रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

कोळशाच्या जीवाला आगीचा ‘आधार’...

'सुधागड ०७' चित्रपटाचे पोस्टर

दिलीप रायण्णावर



(माझे मित्र दिलीप रायण्णावर यांनी आपल्या शासकीय सेवेतील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच ‘सुधागड ०७’ हा चित्रपट बनवला आहे. कोळशाच्या भट्टीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या शोषणाला वाचा फोडणारा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साद घालणारा हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास अद्याप काही अवधी जाणार आहे. कारण सध्या तो विविध चित्रपट महोत्सवांतून फिरतो आहे. पुरस्कार मिळवतो आहे. दिलीपनं, ज्याला मी प्रेमानं दिल्पा म्हणतो, मला हा चित्रपट खाजगीरित्या पाहण्यासाठी पाठवला. आज तो पाहिला. त्या निमित्तानं माझ्या भावना अनावृत पत्रस्वरुपात इथं व्यक्त करीत आहे.)

प्रिय दिल्पा,
मित्रा, आज तुझा चित्रपट ‘सुधागड-०७’ पाहिला. खरं सांगतो, अगदी स्पीचलेस झालोय. त्याहूनही सुन्न झालोय. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट हृदयाला हात घालणारा तर झालाच आहे, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अत्यंत थरारक, रोमांचक बनला आहे.
मला ती संध्याकाळ आठवते आहे, जेव्हा तू या स्क्रीप्टचा पहिला मसुदा फायनल केला होतास आणि थेट कोल्हापूरला माझ्या ऑफिसमध्ये पोहोचला होतास. त्या संध्याकाळी सहाच्या पुढे जवळजवळ दोनेक तास तू मला स्टोरी सांगत होतास आणि मी तल्लीन आणि थक्क होऊन तुझं नॅरेशन ऐकत होतो. सगळ्या लोकेशन्ससह तू मला हा चित्रपट 'ऐकवला' होतास. तेव्हा तू सांगतोयस तसा हा चित्रपट झाला तर जबरदस्त होईल, असं मी तुला म्हणालो होतो. प्रत्यक्षात चित्रपट त्याहूनही अधिक जबराट आणि देखणा झाला आहे, यासाठी तुझं मनापासून अभिनंदन!
इथं एका गोष्टीची कबुली मला द्यायला हवी, ती अशी की, जेव्हा तू हे सारं मला सांगत होतास, तेव्हा मित्र म्हणून तुझ्या आत्मविश्वासाचा अभिमान वाटत असला तरीही एक प्रकारची साशंकताही माझ्या मनात होती, ती म्हणजे, तुझी दिग्दर्शकीय पाटी कोरी असल्यानं आणि चित्रपटाच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे अनेक घटक असल्यानं कशा प्रकारचं प्रोडक्ट असेल, अशी भीती वाटत होती. वेळोवेळी तू चित्रपटाच्या प्रगतीविषयी कळवित होतास, खूष होतास, पण तरीही चित्रपटाची गाणी पाहीपर्यंत माझ्या मनातली शंका कायमच होती. पण गाणी पाहिली, त्यांचे लिरिक्स ऐकले, टेकिंग पाहिलं आणि चित्रपटाविषयीच्या आशाअपेक्षा पुन्हा पल्लवित झाल्या. आज पिक्चर बघितला आणि तुला सांगतो, एकटाच असूनही डोळ्यांत अश्रू उभे राहिले. एक तर, तुझ्या हातून एक उत्तम कलाकृती साकार झाली आहे, याचा मित्र म्हणून अभिमान दाटून आल्यानं आलेले अश्रू होते आणि दुसरे अश्रू तुझ्या कलाकृतीसाठी होते. कारण, शोषणातिरेकाच्या ज्या विश्वाचं दर्शन तू घडवलं आहे, त्यापासून आपला समाज केवळ अन् केवळ अनभिज्ञच नव्हे, तर खूप दूर आहे. त्या विश्वाशी दुरान्वयेही आजच्या समाजाला काही देणंघेणं नाही. समाजाच्या एका व्यापक घटकाचं शोषण करणारी एक यंत्रणा कशी पद्धतशीरपणे आपल्या भोवतालातच काम करते आणि ते विश्व, ती यंत्रणा आपल्या आसपास असूनही आपल्याला त्याचं काही वाटत नाही. मग तू दाखवलंस त्याप्रमाणं आदिवासींचं कोळशासाठीचं शोषण असेल, किंवा ऊसतोड मजुरांचं जीणं असेल. त्यांच्या जगण्याशी, जीवनमरणाशी कसलंही देणं घेणं नसलेला उदासीन, आत्ममग्न समाज सर्वव्याप्त आहे.
या पार्श्वभूमीवर, मित्रा, तुझ्यासारखा वरिष्ठ महसुली अधिकारी समाजाच्या शोषणदुःखानं अस्वस्थ होतो आणि त्याला वाचा फोडण्यासाठी, त्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एका अत्यंत देखण्या कलाकृतीच्या माध्यमातून समाजाला साद घालण्यासाठी सिद्ध होतो, यातूनच तुझ्या उदात्त सामाजिक जाणिवेची प्रचिती येते.
मला महत्त्वाचं काय वाटतं, सांगू? शोषणाची व्याप्ती आणि खोली दाखवून देत असतानाच व्यवस्थेमधील चांगुलपणावरचा, माणूसपणावरचा आणि सांविधानिक मूल्यांवरचा विश्वास तू कोठेही ढळू दिलेला नाहीस. आज हिंसा किती पराकोटीची असते, हे दाखवण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांची चढाओढ लागलेली असण्याच्या काळात तुझं हे वेगळेपण ठसठशीतपणे उठून दिसणारं आहे. कथेवरची पकड कोठेही सुटू न देता, एका विशिष्ट गतीनं चित्रपटाला पुढे नेत असताना त्यातली थरारकता अखेरपर्यंत टिकवून ठेवण्यात तू यशस्वी झालेला आहेस. डॉ. मिलींद शिंदे वगळता बऱ्यापैकी सारेच नवखे कलाकार आहेत. अशा रॉ कलाकारांकडून अभिनय करवून घेणं आणि आवश्यक परिणाम मिळवणं, ही बाब मोठी अवघड असते. पण एका कसलेल्या दिग्दर्शकाप्रमाणं तू ते साध्य केलं आहेस, याचं मला कोण कौतुक वाटतं! स्क्रीनप्लेसाठी तुला ज्येष्ठ लेखक सन्मित्र विद्यासागर अध्यापक आणि सुषमाताई शितोळे यांची उत्तम साथ लाभलेली दिसते. बप्पी लहरी यांचं संगीत लाभलेला हा कदाचित अखेरचाच चित्रपट असेल. त्यांचे चिरंजीव बाप्पा यांनीही संगीताचा गोडवा आणि पार्श्वसंगीताचा थरार अतिशय उत्तम जमवून आणला आहे. भावाच्या पिक्चरसाठी सोनू निगमनं गाणं म्हटलंय, याचाच मोठा आनंद आहे. ते त्यानं भारीच म्हटलंय. प्रत्येक गाण्याचे बोल आशयपूर्ण आणि चित्रपटाच्या कथेला साजेसे, पुढे घेऊन जाणारे आहेत. पोलीस अधीक्षक सन्मित्र महेश सरतापे यांचे तुझ्या चित्रपटात सुखद दर्शन झाले. त्यांना पाहूनही छान वाटलं. तुमच्यासारखे मित्र व्यवस्थेमध्ये सजग मानवतावादी भावनेतून योगदान देत आहेत, आपल्या परीघाबाहेर जाऊन कला, संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक न्याय, प्रबोधन जाणिवा विकसित करण्यासाठी काम करत आहेत, याचाही खूप अभिमान वाटतो.
बऱ्याच वर्षांनी असं कोणाला तरी पत्र लिहीतोय. अलीकडं एका शब्दाच्या अगर ओळीच्या पलिकडं आपण मित्राला सोडूनच दे, आईबापालाही लिहीत नाही. ते तुला लिहीतोय. फार संवेदनशीलतेनं तू ‘सुधागड ०७’ तयार केला आहेस. त्याला महोत्सवीय यश मिळेलंच. पण, चित्रपटगृहांतूनही त्याला उत्तम प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो. आपला मराठी प्रेक्षक तितका सुजाण आणि चोखंदळ निश्चितच आहे.
दिल्पा, पदार्पणातच तू ठोकलेल्या शड्डूचा आवाज चित्रपटसृष्टीत निश्चितपणानं घुमणार आहे, याची खात्री बाळग. जिकलाईस भावा...
तुझाच,
आलोक

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

तोच हा राजा, तोच हा छत्रपती...


अंधारात पेटवी मशाल जो,

रयतेच्या मनी जागवी स्वाभिमान जो,

तोच हा राजा, तोच हा छत्रपती,

गाती गाथा तयाची, चौदिशा अन् आसमंतही!

शिवजयंतीच्या पूर्वप्रभातीला (दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी) उगवतीच्या सूर्याने अवघ्या काही क्षणांसाठी आसमंत असे भगव्या, नारंगी रंगात रंगवून काढले. या लालिमेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा. (छायाचित्र- डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)






दै. जनप्रवास

लोकमत

पुढारी



सिंधुदुर्ग समाचार

टाइम्स ऑफ इंडिया





शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

सूर्यप्रतापी राजा शिवछत्रपति, तेज तुझे अमर दिव्य ज्योती...

शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवाजी विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची काही नयनरम्य छायाचित्रे काढली. त्यांना बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी व्यापक प्रसिद्धी दिली. त्यातील काही निवडक छायाचित्रे पुढे देत आहे...


मकरसंक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू आहे. या उत्तरायण प्रवासादरम्यान कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या पाठी मावळतीच्या सूर्याने तेजांकित प्रभामंडळ प्रदान केले आहे. त्याची आजची काही छायाचित्रे... (छायाचित्र- डॉ. आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)




(लोकमत)




 

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

सरला माहेश्वरी आणि दूरदर्शनच्या आठवणी...

सरला माहेश्वरी

शम्मी नारंग आणि रिनी खन्ना

निती रविंन्द्रन, गीतांजली अय्यर, मीनू तलवार आणि सलमा सुल्तान




दूरदर्शनच्या न्यूज अँकर सरला माहेश्वरी यांचं काल ७१ व्या वर्षी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहात असताना त्या कालखंडातील अनेक आठवणी मनी जागू लागल्या. सरला माहेश्वरी हे नाव आजच्या पिढीला तितकंसं माहिती असण्याचं कारण नसलं तरी दूरदर्शनवरील सोज्वळ प्रज्ञाशील चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. आजच्या कर्कश्य आणि नकोशा वाटणाऱ्या अँकरिंगच्या पार्श्वभूमीवर त्यांचं शांत, सस्मित असं बातम्यांचं वाचन हा दूरदर्शनच्या बातमीपत्रांना नवी उंची प्राप्त करून देणारा होता. हिंदीवर प्रकांड म्हणावं, असं प्रभुत्व असणारं हे व्यक्तीमत्त्व त्यांच्या शालीनतेमुळं वेगळं उठून दिसायचं. आजकाल लोकांना स्क्रीनला खिळवून ठेवण्यासाठी अँकरला नाना गोष्टी कराव्या लागतात. ती आजच्या २४x७ वाहिन्यांच्या जमान्यात कदाचित गरजही आहे. तथापि, केवळ आपल्या शब्दफेकीतून आणि आवाजाच्या आवश्यक तितक्या चढउतारांमधून बातमीचं महत्त्व आणि मूल्य अधोरेखित करण्याचं कौशल्य त्यांच्याकडं होतं. एनडीटीव्हीच्या निधी कुलपतींना पाहिलं की मला माहेश्वरींची हटकून आठवण यायची. कुलपतीही नुकत्याच निवृत्त झाल्यात. माहेश्वरी यांच्या निमित्तानं त्या काळच्या दूरदर्शनमधील अनेक न्यूज अँकर मला त्यांच्या नावानिशी आठवू लागले, याचं माझं मलाही आश्चर्य वाटू लागलं.
यात पहिल्या आठवल्या त्या सलमा सुल्तान! मुस्लीम समाजातील सलमा याही टापटीपतेचा आणि व्यावसायिकतेचा मोठा आदर्श होत्या, असं म्हणायला हवं. परवीन बाबीसारखा हेअरकट, केसांत व्यवस्थित खोवलेले गुलाबाचे फूल आणि साडी गळ्यावरुन अगदी परफेक्ट कोनात दुमडलेली. अखेरपर्यंत त्यांच्या या नीटनेटकेपणात काहीही फरक पडला नाही. आज तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, सलमा या हसत नाहीत, यावरुन त्या काळी देशभरात जशा चर्चा घडल्या, तसंच त्यांनी एकदा स्माईल दिलं, तर त्याच्याही बातम्या झालेल्या. म्हणजे, हे न्यूज रीडर बातमीपत्राच्या अखेरीस जय हिंद.. शुभ रात्री... असं म्हणाले की कॅमेऱ्याकडं पाहून एक हलकंसं स्माईल द्यायचे. पुरूष अँकरही त्याला अपवाद नव्हते. मात्र सलमा त्याला अपवाद होत्या. सलमा इतरांसारख्या हसत नाहीत, याचा माझ्या आईलाही खूप त्रास होई. माध्यमांतच कार्यरत असल्याने आपल्याबद्दलची ही देशभरातील प्रतिक्रिया सलमा यांच्यापर्यंत पोहोचली असावी. आणि एके दिवशी त्या चक्क हसल्या.... मात्र, त्या हसल्या, त्या दिवशी आई ‘ही बया आज कशी काय हसली बरं?’ असं आश्चर्य आणि कौतुकमिश्रीत उद्गारली. हे आश्चर्य देशभरात सार्वत्रिक होतं.
त्या खालोखाल आठवतात ते शम्मी नारंग. एकदम भारदस्त पर्सनॅलिटी आणि आवाजही तसाच. बातमीपत्र कसं वाचावं, हिंदी कसं असावं, याचा उत्तम नमुना म्हणजे शम्मी नारंग यांचं वार्तापत्र सादरीकरण. त्यावेळी त्यांच्यासोबतच रिनी खन्ना या इंग्रजी बातमीपत्र सादर करीत. दिल्ली दूरदर्शननंतर अलिकडं हे दोघे दिल्ली मेट्रोचा आवाज बनलेले आहेत. दिल्ली मेट्रोच्या हिंदी उद्घोषणा व सूचना शम्मी यांच्या, तर इंग्रजी उद्घोषणा रिनी यांच्या आवाजात केल्या जातात.
गीतांजली अय्यर, मीनू तलवार आणि दाढीवाले पण एकदम पॉलिश्ड असे सुनीत टंडन या तिघांना मी विसरू शकणार नाही. हे इंग्रजी वार्तापत्र सादर करायचे. तेव्हा इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी त्यांच्या इंग्रजी बातम्यांचे सादरीकरण आईबाबा लक्षपूर्वक ऐकायला सांगायचे. यातल्या प्रत्येकाची शैली वेगळी तसेच भाषेचे आणि व्यक्तीमत्त्वाचे प्रत्येकाचे अपीलही स्वतंत्र ठसा उमटविणारे असे होते. बातमी कोणती आहे, चांगली आहे, वाईट आहे, यानुसार त्यांचं सादरीकरण बदलायचं. माझं इंग्रजी सुधारण्यामध्ये आईच्या बरोबरीने या अँकर मंडळींचंही श्रेय मान्य करायला पाहिजे. म्हणजे या लोकांनी बातम्या सांगण्यापलिकडं जाऊन एका पिढीच्या व्यक्तीमत्त्व विकासातही काही हातभार लावला आहे. हे त्यांचे ऋण मान्य करायला हवेत.

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६

देसाई, हे बरं नाही केलंत...

संजय देसाई


माझे सकाळमधील ज्येष्ठ छायाचित्रकार मित्र संजय देसाई यांचे काल अकाली आणि अचानकपणे निधन झाले. या क्षणापर्यंत ही वार्ता खोटी ठरावी, असे वाटत राहिले आणि त्यामुळेच श्रद्धांजलीपर पोस्ट लिहायला मन धजावत नव्हते. गेल्या शुक्रवारीच आम्ही सारे पूर्वाश्रमीचे सकाळवासी विश्वास पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात एकत्र आलो होतो. देसाईही आले होते. सकाळमधून मुदतपूर्व निवृत्ती घेतल्यानंतरही छायाचित्रणापासून मात्र ते दुरावले नव्हते. मुक्तपणे फिरणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होणे, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांशी संपर्क राखणे अशा सर्व गोष्टी त्यांच्या सामाजिकतेची साक्ष देणाऱ्या होत्या. मुलांच्या प्रगतीचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून पाझरत असे. आमचा काही ना काही कारणाने नित्य संपर्क असे. अगदी गेल्या ३० डिसेंबरलाही प्रेस क्लबमध्ये पुरस्कार निवड समितीसाठी आम्ही एकत्र होतो. अगदी शेजारी बसून सकाळमधील कामाच्या आठवणी आम्ही जागवल्या होत्या. विशेषतः 'सकाळ टुडे' पुरवणी लॉन्चिंगच्या कालखंडात देसाई, चेचर यांच्या साथीने फोटोजर्नालिझमचे अनेक प्रयोग केले होते. त्या आठवणीही त्यांनी काढल्या. त्या काळात आमचे हे दोन फोटोग्राफर म्हणजे सकाळचे दोन डोळेच होते जणू, इतकं अप्रतिम योगदान त्यांनी दिलंय. आता देसाई यांच्या जाण्यानं हा एक डोळा कायमचा मिटला गेला आहे... देसाई ६३ हे काही आपल्यासारख्याचे जाण्याचे वय नव्हे... पण, तुम्ही गेलात... हे काही बरे नाही केलेत... आपणास भावपूर्ण श्रद्धांजली!

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

‘पुस्तके: साद आणि दाद’ – प्रामाणिक वाचनानुभवाचा दस्तावेज

पुस्तके: साद आणि दाद या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) कृष्णा दिवटे, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. अनुराग लव्हेकर, प्रताप पाटील, भाग्यश्री कासोटे-पाटील आणि श्रीमती टोपकर.



(डॉ. आलोक जत्राटकर यांनी दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी ‘पुस्तके: साद आणि दाद’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केलेल्या भाषणाचा संपादित अंश-)


पुस्तकांविषयीचे पुस्तक’ या गटात मोडणारे ‘पुस्तके: साद आणि दाद’ हा पारंपरिक अर्थाने “समीक्षा-ग्रंथ” नसून तो रसिक वाचकाने लिहिलेला संवादात्मक आस्वाद आहे. येथे समीक्षेपेक्षा वाचनानुभवाची प्रामाणिक नोंद अधिक ठळक आहे. डॉ. अनुराग लव्हेकर यांची ओळख प्रथम रसिक वाचक म्हणून होते. त्यांच्या लेखनात “मी तज्ज्ञ आहे” असा अहंभाव नाही

; उलट “मी वाचतो, मला भावते, म्हणून सांगतो” ही नम्र भूमिका दिसते. सोशल मीडियावरून उभ्या राहिलेल्या वाचन-संवादातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे हे पुस्तक डिजिटल काळातील वाचनसंस्कृतीचे दस्तऐवज ठरते. इतिहास, संस्कृती, राजकारण, विज्ञान, वैद्यक, पर्यावरण, कादंबरी, कविता, विनोद, अनुवाद – असा मोठा पट पुस्तकात येतो. हीच या ग्रंथाची ताकद आहे.

या पुस्तकाच्या वाचनातून काही महत्त्वाची निरीक्षणे सामोरी आली. ती अशी की, ही तशी काही पारंपरिक अकादमिक समीक्षा नाही, तर वाचलेल्या पुस्तकांचे आस्वादात्मक, वाचक-केंद्रित रसग्रहण आहे. लेखक काही ‘निर्णय’ देण्याऐवजी वाचकांमध्ये संबंधित पुस्तकांविषयी ‘उत्सुकता जागवण्यावर’ भर देताना दिसतो. अतिशय सोपी, प्रवाही, अनौपचारिक मराठी भाषा लेखकाची असून तांत्रिक जडत्व जास्तीत जास्त टाळण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. वाचनासाठी आणि विशेषतः लिहीण्यासाठी ज्या पुस्तकांची निवड केली आहे, त्यांत ‘आवडी’बरोबरच ज्यांच्याशी वाचनाचे ‘भावनिक नाते’ जोडलेले आहे, त्यांचा समावेश आहे. खऱ्या अर्थाने वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी “मार्गदर्शक सूची” ठरेल असा ग्रंथ डॉ. लव्हेकर यांनी लिहीला आहे. तो नववाचकांसाठी दिशादर्शक तर आहेच, शिवाय, ‘सर्व काही वाचणे शक्य नाही’ या वास्तवाची प्रामाणिक जाणीव करून देणाराही आहे.

पुस्तकामध्ये लेखकाचे इतिहासविषयक प्रेम प्रकर्षाने जाणवते. ‘हंपी–विजयनगर’, ‘राजाधिराज कृष्णदेवराय’, ‘मराठ्यांचा दरारा’ – इतिहास जिवंत करून सांगण्याची लेखकाची ताकद अधोरेखित करणारे असे अनेक लेख पुस्तकात आहेत. त्याखेरीज विनोदी आणि हलक्याफुलक्या विषयांवरील पुस्तकेही त्यांनी वाचली आहेत. अनुवादित आणि मूळ इंग्रजी पुस्तकांचेही ते आस्वादक असल्याचे पटवणारे रसग्रहणही यामध्ये आहे.

 ‘साद आणि दाद’ हे पुस्तक म्हणजे — वाचकाने दिलेली साद आणि दुसऱ्या वाचकाला दिलेली दाद आहे. ते समीक्षा शिकवत नाही, पण वाचायला शिकवते; निर्णय देत नाही, पण विचार करायला प्रवृत्त करते.

इंग्रजी साहित्यात Book on Books किंवा Reading about Reading ही एक स्वतंत्र, समृद्ध परंपरा आहे. हॅरॉल्ड ब्लूम, जॉर्ज स्टायनर, अल्बर्टो मॅन्गुएल यांसारख्या लेखकांनी वाचनाचा अनुभव, ग्रंथांची परंपरा आणि वाचकाची बौद्धिक घडण यांवर सखोल लेखन केले आहे. ही परंपरा मुख्यतः तत्त्वचिंतनात्मक, समीक्षात्मक आणि बौद्धिक पातळीवर केंद्रित आहे. मराठी साहित्यात मात्र अशी परंपरा तुलनेने विरळ आहे. त्या मोजक्या अपवादांपैकी सतीश काळसेकरांचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे मानावे लागेल. काळसेकरांचे लेखन हे कवीमनाच्या तीक्ष्ण संवेदनशीलतेतून आलेले, आत्मपरीक्षणात्मक आणि भाषिकदृष्ट्या अत्यंत काटेकोर आहे. ते वाचकाकडे बौद्धिक आणि नैतिक जबाबदारी असलेल्या घटक म्हणून पाहतात. त्यामुळे वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तक मराठीतील उच्च दर्जाचे बुक ऑन बुक्स ठरते. या पार्श्वभूमीवर पाहिले तर डॉ. अनुराग लव्हेकर यांचे ‘साद आणि दाद’ हे पुस्तक त्याच परंपरेतील, पण वेगळ्या स्तरावरचे आणि वेगळ्या उद्देशाचे लेखन आहे.

साद आणि दाद हे पुस्तक वाचकाच्या बौद्धिक कसोटीपेक्षा वाचकाच्या वाचनानंदावर विश्वास ठेवते. येथे वाचकाला शिस्त लावण्याचा आग्रह नाही; उलट त्याला वाचनाकडे खेचण्याचा प्रयत्न आहे. काळसेकर जिथे वाचनाकडे अंतर्मुख आणि चिंतनशील प्रक्रिया म्हणून पाहतात, तिथे लव्हेकर वाचनाकडे संवाद, उत्सुकता आणि सामायिक आनंद म्हणून पाहतात. म्हणूनच साद आणि दाद हे पुस्तक— अभिजात समीक्षेऐवजी लोकाभिमुख आस्वाद देते. ग्रंथनिवडीचे निकष ठरवत नाही, तर ग्रंथांशी मैत्री कशी जुळते हे सांगते. वाचकाला घडवण्याऐवजी वाचनासाठी प्रोत्साहित करते. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे पुस्तक वाचकाला आरसा दाखवते; तर ‘साद आणि दाद’ हे पुस्तक वाचकाला रस्ता दाखवते. वाचणाऱ्याची रोजनिशी हे मराठीतील उच्च शिखर असेल, तर साद आणि दाद हे वाचनसंस्कृतीकडे नेणारे प्रवेशद्वार आहे. दोन्ही पुस्तकांचे स्थान वेगळे, पण परस्परपूरक आहे— आणि आजच्या काळात, जेव्हा नव्या वाचकांची संख्या वाढवणे हीच खरी गरज आहे, तेव्हा साद आणि दाद यांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित करावे लागते.

साद आणि दाद कडे जर केवळ ‘बुक ऑन बुक्स’ म्हणून पाहिले, तर या पुस्तकातील एक सूक्ष्म पण महत्त्वाचा पैलू नजरेआड राहण्याचा धोका आहे. तो पैलू म्हणजे—लेखकाचा वैचारिक प्रवास. या पुस्तकातील लेखन वाचताना असे जाणवते की लेखक एका ठराविक वैचारिक स्थानावर उभा राहून पुस्तकांकडे पाहत नाही. उलट, त्याची भूमिका स्थिर मतवादाची नसून प्रवासी वाचकाची आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, लेखकाचा प्रारंभबिंदू काही अंशी उजव्या-डाव्या वैचारिक चौकटींपैकी एका बाजूकडे झुकलेला असू शकतो; मात्र या झुकावाला अंतिम सत्य मानलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे, वाचन ही प्रक्रिया लेखकासाठी स्वतःच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी नसून स्वतःच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी आहे. ही बाब मराठी समीक्षेत दुर्मिळ आहे. बहुतेक वेळा वाचनाचा उपयोग— आपली आधीची भूमिका अधिक पक्की करण्यासाठी, ‘आपण बरोबरच होतो’ हे सिद्ध करण्यासाठी, किंवा वैचारिक विरोधकांना खोडून काढण्यासाठी केला जातो. साद आणि दाद यामध्ये मात्र वाचन हे स्व-स्थानांतरणाचे साधन ठरते.

लेखकाला “दुसरी बाजू” जाणून घ्यायची आहे— पण ती जिंकण्यासाठी नाही; ती समजून घेण्यासाठी आहे. हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. या अर्थाने पाहता, साद आणि दाद हे पुस्तक मतवादातून संवादाकडे होणाऱ्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण आहे. येथे वाचकाला ‘कुठे उभे राहावे’ हे सांगितले जात नाही; तर ‘कसे हलते राहावे’ याचे उदाहरण दिले जाते. याच ठिकाणी हे पुस्तक सतीश काळसेकरांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’पासून वेगळ्या अक्षावर उभे राहते. काळसेकर वाचनाकडे नैतिक–बौद्धिक शिस्त म्हणून पाहतात, तर लव्हेकर वाचनाकडे वैचारिक स्थलांतराची प्रक्रिया म्हणून पाहतात. वाचनानंतर लिहिण्याचे खरे प्रयोजन हे ‘भूमिका घोषित करणे’ नसून ‘भूमिकेच्या सीमारेषा ओलांडण्याची तयारी दाखवणे’ हेच आहे.

या अर्थाने साद आणि दाद हे पुस्तक केवळ ग्रंथपरिचय देत नाही, तर वाचकाला वैचारिक लवचिकतेचे नैतिक भान देते. आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात, जिथे वाचनसुद्धा मतवादाची शस्त्रे बनली आहेत, तिथे असे पुस्तक बौद्धिक लोकशाहीचे सूक्ष्म पण महत्त्वाचे योगदान ठरते. साद आणि दाद हे पुस्तक केवळ ‘बुक ऑन बुक्स’ या चौकटीत समजावून घेणे अपुरे ठरते. कारण या ग्रंथाचा केंद्रबिंदू पुस्तके नसून पुस्तकांमधून घडणारा लेखकाचा वैचारिक प्रवास आहे. या पुस्तकातील लेखन वाचताना असे स्पष्टपणे जाणवते की लेखक एका ठरावीक वैचारिक स्थानावर स्थिर उभा नाही. काही प्रमाणात त्याची झुकावरेषा जाणवते, पण ती आक्रमक भूमिका बनत नाही. उलट, प्रत्येक वाचनानंतर ती भूमिका थोडी हलते, विस्तारते, प्रश्नांकित होते. याच हालचालीत या पुस्तकाचे खरे मोल दडलेले आहे.

आजच्या काळात वाचन अनेकदा मतवादाची पुष्टी करण्याचे साधन बनते. आपण ज्याच्याशी आधीच सहमत आहोत, तेच वाचतो; आणि वाचून अधिक खात्री करून घेतो. साद आणि दाद मात्र या प्रवृत्तीच्या विरुद्ध दिशेने जाते. येथे वाचन हे स्वतःच्या भूमिकेची पुनर्रचना करण्याचे साधन ठरते. या अर्थाने पाहता, लेखक “उजवीकडून डावीकडे” किंवा “एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे” सरकत आहे असे म्हणण्यापेक्षा, तो द्विध्रुवी चौकटीबाहेर जाण्याचा प्रयत्न करतो आहे असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल. त्याला दुसरी बाजू खंडनासाठी नव्हे, तर समजून घेण्यासाठी जाणून घ्यायची आहे—आणि हेच वाचनानंतर लिहिण्याचे सर्वात सुसंस्कृत प्रयोजन आहे.

म्हणूनच साद आणि दाद चे महत्त्व त्याच्या निष्कर्षांत नाही, तर त्याच्या अस्वस्थतेत आहे. ती अस्वस्थता वाचकाला विचार करायला भाग पाडते, बाजू निवडायला नाही. शेवटी असे म्हणता येईल की, वाचन हे भूमिका ठरवण्याचे साधन नसून, भूमिका ओलांडण्याचे धैर्य देणारी प्रक्रिया आहे; आणि साद आणि दाद हे पुस्तक त्या प्रक्रियेचे प्रामाणिक दस्तऐवजीकरण आहे.

पुस्तके: साद आणि दाद (समीक्षा संग्रह)

लेखक- डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर

भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे- २२४,

किंमत रु. ३५०/- 



दुसरा यमकर होणे नाही..! या सम हाच...

अनिल यमकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी उपसंचालक वसंत शिर्के आणि आणि सध्याचे उपसंचालक प्रवीण टाके आणि सहकारी.

अनिल यमकर यांना शुभेच्छा देताना डॉ. आलोक जत्राटकर.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातील माझे ज्येष्ठ सहकारी, छायाचित्रकार अनिलजी यमकर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. नुकताच त्यांचा सुमारे तीन तास चाललेला भरगच्च असा निरोप समारंभ अनुभवून परत आलोय.
यमकर यांनी महाराष्ट्र शासनामध्ये केवळ छायाचित्रकार म्हणून सेवा बजावली, इतकंच म्हणणं त्यांच्या गेल्या तीसेक वर्षांच्या कारकीर्दीवर अन्याय केल्यासारखे होईल. कारण, यमकर हा माणूस त्यापलिकडे काही तरी आहे. त्यांनी बजावलेल्या सेवेतून निर्माण झालेली छायाचित्रकारिता इतक्या प्रदीर्घ कालावधीत कोल्हापूरसह अखिल महाराष्ट्रानं वेळोवेळी अनुभवली आहेच. पण, यमकरांनी सेवा बजावत असताना कोल्हापूरसह सर्वदूर एक व्यापक जनसंपर्क निर्माण केला. जी माणसं जोडली, त्यातून त्यांचं म्हणून एक वर्तुळ आकाराला आलं. याला त्यांचं स्नेहशील, स्वागतशील, मृदू मितभाषी वर्तन आणि समाधानी सुहास्यमुद्रा कारण होती. ‘नाही’ हा शब्दच यमकरांच्या शब्दकोषामध्ये कधी नव्हता. कोणत्याही विभागाचं काम असो, अगर बाहेरचं काही नियोजन असो, त्यांनी प्रत्येकाच्या सादाला तत्परतेनं दिलेला प्रतिसाद हे त्यांच्या या प्रचंड जनसंपर्काचं गमक आहे. कितीही ताणतणावाची परिस्थिती असली तरी संयम, तोल ढळू न देता आपलं नियमित काम ते अत्यंत इमानेइतबारे करीत होतेच, पण त्यापलिकडे जाऊन सर्वांसाठी त्यांचा मदतीचा हातही तितकाच तत्पर असे. मग तिथे ते वरिष्ठ-कनिष्ठ वगैरे कोणताही भेद मानत नसत. लोकांचं कोणतंही काम असो, त्याच्या पूर्ततेमध्ये अत्यंत निरपेक्ष, निस्वार्थ भावाने त्यांना मदत करणं, हे यमकरांचं फार महत्त्वाचं स्वभाववैशिष्ट्य आहे. म्हणूनच आजच्या निरोप समारंभाला माहिती जनसंपर्कचं संपूर्ण कार्यालय फुला-रांगोळ्यांनी सजलं, उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह सर्व सहकारी हा सोहळा अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रेमानं राबले, अगदी अल्पावधीत त्यांच्यावर आठेक मिनिटांची एक उत्तम ध्वनीचित्रफीत तयार केली, जिल्हाधिकारी अमोल येडगे हे खास वेळ काढून यमकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले, दहा मिनिटांहून अधिक वेळ त्यांच्यासमवेत व्यतित केली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, त्यांचे सहकारी अनिल तांदळे आणि विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आले, माजी उपसंचालक वसंत शिर्के सर आपला निवृत्त झाल्यानंतर कार्यालयात पुन्हा न येण्याचा शिरस्ता मोडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आठवणीने उपस्थित राहिले, यमकरांचे बॉस राहिलेले अनेक माजी जिल्हा माहिती अधिकारी या प्रसंगी आवर्जून आले, कोल्हापूर प्रेस क्लब, अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष, सदस्य, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे जनसंपर्क अधिकारी यांच्यासह यमकरांचा प्रचंड मोठा मित्रपरिवार यावेळी उपस्थित राहिला.
आदरणीय यमकर वहिनी आज या निरोप समारंभाच्या निमित्ताने प्रथमच त्यांच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी शेवटी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “साहेबांनी कधी त्यांच्या कामाबद्दल आम्हाला काही सांगितलं नाही, मात्र आज उपस्थितांनी व्यक्त केलेल्या मनोगतांमधून त्यांनी किती चांगलं काम केलंय, याची माहिती होऊन मन अभिमानानं भरून गेलंय.” खरं आहे वहिनी, अभिमानानं ऊर भरून यावा, असाच तुमचा नवरा आणि आमचा हा ज्येष्ठ मित्र आहे. यमकर हे कोल्हापूर विभागातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा चेहरा होते, ब्रँड अँबॅसिडर होते. आपल्या सेवेव्यतिरिक्तही विभागाला असा चेहरा प्रदान करण्याचे काम करणारा यमकरांसारखा दुसरा सहकारी पुन्हा होणे नाही, मिळणे नाही, अशीच भावना या प्रसंगी मनी येत आहे. गेल्या तीस वर्षांच्या सेवेतील महत्त्वाच्या घडामोडींचं दस्तावेजीकरण करावं, अशी सूचना समीर देशपांडे यांनी यावेळी केली. त्या दृष्टीने यमकरांनी काम करावं, आवश्यक प्रसंगी विभागालाही मदत करावी, आणि हे सर्व आता कुटुंबाला वेळ देत करावं, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या भावी आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!