बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

निखळ-१८: ...तो ‘बाप’च असतो!




 (दैनिक 'कृषीवल'मध्ये 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत सोमवार, दि. २३ सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख...)
एका जवळच्या पत्रकार मित्राचा नुकताच फोन येऊन गेला. तो बीजेसी परीक्षा पास झाला होता. ही आनंदाची बातमी शेअर करण्यासाठीच त्यानं फोन केलेला. त्याच्या या आनंदाला अनेक कारणं होती. या परीक्षेमुळं त्याचं काही अडलं होतं, अशातला भाग नाही कारण जवळजवळ गेली १८ वर्षं तो पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे आणि एका मोठ्या दैनिकात संपादकीय टेबलवरच्या साऱ्या जबाबदाऱ्या तो समर्थपणे सांभाळतोय. पण आपल्याकडं पत्रकारितेची पदवी नाही, याचा सल त्याच्या मनी होता. अधूनमधून तो तसं बोलूनही दाखवायचा. मग त्यानं प्रत्यक्ष प्रयत्न करायला सुरवात केली. तो यंदा पास झाला असला तरी गेली पाच वर्षं नित्यनेमानं तो परीक्षेचा फॉर्म भरायचा आणि नेमका परीक्षेच्या काळातच ऑफिसचं काही काम निघायचं आणि तो परीक्षा देऊ शकायचा नाही. यंदा मात्र तो परीक्षेला बसला अन् पास झाला. हे आनंदाचं एक कारण होतं.
बोलता बोलता त्यानं आणखीही एक गोष्ट सांगितली, की ज्यामुळं खरं तर मी त्याच्या पास होण्याच्या आनंदापेक्षा अधिक भारावलो. ती गोष्ट म्हणजे, जेव्हा त्यानं आपण पास झाल्याचं त्याच्या वडिलांना फोन करून कळवलं, तेव्हा त्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलंच, पण लगोलग त्याला पाच हजार रुपयांचं बक्षीसही देणार असल्याचं जाहीर केलं. हे त्यानं सांगताच, मी म्हटलं, क्या बात है..! मुलगा गेल्या २० वर्षांपासून चांगल्या नोकरीत आहे, पन्नासेक हजार रुपये पगारही मिळवत असेल, अशा परिस्थितीत वडिलांनी जाहीर केलेलं बक्षीस ही फार मोठी गोष्ट वाटली मला. मी मित्राला म्हटलं, तुझ्या पास होण्यापेक्षा मला तुझी वडिलांसोबतची इतकी वर्षं कायम असलेली केमिस्ट्री खूप मोलाची आणि महत्त्वाची वाटते. इतर कुठलाही मोठ्यात मोठा पुरस्कार मिळवलास तरी वडिलांच्या या बक्षीसाची सर त्याला येणार नाही. या गोष्टीसाठी खरंच तुझं मनापासून अभिनंदन!
वडिलांनी किती रुपयांचं बक्षीस दिलं, याला इथं काहीच महत्त्व नाही; महत्त्व आहे ते भावनेला आणि हळूवार जपल्या गेलेल्या रिलेशनशीपला! बाप-लेकामध्ये असं निर्व्याज प्रेम फार क्वचित पाह्यला मिळतं. (निदान माझा इतरांच्या बाबतीतला अनुभव तसा आहे.) बापाच मुलीवर आणि आईचं मुलावर असणारं प्रेम सर्वश्रुत आहे, पण बाप-लेकाचं पटण्यापेक्षा, न पटण्याचे प्रसंगच अधिक असल्याचे दिसतात. माझ्या एका जवळच्या नातेवाइकांचंच उदाहरण सांगतो. बाप गरीब परिस्थितीतून मोठ्या कष्टानं शिकला. त्यातून पुढं मोठा सरकारी अधिकारी झाला. मुलांसाठी हयातभर खस्ता खात राहिला; पण मुलांच्या दृष्टीनं मात्र तो केवळ पैसा पुरविण्याचं साधन मात्र बनून राहिला. गरीबीची झळ आपण सोसली, ती आपल्या मुलांना सोसायला लागू नये, म्हणून बाप कष्टतच राहिला आणि कोणतीही झळ न पाहिलेली ती मुलं मात्र त्याच्या अंतरीची तळमळ जाणूच शकले नाहीत, किंबहुना तशी त्यांना गरजच भासली नाही. उलट, घरातल्या कोणत्याही चर्चेचा शेवट ह्यांना काही समजतच नाही, असं त्या बापावरच थोपवून होत असे. बाहेरच्या जगात सर्वार्थानं बाप असणाऱ्या ह्या बापाला समजून घेण्यात त्याची मुलं मात्र कमी पडली होती. हा बापही खरा बापमाणूसच असल्यानं आपल्या मुलांकडून होणारी खिल्लीही तो एन्जॉय करायचा; उलट माझे पाय जमिनीवर राहण्यासाठी मला बाहेर कुठं जावं लागत नाही, असं त्यांचं याविषयी म्हणणं असायचं. असा विचार एक बापच करू शकतो.
याच्या उलट दुसरं उदाहरण माझ्या वडलांचंच देता येईल. मला का कोणास ठाऊक मम्माज् सन म्हणवून घेण्यापेक्षा पापाज् ब्वॉय म्हणवून घ्यायला खरंच आवडतं. माझ्या बाबांनीही खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतलं. कधी कधी घरात अन्नाचा कण नसायचा. तेव्हा आजी जाऊ द्यायची नाही, म्हणून तिला न सांगताच दिवसभर शेतात कामाला जायचे आणि रात्री पसाभर शेंगा आणि मिळालेल्या कमाईतनं ज्वारी घेऊन घरी परतायचे. मग आजी डोळ्यांत पाणी आणून त्याच ज्वारीचं पिठलं आणि त्याचीच भाकरी करून पोराला खाऊ घालायची. अशा परिस्थितीतून आमचा बाप प्राध्यापक झाला, पीएच.डी. डॉक्टर झाला. या गोष्टीचा मला निश्चितपणानं अभिमान आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला दिली ती म्हणजे परिस्थितीची जाणीव. आपल्या मुलांना कुठल्याही बाबतीत काही कमी पडू नये, याची दक्षता घेत असतानाच सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचं भान त्यांनी माझ्या मनात पेरलं. कुठल्याही मोहापासून अलिप्त राहण्याची ताकत मला त्यांच्याकडं पाहून मिळते. मला आजही माझ्याकडं असलेल्या कोणत्याही वस्तूंबद्दल वृथा अभिमान वाटत नाही कारण त्याचं मूळ माझ्या आईबापाच्या कष्टांत आहे, हे मी सदोदित मनी जाणून असतो. जेव्हाही कधी माझ्यावर प्रार्थना करायची वेळ येते, तेव्हा, अधिक काही नाही मिळालं तरी चालेल, पण आईबापानं शून्यातून निर्माण केलेलं हे छोटंसं विश्व सांभाळण्याचं सामर्थ्य मात्र माझ्या अंगी येऊ दे, एवढंच माझं मागणं असतं. आणि आतापावेतो तेवढं माझ्याकडून साध्य झालं आहे.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जेव्हा मी बाबांना विचारतो, तेव्हा तुला जे योग्य वाटेल ते कर. असं त्यांचं मला सांगणं असतं. त्यामुळं आपल्याकडून काही अविचार होणार नाही, चुकीची कृती घडणार नाही, याची जबाबदारीही आपोआपच माझ्यावर येते. त्यामुळं सारासार विचार करण्याची सवयच लागून गेली. हां, आता कधी कधी भावनेच्या भरात काही अविचारी कृत्य घडून जातं, पण ते निस्तरण्याची जबाबदारी मी झटकून देत नाही, ही सुद्धा त्यांचीच देणगी. चांगल्या कृतीला ॲवॉर्ड आणि वाईटाला फटके, अशा वडिलांच्या वर्तणुकीमुळं आमच्या बेशिस्त आयुष्याला काही तरी वळण लागलं, हे नाकारण्यात काय हशील?

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

निखळ-१७: आनंदाचे डोही...!



 
(सोमवार, दि. ९ सप्टेंबर २०१३ रोजी 'दै. कृषीवल'मधील 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत प्रकाशित झालेला माझा लेख...)
दै. कृषीवलच्या तमाम वाचकांना गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आज घरोघरी मंगलमूर्ती गणरायाचं आगमन होतं आहे, आणि त्याच्या आमगनाच्या आनंदात, स्वागत सोहळ्यात आपण सारेच रममाण झालेले असाल. आपणा सर्व कोकणवासियांसाठी गणेशोत्सव हा खरं तर केवळ उत्सव नाही, तर त्याहून अधिक काही आहे. मला कोकणच्या गणेशोत्सवात एक गोष्ट नेहमी आवडते, ती म्हणजे या उत्सवाची भाविकता, त्याचं पावित्र्य जपण्याचा इथल्या स्थानिकांकडून खूप कसोशीनं प्रयत्न केला जातो. आणि चाकरमान्यांच्या आगमनामुळं या उत्सवाला जे एक स्नेहमेळ्याचं आनंदनिधान लाभतं, ते सुद्धा माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे.
मूळचा कोकणचा पण मुंबईत स्थायिक झालेला चाकरमानी मनुष्य एक वेळ दिवाळीला इकडं येईल की नाही, सांगता येणार नाही; मात्र, गणेशोत्सवाचे वेध मात्र त्याला (कदाचित रेल्वेच्या रिझर्वेशनमुळं असेल, पण) खूप आधीपासून लागलेले असतात. प्रवासात त्याला कितीही खस्ता खाव्या लागल्या तरी अखेरीस गावी पोहोचल्यावर त्याच्या मनाला लाभणाऱ्या समाधानाचं वर्णन अन्य कोणत्याच शब्दांत करता येऊ शकणार नाही. त्याच्या मनःस्थितीचा अनुभव त्यांनाच येईल, ज्यांनी कधी ना कधी अशा प्रकारे प्रवास करून उत्सवासाठी दाखल व्हावं लागलं आहे. आणि हो, त्याला अपवाद कमीच असतील, कारण कधी ना कधी इथल्या प्रत्येक चाकरमान्यानं तशा खस्ता खाल्लेल्या असतातच. मात्र हे सारं काही देवासाठी किंवा उत्सवासाठीच तो करतो का, असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या मनाचा मला संमिश्र कौल मिळतो. कारण जो देव मानतो, त्याच्यासाठी तो नाकारण्याचा अधिकार कुणालाच नाही. (आणि नाकारला तरी तो ऐकतो थोडंच?) केवळ उत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी कोकणात येतो, असं म्हटलं तरी ते त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. कारण इथल्यापेक्षा जास्त साजरीकरण तर तो जिथं राहतो, त्या मुंबईत सर्वाधिक होतं. त्यातला गणेश राहतो, मांडवापुरता आणि उत्सवाचाच जल्लोष साऱ्या मुंबईभर ११ दिवस घरंगळत राहात असलेला दिसतो. त्यामुळं ते वातावरण सोडून तो कोकणात येतो, त्याचं कारण आणखी काही वेगळं असावं, असं मला वाटतं.
कोकणी माणसाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे हा माणूस फणसासारखा असतो- वरुन काटेरी अन् आतून गोड. हा इथल्या मातीतलाच गुण म्हणा ना! तो जेव्हा भिडतो तेव्हा थेट भिडतोच आणि भेटतो तेव्हा खूप खोल- एकदम आतून. मुंबईमध्ये पोटापाण्यासाठी गेलेल्या चाकरमान्याला तिथल्या निष्ठूर दुनियेत आपल्या आस्तित्वासाठी अनेक प्रकारचा झगडा मांडावा लागत असतो. संपूर्ण वर्षभर असल्या कचकडी दुनियेत वावरल्यामुळं त्याच्यावर कदाचित त्याचीच पुटं चढण्याची शक्यता असते. पण, गणेशोत्सवाच्या निमित्तानं हा चाकरमानी इथं येतो आणि पुन्हा आपल्या पूर्वरंगात रंगून नव्या जोमानं आणखी वर्षभरासाठी आपल्या रंगील्या दुनियेत दाखल होण्यासाठी बाहेर पडतो. पण त्याच्यातल्या सामाजिक संवेदना जागत्या ठेवण्याचं, मातृभूमीप्रती त्याच्या बांधिलकीची जाणीव त्याच्या मनात जागृत ठेवण्याचं काम गणेशोत्सव करतो, असं मला वाटतं.
गावाकडच्या लोकांमध्ये वावरताना अनुभवांची देवाणघेवाण होणं आणि त्यातून नव्या पिढीसाठी दिशादर्शन करण्याचं कामही या चाकरमान्यांच्या हातून कळत नकळत होत असतं. गावातल्या एखाद्यासाठी एखादा चाकरमानी आदर्श ठरतो आणि त्याच्या प्रगतीसाठी अप्रत्यक्षपणे साह्यभूत ठरतो, असंही घडू शकतं.
मुंबईतल्या गिरणीमध्ये काम करण्यासाठी म्हणून कोकणातला माणूस सर्वप्रथम तिथं दाखल झाला. मुंबापुरीच्या प्रगतीमध्ये रक्त-घाम गाळून ज्यानं आपलं योगदान दिलं, त्या लोकांमध्ये सर्वाधिक कोकणी माणूस होता, ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकेल? अन् त्याच गिरण्या धडाधड बंद होऊ लागल्यानंतर तितक्याच वेगानं देशोधडीला लागणाऱ्यांतही हाच कोकणी माणूस सर्वाधिक होता, ही वस्तुस्थिती सुद्धा कोणी नाकारू शकणार नाही. एकेकाळी चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर जगणारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणासाठी त्याच्या रोजीरोटीवर झालेला आघात सहज पचवण्यासारखा नव्हता. तरीही कोकण त्यातून सावरला आणि कोकणी माणूस पुन्हा नव्या जोमानं आपलं आस्तित्व, स्वत्व सिद्ध करण्यासाठी पुढं सरसावला. या दरम्यानच्या काळात त्याचं बाँडिंग इथल्या मातीशी अधिक दृढ झालं आणि जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी कोकणी माणूस हे मातीचं इमान जपतो, याचं प्रत्यंतर मला इथल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून येतं. माणूसपणाच्या जाणीवा समृद्ध करण्याला, सामाजिक जाणीवेच्या कक्षा रुंदावण्याला हा उत्सव खरोखरीच साह्यभूत ठरू शकतो. त्या विकसित करण्याची क्षमता कोकणातल्या उत्सवात आहे. अन्य ठिकाणीही ती होती, पण आता ते या मूळ उद्देशापासून इतके भरकटले आहेत की, आता त्यांना त्याच्या साजरीकरणापासून आणि विकृतीकरणापासून रोखणे अशक्य आहे. काही ठिकाणी तर उत्सवाच्या नावाखाली थेट लोकांची लुबाडणूकच करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणच्या गणेशोत्सवाचं वेगळेपण आणि साधेपणातलं सच्चेपण मला खूप भावतं.
आता मुंबईचं साजरीकरणाचं लोण या भूमीवर दाखल होऊ पाहतंय. तसं झालं तर इथलं अन् तिथलं असा फरक उरणार नाही आणि कोकणची गणेशोत्सवामधली स्नेहमेळावा संस्कृतीच धोक्यात येईल, अशी मला साधार भीती वाटते. तसं होऊ नये, याची जबाबदारी आज प्रत्येक कोकणवासीय आणि प्रत्येक चाकरमान्यानं उचलायला हवी. कोकणच्या गणेशोत्सवाचं वेगळेपण, देखणेपण आणि सात्विकता जपली गेली तर मेट्रो शहरांतल्या चकचकाटालाही इथल्या उत्सवातला साधेपणा मागे सारेल. पण त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी तरी या निमित्ताने आपण कटिबद्ध होऊ या.
गणपती बाप्पा मोरया!

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

महाराष्ट्राची ‘पुरोगामी’ प्रतिमा बळकट करणारा डॉक्टर!



 ('शेती प्रगती' मासिकाच्या सप्टेंबर २०१३च्या ताज्या अंकात प्रकाशित झालेला माझा लेख...)

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जिथं विचारांचा सामना विचारांनी करता येणं अशक्य होऊन जातं, तिथं ते विचार मांडणाऱ्या डोक्यालाच उडविण्याची परंपरा (?) आपल्याला नवी नाही. त्यातून त्या तथाकथित शक्तींचं इप्सित साध्य होतं अशातला भाग नाही, परंतु संबंधित चळवळीला करकचून ब्रेक लावण्याचे काम त्यांनी साधलेलं असतं. मग अशा गतिमंद झालेल्या चळवळीवर टप्प्याटप्प्याने आघात करून संपविण्याचे पद्धतशीर प्रयत्न त्यानंतर सुरू होतात.
दाभोळकर सरांच्या हत्येमागे जादूटोणा कायद्याचे विरोधक असावेत, असा कयास सार्वत्रिकरित्या व्यक्त केला जातो आहे. तथापि, जोपर्यंत त्यांचे मारेकरी हाती लागत लागत नाही, तोपर्यंत त्या कयासाला अर्थ नाही. अलीकडेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेल्या जात पंचायत विरोधी आंदोलनामुळे अशा दुखावलेल्या, डिवचल्या गेलेल्या प्रवृत्तींचाही त्यामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आणि तत्सम सर्वच शक्याशक्यतांच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा तपास करीत असतील, अशी अपेक्षा आपण व्यक्त करू या. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना पकडून त्यांच्यासह त्यांच्या हत्येमागे असणाऱ्या तमाम कट-कारस्थान्यांना कडक शासन केले जाईल, अशी अपेक्षा आम्हासारखे सर्वच दाभोळकर चाहते व्यक्त करत आहेत.
दाभोळकर यांच्या मृत्यूमुळे पुरोगामी महाराष्ट्राचे जे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून न निघणारे आहे. किंबहुना, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ही राज्याची प्रतिमा कायम राखण्यामध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोठे होते. गेल्या ३० वर्षांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीकडे जेव्हा मी दृष्टीक्षेप टाकतो, तेव्हा त्या कालखंडातून दाभोळकर आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून चालविलेले कार्य वगळले, तर महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला केव्हाच हरताळ फासला गेला असता, असे मला राहून राहून वाटते. कारण देवाधर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात किंवा शेजारच्या राज्यांत कुठेही सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचे शोषण, लुबाडणूक सुरू असल्याचे प्रकार सुरू होत, तिथं तिथं दाभोळकर प्रकट होत असत आणि त्या जनतेसमोरच अशा शोषण करणाऱ्या, फसवणाऱ्या बुवाबाजीच्या प्रकारांना उघडे पाडत असत. त्यामुळं तिथल्या लोकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं की त्या बुवा, बाबाचं प्रस्थ तिथल्यापुरतं संपुष्टात यायचं. मात्र, पुन्हा नव्या ठिकाणी कोणीतरी नवा बाबा उपटलेला असायचा आणि लोक त्याच्याही भजनी लागलेले असायचे की पुन्हा तिथं अंनिसची टीम दाखल व्हायची. अशा पद्धतीनं अखंडितपणे दाभोळकरांनी आणि अंनिसनं पुरोगामी महाराष्ट्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपलं काम रेटलं. अंधश्रद्धेचा आणि लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत देवाच्या नावानं मध्यस्थ दलालांनी जो बाजार मांडला, त्या बाजाराला वेळोवेळी चाप लावण्याचं काम दाभोळकरांनी केलं. मात्र, हे करत असताना त्यांनी देवाधर्मावरील श्रद्धेला मात्र कधीही विरोध केला नाही. लोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा उठवत त्यांची देवाच्या नावानं जी फसवणूक चालायची, शोषण केलं जायचं, त्याला मात्र त्यांनी कसोशीनं आणि सबळ पुराव्यांनिशी विरोध केला. अशा लोकांना थेट आव्हान देत भिडण्याचं साहस डॉक्टरांनी अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्यात निर्माण केलं. त्यामुळं तमाम भक्तगणांसमोरच ज्या बाबाकडून ते नाडले जाताहेत, त्यांना त्याचा मुखवटा फाडून खरा चेहरा दाखवून दिला आणि त्यामुळं अंनिसच्या कार्याला लोकप्रियतेचं अधिष्ठान लाभलं.
डॉक्टरांनी आणखी एक गोष्ट केली ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अंनिसची शाखा सुरू झाली, त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा बुवाबाजी करणाऱ्यांना थेट भिडण्याचं धाडस निर्माण केलं, भिडण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यातून या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचं स्फुल्लिंग चेतवलं गेलं आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ व्यापक प्रमाणात यशस्वी होऊ शकली. असं असतानाही अंनिसनं कधीही अतिरेकी अथवा दुराग्रही भूमिका घेतली नाही, याचं कारण डॉक्टरांच्या संयमी, समंजस आणि सर्वसमावेशक धोरण स्वीकारण्याच्या स्वभावामध्ये होतं, असं मला वाटतं. म्हणून जेव्हा ज्ञानोबा-तुकारामांचा वारसा सांगणाऱ्या वारकऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध केला, तेव्हा दाभोळकरांनी दोन पावलं मागं जाणं सुद्धा पसंत केलं, संतांचा पुरोगामी वारसा सांगणाऱ्या वारकऱ्यांचं नेतृत्व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करणाऱ्यांनी हायजॅक केलं आहे, याची जाणीव असून सुद्धा. व्यापक समाजभावनेची दखल घेण्याचा हा डॉक्टरांचा स्वभावविशेषही वेगळाच म्हणायला हवा. पण, त्यांनी माघार घेतली असं मात्र नव्हे; गांधीजींच्या मार्गानं त्यांनी आपला विधेयकासाठीचा सत्याग्रह सुरूच ठेवला, त्यासाठी गांधीजींसारखाच हौतात्म्याचा मार्गही पत्करला. डॉक्टरांच्या या बलिदानानंतर १८ वर्षे रखडलेले विधेयक त्यांच्या मृत्यूनंतरच्या १८ तासांच्या आत मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आणि १८ दिवसांच्या आतच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ चा वटहुकूम मा. राज्यपालांनी जारी केला. या वटहुकुमाचे येत्या हिंवाळी अधिवेशनात कायद्यात अधिकृत रुपांतर होण्याच्या दृष्टीने राज्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी त्याला पाठिंबा देऊन डॉ. दाभोळकरांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी भावना व्यक्त करावीशी वाटते. त्या योगे देशाला आणखी एक नवा कायदा देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा पुन्हा झळाळून उठेल. आज ना उद्या, केंद्र सरकारलाही देशाला एकविसाव्या शतकातील माहिती तंत्रज्ञान युगात अधिक सक्षम वाटचाल करण्यासाठी या कायद्याचा अंगिकार करून देशाच्या प्रगतीत कोलदांडा घालणाऱ्यांना प्रतिगामी शक्तींना चाप घालावाच लागणार आहे.
----
काय आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३मध्ये?
उपरोक्त अधिनियमानुसार खालील १२ कलमांनुसार अघोरी, जादूटोणा प्रकारांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन, चालना, सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य तसेच प्रचालन, जाहिरात, प्रचार किंवा आचरण करण्यास वा करायला भाग पाडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, तसे आढळल्यास संबंधित व्यक्तीला सहा महिन्यांपासून सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच हजार रुपये ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हे अपराध दखलपात्र व अजामीनपात्र ठरविण्यात आले आहेत.
या विधेयकातील अनुसूचीत देण्यात आलेली १२ कलमे अशी:
१)      भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून तिला मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, त्याला दोरानो किंवा केसांनी बांधणे किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूंचे चटके देऊन इजा पोहचविणे, व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यांसारख्या कोणत्याही कृती करणे.
२)      एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करुन, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे; आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसविणे, ठकविणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे.
३)      अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने, ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष. अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे; आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे.
४)      मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणे, आणि जरणमारण यांच्या नावाने व त्यासारख्या अन्य कारणाने नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणे किंवा त्याकरिता प्रवृत्त करणे अथवा प्रोत्साहन देणे.
५)      आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भिती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी इतरांना धमकी देणे, फसवणे व ठकवणे.
६)      एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, किंवा त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरणारी आहे, असे भासविणे, अशा व्यक्तीचे जगणे मुश्कील करणे, त्रासदायक करणे वा कठीण करणे; एखादी व्यक्ती सैतान असल्याचे किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे.
७)      जारणमारण, करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणे, किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.
८)      मंत्राच्या सहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करून, किंवा भूत पिशाच्चांना आवाहन करीन, अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीला शारिरीक इजा होण्यास भुताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणे आणि तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून, त्याऐवजी तिला अमानुष, अनिष्ट अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे, जादूटोणा अथवा अमानुष कृत्ये करून किंवा तसा आभास निर्माण करून एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती घालणे, शारिरीक वेदना करण्याची किंवा तिचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणे.
९)      कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यांसारखे उपचार करणे.
१०)  बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवितो, असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदल करून दाखवितो, असा दावा करणे.
११)   (क) स्वतःत विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाचा तरी अवतार असल्याचे वा स्वतःच पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता, असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे;
(ख) मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.
१२) एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा व व्यवसाय यांसाठी करणे.