मंगळवार, २९ मार्च, २०२२

“तथागत”: बुद्धाला भेटण्याचा, भेटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न

 







तथागत भगवान बुद्ध यांचं तत्त्वज्ञान अखिल सृष्टीच्या मूलगामी अस्तित्वशोधातून जन्माला आलेलं. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील जीवनप्रवासाचं चिंतन करणारं. मानवी जीवनाचाच नव्हे, तर सृष्टीचा हा प्रवास कसा सुखकर, आनंदमयी होईल, या दृष्टीने समग्र जगण्याचं भान देणारं आणि हे जगणं आणि मरणं या दोन्ही गोष्टी सुंदर करणं, या भोवती आणि यासाठी हे तत्त्वज्ञान माणसाला प्रेरित करणारं. त्याच्या आगे आणि मागे जे काही दृष्टीच्या आणि महत्त्वाचं म्हणजे अनुभूतीच्या पलिकडलं आहे, त्याविषयी तथागत मौन बाळगतात. त्या मौनातून अनुभूतीहीन बाबींमधील फोलपण दर्शवितात. विज्ञानवाद हा बुद्धतत्त्वज्ञानाचा गाभा आहे, तो त्यामुळंच. कारण ज्याची अनुभूती घेता येते, त्याच तथ्यांना विज्ञानात स्थान असतं. बुद्धाच्या तत्त्वज्ञानातही अनुभूतीचं तेच स्थान आहे. त्याचप्रमाणं बुद्ध आपल्या तत्त्वज्ञानालाही काळानुरुप बदलण्याचं स्वातंत्र बहाल करतो- मात्र ती सुद्धा या वैज्ञानिक मार्गांनीच. हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य.

जीवनात दुःख आहे, त्या दुःखावर मात करता येणे शक्य आहे आणि ते दुःख निर्माण होऊ नये, यासाठीही प्रयत्न करता येणे शक्य आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांपासून दूर राहणे त्यासाठी आवश्यकच आणि पंचशील व अष्टांगमार्ग हे त्यासाठीचे प्रमुख मार्ग. अहिंसा, अचौर्य, अव्यभिचार, सत्यवदन आणि अपेयपान त्याग हे पंचशील, तर सम्यकदृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक जिविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधि हे अष्टांग. या मूलभूत गोष्टींचा अंगिकार केल्यास मनुष्याचे जीवन सुखी आणि आनंदी होऊन जाईल.

बुद्ध तत्त्वज्ञानाचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे नुकतीच लेखक, कवी समर यांची तथागतही बुद्धजीवनावरील एक नितांतसुंदर कादंबरी वाचून पूर्ण झाली. विशी-पंचविशीच्या आतबाहेरच्या एका तरुण संवेदनशील लेखकाला बुद्धाच्या चरित्राला भेटावंसं वाटणं आणि त्यापुढे जाऊन त्याचं सहजसोप्या भाषेत निरुपण करावं, अशा पद्धतीनं बुद्ध मांडावासा वाटणं, हीच बाब मुळी माझ्यासाठी अत्यंत आनंदाची अन् अभिमानाची आहे. आजची पिढी बुद्धाचा साकल्यानं विचार करू पाहते आहे, त्याला भेटू पाहते आहे, त्याच्यापासून काही घेऊ आणि समाजाला देऊ पाहते आहे, ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे ही वर्णनात्मक स्वरुपाची कादंबरी नाही, तर प्रथमपुरूषी निवेदनाच्या स्वरुपात ती साकारलेली आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत म्हटलं तर ही गोष्ट सोपी आणि म्हटलं तर त्याहून अवघड आहे. कारण प्रथमपुरूषी निवेदनाचे जसे लाभ आहेत, तशा मर्यादाही आहेत. पौराणिक कथापुरूषांच्या बाबतीत निवेदन लेखकाच्या कल्पनांप्रमाणे फुलविता येऊ शकते. बुद्धासारख्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेच्या संदर्भात मात्र अत्यंत चिकित्सकपणानं वाक्यरचना करावी लागते. त्याच्या तत्त्वज्ञानाचे उपयुक्त आकलन करवून घेणे ही त्यासाठीची पूर्वअट आहे. आणि या बाबतीत समर पूर्णांशाने यशस्वी ठरलेले आहेत. दुसरी महत्त्वाची बाब असते ती म्हणजे अशा बाबतीत लेखक संदर्भसाधने कोणती वापरतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्मयांसह अनेक अधिकृत संदर्भसाधनांचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करीत ही कादंबरी साकारली आहे. बुद्धाच्या धम्माचे आधुनिक स्वरुप जगाला दाखवून देणाऱ्या बाबासाहेबांनाच सदर कादंबरी लेखकाने अर्पण केली आहे. तथागतांनी मानवी मनाचा, अस्तित्वाचा आणि वैश्विक दुःखाचा सखोल अभ्यास करून एक मनुष्यनिष्ठ तत्त्वज्ञान मांडलं. हा प्रवास अद्भुत आहे. तो ऐकून, वाचून त्याबाबत लिहीण्याचा मोह कुणालाही होईल. तसा मलाही झाला. त्यातूनच तथागतकादंबरी साकार झाली’, अशी भूमिका लेखकाने मांडली आहे. मात्र, बुद्धाविषयी लिहीण्याची प्रेरणा त्या तत्त्वज्ञानाच्या ताकदीइतकीच लेखकाच्या संवेदनशीलतेमधूनही आलेली आहे, हे मात्र आवर्जून सांगावंसं वाटतं. तथागतांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर सामाजिक क्रांतीही केली. ते केवळ उपदेश करीत बसले नाहीत, तर त्यांनी समाजही बदलला. तथागतांच्या या क्रांतीकारी कार्याचं प्रतिबिंब उमटविण्यामध्ये ही कादंबरी निश्चितपणे यशस्वी झालेली आहे. त्यासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचं मार्गदर्शनही समर यांनी घेतलेलं आहे. स्वतःच्या साहित्यकृतीला वाचकांना सादर करण्यापूर्वी सर्व कसोट्यांवर ती जास्तीतजास्त निर्दोष करण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. कादंबरी या फॉर्मचा आधार घेत असताना वास्तवाशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणं, ही फार महत्त्वाची बाब आहे. मला सर्वाधिक भावली ती हीच गोष्ट.

आत्मनिवेदनपर शैलीत साकारलेली तथागतही सुमारे ५०२ पृष्ठांची कादंबरी आहे. यामध्ये स्वतः बुद्ध सिद्धार्थ, बोधिसत्त्व सिद्धार्थ, गौतम बुद्ध आणि तथागत या चार विविध अवस्थांमध्ये संवाद साधतात. त्यांच्याखेरीज पत्नी यशोधरा, पिता शुद्धोधन, ब्रह्म सहंपती, शिष्य सारिपुत्त आणि शिष्या भिक्खुणी खेमा अशा सहा जणांच्या तोंडून बुद्धचरित्राचे विविध टप्पे अतिशय अलगद उलगडत जाते. या पात्रनियोजनातून सुद्धा कादंबरीकाराच्या कौशल्याची आणि दांडग्या अभ्यासाची प्रचिती येते. अत्यंत विचारपूर्वक ही योजना केलेली आहे. त्यासाठी समर यांना दाद द्यावीशी वाटते. त्याशिवाय ज्या ओघवत्या शब्दांमध्ये बुद्धाच्या तोंडून त्याचे तत्त्वज्ञान स्रवते, मला वाटते, अलिकडच्या काळात इतक्या सोप्या भाषेत बुद्ध तत्त्वज्ञान आलेलेच नाही. तत्कालीन पाली या लोकभाषेत ते लोकांना कसे भिडले, भावले असावे, हे लेखकाच्या साध्या सोप्या मराठीतून समजते. अन्यथा, सहजसोप्या बुद्धाला अवघड करून सांगणारे विद्वतजनच भोवतालात अधिक दिसतात. या मध्यस्थांमुळे बुद्ध लोकांना अवघड वाटतो. त्यापेक्षा लोकांनी बुद्धाला थेट भेटणे कधीही चांगले. ते किती योग्य आहे, हे सदरची कादंबरी वाचताना जाणवल्याखेरीज राहात नाही. सध्याच्या कोलाहलयुक्त भोवतालात आजची पिढी किती असोशीने बुद्धाला भेटू पाहते आहे, किंबहुना, बुद्धाला भेटत राहणे, त्याच्यापासून प्रेरित होत राहणे किती अगत्याचे आहे, याचे अधोरेखन तथागतही कादंबरी करते. यात बुद्धाचे जीवनचरित्र, बुद्धाचे कार्य आहेच, पण त्यापलिकडे त्याची सार्वकालिक प्रस्तुतताही दृगोच्चर होते. हेच या कादंबरीचे आणि कादंबरीकाराचे योगदान आहे.

सृजनशील चिन्मय...

तथागतया कादंबरीविषयी लिहीले, मात्र आता कादंबरीकाराविषयी कौतुकाचे चार बोल लिहीणे मला अगत्याचे वाटते. समरऊर्फ चिन्मय मोघे हा माझे सहकारी, सन्मित्र किरण मोघे यांचा चिरंजीव. मोघे सरांच्या दोनही मुलांच्या लहानपणापासूनच्या जडणघडणीचा मी एक साक्षीदार. कला क्षेत्राशी बालपणापासून जोडलेली ही मुलं या आईबापानं आणि हो, आजीच्या संस्कारानंही तितक्याच संवेदनशीलतेनं घडवली आहेत. त्यांच्यातलं सामाजिक भान आणि कला-साहित्य-सांस्कृतिक व्यवहारांप्रती सजगता ही मूल्ये त्यातूनच रुजलेली आहे. समर तर अगदी टीनएजपासून लिहीतो आहे. कविता, नाटक, कथा, कादंबऱ्या असा त्याचा वावर सुरू आहे. वास्तवाकडं अतिशय संवेदनशीलतेनं पाहात असताना भूतकाळाकडंही चिकित्सकपणानं पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन फार महत्त्वाचा आहे. त्यामुळंच संगीत नाटक ही परंपरा पौराणिक गोष्टींवर अधिक पोसली गेली असताना त्याला मात्र सम्राट चंद्रगुप्ताच्या व्यक्तीरेखेवर आधारित संगीत चंद्रप्रियाहे संगीत नाटक लिहावंसं वाटतं. यात शास्त्रीय संगीतावर आधारित बारा नाट्यपदं आणि भावगीतांचा समावेश आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रही हाक मारतं आणि त्यातूनच विविध १९ वृत्तांमधलं ६५० पृष्ठांचं महाकाव्य शिवप्रतापतो अवघ्या सोळाव्या वर्षी साकारतो, तेही अवघ्या ५० दिवसांत. या मराठी महाकाव्यात ३००० श्लोक, दहा पर्व आणि शंभर सर्ग आहेत. ही या सृजनशील तरुण कवीची ताकद आहे. त्यापुढं जाऊन आजच्या काळात हिटलर पुन्हा अवतरला तर काय…? हा प्रश्न घेऊन १९७०: रिटर्न ऑफ एडॉल्फ हिटलरही इंग्रजी कादंबरी सुद्धा त्यानं लिहीलीय. आता तो लक्ष्मणाच्या ऊर्मिलेच्या वनवासाचं चिंतन करतो आहे. ती सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मीही त्या प्रतीक्षेत आहे. चिन्मय, तुझं भविष्य उज्ज्वल आहेच, हे मी सांगण्याची खरं तर आवश्यकताच नाही. मात्र, तुझ्यासारख्या संवेदनशील तरुणाच्या हातून या देशाचं भवितव्यही उजळत राहील, याची खात्री आहे. तुझी सर्जनशील अभिव्यक्ती अशीच सकारात्मक दिशेनं फुलत राहो, त्यातून अशा अनेकानेक साहित्यकृती निर्माण होवोत, यासाठी अनेकानेक शुभेच्छा!

---

तथागत

लेखक: समर

प्रकाशक: समर प्रकाशन, पुणे

पृष्ठे: ५०२

मूल्य: रु. ५००/-

(अमेझॉनवर उपलब्ध)


शनिवार, २६ मार्च, २०२२

संत रविदासांच्या ‘बे-गम-पुऱ्या’त...



सन २०२२ सुरू झालं आणि या वर्षीचं पहिलं पुस्तक हाती आलं, ते म्हणजे डॉ. रविंद्र श्रावस्ती यांचं शोध संत रविदासांचा होय. डॉक्टरसाहेबांकडून वेळोवेळी या पुस्तकाच्या लेखन प्रगतीविषयी समजत होतं आणि त्यातून या पुस्तकाविषयीच्या कुतूहलात वाढच होत होती. महत्त्वाचं म्हणजे रविदासांचं चरित्र माहिती होतं, त्यांच्याविषयीच्या काही दंतकथा माहिती होत्या. किंबहुना, कथांपेक्षा दंतकथांतलेच रविदास अधिक माहिती असलेले. अनुप जलोटा यांच्या भक्तीपूर्ण आवाजानं ओथंबलेलं प्रभुजी तुम चंदन हम पानी... हे माझ्या आवडत्या भजनांपैकी एक. हे भजन रविदासांचंच. त्यावेळी रविदास मनात खोल कुठं तरी घुसलेलेच, पण, भजन ऐकताना अनुपजींच्या आवाजाचीच मोहिनी अधिक पडलेली. या साऱ्या दंतकथा आणि ज्ञात-अज्ञात रविदासांबद्दल मनात असलेल्या कल्पनांवरले पहिले आवरण भेदले, ते डॉ. गेल ऑम्वेट यांनी. सिकींग बेमगपुरा वाचलं. वाचलं तेव्हा संशोधकीय आणि सैद्धांतिक मांडणीच्या पलिकडे आकलन झालं, ते एका सामाजिक लोकशाहीवादी राष्ट्रसंताचं! रविदासांची ही तेव्हा मनात निर्माण झालेली प्रतिमा पूर्णरुपात साकार होण्यासाठी २०२२ साल उजाडावं लागलं.

पंधराव्या शतकातला एक संत त्याच्या स्वप्नातल्या शहराची- नव्हे देशाची प्रतिमा कशी रेखाटतो, तर बेगमपूर म्हणून! थेट अर्थ घेतला तर त्यात स्त्रीवादाचा अंतर्भाव, प्रभाव दिसतोच, किंबहुना तो आहेही. जी व्यक्ती समतेची सच्ची पुरस्कर्ती म्हणून प्रबोधनाची मशाल हाती घेते, ती स्त्रियांच्या हक्कांचा हुंकार भरणार नाही का? रविदासांनी तो भरला आहेच. पण, त्याही पुढे जाऊन जहाँ कतई गम न हो असे ते बेगमपूर... म्हणजेच जिथे दुःख नाही, वेदना नाहीत, अशांती नाही, अस्वच्छता नाही, भेदभाव नाही, विषमता नाही, परस्परांप्रती कटुता नाही, असे शहर होय. अर्थातच, शांती, समता, बंधुता, स्वातंत्र्याचा, सहिष्णुतेचा म्हणजेच लोकशाहीवादी, मानवी मूल्यांचा इतका थेट उद्घोष आणि तोही त्या कालखंडात एक संत करतो, ही केवढाली मोठी क्रांतीकारक घटना होती.

आजकाल आपण आपल्या भ्रष्ट राजकीय स्वार्थप्रेरित हेतू साध्य करण्यासाठी साऱ्याच संतांची आणि राष्ट्रपुरूषांची जात काढण्याचं पातक करतो आहोत. त्याला पूरक अशी मिथकं जोजावणं आणि ती सातत्यानं लोकांच्या मनावर बिंबवत राहणं, ही अशा लोकांची गरज बनून राहिली आहे. आपण त्याला बळी पडतो आहोत, हा आपला मूर्खपणा किंवा भ्याडपणा, काही समजा. पण हे होते आहे. पाच शतकांपूर्वी रविदास या साऱ्या गोष्टींतून बाहेर पडू पाहत होते, हे केवढे क्रांतदर्शित्व. त्याच बळावर डिकास्ट अर्थातच महामानव बनलेल्या रविदासांना आपण पुन्हा पकडून जातीच्या चौकटीत आणि त्यांच्या पिढीजात धंद्याचे प्रतीक म्हणून वापरतो आहोत, हा त्या महामानवाच्या कर्तृत्वाचा केवढा घोर अपमान. आता रविदासांबद्दल लिहीतो आहे म्हणून त्यांचा उल्लेख केला, मात्र सध्या प्रत्येक जातीत-पोटजातींत हे राजकारण धुमसते आहे.

डॉ. श्रावस्ती यांनी संत रविदासांचा शोध घेत असताना केवळ त्याच्या जीवनकाळापुरता पाच-सहा दशकांपुरता हा शोध न राखता त्याच्यामागे दोनेक हजार वर्षे आणि पुढे तीनेकशे वर्षे अशा व्यापक पटावर त्यांचे विश्लेषण केले आहे. श्रावस्ती सरांची ही शोधयात्रा प्रचंड रंजक आणि माहितीने ओतप्रोत भरलेली आहे. मुळातच ते अत्यंत गंभीर प्रवृत्तीचे समाजचिंतक आणि संशोधक आहेत. वैद्यकशास्त्राचे समग्र गांभीर्य त्यांच्या सामाजिक चिकित्सेच्या लेखनामध्ये एकवटलेले आढळते. ही सामाजिक शल्यचिकित्सा ते अत्यंत कौशल्याने करतात. टाके तर घालतातच, ते कुठे कुठे टोचायला तर हवेच, पण त्यापुढे जाऊन समाजमानस दुरुस्तही व्हायला हवे, या दृष्टीने त्यांचा समग्र लेखनव्यवहार केंद्रित झालेला आहे. संत रविदासांचा शोधही त्याला अपवाद नाही. खरं तर रविदासांविषयीच्या अधिकृत साहित्याची उपलब्धता अगदी मर्यादित आहे. अशा मर्यादित संदर्भसाधनांच्या आधारे अनेक धागेदोर जुळवत, काहींची फेरमांडणी करत त्यांनी हा सुमारे ५०० पृष्ठांचा महाग्रंथ साकारला आहे. एकूण २४ प्रकरणे, चार परिशिष्टे आणि संदर्भ सूची असा त्याचा पसारा आहे. पसारा आहे, मात्र तरीही तो आटोपशीर आहे. फुलोरा आहे, मात्र रविदासांच्या चरित्रकार्याचा सुगंध त्यासभोवार पसरला आहे. संशोधन आहे, मात्र संशोधकीय रुक्षपणाला त्यात पूर्ण फाटा आहे. समजावून सांगण्याची, पटवून देण्याची त्यांची म्हणून अशी एक शैली आहे. एक एक मुद्दा घेऊन त्याचे विश्लेषण करावयाचे आणि हे सारे विश्लेषित मुद्दे पुनश्च एकत्र करून त्यातून एका नव्या समग्राची मांडणी करण्याचा प्रयत्न करणे, हे डॉ. श्रावस्ती यांचे लेखनवैशिष्ट्य आहे. त्यांचे शब्दप्रभुत्व कमालीचे आहे. त्यांची शैलीही अत्यंत उद्बोधक आणि मर्मग्राही आहे. संयत पण मुद्देसूद मांडणीचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे लेखन.

भगवान बुद्धापासून ते कबीर-तुकाराम-नामदेवांपर्यंतच्या कालखंडाचा रविदासांच्या अनुषंगाने वेध घेत असतानाही कुठेही विषयापासून दूर गेले आहेत, असे होत नाही. रविदासांचा वेध घेणाऱ्या आख्यायिका, मिथके, दंतकथा त्याचप्रमाणे हिंदीतील अभ्यासक, संशोधक डॉ. जसवीर सिंह, डॉ. बी.पी. शर्मा, डॉ. चमन लाल, डॉ. पीतांबरदत्त बडथ्वाल इत्यादींनी रविदासांचे केलेले संकलन यांचा आढावा घेऊन पुन्हा त्याचा अधिक सूक्ष्मपणाने आणि तपशीलाने वेध घेण्याची अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी डॉ. श्रावस्तींना इथे साधली आहे. संत रविदासांचा निर्गुणतेशी धागा जोडत असतानाच त्याच्या व्याप्तीचा अवकाश अधिकाधिक मोठा करीत अंतिमतः त्याचा विस्तार इतका विशाल झाला आहे की, बुद्धाच्या सद्धम्माच्या संकल्पनेला अर्थातच मानवतावादाच्या मूळ सिद्धांताला जाऊन ते मिळतात. एक कुशल संशोधक आपल्या अप्रतिम मांडणीच्या जोरावर किती महत्त्वपूर्ण कामगिरी साकार करू शकतो, त्याचे प्रत्यंतर हा ग्रंथ वाचताना येते. हा ग्रंथ डॉ. गेल ऑम्वेट आणि डॉ. भारत पाटणकर यांना अर्पण केला आहे, याचे त्यामुळेच आश्चर्य वाटत नाही. कारण सुरवातीला म्हटल्याप्रमाणं डॉ. ऑम्वेट यांची संशोधकीय चिकित्सादृष्टी आणि डॉ. पाटणकर यांची राष्ट्रप्रेमाने भारित कार्यकर्तव्य सजगता, याचे संमिश्रण त्यामध्ये स्वाभाविकरित्या आहे.

ग्रंथाचे मुखपृष्ठ हे आपल्याला परिचित असणाऱ्या रविदासांच्या प्रतिमेपेक्षा वेगळे अन् तरीही उत्कट आहे. शहजादा दारा शुकोह याने कबीर आणि रविदासांचे एकत्रित पेंटिंग करवून घेतले होते. त्यातले हे रविदास आहेत. जे मुखपृष्ठाच्या बाबतीत, तेच आतल्या रविदासांच्या शब्दचित्राच्या संदर्भातही तितकेच सार्थ आहे. मिथकांच्या पलिकडले, प्रत्यक्षातले रविदास वाचताना त्यांची मानवी मूल्यांप्रतीची सजगता आणि आस ही आत खोलवर रुतत जाते. आपल्याला आवाहन करीत राहते. लेखक रविदासांना तर जातीतून बाहेर काढतातच, पण त्याच्यातील प्रखर राष्ट्रीय वृत्तीही अधोरेखित करतात. हे राष्ट्रीयत्व खूप निर्मळ आहे, निरागस आहे, पारदर्शी आहे; महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विद्रोही आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविणारा हा ग्रंथ आहे. मात्र तिथपर्यंत आपण कधी पोहोचणार आहोत, कोणास ठावे?

---

शोध संत रविदासांचा

लेखक: डॉ. रविंद्र श्रावस्ती

प्रकाशन: नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर

पृष्ठे: ४९६

किंमत: रु. ५६०/-