मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

...वो 'नजर' कहाँ से लाओगे?

गेले दोन दिवस (कालचा आणि आजचा) हे माझ्या फोटोग्राफीमधील आयुष्याच्या दृष्टीनं अतिशय (आनंदाचे आणि दुःखाचे) संमिश्र स्वरुपाचे ठरले.

काल दुपारी ज्येष्ठ एरियल फोटोग्राफर गोपाळ बोधे हे आमच्या कार्यालयात, मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचं निमंत्रण भुजबळ साहेबांना देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची भेट झाली, त्यांच्याशी चांगला संवाद झाला, ही आनंदाची घटना. त्यांच्या भेटीची बातमी रात्री उशीरापर्यंत माझ्या छायाचित्रकार मित्रांशी आणि छायाचित्रण कलेतील माझे गुरू शशिकांत मुळे यांच्याशी शेअर केली. आनंद द्विगुणित झाला.

आज सकाळी आवरुन ऑफिसला यायला घरातून बाहेर पडतो न् पडतो, तोच थेट भुजबळ साहेबांकडून अत्यंत दुःखद असा मेसेज आला ('चिंतन'च्याही आधी!)- ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष गेल्याचा! विश्वास ठेवण्यासारखी बातमी नव्हतीच! मी स्टेशनवरूनच आणखी दोघा-तिघांना फोन करून बातमी कन्फर्म केली. साहेबांचा कन्डोलन्स मेसेज तयार करायलाही धीर गोळा करावा लागला. कालच्या आनंदावर आजचं दुःख भारी पडलं.

गोपाळ बोधे आणि गौतम राजाध्यक्ष हे दोघेही छायाचित्रणाच्या क्षेत्रातलेच असले तरी या क्षेत्रातल्या दोन भिन्न प्रकारच्या प्रांतात त्यांनी आपापलं प्रभुत्व सिद्ध केलेलं आहे. भारतातले पहिले एरियल फोटोग्राफर असलेल्या किंबहुना, ज्यांच्या प्रयत्नानं देशात एरियल फोटोग्राफी करण्यास परवानगी मिळाली, त्या गोपाळ बोधे यांचे आम्ही फोटोग्राफीचे विद्यार्थी सुरवातीपासूनचे फॅन होतो. गेटवे ऑफ इंडियाचे तीन 'डोम' आम्ही 'बेटर फोटोग्राफी'मध्ये त्यांच्याविषयीच्या आर्टिकलमध्ये पहिल्यांदा पाहिले. आणि अशीही काही फोटोग्राफी करता येऊ शकते, हे आम्हाला त्यावेळी पहिल्यांदा समजलं. बोधेंविषयी एक आदराचं स्थान हृदयात कायमचं निर्माण झालं.

आमची तीच अवस्था गौतम राजाध्यक्ष यांच्या बाबतीत सुद्धा झालेली असायची. वेगवेगळ्या ग्लॅमर मॅगेझिनमध्ये त्यांनी काढलेली छायाचित्र नुसती पाहात राहावीत, असं वाटायचं. यात त्या चेहऱ्याचा किती वाटा आणि छायाचित्रकाराचा किती, हे त्यावेळी समजत नव्हतं. आणि आज समजतंय की या दोन्ही गोष्टी परस्परांहून वेगळ्या जरी करता आल्या नाहीत, तरी सौंदर्य टिपणाऱ्या फोटोग्राफरच्या नजरेचं महत्त्वच अधिक आहे. गौतमजींनी नट-नट्यांची कितीतरी छायाचित्रं काढली, पण त्यात झळकणाऱ्या सौंदर्यावर त्यांनी कधीही अश्लीलतेची सावलीही पडू दिली नाही, हे त्यांच्या कॅमेऱ्यामागच्या नजरेचं मला जाणवलेलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य! गौतम राजाध्यक्षांची फोटो काढण्याची स्टाईल, त्यांचं लाइटिंग माझ्या एवढं परिचयाचं झालं की, एखादा फोटो पाहिला की, वाटतं, 'अरे, हा डेफिनिटली गौतम राजाध्यक्ष टच!' केसरी पाटील यांच्या 'प्रवास...एका प्रवासाचा...' या चरित्रात्मक पुस्तकाच्या कव्हरवर केसरी पाटलांचा फोटो पाहिला की जाणवतं, 'येस, इट्स गौतम!'

सन 2001मध्ये गौतम राजाध्यक्षांनी कोल्हापूरमध्ये 'चेहरे' या त्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्यावेळी आमचे पत्रकारितेतील उमेदवारीचे दिवस होते आणि मी 'निपाणी-दर्शन' हे स्थानिक केबल न्यूज चॅनल चालवायचो. त्यावर कोल्हापूरपासून बेळगावपर्यंतच्या आणि चिकोडीपासून ते गडहिंग्लज-गारगोटीपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या दाखवण्याचा माझा प्रयत्न असायचा. साहजिकच गौतम राजाध्यक्षांना भेटण्याची संधी मी दवडणार नव्हतो. मी कॅमेरा युनिटसह प्रदर्शनस्थळी पोहोचलो. गौतमजींनी नेहमीप्रमाणं एक सुंदरसा झब्बा आणि एका खांद्यावर व्यवस्थित घडी घातलेली शाल घेतली होती. त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांचं ट्रेडमार्क स्माईल, जे कधीही त्यांच्या चेहऱ्यावरुन ढळलेलं दिसलं नाही. मी आधी प्रदर्शनाचं मिळेल तेवढं फुटेज कॅमेरामनला घ्यायला सांगितलं आणि त्यानंतर गौतमजींचा इंटरव्ह्यू घेतला. 'चेहरे'पासून ते त्यांचं करिअर आणि एकूणच करिअरग्राफ असं या इंटरव्ह्यूचं स्वरुप होतं. त्यांना त्यावेळी मी त्यांच्या फोटोग्राफीतल्या यशाचं रहस्य काय, असा सरधोपट आणि बाळबोध प्रश्न विचारला होता. त्यांनी मात्र तसं न समजता मला दिलेलं उत्तर आजही जसंच्या तसं मला लक्षात आहे. गौतमजी म्हणाले होते,

'मी कधीही समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा फोटो काढत नाही. तर मला त्याचं व्यक्तिमत्त्व माझ्या छायाचित्राच्या माध्यमातून रेखाटायचं असतं. त्यामुळं माझ्याकडं कोणी फोटो काढायला आला तर मी 'बसवा समोर आणि काढा फोटो', असं कधीही करत नाही. त्या व्यक्तीशी संवाद साधत साधत त्याचे मूड्स टिपणं मला अधिक आवडतं आणि साहजिकच माझ्याबरोबरच माझ्या फोटोंमधूनही त्याचं व्यक्तिमत्त्व उलगडतं, हेच माझ्या यशाचं रहस्य!'

गौतमजींचं आज अकाली निधन झाल्यामुळं त्यांच्या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. मुंबईत एक-दोन कार्यक्रमांत त्यांची भेट झाली, मात्र बोलणं काहीच झालं नव्हतं. पण त्यांनी सांगितलेलं त्यांच्या यशाचं रहस्य समजून सुद्धा पुन्हा दुसरा गौतम राजाध्यक्ष होऊ शकणार नाही, अशी फार मोठी पोकळी जाणवतेय. शेवटी गौतमजींचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण सांगण्यासाठी मला 'चायना गेट'मधल्या मुकेश तिवारीच्या डॉयलॉगचा आधार घ्यावासा वाटतोय. तो म्हणाला होता, 'हमसे भिडने की हिम्मत तो जुटा लोगे, लेकिन वो कमीनापन कहाँ से लाओगे?' हाच डायलॉग बदलून गौतमजींच्या बाबतीत म्हणावंसं वाटतंय की,

'गौतम राजाध्यक्ष बनने की कोशिश तो जरुर करोगे, लेकिन वो 'नजर' कहाँ से लाओगे?'
हॅट्स ऑफ टू यू गौतम जी! वुई विल मिस यू फॉरेव्हर!!!

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

संत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा!

'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट 2011) सायंकाळी 6 वाजता नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवनामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो.ब. देगळूरकर असतील तर श्री. अरुण खोरे आणि श्री. वा.ल. मंजूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या या गाथेमध्ये संत चोखामेळा यांच्या नव्याने उपलब्ध झालेल्या नऊ अभंगांचा समावेश करण्यात आलेला आहे, हे या पुस्तकाचे अत्यंत महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे.
अभंगगाथेचे संपादक प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना याठिकाणी देत आहे.

चोखोबांनी मराठी सारस्वताला दिलेली देणगी ही अतुलनीय व अलौकिक स्वरूपाची आहे. चोखोबांनी आपल्या हयातीत अभंगाव्यतिरिक्त इतरही रचना केल्याचे आज तरी स्पष्ट खुलासा होत नाही. आज त्यांचे केवळ 349 + 9 एवढे अभंग वाचकांना उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखकाने चोखोबांचे नव्याने उपलब्ध झालेले 9 अभंग या गाथेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आणखी काही ग्रंथालयांतील जुनी बाडे तपासली तर आणखी काही अभंग हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
अनेक संदर्भ ग्रंथांचा आढावा घेता, चोखोबांनी 'विवेकदीप' नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा वारंवार उल्लेख येतो, परंतु आजपर्यंत अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो काही दृष्टीस पडलेला नाही. तो ग्रंथ जर उपलब्ध झाला तर चोखोबांच्या साहित्यावर आणखी प्रकाश पडू शकेल. चोखोबांच्या साहित्य निर्मितीसंबंधी आज अनेक प्रश्न निर्माण होतात. चोखोबांना मुळात लिहिता-वाचता येत होते का? एकंदरीत त्या काळातील प्राप्त परिस्थितीचा विचार करता, संस्कृत ही प्रभावी भाषा होती आणि ती शिकण्यासाठी चोखोबांना अनुकूल परिस्थिती होती, असे वाटत नाही. त्या काळी बरेच साहित्य संस्कृत भाषेत होते, तर मग या सर्वांचे वाचन चोखोबा कसे करीत असत? ज्ञानदेव, नामदेव व इतर समकालीन संतांच्या रचना चोखोबांनी कशा वाचल्या असतील? सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता चोखोबांना यातिहीन म्हणून सतत दूर ढकलत असताना समाजाच्या अंतरंगाचे दर्शन आपल्या अभंगवाणीतून ते कसे करू शकले?

एवढया प्रतिकूल परिस्थितीत देखील कसदार व अमरत्व प्राप्त झालेले साहित्य चोखोबांनी कसे निर्माण केले, हाही एक मोठा प्रश्नच आहे. सातशे वर्षांपासूनचे जे साहित्य आजही अमर अशा स्वरूपात आहे ते साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकाकडे-चोखोबांकडे-अगाध व अफाट प्रतिभाशक्ती होती हे निर्विवाद. त्या व्यतिरिक्त त्यांचे चिंतन व मनन हे अधिक महत्त्वाचे वाटते. समाजातील उच्च स्तरातील लोकांच्या बोलण्यातील व वागण्यातील विसंगती त्यांना सतत सलत असावी. तेच त्यांच्या चिंतनाचे व मननाचे विषय होते. चोखोबांच्या ज्ञानेंद्रियाची बाजू अधिक सशक्त होती, असे वाटते. कारण त्यांच्या अभंगांचे विश्लेषण करतेवेळी याचे दर्शन प्रकर्षाने झाल्याखेरीज राहत नाही. ज्ञानार्जनासाठी चोखोबांनी ज्ञानदेव व नामदेव आदी संतांच्या सोबतीने पुष्कळसे देशाटन व तीर्थाटन केले. त्यामुळे अनेक संतांचा व सज्जनांचा सहवास त्यांना लाभला. चोखोबांची श्रवणशक्ती देखील मोठी होती, असे वाटते. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते हे गृहीत धरून पुढे लिहावयाचे झाले, तर समकालीन संतांच्या रचना एकांतात वाचण्यासाठी चोखोबांना त्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या. ज्यावेळी स्वत: त्या संतांच्या वा इतरांच्या मुखातून बाहेर पडेल त्याच वेळी त्याचा अर्थ व मर्म चोखोबांच्या काळजाला जाऊन भिडत असे आणि अगाध अशा स्वरूपातील श्रवण शक्तीच्या आधारेच त्यांनी ही साहित्य निर्मिती केली.
चोखोबांना आपल्या साहित्य निर्मितीत संतांचा सहवास हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तत्कालीन वर्णाश्रम पध्दतीत समाजातील कर्मठांनी चोखोबांना जरी दूर लोटले असले तरी संतांनी मात्र त्यांना जवळ केले होते. त्यामुळे आपल्या निष्ठापूर्व भक्तीने संत मेळयात त्यांनी फार मोठे स्थान प्राप्त करून घेतले होते.
ज्ञानदेव व नामदेवांच्या अभंग रचनेच्या संख्येच्या मानाने आज उपलब्ध असलेल्या चोखोबांच्या अभंगांची संख्या अगदीच मर्यादित आहे. चोखोबांनी आपली अभंग रचना करण्यास कधी सुरुवात केली आणि किती काळ हे व्रत चालू होते, याचाही अंदाज लागत नाही. त्यांनी दीर्घकाळ अभंग रचना केली असावी असे गृहीत धरले तर आज उपलब्ध आहे त्यापेक्षा अधिक अभंगरचना त्यांनी केली असावी असे वाटते; परंतु आज उपलब्ध असलेल्या अभंगांची संख्या पाहता व त्यांच्या व्यासंगाचा आढावा घेता आजची त्यांच्या अभंगांची संख्या अपुरी आहे, असे वाटते. एका वाचनात हे सर्व अभंग नजरेखालून घातले तर अभंगरचना खंडित झाल्याची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही.
चोखोबांच्या अभंगांचा दर्जा संतश्रेष्ठाचा आहे. नैसर्गिकपणा, सहजसुंदरता, सामाजिक आशय, बांधीव रचना, इत्यादी साहित्यिक गुणांनी चोखोबांच्या अभंगांना मराठी सारस्वतात मानाचे स्थान आहे. चोखोबांची वाणी चोख होती. 'वाणी नाही शुद्ध धड न ये वचन' असे त्यांचे मत होते. यावरून असे दिसते की, त्यांना आत्मप्रौढीचा तिटकारा होता. आपला विचार, सिध्दांत आणि अभंगांबाबत त्यांना पराकोटीचा आदर होता.
चोखोबांच्या अभंगात भक्तीविषयक व पारमार्थिकविषयक आशय तर आहेच, परंतु त्यांच्या मनातील दु:ख व्यक्त करणारे अभंगही आहेत. याही पुढे जाऊन द्वैत-अद्वैत, गीता यातील अनेक तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अत्यंत समर्थपणे आपल्या अभंगातून मांडल्या आहेत. भगवंताच्या रूपाचे, त्याच्या भक्ती, त्याच्या सामर्थ्याचे, करुणा स्वभावाचे गुणगान करण्यासाठी चोखोबांनी जशी अनेक अभंगांची निर्मिती केली, तसेच गुरुपरंपरेतील ज्ञानेश्वर व नामदेवांचे वर्णन करण्यासाठी देखील अनेक अभंग खर्ची टाकले आहेत.
माणसाचा व पर्यायाने समाजाचा विकास काही प्रमाणात त्याच्या आर्थिक सुबत्तेवर अवलंबून असतो, परंतु त्या विकासाच्या परिपूर्णतेला नैतिक व आध्यात्मिकतेचीही जोड द्यावी लागते. तेव्हा संतसाहित्य हे टाळकुटे साहित्य नसून त्याचा गाभा उलगडून पाहिला तर सुखी व सुसंस्कृत जीवनासाठीचे अनेक मौलिक विचार व मार्ग त्यात सापडतात. या संदर्भात कदम यांनी दिलेला दृष्टांत मला मनापासून आवडतो. ते म्हणतात, एके ठिकाणी आग लागली असता त्याकडे धावून गर्दी करणारे लोक आग विझविण्यासाठी काहीच करू शकत नाहीत, परंतु आग विझवण्यासाठी पाण्याच्या साठयाकडे धावणारेच अखेर ती आग विझवू शकतात. हे जसे खरे आहे त्याप्रमाणे संतांच्या कार्याचे व संतसाहित्याचे महत्त्व आहे. प्रथमदर्शनी टाळकुटे वाटत असले तरी अखेर जीवनाचे खरे मर्म त्यातच आहे.
ज्ञानदेव, नामदेव आदी संतांनी समाजात आध्यात्मिक लोकशाही रुजविण्यासाठी जे शतकोटी प्रयत्न केले त्यातील मूर्तिंत उदाहरण म्हणजे संत चोखामेळा होय. प्रस्तुत समाजाने हीन मानलेल्या चोखोबांना नामदेवांनी गुरूपदेश दिले. आपल्या प्रभावळीतील संतमंडळीत चोखोबांना संतश्रेष्ठत्वाचे स्थान देऊन, त्यांच्या हीन कुळाचा कलंक धुऊन त्यांच्या अभंगवाणीचे मुक्त कंठाने गुणगान करून आध्यात्मिक लोकशाहीची पताका त्यांनी चोखोबांच्या खांद्यावर ठेवली.

ज्ञानेश्वरांच्या समकालीन अभंग रचनाकार आपले अभंग रचावयाचेच म्हणून एकांतात बसून स्वत: लेखन करण्याची पध्दती नव्हती. विठ्ठलभक्तीच्या धुंदीत न्हाऊन निघालेले हे संत भजन-कीर्तनातच आपले विचार अभंगांच्या माध्यमातून मांडत असत. कालांतराने त्यांच्या शिष्यांनी, भक्तांनी व लेखनिकांनी ते अभंग (साहित्य) उतरून घेतलेले असे. चोखोबांच्या बाबतीत देखील हेच घडले आहे. त्या काळी बिंदाुधवाचार्य नावाचे मूळचे कन्नड भाषिक सद्गृहस्थ मंगळवेढा किंवा पंढरपूरच्या दरम्यान रहात होते. त्यांचा मुलगा अनंतभट्ट यांनी चोखोबांच्या साहित्याचे (अभंगांचे) लेखन केल्याचा जनाबाईच्या एका अभंगात उल्लेख आढळतो.
चोखोबांच्या मरणोत्तर 700-750 वर्षांनंतर देखील त्यांचे (358 च्या आसपास) अभंग आज ग्रंथरूपाने शिल्लक आहेत, हे मराठी वाचकांचे मोठे भाग्य समजावे. एवढया प्रदीर्घ काळात त्यांच्या सर्व अभंगांचे वारंवार लेखन झाले नसावे. ज्ञानदेवाच्या, नामदेवाच्या, तुकारामाच्या एकत्र साहित्याच्या अनेक हस्तलिखित प्रती आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु चोखोबांच्या अभंग रचनेच्या संदर्भात असे घडले नसावे, असे वाटते. म्हणून काळाच्या ओघात काही अभंग नष्ट देखील झाले असावेत. अनेक वेळा अभंग उतरून घेत असताना त्यात बदल देखील झाले असतील. (मला मिळालेल्या एका हस्तलिखितात-चोखामेळा हे नाव चोखामेला असे लिहिले आहे.) याच प्रक्रियेत काही अभंग नष्टही झाले असतील, तर काही भाष्यकारामुळे अधिक सुस्पष्टही झाले असतील.
चोखोबांचे अभंग उतरून घेणारे अनंतभट्ट यांच्या निष्ठेविषयी थोडी शंका घेतली जाते, ती म्हणजे चोखोबांना नेमके काय सांगावयाचे होते तेच अनंतभट्टांनी उतरून घेतले कशावरून? त्या अभंगात बदल केले नसावे कशावरून? वगैरे वगैरे. परंतु या संदर्भात दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या हीन जातीतील चोखोबांचे अभंग उतरून घेण्यासाठी उच्च जातीतील एक ब्राह्मण-अनंतभट्ट-चोखोबांच्याकडे जातो हे किती विचित्र होते! या कार्यासाठी त्यावेळच्या समाजांनी अनंतभट्टांना किती त्रास दिला असावा वा छळले असावे, ही कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अनंतभट्टांना वाळीत देखील टाकले असावे. हे सर्व सहन करून देखील अनंतभट्टांनी चोखोबांच्या अभंगांचे लेखन केले यात चोखोबांप्रमाणे अनंतभट्ट देखील मोठे वाटतात. चोखोबांच्या अभंगातील कस, निरूपण आणि आशय हे समाजाला उपयुक्त असल्याचे अनंतभट्टांनी त्यावेळी मनापासून जाणले असावे. म्हणूनच त्या काळात हे धाडस त्यांनी केले असावे. दुसरे असे की, त्यावेळी अनंतभट्टांसारखे साक्षर (त्यावेळी बहुसंख्य साक्षरवर्ग हा ब्राह्मणच होता) लोक हे लिहिण्यासाठी पुढे आले नसते तर आज चोखोबांचे अभंग वाचावयास मिळाले असते का? इतक्या शतकांनंतर देखील चोखोबांचे अभंग अमर झाले त्यात अनंतभट्टांचे देखील योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे.
प्रत्येक महापुरुषाने आपापल्या काळात महान काम केले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष झाले. त्यांच्या काळात जी आव्हाने होती, त्या आव्हानांना समर्थपणे सामोरे ते गेले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष ठरले. काही वेळा या महापुरुषांना, त्यांच्या कार्याला सध्याच्या काळात जोखले जाते व काही प्रमाणात प्रतिकूल मतही व्यक्त केले जाते, परंतु असे होऊ नये. कारण काळाच्या ओघात जशी परिस्थिती पलटते तसे समाजासमोरील आव्हाने देखील बदलतात. चोखोबांच्या बाबतीत असेच काहीसे झाल्यासारखे वाटते. चोखोबांच्या काळी आव्हान होते ते समाजातील उच्च-नीचतेचे, सामान्य जातीतील लोकांना उच्च कुळाचे समजणाऱ्यांकडून होणाऱ्या अमानुष छळाचे आणि मुख्य प्रश्न होता तो कमालीच्या दारिद्रयाचा. या सर्व प्रश्नांविषयी चोखोबांनी समर्थपणे जाब विचारून पाटला (आजच्या भाषेत सरकार) समोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. प्रसंगी विरोधही केला आहे, परंतु हे सर्व त्या काळातील रूढ परिस्थितीला धरून होते हे महत्त्वाचे. चोखोबा व त्यांच्या कुटुंबीयांचे हे कृत्य सातशे वर्षांनंतरच्या आजच्या कसोटीवर मोजले तर कदाचित ते अन्यायाचे ठरेल. नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई यासारख्या बहुजन समाजातील या संतांच्या समर्थ फळीत आपल्या कुटुंबासहित सामील होणे व अन्यायाविरुध्द लढा देणे ही चोखोबांची त्या काळातील अनन्यसाधारण कामगिरी होती, एवढेच म्हणावे लागेल.
देव बाटविला म्हणून चोखोबांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची स्वत: चोखोबा आपल्या अभंगातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. सोयरा व कर्मेळा यांनी देखील या संदर्भात केवळ खंतच व्यक्त केली नाही, तर भगवंतांना सणसणीत जाबही विचारला आहे. त्या काळातील सामाजिक स्थितीचे हे कुटुंब बळी होते, असेच म्हणावे लागेल. चोखोबा हीन यातीतील म्हणून तर छळ होत होताच, परंतु त्यांची विठ्ठलासोबत असलेली प्रेमपूर्ण मैत्री, अफाट प्रे व भक्ती ह्यामुळे छळाची तीव्रता अधिक होती. याचे दाखले आपणास अनेकांच्या अभंगातून अनेक वेळा मिळतात. विठ्ठल स्वत: चोखोबांच्या झोपडीत जाऊन दहिभात खाऊन आला. त्यावेळी चोख्याने देव बाटविला म्हणून मारले. एकदा तर मध्यरात्री विठ्ठलाने आपल्या दर्शनासाठी चोखोबांना आपल्या गाभाऱ्यात बोलाविले आणि आपल्या गळयातला कंठा दिला. त्यावेळी कंठा चोरल्याच्या आरोपावरून चोखोबांना बैलाच्या पायाला जुंपून छळले. असे अनेक प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात चोखोबांची काहीच चूक नव्हती. चूक होती ती फक्त विठ्ठलाच्या लेखी चोखोबांचे असलेले महत्त्व. हेच छळामागील मुख्य कारण असले पाहिजे.
आपल्या ज्ञानाचे सामर्थ्य सिध्द करीत चोखोबा संतमंडळीत वावरू लागले. हळूहळू मानाचे स्थान मिळवू लागले. याचीही पोटदुखी काही प्रस्थापित लोकांची वाढली असावी. ज्या ज्या वेळी या समूहाच्या संतापाचा उद्रेक झाला त्या त्या वेळी काही ना काही कारणे पुढे करून चोखोबांचा छळ (मनगटातील दंडुकेशाहीच्या आधारे) केला. प्रस्थापितांच्या विरुध्द बंड केल्याने अशीच वागणूक अनेकांना मिळाल्याचे दाखले या समाजात रग्गड सापडतात. प्रस्थापितांच्या विरोधात भागवत धर्माची पताका तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी फडकाविली आणि या झेंडयाखाली बंडाच्या भूमिकेत अनेक संत येऊन दाखल झाले. त्यात नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई आदी अनेक संत होते, परंतु चोखोबा देखील या बंडाच्या निशाणाखाली सरसावले होते, हे विशेष. कारण एक तर समाजाने मानलेल्या उच्च कुळात चोखोबांचा जन्म झाला नव्हता. कोणतीच शैक्षणिक वा आध्यात्मिक परंपरा चोखोबांच्या पाठीशी नव्हती. पाठीशी होती ती प्रस्थापितांचे प्रस्थ मोडून काढण्याची अदम्य इच्छा. त्यांच्या या सुप्त इच्छेला ज्ञानदेव व नामदेवांनी खतपाणी घातले, हे कौतुकाचे आहे. त्यांचा सहवास, प्रेरणा व आपुलकी निश्चितच चोखोबांना लाभली. आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात चोखोबा धाडसाने व जिद्दीने सामील झाले होते. हीन जातीत जन्मलेल्या चोखोबांना त्या काळात समाजाच्या विरोधात जाऊन भागवत धर्माच्या छताखाली आणण्याचे जे धाडस ज्ञानदेव, नामदेवांनी केले तितकेच धाडस समाजाचा कडवा विरोध पत्करून, माणुसकीला काळिमा लावणारे छळ सोसून देखील या संतांच्या कार्यात मनोभावे सामील झाले, हे चोखोबांचे सर्वात मोठे धाडसच होते. भागवत धर्माचा मोह चोखोबांना या कारणासाठी झाला असावा की त्यात समतेची शिकवण आहे. भगवंतापुढे उच्चनीच असा कोणताच भेदभाव नाही.
चोखोबांचे व्यक्तिमत्त्व हे अलौकिक स्वरूपाचे होते. प्रस्थापित समाजाने त्यांना कितीही छळले तरी उच्चवर्णीय समाजाविषयी त्यांच्या मनात कोठेही तिटकारा नव्हता. सूडाची भावना नव्हती. तशा प्रकारचा विचारही त्यांच्या वाणीतून कोठेही डोकावत नाही. क्षमा हा देवांच्या नंतर संतांचाही स्थायिभाव आहे. तेव्हा चोखोबा केवळ संत नव्हे, तर संतश्रेष्ठ होते. म्हणूनच क्षमा ही भावना त्यांच्या नसानसात संचारत असली पाहिजे. त्यांच्या या उदार अंत:करणाच्या हृदयातून उमललेली ही अभंगवाणी इतक्या वर्षांनंतर देखील आजही टवटवीत वाटते.
संतश्रेष्ठ यांना शोभेल अशी अविचल व शांत वृत्ती चोखोबांची होती. त्यामुळे समाजातील काही
वर्गाकडून होणाऱ्या छळाला अत्यंत शांत चित्ताने व सहनशीलतेने सामोरे गेल्यामुळे समकालीन संतांच्या लेखी चोखोबा उच्चपदस्थ झाले होते. त्यांच्याविषयीचा आदर हा वाढत होता. चोखोबांच्या चरित्रात असे दिसते की लोकांनी त्यांना ज्या ज्या वेळी छळण्याचा प्रकार केला त्या त्या वेळी चोखोबा सहिसलामत सुटले व त्यांनी छळणाऱ्यांनाच तोंडावर आणले. तेव्हा जनाबाई आपल्या एका अभंगात म्हणते की, चोखोबांनी देवालाच ऋणी करून घेतले.
चोखामेळे संत भला। तेणे देव भुलविला॥
भक्ती आहे ज्याची मोठी। त्याला पावतो संकटी॥
चोख्यामेळ्याची करणी। त्याने देव केला ऋणी॥

असेच उद्गार सोयराबाईचे देखील आहेत.
पंढरिचे ब्राह्मणें चोख्याशी छळिलें। तयालागीं केलें नवल देवें॥
सकळ समुदाव चोखियाचे घरीं।ऋद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती॥

परंतु चोखोबांची ही क्षमाशीलता काहींना पळपुटेपणाची वाटत असावी. त्या अन्यायाविरुध्द बंड पुकारण्यासच हवे होते, असेही मत व्यक्त केले जाते; परंतु चोखोबांना समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतो की काय, असे वाटते. कारण बारकाईने चोखोबांचे एक एक अभंग वाचून काढले तर अन्यायाविरुध्द त्यांची संस्कारित प्रतिक्रिया कोणत्याही बंडखोरी वृत्तीला मागे टाकणारी आहे. क्षमागुणातून कोणत्याही बलाढय ताकदीला सहज जिंकता येते ह्या समजुतीचीच चोखोबांची बंडखोरीची वृत्ती होती.
कै. शंकरराव खरात यांच्या एका पुस्तकाचे नाव 'चोखोबांचा विद्रोह' असे आहे. यातील चोखोबांची बंडखोरी आणि चोखोबांचा धर्मशास्त्राशी विद्रोह ही दोन प्रकरणे महत्त्वाची वाटतात. 'संत चोखामेळा आणि मी' या दलित नाटककार भि. शि. शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथात चोखोबांचा विद्रोह कालसापेक्ष दृष्टिकोनातून जाणून घ्यायला हवा, त्यावेळचे त्यांचे कार्य आजच्या काळाच्या निकषावर तपासायला नको, असे म्हटले आहे.
''आधुनिक काळात क्रांती शब्दाचा अर्थ इतका कडवा बनला आहे आणि त्यात हर्षविषादांची एवढी कडवट खेचाखेच असावी लागते की, महाराष्ट्रीय संतांनी तेव्हाच्या समाजात परमार्थ पीठावरून ही एक क्रांती केली असे म्हटले, तर केवळ आधुनिक पध्दतीने विचार करणाऱ्यांना ते खरे वाटत नाही आणि विशेष म्हणजे त्यात काही गोडी वाटत नाही. आपल्या उच्च शिक्षणात ऐतिहासिक रसिकता या नावाचा विषय स्वतंत्रपणे शिकवावयास हवा असे वाटते. आपल्याला आपल्या काळाच्या संबंधाने जेवढी रसिकता दाखविता येते, तेवढी ऐतिहासिक काळासंबंधाने दाखविता येत नाही, ही मोठी दु:खाची गोष्ट आहे.''
चोखोबा, सोयराबाई आणि कर्मेळा यांच्या अभंग वाड्.मयावरून श्री. म. माटे म्हणतात, ''इतक्या पूर्वीच्या अस्पृश्य पुढाऱ्यांनी सुध्दा अस्पृश्यतेविरुध्द केवढी तक्रार केलेली होती, याचा उत्तम बोध होतो. या तक्रारीत केवळ पारमार्थिक दु:ख होते असे समजणे अगदी साफ चूक आहे. या संतांच्या मनाचे हे दुखणे अगदी स्पष्टपणे सामाजिक होते; आणि त्यामुळे भक्तिरसात डुंबत असताना सुध्दा त्यांच्या मनाचे समाधान समूळ नष्ट झालेले होते. कर्ममेळयाने केलेली तक्रार तर उघड उघड सामाजिक आहे; आणि त्याने दाखविलेल्या तुसडेपणाच्या भावनेला सामाजिक धार उत्पन्न झालेली आहे. देवापुढे वागत असतानासुध्दा तुझा मला काय उपयोग आहे, असे तो बिनमुर्वतीने म्हणतो. सध्याच्या काळातील त्या समाजातील सर्वश्रेष्ठ पुढारी डॉ. आंबेडकर हे राष्ट्राच्या संगतीत नांदत असतानाच आणि हिंदू धर्माच्या पोटीच जन्माला आलेले असताना तुमचा आम्हाला काय उपयोग आहे? असे त्वेषाने विचारीत असत. विचारण्याची भूमिका बदललेली आहे इतकेच, परंतु सामाजिक दु:ख आणि सामाजिक त्वेष तोच आहे. याचा अर्थ असा की, कर्ममेळा आणि आंबेडकर यांच्या भावना एकमेकाशी सुसंगत आहेत. आज जी तक्रार अस्पृश्य लोक करीत आहेत तीच सामाजिक तक्रार सातशे वर्षांपूर्वीचे महार पुढारी करीत होते, हे अनंतभट्टाने लिहून ठेवलेल्या वाड़्.मयावरून स्पष्ट दिसते. हे वेड त्यांच्या डोक्यात कोणी आधुनिकांनी शिरकविलेले नाही.''
''चोखामेळयाने सात्त्विक संतापाने विचारलेले प्रश्न त्यांच्यानंतरच्या पिढीतल्या कर्ममेळयाने उघड उघड मराठी समाजाला आव्हान देऊन अधिक स्पष्ट केले. ह्या सर्वच कुटुंबीयांनी शोषित वर्गाची नवी आविष्कारशैली मराठी कवितेच्या सुरुवातीलाच अमोघ करून ठेवली. प्रत्यक्ष विठ्ठलाला लाज वाटेल असे प्रश्न विचारून ठेवले. त्यामुळे चोखामेळयाच्या कुटुंबीयांचे मराठी परंपरेत अढळ स्थान आहे. कारण ह्या सर्वांनी निष्कपट मनाने एका अवाढव्य परंपरेला उगमस्थानीच धोक्याचे इशारे देऊन ठेवले. 'पंचहि भूतांचा एकचि विटाळ' म्हणून घटापटाची चर्चा करणाऱ्यांची तोंडे बंद करून टाकली. ह्या सर्व विद्रोही गोष्टी त्यांनी साहित्यिक चर्चा म्हणून केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष स्वत:च्या जगण्यातून विकसित केल्या आणि मग कवितेत मांडल्या.''
जातीभेद, वर्णभेद समूळ खणून काढण्यासाठी संतांनी शतकोटीचे प्रयत्न केले. ज्ञानोबा, नामदेवापासून ते तुकारामापर्यंत अगदी अलीकडच्या काळात गाडगेबुवा, महात्मा जोतिराव फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी देखील पराकोटीचे प्रयत्न केले. तरीही हा रोग बरा होताना दिसत नाही. उलट आजच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार करता नव्या रूपात जातीभेदाची आवश्यकता आहे की काय, असे वाटू लागले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चोखामेळा यांच्याविषयी अत्यंत आदराचे उद्गार काढले आहेत. त्यांनी आपले The untouchables नावाचे इंग्रजीतील एक पुस्तक चोखामेळा, नंदनार व रविदास यांना अर्पण करून त्यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त केला आहे. त्यात ते लिहितात- ''चोखामेळा, नंदनार व रविदास हे अस्पृश्य समाजात जन्मले. आपल्या निष्ठायुक्त कृत्य, संयमी व न्यायी वृत्ती यामुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले. त्या तीन संतांच्या स्मृतीस अर्पण.'' 1936 साली, हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्यासाठी अस्पृश्यांची परिषद बोलावली होती. त्या परिषदेत भाषण करताना आंबेडकर श्रोत्यांना म्हणाले - If someone asks you - what your caste is, you say that you are a Chokhamela or Harijan; but you do not say you are a Mahar.
मराठीत असे म्हणता येईल की, तुम्हाला कोणी तुची जात विचारली तर महार म्हणून सांगू नका तर चोखामेळा किंवा हरिजन म्हणून सांगा; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आणि भागवत धर्म, हिंदू धर्मात विश्वास ठेवून असणाऱ्या चोखोबांना अनुयायांचा मोठा वर्ग मिळाला नाही. म्हणून चोखोबा जिवंत असताना त्यावेळच्या समाजाने त्यांना उपेक्षिले आणि आज मेहुणपुरा येथील त्यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, पंढरपुरातील वास्तव्याचे त्यांचे एकमेव निशाण ती उद्ध्वस्त झालेली दीपमाळा, मंगळवेढा व पंढरपुरातील त्यांच्या समाध्या पाहिल्या तर दुर्लक्षितच आहेत हे निश्चित. ही खंत व्यक्त करीत असताना भालचंद्र नोडे म्हणतात, ''बिचारा चोखा यातिहीन म्हणून त्यांची वारकऱ्यांना पर्वा नाही आणि भरभराटलेल्या दलित चळवळीने तर विठ्ठलभक्त चोख्याला प्रतिगामी ठरविले. असा एकूण हा भला संत मराठी परंपरेपासून तेव्हाही व आताही दूरच राहिला. शेवटी संतांनाही जातीचे पाठबळ लाभलेले दिसते, परंतु केवळ स्वत:च्या आविष्कार सामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत राहिलेला चोखा हा एकमेव मराठी कवी ठरतो, हाही एक नवा वारसा ह्यापुढील साहित्यप्रेमिकांना सांभाळावा लागेल. चोखामेळा सतत स्फूर्तिदायक वाटत राहील, असे वाटते.''
- प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी (मोबाइल क्र. 9960125015)

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

बच्चन साब, फिल्म इंडस्ट्रीत 'आरक्षण' नाही???



सध्या 'आरक्षण' या चित्रपटाच्या संदर्भात उलटसुलट चर्चेला ऊत आलाय. येत्या 12 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं या चर्चेचा चित्रपटाला प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी चांगलाच फायदा होत आहे. त्याच वेळी या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रकाश झा हे आपल्या टीमसह देशभरात दौरे सुद्धा करत आहेत. चित्रपट आरक्षणाच्या धोरणाविरोधात असल्यास त्याला विरोध करण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. आरक्षण समर्थक नेत्यांनी रितसर प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आधी दाखविण्याची मागणीही केली. दरम्यानच्या काळात केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. पुनिया यांनी, या चित्रपटात देशातील मागासवर्गीय जनतेसाठी उपयुक्त असलेल्या आरक्षणासारख्या घटनात्मक तरतुदीबाबत नेमके कोणते भाष्य करण्यात आलेले आहे, ते तपासण्यासाठी केंद्रीय चित्रपट परीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्ड) समन्सही बजावले.
या पार्श्वभूमीवर काल (रविवारी) विविध महत्त्वपूर्ण राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर 'आरक्षण' या विषयावर चर्चा झाली नसती, तरच नवल! यापैकी एका चॅनेलवर चर्चेमध्ये प्रकाश झा यांच्यासह अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, मनोज वाजपेयी आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. पुनिया हे सुद्धा सहभागी झाले होते.
आता चित्रपट मी सुद्धा पाहिला नसल्यामुळं आरक्षणासंदर्भात त्यात नेमकी काय भूमिका घेतली आहे, याविषयी काही भाष्य करणं चुकीचं ठरेल.
तथापि, यावेळी झा यांनी, सेन्सॉर बोर्ड ही सुद्धा सरकारी संस्था आहे आणि त्यामध्ये सर्व जाती-धर्मांचे लोक असतात, त्यांना काही खटकलं नाही, तेव्हा विविध नेत्यांनी किंवा आयोगानं पुन्हा त्याच्या स्पेशल स्क्रीनिंगची मागणी करणं चुकीची आहे, अशी भूमिका मांडली. त्यावर पुनिया यांनी त्यांना चांगलं उत्तर दिलं, 'अनुसूचित जाती-जमाती आयोग हा घटनात्मकरित्या आस्तित्वात आलेला आहे. देशातल्या आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाजाच्या हिताचं रक्षण करणं, ही जबाबदारी आयोगावर आहे. 'आरक्षण' चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादांमुळं संवेदनशील वातावरण निर्माण होऊ नये, सामाजिक अस्थैर्य निर्माण होऊ नये, यासाठी आयोगावर असलेल्या जबाबदारीच्या जाणीवेतून आणि अधिकारातून मी सेन्सॉर बोर्ड या शासकीय संस्थेकडे या चित्रपटाच्या स्क्रिनिंगची मागणी केली. पहिल्या नोटीसला उत्तर न आल्यानं त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं.' यावेळी झा यांनी स्वतः पुनिया यांना प्रदर्शनापूर्वी चित्रपट दाखविण्याची तयारी दर्शविली; पण 'याठिकाणी व्यक्ती गौण आहे, ती प्रकाश झा आहे किंवा अन्य कोणी, या गोष्टीशी आपल्याला काहीही देणंघेणं नसून सेन्सॉर बोर्डाकडूनच स्पष्टीकरण मागविण्याचा आपल्याला अधिकार असून आपण आपल्या कार्यकक्षेच्या मर्यादा कधीही ओलांडणार नाही, तसंच देशातल्या जनतेच्या घटनात्मक हक्कांची पायमल्लीही होऊ देणार नाही,' असंही पुनिया यांनी स्पष्टपणे सांगितलं.
हा झाला पहिला भाग! पुढचा भाग इंटरेस्टींग आहे. यापूर्वीही ठिकठिकाणी सांगितलेल्या गोष्टी अमिताभ बच्चन यांनी इथंही सांगितल्या. 'या देशात दोन भारत आहेत, आणि त्यांच्यातील दरी सांधणं गरजेची आहे. त्यासाठी वंचित समाजाला बरोबरीला येण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली पाहिजे,' अशी भूमिका स्पष्ट केली. एकदम मान्य! त्याचबरोबर आपण या देशाचे जबाबदार नागरिक असून कधीही भेदभाव केलेला नाही, आमच्या वेळी असं वातावरण नव्हतं आणि फिल्म इंडस्ट्रीत आरक्षण अजिबात नाही, इथं फक्त टॅलंट आहे इत्यादी इत्यादी गोष्टीही सांगितल्या.
बच्चन यांनी आरक्षणाच्या संदर्भात मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे. तरी सुद्धा याठिकाणी त्यांना काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आपण भेदभाव केला नाहीत, ही आपल्या बाबूजींची कृपा आहे आणि आजही आपण अत्यंत 'डाऊन टू अर्थ' आहात, कामाप्रती लॉयल आहात, अजूनही आपण हार्ड वर्क करता, हे सुद्धा बाबूजींचेच संस्कार आहेत आणि त्यासाठी आम्ही नेहमीच आपल्याविषयी आदर बाळगून आहोत. मात्र अमितजी, आपण ज्यावेळी शाळा-कॉलेजमध्ये असाल, त्यावेळी दलित, आदिवासी, समाजातल्या मुलांना शाळेत जाण्याची पहिली संधी मिळाली होती. साहजिकच त्यांची संख्या कमी होती. जिथं शिक्षणाचे मूलभूत धडेच गिरवण्याची मारामार होती, तिथं स्पर्धेची जाणीव ती काय असणार? आणि स्पर्धेत उतरणार तरी कसा? साहजिकच आपला काळ खरोखरीच वेगळा होता. आज खुल्या वर्गात जितकी स्पर्धा आणि गुणवत्ता आहे, तितकीच स्पर्धा आणि गुणवत्ता मागासवर्गीय विद्यार्थ्यांत सुद्धा आहे. या स्पर्धेत ते चमकत सुद्धा आहेत. आणि तरी सुद्धा अद्यापही शिक्षणाच्या परीघापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी, मागासवर्गीय मुलांची संख्याही प्रचंड आहे. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. आणि त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. (आरक्षण हा एक भाग असला तरी या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधांची उपलब्धता करणं, त्यातही त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा रोजच्या रोजीरोटीचा अधिक मूलभूत प्रश्न सोडवणं, त्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देणं, हा सुद्धा आपल्या यंत्रणेसमोरचा एक गंभीर प्रश्न आहे.)
फिल्म इंडस्ट्रीत आरक्षण नाही, इथं टॅलंटच लागतं, असं अमिताभ छातीठोकपणे सांगत आहेत. पण हे त्यांचं म्हणणं अर्धसत्य स्वरुपाचं आहे. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, की फिल्म इंडस्ट्रीत आरक्षण आहे, पण ते निगेटीव्ह स्वरुपाचं! आज चित्रपटाच्या ग्लॅमरला भुलून किंवा सिरिअसली याच क्षेत्रात करिअर करायचं म्हणून हजारो तरुण या मायानगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी दररोज दाखल होत असतात. यातले काही एफटीआयआय, एनएसडी यांसह विविध फिल्म इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले असतात. पण त्यांना कितीही टॅलंट असलं तरी संधी का मिळत नाही? अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या 'क्ष' व्यक्तीला पदार्पणातच जे.पी. दत्तासारख्या मान्यवर दिग्दर्शकाकडं 'रेफ्युजी' करण्याची संधी मिळत नाही, ती मिळते अभिषेक बच्चनला! तो आपटल्यानंतरही पुढच्या कित्येक चित्रपटांत अभिषेकला संधी मिळत राहते, एकामागोमाग फ्लॉप होत जात असताना सुद्धा! अभिषेकखेरीज अगदी सलमान, आमीरपासून ते आजच्या सोनम कपूर, सोनाक्षी ते इम्रान खान पर्यंत कितीतरी नावं ओळीनं देता येऊ शकतील. ही प्रचंड यादी मी इथं देत बसत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की, स्टार पुत्र -पुत्रींना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहजगत्या उपलब्ध होणारी संधी, हे एक प्रकारचं आरक्षणच नव्हे काय? टॅलंट सिद्ध होईपर्यंत त्यांना सातत्यानं संधी मिळत राहते आणि खरं टॅलंट मात्र स्टुडिओच्या आणि प्रॉडक्शन हाऊसेसच्या पायऱ्या झिजवत राहतं. त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या नशीबानं तो चित्रपट हिट झाला तर ठीक, नाही तर त्यांना 'हिट' करून कायमचा बाहेरचा रस्ता दाखवला जातो. इंडस्ट्रीतल्या या संकुचित आरक्षणाचा आणि लॉबिंगचा फटका इतका तीव्र आहे, की कित्येक आयुष्यं इथं बरबाद झाली आहेत, होत आहेत- टॅलंट असून सुद्धा!
फिल्म इंडस्ट्रीमध्ये आरक्षण नसण्याचं दुसरं कारण म्हणजे इथं पाण्यापेक्षाही अधिक खळखळाट करत वाहणारा पैसा! माणसाकडं आर्थिक संपन्नता, अति सधनता आली की, साहजिकच कोणत्याही गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टीकोन 'पैसा फेंक, तमाशा देख', असा तयार होतो. पैसा असला की साऱ्याच गोष्टी कशा सोप्या होऊन जातात. कोणी नादाला लागत नाही. 'ये सब बडे लोगों के मिजाज है।' असं म्हणून सामान्य माणूसही त्याकडं दुर्लक्ष करतो. इंडस्ट्रीतली एक गोष्ट मात्र चांगली आहे, ती म्हणजे इथं पैसा हा एकच धर्म चालत असल्यानं जाती-धर्मांच्या अन्य भिंती तिथं रिलेशनशीपमध्ये आडव्या येत नाहीत. आज देशातल्या प्रत्येक माणसाकडं फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांसारखा कोट्यवधीनं नसला तरी, त्याचा गुजारा होण्याइतका योग्य प्रमाणात जरी पैसा असता, तर त्यालाही आरक्षणाची गरज भासली नसती. पण पैसा खर्चायला सुद्धा व्यावहारिक शहाणपण असण्याची आवश्यकता असते आणि ते केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच विकसित होऊ शकतं. नाही तर या पैशांची अवस्था 'माकडाच्या हाती कोलीत', अशी होऊन जाईल. त्यामुळं पुन्हा फिरुन चक्र तिथंच येतं- या मुख्य प्रवाहाबाहेरच्या कोट्यवधी वंचितांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देऊन शिक्षणाच्या माध्यमातूनच त्यांचं सामाजिक, आर्थिक उत्थान, प्रगती साधणं शक्य आहे. त्यासाठी आरक्षणाखेरीज अन्य प्रभावी पर्याय आज तरी दृष्टीपथात नाही. डझ एनी बडी हॅव्ह इट..मि. बच्चन?

गुरुवार, ७ जुलै, २०११

माझ्या मना, बन दगड..!

'दै. सकाळ'मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत असताना 15 एप्रिल 2005 रोजी निपाणी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेचा प्रकार झाला होता. यानंतर शहरात आणि परिसरात प्रचंड असं तणावाचं वातावरण पसरलं. सहिष्णु स्वभावाच्या निपाणीमध्ये असा प्रकार होणं, ही माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक गोष्ट होती. शहरात फिरताना ठिकठिकाणी विखुरलेल्या काचा, काठ्या, फोडलेल्या बस, वाहनं, दुकानं- सारा अनुभवच अतिशय वेदनादायी होता. आज निपाणी पूर्वपदावर आहे, पण कुठे ना कुठे तरी असे मूर्तीभंजनाचे प्रकार घडतच असतात. या पार्श्वभूमीवर मी लिहिलेला लेख हा आजही कालसुसंगत वाटतो. म्हणून खास आपणा सर्व मित्रांसोबत शेअर करीत आहे.
(प्रतिकात्मक छायाचित्र)

15 एप्रिल, 2005. डॉ. आंबेडकर जयंतीचा दुसरा दिवस. देशभर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली गेली असतानाच निपाणीतील आंबेडकरांच्या पुतळयास कोण्या एका समाजकंटकाने चपलांचा हार घातला. त्याची शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. जुना पुणे बंगळूर महामार्ग आणि मुख्य व्यापारीपेठ याभोवती वसलेल्या या शहरातील मुख्य मार्गावर दगडफेक होऊन नासधूस झाली नाही, असे एकही दुकान, खोका किंवा बूथ उरला नाही. रस्त्यावरील खासगी तसेच सार्वजनिक मालकीची वाहनेही यातून सुटली नाहीत. काही घरांवरही प्रक्षुब्ध जमावाने हल्ला केला. नेहमीच शांत आणि संयमी असणाऱ्या निपाणीवासियांचा रागाचा बांध या घटनेने फुटला होता. विशेषतः दलित समाज आपल्या नेत्याच्या पुतळयाच्या विटंबनेने संयम हरवून बसला होता. कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस यंत्रणेलाही केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलिकडे काहीही करता आले नाही. दलित समाजाच्या या संतप्त भूमिकेचा फटका अनेक निष्पाप आणि विटंबनेच्या घटनेशी कोणताही संबंध नसणाऱ्या असंख्य गोरगरीब सामान्य व्यक्तींसह व्यापाऱ्यांनाही बसला. आपल्या मिळकतीचे होत असलेले नुकसान पाहून त्यांच्या भावनाही तीव्र न होत्या तरच नवल. साहजिकच सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या निपाणीत दलितांविरुध्द सवर्णांची एकी होऊ लागली आणि दलित वस्तीवर चालून जाण्याचा विचारही सामोरा आला. त्या विचाराच्या अंमलबजावणीच्या दिशेने त्यांची पावले वळू लागली; मात्र तोपर्यंत सावरलेल्या पोलिस प्रशासनाने आपली कुमक आणि बंदोबस्त वाढवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले आणि पुढचा- विचारही करता येणार नाही असा- गंभीर प्रसंग टळला. अन्यथा या घटनेला किती टोकाचे वळण लागले असते, याचा अंदाजही करता येत नाही. निपाणीतील जनजीवन दोन दिवसांत पूर्वपदावर आले; मात्र एक निपाणीकर या नात्याने या घटनेचे खोल पडसाद माझ्या ङ्कनावर उमटत राहिले.
पुतळा विटंबनेच्या या घटना घडतातच का ? अलिकडे त्यांचे प्रमाण का वाढू लागलेय ? समाजमन एखाद्या थोर व्यक्तीविरोधात किंवा आपल्याच बरोबरीने राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीविरोधात कलुषित का होऊ लागलेय ? समाजाची मानसिकता अशी हिंसक का होऊ पाहतेय ? या आणि अशा अनेक प्रश्नांची मालिका मनात उभी राहिली आणि त्यांची उत्तरे शोधण्याची प्रक्रियाही.
असे म्हटले जाते की थोर महापुरुषांचे मृत्यू दोनदा होतात. पहिले म्हणजे त्यांचे भौतिक अस्तित्व काळाच्या पडद्याआड जाते. दुसरे मरण म्हणजे त्यांच्या विचारांची त्यांच्याच अनुयायांकडून होणारी कत्तल. याला जोडून आता असे म्हणावेसे वाटते की, पुतळयांच्या रुपातील अस्तित्वही काही लोकांना आता नकोसे झाले आहे. त्यामुळे ते नष्ट करून तरी त्या व्यक्तीच्या स्मृती नाहीशा करता येतात का, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असावेत. असा विचार करणारे समाजकंटकच परिस्थितीचा फायदा घेत असतात. विटंबना करणारा कधीच चित्रात नसतो; मात्र दंगल घडविण्याचा त्याचा हेतू 101 टक्के यशस्वी झालेला असतो. सर्व काही करून सवरून तो मजा पाहात असतो. अशा समाजकंटकाला कुठली आलीय जात आणि धर्म ? समाजविघातक कृत्ये करणे हाच त्याचा धर्म आणि जातीजातीतील तेढ बळकट करणारी परिस्थिती निर्माण करणारी त्याची जात. विटंबनेनंतर उसळणाऱ्या दंगलीत सर्वच समाजघटक तितक्याच तीव्रतेने भरडले जातात; कोणीही त्यातून सुटत नाही. पण ही बाब लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते; होऊ नये ते झालेले असते. सामाजिक दरी सांधण्याच्या घटनाकारांच्या हेतूला सुरूंग लागलेला असतो आणि ही आग धुमसत राहते- नवी संधी मिळेपर्यंत. समाजमनावर झालेल्या या जखमा सहजी भरून निघणे शक्य नसते. पण लक्षात घेणार कोण ?
मुळात अशा घटना घडण्यास कारणीभूत आहे ती आपली मानसिकता. भारतीय समाज किंवा एकूणच मानवजात ही प्रतिमा आणि प्रतिकांच्या प्रेमात गुरफटलेली आहे. आपली अस्मिता ही विचारांपेक्षा अशा प्रतिमांपाशी अधिक भावनिकतेने गुंतलेली दिसते. त्यामुळेच जागोजागी मंदिरे, पुतळे उभारुन त्या व्यक्तींविषयी आदर प्रकट केला जातो, उदात्तीकरण केले जाते. अशा पुतळयांचा योग्य सन्मान राखला जातो का, हा आणखी एक वेगळाच विषय होऊ शकेल. मात्र या मानसिकतेमुळेच त्याचा राजकीय आणि धार्मिक लाभ घेणाऱ्यांचे फावते. जागोजागी उभारलेले पुतळे ही तर स्फोटके आहेत. त्यातही डॉ. आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे पुतळे म्हणजे तर अणूबाँब आणि हायड्रोजन बाँब. मनुवाद बोकाळलेल्या या देशात राज्यघटनेद्वारे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम लोकशाहीची प्रस्थापना करून 'आधुनिक मनू' बनलेले डॉ. आंबेडकर आणि धर्मनिरपेक्ष हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे, आपल्या मुस्लीम शिलेदारांवरही जिवापाड प्रेम करणारे दिलदार शिवाजी महाराज यांच्या पुतळयांच्या विटंबनेवरुन दंगलींचे स्वरुप निश्चित होऊ लागले आहे, याला काय म्हणावे ? 'दलित-सवर्ण दंगल हवीय ?', करा आंबेडकर पुतळयाची विटंबना. 'की हिंदू-मुस्लीम दंगल हवीय ?'- शिवपुतळे आहेतच की. इतक्या सहजपणे समाजकंटकांचे फावतेय.
डॉ. आंबेडकर यांच्याच बाबतीत केवळ विचार करायचा झाला तर या देशातील सवर्णांनीच नव्हे तर बहुजन समाजानेही त्यांना कधीही राष्ट्रीय नेता किंवा आपला नेता म्हणून स्विकारले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ते हयात होते तेव्हाही त्यांची अवहेलना झाली आणि आज मृत्यूनंतर 50 वर्षांनीही त्यांच्या प्रतिमेची विटंबना चालविली आहे. सवर्ण तरुणांचा आंबेडकरांवर रोष आहे तो त्यांनी घटनेत केलेल्या आरक्षणाच्या तरतुदींमुळे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण वर्गाच्या टीकेचे लक्ष्य ठरतेय ती आरक्षण निती. 'दलित लोक सरकारचे जावई झालेत. पायरी सोडून वागताहेत, शिरजोर झालेत. तेव्हा त्यांची आरक्षणे रद्द करा. घटना बदला.' अशी ओरड सार्वत्रिक झाली आहे. मात्र युगानुयुगे गुलामगिरीत पिचलेल्या मागासवर्गीयांना आरक्षण मिळून आज केवळ 50 वर्षे होताहेत. त्यातही आरक्षणाची खरी अंमलबजावणी 1970 नंतरच्याच कालखंडात झाली. या कालावधीतच मागासवर्गीयांतील काहींनी शिक्षण घेऊन प्रगती साधली. मात्र अशी प्रगती साधणाऱ्यांच्या तुलनेत आजही गरीबीत असणारा मागासवर्ग मोठया प्रमाणात आहे. त्याला अजूनही आरक्षणाची गरज आहे, ही बाब हेतूतः नजरअंदाज केली जाते.
डॉ. आंबेडकरांविरुध्द केवळ सवर्णांतच खदखद आहे असे नाही तर मागासवर्गीय लोकही त्यांना आपलं मानत नाहीत. ज्या आंबेडकरांनी केवळ एस. सी., एस. टी. यांनाच नव्हे तर ओबीसींबरोबरच सर्व जातींतील स्त्रियांना आरक्षण मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; त्या जाती त्यांचे हे कार्य जाणतात, पण त्यांना मानत नाहीत. दलित समाजातीलच या जातीजातींतील दुहीचा राजकारणात किती पध्दतशीरपणे फायदा घेतला जातोय, हे इथे वेगळे सांगण्याची गरज नाही. आंबेडकरांसारख्या महान नेत्यालाही जातीच्या राजकारणात संकुचित करून टाकले आहे, ही खेदाची बाब आहे.
डॉ. आंबेडकरांचे अनुयायी म्हणून ज्या समाजाने निपाणीत दंगा केला; त्यांनीही आपण खरोखरीच आंबेडकरांचे अनुयायी म्हणावयाच्या पात्रतेचे आहोत का, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण डॉ. आंबेडकरांनी कधीही अहिंसेची कास सोडली नाही. महाडचा चौदार तळयाचा सत्याग्रह असो की नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह- दलितांना समानतेची वागणूक मिळविण्याच्या दिशेने मूलभूत म्हणावे, असे हे दोन लढे डॉ. आंबेडकरांनी अत्यंत संयमाने आणि सनदशीर मार्गांनी हाताळले. मात्र त्याच आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे एवढया मोठया प्रमाणात नुकसान करणारेही समाजकंटकच नव्हेत काय ? आपल्याच समाजातील एखाद्या गरीबाने टाकलेला खोका, टपरी, दुकान किंवा बूथ असेल अथवा बँकेचे कर्ज काढून घेतलेली रिक्षा असेल, ती उध्वस्त करताना आपल्या मनाला यातना होत नाहीत का ? की केवळ विध्वंसासाठी विध्वंस करायचा ? यातून नुकसान आपलेच आहे हे ध्यानात कसे येत नाही ? संपूर्ण हयातभर मूर्तीभंजक म्हणून वावरलेले डॉ. आंबेडकर आज असते तर त्यांनी स्वतःच आपले पुतळे हातोडयाचे घाव घालून फोडले असते. कारण प्रतिमांशी निष्ठा बाळगणारे अनुयायी त्यांना कधीच अभिप्रेत नव्हते तर विचारांशी निष्ठा आणि समाजोन्नतीसाठी प्रामाणिक कृतिशीलता त्यांना अभिप्रेत होती. पण आपल्याला विचारांशी काय देवाणघेवाण ? विचारांशी देणेघेणे असते तर डॉ. आंबेडकरांच्या पुतळयाचे दुग्धाभिषेकाने शुध्दीकरण करण्याचा हास्यास्पद प्रकारही होऊ देण्यात आला नसता.
'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या डॉ. आंबेडकरांनी व्यापक अर्थाने दिलेल्या संदेशाचा त्यांच्या अनुयायांनी अत्यंत संकुचित अर्थ घेतला आहे, असे खेदाने म्हणावे लागते. सवर्णांनी शिक्षणाच्या जोरावर शतकानुशतके आपले वर्चस्व अबाधित ठेवले तर तळागाळातील समाजाला त्या शिक्षणापासून वंचित ठेवूनच गुलामगिरीच्या जोखडात अडकविले, ही बाब डॉ. आंबेडकरांच्या लक्षात आली होती. त्यामुळे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हेही त्यांना कळून चुकले होते. म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ते शिकले. इतके उच्चविद्याविभूषित झाले की त्यांच्या तोडीचे शिक्षण घेणारा माणूस आजही या देशात नाही. केवळ शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान त्यांना अपेक्षित नव्हते तर शिक्षणामुळे येणारी विचारक्षमता, चिंतनशीलता, स्वाभिमान आणि त्यातून निर्माण होणारा आत्मोन्नती आणि समाजोन्नतीचा विचार अभिप्रेत होता. 'संघटित व्हा आणि संघर्ष करा' याचा अर्थही गटबाजी किंवा हिंसा असा खचितच नव्हता. 1929मध्ये नाशिक जिल्ह्यातील चितेगाव येथील एका परिषदेतील त्यांच्या भाषणात याचे स्पष्टीकरण आढळते. ते म्हणाले होते की, 'मनुष्याचा स्वाभिमान टिकवून धरणारी शिक्षण ही एकमेव गोष्ट नाही. शिक्षणाने जर माणुसकी मिळती तर सुशिक्षित आणि अधिकारी यांच्याकडून आमच्यावर अन्याय झाला नसता. माणुसकीसाठी निकराचा लढा करा. आपल्या ध्येयातील व मार्गातील अडथळे स्वतःच दूर करून आपल्यावरील कलंक तुम्ही स्वतःच धुवून दूर करा.' या आवाहनातच संघटन आणि संघर्ष या संज्ञांचा अर्थ स्पष्ट होतो. पण त्यादृष्टीने विचार करण्याची क्षमताच आज समाज हरवत चालला आहे. कारण त्यासाठी विचारांचा अभ्यास करावा लागेल आणि ती तयारी समाजात दिसत नाही- दलितांतही, सवर्णांतही आणि बहुजन समाजातही. परिणामी भावनांच्या उद्रेकाची परिणती संपूर्ण समाजाचेच आर्थिक नुकसान होण्यात होते. यातून होणाऱ्या आर्थिक हानीपेक्षा होणारी सामाजिक हानी चिंताजनक आहे.
भारतीय समाजातील दरी सांधण्याचा प्रयत्न घटनाकार डॉ. आंबेडकरांनी केला आहे; पण सध्या एक 'दोरखंडाचा पूल' असेच त्याचे स्वरुप आहे. तो तोडण्यास सुरूंगाची नव्हे, केवळ एका दगडाचीच गरज असते. असे दगड वारंवार बरसू लागले तर, तिथे पक्का पूल कधीच बांधता येणार नाही आणि ही दरी रुंदावत जाण्याचाच धोका अधिक आहे. प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतर 55व्या वर्षानंतरही दलित आणि सवर्ण या शब्दांचा वापर करीत लेख लिहावा लागणे, हे त्याचेच द्योतक नव्हे काय?

बुधवार, २९ जून, २०११

`महालक्ष्मी`ची लूट!

गेल्या सोमवारी (दि. 26 जून) सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसनं मी कोल्हापूरहून कल्याणला आलो. मध्यंतरी या रेल्वेवर दरोडा पडण्याच्या, लुटीच्या घटना घडलेल्या. पण या रात्री मी प्रवास करत असलेल्या रेल्वेमध्ये आणि माझ्या बोगीमध्ये मोठ्या प्रमाणात लूट झाल्याची घटना घडली. त्याची ही कथा!
झालं असं की, माझी आठवड्याची रजा संपवून मी रविवारी रात्री `महालक्ष्मी`ला बसलो. एकटा असलो की मी नेहमी अप्पर बर्थ बुक करतो. एकदा वर `ढगात` गेलं की निवांत. सॅक उशाला घेतली आणि दुसऱ्या दिवशी कल्याणला पोहोचण्याच्या टायमिंगच्या आधी पंधरा मिनिटांचा गजर मोबाईलवर सेट केला की झोपायला चिक्कार वेळ! मग मस्त गाणी ऐकत किंवा `इंटरेस्टींग` (सहप्रवाशी किंवा त्यांच्या गप्पा) असतील तर त्यांच्या गप्पा ऐकत आरामात झोपी जायचं, असा माझा रेल्वेतला `रात्रक्रम` असतो. त्या दिवशीही मी असाच ढगात गेलो होतो. लोअर बर्थवरचे सहप्रवासी `इंटरेस्टींग` होते, पण दिसत नव्हते. शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेज तरुणांचा ग्रुप होता. त्यातल्या एकानं नवा मोबाईल घेतला होता. त्याचं गुणगान सुरू होतं. जयसिंगपूरमध्ये गाडीत चढलेल्या विक्रेत्याकडून घरगुती बिर्याणीच्या जवळजवळ पंधरा प्लेट (आठ जणांत) संपण्याच्या मार्गावर होत्या. त्या वासानं पुन्हा एकदा जेवण्याची इच्छा उफाळून आली, बट आय कंट्रोल्ड! कारण एकदा घरातून जेऊन निघालो होतो. असो!
मिरजला साइड बर्थवर आणखी एका `इंटरेस्टींग` चेहऱ्याचा प्रवेश झाला. मी कूस बदलून गाणी ऐकत आणि समोरचं `चित्र` पाहात झोपेची `आराधना` करू लागलो. तिचं एकीकडं लॅपटॉपवर काम आणि दुसरीकडं मोबाईलवर बोलणं सुरू होतं. अशा मस्त वातावरणात मला अगदी छान झोप लागली.
सकाळी सहा वाजता गजर झाला. खाली उतरलो तर गाडी अजून कर्जतला पोहोचायची होती. म्हणजे किमान अर्धा ते पाऊण तास गाडी लेट. आता झोपणंही शक्य नव्हतं. माझं लक्ष साइड बर्थच्या `इंटरेस्टींग` चेहऱ्याकडं गेलं. तो कोमेजला होता. कोमेजला नव्हे, रडवेला झाला होता. पाचेक मिनिटांत तिनं साऱ्या बोगीभर काहीशी धावपळ केली. थोड्या वेळानं पुन्हा जागेवर येऊन बसली. तिला `काय झालं?` म्हणून विचारलं तर लॅपटॉप ठेवलेली तिची बॅग कुणीतरी चोरली होती. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं, असंही वर तिनं मला सांगितलं. `बाई, पूर्वी कधीही न झालेली गोष्ट, पुढं कधी होणारच नाही, असं आपण गृहित धरणं चुकीचं असतं,` असं तिला मला सांगावंसं वाटलं, पण तिच्या चेहऱ्याकडं पाहून मी माझे शब्द मनातच ठेवले. तिला कोरडा दिलासा दिला. एवढ्यात पलिकडच्या मोबाईलवाल्या तरुण मित्राचाही मोबाईल गेल्याचा आवाज ऐकू आला. मला शंका आल्यानं बोगीत चक्कर मारली तर कुणाच्या पर्सपासून बॅगपर्यंत असं बरंचसं साहित्य चोरीला गेलं होतं.
कल्याण आलं, मी उतरलो. आणि अन्य बोगींमधून उतरलेल्या प्रवाशांतही त्यांच्या किंवा त्यांच्या सहप्रवाशांकडं झालेल्या चोरीविषयीच चर्चा कानी पडू लागली. म्हणजे कुणाला मारहाण झाली नाही, म्हणूनच केवळ दरोडा म्हणायचा नाही, असं या चोरीचं मोठं स्वरुप होतं. ही बातमी मी नंतर माझ्या मुंबईतल्या काही पत्रकार मित्रांना सांगितली. त्यांनी तसंच नंतर मीही रेल्वे पोलिसांत फोन करून चौकशी केली तर त्या दिवसभरात त्यांच्याकडं एकाही चोरीची तक्रार दाखल झाली नव्हती. आता याबद्दल आश्चर्य व्यक्त करावं, चिंता व्यक्त करावी की आपल्याच यंत्रणेबद्दल आपल्या मनात किती अविश्वास भिनला आहे, याबद्दल खेद करावा, अशी माझ्या मनाची संदिग्ध अवस्था झाली आहे. पोलिसांना सांगूनही काही होणार नाही, त्यापेक्षा झालेलं नुकसान सोसण्याची प्रवाशांची मानसिकता दुसरं काय सांगते? अशा किती चोऱ्या या रेल्वेमध्ये होत असतील. पण प्रवाशांनीच मनावर घेतलं नाही, तर हे प्रकार पुढं गंभीर स्वरुप धारण करतील आणि प्रवाशांच्या जीवावरही बेतू शकतील, एवढाच सावधानतेचा इशारा मला या निमित्तानं द्यावासा वाटतो.
ता.क. : मी माझ्या डोक्याशी घेतलेल्या सॅकमध्ये माझा `आऊटडेटेड` का असेना, पण लॅपटॉप होता. एखाद्या लुटारूनं माझ्या डोक्यात दांडकं हाणलं असतं तर जीव वाचवण्यासाठी माझी बॅग त्याच्या ताब्यात देण्यापलिकडं मी काही करू शकलो नसतो. रेल्वेतून उतरल्यावरही `लॅपटॉप गेला तरी हरकत नाही, पण जीव वाचला` असाच आनंद व्यक्त केला असता. रेल्वे पोलिसांकडं जाण्याचा विचारही केला नसता. ते तरी बिचारे काय करू शकणार होते? पण ते जर काही करू शकले असते, तर साईड बर्थच्या `इंटरेस्टींग` चेहऱ्यावरचं हसू निश्चित परत आणू शकले असते!
(वाचक मित्रांना सूचना : विषय फुलवण्याच्या दृष्टीनं विशेषणं वापरली असली तरी आशय मात्र शंभर टक्के खरा आहे, बरं!)

मंगळवार, १४ जून, २०११

बळीराजाला जागता ठेवणारा प्रकाशक


(श्री. रावसाहेब पुजारी हे माझे अगदी `सकाळ`पासूनचे सहकारी आणि एक जीवलग मित्र. शेतीवर आणि बांधावर मनापासून प्रेम करणाऱ्या, निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या आमच्या या मित्रानं आपल्या शेतीच्या प्रेमाला मासिकाचं स्वरुप देऊन या प्रेमाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं ध्येय बाळगलं आणि गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत `शेती-प्रगती` या त्यांनी सुरू केलेल्या मासिकानं पश्चिम महाराष्ट्र, कोकण या परिसरातील शेतकरी-वाचकांच्या मनात एक विशिष्ट स्थान मिळवलं आहे. आपल्या कृषी प्रेमाची व्याप्ती आणखी वाढवतानाच त्यांनी तेजस प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून शेती या विषयाला वाहिलेली अत्यंत उपयुक्त पुस्तकंही प्रकाशित केली. त्यांनाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. आमच्या या मित्राच्या `शेती-प्रगती`ला यंदा सहा वर्षं पूर्ण होताहेत. त्यानिमित्तानं आमचे आणखी एक ज्येष्ठ स्नेही, मित्र आणि मार्गदर्शक असलेले बाप्पा उर्फ सुधीर श्रीधर कुलकर्णी (सांगली, मोबा. 9420676543) यांनी रावसाहेब पुजारी यांच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेतलेला आहे. तो खास माझ्या मित्रांसाठी सादर करीत आहे. मनापासून एखाद्या गोष्टीवर केलेलं प्रेम आपली आयुष्याची कारकीर्द घडविण्यास कशा प्रकारे साह्यभूत ठरू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रावसाहेब पुजारी आहेत. त्यांच्या आयुष्यापासून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.) वाचा तर मग.. आमच्या पुजारींची यशोगाथा...!



कोल्हापूर जिल्ह्यात तमदलगेसारख्या छोटया खेडयात राहणारा एक शेतकऱ्याचा मुलगा रावसाहेब बाळू पुजारी यांनी कृषी मासिक व कृषिविषयक पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी सहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले `शेती-प्रगती` हे मासिक देखील आता चांगले नावारूपाला आले आहे. शेती विषयांतील अनेक तज्ज्ञांना त्यांनी लिहिते केले आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग अन्य शेतकऱ्यांना व्हावा या भूमिकेतून त्यांनी त्यांची पुस्तके प्रसिध्द केली आहेत. कोल्हापूरसारख्या कृषी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या शहरातील ट्रेड सेंटर इमारतीत त्यांनी कृषिविषयक पुस्तकांचे दालन सुरू केलेले आहे. तिथे स्वतःची तसेच अन्य प्रकाशनांची पुस्तके देखील त्यांनी उपलब्ध करून ठेवली आहेत. या तीनही उपक्रमांद्वारे ते शेतकऱ्यांना शेतीबाबत व शेतीशी संबंधित अनेक प्रश्नांवर सतत जागते ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
श्री. रावसाहेब पुजारी यांनी अतिशय कष्टात शिक्षण पूर्ण केले. वडील मेंढपाळ व शेतकरी. त्यामुळे शेतीच्या कामात मदत करत व लहानसहान नोकऱ्या करीत त्यांनी एम. ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. शेतातील काम करताना त्यातील प्रश्नांवर त्यांचे चिंतन सतत सुरू होते. त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीला गावोगावी फिरून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नंतर त्यांनी 16 वर्षे 'सकाळ' चे बातमीदार, उपसंपादक म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी शेती पुरवणीचे संपादन केले. या पुरवणीतून अनेक लेखमाला लिहिल्या.
हे करीत असतानाही त्यांना मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. एका टप्प्यावर त्यांनी `सकाळ`च्या उपसंपादकपदाचा राजीनामा दिला. त्यांनी चक्क शेती करण्यास सुरुवात केली. पाणी अडवा, पाणी जिरवासारखे प्रयोग केले आहेत. त्यांची दहा एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, भाजीपाला, फुले, केळी ही पिके ते घेत असतात. त्यांची पेरूची बागही आहे. ऊस सोडला तर सर्व शेतमालाची विक्री त्यांचे कुटुंबीय स्वतः बाजारात करीत असतात. त्यामुळे त्यांची शेती सतत फायद्यात आहे.
एकूण शेतीच्या अभ्यासातून त्यांच्या असे लक्षात आले की, शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते आपल्या शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे. शेतकरी शेतीबाबत खऱ्या अर्थाने शिक्षित झाल्याशिवाय शेती व त्याची स्थिती सुधारणार नाही. नव्या तंत्राशिवाय शेती फायदेशीर होणारच नाही. शेतकऱ्यांध्ये जागृती व नामवंत जे शेतीमध्ये यशस्वी झाले आहेत त्या शेतकऱ्यांचे अनुभव सांगून त्यांना प्रोत्साहित करावे असे दोन प्रकारचे काम त्यांनी सुरू केले. त्यातून त्यांच्या 'समृध्द शेतीच्या पायवाटा', 'कायापालट क्षारपड जमिनीचा', 'शेतकऱ्यांचे सोबती' या तीन पुस्तकांचा जन्म झाला. या तीनही पुस्तकांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन पुस्तकांच्या दोन आवृत्त्या निघाल्या.
या कालावधीत त्यांना क्षारपीडित जमिनीच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी नवी दिल्लीच्या 'सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायरमेंटस्` (सीएसई) या संस्थेची फेलोशीप मिळाली. त्यातून त्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील क्षारपड जमिनीचा अभ्यास केला. हा प्रश्न व त्यावरील उपाय असा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. पुढे त्यावर आधारित 'कायापालट क्षारपड जमिनीचा' हे पुस्तक त्यांनी प्रसिध्द केले. त्यांच्या पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतीच्या मातीचा वास असलेले
मासिक सुरू करावे अशी कल्पना त्यांना सुचली. त्यांनी ती प्रत्यक्षात देखील आणली. त्यातूनच त्यांनी जानेवारी 2005 पासून पूर्णपणे शेतीला वाहिलेले 'शेतीप्रगती' हे मासिक सुरू केले. जवळ पुरेसे भांडवल नाही. मराठीतील अनेक नावाजलेली मासिके, साप्ताहिके आर्थिक तंगीतून बंद पडलेली असताना, आहे त्यांना पुरेसा ग्राहक नसताना त्यांनी हे धाडस केले. अनेकांनी त्यांना वेडयात काढले. काही जण त्यातूनही त्यांना धीर देत होते.
दैनिकात नोकरी केल्याने त्यांना संपादन, जाहिरात व वितरण या तिन्ही अंगांची चांगली जाण होती. चिकाटीने त्यांनी ही मासिकाची तीनही अंगे फुलवली व मासिक नावारूपास आणले. नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग, यशस्वी शेतकऱ्यांच्या गाथा, शेतीविषयक नवीन माहिती, शेतीविषयक वृत्त, चर्चेतील विषय असे अनेक महत्त्वाचे विषय ते नेहमी हाताळतात. त्याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतो. तांत्रिक अंगाने म्हणजे कागद, छपाई, सजावट, बांधणी या बाजूंनी देखील हे मासिक सरस आहे. या साऱ्या बळावर स्थानिकबरोबरच कार्पोरेट जाहिराती त्यांना मिळत आहेत. हे त्यांच्या कष्टाचे व मासिकाचे यश आहे.
त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आज सहा वर्षे खंड न पडता हे मासिक सुरू आहे. त्यांनी प्रसिध्द केलेले दिवाळी अंक देखील या मासिकाचे वेगळेपण आहे. पाणीप्रश्न, ग्लोबल वॉर्मिंग, मातीचा कस असे विषय घेऊन एकेका विषयांबाबत संपूर्ण जागृती करणारे दर्जेदार अंक त्यांनी दिले. त्याशिवाय प्रासंगिक केळी, ऊस, रोपवाटिका, बी-बियाणे, दुग्ध व्यवसाय आदी विषयांवरती खास अंक असतातच. अर्थसंकल्पातील शेती या विषयावर दरवर्षी अतिशय नेटका अंक करतात. शेतीविषयक सर्व प्रश्नांना स्पर्श करणारे मासिक म्हणून ते शेतकऱ्यांत वाचकप्रिय झालेले आहे. शेतीप्रगती मासिकाची प्रगती पाहून महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी शेतीविषयक मासिके सुरू झाली आहेत. पूर्वीपासून सुरू असलेल्या मासिकांनाही कात टाकायला लावली आहे.
त्यानंतर त्यांनी प्रकाशन व्यवसाय चालू केला. आज त्यांनी वेगवेगळया विषयांवरील 16 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये उद्यान पंडित पी. व्ही. जाधव यांचे शेतकरी अजोबाचा बटवा हे पॉकेट आकाराचे पुस्तक चांगले खपले. शेतकऱ्याला आपल्या शेतावर उपलब्ध साधनांचा वापर करून खते, औषधे, बियाणे कशी करावीत यांचे मार्गदर्शन त्यात आहे. त्याचप्रमाणे डॉ. राजेंद्र देशमुख यांचे 'अशी फुलवा परसबाग', सौ अर्चना चौगुले-करोशी यांचे 'मंथन एक विचारधारेचे', कोल्हापूरचे शेतीतज्ज्ञ प्रताप चिपळूणकर यांची 'कमी खर्चाची ऊसशेती' व 'फायदेशीर भातशेती', बी. बी. घाडगे यांचे 'स्वावलंबनासाठी शासकीय योजना', सुभाष हंड- देखमुख यांचे 'यक्ष व युधिष्ठिर संवाद', उमेश पाटील यांचे 'प्रमुख पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन', रत्नागिरीचे सर्पमित्र प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे साप-आपला सोबती आदी पुस्तकांचा समावेश आहे. नुकतेच `ग्लोबल वॉर्मिग` या विषयावर संजय आवटे आणि जगदीश मोरे यांचे आणि `संत चोखामेळा - समग्र अभंगगाथा व चरित्र` हे डॉ. अप्पासाहेब पुजारी यांचे संशोधनपर पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकांना चांगला शेतकरी वाचक मिळाला.
नव्या तरुण शेतकऱ्यांमध्ये माहिती मिळविण्याची मोठी तहान आहे. आज द्राक्ष, ऊस, केळी, हळद आदी पिकांवर जे परिसंवाद किंवा चर्चासत्रे होतात त्याला ही तरुणाई उपस्थित असते. त्यात गांभीर्याने सहभागी होते. शंका निरसन करून घेते. त्याचबरोबर जी कृषी प्रदर्शने होतात त्यामध्ये देखील शेतकरी मोठया संख्येने सहभागी होत असतात. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून भरघोस पीक काढताना दिसत आहेत. रोपवाटिकाच्या व्यवसायाने देखील चांगले मूळ धरले आहे. या सर्व बदलाचा उपयोग करून घेण्याचा एक भाग म्हणून श्री. पुजारी यांनी फेब्रुवारी 2010 पासून कोल्हापुरात ट्रेड सेंटर येथे दुकान गाळा विकत घेऊन केवळ कृषीविषयक पुस्तकांचे दालन सुरू केले आहे. या दुकानात त्यांनी त्यांच्या प्रकाशनाची पुस्तके ठेवली आहेतच, त्याचबरोबर कृषिविषयक सर्व प्रकाशकांची पुस्तके येथे आहेत. तसेच कृषिविषयक सीडीज विक्रीसाठी उपलब्ध आहे.
या एकूण प्रकाशन व कृषी पुस्तक विक्री व्यवसायात त्यांना शेतीचा अनुभव उपयोगी आला. शेतीविषयक पुस्तकांचे अनेक प्रकाशक आहेत. मात्र त्यांचा शेतीशी थेट संबंध असेलच, असे नाही. त्यापेक्षा श्री पुजारी यांचा अजूनही शेतीशी संबंध आहे.
त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना नेके काय हवे आहे, त्यांची नेमकी गरज काय आहे, याचे गमक त्यांना अनुभवातून ठाऊक आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना हवे ते त्यांच्या मासिकातून व त्यांच्या पुस्तकांतून देत असतात. शेतकरी, लेखक, जाहिरातदार, कृषितज्ज्ञ, संशोधक, कृषी अधिकारी, बँकांचे अधिकारी आदी सर्व संबंधित घटकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्या बळावर त्यांचा प्रकाशन व्यवसाय घोडदौड करताना दिसतो आहे. शेती व शेतीविषयक सर्व बाबींवर शेतकऱ्यांना माहिती देणे, त्यातील सर्व प्रश्नांवर व हक्काबाबत त्याला सतत जागे ठेवण्याचे काम श्री. पुजारी अखंडपणे करीत आहेत.

संपर्क :
रावसाहेब पुजारी,
संपादक-प्रकाशक,
शेतीप्रगती मासिक, तेजस प्रकाशन,
एफ-3, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर
मोबाइल : 9881747325

शुक्रवार, ६ मे, २०११

'सोन्याचा' दिवस!

आज अक्षयतृतीया... हिंदू मान्यतेनुसार साडेतीन मुहूर्तांमधला एक श्रेष्ठ मुहूर्त... माझा कल निर्मिकाचं अस्तित्व मानून नास्तिकतेकडे झुकणारा असल्यानं या दिवसाबद्दलचं माझं आकर्षण यथातथाच! पण आज सकाळी सकाळी माझा जीवलग मित्र प्रशांतचा फोन आला, त्याचं लग्न जुळत असल्याची बातमी त्यानं मला दिली आणि आजचा आपला दिवस खऱ्या अर्थानं 'सोन्याचा' झाला, अशी भावना मनात दाटून आली.
आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की, मित्राचं लग्न ठरलं, हे ठीक आहे. पण त्यात अगदी माझा दिवस सोन्याचा होण्यासारखं काय विशेष? सांगतो. याठिकाणी एक खुलासा करतो, तो म्हणजे प्रशांतचं लग्न पुन्हा (म्हणजे दुसऱ्यांदा) ठरतं आहे. पहिलं लग्न (सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं!) मोडलं. तो काडीमोड व्यवस्थित मिळवून देण्यात मलाच मोठी भूमिका पार पाडावी लागली होती. त्यानंतरचा मधला दोन वर्षांचा काळ माझ्यासाठी तर जड गेलाच, पण प्रशांतसाठी सुध्दा त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक जड गेला.
काही व्यक्तींच्या आयुष्यात संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे माझा हा मित्र! तो लहान असतानाच वडिल वारलेले, घरची ना शेती ना अन्य काही उत्पन्न! आई निपाणीत विडया वळायची. त्यातून मिळणारी तुटपुंजी पेन्शन हाच काय तो घरखर्चाचा स्रोत. मधली बहिण आणि भावोजी हायवेवर चहाचा गाडा चालवायचे. त्या दोघांची चंद्रमौळी झोपडी, (चंद्रमौळी हा शब्द ऐकायला भारी वाटतो, पण प्रत्यक्षात ऊन्हापावसात त्या झोपडीची आणि त्यात राहणाऱ्यांची काय अवस्था होते, हे मी जवळून पाहिलंय.) तिथंच ही दोघं मायालेकरंही राहायची.
आठवीपर्यंत प्रशांत आपल्या मोठया बहिणीकडं जयसिंगपूरमध्ये शिकायला असायचा. अर्जुननगरच्या मोहनलाल दोशी विद्यालयात नववीत नवीन ऍडमिशन घेणारे तो आणि मी असे दोघेच होते. त्यामुळं साहजिकच जुन्यांपेक्षा आमच्या दोघांची ओळख, मैत्री आधी झाली. एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला, तो अगदी आजतागायत कायम आहे. अभ्यासात हुशार, अत्यंत प्रामाणिक, मित व मृदू भाषी, अतिशय सुंदर हस्ताक्षर (इतकं की त्या दोन वर्षांत शाळेतर्फे देण्यात आलेलं प्रत्येक प्रशस्तीपत्र त्याच्याच हस्ताक्षरातलं आहे.), रिंगटेनिस, क्रिकेट या खेळांमध्ये गती अशी अनेक वैशिष्टयं प्रशांतमध्ये होती. तसंच तो राहायलाही आमच्या घरापासून थोडयाच अंतरावर होता. आम्ही दोघं एकमेकांच्या घरी जायचो. त्याच्या घरची परिस्थिती मी माझ्या आई बाबांना सांगितली. त्याची हुशारी वाया जाऊ द्यायची नाही, असा निर्धार करून मी तेव्हापासूनच त्याला आमच्या घरी अभ्यासाला बोलवायला सुरवात केली. नववीपासून ते अगदी फायनल इयर (माझी बीएस्सी आणि त्याचं बीए) यात खंड पडला नाही.
तोपर्यंत प्रशांतची घरची परिस्थिती हळूहळू सुधारतेय, असं चित्र निर्माण झालं. बीएस्सीला मी फर्स्ट क्लास कव्हर करायच्या मागं असताना प्रशांतनं बीए इकॉनॉमिक्समध्ये डिस्टींक्शन मिळवलं. त्यानं एमए करावं, यासाठी माझ्या बाबांनी त्याला पूर्ण पाठबळ द्यायचं ठरवलं. (एक उत्कृष्ट प्राध्यापक होण्याच्या क्वालिटीज् त्याच्यामध्ये आहेत, असं आमचं ठाम मत होतं.) शिवाजी विद्यापीठात ऍडमिशनही घेतलं. नेमक्या त्याचवेळी त्याच्या कौटुंबिक अडचणींनी तोंड वर काढायला सुरवात केली. हायवेच्या चौपदरीकरणाच्या कामात चहाचा गाडा गेला, भावोजी परागंदा झाले, आईला अर्धांगाचा मायनर झटका आला, तिच्या औषधोपचाराचा आणि भाच्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याचं आव्हान होतं. आमचं त्याला पाठबळ होतंच, पण त्याच्यासारख्या स्वाभिमानी व्यक्तीनं अशा परिस्थितीत घरची जबाबदारी टाळणं शक्यच नव्हतं. त्याला शिक्षण सोडावं लागलं. तत्पूर्वी, टेलिफोन बूथवर काम करणारा प्रशांत आता निपाणीत रिक्षा चालवू लागला. (तुम्ही कधी निपाणीत आलात, तर एक से एक 'टकाटक' रिक्षावाले दिसतील, इतकं या व्यवसायाला इथं ग्लॅमर आहे. आम्ही 1991मध्ये इथं राहायला आलो तर स्टँडवर मोजून पाच दहा रिक्षा असतील. आता स्टँडभोवतीच पाच स्टॉप आहेत. रिक्षांची तर गणतीच नाही.) दुसऱ्याची रिक्षा रोजंदारीवर चालवता चालवता एक दिवस स्वत:ची रिक्षा घेण्यापर्यंत प्रशांतची प्रगती झाली. स्वत:चं चार खोल्याचं घरही बांधून झालं. ज्या भाच्याच्या शिक्षणासाठी प्रशांत डे-नाईट डयुटी करत होता, त्या भाच्याला दहावी होण्याआधीच शिक्षणापेक्षा मामाचा रिक्षाचा धंदाच अधिक ग्लॅमरस वाटू लागला. त्याला आम्ही किती समजावलं, पण तो ऐकायला तयार होईना. शेवटी प्रशांतनं आपली रिक्षा त्याला चालवायला दिली.
दरम्यानच्या काळात त्याला मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये ओळखीनं वसुलीचं काम मिळालं. तेही त्यानं स्वीकारलं. इथं वर्षभर काढलं सुध्दा! पण इतकी वर्षं रिक्षा चालवल्यानंतर त्याची मानसिकता बदलली होती. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर,
'आम्हाला रोजच्या रोज ताजा पैसा लागतो, महिनाभराचा एकदम शिळा पैसा आता नकोसा वाटतो.'
त्याच्या या एका वाक्यानं मला निपाणीतल्या तमाम रिक्षाचालक मित्रांच्या या व्यवसायातल्या वावराचं स्पष्टीकरण मिळून गेलं. प्रशांत पुन्हा निपाणीत परतला. भाच्यासह डे-नाइट असा आलटून पालटून रिक्षा चालवू लागला.
याच दरम्यान, आईला पुन्हा ब्रेन-हॅमोरेजचा झटका आला. त्यात तिची दृष्टी गेली. पण उपचारानं चालता बोलता येऊ लागलं. याचं श्रेय प्रशांतनं केलेल्या सेवेला होतं.
पुढं कोल्हापूरजवळच्या एका गावातल्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं, झालं. आणि तिथंच त्याच्या कौटुंबिक संघर्षाचा नवा अंक सुरू झाला. लग्नानंतर ती मुलगी मोजून दोन ते तीन दिवस त्याच्या घरी राहिली असेल. 'आपण कोल्हापुरात राहू', 'मी जॉब करते', 'तू सुध्दा रिक्षा सोडून नोकरी कर', 'आई नको', असे एक ना अनेक नखरे सुरू झाले. यावरुनच बहिणीशीही खटके उडू लागले. अखेर जड मनानं प्रशांतनं कोल्हापुरात भाडयानं घर घेतलं. बहिणीनं टोकाची भूमिका घेतल्यानं आईला सुध्दा बरोबर घेणं आवश्यक होतं. तरीही त्याच्या बायकोला काय हवं होतं, कोण जाणे! तिनं त्याच्याशी अजिबात जुळवून घेतलं नाही. त्याच्या विनवण्यांना काडीची किंमत न देता ती माहेरी निघून गेली. मोजून महिनाभरही हा संसार झाला नाही.
प्रकरण माझ्यापर्यंत आलं. समजावून सांगून, रागावून काहीही उपयोग झाला नाही. प्रकरण सामोपचारानं मिटवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आता तिच्या माहेरचे लोकही फारच टोकाची भूमिका घेऊ लागले. मऊ स्वभावाच्या प्रशांतला कोपरानं खणायचे, त्यांचे प्रयत्न सुरू झाले. पै न् पै जमवून प्रशांतनं मोठया हौशेनं तिला केलेले दागिने सुध्दा त्यांनी घरातून गायब केले. ज्या खोलीचं भाडं हा भरत होता, त्या खोलीला यानं लावलेल्या कुलुपावर तिच्या घरच्यांनी दुसरं कुलूप आणून लावण्यापर्यंत मजल गेली. घरातले स्वत:चे कपडेही त्याला घेता येणार नाहीत, अशी सारी व्यवस्था केली गेली. आणि याला कारण काय? तर ठोस असं कोणतंही कारण दिलं जात नव्हतं. एकूणच ही गंभीर परिस्थिती पाहता मलाही टोकाची भूमिका घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. प्रशांतला घटस्फोटासाठी राजी केलं. त्याशिवाय त्याची या दुष्टचक्रातून सुटका नसल्याचंही पटवून दिलं. माझ्यासारखंच अन्य मित्रांचंही मत पडलं. त्यानंतर माझे सर्व सोर्सेस वापरून पध्दतशीरपणे प्रशांतला या बंधनातून रितसर सोडवला. दरम्यानच्या काळात वर्षभर गेलं.
प्रशांतवर ओढवलेली परिस्थिती स्पष्टीकरणापलिकडची होती. आम्हा साऱ्यांनाच वाईट वाटलं. तो आईसह पुन्हा निपाणीत आला. मी मुंबईत राहून फार काही करू शकत नसलो तरी त्याला सावरण्यासाठी माझ्या साऱ्या मित्रांनी कंबर कसली. गजू, बबलू, संतोष या सांगावकर बंधूंनी तर त्याला खूप आधार दिला. संतोषनं स्वत:ची रिक्षा चालवायला देऊन त्याला आर्थिक आधार दिला. बबलू गरज पडेल त्यावेळी जेवण देत होता. प्रशांतच्या मनातल्या दु:खावर मात्र आमच्याकडं समजावणीची फुंकर घालण्यापलिकडं दुसरा उपाय नव्हता. घराच्या वाटण्या झाल्यानं आईची जबाबदारी त्याच्यावरच आलेली. यातून दु:ख विसरण्यासाठी अखेर ड्रिंक्सवरचा त्याचा भर वाढला. अधूनमधून मित्रांसोबत बसणारा प्रशांत दररोज एकटाच जाऊ लागला. मित्रांच्या समजावण्यांच्याही पलिकडं गेला. ही गोष्ट माझ्या कानावर आली. त्याला भेटून मी त्याला बरंच समजावलं. त्याला सांगितलं, `यापुढं तुझं हे प्रमाण कमी झाल्याशिवाय मी तुला फोन करणार नाही`, आणि त्यासाठी मी त्याला आठवडयाची मुदत दिली होती. मला माहित होतं, पुढच्या आठवडयात त्याचा फोन येणार नाही. तसंच झालं! चार महिने उलटल्यानंतर गेल्या महिन्यात त्याचा फोन आला.
'मी आता माझ्यावर बऱ्यापैकी कंट्रोल मिळवलाय. तू नाराज होऊ नको.'
माझ्या डोळयात टचकन् पाणी आलं. तो माझ्याशी खोटं बोलणार नाही, याची मला खात्री होती. त्याला पुन्हा पंधरा मिनिटं समजावलं.
आणि आज पुन्हा प्रशांतचा फोन आला. मुलीकडच्यांनीही त्याला पसंत केलं आहे. आता येत्या महिन्याभरात त्याचं (रेकॉर्डनुसार) दुसरं लग्न होईल. पण तसं हे पहिलंच लग्न असेल कारण पहिला संसार मांडलाच कुठं होता? नुसताच आयुष्याचा खेळखंडोबा! आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, ही मुलगी पाहायला त्याची बहीणसुध्दा सोबत गेली होती. म्हणजे घरच्या आघाडीवरही आता चांगलं वातावरण निर्माण होतंय. आता मात्र प्रशांतला सुख मिळू दे. यापुढं कोणतंही संकट त्याच्यावर येऊ नये, अशी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आज सकाळीच मी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. तसं झालं तर, अक्षयतृतीया हा खरंच चांगला मुहूर्त आहे, योग आहे, असं मानायला मी अजिबात मागंपुढं पाहणार नाही.
गुड लक माय फ्रेंड...गुड लक...!
--
आलोक जत्राटकर

सोमवार, २ मे, २०११

इशारा लादेनच्या मृत्यूचा!

कुख्यात दहशतवादी आणि जगभरातील तमाम दहशतवादी संघटनांचा प्रेरणास्रोत असलेला ओसामा बिन लादेन अमेरिकन सीआयएकडून पाकिस्तानात मारला गेल्याचं आज सकाळी लोकल ट्रेनमध्येच एसएमएसद्वारे समजलं. (थँक्स टू न्यू टेक्नॉलॉजी!) साहजिकच ट्रेनमध्ये दुसरं काहीच करता येत नसल्यानं याच बातमीच्या अनुषंगानं डोक्यात विचारचक्र सुरू झालं. एखादी बातमी ही जशी विचारांना चालना देत असते, त्याचप्रमाणं लादेनसारख्यांचे मृत्यू आपल्यासमोरचे प्रश्न संपुष्टात न आणता नव्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना जन्म देत असतात. त्या प्रश्नांची उत्तर आपण कशा पध्दतीनं शोधतो, यावर येणाऱ्या काळाची वाटचाल ठरत असते.
लादेनच्या मृत्यूनं अशाच काही विचारांची, प्रश्नांची आवर्तनं माझ्या मनात उमटली. अमेरिकेनं पोसलेल्या एका भस्मासुराचा त्यांच्याच एजन्सीकडून अंत होण्यानं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर 9 सप्टेंबर, 2001 रोजी साऱ्या जगाच्या साक्षीनं अमेरिकेच्या टि्वन टॉवर्सवर विमानहल्ला करून या इमारतीबरोबरच अमेरिकेच्या अतिआत्मविश्वासाच्याही चिंधडया उडवणाऱ्या लादेनच्या मृत्यूनं सुडाचं चक्रही पूर्ण झालं आहे.
अमेरिकेवर दहशतवादी हल्ला होईपर्यंत भारतानंच दहशतवादाच्या सर्वाधिक झळा सोसल्या होत्या. कित्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून भारतानं या प्रकाराचं गांभीर्य पटवून देण्याचा आतोनात प्रयत्न चालवला होता. पण त्याकडं म्हणावं तितकं कोणी लक्ष दिलं नाही. 9/11च्या हल्ल्यानंतर मात्र दहशतवाद ही जगासमोरची सर्वात मोठी आणि भीषण समस्या असल्याचा साक्षात्कार अमेरिकेला झाला आणि मग गेली दहा-अकरा वर्षे लादेनला पकडून अथवा मारुन दहशतवादाचा खातमा करण्यासाठी अमेरिकेनं दक्षिण आशियामध्ये आपल्या फौजा उतरवल्या. दरम्यानच्या काळात सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर मध्य-पूर्वेमध्ये अमेरिकेचं बऱ्यापैकी (की उत्तमपैकी?) बस्तान बसलं. जोडीनं लादेनच्या निमित्तानं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही फौजा उतरवण्याची नामी संधी अमेरिकेला चालून आली आणि अशा संधींचं सोन्यात रुपांतर करण्यात अमेरिकेचा हात कोणीही धरू शकत नाही.
आता लादेनच्या मृत्यूची घोषणा करून अमेरिकेचं पाकिस्तानमध्ये फौजा उतरवण्यामागचं (छुपं) इप्सित साध्य झालं असल्याची शक्यताच मोठया प्रमाणात जाणवते आहे. कारण लादेनला पाकिस्तानसारख्या छोटया देशामध्ये किती काळ पळू द्यायचं, किती काळ लपू द्यायचं आणि पकडायचं की मारायचं, याचा निर्णय हा सर्वस्वी अमेरिकेवरच अवलंबून होता आणि त्यांनी तो योग आज साधला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी, गेल्या आठवडयात आपण स्वत:च लादेनला मारण्याची परवानगी सीआयएला दिल्याचं आजच्या निवेदनामध्ये सांगितलं. (इथं आणखीही एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर सिनिअर बुश असोत, ज्युनिअर बुश असोत, क्लिंटन असोत की ओबामा, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये फारसा फेरफार होत नाही, केला जाऊ शकत नाही!) त्यामुळं आता आशिया खंडात अमेरिकन वर्चस्ववादाच्या हिटलिस्टमध्ये पुढचं टारगेट हे भारत किंवा चीन असणार आहे. त्यातही चीनची भिंत भेदणं, अमेरिकेला सहजशक्य नसल्यानं हे टारगेट भारतच असेल, अशी अधिक शक्यता वाटते. इथल्या बाजारपेठेमध्ये मोठया प्रमाणावर शिरकाव करून त्यांनी याची सुरवात फार आधीच केली आहे. आता त्याला नवे आयाम ते कुठल्या पध्दतीनं लावतात, याकडं भारतानं फार सजगतेनं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
लादेनचा मृत्यू पाकिस्तानात झाल्यानं आणि ते थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या तोंडूनच जगजाहीर झाल्यानं भारतानं वेळोवेळी पाकिस्तानच्या दहशतवादी लिंक्सचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरुन उच्चार केला आहे, त्याला बळकटी मिळाली आहे. दहशतवादी आणि माफिया-डॉन यांना पाकिस्तान फार आधीपासून आश्रय देत आला आहे. अद्यापही भारताचा मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम सुध्दा तिथंच आहे. एक बरं झालं, आपले केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना, पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या प्रवृत्ती जगासमोर आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणं मुंबईवर 26 नोव्हेंबर, 2008 रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना भारताच्या हवाली करण्याची पाकिस्तानकडं मागणीही केली.
पंजाब, काश्मीर इथं फोफावलेला दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत होता किंवा आहे, हे एक आता खुलं रहस्य आहे. त्याचबरोबर मुंबईसह भारतातल्या कित्येक शहरांनी बाँबस्फोटांच्या रुपानं या दहशतवादाचं उग्र रुप पाहिलं आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामधल्या कसाबला जिवंत पकडून भारतानंच सर्वप्रथम दहशतवादाचा चेहरा जगासमोर आणला. लक्षात घ्या, लादेनला जिवंत पकडण्यासाठी दहा वर्षे आंतरराष्ट्रीय मोहीम चालवणाऱ्या अमेरिकेला सुध्दा ही गोष्ट शक्य झालेली नाही. (किंवा त्याला जिवंत पकडणं हे त्यांच्या हिताचं नसेलही कदाचित! त्यांनाच ठाऊक!!) त्यामुळं भारतानं कसाबवर चालविलेल्या खटल्याचा शक्य तितक्या लवकर निकाल लावून त्याचा सोक्षमोक्ष लावणं, ही बाब आता अधिक निकडीची झालेली आहे.
लादेनच्या मृत्यूनं एक दहशतवादी आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा, तो जगभर फोफावण्यासाठी कारणीभूत ठरलेला व्यक्ती नाहीसा झाला असला तरी, त्यामुळं दहशतवाद संपुष्टात आला किंवा येईल, असं समजणं हास्यास्पद ठरेल. दहशतवाद हा व्यक्तीमध्ये कधीच नसतो, तो असतो त्या व्यक्तीला फशी पाडणाऱ्या एक्स्ट्रिमिस्ट (अतिरेकी) विचारसरणीमध्ये! कोणताही मूलतत्त्ववाद हा अशा प्रकारच्या अतिरेकी विचारसरणीला अधिक पोसत असतो. आणि या विचारसरणीच्या मुळावर घाव घालून ती नष्ट करणं, हे महाकर्मकठीण काम असतं. कारण त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास लवचिकता या विचारसरणीत कधीच नसते. सारासार विचार, विवेक या गोष्टींपासून हे अतिरेकी कोसों दूर असतात. भगवान बुध्दाचा मध्यममार्ग किंवा महात्मा गांधींचा अहिंसा विचार स्वीकारणं हे तसं फारसं अवघड नाही, पण तितकंसं सोपंही नाही. कारण मध्यममार्ग स्वीकारण्यासाठी विवेकानं विचार करणं आवश्यक असतं. त्यापेक्षा अशा अतिरेक्यांना एक बाजू घेणं अधिक सोपं वाटत असतं. कट्टर मूलतत्त्ववादी लोक आपला वापर करून घेत आहेत, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. आणि एकदा वापर करून घेतल्यानंतर पुढं त्यांचं काहीही झालं तरी या चळवळीचं काहीही नुकसान होत नसतं कारण असे 'प्रभावित' झालेले, परिस्थितीनं गांजलेले तरुण त्यांच्याकडं येतच असतात. वापर होऊन गेल्यानंतर पश्चाताप झाला तरी त्याचा फारसा उपयोगही नसतो.
लादेनच्या मारल्या जाण्यानं दहशतवादी 'चळवळी'ला धक्का बसलाय, ही गोष्ट खरी असली तरी तो जगातल्या तमाम दहशतवादी संघटनांसाठी 'हुतात्मा' ठरणार नाही, असं थोडंच आहे? त्यामुळंच नजीकच्या काळात दहशतवाद अधिक भीषण स्वरुप धारण करेल, याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळंच साऱ्या जगानं या दहशतवादाला तोंड देण्यासाठी अधिक सजगतेनं सज्ज झालं पाहिजे. भारतानं तर अधिकच सज्ज झालं पाहिजे- कारण दहशतवादाबरोबरच साऱ्या जगासाठी आपण सॉफ्ट टारगेट असतो- नेहमीच!

मंगळवार, २२ मार्च, २०११

Intersesting Neurological Test

Dear Readers,
This interesting test and information, I got through email. You will also enjoy it. Just Scroll down and see.......

A Short Neurological Test

1- Find the C below..
Please do not use any cursor help.

OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOCOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO
OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO

2- If you already found the C, now find the 6 below.

99999999999999999999999999999999999999999999999
99999999999999999999999999999999999999999999999
99999999999999999999999999999999999999999999999
69999999999999999999999999999999999999999999999
99999999999999999999999999999999999999999999999
99999999999999999999999999999999999999999999999

3 - Now find the N below. It's a little more difficult.

MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMNMM
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM
MMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMMM

This is NOT a joke. If you were able to pass these 3 tests, you can cancel your annual visit to your neurologist. Your brain is great and you're far from having a close relationship with Alzheimer.

Congratulations!

Eonvrye that can raed this rsaie your hnad.
To my 'selected' strange-minded friends:

If you can read the following paragraph, forward it on to your friends and the person that sent it to you with 'yes' in the subject line.




Only great minds can read this
This is weird, but interesting!

If you can raed this, you have a sgtrane mnid too

Can you raed this? Olny 55 plepoe out of 100 can.

I cdnuolt blveiee that I cluod aulaclty uesdnatnrd what I was rdanieg. The phaonmneal pweor of the hmuan mnid, aoccdrnig to a rscheearch at Cmabrigde Uinervtisy, it dseno't mtaetr in what oerdr the ltteres in a word are, the olny iproamtnt tihng is that the frsit and last ltteer be in the rghit pclae. The rset can be a taotl mses and you can still raed it whotuit a pboerlm. This is bcuseae the huamn mnid deos not raed ervey lteter by istlef, but the word as a wlohe. Azanmig huh? Yaeh and I awlyas tghuhot slpeling was ipmorantt!

Isn't it Interesting! Still is there anybody to blame anyone's spelling mistake?

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

अजिंठा टुरिस्ट कॉम्प्लेक्स


जपान बँक फॉर इंटरनॅशनल कॉ-ऑपरेशन (जेबीआयसी) या बँकेच्या मदतीने अजिंठा येथे पर्यटनाच्या वृध्दीसाठी व पर्यटकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प टुरिस्ट कॉम्प्लेक्सच्या रुपाने साकार होत आहे. या प्रकल्पाविषयी...

बौध्द धर्म... इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भगवान बुध्दाने शांती, करूणा, अहिंसेचा दाखविलेला मार्ग... भारताने जगाला दिलेली एक महान देणगी... आज व्हिएतनाम, जपान, श्रीलंका, नेपाळ, तिबेट, भूतान, दक्षिण कोरिया, तैवान, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, चीन अशा अनेक देशांनी या मार्गाचा अंगिकार केला... जगभरात बुध्दाचे अनुयायी 33 कोटीच्या घरात आहेत... पण मधल्या काळात उद्गात्या भारतातच बौध्द धर्माने अस्ताचल पाहिला... मुस्लीम चढाया, हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन... कारणे काही असोत, बौध्द धर्माची पीछेहाट झाली. धर्माचा प्रसार कमी झाला तरी एके काळी अत्यंत भरभराट पाहिलेल्या या धर्माच्या भिक्षूंनी, अनुयायांनी, प्रचारकांनी धर्मप्रसारासाठी केलेले प्रयत्न आजही साहित्य, चित्रे, कलाकृती वा भग्नावशेषांच्या रुपात का असेना पाहता येतात... या धर्माच्या तत्कालीन लोकप्रियतेची जाणीव आपल्याला नक्कीच होते. या धर्माचा अमूल्य ठेवा आपल्या महाराष्ट्रात अजिंठा, वेरुळ, घारापुरी, औरंगाबाद येथे लेण्यांच्या स्वरुपात उभा आहे.
अजिंठा हा तर केवळ देशातीलच नव्हे तर जागतिक दर्जाचा प्राचीन वारसा असल्याचे युनेस्कोनेही जाहीर केले आहे. अशा या ठिकाणाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील बौध्द अनुयायी अत्यंत भाविकतेने येत असतात. त्यामध्ये जपानी अनुयायांची संख्याही लक्षणीय असते. जपानच्या जपान बँक फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन (जेबीआयसी) या बँकेने अजिंठा-वेरुळचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व जाणूनच त्याच्या जतनासाठी पुढाकार घेतला आणि भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयास 7331 दशलक्ष येन इतक्या खर्चाचा प्रस्तावही सादर केला. हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांना एक्झिक्युटीव्ह एजन्सी नेमण्यात आले. जेबीआयसीमार्फत देण्यात येणारा काही निधी पुरातत्त्व खात्याकडेही जतनाच्या कार्यासाठी देण्यात आला असून अन्य निधीच्या माध्यमातून अजिंठयानजीक अजिंठा टुरिस्ट कॉम्प्लेक्स व व्हिजिटर सेंटर साकार करण्यात येत आहे.
अजिंठयाच्या पायथ्याशी टी-जंक्शन येथे सध्या एल ऍन्ड टी कंपनीतर्फे भव्यदिव्य असे टुरिस्ट कॉम्प्लेक्स उभे राहात आहे. सुमारे 56 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे स्वरुप अत्यंत भव्य, देखणे व आकर्षक असे आहे. पाच म्युझियम, चार गुहांच्या प्रतिकृती, सायक्लोरामा, ऍंम्फी थिएटर, स्टडी सेंटर, रेस्टॉरंट अशा अनेक अभिनव गोष्टींचा या प्रकल्पात समावेश आहे. सुमारे 45 हजार चौरस मीटरच्या लँडस्केप जागेवर 15 हजार चौरस मीटरवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. सुमारे 55 हजार घनमीटर इतका दगड खोदल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाचा ढाचा उभा राहिला असून लवकरच काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पातील सायक्लोरामा ही एक अभिनव अशी संकल्पना आहे. यामध्ये एक दुमजली घुमटाकार इमारत आहे. त्या घुमटावर भगवान बुध्दाच्या चरित्रातील प्रसंग, जातक कथा, अजिंठा-वेरुळच्या गुहांची माहिती, भारतीय कला-संस्कृती आदी विविध विषयांबाबत अत्याधुनिक ऑडिओव्हिज्युअल तंत्रज्ञानाच्या साह्याने सातत्याने प्रदर्शन केले जाणार आहे. ते पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना बसण्यासाठीही आरामदायी आसनव्यवस्था असेल.
अजिंठा येथील गुहा क्र.1, 2, 16 व 17 या चार गुहांच्या प्रतिकृती हा तर या प्रकल्पाच्या ठळक आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. या गुहांचे अंतर्गत व बाह्य स्वरुप, त्यांची रचना, बुध्दमूर्तींसह अन्य शिल्पाकृती, चित्रकृती, ध्यानगृह, निद्रागृह आदी सर्व गोष्टी अगदी हुबेहुब साकारण्यात येणार आहेत. या गुहांतील खांबांवर हेडफोन बसविण्यात आलेले असतील. त्याठिकाणी जगातल्या प्रत्येक प्रमुख भाषेत तत्कालीन इतिहास व माहिती ऐकविण्याची व्यवस्था करण्यात येईल. पाच संग्रहालयांत बौध्द तसेच अन्य पुरातन भारतीय साहित्य, कला आदींची माहिती देणारे विभाग असतील. गॅलरी, एक्झिबिशन सेंटर, मल्टिमिडिया ऑडिटोरिया, गाईड पोस्ट, कल्चरल प्लाझा आदींचा यामध्ये समावेश आहे. देशी परदेशी अभ्यासकांना तेथे संशोधन करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. खुल्या ऍम्फी थिएटरमध्येही संध्याकाळच्या वेळी विविध मनोरंजनाचे व स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम करता येतील.
याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी एक प्रशस्त रेस्टॉरंट, शॉपिंग कोर्ट, बैठक व्यवस्थेसह सज्ज कॉरिडॉर, उद्यान, ऍडल्ट्स व किड्स ओरिएंटेशन, एस्केलेटर, लिफ्ट्स अशा सुविधा असतील. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या कॉरिडॉरमध्ये विविध सुविधा पुरविणाऱ्या दुकानांसाठी गाळयांचीही व्यवस्था आहे. या संपूर्ण बांधकामाला प्राचीन काळाच्या बांधकामाचा लूक देण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात गुहांचे डिझाईन, पेंटिंग आदी जिकीरीची कामे करण्यात येणार आहेत. या केंद्राच्या रुपाने अजिंठयाच्या पायथ्याशी एक आकर्षक पर्यटनस्थळ साकार होत आहे, एवढे निश्चित!

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

अनमोल अजिंठा


प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून साऱ्या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...

कोणत्याही गोष्टीची एक वेळ यावी लागते, असं म्हणतात. त्यावर विश्वास बसावा, अशी माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट म्हणजे माझी अजिंठा लेण्यांना भेट. बी.एस्सी. एफ. वाय.च्या सहलीपासून म्हणजे साधारण 1995पासून एप्रिल 2008पर्यंत अशा सुमारे तेरा वर्षांच्या काळात अजिंठा-वेरूळ लेण्यांना भेट देता येईल, अशा अनेक संधी माझ्याकडे चालून येत होत्या. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणानं योग जुळून येत नव्हता. या काळात औरंगाबादलाही कितीतरी वेळा गेलो पण परिसरातील प्राचीन कला-संस्कृतीच्या या अनमोल खजिन्याचं दर्शन मी घेऊ शकलेलो नव्हतो. मात्र लोकराज्य पर्यटन विशेषांकाच्या निमित्तानं ही बहुप्रतिक्षित व बहुप्रलंबित संधी मी घेण्याचं ठरवलं. याला आणखीही एक महत्त्वाचं कारण होतं ते हे की अजिंठयाला मी प्रथमच जाणार असल्यानं तिथल्या सर्वच गोष्टी माझ्यासाठी नवीन असणार होत्या, तिथल्या प्रत्येक गोष्टीचं मला अप्रूप असणार होतं आणि या दृष्टीनंच मी तिथल्या प्रत्येक कलाकृतीकडं पाहू शकणार होतो, तिचा आस्वाद घेऊ शकणार होतो आणि जमेल तितकं, जमेल तसं वाचकांना सांगू शकणार होतो. माझ्या दृष्टीनं ही जमेची बाजू होती.

या अजिंठा भेटीच्या निमित्तानं आणखीही एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे अजिंठयाला जोडून नेहमीच वेरूळचं नाव येत असल्यानं (अजिंठा-वेरूळ असं) अत्यंत धावपळीत या ठिकाणांना भेट देऊन जाणाऱ्या बहुतेक व्यक्तींच्या मनात या दोन्ही लेण्यांबद्दल संभ्रम आढळतो. औरंगाबादला गेलेल्या माझ्या काही मित्रांनी अजिंठयापेक्षा तुलनेत जवळ असलेल्या वेरूळ लेण्या पाहिल्या होत्या. मी अजिंठयाला जातोय असं समजल्यावर त्यांनी मला कैलास लेण्यांपासून अन्य काही लेण्यांमध्ये छायाचित्र काढण्यासारखं काय काय आहे, याची माहिती दिली होती. साहजिकच ती माझ्या (निदान आता तरी) उपयोगाची नव्हती. अजिंठयाची माहिती काढत असताना ही गोष्ट माझ्या लक्षात आली, तेव्हाच मी ठरवलं की यावेळी आपण फक्त अजिंठा एके अजिंठाच पाहायचा. वेरूळ फिर कभी देखा जाए।

युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत 1982मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून 107 किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे 76 मीटर उंचावरील घोडयाच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठयाच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठयापर्यंतच्या दोन-अडीच तासांच्या प्रवासात मी प्रत्येक डोंगराकडे पाहायचो, कुठे एखादी लेणी दिसत्येय का म्हणून. पण अजिंठयाच्या कर्त्या-करवित्यांनी माझी पूर्ण निराशा केली. टी- जंक्शनपासून अजिंठयाच्या डोंगरावर एमटीडीसीच्या एसी-बसने गेलो तरी एखादा कोरीव दगडही दिसला नाही. तिथून काँक्रीटच्या बांधीव रस्त्यावरुन वर चढून गेलो अन् एका क्षणात साऱ्या लेण्या दृष्टीपथात आल्या. त्याच जागी कित्येक वेळ उभा राहून ते शेकडो वर्षांपूर्वीचं देखणं कोरीव रुप मी मनात साठवत राहिलो आणि थोडया वेळानं कॅमेऱ्यात. त्याक्षणी मी ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन यालाही शतश: धन्यवाद दिले कारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं या परिसरात आला असताना त्याला इथल्या 10व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौध्द लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 500 ते 600 अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं मला खरंच कौतुक वाटलं. बौध्द भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागीरांनी इतक्या कलात्मक, देखण्या शिल्पाकृती कोरल्या कशा असतील, याचंच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. आधी गुहेचा खडबडीत पृष्ठभाग कोरून त्यावर चिखलाचे प्लास्टर, पुन्हा त्यावर चुन्याचा पातळ थर देऊन त्यावर कलाकारांनी आपली चित्रकला प्रदर्शित केली आहे. शिल्पावर चुन्याचं प्लास्टर केल्याचं दिसतं. चिखलाच्या प्लास्टरमध्ये स्थानिक चिकणमाती, कर्नाटक किंवा तमिळनाडूत मिळणारी ग्रॅनाइटची बारीक पूड, विविध झाडांच्या बिया व तंतूंचं मिश्रण असतं. अंधाऱ्या गुहांत त्यांनी प्रकाशयोजनाही अत्यंत कल्पकतेनं केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरुन कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्यानं सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुहांमध्ये काम करण्यात आलं.
या तीस लेण्यांपैकी 9, 10, 19, 26 व 29 या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या विहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बौध्द धर्माच्या हीनयानपंथाच्या काळात झाली. यामध्ये 9, 10 या चैत्यगृहांसह 12, 13 व 15 अ या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यांच्यातील ढोबळ फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासारख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात. इथल्या काही गुहांमध्ये स्तुपावर बुध्दप्रतिमा कोरल्याचे दिसते, यावरुन त्या ठराविक काळात हीनयान व महायानपंथीयांच्या विचारसरणीचा संगम झाल्याचे दिसते. तर 19 क्रमांकाच्या गुहेमध्ये महायानांनी स्तुपालाच बुध्दप्रतिमेमध्ये प्रवर्तित केल्याचे दिसते. त्यामुळे बुध्दप्रतिमेच्या दोहो बाजूंना नेहमी दिसणारे पद्मपाणि व वज्रपाणि केवळ या प्रतिमेच्याच बाजूला दिसत नाहीत. कारण स्तुपासाठी आधीच दगड कोरल्याने त्यांच्यासाठी जागाच उरलेली नाही.
बुध्दाच्या जन्मकथेपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या कथांचा प्रवास दर गुहेगणिक इथं उलगडत जातो. त्याला जोड मिळते ती जातकातील सुरस कथांची. इथलं प्रत्येक चित्र-शिल्प आपल्याशी बोलतं, काही सांगू पाहतं. गरज असते ती आपण थोडा वेळ देण्याची. आपण जितकं पाहू तितकं त्यातलं नाविन्य प्रतित होत जातं. अप्रतिम शिल्पांबरोबरच शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांत रंगविलेली चित्रं आजही तितकीच टवटवीत आहेत. आधुनिक तर इतकी की त्रिमितीय आणि चौमितीय आभास निर्माण करण्याची क्षमता या चित्रांत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या गुहेतील पद्मपाणि. या चित्राच्या समोर उभं राहिलं की त्याचे दोन्ही खांदे एका रेषेत दिसतात. तेच चित्र डावीकडून पाहिलं की पद्मपाणिचा डावा खांदा वर उचलल्यासारखा आणि उजवीकडून पाहिलं की उजवा खांदा वर उचलल्यासारखा दिसतो. त्याची मानही त्याच प्रमाणात अधो वा उर्ध्व झाल्यासारखी वाटते. हा त्रिमितीय आभास चित्रात नाही तर ज्याठिकाणी आपण उभे राहतो, त्या अंतरावर अवलंबून असल्याचं दिसतं. हाच आभास 26 व्या गुहेतील बालकाच्या बाबतीतही आढळतो. कोठूनही पाहिलं तरी ते आपल्याकडे पाहात असल्याचा आभास होतो.
पहिल्या गुहेतील भगवान बुध्दाची मूर्तीही अशीच आश्चर्यजनक त्रिमितीय आभास देणारी. या मूर्तीवर उजवीकडून प्रकाश टाकला तर तिच्या चेहऱ्यावर कष्टी भाव दिसतात- जगातील दु:ख पाहून जणू भगवंत दु:खी झाले आहेत. डावीकडून प्रकाश टाकला तर याच चेहऱ्यावर समाधानाचे प्रसन्न भाव दिसतात- दु:खाचे मूळ आणि निर्वाणप्राप्तीचा मार्ग सापडल्याचा जणू हा आनंद आहे. समोरुन प्रकाश टाकला असता चेहऱ्यावर एकदम शांत, ध्यानस्थ भाव दिसतात. एकाच मूर्तीत त्रिमितीचं असं अन्य उदाहरण सापडणं दुर्मिळच.
याच गुहेतील उधळलेला बैल हा चौमितीचं उत्कृष्ट उदाहरण. ही चौथी मिती असते आपल्या दृष्टीकोनाची. सुरवातीला चित्राकडे पाहिलं तर काही विशेष असं न वाटणारं. पण जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही कोठूनही पाहा, तो आपल्यामागे धावतोय, असं वाटेल. त्यानंतर त्या चित्राकडे पाहिलं असता तसंच वाटतं. याठिकाणी एक सांगावसं वाटतं ते म्हणजे 14-15 व्या शतकात मायकेल एंजेलोनं चित्रकलेत द्विमितीचा आभास निर्माण केला आणि तो महान ठरला. त्याच्याही आधी आठशे वर्षे अशा कलाकृती निर्माण करणारे ते अज्ञात कलाकार किती महान असतील!
पद्मपाणिखेरीज फ्लाइंग अप्सरा, फ्लाइंग इंद्रा, अवलोकितेश्वर, कुबेर अशा जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती इथं जागोजागी आढळतात. तत्कालीन आधुनिक व फॅशनेबल राहणीमानाचं चित्रणही याठिकाणी आहे. यामध्ये दोनमजली, तीनमजली घरं आहेत. त्यामध्ये सोफासेट आहे, गॅलरी आहे. वाऱ्याच्या झुळुकीसरशी फडफडणाऱ्या मांडवाप्रमाणं भासणारं इथल्या काही लेण्यांचं छत आहे. वस्त्रप्रावरणं आणि आभुषणांची तर या चित्रांतून पखरणच आहे. राजकुमारीच्या सौंदर्यप्रसाधनाचा प्रसंग याठिकाणी आहे. तिच्या मेकअप बॉक्समध्ये असलेल्या सामग्रीपुढे आजच्या तरुणींचा मेकअप किटही फिका पडेल. लिपस्टीकची 'फॅशन' व 'पॅशन' त्या काळातही असल्याचं दिसतंच, त्यातही केवळ खालच्या एका ओठालाच लिपस्टीक लावण्याची फॅशन या चित्रांतून दृगोच्चर होते. आभुषणांच्या बाबतीतही तो काळ अत्यंत समृध्द व पुढारलेला असाच दिसतो आणि वस्त्रांच्या बाबतीतही मिनी-मिडीपासून मॅक्सी- साडीपर्यंत अशी व्हरायटी दिसते. आज आपल्याकडे साहेबाच्या पोशाखावरुन ज्या रंगाची पँट, त्या रंगाचे मोजे घालावेत, असा संकेत रूढ झालाय, पण इथल्या चित्रांवरुन त्या काळात ज्या रंगाचा फेटा, त्या रंगाचे मोजे घालावेत, इतकी पोषाखी टापटीप सांभाळल्याचं दिसतं. बहुरंगी, बहुआयामी मानवी प्रवृत्तीचं दर्शन इथल्या विविध जातक कथा घडवतातच, त्याचबरोबर कलियुगाविषयी भाष्य करायलाही इथली शिल्पं कमी पडत नाहीत. पत्नीचे पाय चेपणारा पती हे शिल्प याचंच द्योतक.
बौध्द लेणी असल्यामुळे साहजिकच भगवान बुध्दांच्या हजारो मूर्ती येथे पाहावयास मिळतात. अगदी सव्वा इंची मूर्तीपासून ते महापरिनिर्वाणावस्थेतील 24 फुटी बुध्द मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या अन् बारकाईनं पाहिलं तर एकमेकांपेक्षा भिन्न अशा आहेत. केवळ एका संपूर्ण दिवसातच अजिंठयाविषयी सांगण्या-बोलण्यासारखं इतकं काही मला मिळालं की कितीही लिहीलं तरी शब्द तोकडे पडतील. संध्याकाळी परतताना वाटत होतं की अजूनही या शिल्पचित्रांकडून पुष्कळ काही समजून घ्यायचं, पाहायचं राहून गेलंय. माझी रितेपणाची ही भावना लिहीताना अजिंठयाला भेट देऊ इच्छिणाऱ्यांना मला एकच सांगायचंय, ते म्हणजे अजिंठा हा आपला अमूल्य ठेवा आहे, तेव्हा तो पाह्यला जाताना मोठया आदरानं गेलं पाहिजे. पुन्हा तिथं काही कोरणं, कचरा करणं म्हणजे त्या कलाकारांचा व कलाकृतींचा अपमानच. जेव्हा वर चढून जाल तेव्हा दमलेल्या अवस्थेत कोणत्याही गुहेत जाऊ नका, कारण आपल्या जोराच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारी आर्द्रताही या चित्रांना घातक ठरू शकते. या शिल्प-चित्रांना जपण्यासाठी, जोपासण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी जिवाचे रान करत आहेत. या कामगिरीत आपणही असा हातभार नको का लावायला?

--

अजिंठा येथील गुहांची यादी

पहिला टप्पा : ख्रिस्तपूर्व दुसरे शतक ते ख्रिस्तपूर्व पहिले शतक लेणी क्र. 9 व 10 : चैत्यगृह लेणी क्र. 12, 13 व 15 अ : विहार
दुसरा टप्पा : इसवी सन 5 ते 6वे शतक लेणी क्र. 19, 26, 29 : चैत्यगृह लेणी क्र. 1 ते 7, 11, 14 ते 18, 20 ते 25, 27 व 28 : विहार
अपूर्ण लेणी : 3, 5, 8, 23 ते 25, 28 व 2
--
कसे जावे अजिंठयाला?
मुंबई- अजिंठा अंतर : जळगावमार्गे 491 कि.मी., मनमाडमार्गे 487 कि.मी. व पुणेमार्गे 499 कि.मी.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने औरंगाबाद व जळगाव येथून साध्या व लक्झरी गाडयांची सोय, अन्य खाजगी टूर ऑपरेटर कंपन्यांतर्फेही मुबलक वाहन सुविधा उपलब्ध.
नजीकचे रेल्वे स्थानक : मध्य रेल्वेचे जळगाव स्थानक (58 कि.मी.), औरंगाबाद (107 कि.मी.)
नजीकचे विमानतळ : औरंगाबाद 108 कि.मी.
राहण्याची सुविधा : अजिंठा, फर्दापूर तसेच औरंगाबाद येथे एमटीडीसीची पर्यटक निवासस्थाने व हॉटेल्स आहेत. औरंगाबाद येथे आयटीडीसीचेही निवासस्थान. त्याखेरीज औरंगाबाद, जळगाव येथे अनेक खाजगी हॉटेल्स, लॉज उपलब्ध.

रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

मनाची मशागत

उत्क्रांतीनंतरच्या कालखंडात मानवाच्या प्रगतीची सुरवात ही खऱ्या अर्थानं शेतीपासून झाली. सुरक्षिततेसाठी टोळया करून राहणाऱ्या मानवानं उपजिविकेसाठी शेती करण्यास प्रारंभ केला आणि एका वेगळया संस्कृतीची मूळ या पृथ्वीतलावर रुजली. मातीची मशागत करत मानवानं तेथपासून आजतागायत आपल्या प्रगतीचा विस्तार केला. पुढं त्याला औद्योगिकीकरणाची, माहिती तंत्रज्ञान क्रांतीची जोड मिळत गेली असली तरी या सर्व प्रगतीचा मूळ पाया हा शेतीकरणात होता, किंबहुना आजही मानवी जीवनाचा प्रमुख पाया हा शेतीच आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
जमिनीची मशागत करण्याचा शोध लावण्यामागं मानवाची विचारशक्ती ही खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. विचार करण्याची, आपल्या भावभावना वेगवेगळया माध्यमांतून व्यक्त करण्याची, अभिव्यक्त होण्याची शक्ती मानवाला लाभली. त्याचा प्रगत होत जाणारा, अधिकाधिक विचारक्षम होत जाणारा मेंदू हा त्यामागं आहे. या विचारशक्तीच्या, मन:शक्तीच्या बळावर माणसानं साऱ्या पृथ्वीवर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. इतर प्राण्यांना एकतर त्यानं आपला गुलाम केलं किंवा त्यांची निवासस्थानं असलेली अरण्यं प्रगतीच्या नावाखाली गिळंकृत करून त्यांच्या आस्तित्वालाच धक्का पोहोचवला. कित्येक वनस्पती-प्राण्यांच्या स्पेसीज त्यानं आजपर्यंत नष्ट करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
मानवाचं मन हे एक असं प्रकरण आहे की सातत्यानं ते आपल्या प्रगतीसाठी (की स्वार्थासाठी?) सातत्यानं वेगवेगळया क्लृप्त्या शोधण्यात मग्न असतं. मानवी जीवनाच्या इतिहासाच्या सुरवातीपासून पाहिलं तर असं लक्षात येईल की मातीची मशागत सुरू होण्यापूर्वी मानवाच्या मनाच्या मशागतीला सुरवात झाली होती. ही प्रक्रिया आजतागायत अखंडितपणे सुरू आहे. मानवाच्या सो कॉल्ड प्रगतीला त्यानं केलेली मनाची मशागतच पूर्णत: कारणीभूत ठरली आहे. काहीवेळा ही मशागत चुकीच्या मार्गानं गेली आणि मानवी इतिहासाला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडून गेल्या आणि जिथं उत्तम मशागत झाली त्यावेळी अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टी मानवी इतिहासात नोंदल्या गेल्या.
म्हणजेच लौकिकार्थानं मानवी संस्कृतीची सुरवात ही मातीच्या मशागतीपासून सुरू झाली, असं आपण ढोबळ मानानं मानत असलो तरी त्यापूर्वी त्याच्या मनाच्या मशागतीपासूनच, त्याच्या विचार करण्याच्या शक्तीमधूनच त्याच्या पुढील वाटचालीचा मार्ग मानव शोधत गेला, चोखाळत गेला, असं म्हणता येईल.
मानवाच्या या प्रगतीला विज्ञानाच्या विविध शोधांनी नवे आयाम प्राप्त करून दिले. औद्योगिकीकरणानं तर त्याच्या आकांक्षांना भरारी मारण्यासाठी नवे पंख दिले. कष्ट करून जीवनाची वाटचाल साध्यासरळ पध्दतीनं करणाऱ्या मानवाला औद्योगिकीकरणानं कमी कष्टात भरपूर सुखं मिळविण्याचा राजमार्ग दाखवला. त्या मार्गानं वेगवान वाटचाल करणाऱ्या मानवानं मग इकडंतिकडं न पाहता केवळ भौतिक सुखांची पाठ धरली. लाइफस्टाइल अधिकाधिक उच्च दर्जाची करण्याकडं त्याचा कल वाढला, अधिकाधिक भौतिक सोयीसुविधा आणि साधनांच्या तो मागं लागला. मानवाला या दिखावटी, कचकडयाच्या दुनियादारीचा मोठा मोह पडला आहे. विवध माध्यमांमधून हीच लाइफस्टाइल खरी आणि योग्य म्हणून या महागडया लाइफस्टाइलचं प्रचंड स्तोम माजवत मार्केटिंग सुरू आहे. या गोष्टी पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या अथवा परवडणाऱ्या आणि न परवडणाऱ्या अशा सर्व प्रकारचे लोक तिचा स्वीकार करत आहेत. स्वीकार न करणारे लोकही तिला प्रतिकार अथवा प्रतिवाद करू शकत नाहीत, इतकी तिचा भुरळ समाजमनावर पडली आहे. अशा गोष्टींच्या मागं लागत असताना मानवतावाद किंवा माणुसकी मात्र मागं पडू लागली आहे, ही खेदाची बाब आहे.
मानवी मन काळाबरोबर प्रगत आणि प्रगल्भ होत गेलं असलं तरी आज या प्रगल्भतेलाही संकुचिततेची एक काळी किनार लाभताना दिसत आहे. माणूस भौतिक अर्थानं कितीही मोठा होत गेला तरी मनानं मात्र आक्रसत असलेला दिसतो आहे. आजचा जमाना शहरीकरणाचा आहे, मात्र शहरात माणसं वाढत चालली असली तरी या शहरांतून माणुसकी मात्र हद्दपार होत चाललेली दिसते. जागतिकीकरणानं या शहरी माणसाला लाइफस्टाइलच्या एका अभेद्य चक्रव्यूहात असं काही बांधून टाकलं आहे की तो अखंडितपणे फिरत राहिला तरी तो भेदणं त्याला शक्य होत नाही. या लाइफस्टाइलच्या नादाता आणि स्वत:च्या व्यापात तो इतका गुंतून गेला आहे की स्वत:चा शेजारी कोण, हेही त्याला माहित नसतं. माहिती तंत्रज्ञानानं जगात मोठी क्रांती झाली. मार्शल मॅक्लुहानच्या म्हणण्यानुसार सारं जग एक खेडं बनलं. सारं जग जवळ आलं, मात्र आपला शेजारी मात्र दुरावला. आता हे दुरावणं शेजाऱ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही तर मोबाईल क्रांतीनं त्याच्याही पुढची मजल मारली आहे. घरातल्या माणसांतही आज संवाद राहिलेला नाही. मोबाईल कंपन्यांना पैसे देऊन त्यावरून एकमेकांशी तासंतास गप्पा मारणारी मंडळी समोरासमोर आल्यावर हाय-हॅलो च्या पलीकडं सरकू शकत नाहीत, ही या माहिती क्रांतीच्या युगातली सर्वात खेदजनक अशी बाब आहे.
सर्व प्रकारच्या नात्यांना आपण हाताच्या अंतरावर ठेवता ठेवता काही किलोमीटरपर्यंत नेऊन ठेवतो आहोत. कोणालाही कोणाविषयी ऍटेचमेंट राहिली नाही. नात्यांचे बंध-अनुबंध सुटे होत चालले आहेत. एकत्र कुटुंबं तर आता टीव्हीवरच्या मालिकांपुरतीच आणि ती सुध्दा एकमेकांविषयी द्वेषभाव जोपासण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहेत. सर्वच नातीगोती आपण व्यावहारिक पातळीवर नेऊन ठेवली आहेत. आईबापाचं नातंही त्याला अपवाद राहिलेलं नाही. आईबाप जे करतात, ते त्यांचं कर्तव्य असतं. मुलं जन्माला घातली तर ही कर्तव्यं त्यांनी पार पाडायलाच हवीत, अशी भावना आजच्या मुलामुलींमध्ये बळावत चाललेली दिसते. आईवडलांविषयी एवढी कृतज्ञता असेल, तर अन्य नात्यांच्या विषयी बोलायलाच नको? निस्वार्थ मैत्र तर हल्ली पाहायलाच मिळत नाही. मिळालेल्या मोकळिकीला स्वैराचाराचं आणि पुढं व्यभिचाराचं रुप येताना दिसतं आहे. आणि त्याचंही कुणाला काही वाटेनासं झालंय, इतका कोरडेपणा सर्वत्र निर्माण होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर लोकांचा कल देवाकडं वाढू लागलाय, ही चांगली बाब आहे, असं म्हणावं तर त्यातही भक्तीपेक्षा स्वार्थाचाच अधिक वास येतो. धकाधकीच्या जीवनातली वाढती असुरक्षितता ही त्याला सर्वाधिक कारणीभूत असल्याचं दिसतं. गरीबाला जिथं पोट भरण्यासाठी पोटोबाच्या मागं धावावं लागतं, तिथं पोटं भरलेल्या, करू भागलेल्या लोकांनी अशा लोकांनाही आपल्याबरोबर या देवाच्या भजनी लावण्याचा उद्योग चालवलाय. या जाळयात सारेच सापडू लागलेत. प्रसारमाध्यमंही अशा प्रवृत्तींचं उदात्तीकरण करू लागली आहेत. त्यामुळं डोळे झाकून अशा लोकांचं अनुकरण करणाऱ्याचं प्रमाणही वाढीस लागलं आहे.
अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आपली डोकी गहाण ठेवली आहेत की काय, असा प्रश्न भेडसावू लागला आहे. माणसानं सुरवातीच्या टप्प्यापासून आपल्या मनाची जी मशागत केली होती, ती मनाची जमीन क्षारपड होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दुसऱ्यांच्या चकचकीत मानसिक गुलामगिरीच्या मॉलमधला माल उसना घेण्यापेक्षा आपल्या मनाच्या जमिनीवर सातत्यानं विचार करून जितकं मिळेल तितकं पीक आपण घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. व्यक्तीगत पातळीवर ही प्रक्रिया सुरू झाली तरच तिला एखादेवेळेस सामूहिक, सामाजिक शक्तीचं स्वरुप प्राप्त होईल. अन्यथा ज्या चाकोरी मोडत, उध्वस्त करत आपण वाटचाल करत इथवर आलो आहोत, पुन्हा त्या चाकोरीमध्ये बांधून टाकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवाच्या सर्वच पातळीवरील प्रगतीच्या वाटा त्यामुळं अधिक व्यापक होतीलच शिवाय त्या वाटचालीला एक ठोस असं अधिष्ठान प्राप्त होईल.
माती हाच शेतीचा जीव की प्राण. पण माणसाच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्तीमुळं मातीचा कस कमी होत चालला आहे आणि मातीशी नातं सांगमारी माणसंही कमी होत चालली आहेत. मातीचा कस आणि तिच्याशी इमान कायम राखण्याचं मोठं आव्हान आपल्यापुढं आहे. हावरटपणामुळं मातीचा कस जसा कमी होत आहे, तशी नातीसुध्दा दुरावत चालली आहेत. मातीचं आणि नात्यांचं सारखंच आहे. अधिकारांविषयी आपण फार जागरूकता दाखवतो; कर्तव्यांना मात्र सोयीस्कररित्या विसरतो. जमिनीतून वारेमाप पीक घेताना तिला योग्य त्या प्रमाणात आणि योग्य ते घटकही परत द्यावे लागतात. पण आपण ते देत नाही. तसंच नात्यांच्या व्यवहारात आपण फक्त अधिकार जाणतो, कर्तव्यच विसरतो. हीच सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून आता दोन्ही ठिकाणी नव्यानं खतपाणी आणि मशागतीची आवश्यकता आहे.

रविवार, ३० जानेवारी, २०११

निर्मलाताईंची 'निर्मल' मोहीम


एक मध्यमवर्गीय गृहिणी... अभियंता पती, तीन मुलं एवढंच तिचं विश्व... इतरांप्रमाणंच तीही वाढत्या महागाईनं त्रस्त... इतरांहून फरक इतकाच की वाचनामुळं आणि पूर्वाश्रमीच्या शेतकरी कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळं सामाजिक अन् पर्यावरणविषयक जाणीवा तीव्र झालेल्या... त्यातून ती स्वत:चं घर कचरामुक्त करून त्यापासून गांडूळखत, गॅस तयार करण्याच्या मागे लागते... तिच्या या प्रयत्नांना यश येतं... या यशानं हुरूप वाढून ती हळूहळू आपली कार्यकक्षा वाढवते... आणि तिच्या प्रकल्पाला वीजनिर्मितीचीही जोड लाभते... घरापासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा केवळ पाच वर्षांतच सव्वादोन कोटीची उलाढाल असणाऱ्या 'विवम् ऍग्रोटेक'च्या रुपात देशभर विस्तार झाला... आणि या प्रकल्पांना देशातीलच नव्हे तर जगभरातील तज्ज्ञांकडून प्रशंसेची पोचपावती मिळाली. ही यशोगाथा आहे औरंगाबादच्या निर्मला कांदळगावकर यांची.
निर्मलाताईंचं शिक्षण बीएस्सी. त्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात एम. ए. ही केलं. पर्यावरण विषयाची सुरवातीपासूनच आवड. त्यामुळं दिल्ली विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्राची पदविका परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. वाचनाची त्यांना मोठी आवड. या आवडीपोटी शेती, पर्यावरण या विषयावर पुष्कळ वाचन केलं, अभ्यास केला. आपल्या दैनंदिन बेजबाबदार वर्तनातून आपण पर्यावरणाला किती हानी पोहोचवत आहोत, याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेतूनच शेतकरी व पर्यावरण या दोन्ही घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, या भावनेनं त्यांना अस्वस्थ केलं. अभ्यासाअंती त्यांना मार्गही सापडला. हा मार्ग होता गांडूळ खतनिर्मितीचा.
गांडूळखत निर्मिती :
पारंपरिक पध्दतीतील तोटे दूर करून निर्मलाताईंनी स्वरुप गांडूळ खत निर्मिती संयंत्राची निर्मिती केली. यात कमी श्रमात व कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यापासून खत तयार करता येते. शेतकरी आपल्या शेतातील कचरा, शेण वापरून शेतातच खत तयार करू शकतात. खत उत्तम प्रकारचे व शुध्द असल्यामुळे, पीक चांगले येतेच, शिवाय जमिनीचा पोतही सुधारतो. निर्मलाताईंच्याच शब्दांत सांगायचे तर रासायनिक खताचा वापर न केल्याने अगदी विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खामखेडासारख्या गावात महिलांनी बचतगट स्थापन करून गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही अथवा श्रमही जास्त पडत नाहीत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचे एक साधन सुरू झाले आहे.
शहरातील कचरा, त्याच्या विल्हेवाटीची अशास्त्रीय पध्दत, त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान व पर्यायाने मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांवरही गांडूळखत हा योग्य व शास्त्रीय उपाय होऊ शकतो, असे निर्मलाताईंच्या लक्षात आले. शहरी कचऱ्याचेही गांडूळखतात रुपांतर करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे जिथे कचरा निर्माण होतो, तिथेच त्याचे गांडूळखत केले तर खर्च कमी होतोच, आणि कचरा रस्त्यावरही जाणार नाही व परिसरही स्वच्छ राहील, असे त्यांना वाटले. त्यामुळे घरात तयार होणारा कचरा वेगळा केला तर त्यातील कुजणाऱ्या कचऱ्यापासून गांडूळखत होऊ शकते आणि न कुजणाऱ्या प्लास्टीकसारखा कचरा पुन्हा वापरात येऊ शकतो. ही बाब लक्षात येताच त्यांनी घरातील कचऱ्यापासून गांडूळखत तयार करणारे छोटे मॉडेल तयार केले. या कचऱ्यात विशिष्ट जीवाणू घातले की त्याचा वासही येत नाही, त्यामुळे ते घरात ठेवले तरी त्यात कचरा असल्याचे लक्षात येत नाही. निर्मलाताईंनी औरंगाबादच्या घरातच गांडूळखत उत्पादन, त्यासाठी लागणारी यंत्रे व गांडुळांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी बनविलेल्या 'स्वरुप' गांडूळखत निर्मिती संयंत्राच्या साह्याने एका महिन्यात 1 ते 1.5 टन गांडूळखत बनविता येते. गॅल्व्हनाइज्ड जाळी आणि लोखंडापासून त्यांनी घडी पध्दतीचे संयंत्र बनविले आहे. त्यामुळे ते कोठेही नेण्यास सोपे आहे. आपल्या घरातील एक किलोच्या कचऱ्यापासून ते दरमहा 75 टन गांडूळखत बनविणारी प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या उभारले आहेत. आज केवळ पाच वर्षांत नेपाळपासून, पंजाब, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील 222 तालुक्यांत त्यांचे प्रकल्प पोहोचले आहेत. पाच हजारहून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. एकटया औरंगाबाद शहरात हे गांडूळखत निर्मिती संयंत्र घेणारे सुमारे चार हजार नागरिक आणि दीडशे संस्था आहेत.
निर्मलाताईंच्या या शास्त्रीय व बहुपयोगी उपक्रमाची भारत सरकारच्या कृषी खात्यानेही दखल घेतली असून दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. तसेच त्यांच्या स्टॉलसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली. राज्याच्या तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक शासकीय उपक्रमांच्या जागेवर (उदा. कृषी, वनीकरण आदी) तसेच अनेक मान्यवरांच्या घरांतही निर्मलाताईंची स्वरुप संयंत्रे बसविण्यात आली आहेत. याठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे म्हणजे गांडूळखताच्या प्लँटमधून गांडूळपाणी मिळवले तर ते एक अत्यंत उपयुक्त कीटकनाशक आहे आणि त्याचे अन्य दुष्परिणामही नाहीत.
बायोगॅस निर्मिती :
गांडूळखत निर्मितीनंतर काय, हा प्रश्न पुढे निर्मलाताईंना पडलाच नाही. कारण त्याचे उत्तर त्यांनी शोधून ठेवले होते, ते म्हणजे बायोगॅस निर्मिती. घरातील कचऱ्याचे त्यांनी सुका कचरा, ओला कचरा आणि नष्ट न होणारा कचरा असे वर्गीकरण केले. भाजी, फळे, निर्माल्य, नारळाच्या शेंडया, कांद्याची टरफले थोडक्यात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पदार्थांचे उरलेले भाग, कागदाचे तुकडे- हा झाला हिरवा कचरा. यापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत निर्माण होते. त्यानंतर जेवणाच्या ताटातील, भांडयातील उष्टे अथवा शिल्लक अन्नपदार्थ, चहाच्या पातेल्यातला चोथा, खरकटे पाणी हा झाला ओला कचरा. हा कचरा बायोगॅसच्या संयंत्रामध्ये टाकून गॅस तयार केला जातो. तो गॅस पाइपच्या साह्याने स्वयंपाकघरात आणून थेट वापरता येतो. नष्ट न होणाऱ्या सुक्या कचऱ्यात रिकाम्या बाटल्या, टयूब, खराब बल्ब, प्लास्टीकचे तुकडे व पिशव्या, धातू, काच यांचा समावेश होतो. या वस्तू आपण भंगारवाल्याला देऊ शकतो. त्याच्या विक्रीतून पैसा मिळू शकतो. याठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे घरातील कोणताच कचरा या पध्दतीमुळे डंपिंग ग्राऊंडवर जाणार नाही. तयार होणारे गांडूळखत 10 रुपये प्रतिकिलो या दराने विकले जाते. खरकटया पाण्यापासून बायोगॅस मिळतो. त्यामुळे गॅसची बचत होते.
साधारण सकाळी दोन किलो अन्न व सायंकाळी दोन किलो अन्न बायोगॅस संयंत्रात टाकले तर त्यापासून 3 तास पुरेल एवढा गॅस मिळतो. त्याची ज्योतही निळया रंगात जळते. निर्मलाताईंनी त्यांच्या घरातच या गॅसचं प्रात्यक्षिकच आम्हाला दाखवलं. शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्रात्यक्षित पाहण्यासाठी त्यांच्या घरी येऊन गेले आहेत.
या गॅसला कोणताही वास येत नाही. त्याचप्रमाणे त्या स्फोट होण्याचीही भिती नाही. जमिनीमधला मिथेन वायू काढून जाळण्याऐवजी कचऱ्यापासून निर्माण होणारा मिथेन वापरणे कधीही हितावहच ना!
आज राज्यभरात बसविलेल्या विवम् ऍग्रोटेकच्या संयंत्रांमधून दररोज सुमारे 500 टन कचऱ्याचे गांडूळखत अथवा बायोगॅसमध्ये रुपांतर होत आहे. यामध्ये आणखी भरच पडत आहे. औरंगाबादसह राज्यात 50 शहरांत असे बायोगॅसचे प्रकल्प बसविले आहेत. पुणे महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 11 नगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयातील कॅन्टीनसह अनेक शासकीय इमारती, खासगी कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये ही संयंत्रे बसविली आहेत. प्रतिष्ठेच्या आयएसओ मानांकन मिळवण्यासाठीही अनेक कंपन्या आता हे संयंत्र बसविण्याला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. हॉटेल, धाबे यांनाही डंपिंग ग्राऊंडऐवजी असा प्रकल्प परवडतो.
निर्मलाताईंनी नुकताच चंद्रपूर नगरपरिषदेसाठी बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित केला आहे. गंजवार्ड भाजी मार्केटमधील रोजच्या 1500 किलो कचऱ्यावर येथे प्रक्रिया करण्यात येते. त्यातून निर्माण होणारा गॅस शेजारच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या कॅन्टीनला देण्याची योजना आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प स्वर्णजयंती महिला बचत गटामार्फत चालविला जातो.
वीजनिर्मिती प्रकल्प :
केवळ बायोगॅस निर्मितीवर निर्मलाताई थांबल्या नाहीत. त्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. याअंतर्गत जनरेटरमध्ये (डिझेलऐवजी बायोगॅस प्रकल्पांत तयार होणारा) बायोगॅस वापरला जातो. आज वीज तयार करण्यासाठी कोळशाचे ज्वलन केले जाते. यासाठी ऑक्सिजन मोठया प्रमाणात जळतो. ऑक्सिजनची किंमत पाहायला गेलो तर ती 36 रुपये प्रतिकिलो आहेच, पण जीवनासाठी अनमोल आहे. अशा वीजनिर्मितीचा खर्च ऑक्सिजनच्या किंमतीसह 120 रुपये प्रतियुनिटपर्यंत असू शकतो. मात्र कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा खर्च 3 रुपये प्रतियुनिट इतका असतो आणि प्रकल्पही पूर्णत: पर्यावरण सुसंगत.
नांदेड येथील केळी मार्केटमध्ये एक बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. तिथल्या केळीच्या लिलावानंतर उरणारे देठ, बुंधे, पाने असा रोजचा 1500 किलो कचरा प्रकल्पात टाकला जातो. याठिकाणी वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव आहे. याखेरीज चंद्रपूर नगरपालिका, वर्धा नगरपालिका, पंढरपूर नगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, रामटेक नगरपालिका व कागल नगरपालिका या ठिकाणी दीड ते पाच टनांपर्यंतचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोकणात चिपळूण आणि विदर्भात अंजनगाव- सुर्जी येथेही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
निर्मलाताईंच्या कार्याची आज अनेक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. जागतिक बँकेचे अधिकारीही त्यांचे काम पाहून प्रभावित झाले आहेत. केंद्र शासनाने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या स्टॉलला मोफत जागा उपलब्ध केलीच शिवाय ठिकठिकाणी त्यांची मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली. महाराष्ट्र शासनाने कृषी सल्लागार समितीमध्ये स्थान देऊन त्यांच्या कामाचा सन्मान केला आहे. नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांत बायोगॅस व गांडूळखत या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाते. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा पुरस्कार, माँसाहेब मीनाताई ठाकरे विशेष गौरव पुरस्कार, बेस्ट प्रोजेक्ट पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विविध नगरपालिकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याच्या कामाचा ओघही त्यांच्याकडे पुष्कळ आहे.
'आधी केले, मग सांगितले' अशा वृत्तीने निर्मलाताईंनी कचऱ्यापासून वीजनिर्मितीपर्यंतचा टप्पा गाठला आहे. यापुढे सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याबरोबरच 'व्हर्मीकंपोस्टिंग' या विषयावर पीएच. डी. करण्याचा त्यांचा मानस आहे. शाळा व मंदिरे याठिकाणी प्रबोधन शिबिरे घेण्याचे प्रमाणही त्या वाढविणार आहेत. अत्यंत साधी राहणी, मनमोकळं बोलणं यामुळं आपलंसं करणारं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या निर्मलाताई आजही 'जमिनीवर'च असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवतं. या जमिनीचे उपकार फेडण्यासाठी त्यांचे प्रयत्न अथक सुरू आहेत. त्या प्रयत्नांत आपणही सहभागी होण्याची गरज आहे.

बचतगटांना काम
चंद्रपूर येथील बायोगॅस प्रकल्पाचे काम महिला बचत गटाकडे सोपविण्यात आले आहे. या महिला सायकलवरुन कचरा गोळा करतात. प्रत्येक महिलेकडे साधारण 250 घरे आहेत. घरगुती स्तरावरच कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यांच्या ताब्यात मिळते. यामध्ये हिरवा भाजीपाला, अन्य सुका कचरा व ओला कचरा असा त्या गोळा करतात. प्रत्येक घरातून दरमहा दहा रुपये त्यांना मिळतात. जर कोणी ही मामुली रक्कम देण्यासही का- कु केले तर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे संबंधिताची तक्रार करण्याची मुभा त्या महिलेला असते. दरम्यान गोळा केलेल्या कचऱ्यातील हिरवा कचऱ्यापासून गांडूळखत केले जाते. प्लास्टीक, धातू, काच, बाटल्या वगैरे सामान विकूनही या महिलेला पैसे मिळतात. त्यामुळे कचरा गोळा करण्याचा मोबदला, गांडूळखत विक्री व भंगार विक्री यातून महिन्याकाठी तिला तीन ते चार हजार रुपये सुटू शकतात. तसेच त्यासाठी संपूर्ण दिवस न राबता केवळ चार तास द्यावे लागतात, अशी माहिती निर्मलाताईंनी दिली.
--
संपर्कासाठी पत्ता :
निर्मला कांदळगावकर,
विवम् ऍग्रोटेक,
ए-6, वेदांत गृहकुल, नवे श्रेयानगर,
औरंगाबाद, 431 005.
दूरध्वनी क्र. 0240- 2346532, 2321863
इ-मेल : vivamgroup@rediffmail.com
वेबपेज : http://vivamgroup.tripod.com