मंगळवार, ३० मे, २०२३

नितळ-११: ‘युनि’फॉर्म!




(मुंबई येथील 'दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेअंतर्गत आज, दि. ३० मे २०२३ रोजी प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे शेअर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


फार नाही, अवघ्या तीस वर्षांपूर्वीपर्यंत केवळ म्युनिसिपालिटी, जिल्हा परिषदा अर्थात शासकीय संस्थांच्या मार्फत शाळा चालविल्या जात असत, तेव्हा सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांसाठी पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि काही ठिकाणी डोक्यावर गांधी टोपी तर विद्यार्थिनींसाठी पांढरा ब्लाऊज आणि निळा किंवा गुलाबी स्कर्ट असा गणवेश असे. कित्येक स्पर्धांच्या निमित्ताने आम्ही विविध शाळांमध्ये जायचो, मात्र सारी मुलं याच युनिफॉर्ममध्ये असायची. त्यामुळं त्या ठिकाणी जमलेली सर्व मुलं ही विद्यार्थी म्हणून एक असायची.

आज या गोष्टीकडं मागं वळून पाहताना तत्कालीन शैक्षणिक धोरणकर्त्यांविषयी विलक्षण कौतुक मनी दाटून येतं. सर्व शाळांमध्ये गणवेश एकसारखा असावा, गणवेशामध्ये युनिफॉर्मिटी असावी, यासाठी त्यांनी किती सखोल चिंतन, विचार केला असेल, हे जाणवते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सामाजिक, आर्थिकदृष्ट्या अजिबातच एकजिनसी नसलेल्या किंवा प्रचंड विषम अवस्थेत असलेल्या स्तरित भारतीय समाजामधील अनेक समाजघटक प्रथमच शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील होत होते. त्यांना परवडेल असा कपडा हा गणवेशाचा भाग असला पाहिजे, असा विचार त्यामागे होता. मग खादीचा जाडाभरडा पांढरा कपडा आणि खाकी पाटलोणाचा कपडा हा समाजातल्या अगदी खालच्या स्तरातील लोकांनाही परवडू शकतो, असा विचार पुढे आला असावा. आता गणवेश तरी कशाला?, तर शाळा म्हणून काही एक शिस्त या मुलांमध्ये असावी, केवळ यासाठीच. अन्यथा कर्मवीर भाऊराव पाटलांपासून ते कित्येक शिक्षकांनी मुलांना त्यांच्या दारातून उचलून कडेवरुन आणि खांद्यावरुन शाळेत नेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याची अनेक उदाहरणे मागल्या पिढीत आहेत. तर, मुद्दा होता गणवेशाचा. समाजातल्या सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातली मुले शाळेत येत असताना त्यांच्या राहणीमानावरुन, विशेषतः पेहरावावरुन त्यांच्यात एकमेकांप्रती उच्चनीचतेची भावना उद्भवू नये, विद्यार्थी म्हणून त्यांनी शाळेमध्ये एका समान पातळीवर राहावे, या दृष्टीने हा एक साधा निर्णय फार महत्त्वाचा होता, असे माझे मत आहे.

मात्र, पुढे शाळांचे वेगवेगळे प्रकार जसजसे वाढीस लागले, तसतसे त्यांचे युनिफॉर्मही वेगवेगळे, रंगबिरंगी होऊ लागले. मराठी शाळांच्या पलिकडे कॉन्व्हेंट, सीबीएसई, आयसीएसई, इंग्लीश मीडियम, सेमी-इंग्लीश मीडियम, प्रायव्हेट, रेसिडेन्शियल, इंटरनॅशनल असे शाळांचे नानाविध प्रकार अवतरू लागले आणि तितकेच वेगवेगळ्या युनिफॉर्मचे लोणही फोफावले. या शाळांच्या विविध प्रकारांनी युनिफॉर्ममधली युनिफॉर्मिटी पूर्णतः संपुष्टात आणली. आपण शिक्षणाच्या व्यावसायीकरणाच्या नादामध्ये या देशातल्या विद्यार्थ्यांमधील समतेच्या भावनेला हरताळ फासतो आहोत, हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यांनी हे जाणीवपूर्वक केले, असे नक्कीच म्हणायचे नाही. आपापले वेगळेपण निर्माण करण्याच्या नादात त्यांच्या हातून हे पातक झाले, हे मात्र खरे.

विद्यार्थी एकमेकांच्या युनिफॉर्मवरुन एकमेकांना जोखू लागली. कॉन्व्हेंटची मुलं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागली. मराठी आणि म्युनिसिपालिटीच्या शाळांतील विद्यार्थी त्यांच्या दृष्टीनं शूद्र बनली. नवी शिक्षणव्यवस्था शिक्षणाच्या क्षेत्रात एका नव्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जन्म देती झाली. इंटरनॅशनल स्कूल, कॉन्व्हेंटची मुलं या व्यवस्थेतले नवब्राह्मण आहेत. सीबीएसईवाली मुलं क्षत्रिय आहेत. इंग्लीश, सेमी-इंग्लीशवाली वैश्य आहेत तर म्युनिसिपालिटीच्या मराठी शाळांतली मुलं शूद्र आहेत. शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरची मुलं तर कायमच अतिशूद्र आहेत.

एकदा अंधेरी ते कुर्ला बेस्टनं प्रवास करत होतो. वाटेत एका स्टॉपवर दोन अशाच हाय-क्लास शाळेतल्या मुली चढल्या. सहावी-सातवीतच असतील, फार तर. मी बसलो होतो, त्याच्या पुढच्या बाकावर त्या येऊन बसल्या. त्यांच्यात त्या स्टॉपवर उभ्या असलेल्या अशा शूद्र विद्यार्थिनींबद्दल बोलणं सुरू होतं. त्यांच्या इंग्रजीत सुरू असलेल्या चर्चेचा सूर थट्टेचाच, नव्हे तर कुचेष्टेचा होता. त्यांची शाळा, त्यांचा युनिफॉर्म, त्यांचं दिसणं, त्यांचं एकमेकींशी मराठीतून संवाद साधणं, या साऱ्याच बाबी या दोन मुलींच्या दृष्टीनं लो-क्लास होतं. त्या मुली आता नव्हत्या त्यांच्यासमोर, पण त्यांचं वर्णन करीत त्या एकमेकींना टाळ्या देत फिदीफिदी हसत होत्या. माझ्या मनात त्या खालच्या दोघींविषयी नव्हे, तर समोरच्या या तथाकथित हायक्लास मुलींविषयी आणि एकूणच शिक्षणव्यवस्थेविषयी करुणा दाटून येत होती. कारण या देशातल्या सामाजिक वास्तवापासून त्या कोसो दूर फेकल्या गेल्या होत्या. शिक्षणानं माणसामध्ये समतेची, समानतेच्या भावनेची रुजवात करायला हवी, बहुसांस्कृतिक भारताच्या प्रत्येक संस्कृतीविषयी आदरभाव रुजवायला हवा, मात्र प्रत्यक्षात शाळांच्या या नवनव्या प्रकारांनी हा नव्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जन्म दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून परस्परांप्रती विषमतेची भावना अधिक फोफावू लागली आहे.

युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी हे खरं तर आपल्या देशाचं वैशिष्ट्य. प्रत्यक्षात शाळांचा युनिफॉर्म मात्र विषमतेला कारणीभूत ठरल्याचं वर केवळ एक प्रत्यक्षदर्शी उदाहरण दिलं. प्रत्यक्षात याहूनही अधिक गंभीर परिस्थिती आहे. भारत आणि इंडिया ही जी सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक आणि अगदी डिजीटल दरी निर्माण होते आहे, त्याला हे शिक्षणातील बहुस्तरितीकरण कारणीभूत ठरत आहे. गगनचुंबी टॉवरमध्ये राहणाऱ्या समुदायाला आपल्या शेजारी असणारी झोपडपट्टी नकोशी असते- त्या झोपडपट्टीतूनच त्यांच्या कामवाल्या, झाडूवाल्या, अगदी सुरक्षा रक्षक येत असून सुद्धा. या घटकांच्या जगण्या-मरण्याशी कोणतंही नातं, हे टॉवर जोडू पाहात नाहीत. त्याचं दुखणं समजून घेण्याचा ते प्रयत्नही करत नाहीत. कारण ते जिथं शिकले, तिथल्या शिक्षणानं त्यांच्यामध्ये ही आस्था कणव निर्माणच केलेली नसते. सन्माननीय अपवाद गृहित धरल्यानंतर सुद्धा हे प्रमाण खूपच नगण्य असतं.

केवळ युनिफॉर्म बदलल्यानं ही विद्यार्थ्यांची, विविध समाजघटकांची एकमेकांकडं विषमतेच्या भावनेनं पाहण्याची दृष्टी लगोलग बदलेल, असं मुळीच म्हणायचं नाही; मात्र, समतेचा दृष्टीकोन निर्माण करण्याची ताकदही युनिफॉर्ममध्ये असते, हेही तितकंच खरं!

मंगळवार, १६ मे, २०२३

नितळ-१०: ... ये तो नहीं, किसी पे भरोसा किया न जाए।


('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)


हर-चंद ऐतबार में, धोके भी हैं मगर,

ये तो नहीं, किसी पे भरोसा किया न जाए।।

गेल्या आठवड्यापासून जाँ निसार अख़्तर साहेबांचा हा शेर सारखा सारखा आठवतो आहे; अस्वस्थ करतो आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असणारी राष्ट्रीय नीट अर्थात नॅशनल इलिजिबिलिटी तथा एन्ट्रन्स टेस्ट नुकतीच पार पडली. यावेळी ती काही फारशी नीट पार पडली नाही, असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्रातील सांगली आणि पश्चिम बंगालमधील हिंदमाता केंद्रावर या परीक्षेला बसलेल्या बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर ऐनवेळी कपडे उलटे परिधान करून संपूर्ण परीक्षा द्यावी लागली. या अतिशय लाजीरवाण्या प्रसंगाला विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्याविषयी कोणालाही कसल्याही प्रकारचा अधिकृत खुलासा करावासा वाटत नाही, हे अधिक वेदनादायक आहे.

नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून आधीच वस्त्रे परिधान करण्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या बाह्यांचे शर्ट किंवा टी शर्ट, पारंपरिक पॅंट तसेच बारीक सोलचे सँडल किंवा चप्पल घालावयाचे आहेत. त्यांनी कुर्ता-पायजमा, लांब बाह्यांचे, बारीक नक्षीकामाचे (एंम्ब्रॉयडरी), डिझाईनर बटणांचे अथवा चेन्सचे, मोठ्या खिशांचे असे कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करावयाचे नसतात. बूट तर त्यांनी घालायचेच नाहीत. विद्यार्थिनींनीही फॅशनेबल कपडे, मोठ्या बटणांचे, लांब बाह्यांचे कपडे, जीन्स, पलाझ्झो, लेगिंग्ज, हाय हील्स किंवा जाड सोलच्या चपला, दागिने असे काहीच घालावयाचे नाहीत. शीख आणि मुस्लीम विद्यार्थ्यांना त्यांचे पारंपरिक कपडे परिधान करण्यास, आधी उपस्थित राहून तपासणी करण्याच्या अटीस अधीन राहून मान्यता आहे.

मुळात ही सारी प्रक्रियाच किती मोठ्या अविश्वासाच्या पायावर उभी आहे, हे पाहून वाईट वाटते. जी मुलं वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छित असतात, त्यामध्ये इतक्या टोकाची कॉपी करणारे विद्यार्थी असतील, हे पटणारे नाही. जरी काही मोजकी असतील, तर ती त्यांच्या अंतिम ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचणार नाहीत. शिवाय, त्यांना शोधून काढण्यासाठी कॉपी प्रतिबंधक यंत्रणा सक्षम असायला हवी, इतकी अपेक्षा तरी बाळगायला हरकत नाही. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही तशी राष्ट्रीय स्तरावरील पहिलीच परीक्षा. त्या परीक्षेचे दडपण विद्यार्थी आणि पालकांवर अगदी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासूनच असते. वेगवेगळे क्लास, पॅटर्न यांचा पालक-विद्यार्थी कसोशीने अभ्यास करून त्या त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. त्यानंतर नीट’, सीईटी, जेईई अशा महत्त्वाच्या अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षांना अवतीर्ण होत असतात. अशा वेळेला ही मुलं आणि त्यांचे पालक कॉपी करण्याला प्राधान्य देत असतील, की अभ्यास करण्याला?, याचा परीक्षा घेणाऱ्यांनी विचार करायला हवा. आजकाल बूट, जीन्स, लेगिंग्ज, हाय हील्स वगैरे पोशाख, वेशभूषा ही सर्वसामान्य म्हणावी इतकी प्रचलित झालेली आहे. ती परिधान करण्यापासून विद्यार्थ्यांना रोखणं, चुकीचं आहे. परीक्षकांना, सुपरवायझरना शंका आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची मुभा त्यांना असते. सापडल्यास विहीत कठोर कारवाईचीही नियमावलीत तरतूद असतेच. असे असतानाही विद्यार्थ्यांचा विनयभंग होईल, इतक्या अपमानास्पद पद्धतीने त्यांना वागवण्याचा कोणालाही अधिकार नाही. विद्यार्थिनींच्या बाबतीत नाहीच नाही, पण विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारे कोणी त्रास देता कामा नये. त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी अतिशय मोठ्या मानसिक तणावाखाली असतात. त्यावेळी त्यांना परीक्षेखेरीज इतर काहीही सुचत नसते. नेमक्या अशा वेळी त्यांचे चित्त विचलित होईल आणि परीक्षेला त्यांना योग्य पद्धतीने सामोरे जाता येणार नाही, असे वर्तन जर परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडूनच झाले आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी या यंत्रणा आणि त्यांमधील घटक घेणार आहेत का? याचे उत्तर निश्चितच नकारात्मक असेल. तसे असल्यास अशा चुकीच्या पद्धती निर्माण करून कोणाही विद्यार्थ्याच्या कारकीर्दीशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही.

सांगलीतील घटनेच्या तपशीलामध्ये शिरल्यास तेथे विद्यार्थिनींना त्यांच्या अंतर्वस्त्रांसह कपडे उलटे घालण्यास भाग पाडण्यात आले. बंगालमध्ये काही विद्यार्थिनींनी त्यांच्या आयांचे कपडे अदलाबदली केले. असे असताना या महाविद्यालयाच्या परिसरात त्यांच्यासाठी योग्य आडोसाही नव्हता. त्या अर्थाने सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना कपडे बदलावयास लावणे अथवा उलटे करून घालावयास लावणे हा त्यांच्या विनयभंगाचा किंवा त्याही पुढे जाऊन लैंगिक शोषणाचा प्रकार आहे, असे म्हणण्यास वाव आहे. आणि पुढे अशा उलटे कपडे घातलेल्या अवस्थेत विद्यार्थिनींना तीन तास परीक्षा द्यावयास लावणे, हा तर अमानुषपणाचा कळस आहे, असेच म्हणावे लागेल.

आता महिला आयोग वगैरेंनी त्याविरोधात आवाज उठवला आहे. त्याचे पुढे काय व्हायचे ते होईल. पण, मुळात प्रश्न असा उद्भवतो की, आपण इतके व्यवस्थाशरण झालो आहोत का, की जे काही होते आहे, ते जर नैतिकदृष्ट्या अयोग्य असेल, तर आपण त्याविरोधात आवाजही उठवू शकत नाही. एकाही पालकाला अगर विद्यार्थ्याला होत असलेल्या गैरप्रकाराला प्रतिरोध, विरोध करावासा वाटत नाही. वैद्यकीय प्रवेशापुढे सारी नितीमत्ता, मानवता आपल्याला फिकी वाटते. शिक्षणाने माणसामध्ये स्वाभिमान निर्माण होतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिक्षण ही माणूस घडविण्याची महत्त्वाची प्रक्रिया आहे, असे स्वामी विवेकानंद सांगतात. हे त्यांचे सांगणे प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आपल्या शिक्षण व्यवस्थेची पावले पडणार की नाही, हा आजघडीचा कळीचा प्रश्न आहे. अन्यथा व्यवस्थेच्या वरच्या थरात बसलेले लोक त्यांच्या पद्धतीने नियमांचा अर्थ लावत राहणार आणि खालच्या स्तरातल्या लोकांचे शोषण करीत राहणार. प्रत्यक्षात शिक्षणाने शोषणाची जाणीव शोषितांमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षा तर इथे फलद्रुप होताना दिसत नाहीच, उलट आपण आपल्या तात्कालिक लाभाच्या काही बाबींसाठी शोषकांना शोषणाची संधी उपलब्ध करून देत आहोत, असेच चित्र सामोरे आले आहे. शोषणाविरुद्धचा किमान एक हुंकार तरी समाजाने भरायला हवा. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तेवढी तरी अपेक्षा करणे रास्तच आहे, नाही का?


मंगळवार, २ मे, २०२३

नितळ-९: विरासत को नजरअंदाज न कर...


अजिंठा येथील १७व्या क्रमांकाच्या लेणीमधील इंद्र (सन २००८ मध्ये घेतलेले छायाचित्र)

अजिंठा येथील १७व्या क्रमांकाच्या लेणीमधील इंद्र (सन २०२२ मध्ये घेतलेले छायाचित्र)

अजिंठा येथील १० व्या क्रमांकाच्या लेणीमधील स्तंभांवरील चित्रे. (सन २०१२)

अजिंठा येथील १० व्या क्रमांकाच्या लेणीमधील स्तंभांवरील चित्रे. (सन २०२२)

('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



भारताला समृद्ध कला-संस्कृतीचा इतिहास लाभला आहे. तो या देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरला आहे. मात्र, आपण भारतीय लोक आपला समृद्ध वारसा जतन करण्याच्या बाबतीत करंटे आहोत, हे या आधीही कित्येकदा सिद्ध झाले आहे आणि यापुढेही आपण ते हिरीरीने सिद्ध करीत राहणार आहोत. आपल्यात जाणिवांचा अभाव इतका तीव्र आहे की, आपल्या शेजारी असलेल्या वारशाचे जतन, संवर्धन करण्याची आवश्यकता आपल्या मनाला स्पर्शदेखील करीत नाही.

गेल्या तीन दशकांत सरासरी दहा वर्षांच्या अंतरानं अजिंठ्याच्या लेण्यांना भेट दिली. अजिंठा लेण्यांमधील शिल्पकला तर अप्रतिम आहेच, पण येथील भित्तीचित्रे ही या लेण्यांना इतर लेण्यांहून वेगळी आणि सर्वश्रेष्ठ ठरवितात. म्हणूनच त्यांचा समावेश युनेस्कोच्या महत्त्वाच्या जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला आहे. अजिंठ्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आहे. त्याचप्रमाणे परिसरातील वनसंपदेचे जतन व संवर्धन वन विभागाकडे आहे. अजिंठ्याला दर वर्षी जगभरातील लाखो पर्यटक भेट देत असतात. दिवाळी आणि उन्हाळी सुटीच्या कालावधीत तसेच डिसेंबर-जानेवारीमध्ये या लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची तसेच विविध शालेय, महाविद्यालयीन सहलींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तथापि, पर्यटकांमधील जाणिवांच्या अभावाचा फटका अजिंठ्याच्या वारशाला जबर बसतो आहे, हे लक्षात आणून देण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे.

प्रस्तुत लेखकाने डिसेंबर २०१२ आणि डिसेंबर २०२२ आणि तत्पूर्वी मार्च २००८मध्ये या लेण्यांना भेट दिली. अवघ्या दशक-दीडदशकाच्या कालावधीमध्ये या लेण्यांमधील भित्तीचित्रांची अपरिमित हानी झाल्याची बाब यावेळी लक्षात आली. पुरातत्त्व विभाग आपल्या मनुष्यबळाच्या मर्यादेमध्येही संवर्धनाचे काम करीत असल्याचे दिसत असले तरी बेफिकीर पर्यटकांमुळे आणि अनास्थेमुळे अजिंठ्याचा हा अनमोल वारसा आणखी काही वर्षांत पूर्णतः लुप्त होऊन जाईल, अशी साधार भीती वाटते.

दशकभरापूर्वी अजिंठ्याच्या कन्व्हेन्शन सेंटरपासून लेण्यांपर्यंत पर्यावरणपूरक बसने पर्यटकांना वाहून नेले जात असे. ही बस प्रदूषणविरहित होती. मात्र, डिसेंबर २०२२मध्ये मात्र त्यांच्या जागी एसटीच्या डिझेलचा धूर ओकणाऱ्या बस पाहून आश्चर्यात भर पडली. अनास्थेची सुरवात इथंपासूनच. लेण्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पर्यटकांच्या गर्दीचा महापूर. त्यात शालेय सहलींचे प्रमाण तर विचारता सोय नाही. अजिंठ्याची भित्तीचित्रे ही पूर्णपणे नैसर्गिक माती, चुना आणि पानाफुलांच्या भुकटीच्या रंगलेपनातून साकारलेली आहेत. श्वासोच्छवासामुळे गुहांमधील आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वातावरण दमट, ओलसर होऊन त्या चित्रांमध्ये बुरशीसह वेगवेगळे विषाणू वाढतात आणि चित्रांची हानी होण्यास सुरवात होते. म्हणून या गुहांमधील पर्यटकांची संख्या ही मर्यादित करण्याची मोठी आवश्यकता आहे. दिवसाला ठराविकच पर्यटक लेण्यांकडे सोडले जावेत. त्यातही निवडक गंभीर, अभ्यासक पर्यटकांनाच सोडले जावे. बाकीच्यांना पायथ्याशी उभारलेल्या लेण्यांच्या प्रतिकृती दाखवून वाटेला लावायला हवे. शालेय सहली घेऊन येणाऱ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही या लेण्यांचे फारसे गांभीर्य दिसत नाही. मोठमोठ्याने दंगा करीत, आरडाओरड करीत पळापळ करत लेणी पाहतात. परतण्याचीही घाई असते. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांमागे नुसती गडबड करीत असतात. यामुळे साहजिकच श्वासोच्छवास आणि गुहांमधील आर्द्रता यांचे प्रमाण वाढते. तशात पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अत्यधिक वाढते. त्यामुळे भित्तीचित्रे ओली होतात. उन्हाळ्याचा तडाखा वाढत जाईल, तसतसे या भित्तीचित्रांमधील बाष्प बाहेर पडण्यासाठी वाट शोधते आणि अचानक वाळल्याने या चित्रांचे पोपडे पडू लागतात. या भित्तीचित्रांच्या ऱ्हासाला ही नैसर्गिक बाब कारणीभूत असली तरी मानवी हस्तक्षेप अधिक जबाबदार आहे.

या भित्तीशिल्पांवर कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचाही विपरित परिणाम होतो. त्यामुळे येथे फ्लॅश न वापरता फोटो काढणे अभिप्रेत असते. मात्र, लेण्या पाहण्यापेक्षा हल्ली सेल्फीश लोकांचे प्रमाण वाढल्याने या बाबीकडेही दुर्लक्ष होताना दिसते. याचा परिणाम असा झाला आहे की, या अवघ्या दशकभरातच या भित्तीशिल्पांची खूप हानी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी जी चित्रे बऱ्यापैकी दिसून येत होती, ती आता शोधावी लागत आहेत. छतांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम आणि चित्रे ही आज धुसर, धूरकट होत निघाली आहेत. आणखी दशकभराने ती दिसतील किंवा कसे, याविषयी साशंकता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. चैत्यगृहामधील स्तंभांवरील आणि छतावरील चित्रांचीही स्थिती काही वेगळी नाही. अजिंठ्यातील ही सारी भित्तीचित्रे आज अस्तंगत होण्याच्या सीमारेषेवर आहेत. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते पाचवे- सहावे शतक अशा दोन कालावधींमध्ये हा बौद्ध वारसा साकार झाला. काळाच्या उदरात गडप होऊनही पुन्हा झळाळून या देशाला त्याच्या समृद्ध बौद्ध परंपरेची जाणीव करून देता झाला. हा वारसा आता पुन्हा एकदा कायमस्वरुपी काळाच्या उदरात गडप करण्याची सिद्धता जणू आपण सारे मिळून करतो आहोत. अशा वेळेला त्याचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी कोणी तरी पुढे सरसावेल, याच्या प्रतीक्षेत अजिंठ्याची भित्तीचित्रे आहेत. या मृत्यूच्या छायेतून कोणी वाचवेल का त्यांना?

अपनी विरासत को नजरअंदाज न कर आलोक,

आगे चलकर तुझे भी तो इतिहास रचना है।



(सर्व छायाचित्रे डॉ. आलोक जत्राटकर यांनी फ्लॅश न वापरता नियम पाळून काढलेली आहेत.)

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत

यंदा डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. नानासाहेब थोरात

 

डॉ. भालचंद्र काकडे

डॉ. व्ही.एन. शिंदे

डॉ. नानासाहेब थोरात


कोल्हापूर, दि. २ मे: येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र असणारे उदयोन्मुख शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या द्वितिय स्मृतिदिनानिमित्त डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालाऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. गत वर्षीपासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये यंदा कोविड लस संशोधनात महत्त्वाची कामगिरी बजावणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांची व्याख्याने होणार आहेत. दि. ३ व ४ मे २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता या व्याख्यानांचे आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरून प्रसारण होईल.

दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा द्वितिय स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेमध्ये दि. ३ मे रोजी विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे मराठी विज्ञान साहित्य या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. शिंदे हे सध्या शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव असून विज्ञान लेखनाच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. विज्ञान, वैज्ञानिक, वनस्पती व कृषी शास्त्रज्ञ यांविषयी त्यांची पुस्तके प्रकाशित असून या विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. त्यासाठी त्यांना राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण पुरस्कारासह अनेक साहित्यिक पुरस्कार प्राप्त आहेत.

दि. ४ मे रोजी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांचे आजचा भारत आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. डॉ. थोरात यांची ऑक्सफर्ड विद्यापीठातील कोविड लसनिर्मिती करण्यात यशस्वी ठरलेल्या चमूमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासह ते आयर्लंडच्या लिमरिक विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक आहेत. रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनचे ते फेलो आहेत. त्यांना जागतिक प्रतिष्ठेची मेरी क्युरी फेलोशीप तीन वेळा प्राप्त झाली आहे. नॅनो मटेरियल्स व नॅनो तंत्रज्ञानाच्या आधारे स्तन तसेच मेंदूच्या कर्करोगावर लस तथा औषध शोधण्याच्या दिशेने त्यांचे सातत्यपूर्ण संशोधन सुरू आहे.

सदर व्याख्यानमाला आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना https://www.youtube.com/@Alokshahi या लिंकद्वारे सहभागी होता येईल, अशी माहिती डॉ. आलोक जत्राटकर आणि संतोष पिसे यांनी दिली आहे.