गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

‘आकंठ’ नावाची साहित्यिक चळवळ



'आकंठ'च्या सन २०१९च्या ४०व्या दिवाळी विशेषांकाचे कलात्मक मुखपृष्ठ

रंगनाथ चोरमुले हे माझे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातले वरिष्ठ सहकारी. त्यांच्यासमवेत वृत्त शाखेसह उपमुख्यमंत्री कार्यालयात काम करता आले. त्यांचे काम खूप जवळून पाहता आले. अत्यंत ऋजू स्वभावाचे चोरमुले सर तसे मितभाषी. चेहऱ्यावर सतत एक मंद स्मित विलसणारं. वाचन दांडगं. लोकसंपर्क, त्यातून सामाजिक काम यांचा व्यापही तितकाच मोठा. राजकीय क्षेत्रातील दिलीप वळसे-पाटील यांच्यापासून ते प्रशासनातील रंगनाथ नाईकडेंसारखे एकदम रॉयल स्वभावाचे लोक स्वाभाविकपणे त्यांच्या मित्रयादीत मोठ्या संख्येनं. पण, चोरमुले सरांचं एक साहित्य-संपादक म्हणून मराठी भाषेसाठी जे योगदान आहे, ते आज मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मला अधोरेखित करावंसं वाटतं. चोरमुले सरांनी मराठी साहित्याला त्यांच्या आकंठ या दिवाळी अंकाच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षांत जी मेजवानी दिलेली आहे, तिचं ऋणही या निमित्तानं अधोरेखित करणं अनुचित ठरणार नाही.
मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे यंदाच्या ४५व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. किंबहुना, आज (दि. २७) सायंकाळीच दादरच्या सार्वजनिक वाचनालयात पुरस्कार वितरण समारंभही होतो आहे. त्यामध्ये आकंठला का.र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.
रंगनाथ चोरमुले
या आकंठची सुरवात चोरमुले सरांनी ४० वर्षांपूर्वी अलिबाग येथे केली. त्यानंतर हटाळे, रामानंद नगर, किर्लोस्करवाडी असा प्रवास करत करत तो लोअर परेलला येऊन २५ वर्षे स्थिरावला. पॉप्युलर प्रेसकडेच तेव्हापासून त्याची छपाई असते. आकंठ हा दिवाळी अंक शेकडो मराठी दिवाळी अंकांच्या गर्दीतही आपलं वेगळेपण राखून राहिला. संत साहित्य, स्त्री साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य याचबरोबर केवळ कविता, केवळ अभंग-ओव्या, केवळ गजल अशा साहित्य प्रकारांवर उत्तमोत्तम विशेषांक सादर करण्याचं धाडस आकंठनं दाखवलं. सन २००४मध्ये गत शतकातील मराठी साहित्य या ५४० पानांच्या रौप्यमहोत्सवी अंकाने तर शतकातील मराठी साहित्याचा धांडोळा मराठी वाचकांपुढं ठेवलाच, शिवाय एकाच वर्षात सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे पाच राज्यस्तरीय पुरस्कार एकाच वर्षी पटकावण्याचा विक्रमही आकंठनं नोंदविला. साहजिकच त्या प्रत्येक अंकाचं संग्रहमूल्य आजही कायम आहे.
या रौप्यमहोत्सवी अंकानंतरच थांबण्याचा निर्णय चोरमुले सरांनी घेतला होता. पण, वाचकांच्या अत्याग्रहामुळं त्यांनी पुढंही ही साहित्यसेवा सुरू राखली. आकंठच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये अन्य भारतीय भाषांमध्ये काय साहित्यिक हालचाली आहेत, प्रवाह, अंतःप्रवाह काय आहे, हे चिकित्सकपणे पाहण्याचा प्रयत्न केला. तसं हे खूपच अवघड काम होतं. ज्या त्या राज्यातलं दर्जेदार साहित्य, साहित्यिक आणि त्यासाठी मराठीतले चांगले अनुवादक निवडून जवळपास सर्व भारतीय भाषा मराठीला जोडण्याचं काम आकंठनं या काळात केलं. कन्नड, पंजाबी, ओडिया, बंगाली, गुजराती, मल्याळी, हिंदी, तेलुगू, तमिळ, सिंधी, असमिया, काश्मिरी, भारतीय नेपाळी, राजस्थानी इत्यादी भाषांमधील निवडक साहित्य मराठी वाचकांना त्यांनी सादर केलं. सन २०१९मध्ये आकंठचा ४०वा सांगता विशेषांक चोरमुले सरांनी प्रकाशित केला आहे. या सुमारे ६००हून अधिक पृष्ठांच्या अंकात २४ भारतीय भाषांतील निवडक कथा, कविता प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
मंत्रालयात असताना आकंठच्या काही अंकांसाठी काम करण्याची संधीही मला लाभली. त्या अर्थानं या परिवाराचा मी एक छोटासा घटक आहे. त्यामुळंही आणि एक वाचक म्हणूनही आकंठचं बंद होणं, माझ्यासाठी वेदनादायी आहे. आकंठनं भारतीय भाषांशी मराठीला जोडण्याचं केलेलं काम अतुलनीय आहे. आज अस्मितेच्या नावाखाली आपण आपल्या मातृभाषेचा टेंभा जरुर मिरवतो, पण त्याखाली अन्य भाषांचं अज्ञान दडवण्याचा प्रयत्न कोठे तरी केला जातो आहे का, याचाही विचार या निमित्तानं व्हायला हवा. तेरा तेरा भाषांचे ज्ञान असणारे पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासारखे ज्ञानी पंतप्रधान आपल्याला लाभलेले होते. आपण मातृभाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे, पण अन्य भारतीय अगर परदेशी भाषा यांचा सन्मानही आपल्याकडून राखला जाणे आवश्यक आहे. त्यातल्या एक-दोन अतिरिक्त भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? भाषिक तुटलेपण, भाषिक भेद एकदा आपल्यामध्ये आले की, भौगोलिक सीमा कितीही एक असू द्यात, मानसिक दरी आपण कधीही सांधू शकणार नाही, हे भाषेची अनाठायी अस्मिता बाळगणाऱ्यांना सांगायला हवं. भाषेवर प्रेम असावं, ते असलंच पाहिजे, पण ते प्रेम अन्य भाषांच्या, अन्य भाषिकांच्या तिरस्कारातून निर्माण झालेलं असता कामा नये. तसल्या बेगडी प्रेमाला काडीचा अर्थ नाही. भाषाबंधुत्व वा भाषाभगिनित्व यांचं एक अत्यंत आदर्श असं उदाहरण आकंठनं गेल्या ४० वर्षांत आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यामुळं त्याचा निरोप घेताना हृदय जड होतं आहे. आकंठचा वारसा जपण्याची जबाबदारी आता आपण वाचक मंडळी कशी निभावणार, हाच खरा प्रश्न आहे.


मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

गावाच्या प्रेमाने चिंब झालो; तो दिवस...

जत्राट येथे झालेल्या शिवजयंती उत्सवात शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना युपीएससी उत्तीर्ण झालेले असि. कमांडंट ऑफिसर प्रीतम जनार्दन मेस्त्री व डॉ. आलोक जत्राटकर


जत्राट येथील शिवजयंती उत्सवात डॉ. आलोक जत्राटकर यांचा युवा प्रेरणा पुरस्काराने गौरव करताना ज्येष्ठ विचारवंत अॅड. अविनाश कट्टी. छायाचित्राच दलित क्रांती सेनेचे अशोककुमार असोदे दिसत आहेत.

जत्राट येथील शिवजयंती उत्सवात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर.

जत्राट येथील शिवजयंती उत्सवात मार्गदर्शन करताना डॉ. आलोक जत्राटकर.

जत्राट हे माझ्या गावचं नाव मी अभिमानानं माझ्या आडनावात मिरवतो आहेच; पण, गावानं परवाच्या (दि. २२ फेब्रुवारी) शिवजयंती उत्सवात त्यांच्या प्रेमानं मला चिंब करून सोडलं. माझ्या वडिलांच्या नंतर पीएच.डी. प्राप्त करणारा या गावचा मी दुसराच व्यक्ती. (म्हणजे पाहा, एकीकडे विद्यापीठांतून पीएच.डी. होऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली असताना माझ्या गावचा मी दुसराच, तेही माझ्या वडिलांनंतर... सुमारे ३० वर्षानंतर... ही बाब आपल्या समाजातील शैक्षणिक स्थितीवर पुरेसे बोलके भाष्य करते...) त्यामुळे गावकऱ्यांनी युवा प्रेरणा विशेष सत्कार करून गौरवलं, ही बाब माझ्यासाठी खरोखरीच अभिमानास्पद... शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं हा सत्काराचा घाट घालणारे माझे लाडके किरण मेस्त्री, एकनाथ उर्फ रविंद्र कांबळे, किशोर कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचा मी खरोखरीच ऋणी आहे कारण आपल्या कामाची गावानं म्हणजे आपल्या माणसांनी दखल घेण्यासारखं दुसरं कौतुक नाही. दलित संघर्ष समितीचे अध्यक्ष व माझे सन्मित्र अशोककुमार असोदे यांच्यासह गावचे नेते श्री. एम.पी. पाटील अण्णा, श्री. रमेश भिवशे, श्री. सुधाकर थोरात आणि ग्रामपंचायत अध्यक्ष नीलम जबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ विचारवंत विधिज्ञ अॅड. अविनाश कट्टी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी युपीएससी क्रॅक करून असिस्टंट कमांडंट ऑफिसर पदावर विराजमान होणाऱ्या प्रीतम मेस्त्री यानंही विपरित परिस्थितीवर मात करीत घवघवीत यश संपादन केलं, त्याचाही गौरव करण्यात आला. त्याच्यासह क्रीडा, शिक्षण क्षेत्रात आकर्षक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आलं. त्यांचं यश गावातल्या युवकांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहेच, पण मला त्यात दोन सत्कार मनापासून भावले, ते म्हणजे आनंदा मारुती कांबळे आणि हाजी बेबीजान बाबाजी फकीर यांचे!
आनंदा कांबळे तथा नाना हे गावातलं बुजूर्ग व्यक्तीमत्त्व. नाना म्हणजे गावात कोणाचाही कार्यक्रम असो, कामाला पुढे असणारच. विशेषतः मयताच्या विधीदरम्यान नानांचा वावर उठून दिसणारा. मर्तिकेच्या सगळ्या कामात पुढे होऊन भाग घेणारा, दुःखात बुडालेल्या नातेवाईकांना दिलासा देण्याबरोबरच अति करणाऱ्या नातेवाईकांना ताळ्यात ठेवून अंत्यसंस्कार वेळेत, व्यवस्थित होईल, याची दक्षता घेणारे नाना हे काम अनेक वर्षे अत्यंत निरपेक्षपणे आणि सामाजिक दायित्वाच्या भावनेतून करीत आहेत. अलिकडेच माझी आजी गेली, तेव्हा तिच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आमच्यापेक्षा जणू नानांच्याच खांद्यावर अधिक असल्याप्रमाणे त्यांनी सारं काही सुरळित होईल, याची काळजी घेतलेली. तेव्हाच नानांचं व्यक्तीमत्त्व मनाला स्पर्शून गेलेलं. त्यांचा शिवजयंतीच्या व्यासपीठावर सत्कार म्हणजे शिवरायांच्या खऱ्या मावळ्याचाच गौरव वाटला मला.
दुसऱ्या व्यक्ती म्हणजे हाजी बेबीजान फकीर. ही वयस्कर महिला गावात कित्येक वर्षांपासून आया, दाई म्हणून काम करते आहे. गावातल्या जवळपास अडलेल्या सर्वच महिलांची सुटका भाभींनी केलेली. त्यामुळं गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर. जात-धर्म या भावनांच्या पलिकडे माणुसकीचे, आपुलकीचे नाते म्हणजे काय, याचे प्रतीक म्हणजे जत्राट आणि भाभींचे नाते. कुठल्याही सत्काराची वगैरे अपेक्षा न ठेवता काम करीत असणाऱ्या या सत्कारानेही माझ्या मनात आयोजकांविषयी आदराची व कौतुकाची भावना निर्माण झाली. ती मी माझ्या भाषणात बोलूनही दाखविली.
यावेळी शिवरायांच्या कार्याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. भारताचे पहिले स्वातंत्र्ययोद्धे म्हणजे छत्रपती शिवराय, या अंगाने मांडणी केली. आमचे अत्यंत लाडके व्यक्तीमत्त्व गारगोटीचे डॉ. राजीव चव्हाण यांचा प्रबोधनात्मक शाहिरी पोवाडा म्हणजे तर आईसिंग ऑन द केकच ठरला.
या कार्यक्रमानंतर लाडकी अलका आत्ती, मामा, भरतमामा आणि नितीन यांनी निपाणी येथील त्यांच्या हॉटेल बैठक येथे बोलावून केलेला सरप्राईजसत्कार सुद्धा आनंदात भर टाकणाराच!
ग्रामस्थांच्या या ऋणातून उतराई होणे, कसे बरे शक्य आहे?