबरच बाबासाहेब लंडनमध्ये असताना त्यांच्या माघारी मूकनायकला आर्थिक आधार देण्याचे कामही त्यांनी केले. लंडनवरुन त्यांनी पाठवलेली पुस्तके मुंबईत स्वीकारण्याचे कामही बहुतेकदा भथेना यांनाच करावे लागत असे. हे मित्रकर्तव्य ते आनंदाने पार पाडत असत.

लंडनमधील अभ्यासक्रम पूर्ण करून उच्चविद्याविभूषित बॅरिस्टर डॉ. आंबेडकर १९२३ला भारतात परत आले. त्यावेळी निर्वाहाचे साधन म्हणून वकिली करायची आणि आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांना अस्पृश्यतेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी संघर्ष करायचा, असा निर्धार डॉ. आंबेडकरांनी केला. पण, वकिलीची सनद मिळविण्यासाठी लागणारी अनामत रक्कमही त्यांच्याकडे नव्हती. ती रक्कमही नवल भथेनांनी त्यांना दिली.

भथेना अमेरिकेतून आल्यापासून म्हणजे १९२१ पासूनच काँग्रेसमध्ये सक्रिय झाले होते. पुढील दशकभर मुंबईतील विदेशी मालाची होळी वगैरे काँग्रेसप्रणित आंदोलनांत सक्रिय सहभागी होत असत. भथेनांनी पुढे आयुष्यभर केवळ खादीचे कपडेच वापरले. एकीकडे भथेना हे असे गांधीवादी, तर दुसरीकडे डॉ. आंबेडकर गांधी विरोधक. या मैत्रीची परीक्षा पाहणारे पुणे करारासारखे काही मोठे प्रसंग सामोरे आले, तथापि, या हे मतभेद या दोघांच्या निखळ मैत्रीआड कधीही आले नाहीत, हे महत्त्वाचे!

पुणे कराराच्या वेळी गांधींचे उपोषण सुरू असतानाचा प्रसंग भथेना यांनी एके ठिकाणी सांगितला आहे. त्यात ते म्हणतात की, मी १९२१मध्ये गांधीजींच्या चळवळीत सामील झालो. त्यामुळे आंबेडकर आणि माझ्यात वारंवार खटके उडत. माझ्या राजकीय सहानुभूतीमुळे ते वारंवार माझ्यावर खेकसत. पण अशी स्थिती असूनही आमचे मैत्रीचे नाते कायम राहिले. आम्ही नेहमी एकत्र भेटत असू व एकत्र जेवण घेत असू. गांधीजींनी जेव्हा पुण्यात त्यांचे उपोषण सुरू केले, तेव्हा योगायोगाने माझी व डॉ. आंबेडकरांची मोटारबसमध्ये भेट झाली. तेव्हा आमच्यात भयानक वाग्युद्ध घडले. ते इतके की, मी बसमधून खाली उतरलो व त्यांना एकट्याने पुढे जाऊ दिले. त्या काळातील काँग्रेसच्या मोठ्या व्यक्तींपैकी एस.आर. तेरेसेस, डॉ. साठे, बी.एम. बोरुचा व इतरांनी त्या प्रकरणात डॉ. आंबेडकरांचे मन वळविण्यास मी त्यांना मदत करावी, अशी मला विनंती केली. परंतु, मला डॉ. आंबेडकरांचे मन पक्के माहीत असल्यामुळे व कोणत्याही बाबतीत मी पूर्ण असहाय्य होतो त्यामुळे, १९२५ नंतर मी राजकारणात कसलाच रस घेतला नाही.

पुढे डॉ. आंबेडकरांनी अनेक लढे लढवले, ते प्रथम श्रेणीचे राष्ट्रीय नेते झाले, त्यांनी अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, १९४२ साली गव्हर्नर-जनरलच्या कार्यकारी मंडळात ते मजूर मंत्री झाले. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होऊन स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. नेहरू मंत्रीमंडळात स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले, परंतु भथेना यांनी डॉ. आंबेडकरांवर केलेल्या अनंत उपकारांचे कधीही भांडवल केले नाही किंवा त्या उपकारापोटी कुठलेही पद, नेतेपद वा एखादे स्वार्थसाधू काम करून घेतले नाही, किंवा आपली कुठल्याही समितीवर वर्णी लावून घेतली नाही. उलट पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कामकाजात लक्ष घालून कार्यभार स्वीकारण्याची विनंती खुद्द डॉ. आंबेडकरांनी मृत्यूच्या काही महिने अगोदर त्यांना केली होती.

आपल्या मुलाला (यशवंत) व पुतण्याला (मुकुंद) सन्मानाने निर्वाह करण्याचे साधन प्राप्त व्हावे यासाठी डॉ. आंबेडकरांचा जीव तळमळत होता. त्या उद्देशाने त्यांनी भथेना यांना पत्र पाठवून या दोघांना काही धंदा काढून द्यावा आणि त्यासंबंधीची योजना आखून पाठवावी, असे कळविले. "हे घडले, तर मला शांतपणे मरण येईल. बाप आपल्या मुलांच्या हितासाठी जसा झटतो, तसा तू माझ्या मुलांसाठी झटून त्यांना सतत चालत राहिल, असा काहीतरी धंदा शिकव" अशी कळकळीची विनंती डॉ. आंबेडकरांनी भधेना यांना १९४८ साली पत्राद्वारे केल्यावर भथेना यांनी यशवंत व मुकुंद यांना लॉण्ड्रीच्या धंद्यात भागीदारी मिळवून दिली होती. या धंद्यात त्यांना अपयश आल्याने आंबेडकरांचे मन मात्र निराशेने पोळून निघाले.

भथेना यांनी आंबेडकरांना प्रत्येक संकटात दिलेली साथ, केलेली मदत अमूल्य आहे. सप्टेंबर १९२० मध्ये लंडनहून डॉ. आंबेडकरांनी भथेना यांना पाठविलेल्या पत्रात एक मित्र म्हणून त्यांच्याबद्दल अत्यंत भावनिकतेने ज्या कृतज्ञ भावना व्यक्त केल्या आहेत, त्या पाहता, त्यातून भथेना यांच्या मनाची विशालता पाहून मन गहिवरुन येते. भथेना यांना पाठविलेल्या त्या पत्रात डॉ. आंबेडकर म्हणतात की, "माझ्यामुळे तुला त्रास होतो, या विषयी मला अत्यंत खेद वाटतो. माझ्यावर विश्वास ठेव की, अत्यंत घनिष्ठ मित्रही सहन करू शकणार नाही, एवढा त्रास तुला माझ्यामुळे सहन करावा लागतो, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. या ना त्या कारणासाठी माझी सतत निकडीची मागणी असते, त्यामुळे तुझाही नाईलाज होऊन, माझा एकमेव आणि अत्यंत जवळचा प्रिय मित्र माझ्यापासून दुरावणार नाही, एवढीच मी आशा करतो." आपल्या या अत्यंत दिलदार मित्राकडे मदतीसाठी सातत्याने याचना करीत असताना आंबेडकरांच्या मनाची होणारी तगमग पाहून अस्वस्थ व्हायला होते. पण, मित्र म्हणून त्याने आपली साथ कधीही सोडू नये, याची रास्त अपेक्षाही ते इथे व्यक्त करतात.

डॉ. आंबेडकर मजूर व कायदा मंत्री असण्याच्या कालखंडात त्यांच्या सचिवांमार्फत भथेना यांना निरोप पाठवून बोलावून घेत. त्यावेळी त्यांच्या ७ ते ९ या न्याहरीच्या वेळेत किंवा रात्री १० नंतर भथेना त्यांना जाऊन भेटत असत. या गप्पांच्या वेळी या दोन मित्रांखेरीज तिथे कोणीही नसे.

माईसाहेब आंबेडकर यांनीही आपल्या आत्मचरित्रामध्ये या दोघांच्या मैत्रीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. १५ एप्रिल १९४८ रोजी शारदा कबीर (सविता आंबेडकर) यांचा बाबासाहेबांसोबत नवी दिल्ली येथे नोंदणी विवाह झाला. त्यावेळी समाजाच्या सर्व स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यावेळीही भथेना यांनी पत्र पाठवून बाबासाहेबांच्या या पुनर्विवाहाचे जोरदार समर्थन करीत त्यांना पाठिंबा दिला होता. बाबासाहेबांनी १९ एप्रिलला भथेना यांना प्रत्युत्तराचे पत्र पाठवले. त्यामध्ये, या विवाहाची आवश्यकता लक्षात घेऊन या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल भथेना यांना त्यांनी धन्यवाद दिले. या दोघांच्या मैत्रीचे वर्णन माईसाहेबांनी अतूट मैत्री असे केले असून डॉ. आंबेडकर आणि नवल भथेना यांची मैत्री ही आदर्श मैत्री होती, असे त्या म्हणतात.

या दोन परममित्रांची अखेरची भेट बाबासाहेबांच्या निर्वाणापूर्वी दोन महिने आधी (ऑक्टोबर १९५६) झाली होती. ही भेट दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रदीर्घ काळ चालली. त्यावेळी त्यांच्या खोलीत दुसऱ्या कोणालाही प्रवेश दिला नव्हता. त्या दिवशी डॉ. आंबेडकर त्यांच्याशी खूप अंतःकरणपूर्वक बोलले. त्यांनी त्यांचा मुलगा (यशवंत) व पुतण्या (मुकुंद) यांच्यावर देखील टीका केली. या भेटीविषयी भथेना लिहीतात की, त्यावेळी माझा मित्र आता अखेरच्या प्रवासाला लागला आहे, या दुःखद भावनेने मी त्या घराचा निरोप घेतला. ते आणखी दोन महिने जगले, यावर माझा आता देखील चटकन विश्वास बसू शकत नाही. आपल्या मुलाला व पुतण्याला उपासमारी होणार नाही, इतकाच पैसा मी त्यांच्यासाठी ठेवण्याचे ठरविले आहे, असे त्याप्रसंगी डॉ. आंबेडकरांनी मला सांगितले. बाकी पैसे ते त्यांनी स्थापलेल्या शैक्षणिक संस्थांना देणार होते. ज्यांनी त्यांना फसविले, असे त्यांना वाटत होते, त्यां व्यक्तींविषयी आणखी त्यांनी माझ्याशी चर्चा केली व या कारणास्तव त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेत (पीपल्स एज्युकेशन सोसायटी) त्याचप्रमाणे त्यांना सुरू करावयाच्या नियोजित तंत्र संस्थेत मी रस घ्यावा, अशी मला त्यांनी विनंती केली. मी या गोष्टीचा विचार करीन आणि नंतर कळवीन, असे मी त्यांना म्हणालो. हे आमच्यातील शेवटचे संभाषण ठरले.

बाबासाहेबांच्या आयुष्यात वेळोवेळी त्यांच्या मदतीसाठी तत्परतेने उभ्या ठाकणाऱ्या भथेना यांना बाबासाहेबांच्या माध्यमातून अनेक लाभाची पदे, मानसन्मान वगैरे सहज मिळविता आले असते, पण तसा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. बाबासाहेबांसाठी ते सदैव मैत्रीचा एक निर्मळ झुळझुळता प्रवाह राहिले, जिथे मित्र म्हणून बाबासाहेबांना त्यांचे मन खऱ्या अर्थाने उघड करता येत असे. विशेषतः वैयक्तिक समस्या, कौटुंबिक प्रश्न याविषयी ते केवळ भथेना यांच्याशीच चर्चा करत असत, असे उपलब्ध दस्तऐवजांवरुन लक्षात येते. अशी मैत्री त्या काळात तर दुर्मिळच होती, आणि आजच्या काळात तर अशक्यप्रायच. म्हणूनच या मैत्रीची स्मरणनोंद महत्त्वाची!

संदर्भ:

१.      आंबेडकर, सविता: डॉ. आंबेडकरांच्या सहवासात,तथागत प्रकाशन, कल्याण (२०१३)

२.      कीर, धनंजय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (२००६)

३.      खैरमोडे, चां.भ.: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड-१, सुगावा प्रकाशन, पुणे (२००२)

४.      सुरवाडे, विजय (संपा.): समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई (२००७)

५.      Keeshwar, Sanober: An Unlikely friendship that stood taste of time (Article in Mid-Day, Mumbai), 6 December 2025

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

‘डॉक्टर’ किशोर गांगुर्डे!




महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक आणि माझे मित्र किशोर गांगुर्डे यांना जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली. किशोर यांनी 'महाराष्ट्र शासनाच्या माहिती प्रसारणासाठी समाजमाध्यमांचा वापर आणि प्रभाव: एक अभ्यास' (A Study on the Use and Impact of Social Media for Information Dissemination by the Government of Maharashtra) या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
किशोर यांचे हे संशोधन यासाठी महत्त्वाचे आहे की, ते स्वतः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया शाखेचे संकल्पक आहेत. शासकीय माहिती प्रसाराच्या कामी शासनात सोशल मीडियाची सुरवात करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना सन २०१८मध्ये नागरी सेवा दिनास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानितही करण्यात आले. या कामाच्या अनुभवाच्या जोरावर शासनाचे निर्णय, लोकाभिमुख योजना, धोरणे आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात समाजमाध्यमांची भूमिका किती प्रभावी ठरते, याविषयीचे विश्लेषण त्यांनी या संशोधनाअंतर्गत केलेले आहे.
काही ‘डॉक्टर’ असे असतात की, त्यांनी सोशल मीडियावर संशोधन केलेले असते; मात्र, गुगल सर्चबारमध्ये google.com टाकून गुगलवर जाणारे असतात. या पार्श्वभूमीवर, किशोर यांच्या संशोधनाचे वेगळेपण हे की, त्यांनी आधी केले आहे आणि मग त्या कृतीला संशोधनबद्ध केले आहे. त्यामुळे त्यांचे संशोधन स्वानुभवसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनातील जबाबदारीच्या पदांवर काम करीत असताना त्याव्यतिरिक्तचा वेळ देऊन संशोधन सिद्धीला नेणे किती जिकिरीचे असू शकते, हे माझ्यापेक्षा अधिक कोणाला ठाऊक असेल? त्यामुळेच सन्मित्र ‘डॉक्टर’ किशोर यांचे जाहीर अभिनंदन करीत असताना मला सर्वार्थाने आनंद आणि अभिमान वाटतो आहे.

गुरुवार, २६ मार्च, २०२६

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जाण्याने प्रेमळ पित्याला आंचवलो...




सुखाच्या लहरींना मात देण्यासाठी दुःखाची एक लाट पुरेशी ठरते. काल पुरस्काराचा आनंद सर्वांसोबत शेअर करीत असतानाच आज आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या निधनाची बातमी यावी, यापरते मोठं दुःख ते काय?

डॉ. जयसिंगराव पवार यांचं जाणं ही सामाजिक आणि इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी आहेच, पण व्यक्तिगत पातळीवर ही माझी सुद्धा खूप मोठी हानी आहे. माझ्यावर अगदी पुत्रवत प्रेम करणारा एक प्रेमळ पिता आज मी गमावला आहे, अशी माझी भावना आहे. काही व्यक्तिगत कारणानं बाहेरगावी असल्यानं या पित्याचं अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. याची खंत वाटते आहेच; पण त्याही पलीकडे त्यांच्या अनेक आठवणी या प्रसंगी मनामध्ये उचंबळून येत आहेत. अनेक आठवणी आहेत त्यांच्या. विद्यापीठात आले की प्रेमाने हातात हात घेऊन चालणारे, अगदी विश्वासाने खांद्यावरती हात टाकणारे, अत्यंत सस्मित वदनाने स्वागत करणारे, बोलणारे, आपुलकीने संशोधनाची, लेखनाची चौकशी करणारे असे पवार सर मला सतत भेटत राहिले. त्यांचा हसतमुख चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतो आहे आणि तितक्या वेळा डोळे पाण्यानं डबडबताहेत. 

 मी जेव्हा पीएचडी झालो, तेव्हा माझा एकमेव जाहीर सत्कार हा आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांनी आणि माझे गुरु डॉ. अशोक चौसाळकर यांनी शाहू स्मारक भवनमध्ये केला. नुसता सत्कार केला नाही तर 'शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर पत्रकारिता' या विषयावर सविस्तर व्याख्यान देण्याची संधी त्यांनी मला दिलेली होती. पवार सर स्वतः अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी माझ्या मांडणीचं कौतुक तर केलं होतंच, पण आता आपले संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी असे तरूण संशोधक पुढे येताहेत, ही समाधानाची बाब असल्याचे उद्गारही काढले होते.

गेल्या वर्षी माझ्या दोन पुस्तकांचा प्रकाशन झालं. ती पुस्तकं द्यायला मी सरांच्या घरी गेलो. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर आदरणीय माईंनी आणि सरांनी अतिशय आपलेपणानं माझं अभिनंदन तर केलंच;  त्याशिवाय अगदी  अनपेक्षितपणे माझा या दोघांनी सत्कारही केला. साक्षात डॉ. जयसिंगराव पवार सरांनी सत्कार करावा, यापेक्षा आयुष्यामध्ये अन्य कुठलीही गोष्ट मोठी असू शकेल, असं मला वाटत नाही. महत्त्वाचं म्हणजे सरांचं पंचखंडात्मक चरित्र लेखनाचं कार्य सुरू असतानाही त्यांनी ही दोन्ही पुस्तकं वाचली आणि मला आवर्जून फोन केला. 'ब्लॅक व्हाईट अन् ग्रे' मधल्या 'डिकास्ट व्हावं कसं?' या लेखानं ते अस्वस्थ झाले होते. त्या विषयावर आम्ही सुमारे पाऊण तास बोललो. 'माझ्या ८५ वर्षांच्या आयुष्यात तुमच्यासारखा खऱ्या अर्थानं डिकास्ट झालेला माणूस प्रथमच मला भेटला,' हे सरांचे कौतुकोद्गार आजही जसेच्या तसे कानात गुंजताहेत आणि जबाबदारीची जाणीवही करून देताहेत.

त्यानंतर  माझ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकाचा मसुदा पाहून सरांनी त्यातील काही संदर्भ नवीन आहेत, असे निरीक्षण नोंदवले आणि अनेक मौलिक सूचना या संदर्भाने मला केल्या.  त्या अंमलात आणायच्या की नाही, याचा निर्णय तुम्ही घ्या, असं इतक्या निर्व्याजपणाने सरांनी मला सांगितलं होतं. सरांच्या सूचनांबरहुकूम आता पुस्तकाची रचना झालेली आहे. अशा किती आठवणी सांगाव्यात सरांच्या. 

या क्षणी पूर्ण ब्लँक व्हायला होतंय ते यासाठी की सरांनी शाहू महाराजांचा वारसा ज्या पद्धतीने पुनरुज्जीवित केला, शाहूंच्या बदनामीची सगळी प्रकरणं, सगळ्या गोष्टी अगदी प्रचंड अभ्यासांती पुरावे गोळा करून सरांनी शाहूंची प्रतिमा ज्या पद्धतीने उजळवली.  केवळ देशातच नव्हे, राज्यातच नव्हे तर जगाच्या पातळीवर सरांनी शाहूंचं नाव पोहोचवलं. पवार सरांचं सगळ्यात मोठं काम हे शाहूंच्या संदर्भातलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं, त्याला अजिबात तोड नाही. त्यांच्यामुळे शाहू महाराजांशी आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने, आत्मीय भावाने जोडले गेलो. शाहू महाराज यांचं दैवतीकरण न करता त्यांना आत्मसात करणं ही आवश्यक बाब आहे, हे सातत्याने ते प्रत्येक तरुणाच्या मनावर बिंबवत राहिले. मला वाटतं ही गोष्ट फार फार मोलाची आणि महत्त्वाची आहे. मात्र आता होतंय असं की, ज्या कोल्हापूरमध्ये महाराजांनी काम केलं आणि जयसिंगराव पवार सरांनी महाराजांचा वारसा पुनरुज्जीवित करण्याचं आणि जिवंत ठेवण्याचं काम केलं; त्या कोल्हापूरमध्ये शाहू विचार संपवण्यासाठीची एक वेगळी चळवळ मूळ धरू पाहते आहे. तशा स्वरूपाच्या बाबी, घटना होऊ लागलेल्या आहेत. त्यांच्या पुरोगामित्वाला हरताळ फासणाऱ्या गोष्टी घडवल्या जात आहेत. 'आता कोल्हापूर पुरोगामी राहिलं नाही,' असं शाहूंच्या पुतळ्याच्या साक्षीनं अभिमानानं सांगणारे तथाकथित नेते उभे राहताहेत. त्यामुळं मला असं वाटतं की शाहूंना जपणं, शाहूंचा वारसा खऱ्या अर्थानं जपणं आणि वृद्धिंगत करणं हीच आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या जीवनकार्याला खरी आदरांजली ठरेल!


बुधवार, २५ मार्च, २०२६

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला

वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार जाहीर

 

कोल्हापूर, दि. २५ मार्च: येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या समाज आणि माध्यमं या वैचारिक लेखसंग्रहाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे यांनी ही घोषणा केली आहे.

डॉ. जत्राटकर यांच्या ब्लॅक व्हाईट अन् ग्रे या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने उत्कृष्ट ललित संग्रहासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर आता समाज आणि माध्यमं या पुस्तकाला महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वैचारिक साहित्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये ६,००० रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वर्धा येथील स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक व 'उपरा'कार लक्ष्मण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ करण्यात येईल, असे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहूल भस्मे, जिगिषा नारायणे यांनी कळविले आहे.

बुधवार, १८ मार्च, २०२६

सर्जनशीलतेची कमाल: यंग शेरलॉक



जगातील सर्वात लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक म्हणजे शेरलॉक होम्स. जो कधी जन्मलाच नाही, पण ज्याच्या अस्तित्वाच्या स्मृती जग आज त्याच्या साहित्यिक जन्माच्या दोनेक शतकांनंतरही जपतं, साजरं करतं, असा हा वल्ली. अगदी आधुनिक काळातील तंत्रज्ञान हाताशी आल्यानंतरही त्याचा तपास कशा पद्धतीचा असू शकेल, या दिशेनेही लेखन आणि मालिकांची निर्मिती झाली. त्या दर्शकप्रियही झाल्या. तथापि, शेरलॉक होम्स या पात्राची निर्मिती करताना सर आर्थर कॉनन डॉयल यांनी त्याच्या संपूर्ण आयुष्याचे तपशीलवार चरित्र लिहिले नाही. उलट त्यांनी विविध कथांमध्ये फक्त काही सूचक उल्लेख केले, जणू एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळाचे छोटे-छोटे तुकडे. या तुकड्यांमधून होम्सच्या पूर्वायुष्याची केवळ झलक मिळते. परंतु याच झलकांवर आधारित एक संपूर्ण साहित्यिक विश्व उभे करण्याचे काम लेखक ॲंन्ड्र्यू लेन यांनी केलं आहे. ते विश्वासार्ह वाटतं, खरं वाटतं, ही खरी त्यांच्या सर्जनशीलतेची कमाल आहे.
त्यांच्या लेखनावर आधारित 'यंग शेरलॉक' ही मालिका केवळ साहसकथा नाही; ती मूळ होम्स विश्वाचा सर्जनशील विस्तार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती मूळ कथांचा आदर राखत, त्यातील सूचक धाग्यांचं कल्पक रूपांतर करते.
डॉयल यांच्या कथांमध्ये होम्सच्या भूतकाळाबद्दल काही महत्त्वाचे संकेत वेगवेगळ्या कथांत विखुरलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास 'द ॲडव्हेंचर ऑफ ग्लोरिया स्कॉट' या कथेत होम्स आपल्या विद्यापीठातील दिवसांची आठवण सांगतो. त्याचा मित्र व्हिक्टर ट्रॅव्होर आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित घडलेल्या रहस्यामुळे होम्सला आपली विश्लेषणशक्ती गुन्हे तपासासाठी वापरता येते हे जाणवते. ही घटना त्याच्या गुप्तहेर कारकिर्दीची सुरुवात ठरते.
त्याचप्रमाणे 'अ स्टडी इन स्कार्लेट'मध्ये होम्स रसायनशास्त्राचे प्रयोग करताना दिसतो. यावरून त्याची वैज्ञानिक वृत्ती आणि प्रयोगशीलता दिसून येते. नंतरच्या कथांमध्ये त्याची निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास यांचा वारंवार उल्लेख येतो.
कुटुंबाबद्दलचा आणखी एक धागा म्हणजे त्याचा भाऊ मायक्रॉफ्ट होम्स. तो अत्यंत बुद्धिमान आणि सरकारी गुप्त यंत्रणेशी संबंधित असल्याचे सूचित केले आहे. या उल्लेखांमुळे होम्सचे बौद्धिक वातावरण कसे असेल, याची कल्पना येते.
या सर्व धाग्यांतून होम्सच्या पूर्वायुष्याचा एक आराखडा तयार होतो. एक विलक्षण बुद्धिमान, पण सामाजिकदृष्ट्या थोडा अलिप्त तरुण, ज्याची वैज्ञानिक जिज्ञासा आणि निरीक्षणशक्ती पुढे त्याला जगातील महान गुप्तहेर बनवते.
या सूचक उल्लेखांवर आधारित पूर्ण कथा उभारणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु लेखक ॲंन्ड्र्यू लेन यांनी ते अत्यंत कल्पकतेने केले आहे. 'यंग शेरलॉक' मालिकेत आपण होम्सला किशोरवयीन अवस्थेत पाहतो, जो अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही, मात्र त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेची चिन्हे येथे दिसताहेत.
मालिकेत त्याचे शिक्षण, त्याच्या आयुष्यात येणारे मार्गदर्शक, आणि त्याला भेटणारी धोकादायक साहसे यांचे चित्रण आहे. या अनुभवांमधून त्याची निरीक्षणशक्ती विकसित होते, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो, आणि गुन्हे उलगडण्याची आवड वाढते. मूळ कथांमध्ये दिसणाऱ्या प्रौढ होम्सच्या व्यक्तिमत्त्वाची बीजे या मालिकेत विकसित होताना दिसतात.
मालिकेतील सर्वात इंटरेस्टिंग कल्पना म्हणजे होम्स आणि त्याचा भविष्यातील शत्रू जेम्स मॉरियार्टी यांच्यातील संबंध. मूळ कथांमध्ये मोरीआर्टी हा गुन्हेगारी जगाचा अत्यंत बुद्धिमान सूत्रधार म्हणून दिसतो. परंतु या मालिकेत त्याला सुरुवातीला शेरलॉकचा मित्र म्हणून दाखवले आहे.
ही कल्पना साहित्यिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ती दाखवते की दोन असामान्य बुद्धिमत्ता वेगवेगळ्या दिशांनी कशी विकसित होऊ शकतात- एक न्यायाच्या मार्गावर आणि दुसरी सत्तेच्या आणि लोलुपतेच्या मार्गावर. अशा प्रकारे नायक आणि खलनायक यांच्या संघर्षाची बीजे त्यांच्या तरुणपणातच पेरली जातात.
यंग शेरलॉक होम्स मालिकेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील मानसशास्त्रीय सखोलता. मूळ कथांमध्ये होम्स अत्यंत तर्कप्रधान आणि भावनांपासून दूर दिसतो. मालिकेत या स्वभावामागील अनुभव दाखवून कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे वाचकाला प्रौढ होम्सच्या व्यक्तिमत्त्वाचा उगम समजतो. मालिकेने या व्यक्तिरेखेचा विकास दाखवला आहे.
या मालिकेचे मोठे यश म्हणजे ती दोन स्तरांवर अनुभवली जाऊ शकते. एका बाजूला ती किशोरवयीनांसाठी रोमांचक साहसकथा आहे. दुसऱ्या बाजूला मूळ होम्स साहित्याशी परिचित असलेल्या वाचकांसाठी ती एक प्रकारची साहित्यिक पुनर्रचना आहे.
मूळ कथांतील लहान-लहान संकेत, जसे की निरीक्षणशक्ती, वैज्ञानिक प्रयोग, मायक्रॉफ्टचा प्रभाव आणि मोरीआर्टीसोबतचा संघर्ष यांना लेखकाने विस्तृत कथानकात रूपांतरित केले आहे. त्यामुळे ही मालिका मूळ होम्स विश्वाचा आदर राखत त्याचा सर्जनशील विस्तार करते.
थोडक्यात, शेरलॉक होम्सच्या कथांमध्ये आर्थर कॉनन डॉयल यांनी जाणीवपूर्वक किंवा नकळत दिलेले सूचक धागे जणू एका मोठ्या कथानकाची बीजे आहेत आणि त्या आधारे ॲंन्ड्र्यू लेन यांनी त्या बीजांपासून एक समृद्ध आणि रोमांचक विश्व निर्माण केले आहे.
म्हणून ही मालिका केवळ लोकप्रिय साहसकथा नाही; तर मूळ साहित्याशी संवाद साधणारी, त्याचा अर्थविस्तार करणारी आणि शेरलॉक होम्स या अमर पात्राच्या घडणीच्या अनुषंगाने नवा दृष्टीकोन देणारी एक आवर्जून पाहावी, अशी सर्जनशील निर्मिती आहे. त्यासाठी क्रिएटर मॅथ्यू पार्कहिल, दिग्दर्शक पीटर हार्नेस आणि गाय रिची यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे...
(ओटीटी: ॲमेझॉन प्राईम)

मंगळवार, १० मार्च, २०२६

कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीतील तारकादळ विद्यापीठात अवतरते तेव्हा...

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत (डावीकडून) प्रिया सरीकर, आरजे स्नेहा, आरजे रसिका, डॉ. आलोक जत्राटकर, शुभांगी तावरे, अनुराधा सरनाईक-कदम, इंदुमती गणेश आणि श्रद्धा जोगळेकर.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाच्या मुशीतून घडलेलं कोल्हापूर. इथं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं यशाची कमान निर्माण करणाऱ्या आणि उंचावणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी नाही. स्त्री-सन्मान, स्त्रियांना समतापूर्ण सौहार्द लाभावा, यासाठी अनेक कायदेकानू करून तिची प्रतिष्ठा कायम करणाऱ्या या राजर्षींच्या वारशामुळं आजही कोल्हापुरात स्त्रिया आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालताना दिसतात. कोल्हापूरची वृत्तपत्रसृष्टी सुद्धा त्याला अपवाद नाही. फिल्डवर पुरूषांच्या बरोबरीनं आत्मविश्वासानं वावरणाऱ्या, किंबहुना कित्येकदा त्यांच्याहून काकणभर सरस कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारांची इथं कमी नाही. आज फिल्डवर, डेस्कवर आणि डिजीटल अशा मिळून साधारण पन्नासेक महिला, मुली कोल्हापूर शहरात कार्य़रत असतील. यातील अनेकींची कारकीर्द २० वर्षांहून अधिक काळची सुद्धा आहे. तसे पाहता कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीत स्वयंतेजाने तळपणाऱ्या या अशा तारका आहेत ज्या आजच्या युवा वर्गासाठी सच्च्या आयडॉल ठराव्यात.
सध्या शिवाजी विद्यापीठात प्रभारी प्र-कुलगुरूपदाची धुरा ज्येष्ठ संशोधक डॉ. ज्योती जाधव यांच्याकडं आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठाला महिला प्र-कुलगुरू लाभलेल्या आहेत. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं या महिला पत्रकारांना विद्यापीठात आमंत्रित करावं आणि प्र-कुलगुरू मॅडमचा त्यांच्याशी औपचारिक, अनौपचारिक संवाद घडवून आणावा, अशी एक आंतरिक इच्छा मनी होती. ती १० मार्चच्या सायंकाळी फलद्रुप झाली. पत्रकारितेमध्ये ‘ड्युटी फर्स्ट’ हाच मूलमंत्र जपावा लागत असल्यानं अनेक महिला पत्रकार त्यांच्या असाईनमेंट्स, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळं उपस्थित राहू शकल्या नाहीत. तथापि, काही जणी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिल्या. नावंच सांगायची झाल्यास, इंदुमती गणेश, अनुराधा कदम-सरनाईक, प्रिया सरीकर, शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर, आरजे रसिका आणि आरजे स्नेहा. यातल्या प्रत्येकीनं स्वतःच्या कामाचा ठसा कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. तसं पाहता, त्या या फिल्डमधल्या खऱ्या स्टार आहेत. इंदुमती गणेश या मैत्रिणीच्या धाडसी पत्रकारितेला सलाम करीत असताना मी यापूर्वी स्वतंत्र पोस्ट लिहील्याचं आपल्याला स्मरत असेलच. तिच्यासह अनु, प्रिया, शुभांगी, श्रद्धा या प्रत्येकीचा पिंड वेगळा, कामाची पद्धत वेगळी असं असलं तरी सिन्सिरिटीच्या बाबतीत त्या साऱ्या सरस आहेत, कदाचित पुरूषांपेक्षाही अधिक. त्यामुळं त्यांच्या बायलाईन बातम्या आवर्जून वाचणारे वाचक आढळतात. तीच परिस्थिती आरजे रसिका आणि स्नेहा यांची. स्थानिक एफएम वाहिनीच्या माध्यमातून या दोघींचे आवाज प्रत्येक रेडिओ श्रोत्याला अतिशय चिरपरिचित असलेले. अतिशय संयमी, अभ्यासू आणि संदर्भांनी परिपूर्ण असे अनेक कार्यक्रम त्या सादर करतात. या निमित्ताने त्याही प्रथमच विद्यापीठात आल्या. या सर्वांमध्ये आणखी एक महत्त्वाचा धागा होता, तो म्हणजे त्या सर्व जणी शिवाजी विद्यापीठाच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे या चर्चेला एक वेगळीच आपुलकीची किनार होती.
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी या संवादासाठी साधारण अर्धा तासाची वेळ दिलेली होती. पण त्यांच्यात आणि या सर्व पत्रकार मैत्रिणींमध्ये संवाद असा काही रंगला की दीड तास कधी उलटून गेला, तेही समजले नाही. गंमतीचा भाग म्हणजे या साऱ्या जणींना मॅडमच्या संशोधनाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते, तर मॅडमना पत्रकारिता करीत असताना त्यांना येणारी आव्हाने, भेडसावणाऱ्या समस्या, समाज आणि सहकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक इत्यादी गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे होते. आणि त्या पद्धतीने अत्यंत अनौपचारिकपणे हा संवाद घडत गेला, उलगडत गेला. अंती साऱ्यांच्याच चेहऱ्यावर एक उत्तम भेट झाल्याचा आनंद झळकला. आणि मला लाभले एक चांगला संवाद घडवून आणल्याचे समाधान!!!