शनिवार, २ मे, २०२६

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार

डॉ. भालचंद्र काकडे

डॉ. प्रकाश पवार


कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता ‘आ’लोकशाही’ (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून हे व्याख्यान प्रसारित होणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ. आलोक जत्राटकर यांनी दिली.

दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा पाचवा स्मृतिदिन असून त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयातून डॉ. पवार विज्ञाननिष्ठ विचारसरणी, समाजजीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय परंपरेतील विवेकनिष्ठ प्रवाह यांचा परामर्श घेणार आहेत.

डॉ. प्रकाश पवार हे महाराष्ट्रातील प्रख्यात राजकीय विश्लेषक असून त्यांनी राज्यातील सामाजिक-राजकीय घडामोडींवर सखोल अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील त्यांचे चरित्रग्रंथ विशेष गाजले आहेत. विविध माध्यमांमधून ते सातत्याने प्रबोधनपर लेखन व व्याख्याने देत असतात. समकालीन राजकारण, इतिहास आणि समाजरचना यांचा परस्परसंबंध उलगडून सांगण्याची त्यांची शैली अभ्यासकांमध्ये लोकप्रिय आहे.

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही विज्ञान विषयाला वाहिलेली असून गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षवेधक व्याख्याने या व्याख्यानमालेत झाली आहेत. ही व्याख्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी प्रतिसाद देऊन ऐकली आहेत. सदर व्याख्यानमाला ‘आ’लोकशाही’ या युट्यूब वाहिनीवरून प्रसारित होणार असून प्रेक्षकांना @alokshahi या वाहिनीवर जाऊन त्यामध्ये सहभागी होता येईल. अगर पुढील लिंकद्वारेही सहभागी होता येईल.

https://youtu.be/z1CPpm8lL2k?si=78zLC8UgX225Eagw


बौद्ध स्थापत्य वारशाचे जतन व संवर्धन अत्यावश्यक: डॉ. कपिल राजहंस

डॉ. कपिल राजहंस


कोल्हापूर, दि. २ मे: बौद्ध स्थापत्य हा भारतीय सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा असून त्याचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. कपिल राजहंस यांनी केले. डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या वाहिनीद्वारे आयोजित बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमालेअंतर्गत बौद्ध स्थापत्य कला या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. राजहंस यांनी आपल्या भाषणात बौद्ध स्थापत्याची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना सांगितले की, स्तूप, चैत्यगृह आणि विहार ही केवळ धार्मिक स्थळे नसून बौद्ध तत्त्वज्ञान, समाजरचना आणि ज्ञानपरंपरेची साक्ष देणारी केंद्रे आहेत. या स्थापत्य रचनांमध्ये प्रतीकात्मकता, भूमितीय अचूकता आणि पर्यावरणाशी सुसंगत नियोजन दिसून येते. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध स्थापत्याला मोठी चालना मिळाली असून देशभर उभारण्यात आलेले स्तूप आणि शिलालेख हे त्या वैभवाचे द्योतक आहेत. या वारशामुळे भारताची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या काळात नागरीकरण, दुर्लक्ष आणि अपुऱ्या संवर्धनामुळे अनेक बौद्ध वारसा स्थळे धोक्यात आली आहेत, याबाबत डॉ. राजहंस यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शासन संस्था, पुरातत्त्व विभाग, संशोधक आणि स्थानिक नागरिक यांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

नव्या पिढीमध्ये या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश करणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून संवर्धनाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्ध स्थापत्य हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून मानवी मूल्ये, शांती आणि सहअस्तित्वाचा संदेश देणारा जिवंत वारसा आहे, असेही राजहंस यांनी सांगितले.

डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून दिला आणि आभार मानले. 

--

(सविस्तर व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. - https://youtu.be/CM8X4haMvqo?si=DWgIGkE0IpjTEBb2)


रविवार, २६ एप्रिल, २०२६

प्रतिष्ठेचा नारायणे पुरस्कार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या स्मृतींना अर्पण!

वर्धा येथे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात येणारा वैचारिक साहित्यासाठीचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार 'उपरा'कार पद्मश्री डॉ. लक्ष्मण माने यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) स्नेहलता नारायणे, डॉ. प्रदीप नारायणे, डॉ. सखाराम डाखोरे, डॉ. सूरज चौगुले, विलासराव देशमुख, प्रदीप दाते, दिवाकर आचार्य आणि स्मिता दातार.











वर्धा येथे काल (शनिवार, दि. २५ एप्रिल) मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय वैचारिक साहित्याचा वाङ्मय पुरस्कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते स्वीकारण्याचा सन्मान मला लाभला.
हा पुरस्कार प्रदान सोहळा अत्यंत भव्य, दिमाखदार आणि मनात दीर्घकाळ ठसा उमटवणारा ठरला. वर्ध्यातील बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात, मूळ आसनक्षमतेपलीकडे अतिरिक्त व्यवस्था करूनही, आणि त्याही पुढे उभ्या राहून कार्यक्रम ऐकणाऱ्या रसिकांच्या उपस्थितीत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी दिलेला प्रतिसाद खरोखरच उल्लेखनीय होता.
आम्ही केवळ पाच पुरस्कार विजेते असताना, आमच्या सन्मानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणे, हीच नारायणे प्रतिष्ठानची खरी कमाई आहे, असे मला मनापासून वाटते. अवघ्या पाच वर्षांत या प्रतिष्ठानने निर्माण केलेला विश्वास आणि सामाजिक सन्मान विशेष उल्लेखनीय आहे.
या सोहळ्याच्या यशामागे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे आणि कार्यकारिणीतील प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहुल भस्मे, जिगीषा नारायणे यांच्यासह पुरस्कार संयोजन समितीचे श्रीकांत पेटकर, डॉ. संदीप भेले, किशोर पेटकर, सूर्यकांत पाटील यांचे परिश्रम अत्यंत मोलाचे आहेत.
विशेषतः, पुरस्कार विजेत्यांसाठी राहण्यापासून ते सेवाग्राम आणि आनंदवन दर्शनापर्यंतची केलेली आदरपूर्वक व्यवस्था हा एक वेगळाच आणि प्रेरणादायी अनुभव होता. केवळ पुरस्कार देणे नव्हे, तर पाहुणचाराची ही समृद्ध परंपरा जपण्याचा त्यांचा दृष्टिकोन निश्चितच अनुकरणीय आहे.
या सर्व अनुभवांमुळे हा पुरस्कार आज राज्यभरात एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानबिंदू बनत असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
हा सन्मान स्वीकारताना माझ्या मनात आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ इतिहासकार आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या स्मृती तेवत होत्या. या भावनेतून हा पुरस्कार मी त्यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करीत आहे.
या सन्मानासाठी आणि प्रेमासाठी मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार!
या निमित्ताने मित्रवर्य मंगेश वरकड, बुद्धदेव मिरगे यांची बऱ्याच कालावधीनंतर आनंददायी भेट झाली, हेही महत्त्वाचे!

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

'समाज आणि माध्यमं': नवमाध्यमनिर्मित प्रश्नांना वाचा फोडणारा वैचारिक आवाजग्रंथ


वर्धा इथे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन चळवळीत अग्रेसर असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानने 'समाज आणि माध्यमं' या ग्रंथाला वैचारिक साहित्यासाठीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार - २०२६ प्रदान करीत असताना ज्या शब्दांत या साहित्यकृतीचा गौरव केला आहे, तो निश्चितच प्रेरणादायी आहे.


या सन्मानपत्रात म्हटले आहे की,
"मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान, वर्धा यांच्या वतीने देण्यात येणारा मारोतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार-२०२६ आपल्या अक्षर दालन प्रकाशन, कोल्हापूर द्वारा प्रकाशित 'समाज आणि माध्यमं' या वैचारिक लेखसंग्रहाला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.
चिकित्सक आणि संशोधक वृत्तीचे पत्रकार, परखड वक्ते, माणसे जोडणारे उत्तम संघटक, बुद्धिवादाचा पुरस्कार करणारे लेखक, सातत्यपूर्ण लेखन करणारे ब्लॉगलेखक आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आपली ओळख आहे. 'समाज आणि माध्यमं' हा आपला वैचारिक लेखसंग्रह बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सिद्ध झालेला समाजऐवज आहे.
'समाज आणि माध्यमं' हा वैचारिक ग्रंथ नव्या माध्यमांच्या प्रवेशानंतर समाजामध्ये झालेल्या उलथापालथींचा नेमकेपणाने वेध घेतो. या पुस्तकात डिजिटल युगातील स्मार्ट एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण, सोशल मिडियातील उलाढाली, समाजमाध्यमे आणि ट्रोलिंग, भारतातील टेलि-कम्प्युटर क्रांती, विश्वव्यापी माध्यमांतर, लिव्ह इन, पोर्नग्रस्त पौगंड, निवडणुका आणि प्रसारमाध्यमे, आयुष्याचा गेम करणाऱ्या गेम्स, अनसोशल षडयंत्राचा पर्दाफाश, या आजच्या समाजातील अत्यंत संवेदनशील मुद्द्‌द्याचा आपण परिणामकरीत्या वेध घेतलेला आहे. नवमाध्यमांनी निर्माण केलेल्या नवनवीन प्रश्नांना वाचा फोडणारा एक वैचारिक आवाजग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करता येईल. महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. यात सुधारणावादी आणि परिवर्तनवादी विचारवंतांनी वैज्ञानिक दृष्टीने लेखन करून सातत्याने समाजामध्ये जागृतीचे कार्य केले आहे. आपल्या या पुस्तकामुळेसुद्धा जागृतीचे मोठे कार्य होणार आहे यात दुमत नाही. हा समाज विचारशील व्हावा आणि लोकांच्या मनांमध्ये विवेकनिष्ठ जाणिवांची बिजे रोवली जावी हा प्रामाणिक प्रयत्न आपण अशा पुस्तकांच्या माध्यमातून सातत्याने करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
या पुस्तकाची भाषा अत्यंत सुगम आहे. सोपी उदाहरणे देऊन आपण हा विषय अत्यंत सोप्या व सरळ भाषेत समजावून सांगितला आहे. वाढत्या नवमाध्यमांनी समाजासमोर काही आव्हाने उभी केलेली आहेत. अशा काळात आपले समाज आणि माध्यम हे आपले वैचारिक पुस्तक निश्चितच समाज जागृतीचे कार्य करेल, अशी आम्हाला खात्री आहे.
आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी समाज आणि माध्यम या पुस्तकासाठी मारोतराव नारायणे स्मृति राज्यस्तरीय वैचारिक साहित्य पुरस्कार 2026 आपणास आम्ही सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत.
पुढील उज्वल वाङमयीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!"
... जबाबदारी वाढली आहे, या जाणीवेसह नारायणे प्रतिष्ठानचे आभार मानायला हवेत!

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

डॉ. श्रीकृष्ण महाजन: फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा इंटेलेक्चुअल मार्गदर्शक

(शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी अपघातात जखमी झाल्याने उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!)




शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या अकाली निधनामुळे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा समकाळातील एक अत्यंत महत्त्वाचा असा इंटेलेक्चुअल मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
डॉ. महाजन यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विविध मंचांवरून आपल्या मुख्य विषयाबरोबरच चळवळीच्या संशोधन संदर्भानेही फार महत्त्वपूर्ण काम केले. डॉ. महाजन आंबेडकरी विचारांचे सच्चे पाईक होते. त्यांनी केंद्राच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम विषयांवर प्रख्यात तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा , परिषदा आयोजित करण्यासह विविध विषयांवरील महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि संविधानाविषयी जनजागृतीपर अनेक उपक्रम राबविले. विद्यापीठासह महाविद्यालयांत 'संविधान दूत' उपक्रम ही त्यांचीच संकल्पना. संविधानविषयक अभ्यासक्रम, संविधान प्रश्नमंजुषा, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले. या सर्व उपक्रमांत मलाही अतिशय हक्काने सामावून घेतले, हे त्यांचे प्रेम!
महाजन सरांसमवेत कोणत्याही विषयावर चर्चा करणे हा इंटेलेक्चुअल एनरिचमेंटचा भाग असे. अनेक नवे मुद्दे त्यांच्याकडून माहिती होत असत. अनेक शंकांचे निरसन होत असे. अतिशय शांत, संयत आणि नेमकेपणाने ते आपले म्हणणे मांडत असत. चेहऱ्यावर सदैव एक हलकेसे स्मित असे त्यांच्या. कामाचा कितीही व्याप असो, कधीही त्यांना संत्रस्त झालेले पाहण्यात आले नाही. अनेक क्लिष्ट विषयांच्या अनुषंगानेही त्यांच्याकडे स्पष्टता असे. म्हणजे आकलन आणि विश्लेषण या बाबतीत ते खूपच पुढे असायचे. बरे, केवळ शैक्षणिक, संशोधकीय अगर प्रशासकीय बाबींतच नव्हे, तर विविध सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही त्यांचा लक्षवेधी वावर असे. ते स्वतः एक कवी होते. त्यामुळे भोवतालाकडे अत्यंत तरल आणि संवेदनशीलपणे पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. वेगवेगळे मुखवटे चढवून जगाला प्रत्यक्षाहूनी वेगळाच चेहरा दाखविणाऱ्यांची मांदियाळी आसपास वाढत असतानाच्या काळात प्रामाणिक चेहऱ्याने वावरणारा चळवळीचा आणि माझाही एक सच्चा मार्गदर्शक गेल्याचे हे दुःख फार फार मोठे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

रविवार, १९ एप्रिल, २०२६

शौकतमामांची आठवण येते नि आपसूक मनात मेघ बरसू लागतात...



शौकत शेख


महान संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्यासमवेत शौकत शेख

शौकत मामांच्या स्मृतींना अर्पण गीत...


'प्यासा सावन' या चित्रपटातलं 'मेघा रे मेघा' हे गीत माझ्या हृदयाच्या खूप जवळचं आहे. याला यामधल्या उदात्त प्रेमभावना ह्या खूप नंतर कारणीभूत ठरल्या; मात्र त्याही पूर्वी कारणीभूत ठरले ते म्हणजे मी लहान असताना माझे गायनातले पहिले गुरु शौकत अली शेख! त्यांना सगळे शौकत भैया म्हणायचे. मी शौकतमामा म्हणायचो. तर हे शौकत मामा हे 'मेघा रे मेघा' गाणं इतकं जबरदस्त म्हणायचे की क्या बात! संगीत साथ असेल तर त्यांचं हे गाणं प्रचंड उंचीवर जायचं आणि संगीतसाथीविनाही!
जेव्हाही कधी शौकत मामा आमच्या कागलेवाड्यात येत आणि वाड्यातील सगळी मंडळी एकत्र गप्पा मारत बसलेली असत, तेव्हा शौकतमामांच्या या गाण्याशिवाय त्या मैफलीला रंगच चढत नसे. अत्यंत तन्मयतेनं ते हे गीत अशा नजाकतीनं सादर करीत की नुसतं ऐकतच राहावंसं वाटत असे. गमतीची गोष्ट यामध्ये अशी की, शौकतमामा बोलताना अडखळायचे म्हणजे थोडंसं हकलायचे. मात्र गाणं म्हणायला लागले की त्यांचं हे अडखळणं कुठल्या कुठं गायब व्हायचं. मला या गोष्टीची खूप मौज वाटायची की हे कसं काय शक्य आहे? मात्र त्यांना ते साधलेलं होतं खरं. बोलताना अडखळणं आणि गाणं म्हणताना मात्र कुठंही एकही स्वर न चुकू देता, कुठंही बेसूर न होता अशा पद्धतीने ते सादर करायचे.

त्यांच्या अनेक आठवणी आहेत, त्यातली जवळची एक म्हणजे शाळेच्या गॅदरिंगसाठी मी जेव्हा बालगीतांतून बाहेर पडून चित्रपट गीत म्हणण्याचा प्रसंग माझ्यावर आला, तेव्हा आईने माझी तयारी करून घेण्याची जबाबदारी शौकत मामांच्याकडे दिलेली होती आणि त्यांनी त्यांची दररोजची संध्याकाळ माझ्यासाठी राखून ठेवलेली असायची. माझ्याकडून ते रियाज करून घेत असत. ते म्हणायचे की, गाणं कुठलंही असो, त्याच्याकडे तितक्याच गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि त्याचा सराव तितक्याच गंभीरपणाने केला पाहिजे, तरच आपल्याला हवा तो रिझल्ट मिळवता येतो. कुठल्याही सुराचं मोल कमी-अधिक असत नाही. शास्त्रीय गीताच्या सुराचं, शब्दाचं जे मोल, तितकंच भावगीताचंही आणि तितकंच चित्रपटाच्या गीताचंही! हे तत्वज्ञान मला पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर ते शौकत मामांनी.

पुढच्या काळात त्यांच्यासोबत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही गाण्याचे कार्यक्रम करण्याचाही योग आला. मात्र त्यांना ऐकणं ही खूपच नादावून टाकणारी गोष्ट होती. प्रेम तर माझ्यावर इतकं अपरंपार केलं की आठवण आली तरी डोळ्यामध्ये पाणी दाटतं. शौकत मामा आज जरी नसले तरी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी हे गाणं म्हणण्याचा प्रयत्न केलेलाय.. त्यांच्याएवढं भारी ते नक्कीच झालेलं नाही; पण एक प्रयत्न आहे शौकतमामांना आदरांजली वाहण्याचा...!

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी जातिनिर्मूलन आवश्यक: डॉ. आलोक जत्राटकर

कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रमात बोलताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर डॉ. शरद गायकवाड आणि प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी.





कोल्हापूर, दि. १५ एप्रिल: भारतात खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी संपूर्ण जातिनिर्मूलन आणि एकमेकांकडे केवळ माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन अंगिकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी आज येथे केले.

येथील महावीर महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “फुले–आंबेडकर यांच्या विचारकार्याची प्रस्तुतता” या विषयावर विशेष व्याख्यान देताना ते बोलत होते.

फुले–शाहू-आंबेडकर ही केवळ नावे नसून या देशाच्या प्रबोधनपर्वाची ती एक व्यापक मूल्यव्यवस्था असल्याचे सांगून डॉ. जत्राटकर म्हणाले, आजच्या समाजात जातीयवाद, राजकीय स्वार्थ आणि सामाजिक विसंगती यांचे प्रमाण अतिरेकी वाढले आहे. फुले–शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार करूनच समाज अधिक समताधिष्ठित आणि प्रगत होऊ शकतो. या त्रयीचे कार्य केवळ एका घटकापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची मूल्ये देणारे आहे. आपण या महामानवांना पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित ठेवतो; मात्र त्यापलिकडे त्यांच्या विचारांचा अभ्यास आणि आचरण ही काळाची गरज आहे.

ते म्हणाले, महात्मा फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले, तसेच त्यांनी विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक सुधारणांचे व्यापक आंदोलन उभे केले. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले संघर्ष हे केवळ एका समाजघटकासाठी नव्हते, तर संपूर्ण भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी होते. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला त्यांनी समान हक्क, प्रतिष्ठा आणि न्याय दिल्याचे नमूद केले. 

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी म्हणाले, समोरच्या प्रत्येक व्यक्तीकडे केवळ जातीच्या दृष्टीने पाहणे आता सोडून दिले पाहिजे. प्रत्येकाने माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर या महामानवांच्या चरित्रांचे, विचारकार्याचे सतत वाचन, चिंतन आणि अनुसरण करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी डॉ. शरद गायकवाड यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि परिचय करून दिला. डॉ. संध्या जाधव आणि डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. हेमंत पाटील यांनी आभार मानले. यावेळी नामदेवराव कांबळे, डॉ. शिरीष शितोळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.