शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

अनप्रेडिक्टेबल



('दै. पुण्यनगरी'च्या कोल्हापूर आवृत्तीने गतवर्षीप्रमाणे यंदाही स्वतंत्र दिवाळी विशेषांक काढला. या देखण्या अंकात उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जाँग-ऊन याच्याविषयी लिहीण्यासाठी संपादक मित्रवर्य श्री. अशोक घोरपडे आणि श्री. समाधान पोरे यांनी प्रवृत्त केले. वाचकांनी त्याचे उत्तम स्वागतही केले. हा लेख दै. पुण्यनगरीच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी साभार पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)



आम्ही ताकदवान आहोत, शांत आहोत; पण म्हणून आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. रॉकेटमॅनने आपला अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम थांबविला नाही तर तुम्हाला उद्ध्वस्त करण्याखेरीज आमच्यासमोर पर्याय नाही... अमेरिकेसारख्या जगातील सर्वशक्तीमान महासत्तेचा अध्यक्ष जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरुन भौगोलिकदृष्ट्या त्यांच्या तुलनेत एक दशांशही नसणाऱ्या उत्तर कोरियासारख्या देशाला इशारा देतो, तेव्हा त्यातील गांभीर्य मोठे असते. त्याचवेळी त्याच व्यासपीठावरुन युद्धाची चिथावणी देणाऱ्यांनो, जर तशी वेळ आलीच तर हवाई सीमांची तमा न बाळगता तुमची बॉम्बर विमाने वरच्या वर उडवून देऊ. कोण उद्ध्वस्त होते ते पाहूच!’ असे प्रतिआव्हान देण्याचे धाडस जेव्हा संबंधित देशाचा पराष्ट्रमंत्री करतो, तेव्हा अखिल जगाच्या दृष्टीने हे गांभीर्य अधिकच वाढलेले असते. महत्त्वाचे म्हणजे चीन, रशिया आणि जपानसारखे देश या प्रसंगी सबुरीची भाषा करीत असले तरी त्यांच्याही संयमाचा अंत पाहणे, कोणालाच परवडणारे नाही.
उत्तर कोरियाचा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम हा काही आजचा नाही. मात्र, या वर्षभरात त्यांनी ज्या गतीने आपला अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम चालविला आहे, ती गती केवळ अचंबित करणारी नव्हे, तर चिंतेत भर टाकणारी आहे. सन २०१७च्या फेब्रुवारीत यशस्वी अणुचाचणी घेतल्यानंतर ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात साऱ्या सागरी व हवाई सीमांचा भंग करीत उत्तर कोरियाने जपानवरुन आपल्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. सुमारे ७०० किलोमीटरची उंची गाठून जवळ जवळ ३७०० किलोमीटरचे अंतर पार करून हे क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रात पडले. गुआम येथील अमेरिकी लष्कराचा तळ त्याचे लक्ष्य असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०१७मध्ये लगेचच आपली सहावी महाशक्तीशाली अणुबॉम्बची चाचणी घेतली. हा अणुबॉम्ब नव्हे, तर हायड्रोजन बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. उत्तर कोरियाने देखील त्याचा इन्कार केलेला नाही.
उत्तर कोरियाचा रोष त्याच्या स्थापनेपासूनच दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेवर आहे. त्याला कारणेही आहेत. सन १९४५मध्ये जपानच्या वसाहतवादापासून मुक्त झालेला अखंड कोरिया, त्यानंतर १९४८मध्ये त्याचे दक्षिण व उत्तर असे झालेले विभाजन आणि १९५३मध्ये उत्तर कोरियात उदयास आलेली किम घराण्याची वंशपारंपरिक राजसत्ता म्हणा किंवा हुकुमशाही म्हणा, यामध्ये या सर्वांची बीजे आहेत. सर्वशक्तीमान असल्याचा साक्षात्कार आणि मग तो रुजविण्यासाठी, बिंबवण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी हे या घराण्याचे वैशिष्ट्य आहे. सध्याचा नेता किम जाँग-ऊनही त्याला अपवाद नाही, उलट तो त्याच्या लहरी स्वभावामुळे आजोबा किम ईल-संग आणि वडील किम जाँग-ईल यांच्यापेक्षा कित्येक पावले पुढेच आहे.
किम जाँग-ऊन हा त्याचा सणकीपणा आणि लहरी स्वभावासाठी (कु)प्रसिद्ध आहे. सलग तिसऱ्या पिढीकडे आलेली राजसत्ता आणि त्यातून आपले वर्चस्व, अस्तित्व अबाधित राखून आपले व्यक्तीमाहात्म्य जनतेच्या मनावर येनकेन प्रकारे लादत राहणे, इतके की तिच्यावर तिचे गारूड- नव्हे, दहशत कायम राहावी. त्याचवेळी जनतेने आपल्याला दैवतही मानत राहावे, यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा, माध्यमांचा वापर करणे, आपल्या माहात्म्याचा डंका (प्रोपोगंडा) सातत्याने वाजत-गाजत राहिला पाहिजे, जनतेच्या कानावर आणि जगाच्या पाठीवर त्याच्या कहाण्या सातत्याने जात राहिल्या पाहिजेत, याची काळजी अत्यंत प्रयत्नपूर्वक किम जाँग-ऊन याच्याकडून घेतली जात आहे. सणकीपणा किंवा लहरीपणा हा त्याच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जागतिक व्यासपीठावर अनप्रेडिक्टेबल अशी प्रतिमा निर्माण करून जगाला सातत्याने संभ्रमात ठेवण्याच्या रणनीतीचे ते एक महत्त्वाचे अंग आहे. म्हणूनच सातत्याने अनप्रेडिक्टेबल वागून, तशी उदाहरणे जगाच्या कानी जात राहतील, आपल्या निर्दयपणाचे किस्से गाजत राहतील, त्यातून दहशत निर्माण होत राहील, याची दक्षता किम जाँग-ऊन याने उत्तर कोरियाची सत्ता हाती घेतल्यापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेतलेली आहे.
आज आधुनिक संवाद साधनांच्या क्रांतीमुळे आपण सहजरित्या वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज म्हणतो. पण उत्तर कोरियाच्या राज्यकर्त्यांनी या ग्लोबलतेपासून स्वतःला अर्थात आपल्या जनतेला अत्यंत जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांवर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे. येथे रेडिओ-टेलिव्हीजनवर पूर्णपणे उत्तर कोरियन सरकारच्याच वाहिन्या दिसत राहतात, ऐकू येतात. नागरिकांना घरातील रेडिओ बंद करण्याची परवानगी नाही. सरकारी प्रोपगंडा सातत्याने त्यांच्या कानी पडत राहावा, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. अत्यंत गतिमान इंटरनेट सेवा तेथे आहे. मात्र, इंटरनेट सेवा सुद्धा मोजक्या लोकांना उपलब्ध आहे आणि ती सुद्धा अत्यंत फिल्टर्ड आहे. राजधानी प्योंगयांगमध्ये केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच राहण्याची परवानगी आहे. इतर जनतेने राजधानीत येऊन वसण्याचा विचारही मनात आणता कामा नये, असा इथला दंडक आहे.
माध्यमांवरचे हे कडक निर्बंधच सुरवातीला सांगण्याचे कारण म्हणजे भारतासारख्या देशात आपण जे काही माध्यमस्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्याच्या एक टक्काही स्वातंत्र्य उत्तर कोरियन जनतेला नाही. त्यांना स्वतःचा आवाज नाही. असला तरी किंवा कोणी काढण्याचा प्रयत्न केला तरी, त्याचा आवाज थेट बंद करण्यात येतो. इथे लोकांनी तेच बोलायचे किंवा ऐकायचे, जे इथे सरकार म्हणते किंवा ऐकवते. आपल्याकडे एखाद्या अभिनेत्रीला अगदी दिवस गेल्यापासूनच्या बातम्या माध्यमांमध्ये गाजत राहतात. पण, उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची बायको जेव्हा खूप दिवस जनतेला दिसत नाही, तेव्हा एक तर ती गर्भवती असावी अगर या तानाशहाने तिची हत्या केली असावी, अशी दबकी चर्चा होते. जेव्हा तिला मूल झाल्याची बातमी येते, तेव्हा हे कदाचित त्याचे तिसरे अपत्य असावे, अशा स्वरुपाची बातमी बाहेर येते. तसेच, या अपत्याचे लिंग कोणते, याची माहितीही आजतागायत लोकांना होऊ शकत नाही. किंबहुना, त्याला जी पहिली दोन अपत्ये आहेत, त्यातील केवळ दुसरी मुलगी आहे, एवढीच माहिती लोकांपर्यत येते. पहिल्या आणि तिसऱ्या अपत्याची काहीही माहिती उपलब्ध होऊ दिली जात नाही. इतकी गोपनीयता बाळगली जाते.
या पार्श्वभूमीवर, किम जाँग-ऊन याच्याविषयी त्याच्या सणकीपणाचे जितके किस्से उपलब्ध आहेत, तितकी माहिती त्याच्या व्यक्तीगत जीवनाबद्दल विशेषतः पूर्वायुष्याबद्दल उपलब्ध नाही. उपलब्ध करून दिली जात नाही. उत्तर कोरियाच्या आणि किम जाँग-ऊनच्या गोपनीयतेची सुरवात अगदी त्याच्या जन्मतारखेपासूनच होते. गंमतीचा भाग म्हणजे किम जाँग-ऊनच्या तीन जन्मतारखा सांगितल्या जातात. उत्तर कोरियन अधिकारी त्याची जन्मतारीख ८ जानेवारी १९८२ अशी सांगतात, तर दक्षिण कोरियाचे गुप्तचर अधिकारी ती ५ जुलै १९८४ मानतात. मात्र माजी बास्केटबॉल स्टार आणि किम जाँगचा मित्र डेनिस रॉडमन याने सप्टेंबर २०१३मध्ये त्याची उत्तर कोरियात भेट घेतली, त्यावेळी ही जन्मतारीख ८ जानेवारी १९८३ असल्याचे सांगितले. आता यातल्या कोणत्याही बाबीची शहानिशा करणे शक्य नसल्याने आज माहितीच्या युगातही विकिपिडियाने देखील या तिन्ही जन्मतारखा त्याच्या प्रोफाईलमध्ये दिल्या आहेत. यामध्ये एकच गोष्ट खरी की, १९८२ ते १९८४ या दरम्यान किम जाँग-ऊन याचा जन्म झाला. किम जाँग-हुई आणि किम जाँग-ईल यांचे हे दुसरे अपत्य. किम जाँग-चुल हा त्याचा वडील भाऊ तर किम यो-जाँग ही धाकटी भगिनी. भावाचा जन्म १९८१चा, तर बहिणीचा १९८७चा.
उत्तर कोरियातून बाहेर पडण्याची संधी मिळालेल्या (देश सोडण्याची परवानगीही येथे नागरिकांना नाही.) काहींच्या मते आणि काही जपानी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, किम जाँग-ऊन स्वित्झर्लंडमधल्या बर्न येथील एका खाजगी आंतरराष्ट्रीय शाळेत १९९३ ते १९९८ या कालावधीत शिकला. चोल-पाक किंवा पाक-चोल असे बनावट नाव धारण करून तो तेथे शिकत होता, अशी माहिती देण्यात येते. एक लाजराबुजरा आणि वर्गमित्रांत मिसळून राहणारा चांगला विद्यार्थी अशी त्याची प्रतिमा होती. बास्केटबॉलची त्याला जबरदस्त आवड होती. एक वरच्या वर्गातला मुलगा नित्य त्याच्यासोबत असे. तो त्याचा कदाचित अंगरक्षक असावा. त्यानंतर १९९८ ते २००० या कालावधीत किम जाँगने तिथल्याच कोनिझ येथील शाळेत पाक-ऊन किंवा ऊन-पाक असे नाव धारण करून पुढील शिक्षण घेतले. उत्तर कोरियन असेंब्लीमधील एका वरिष्ठ सदस्याचा मुलगा अशी त्याची तेथे नोंद आहे. सन २०००मध्ये त्याने अचानक मधूनच शाळा सोडली. तेथेही त्याच्याविषयी बास्केटबॉलची आवड असणारा चांगला विद्यार्थी अशी ओळख होती. मात्र वर्गातील त्याची उपस्थिती आणि त्याचे गुण या बाबतीत मात्र सारा आनंदीआनंदच होता. एकदा वर्गात पोर्न मॅगेझीन पाहताना तो पकडला गेल्याचाही किस्सा सांगितला जातो. स्वित्झर्लंडमधील उत्तर कोरियाचे तत्कालीन राजदूत रि चोल यांच्याशी त्याचे चांगले संबंध होते. ते त्याचे मार्गदर्शक, हितचिंतक म्हणून कार्यरत होते. किम जाँग-ऊनला अमेरिकन नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन आणि मायकेल जॉर्डन यांचे भारी आकर्षण होते, असे त्याचे (पाक-ऊनचे) तत्कालीन सहपाठी सांगतात. कोबे ब्रायंट आणि टोनी कुकॉकसोबतची त्याची छायाचित्रे त्याने दाखविल्याचेही ते सांगतात. एप्रिल २०१२मध्ये नव्याने प्रकाशझोतात आलेल्या काही कागदपत्रांवरुन किम जाँग-ऊन हा १९९१पासूनच स्वित्झर्लंडमध्ये राहिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. फ्रान्समधल्या लायॉन युनिव्हर्सिटीच्या ॲनाटॉमिक ॲन्थ्रॉपॉलॉजी विभागाचे प्रमुख राओल पेरॉट यांनी किमच्या २०१२ आणि १९९९मधील छायाचित्रांचा अभ्यास करून त्या दोहोंमध्ये ९५ टक्के साम्य असल्याचे स्पष्ट केले. त्यावरुन पाक-ऊन आणि किम जाँग-ऊन या दोन्ही व्यक्ती एकच आहेत, असा निष्कर्ष त्यांनी काढला. किम जाँग-ऊनचा बंधू किम जाँग-चुल हा सुद्धा स्वित्झर्लंडमध्ये त्याच शाळेत शिकला. किम जाँग-ईल यांनी मुलांना स्वित्झर्लंडमध्येच ठेवले. त्यांच्यासोबत त्यांची आईही जिनिव्हा येथे काही काळ राहात होती.
सन २००२ ते २००७ या कालावधीत मात्र किम जाँग-ऊन हा प्योंगयांगमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रशिक्षण शाळा समजल्या जाणाऱ्या किम ईल-संग विद्यापीठात शिकला. पुढे जून २०१०मध्ये त्याच्याकडे अधिकारी पदाची सूत्रे सुपूर्द होईपर्यंत त्याचे वयाच्या अकराव्या वर्षीचे एकमेव छायाचित्र जगाला माहीत होते. अध्येमध्ये एखादे छायाचित्र प्रसिद्ध होई, पण ते त्याचेच आहे किंवा नाही, याविषयी मतभेद असत. ३० सप्टेंबर २०१० रोजी एका समूह छायाचित्राच्या रुपात त्याचे पहिले अधिकृत छायाचित्र प्रसिद्ध झाले. पक्षाच्या परिषदेत वडिलांपासून दोन जागा सोडून पहिल्या रांगेत बसलेल्या किम जाँग-ऊनच्या त्या छायाचित्रासह परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जातानाचे न्यूजरील फुटेजही पद्धतशीरपणे प्रसिद्ध करण्यात आले. २०१३मध्ये मलेशियातल्या खाजगी हेल्प विद्यापीठाने त्याला अर्थशास्त्रातली मानद डॉक्टरेट प्रदान केली.
किम जाँग-ऊनचा सावत्र वडीलभाऊ किम जाँग-नाम हा खरे तर वडिलांनंतर सत्ता सांभाळेल, असे २००१पर्यंतचे चित्र होते. मात्र त्या वर्षी टोकियोतल्या डिस्नेलँडला जाण्यासाठी बनावट पासपोर्टच्या आधारे जपानमध्ये शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असताना तो पकडला गेला आणि त्याने नाराजी ओढवून घेतली. सन २०१७मध्ये मलेशियात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. उत्तर कोरियन एजंटांनीच त्याची हत्या केल्याचा संशय आहे.
किम जाँग-ऊनचा वडीलबंधू किम जाँग-चुल हा खरे तर उत्तराधिकारी व्हायचा, पण त्याचे वागणे बरेचसे बायकी स्वरुपाचे होते. तसेच किम जाँग-ईल यांना किम जाँग-ऊनमध्ये आपले वडील किम ईल-संग यांचा भास व्हायचा. त्यामुळे १५ जानेवारी २००९ रोजी त्यांनी त्यालाच आपला उत्तराधिकारी घोषित केले. उत्तर कोरियाच्या रबरस्टँप संसदेच्या निवडणुकीत दि. ८ मार्च २००९ रोजी किम जाँग-ऊन विजयी झाला. मात्र, त्याचे नाव सर्वसाधारण कायदेमंडळ प्रतिनिधींमध्ये नव्हे, तर त्यावरील मध्यम दर्जाच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगावर होते. हा आयोग म्हणजे उत्तर कोरियाच्या लष्कराचाच एक प्रमुख भाग आहे. त्याचवेळी किम जाँग-ऊन हाच किम जाँग-ईल यांचा उत्तराधिकारी असेल आणि कोरियन वर्कर्स पार्टीबरोबरच उत्तर कोरियाचा अनभिषिक्त सर्वेसर्वा असेल, हे खऱ्या अर्थाने स्पष्ट झाले. त्याला योंगम्योंग-हान तोंगजी अर्थात ब्रिलियंट कॉम्रेड ही सन्माननीय पदवी बहाल करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याच्या वडीलांनी संसदेसह जगभरात पसरलेल्या उत्तर कोरियन स्टाफला किम जाँग-ऊन याच्याप्रती निष्ठा बाळगण्याची शपथ देवविली. आजोबा किम ईल-संग आणि वडील किम जाँग-ईल यांच्याप्रमाणेच किम जाँग-ऊन याच्यासाठीही स्तुतीगीत रचण्यात आले आणि ते गाण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येऊ लागले. त्याच कालावधीत स्वतःचा परिचय करून देण्यासाठी किमने चीनला गोपनीयरित्या भेट दिली, असेही सांगितले जाते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र अशी कोणतीही भेट झाल्याचा इन्कार केला.
२७ सप्टेंबर २०१०मध्ये किम जाँग-ऊन याला कोरियन लष्करातील वरिष्ठ दाएजांग पद देण्यात आले. हे अमेरिकेच्या फोर-स्टार जनरलच्या बरोबरीचे पद मानले जाते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २८ सप्टेंबरला किम याची उत्तर कोरियाच्या मध्यवर्ती लष्करी आयोगावर व्हाईस चेअरमन म्हणून तसेच कोरियन वर्कर्स पार्टीच्या मध्यवर्ती समितीवर नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे किम जाँग-ईल यांचा उत्तराधिकारी बनण्याच्या सर्व बाबींची पूर्तता त्वरेने करण्यात आली. १० ऑक्टोबर २०१० रोजी किम जाँग-ऊन वडिलांच्या बरोबरीने वर्कर्स पार्टीच्या ६५व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहिले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांवर त्यांचे अस्तित्व आणि उत्तराधिकारत्व बिंबविण्यात आले. किम यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रथा मोडून, कधी नव्हे ते आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना या परिषदेत प्रवेश देण्यात आला.
जानेवारी २०११पासून किम जाँग-ऊनचे मामा जँग सेंग-थाएक आणि राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे व्हाईस चेअरमन ओ कुक-रयॉल यांच्यामध्ये सत्तेसाठीचा संघर्ष उफाळून आला. दरम्यान, १७ डिसेंबर २०११ रोजी किम जाँग-ईल यांचे अकाली निधन झाले. त्यांनी निर्धार केलेला असूनही किम जाँग-ऊन याच्या उत्तराधिकारत्वाबद्दल आणि अननुभवी असल्यामुळे क्षमतेबद्दल साशंकता निर्माण करण्यात आल्या. त्यांच्या वतीने जँग सेंग-थाएक यांनी रिजंट म्हणून कारभार पाहावा, असा एक मतप्रवाह पुढे येऊ लागला.
त्याच वेळी किम जाँग-ऊन याच्यावर किम जाँग-ईल यांच्यासारखाच महान कमांडर, किम यांचा महान क्रांतीकारक वारसदार, पक्ष, लष्कर आणि जनता यांचा अत्युत्कृष्ट नेता अशी स्तुतीसुमनेही प्रोपगंडा करणाऱ्यांकडून उधळली जाऊ लागली. त्याला किम जाँग-ईल यांच्या अंत्ययात्रा समितीचा अध्यक्ष करण्यात आले. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने तर या साऱ्यांवर कळस केला. केवळ त्याचे आजोबा आणि वडील यांच्यासाठीच वापरण्यात येणारे महान स्वर्गीय व्यक्तीमत्त्व हे संबोधन किम जाँग-ऊनसाठी त्यांनी वापरले. वर्कर्स पार्टीनेही त्यांच्या संपादकीयात आपल्या रक्ताश्रूंची शपथ घेऊन किम जाँग-ऊन यांना आपला सर्वोच्च कमांडर, नेता मानून त्याच्याप्रती आपली निष्ठा जाहीर केली. २४ डिसेंबर २०११ रोजी याची रितसर घोषणा करण्यात आली. पाठोपाठ ३० डिसेंबरला त्याची पक्षाच्या पॉलिट ब्युरो प्रमुखपदी निवड करण्यात आली. ९ जानेवारी २०१२ रोजी त्याच्या कुमसुसान पॅलेससमोर निष्ठा प्रदर्शित करण्यासाठी आणि गौरव करण्यासाठी कोरियन पीपल्स आर्मीच्या वतीने भव्य रॅली आयोजित करण्यात आली. सन २०१३मध्ये जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत किम जाँग-ऊनला ४६वे स्थान लाभले. इतक्या गतिमान पद्धतीने त्याने सर्व कारभार आपल्या हाती घेतला. देशात किमईलसंगीझम व किमजाँगइलिझम या विचारधारांची प्रस्थापना करणे हा एककलमी कार्यक्रम पक्षाला प्रदान केला. थोडक्यात आपली अबाधित सत्ता उत्तर कोरियावर निरंकुशरित्या प्रस्थापित करणे, हाच त्याचा कार्यक्रम ठरला आणि त्यासाठी सर्वांना त्याने जुंपले. एप्रिल २०१२मध्ये आजोबा किम ईल-संग यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्याने पहिले जाहीर भाषण केले. त्यामध्ये उत्तर कोरियाला ऑनवर्ड्स टुवर्ड्स द फायनल व्हिक्टरी (अंतिम विजयाच्या दिशेने) वाटचाल करण्याचा संदेश दिला.
वडिलांच्या अंत्ययात्रेप्रसंगी सर्व जनतेने रडलेच पाहिजे, असा आदेश किमने जारी केला. हजारो नागरिकांनी त्यामुळे रस्त्यावर उतरून आपल्या शोकाचे प्रदर्शन केले. मात्र त्याचवेळी ज्यांनी तसे केले नाही, अशा सर्वांना अटक करून नंतर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले, असेही त्याच्या बाबतीत सांगितले जाते.
किम जाँग-ऊन याच्यावर आजोबा किम ईल-संग यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्याचे वागणे, बोलणे हे त्यांच्याप्रमाणेच आहे, असे त्याच्या वडिलांचेही मत होते. त्यामुळे त्यांच्या पदचिन्हांवरच वाटचाल करण्याचा किमने जणू चंग बांधला. आजोबांच्या नंतर त्यांना प्रदान करण्यात आलेला सर्वोच्च ग्रँड मार्शल हा किताब किमलाही प्रदान करण्यात आला. आपल्या आजोबांप्रमाणे दिसण्यासाठी त्याने चेहऱ्यावर प्लास्टीक सर्जरी केल्याचेही सांगण्यात येते. नववर्षाप्रित्यर्थ जनतेला संदेश देण्याची प्रथा किम ईल-संग यांनी त्यांच्या काळात सुरू केली होती. किम जाँग-ईल यांनी मात्र आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत एकदाही जनतेशी संवाद साधला नव्हता. टीव्हीवरुन संवादाऐवजी वर्कर्स पार्टीच्या मुखपत्रात ते संपादकीय लिहीत असत. किम जाँग-ऊन याने त्या प्रथेचे पुनरुज्जीवन केले आणि टीव्हीवरुन उत्तर कोरियन जनतेला संबोधित करण्यास सुरवात केली. जानेवारी २०१३मध्ये त्याने अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाला गती देण्याचा निर्धार करून देशात मार्शल लॉ लागू केला. सन २०१४मध्ये उत्तर कोरियातल्या रबरस्टँप संसदेसाठी निवडणूक घेण्यात आली. किम जाँग-ऊनला साहजिकच कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता. जनतेला केवळ होय किंवा नाही यापैकी एक पर्याय निवडून मतदान करण्याचा अधिकार (?) देण्यात आलेला होता. लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आणि सर्वांनीच किमला होय असे मतदान केल्याचे सांगण्यात आले आणि तो बिनविरोध निवडून आल्याची घोषणा झाली.
या दरम्यानच्या काळात सल्लागार म्हणून काम पाहणारा मामा जँग सेंग-थाएक हा आपल्यापेक्षा अधिक वरचढ होईल की काय, या भीतीने किमला ग्रासले. त्यातून त्याच्यावर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवून शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्यावर एकाच वेळी १२० शिकारी कुत्री सोडण्यात आली. काही क्षणांत त्या कुत्र्यांनी मामाचा फडशा पाडला. या शिक्षेची अंमलबजावणी होत असताना सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जनतेला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले, जेणे करून आपल्या निष्ठाभंगाची किती टोकाची कठोर शिक्षा होऊ शकते, याचे प्रत्यंतर सर्वांना यावे. आत्या क्योंग यांनी आपल्या पतीच्या हत्येविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्याचे फळ त्यांनाही भोगावे लागले. त्यांच्यावर विषप्रयोग करून त्यांचीही हत्या करण्यात आली. हत्येचे कारण मात्र हार्ट अटॅक सांगण्यात आले. ही हत्या दाबण्याचा किमने मोठा प्रयत्न केला. मात्र, मे २०१५मध्ये कोरियातून पळून गेलेल्या एका सैन्याधिकाऱ्याने त्याने आत्याची हत्या केल्याची माहिती जगासमोर आणली.
उत्तर कोरियाचा सुरक्षा प्रमुख ह्योंग याँग याची हत्याही अशाच क्षुल्लक कारणावरुन करण्यात आली. किम जाँग-ऊन याने बोलावलेल्या बैठकीमध्ये याँग यांना डुलकी लागली आणि ते पाहून किमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. सुरक्षा प्रमुखालाच त्याने तत्क्षणी अटक करण्याची आज्ञा दिली आणि त्याला थेट अँटी एअरक्राफ्ट गननेच उडवले. सर्व अधिकाऱ्यांसमोर ही शिक्षा अंमलात आणली, जेणे करून त्यांच्या मनात कायमस्वरुपी दहशत बसावी.
किम जाँग-ऊन इतका सणकी आहे की, त्याची मैत्रीण ज्या संगीताच्या ग्रुपमध्ये गायिका होती, तो ग्रुप पोर्न फिल्म्स बनवित असल्याचा संशय येताच त्याने त्या मैत्रिणीसह संपूर्ण ग्रुपलाच गोळ्या घालून ठार केल्याचे सांगतात.

लोकांसाठी कडक नियम बनवून त्यांना सातत्याने दबावाखाली ठेवणे, हे तर या हुकुमशहाचे महत्त्वाचे कर्तव्यच होऊन बसले आहे. त्यामुळे उत्तर कोरियात एखाद्याने काही गुन्हा केला, तर त्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या तीन पिढ्यांना भोगावी लागते. म्हणजे एखाद्या गुन्ह्यात आजोबाला फाशी झाली, तर त्याचा मुलगा आणि नातू यांनाही फाशी दिली जाते. अमेरिकन संस्कृतीचे प्रतीक असणारी जीन्स घालण्यास नागरिकांना येथे परवानगी नाही. सरकारने नागरिकांना २८ केशभूषा ठरवून दिलेल्या आहेत. त्यातील दहा पुरूषांसाठी तर १८ महिलांसाठी आहेत. त्याव्यतिरिक्त अन्य हेअरस्टाईल करण्यास परवानगी नाही. पुरूषांना तीन इंचांपेक्षा अधिक केस वाढविण्याची परवानगी नाही. उत्तर कोरियातल्या गरीबांची छायाचित्रे काढण्यास सक्त मनाई आहे. बायबल जवळ बाळगणे हा सुद्धा तेथे गुन्हा आहे. पोर्न पाहणे, दक्षिण कोरियन चित्रपट पाहणे यांवर बंदी आहे. पर्यटकांना मोबाईल फोन, लॅपटॉप, कॅमेरा जवळ बाळगता येत नाही. या वस्तू एअरपोर्टवर उतरल्यावर तेथेच सोडून जावे लागते. त्या परततानाच ताब्यात मिळतात. नागरिकांना स्वतःची मोटार खरेदी करण्यासही बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारावासापासून फाशीपर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.
एकीकडे स्वतःची अशी कठोर, लहरी शासक म्हणून जाणीवपूर्वक प्रतिमा निर्माण करीत असतानाच दुसरीकडे उत्तर कोरियाचा देव अशी प्रतिमाही निर्माण करण्याचे किम जाँग-ऊनचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. हे प्रयत्न त्याच्या आजोबापासूनचेच आहेत. त्यात नवीन काही नाही. चित्र, नाट्य, शिल्प, संगीत आदींबरोबरच किम ईल-यंग यांनी जगाची निर्मिती केली, अशी श्रद्धा उत्तर कोरियन जनतेत पसरवण्यात आली. पुढे किम जाँग-ईल यांच्याकडे सत्ता आली, तेव्हा हवामान नियंत्रित करण्याची क्षमता असलेला महापुरूष अशी त्यांची प्रतिमा ठसविण्यात आली. आता जगद्निर्माता आजोबा आणि हवामान-पुरूष बाप यांचा नातू व मुलगा असलेल्या किम जाँग-ऊन याने ही परंपरा पुढे चालविणे तसे क्रमप्राप्तच. त्यामुळे आपला जन्म दोन इंद्रधनुष्याच्या बरोबर मध्यावर झालेला असून त्या प्रसंगी आकाशात एका नवीन ताऱ्याचा जन्म झाल्याचेही किम सांगतो. आपल्या वडिलांप्रमाणे हवामान आपल्याही कह्यात असल्याची दर्पोक्ती तो करतो. एकूणच स्वतःला कोरियन जनतेचा देव म्हणून सिद्ध करण्यासाठी त्याची धडपड सातत्याने सुरू असते. ऱ्यांगगँग प्रांतातल्या एका मोठ्या डोंगरावर आकाशाच्या दिशेने त्याने १६०० फूट लांबीचा एक संदेश कोरला आहे, जो उपग्रहांच्या छायाचित्रांतही स्पष्ट दिसतो. जनरल किम जाँग-ऊन आचंद्रसूर्य चिरायू होवोत!’ अशा आशयाचा तो संदेश आहे.
त्याच्या स्वभावाच्या अनप्रेडिक्टेबिलीटीचा आणखी एक किस्सा सांगितला जातो. प्योंगयांगमध्ये एक मोठी अपार्टमेंट कोसळून मोठी जीवितहानी झाली. त्यावेळी किम अत्यंत दुःखी झाला आणि रात्रभर झोपला नाही, असे वृत्त बीबीसीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले. दुसरे म्हणजे नुकसानग्रस्तांना भरपाईची घोषणा करतानाच त्यांची क्षमायाचना करणारे अधिकृत शासकीय पत्रक किम याच्या वतीने जारी करण्यात आले, ही बाब सर्वांसाठीच मोठी आश्चर्यजनक व धक्कादायक होती. मात्र, ही दुर्घटना नेमकी काय होती, आणि त्यात नेमकी हानी काय झाली, हे खूप काळाने बाहेर आले. एक २३ मजली इमारत कोसळून त्यात शंभरहून अधिक लोक ठार झाले होते.
आज किम जाँग-ऊन ज्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे चर्चेत आला आहे, त्या चाचण्या काही आजच्या नाहीत. त्याचे आजोबा किम ईल-संग यांच्या कारकीर्दीपासूनच त्याची सुरवात झालेली आहे. मौज अशी की, १९८५मध्ये अण्वस्त्रनिर्मिती करणार नाही, असे सांगत उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रबंदी करारावर स्वाक्षरी केली आणि तेथपासूनच त्यांच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. १९८६मध्ये योंगब्योन येथे संशोधन अणुभट्टी कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर १९९१मध्ये उत्तर व दक्षिण कोरिया हे दोन्ही देश संयुक्त राष्ट्रसंघात सामील झाले. १९९३मध्ये अण्वस्त्रबंदी कराराचा उत्तर कोरियाने भंग केल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने केला आणि आण्विक कचरा ठेवलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मागणी केली. त्यावेळी आयोगाला न जुमानता करारातून बाहेर पडण्याचीच धमकी उत्तर कोरियाने दिली.
दरम्यान, जुलै १९९४मध्ये किम ईल-संग यांचे निधन होऊन किम जाँग-ईल सत्तेत आले. त्यानंतर लगेचच ऑक्टोबर १९९४मध्ये आपला अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम स्थगित करण्याबाबत उत्तर कोरियाने अमेरिकेशी समझोता केला. त्या मोबदल्यात अमेरिकेने उत्तर कोरियाला जड इंधन आणि दोन हलक्या-पाण्यावर आधारित अणुभट्ट्या दिल्या. दरम्यानच्या काळात फमाईन वादळ आणि पूर यांमुळे उत्तर कोरियात जवळजवळ तीस लाख नागरिक मृत्युमुखी पडले. त्याचवेळी दक्षिण कोरियासोबत तणावाचे प्रसंगही वाढत होते. १९९८मध्ये उत्तर कोरियाने आपल्या दीर्घ पल्ल्याच्या मल्टिस्टेज क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जपानवरुन उडून पॅसिफिक सागरात कोसळले. उत्तर कोरियाच्या जगाला ज्ञात असलेल्या क्षमतेपेक्षा हा पल्ला कैक पटीने मोठा होता. त्यामुळे अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी विध्वंसक शस्त्रे तयार करणाऱ्या इराक, इराणच्या जोडीने उत्तर कोरियालाही सैतानी राष्ट्र (ॲक्सीस ऑफ एव्हील) म्हणून जाहीर केले.
सन २००२मध्ये अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी उत्तर कोरिया गोपनीयरित्या युरेनियम आधारित अणु कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप करून त्याला पुरविण्यात येणाऱ्या इंधनाच्या बोटी रोखून धरल्या. पण, त्यांच्या या दबावापुढे न झुकता त्याच वेळी योंगब्योन इथली अणुभट्टी नव्याने कार्यान्वित करीत असल्याची घोषणाच उत्तर कोरियाने केली. २००३मध्ये उत्तर कोरिया अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर पडला, तसेच दक्षिण कोरियासोबतचा अण्वस्त्रमुक्त कोरियन टापूचा करारही बासनात गुंडाळला. त्याच वर्षी उत्तर कोरियाने प्लुटोनियम आधारित अणुबॉम्ब बनविले. सन २००५मध्ये प्रथमच आपण स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्रे बनविली असल्याचे उत्तर कोरियाने जाहीररित्या मान्य केले. २००९मध्ये पुन्हा दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांबरोबरच अणुचाचणीही घेतली. यामुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या रोषाला सामोरे जावे लागले, पण त्याला न जुमानता त्यांनी आपला अणुकार्यक्रम पुढे सुरूच ठेवला.
किम जोंग-ईल यांच्या निधनानंतर २०११मध्ये किम जाँग-ऊन यांनी कारभार हाती घेतल्यानंतर तर याला खूपच गती देण्यात आली. अमेरिका आणि जपानला लक्ष्य करून क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात आला. सहा अणुचाचण्या, त्यात एक हायड्रोजन बॉम्ब चाचणी आणि अण्वस्त्रे वाहून नेऊ शकणारी दीर्घ पल्ल्याची गाईडेड क्षेपणास्त्रे इथपर्यंतचा प्रवास या किम घराण्यातील तीन नेतृत्वांखाली उत्तर कोरियाने आजतागायत केला आहे, तोही कोणत्याही देशाच्या कसल्याही बंदीला न जुमानता.
किम जाँग-ऊन याचा आजपर्यंतचा एकूण प्रवास, त्याचे वय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा लहरी, बेभरवशी स्वभाव यामुळे उत्तर कोरियाच्या या अण्वस्त्र कार्यक्रमाचा धोका जागतिक समुदायाला प्रकर्षाने भेडसावतो आहे. एकदा म्हणायचे, आम्ही केवळ स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्रे तयार करतो आहोत; एकदा विचारायचे, टाकू का अणुबॉम्ब? तसेच, सातत्याने आंतरराष्ट्रीय सीमांचे उल्लंघन करून शेजारी राष्ट्रांवरुन त्यांच्या सागरी सीमांमध्ये आपल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेणे आणि अमेरिकेसारख्या सर्वशक्तीमान महासत्तेला सातत्याने चिथावण्या देऊन डिवचणे अशा कुरापतींमुळे जागतिक विशेषतः आशियाई विभागातील शांतता कलुषित होते आहे. आज अण्वस्त्र कोणत्याही देशाने कोणावरही सोडले तरी, त्यात संपूर्ण जगाचाच विनाश अटळ आहे, याची सूज्ञ जाणीव प्रत्येक राष्ट्राने बाळगणे आवश्यक आहे. प्रश्न एवढाच आहे की, किम जाँग-ऊन नामक या लहरी हुकुमशहाला हे समजावणार कोण?

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

सदा‘सतेज’




(माझे पत्रकारितेमधील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. प्रवीण बर्दापूरकर सर यांनी यंदा 'उद्याचा मराठवाडा' या दैनिकाच्या दिवाळी अंकाचे संपादकपद भूषविले. या 'नवोन्मेषपर्व' अंकात सरांनी महाराष्ट्रामधील आश्वासक तरुण नेतृत्वांच्या वाटचालीचा वेध घेतला आहे. बर्दापूरकर सर आणि संपादक श्री. राम शेवडीकर या दोघांच्या प्रेमळ आग्रहामुळे कोल्हापूरचे युवा नेतृत्व श्री. सतेज पाटील यांच्याविषयी या अंकात लिहीता आले. हा लेख 'उद्याचा मराठवाडा'च्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)

सतेज पाटील तथा बंटी या लाडक्या संबोधनानंच ज्यांना लोक ओळखतात, त्या बंटी पाटलांशी माझा थेट परिचय आहे म्हणावा, तर तसं काही नाही. ते मला अपरिचित आहेत, असं म्हणावं तर तसंही नाही. याचं कारण असं की, माझ्या पत्रकारितेच्या दिवसांपासूनच नव्हे, तर अगदी विद्यार्थी दशेपासून मी या माणसाला फॉलो करतोय. फॉलो करतोय, म्हणण्यापेक्षाही त्यांना इग्नोर करणं शक्य नव्हतं, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. कोल्हापूरमध्ये कदाचित दिग्विजय खानविलकर यांच्यानंतर प्रचंड म्हणावा, असा लोकसंग्रह जमविणारा नेता म्हणून उल्लेख करावयाचा झाला, तर त्यात बंटी पाटील यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.
राजकारणातलं दादाव्यक्तीमत्त्व असणाऱ्या डॉ. डी.वाय. पाटील यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या बंटी यांनी त्यांची कारकीर्द मात्र केवळ त्या वारशावर विकसित न करता स्वतंत्रपणानं केली, हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. विद्यार्थी चळवळी करता करता घरच्या काँग्रेसी संस्कारातून एक अत्यंत संतुलित व समंजस कारकीर्द बंटी यांनी घडविली आहे. त्यांच्या राजकारणाला आक्रमकतेची धार नाही, असं नाही; मात्र, त्या धारेला सुसंस्कृतपणाचं कोंदण लाभलं आहे, हे महत्त्वाचं
सतेज पाटील यांच्या राजकीय वाटचालीचा आलेख रेखाटणं, हा मुळातच माझ्या लिखाणाचा हेतू नाही, तो कोल्हापूरच्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ, राजाराम कारखाना आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या पानापानांवर रेखाटलेला आहेच. या राजकारणाच्या पलिकडं जाऊन बंटी यांच्या व्यक्तीमत्त्वाला असणाऱ्या विविध कंगोऱ्यांमधून त्यांची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण झालेली आहे, ती मला महत्त्वाची वाटते.
खरं तर राज्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि सहकार क्षेत्रातील वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, राजारामबापू पाटील, रत्नाप्पाण्णा कुंभार, डी.वाय. पाटील आदींची एक मोठी कर्मयोग्यांची फळी निर्माण झाली. त्यानंतर राजकीय पटलावर उदयास आलेल्या विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, आर.आर. पाटील, जयंत पाटील यांच्यासारख्या उच्चशिक्षित व सुसंस्कृत पिढीचे वारसदार म्हणून बंटी पाटील यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. डी.वाय. दादांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा सांभाळत असताना त्याला त्यांनी स्वतःचा म्हणून एक वेगळा 'सतेज'स्पर्श देण्याचं काम केलं. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या मुलांमध्ये आत्ममग्नता, तुटलेपणा किंवा इतरांना कमी मानण्याची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र बंटी यांनी लहानपणापासूनच घराचा उंबरठा ओलांडून समाजात वावर राखल्याने या बाबतीत ते वेगळेपण जपून आहेत. हाती घेतलेले काम प्रमाण मानून ते तडीस नेण्यासाठी हरेक प्रकारे ते प्रयत्नरत राहतात. किंबहुना, आपल्या वारशाची जाणीव सदोदित मनी बाळगून त्यांनी आपलं काम चालवल्याचं त्यांच्या कृती व उक्तीमधून प्रत्ययास येत राहतं.
अत्यंत सुजाण, समंजस, सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व बंटी पाटील यांच्या रुपानं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला लाभलेलं आहे. हाती घेतलेल्या कोणत्याही कार्याला, प्रकल्पाला अभ्यासाची जोड देऊन त्याला यशाची चढती कमान प्राप्त करून देण्याचं कसब त्यांनी प्रयत्नपूर्वक साध्य केलं आहे. त्यांचं राजकारण कन्व्हिन्सिंग आहे, विश्वासपात्र आहे. मित्र-कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याखेरीज निर्णय न घेण्याचा त्यांचा स्वभाव हा कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात खूप वेगळा आहे. कोल्हापूरचं स्थानिक राजकारण गट आणि मोटबांधणीच्या दावणीला बांधलं गेल्याचं चित्र होतं. नगरसेवकांची पळवापळवी आणि निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात घोडेबाजार भरवून त्या मोटबांधणीतून इथल्या राजकारणाची दिशा, दशा व दुर्दशा ठरत असे. हे चित्र अलीकडच्या काळात सर्वप्रथम बदललं ते बंटी यांनीच. गटावरुन पक्षीय पातळीवर नेऊन स्थानिक राजकारणाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त करून देण्याचं आणि महत्त्वाचं म्हणजे इथं पारंपरिक पद्धतीनं सुरू असलेल्या घोडेबाजाराला बऱ्याच अंशी खीळ घालण्याचं आणि येथील स्थानिक राजकारणाला एक किमान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं श्रेय बंटी यांना द्यावं लागेल.
बंटी यांचा मला सर्वाधिक आवडणारा पैलू म्हणजे त्यांचं फायटिंग स्पिरीट. निवडणुकीत पराभव जरी पत्करावा लागला तरी त्याचं दुःख कुरवाळत न बसता हा युवा नेता दुसऱ्या दिवशी आपल्या मित्र- कार्यकर्त्यांच्या गराड्यात हजर असतो. तिथं मग पराभवाचं विश्लेषण करून पुढची रणनीती आखून लगोलग कामाला सुरवात करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या उमेदीची साक्ष देणारा आहे. अगदी १९९९पासूनचंच उदाहरण घेतलं तरी हे पटण्यासारखं आहे. १९९९मध्ये काँग्रेसकडून अपेक्षित असणारी उमेदवारी ऐनवेळी मिळाली नाही, तरी बंटी शांत बसले नाहीत. सन २००४च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी कार्यकर्त्यांच्या बांधणीला सुरवात केली. केवळ मतदारसंघातलेच नव्हे, तर बावड्याच्या आसपासच्या आणि कोल्हापूर परिसरातील खेडोपाड्यातल्या युवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक वावर वाढवला. मात्र, त्या त्यांच्या वावरामध्ये ओढूनताणून आणलेली कृत्रिमता नव्हती. या नैसर्गिकतेची मूळं त्यांच्या बावड्यातल्या राधेय ग्रुपच्या युथ कट्ट्यानंच त्यांच्यात रुजवलेली होती. बावड्यातला हा युथ कट्टा म्हणजे दररोज सायंकाळी भरणारा बंटी यांचा खुला दरबारच जणू. तिथं येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांशी संवाद साधण्याचा, वाढवण्याचा एक प्रघातच बंटी यांनी पाडलेला. लोकांच्या अडचणींबाबत चर्चा करणं, त्या सोडविण्याचे उपाय ठरवणं आणि त्या दिशेनं काम करणं, हा त्यांच्या दैनंदिनीचा भाग होता. सर्वांच्या आनंदात सहभागी होणं आणि दुःखाच्या क्षणी सावरण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी सर्वांच्या पुढं राहणं, हा त्यांचा स्थायीभावच बनून गेला. कागलचे विक्रमसिंहराजे घाटगे यांनी त्यांच्या या स्वभावाला दिलेली एक कॉम्प्लिमेंट अत्यंत बोलकी आहे. राजे म्हणायचे की, हा माणूस सकाळी एखाद्या अंत्ययात्रेत दिसतो, दुपारी लग्नात असतो. सायंकाळी सार्वजनिक समारंभात तर रात्री कुणाच्या तरी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असतो. त्यांचा मोबाईल नेहमी सुरूच असतो आणि त्या मोबाईलसारखे त्यांचे नेटवर्कही लोकांच्या समस्यांना भिडण्यासाठी सतत कार्यरत असते. स्वतः टेक्नोसॅव्ही असणारे बंटी नव्या पिढीशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सचा प्रभावी वापर करताना दिसतात.
भेटायला येणाऱ्या गरजूंची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी 'आऊट ऑफ द वे' जाऊन विचार व प्रयत्न करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. 'अजिंक्यताऱ्या'वरच्या साऱ्या फौजफाट्याला त्यांच्या तशा सूचनाच आहेत. विविध पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, त्या त्या पातळीवर सोडविण्यासाठी त्यांची टीमही त्यांच्या निर्देशानुसार सातत्यानं कार्यरत असते. ते सत्तेत असताना हे प्रमाण साहजिकच अधिक होतं, पण आज सत्तेबाहेर असूनही त्यांच्या कामाचा झपाटा आहे तोच आणि तसाच आहे. काही माणसं सत्तेत असली काय किंवा नसली काय, त्यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य हे त्यांच्या पद्धतीनं सुरूच असतं. बंटी हे या कॅटेगरीत मोडणारं रसायन आहे. आजही गणेश मंडळांपासून ते विविध उपक्रमांना उपस्थित राहण्याचा त्यांचा प्रघात कायम आहे.
बंटी यांच्या आणखी एका गुणवैशिष्ट्याचा मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, ते म्हणजे सौ. प्रतिमावहिनींना त्यांनी ज्या पद्धतीनं सामाजिक कार्य करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. बंटी पाटील यांच्या बाबतीत प्रतिमा वहिनींनी विविध उपक्रमांतून महिला संघटनाचं चालवलेलं काम अत्यंत उपयुक्त ठरलं आहे. महिला सक्षमीकरणाबरोबरच स्थानिक कला, संस्कृती, उद्योग, व्यवसाय, कौशल्य विकास, पर्यावरणपूरकता, आरोग्य रक्षण असे अनेक सामाजिक उपक्रम प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर, सतेज यूथ फाऊंडेशन, गृहिणी महोत्सव, सतेज यूथ फेस्टिव्हल अशा व्यासपीठांवरुन नियमितपणे चालविले जाताहेत. त्या व्यासपीठांवर हे दांपत्य पूर्ण वेळ उपस्थित राहून लोकांशी सातत्यानं संवाद साधत असतं.
बंटी यांना इतक्या वर्षांमध्ये मी कधीही संत्रस्त अथवा दुर्मुखलेलं पाहिल्याचं स्मरत नाही. एक सुहास्य सदोदित त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असतं. त्यामुळं त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होते. ही क्वालिटी जपली होती, ती विलासरावांनीच. लॉबीमधून जाता जाता सुद्धा समोर उभ्या असलेल्याकडं पाहून हसणं, त्याची चौकशी करणं, अभिवादन करणं किंवा अगदीच ओळखीचा व्यक्ती असला तर त्याच्या खांद्यावर, पाठीवर हात ठेवून आवर्जून विचारपूस करणं, ही विलासरावांची शैली माणसाला पागल करणारीच होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा भाव, खरोखरीच त्या माणसाचा इतरांच्या मनातला भाव वधारण्यास आणि विलासरावांविषयीचाही भक्तीभाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असे. याच विलासरावांनी बंटी यांच्या धडपडीची दखल घेत सबसे तेज सतेज असे जाहीर कौतुकोद्गार काढून त्यांची पाठ थोपटली होती. आर.आर. आबांची मेमरीही तशीच. एकदा माणूस भेटला की, तो कायमच आबांचा होऊन जाई, इतकं ते त्याला आपलंसं करीत. सतेज यांच्यामध्ये मला ही क्वालिटी आढळते आणि या दोन दिवंगत नेत्यांची आठवण त्यांच्यामुळं माझ्या मनात चाळवते.
मी मंत्रालयात होतो, त्या काळातला एक किस्सा आता इथं शेअर करायला हरकत नाही. बंटी त्यावेळी आमदार होते. आमच्या एका वरिष्ठ सहकाऱ्याकडून त्यांचा आम्हाला निरोप आला की, कोल्हापूर जिल्ह्यातील जेवढे म्हणून काही अधिकारी-कर्मचारी असतील, त्या सर्वांचं एक छोटेखानी गेट टुगेदर बंटींनी आयोजित केलंय. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते अगदी ड्रायव्हर, शिपाई अशा सर्वांचा समावेश होता. तत्पूर्वी, मराठवाडा-विदर्भातल्या अधिकाऱ्यांचं संघटन वगैरे बाबी अगदी नियमित म्हणाव्यात, अशा पद्धतीनं झालेल्या होत्या. मंत्रालयात तिथल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं प्रमाण हे अलिकडच्या काळात वाढू लागलेलं. त्यामुळं बंटी यांनी आम्हा जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांसाठी भरवलेलं हे तसं पहिलंच गेट टुगेदर होतं, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. या निमित्तानं आम्हालाही आपल्या भागातले किती आणि कोण कोण अधिकारी-कर्मचारी तिथे आहेत, ते समजलं. एकमेकांच्या ओळखी झाल्या. मंत्रालयात येताना आमच्यातला प्रत्येक जण एकट्यानं रुजू झालेला. पण, आपल्या भागातले इतके लोक भेटल्यानं एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास, दिलासा आम्हा साऱ्यांच्या मनात त्यावेळी दाटून आला. बऱ्याच लोकांशी त्यानंतरच्या काळात मैत्रही जमलं. आम्ही सारेच काही बंटी यांचे मतदार होतो, अशातला भाग नव्हता. पण, त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलासा दिला की, कोणतीही अडचण असो, काही काम असो, माझ्या कार्यालयाचे दरवाजे सदैव आपल्यासाठी खुले असल्याचं त्यांनी सांगितलं. ही मोठी गोष्ट होती. आम्हाला कधी गरज पडली नाही, पण, पडली असतीच, तर आपला एक हक्काचा माणूस इथं असल्याचा विश्वास मनात निर्माण झाला. 
गृह राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत सुद्धा आपण सदैव पोलीसांसमवेत आणि त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी पोलीस दलात निर्माण केला. विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण निवेदने त्याची साक्ष देतात. विशेषतः अन्न व औषध प्रशासन मंत्री या नात्यानं गुटखाबंदीच्या अनुषंगानं त्यांनी सभागृहात केलेलं भाषण मला आजही स्मरतं. गुटखा उत्पादकांच्या, उद्योजकांच्या रोषाला सामोरं जावं लागणार, याची जाणीव असूनही त्यांनी ज्या पोटतिडकीनं गुटखा बंदीच्या निर्णयाला सभागृहानं समर्थन देण्याचं आवाहन केलं, त्याला तोड नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री बंदोबस्तावर तैनात पोलीसांना रात्र-रात्रभर फिरून बिस्कीटांची पाकिटं वाटून त्यांचा कुटुंबप्रमुख म्हणून काळजी वाहणारा मंत्री पोलीस खात्यानं आणि जनतेनंही बंटी यांच्या रुपानं प्रथमच पाहिला. गृह राज्यमंत्री असतानाच एका प्रवासादरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गावर झालेल्या एका अपघातातील जखमींना स्वतःच्या गाडीतून थेट हॉस्पिटलपर्यंत त्यांनी पोहोचवलं. बंटींच्या मानवी संवेदनशीलतेचीच प्रचिती देणारा हा प्रसंग. लोक प्रश्न घेऊन आले की आपल्या केबीनमधून निघून तडक संबंधित मंत्री किंवा थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडं धाव घेणारा असा हा मंत्री. विभागाच्या प्रश्नांच्या संदर्भातही विभागातले मुश्रीफ साहेबांसारखे अन्य मंत्री आणि आमदार यांची मोट बांधून संबंधित प्रश्नाचा पाठपुरावा करण्यातही बंटींचा पुढाकार असे.
बंटी यांच्या पाठपुराव्याचं भक्कम उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा प्रश्न. कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं, यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन व्हावी, हे स्वप्न शहरवासीयांनी ४० वर्षं उराशी बाळगलेलं. २०१०च्या महानगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या एका सभेत बंटींनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोरच थेट पाईपलाईन योजनेला मंजुरी मिळाली नाही, तर २०१४ची विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी चकित करणारी घोषणा केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळंच थेट पाईपलाईन योजनेला पुढं केंद्र सरकारची मंजुरी मिळाली.
मुळात बंटी यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरवात झाली ती १९९२ साली. एन.एस.यू.आय.च्या माध्यमातून ते शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे चेअरमन म्हणून बिनविरोध निवडून आलेले. याच काळात त्यांनी विद्यार्थी हिताच्या अनेक प्रश्नांत लक्ष घालून ते सोडविलेले. यूथ फेस्टीव्हलच्या खर्चात बचत करून मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक लाख रुपये त्यांनी दिल्याचं मला आठवतं. स्वतः विद्यार्थी नेता असल्यापासून विद्यार्थ्यांची काळजी वाहणारा बंटी यांच्यातला तो पिंड आजही कायम आहे. गोरगरीब घरातल्या दहावी- बारावीत उत्तुंग यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी सर्वात आधी पोहोचून त्या विद्यार्थ्याचं अभिनंदन करण्यात बंटी पुढं असत. त्यावेळीही बंटी यांचं नेटवर्क असं होतं, की अशा विद्यार्थ्यांची माहिती आम्हा पत्रकारांच्या आधी कित्येकदा त्यांच्याकडे असे. त्यामुळं आम्ही आमच्या नेटवर्कमधून अशा विद्यार्थ्यांची माहिती घेतली तरी बंटी कोणा-कोणा विद्यार्थ्याला भेटतात, इकडंही आमचं लक्ष असायचं. या जाणीवेतूनच पुढं वाढदिवसाला हार-तुरे, पुष्पगुच्छ न स्वीकारता त्याऐवजी वह्या संकलित करण्याचा विधायक उपक्रम बंटी यांनी सुरू केला. गेल्या अकरा वर्षांत त्यांच्या या उपक्रमातून जमलेल्या ५० लाखांहून अधिक वह्यांचा दहा लाखांहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. हा उपक्रम आता इतका सेट झाला आहे की, बंटी यांना आता वाढदिवसाला वह्या घेऊन यायला लोकांना सांगावंही लागत नाही. ही सवय आता लोकांच्या अंगवळणीच पडली आहे. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया यांतही झाली आहे, हे विशेष! त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं आणखीही एक उदाहरण देता येईल. बंटी यांचे वडील डॉ.डी.वाय. पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या प्रचारादरम्यान गगनबावड्यासारख्या अतिदुर्गम भागात साखर कारखाना उभारण्याचं वचन लोकांना दिलं होतं. बंटी यांनी हे वचन निभावण्यासाठी या भागात गावोगावी फिरुन शेअर्स गोळा केले आणि कारखाना उभारला. आज ते या कारखान्याचे चेअरमन आहेत. या साखर कारखान्यामुळं गगनबावडा तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळालीय. सुजाण नेतृत्वानं पुढाकार घेतला तर नागरिकांमध्ये चांगला उपक्रम सहजगत्या रुजवता येतो, त्याला इच्छाशक्तीची जोड मात्र असावी लागते, हेच या उदाहरणांतून निदर्शनास येतं. सामाजिक जाणिवेनं प्रेरित अशी उदाहरणं राज्यातच नव्हे, तर देशभरात निर्माण होण्याची गरज आहे. या देशात विधायक कामांत लोकसहभाग आणि लोकांचा पाठिंबा मिळवायचा तर राजकीय इच्छाशक्ती हा त्यांतला अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे.
असो! विषय बंटी पाटलांचा आहे. दिग्विजय खानविलकर यांच्यासारख्या दिग्गज आणि लाडक्या नेतृत्वाचा पराभव करून आमदार होत असताना जिल्ह्याच्या प्रचलित राजकारणाची बरीचशी समीकरणं बंटी यांनी बदलली. दिग्विजय यांनी त्यांच्या आरोग्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्हा रुग्णालयांची रुग्णावस्था पार सुधारून टाकली. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेसाठी अनेक सुविधा इथं सुरू केल्या. मात्र, मंत्री असल्यानं मतदारसंघातलं काम कमी झालं नसलं तरी वावर कमी झालेला होता. नेमक्या याच वेळी १९९९च्या वेळी तिकीट नाकारलेल्या बंटी यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केलेली. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत पायाला भिंगरी बांधून त्यांनी करवीरच्या जनतेशी नाळ जोडली. सत्ता सोबत नसतानाही जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आबालवृद्धांच्या हृदयात स्थान मिळवलं. महापुराच्या काळात अगदी कमरेएवढ्या पाण्यातून चालत जाऊन गावागावांतल्या लोकांना आपण त्यांच्यासोबत असल्याचा धीर व दिलासा देण्याचं काम केलं. दिग्विजय यांचं नसणं आणि बंटी यांचं सदोदित असणं, या गोष्टींचा नाही म्हटला तरी मतदारांवर परिणाम झालेला होता. सलग पाच वेळा आमदारकी मिळविणाऱ्या दिग्विजयांनी मतदारांना यावेळी जास्तीच गृहित धरलेलं होतं. साहजिकच याचा त्यांना फटका तर बंटी यांना लाभ झाला. बंटी यांच्या बाबतीत यावेळी म्हणजे २००४ला एक महत्त्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे १९९९च्या वेळेस ते केवळ डी.वाय. यांचे सुपुत्र होते म्हणून विधानसभेच्या तिकीटाचे दावेदार होते. यावेळी मात्र, तळागाळापर्यंत घाम गाळलेला एक सच्चा कार्यकर्ता सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणून त्यांना उमेदवारी मिळणं क्रमप्राप्त होतं. मात्र, यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढल्यानं करवीर मतदारसंघातली उमेदवारीची माळ राष्ट्रवादीच्या दिग्विजय खानविलकर यांच्या गळ्यात पडली. त्या दरम्यान एका कुस्तीच्या मैदानातलांग कुठल्याही रंगाची असेल, कुती मात्र करणारच!’ अशा शब्दांत आपला इरादा बंटी यांनी स्पष्ट केला आणि खानविलकरांविरोधात अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. जन्मजात पुण्याईला इथं बंटी यांनी कर्मपुण्याईची दिलेली जोड त्यांच्या कामी आली. स्वतंत्र ओळख घेऊन त्यांनी ही निवडणूक लढविली आणि तब्बल ४२ हजारांहून अधिक मतांनी जिंकली. या मतदारसंघात काम सुरू असतानाच साधारणतः सन २००८मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यांच्या करवीर मतदारसंघातलं वीस हजारांहून अधिक मतदार असणारं बंटी यांचं हक्काचं कसबा बावडा कोल्हापूर-उत्तर या शहरी तोंडवळ्याच्या मतदारसंघात समाविष्ट झालं. बंटी यांनी काँग्रेस पक्षाची व स्थानिक नेत्यांची सोय पाहून कोल्हापूर-दक्षिण हा शहरी व ग्रामीण असा संमिश्र मतदारसंघ निवडला. सन २००९ साली त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र व सध्याचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्याशी त्यांची काटाजोड लढत झाली. यावेळी बंटी साधारणपणे साडेपाच हजार मतांच्या फरकानं विजयी झाले. आमदारकीच्या या दुसऱ्या टर्ममध्ये सन २०१० साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळात गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन या तीन महत्त्वाच्या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी देऊन बंटींच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्यालाही त्यांनी त्यांच्या परीनं योग्य न्यायच दिला. मात्र, दिग्विजय यांच्याबाबतीत जे घडलं, तेच योगायोगानं बंटी यांच्या बाबतीतही २०१४च्या निवडणुकीत घडलं. गृह राज्यमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी. त्यात पालकमंत्रीपद लातूरचं आणि संपर्कमंत्रीपद साताऱ्याचं. या जबाबदाऱ्यांना योग्य न्याय देण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करीत होते. मतदारसंघाकडं दुर्लक्ष नव्हतं, पण प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवणं दर वेळीच शक्य होत नव्हतं. त्याचा फटका त्यांनाही सोसावा लागला. काही 'मित्रां'वर टाकलेला विश्वास गैरलागू ठरला. या साऱ्या गोष्टी समजून उमजून बंटी यांनी पुन्हा नव्या उमेदीनं कामाला सुरवात केली. डिसेंबर २०१६मध्ये कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून प्रतिष्ठेच्या लढतीत विजय मिळवून ते विधान परिषदेचे सदस्य बनले. त्यांचा पक्ष केंद्र आणि राज्यात अद्यापही लोकसभा आणि विधानसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरायला तयार नसताना बंटी यांनी मात्र धोरणी आखणी केली. सर्वत्र भाजपची लाट असताना २०१५ साली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली. या निवडणुकीची एकहाती सूत्रं काँग्रेसनं बंटींच्या हाती दिली. पक्षाचा विश्वास सार्थ ठरविताना बंटींनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले; महापौरही काँग्रेसचाच केला. कोल्हापूर महानगरपालिकेतील या विजयानं राज्यातल्या काँग्रेसजनांत पुन्हा जान ओतली. पक्षाच्या चळवळींमध्ये बराचसा जिवंतपणा आला, याचं श्रेयही बंटींनाच द्यावं लागेल.
अशोक चव्हाण यांनी खासदारकी मिळवून पक्षाचे राज्यात टिकवून ठेवलेले अस्तित्व आणि सतेज यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या केंद्रात केलेली मोर्चेबांधणी या गोष्टी पक्षाला उभारी देणाऱ्या ठरल्या आहेत. राज्यातल्या पक्षीय वर्तुळात बंटी यांचा वावर हा येथून पुढच्या काळात अधिक व्यापक प्रमाणातील असणार आहे, याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. बंटी यांच्यात मला राज्यस्तरीय नेतृत्व करण्याची क्षमता दिसते. शरद पवार यांच्यानंतर राज्यव्यापी नेतृत्व म्हणून उभं राहण्याची क्षमता विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, आर.आर. पाटील यांच्यात होती. मात्र, आता त्यातले तिघे हयात नाहीत, तर भुजबळांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे. तशीच क्षमता असणारे हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील यांनी स्वतःला मतदारसंघांपुरते सिमीत करून घेतले आहे. राज ठाकरे यांनी ती संधी गमावली आहे. अजितदादांना ही संधी मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसमध्ये असं नेतृत्व करण्याची क्षमता सद्यस्थितीत अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांची व्यापक दृष्टी, त्यांचा लोकसंग्रह आणि बऱ्याच बाबतीत पिता शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणे कठोर निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडं आहे. त्यांच्या खालोखाल काँग्रेसमध्ये आता चेहरा आणि क्षमता या दोन्ही निकषांवर विचार करावयाचा झाल्यास बंटी पाटील यांचं भवितव्य मला अत्यंत उज्ज्वल दिसतं. अथक परिश्रम करण्याची त्यांची तयारी आणि कोणतेही काम तडीला नेण्याची जिद्द या गुणांच्या बळावर पक्षाला आणि एकूणच राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याची क्षमता मला त्यांच्यामध्ये दिसते. विलासराव, आबा, मुंडे साहेब गेल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहराही कोठेतरी हरपला आहे. हा सुसंस्कृत चेहरा प्रदान करण्याची क्षमता बंटी पाटील यांच्या 'सदा'सतेज व्यक्तीमत्त्वात निश्चितपणे आहे. गरज आहे ती योग्य संधी मिळण्याचीच!