शुक्रवार, ८ मार्च, २०२४

'ब्रेकिंग न्यूज'चे स्वागत...




इट्स ऑल्वेज बेटर लेट, दॅन नेव्हर...  ती वेळ मात्र यावी लागते. 

पत्रकारितेमधील आमचे एक (खरेखुरे) अजातशत्रू मित्र विजयकुमार पाटील यांच्या 'ब्रेकिंग न्यूज' या पुस्तकाचा कच्चा मसुदा वाचून काही वर्षं झाली, तेव्हापासून हे पुस्तक लवकरात लवकर आलं पाहिजे, यासाठी आग्रही होतो. कारण न्यूजच्या अलीकडील माहिती देणारं आणि फीचरच्याही पलीकडील असं हे लेखन आहे. त्यांनी ज्या काही ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी केल्यात, त्यातीलच काही निवडक अद्भुतमय, रहस्याच्या जवळ जाणाऱ्या पण तरीही वास्तव अशा गोष्टींचं अतिशय वाचनीय असं हे संग्रहण आहे. केवळ स्टोरीजचं संग्रहण नाही, तर त्या स्टोरीमागील स्टोरीजचा यात समावेश आहे. यात बच्चनला 'पती' मानून त्याच्याच नावचे उखाणे घेणाऱ्या शानूरपासून ते शाहू महाराजांनी उभारलेल्या देशातल्या पहिल्या ग्रीनहाऊसच्या स्टोरीजचा समावेश आहे. अशा १८ स्टोरी पुस्तकात आहेत. मात्र, यातली शामराव -विशाखाची प्रेमकहाणी काळजात खोलवर रूतून बसणारी. पत्थरालाही पाझर फोडेल अशी. शंभर वर्षांच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर अशी एकही प्रेमकथा रुपेरी पडद्यावर आलेली नाही, हे मी पैजेवर सांगतो. इतकी उदात्त, निर्मळ आणि खरीखुरी प्रेमकथा विजयरावांनी जगासमोर आणलीय. बाकी १७ कथा एकीकडे आणि ही एकीकडे. वाचकांनी केवळ एवढ्या एका गोष्टीसाठी पुस्तक घेतलं तरी पैसावसूल.

 अशा या पुस्तकातून एका सजग पत्रकाराच्या वृत्तपत्रीय लेखनामागील प्रेरणांचा, सामाजिक संवेदनांचा एक उत्तम दस्तावेज या निमित्ताने साकार झाला आहे. त्यात विजयरावांची लेखनशैली संवादी अन् प्रवाही असल्यामुळं वाचक त्यात गुंततो आणि एकामागून एक स्टोरी वाचत जातो. वाचकाला भावनिक हिंदोळ्यावर झुलवत ठेवण्याचं काम या स्टोरी करतात. एखाद्या कथांचं पुस्तक असल्याप्रमाणं वाचक या स्टोरी पुनःपुन्हा वाचण्यासाठी प्रवृत्त होतो. त्यामागील सच्च्या जाणीवा वाचकाच्या विवेकाला, माणूसपणाला आवाहन करीत राहतात, ही या पुस्तकाची जमेची बाजू. विजयरावांनी आता अधिक खुलेपणानं लिहीतं व्हावं, अशी एक मित्र म्हणून  अपेक्षा आहेच... त्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

---

ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाविषयी...


पत्रकार विजय पाटील यांच्या ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाची प्रत माझ्या हाती आली, तेव्हा आणखी एक न्यूज फीचरचे पुस्तक बाजारात दाखल होते आहे, अशी प्रतिक्रिया माझ्या मनात उमटली. मात्र, घरी जाऊन मी जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतले, तेव्हा अगदी पहिल्या अमिताभला पती मानणाऱ्या शानूरच्या बातमीपासून माझ्या मनाची इतकी पकड घेतली की, ते वाचून संपवल्याखेरीज बाजूला ठेवणे झाले नाही. हे पुस्तक म्हणजे केवळ बातम्या किंवा फीचर यांचा संग्रह असल्याचा माझा गैरसमज या वाचनाने दूर झाला. एक वेगळे पुस्तक वाचल्याचे समाधानही लाभले.

लेखकाने खरे तर ब्रेकिंग न्यूजऐवजी ब्रेकिंग ऑफ न्यूज असे नाव द्यायला हवे होते, असाही विचार मनात चमकून गेला. कारण या पुस्तकाच्या माध्यमातून पत्रकारिताविषयक साहित्याच्या क्षेत्रामध्ये लेखनाचा एक नवीन प्रवाह विजय पाटील सादर करीत आहेत, असे मला वाटते. हा प्रवाह म्हणजे एखाद्या अत्यंत वाचकप्रिय बातमीमागील बातमीची वाचकांना फोड करून सांगण्याचा आहे. विजय पाटील यांनी केवळ बातम्यांचा संग्रह केला असता तरी चालले असते कारण त्यांना मानवी संवेदनांना हात घालण्याची लेखनशैली साधलेली आहे. त्यामुळे त्यांच्या बातम्या वाचकांना खिळवून ठेवतातच. मात्र, आपल्या लोकप्रिय बातम्यांमागील बातमी, त्यासाठी केलेली धडपड आणि त्या बातमीचा केलेला पाठपुरावा यासाठीची यातायात यांची खरी गोष्ट श्री. पाटील येथे सांगताहेत. आजकाल कॉलम भरण्याच्या नादात केवळ बातमी दिली जाते; मात्र, तिचा पाठपुरावा बातमीदारांकडून म्हणावा तितका होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, पाठपुरावा हा विजय पाटील यांच्या बातमीदारीचा एक महत्त्वाचा गुणविशेष आहे, हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. हा पाठपुरावाही केवळ शब्दांचा अथवा घटनेचे वार्तांकन करण्यापुरता मर्यादित नाही, तर, संबंधित समस्या कायमस्वरुपी मिटविण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर संबंधितांना भेटून त्यावर तोडगा, मार्ग काढण्यास प्रवृत्त करणारा एक कृतीशील पाठपुरावा आहे. त्यांच्या या कृतीशीलतेचे दर्शन सदर पुस्तकात पानोपानी होते. तथापि, या निवेदनामध्ये विजय पाटील यांचा अभिनिवेश डोकावत नाही, तर लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान त्यातून उमटलेले दिसते. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना आवश्यक असलेले पराकोटीचे सामाजिक जबाबदारीचे भान विजय पाटील यांच्या लेखणीत आणि व्यक्तीमत्त्वात आढळते. त्यांनी पत्रकार म्हणून पुस्तक लिहीले असले तरी त्यांच्यातल्या सहृदयी माणसाचे प्रतिबिंब म्हणजे हे पुस्तक आहे.

बातमीला किंवा वर्तमानपत्राला एक दिवसानंतरची रद्दी, असे काही जण उपहासाने म्हणतात. वर्तमानपत्रातील माहितीचा योग्य विनियोग नाही केला, तर त्या म्हणण्यातील वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही. तथापि, विजय पाटील यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या आणि एकूणच समाजाच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या बातम्यांना चिरंतनत्व प्रदान केले आहे. हे चिरंतनत्व त्या बातमीबरोबरच तिच्या विषयालाही आपसूकच प्राप्त झाले आहे.

ह्युमन इंटरेस्ट स्टोरीजमध्ये किती प्रकारचे वैविध्य असू शकते, याची प्रचिती ब्रेकिंग न्यूज वाचताना येते. मात्र, हे वैविध्य जपत असताना विजय पाटील आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही हरपू देत नाहीत, ही बाब महत्त्वाची वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर, भुताच्या फोटोची बातमी असो, अगर प्रार्थना करणाऱ्या श्वानाची बातमी असो, त्यातील कुतुहलाचा भाग सांगण्याबरोबरच तज्ज्ञांची समर्पक प्रतिक्रिया घेऊन ते आपली बातमी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार नाही, याची काटेकोर दक्षता घेतात. त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला घाबरून आत्महत्येला प्रवृत्त होणारी मुले असोत की अंधारात हरवलेली वसाहत असो, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते बातम्यांवर बातम्या लिहीतातच, पण बोर्डाच्या अध्यक्षांना भेटून, लोकप्रतिनिधींना भेटून त्या समस्येवर चोख तोडगा काढण्यासाठी प्रवृत्त करतात आणि त्यालाही व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी प्रयत्न करतात. हे विजय पाटील यांच्या पत्रकारितेचे वेगळेपण, वैशिष्ट्य आहे.

हातात लेखणी आणि त्या लेखणीतून उमटणारा प्रत्येक शब्द छापणारे व्यासपीठ असले की, त्याची हवा पत्रकाराच्या डोक्यात जाण्यास वेळ लागत नाही. ती हवा त्याच्यातील अहंभावाला अधिकच वारे देत असते. ती कायम राखण्यासाठी मग कोणताही विधिनिषेध न बाळगता वाट्टेल त्या गोष्टीसाठी आपली लेखणी कोणाच्याही दावणीला बांधणारे अगर प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारे काही पत्रकार असतात. विजय पाटील त्यालाही अपवाद ठरतात. पत्रकारितेची हवा डोक्यात न जाऊ देता, सकारात्मकतेकडे झुकणारी त्यांची पत्रकारिता आहे, याचे दर्शनही या पुस्तकात घडते. ब्लॅक पार्टीची बातमी हे याचे ढळढळीत उदाहरण. पुण्यामध्ये अलीकडे स्तोम माजविलेल्या रेव्ह पार्टीच्या धर्तीवर कोल्हापुरातही ब्लॅक पार्टी झडत असल्याची बातमी अत्यंत कष्टाने, अगदी सप्रमाण मिळवून त्यांनी प्रसिद्ध केली. या बातमीमुळे प्रचंड सनसनाटी निर्माण होणे स्वाभाविक होते. तशी ती झालीही. या सनसनाटीच्या लाटेवर आरुढ होऊन इलेक्ट्रॉनिक माध्यमांना त्या पार्ट्यांचे फुटेज पुरवून ते आणखी पॉप्युलर होऊ शकले असते. पण, या क्षणीही त्यांनी कळत्या- न कळत्या वयात या पार्टीत सहभागी होणाऱ्या मुलांच्या भवितव्याचाच विचार केला. बातम्या छापून येतात, हे पाहून ती मुले पुन्हा तसे धाडस करणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या मनात होता. तो खराही ठरला. काही मुले त्यांना भेटावयास आली, त्यांचे यथाशक्ती कौन्सिलींगही त्यांनी केले आणि त्यांना या गर्तेत गुरफटण्यापूर्वीच बाहेर काढले. पत्रकार म्हणून बातमी दिली तेव्हाच त्यांचे काम संपले होते. पण, या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या परिघापलिकडे जाऊन आपले कर्तव्य बजावले, याचे समाधान मोठे आहे.

पर्यावरणाच्या रक्षणाप्रती असलेली त्यांची सजगता वाघाच्या आणि कासवांच्या तस्करीच्या बातम्यांतून झळकते. येथेही पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून रसद पुरवून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मदत करण्याची आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची त्यांची धडपड दिसून येते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याप्रती विजय पाटील यांच्या मनात असलेल्या निरतिशय आदराची प्रचितीही यातील काही बातम्यांतून येते. लोकोत्तर काम करणाऱ्या या राजाच्या कार्याचे जतन करण्याच्या जबाबदारीची जाणीव ते करून देतात.

यातील प्रत्येक बातमी आणि त्यामागील बातमी ही पानागणिक आपला पत्रकारितेवरील विश्वास अधिक दृढ करते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. या स्तंभाला डळमळीत करण्याचे प्रयत्नही चहूबाजूंनी होत असल्याचेही दिसते. मात्र, विजय पाटील यांच्यासारख्या जागल्या पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या टोकावर हा स्तंभ तोलून धरला आहे. जोपर्यंत विजय पाटील यांच्यासारखे संवेदनशील पत्रकार या देशात आहेत, तोपर्यंत या देशातील नागरिकांचे घटनादत्त अधिकार आणि मानवी मूल्यांची प्रतिष्ठा सदोदित कायम राहील.

मंगळवार, ५ मार्च, २०२४

‘घरंदाज सावली’ अखेर प्रकाशात आली...




हॅलो, रजिस्ट्रार स्पिकिंग... माझ्याकडे अमूक नावाचा विद्यार्थी आला आहे... चांगला लायक आहे, शिकण्याची उमेद आहे. त्याला मी अॅडमिशन दिलं आहे. त्याला आपल्याकडं विभागात पाठवते. त्याचा फॉर्म वगैरे भरून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करा.... त्याला कमवा आणि शिका योजनेत सहभागी करून घेतलंय, प्रवेश द्या, खोली द्या.... भवनमधली प्रवेश क्षमता संपली असली तरी, या विद्यार्थ्याची आरोग्य केंद्रातल्या वाढीव विद्यार्थ्यांबरोबर राहायची सोय करा. शिकू द्या त्याला....

वर्तमानात एखाद्या विद्यार्थ्यालाच नव्हे, तर विद्यापीठाच्या कुलसचिवांना देखील स्वप्नवत आणि धाडसी वाटावं, असं हे विधान साधारण साठेक वर्षांपूर्वी एका महिला कुलसचिवांच्या तोंडून अनेक गरीब, होतकरू आणि उच्चशिक्षणेच्छु विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आलं आणि त्या विधानावर अनेकांची जीवननौका तरली, नव्हे महदअंतर कापून त्यांनी मोठमोठी पदे, प्रतिष्ठा मिळवली आणि आपल्या या मातेप्रती सदैव कृतज्ञता मनी बाळगली.

शिवाजी विद्यापीठात रुजू झाल्यापासून किंबहुना विद्यार्थीदशेपासून या विद्यापीठाच्या सुरवातीच्या कालखंडातील कुलसचिव डॉ. उषा इथापे मॅडम यांच्याविषयी प्रचंड कुतूहल मनी होतं. त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रंही मी संकलित केली. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि दुसऱ्या कुलसचिव डॉ. उषा इथापे या दोघांनी प्रदीर्घ काळ शिवाजी विद्यापीठाची पायाभरणी करून या रोपाचा वटवृक्ष करण्याचं कार्य आपल्या हयातीत केलं. डॉ. आप्पासाहेब पवार यांना पितामह म्हटलं, तर डॉ. इथापे या इथल्या प्रत्येक घटकाच्या माता होत्या. इथापे मॅडमचं एक छायाचित्र माझ्या मनात कायमचं ठसलं आहे, ते म्हणजे विद्यापीठाचा ज्ञानदंड घेऊन त्या विद्यापीठाच्या अगदी सुरवातीच्या काळातील एका दीक्षान्त मिरवणुकीचं नेतृत्व करताहेत आणि सारे कार्यकारिणी सदस्य, कुलगुरू, प्रमुख पाहुणे आदी सर्व त्यांना फॉलो करताहेत. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचं प्रशासकीय कामकाज जुन्या ओपल हॉटेलच्या इमारतीत चालायचं आणि तिथेच हा दीक्षान्त समारंभ झालेला. छायाचित्र पाहताक्षणी त्यांची आत्मविश्वासानं भारलेली बॉडी लँग्वेज आपल्या मनाचा ताबा घेते. डोक्यावरचा पदर घरंदाजपणाची ओळख देणारा, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रखर तेजही न लपून राहणारं. या तेजस्वितेनं शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाचा कारभार १९६६ ते १९८३ असा सुमारे १७ वर्षे  हाकला, त्याला आकार दिला. मात्र, त्यांच्याविषयी अन्य कोणतीही माहिती मला नव्हती. त्यांच्याविषयी अगदीच त्रोटक माहिती आणि तीही तुकड्या तुकड्यांत होती- जवळपास नसल्यासारखीच. मात्र, ही उणीव भरून काढणारं एक फार महत्त्वाचं पुस्तक हाती पडलं. मराठी अधिविभागातील आमचे सन्मित्र डॉ. रणधीर शिंदे यांनी चार दिवसांपूर्वीच त्यांनी संपादित केलेलं घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी हे पुस्तक दिलं आणि माझ्या कुतुहलाचा विषय असणारं इथापे मॅडम यांचं जीवनकार्य मी गेल्या दोन दिवसांतच वाचून काढलं. सुरवातीला मला डॉ. रणधीर शिंदे यांनी हा एक महत्त्वाचा आणि अलक्षित व्यक्तीमत्त्वाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा प्रकल्प हाती घेऊन तडीस नेला, याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत आणि या कार्यासाठी प्रेरित केल्याबद्दल माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

मंगळवेढ्याच्या शब्दशिवार प्रकाशनानं २१६ पृष्ठांच्या या ग्रंथाची देखणी निर्मिती केली आहे. तसं हे काही इथापे मॅडम यांचा सलग चरित्रग्रंथ नाही. तर इथंही त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी आलेल्या किंवा त्यांच्या कार्याची कृतज्ञ जाणीव असणाऱ्या लोकांच्या मनोगतांतून त्यांचं आयुष्य बरंचसं आपल्यासमोर येतं. अगदीच चित्रासारखं नसलं तरी कॅलिडोस्कोपिक व्ह्यू तरी नक्कीच साकार होतो, हे या पुस्तकाचं यश. प्रस्तावना आणि स्वतः इथापे मॅडम यांच्या दो स्मरण प्रसंग या लेखाखेरीज एकूण २६ व्यक्तींनी मॅडमविषयी इथं लिहीलंय, त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. या लेखकांत माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एस.एन. पठाण यांच्यासह शालिनीताई पाटील, चंद्रकुमार नलगे, डॉ. राजन गवस, डॉ. एस.एच. पवार, किसनराव कुराडे, डॉ. अरुण भोसले, डॉ. माया पंडित, विजय पाटील, निनाद शहा, प्रतिमा पवार, मानसिंगराव जगताप, कृष्णा इंगोले, जी.पी. माळी, सूर्यकांत जुगदर-पाटील, विजयसिंह पाटील, डॉ. सुनीलकुमार लवटे, राजेश पाटील, गजानन साळुंखे, विलास पोवार, अरुण साटम, महेंद्र शिंदे, रेखा नलवडे आणि रेखा शिंदे यांचा समावेश आहे. या लिहीणाऱ्यांतील बहुतांश जण मॅडमच्या कार्यकाळात विद्यार्थी म्हणून त्यांच्याशी संबंध आलेले, तर काही शिक्षक अन् काही नातेवाईकही आहेत.

ग्वाल्हेरच्या सरदार शिंदे घराण्यातून थेट आलेल्या इथापे मॅडम या राजघराण्यातील पहिल्या उच्च पदवीधर. हिंदी विषयातून त्यांनी पीएच.डी.चा प्रबंध सुद्धा स्वतंत्रपणे (विना-मार्गदर्शक) सादर केलेला. पुणे विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला पीएचडी धारक संशोधक. असं क्रांतीकारी शिक्षण घेऊन अखेरीस व्ही.टी. पाटील यांच्या कीर्ती कॉलेजद्वारा त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या उपकुलसचिव पदापर्यंत प्रवास झाला आणि दोनच वर्षांत त्यांच्यावर कुलसचिव पदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली, ती त्यांनी अखेरपर्यंत प्रशासकीय कर्तव्यकठोरतेने आणि विद्यार्थ्यांप्रती मातृत्वभरल्या ममतापूर्णतेने निभावली. या पुस्तकांतल्या साऱ्यांच लेखांतून मॅडमची कर्तव्यकठोरता जितकी सामोरी येते, त्याहूनही अधिक त्यांची मातृहृदयी प्रतिमा अधिक झळाळून दिसते. त्यांच्या कारकीर्दीतली सारी मुलं त्यांना आईच्या जागी मानायची आणि त्याही या सर्व मुलांना आईच्या करारी आणि सहृदयी संस्कारी नजरेनं जपायच्या. त्या स्वतः मात्र विनापत्य होत्या, याला काय म्हणावं? विद्यापीठातील त्यांच्या कारकीर्दीची अखेर मात्र संघर्षपूर्ण पद्धतीनं झाली. आत्मसन्मानाची लढाई जिंकून त्यानंतरच त्यांनी पुन्हा पद स्वीकारणं नाकारलं, हे त्यांच्या फाईंटिंग स्पिरिटला आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या वृत्तीला साजेसंच होतं. दातृत्वतेज तर इतकं की अवयवदानाचा फारसा गाजावाजा नसण्याच्या काळात त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मृत्योपरांत देहदानही केलं.

या पुस्तकातून इथापे मॅडम यांचं चरित्र जसं समजतं, तसंच शिवाजी विद्यापीठाची जडणघडणही समजायला मदत होते. अनेक गोष्टी समजतात. आजही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विमान इमारतीत कंजारभाट समाजातील मुलांसाठी विद्यापीठ शाळा चालवित होतं, हे समजलं आणि अभिमानच दाटला मनी. आज आपण एक्स्टेंशनच्या गोष्टी करतो. पण त्या काळात वरून खाली असा शिक्षणाचा विस्तार करण्याचा विद्यापीठाचा हा प्रयत्न केवढा तरी स्तुत्यच होता. अशा अनेक गोष्टी इथं समजतात. इथापे मॅडमचं चरित्र तर इथं समजतंच, पण ज्या व्यक्तींनी त्यांच्याविषयी यात लिहीलंय, त्यांच्याही जडणघडणीचा, उभारणीचा असा तो कालखंड होता, ज्यामध्ये त्यांना इथापे मॅडमनी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आधार आणि उमेद दिलेली. त्यामुळं या चरित्रकारांचं चरित्रही इथं थोडंफार उलगडतंच. उदाहरणार्थ, चंद्रकुमार नलगे सरांचं विद्यापीठातलं योगदान आणि त्यांचं येथून पुनःश्च बाहेर पडणं, माया पंडित मॅडमचा विद्यापीठाच्या सेवेतील प्रवेश ते त्यांच्या विवाहाला इथापे मॅडमचा आशीर्वाद लाभणं अशा अनेक बाबी वाचायला मिळतात, ज्या एरव्ही पुन्हा त्यांच्या त्यांच्या आत्मकथनातच कधी तरी पुढं वाचता येऊ शकतील.

डॉ. अरुण भोसले सर म्हणतात, त्याप्रमाणं इथापे मॅडम या विद्यापीठाच्या यशोगाथेतील उपेक्षित मानकरीअसतील, तर गवस सर म्हणतात त्याप्रमाणं त्यांच्यावरील अन्यायाला कधीतरी वाचा फुटायला हवी आणि या रखरखत्या माळावरच्या सावलीला आपण नीट समजून घ्यायला हवं आहे.

शेवटी आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे डॉ. उषा इथापे मॅडम या शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलसचिव होत्या, इथपर्यंत ठीकच आहे. पण, अलीकडच्या काळात साधारण २०१७ नंतरच्या काळात आंध्र प्रदेशात डॉ. आर.के. अनुराधा (श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटी), पश्चिम बंगालमध्ये नुपूर दास (नॉर्थ बेंगॉल युनिव्हर्सिटी) आणि आर. सुधा (मदुराई कामराज युनिव्हर्सिटी) या महिलांनी त्या त्या विद्यापीठांच्या ६० ते ८० वर्षांच्या इतिहासातील पहिल्या कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारल्याच्या बातम्या वाचनात आलेल्या होत्या. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठांना जर महिला कुलसचिव लाभण्यास शतकभराचा कालावधी लागत असेल तर माझ्या अंदाजाने डॉ. उषा इथापे या केवळ महाराष्ट्रातील विद्यापीठांतीलच नव्हे, तर देशभरातील विद्यापीठांच्या इतिहासातील कदाचित पहिल्या महिला कुलसचिव ठरतील. हा माझा अंदाज आहे. तो जर खरा असेल, तर विचार करा, इथापे मॅडमच्या कार्याचे मोल आणि त्यांनी जिथे घाम, रक्त आणि अखेरच्या काळात अश्रूही गाळले, त्या शिवाजी विद्यापीठाचे मोल कितीतरी पटीने अधिक वाढलेले असेल. त्या दृष्टीने मॅडमच्या जीवनचरित्राचा अधिक चिकित्सक संशोधकीय वेध घेण्याची गरज डॉ. रणधीर शिंदे यांच्या या संपादकीय कार्याने अधोरेखित केलेली आहे. त्यांना धन्यवाद!

 

पुस्तकाचे नाव: घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी

संपादक: डॉ. रणधीर शिंदे

प्रकाशक: शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा

पृष्ठे: २१६

किंमत: रु. ३००/-