गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

संस्कृत भाषा आणि संस्कृत पत्रकारिता

भारतातील एकमेव संस्कृत दैनिक 'सुधर्मा'

(देशभरात आज संस्कृत भाषा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने या भाषेविषयी आणि संस्कृत पत्रकारितेविषयी संक्षिप्त माहिती देणारा लेख माझ्या वाचकांसाठी सादर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर) 

संस्कृत भाषा, तिचे वैभव आणि संवर्धन या दृष्टीने सदर लेखामध्ये काही चिंतन करण्याचा प्रयत्न आहे. संस्कृत भाषेच्या अनुषंगाने या भाषेशी मला जोडणाऱ्या माझ्या तमाम गुरूंना कृतज्ञतापूर्वक नमन करण्याची संधी घेणे उचित आहे. त्या निमित्ताने संस्कृत भाषेसाठी माझ्या गुरूंनी घेतलेल्या कष्टांची जाणीवही आपल्याला होईल.

माझा संस्कृत शिक्षणाचा पहिला श्लोक-

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः

निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा

हा शिकविला तो कागलच्या मुजुमदार मॅडमनी!

आयु. पुष्पा मुजुमदार मॅडम या निपाणीच्या देवचंद महाविद्यालयात प्राध्यापक होत्या आणि त्या कागलमध्ये राहायच्या. त्यांनी सायंकाळच्या सत्रात कागलमध्ये त्यांच्या घरी गावातील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांना मोफत संस्कृत सुभाषिते शिकविण्याचे ठरविले. तेव्हा मी पाचवीत होतो. आम्ही साधारण तीसेक मुलं-मुली रोज सायंकाळी मुजुमदार वाड्यात जमायचो. साधारण तासभर वर्ग चालायचा. दररोज पाच सुभाषिते त्यांच्या अर्थांसह पाठ करायची. तीनेक महिने त्यांनी हा वर्ग घेतला. त्या काळात संपूर्ण सुभाषितमाला मला पाठ झालेली.

यातूनच मग प्रेरणा जागृत झाली आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रि-एलिमेंटरी संस्कृत परीक्षेला बसलो. त्यावेळीही कागलच्याच सुधा कुलकर्णी यांच्याकडे अभ्यासाला जायचो. सुधाबाई अत्यंत प्रेमाने शिकवायच्या. ही परीक्षा देखील मी उत्तीर्ण झालो.

पुढं नववीला निपाणीच्या मोहनलाल दोशी विद्यालयात प्रवेश घेतला. तिथं संस्कृत विषय आठवीपासून होता. पण माझ्या पूर्वीच्या कागलच्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये संस्कृत विषय नसल्याने माझा हिंदी विषय होता. इथे संस्कृत आहे म्हटल्यावर पूर्ण शंभर गुणांचे संस्कृत शिकायची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. पण मागील वर्षी काहीच न शिकल्याने हिंदी-संस्कृत असा प्रत्येकी ५० गुणांचा जोडविषय घेतला.

माझी ही संस्कृतची ओढ लक्षात आल्याने तिथे संस्कृत शिकविणाऱ्या जेपीके तथा ज्योती प्रकाश कुलकर्णी मॅडमनी माझे आठवीचे संस्कृत करवून घेण्याचे ठरविले. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जायचो. स्वयंपाकपाणी करता करता त्यांनी मला मोफत संस्कृत शिकविले, व्याकरणाचा पाया पक्का करून घेतला. दोनेक महिन्यांत त्यांनी मला इतरांच्या बरोबरीने आणून ठेवले. पुढेही दहावीपर्यंत आम्ही किती तरी मुलं त्यांच्या घरी शिकायला जायचो. पण, मॅडमनी कधी आमच्याकडून एक पैसाही शुल्क घेतले नाही. इतक्या निरलसपणाने त्यांनी संस्कृत भाषेची सेवा केली.

पुढं देवचंद महाविद्यालयात मात्र मी बारावीपर्यंत पूर्ण संस्कृत (१०० गुण) विषय घेतला. आर.एन. कुलकर्णी नावाचा बापमाणूस आम्हाला शिकवायचा. अत्यंत प्रेमळ न् अत्यंत प्रांजळ अशा आरएनके सरांमुळे संस्कृतमधले विविध प्रकारचे चांगले साहित्य वाचायला मी प्रवृत्त झालो. संस्कृतमुळे माणसामध्ये किती पराकोटीची सुसंस्कृतता येऊ शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझे हे गुरू. या सर्व गुरूंना या निमित्ताने मनापासून अभिवादन करणे अगत्याचे आहे.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्।।

हा अनुष्ठुभ छंदातला श्लोक आहे आणि याचे संस्कृतमधील महत्त्व मी जाणकारांना सांगण्याचे खरे तर कारण नाही. प्रणयात मग्न झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीतील नराला पारधी मारतो आणि क्रौंच मादीची शोकविव्हलता पाहून महर्षी वाल्मिकींच्या तोंडून सर्वप्रथम उमटलेली ही सौंदर्यशाली शापवाणी- हे दुष्टा, तू प्रेमाराधनेत मग्न झालेल्या क्रौंचाला मारलं आहेस. जा, तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही आणि वियोगाचं दुःख तुलाही झेलावं लागेल.

या शापवाणीचे पुढे काय झाले असेल ते असो; पण, या भारताला एक महाकवी मात्र त्या काळी मिळाला होता. त्यानंतरच वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. त्यातील बहुतांश रचना या अनुष्ठुभ छंदातीलच आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

रामायणाबरोबरच महाभारत हे महाकाव्यही याच दृष्टीने महत्त्वाचे. व्यासोच्छिष्टम् जगत्सर्वम् असे त्याचे सार्थ वर्णन केले जाते. ही केवळ कौरव-पांडवांच्या जय-पराजयाची गाथा नाही; तर, एकूणच मानवी प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, प्रकृती याचे सर्वंकष सार महाभारतात आहे. इथे नाही, ते कुठेच नाही, ही महाभारताची महती आजच्या कलियुगालाही लागू पडेल अशीच.

व्यासांनी अवघ्या ८८०० श्लोकांचे जय नावाचे काव्य रचले. त्यात त्यांचा शिष्य वैशंपायनाने जनमेजयाच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल सांगितलेल्या कथा, वृत्तांतांची भर घातल्याने ते २४ हजार श्लोकांपर्यंत विस्तारले. भारतवंशाची गोष्ट म्हणून त्याला भारत नाव मिळाले. पुढे सौतीने नैमिषारण्यात चाललेल्या यज्ञसत्रादरम्यान ही कथा ऐकविताना त्यात कालानुरुप काही गोष्टींची भर घातली आणि कथा एक लक्ष श्लोकांची झाली. ही सविस्तर भारत कथा म्हणजेच महाभारत होय. कृष्णधवलबरोबरच करड्या रंगांतील विविध व्यक्तींचे, पात्रांचे यथार्थ चित्रण हे महाभारताचे वैशिष्ट्य. आजही भारतातील हिंदीसह अनेक चित्रपटांच्या कथा या रामायण, महाभारतापासून प्रेरित असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

संस्कृतचे प्राचीनत्व:

संस्कृत ही आर्यांबरोबर भारतात आली असे मानल्यास, तत्पूर्वी द्रविड भाषाकुलातील भाषा इथे अस्तित्वात होत्याच. अशा १६१ भाषा आहेत. या स्थानिक भाषिकांशी आदानप्रदान व्यवहार करण्यासाठी निवडक लोकांना आर्यांनी संस्कृत शिकविले. हे ज्ञानी लोक परस्परांशी भाषाव्यवहार करू लागले. म्हणजे व्यवहारात लोकांची भाषा बोलीभाषाच राहिली आणि संस्कृत ही त्या लोकसमूहांना जोडणारी ज्ञानभाषा म्हणून अखिल भारतीय भाषा बनली.

वेदांपासून पुराणांपर्यंतच्या सर्व वैदिक धर्मग्रंथांची भाषा संस्कृत होती. वैदिक धर्माविरुद्ध बंड करून उदयास आलेल्या बौद्ध व जैन धर्मांनी धर्मग्रंथ व धर्मप्रसार यांसाठी अनुक्रमे पाली व अर्धमागधी या लोकभाषांचा स्वीकार व अंगिकार केला. मात्र, पुढे पहिल्या शतकापासून बौद्ध धर्मातील महायान पंथाने संस्कृतचा स्वीकार केला. अश्वघोषाने बुद्धचरितम् हे पुस्तक संस्कृतमध्ये लिहीले. त्रिपिटकासह अनेक बौद्ध ग्रंथांचे संस्कृतमध्ये भाषांतर झाले. जैनांनीही धर्मग्रंथासाठी संस्कृत स्वीकारले. तत्त्वार्थसूत्र हा त्यांचा संस्कृत ग्रंथ सुप्रसिद्ध आहे.

भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी युरोपीय पंडितांनीही संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. जर्मन पंडितांनी अनेक संस्कृत ग्रंथांची जर्मन भाषांतरे केली. पाणिनीच्या व्याकरणाचेही इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंचमध्ये भाषांतर झाले. वॉरन हेस्टींग यांच्या काळापासून संस्कृत ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे सुरू झाली. यातला पहिला भाषांतरित ग्रंथ म्हणजे भगवद्गीता होय. (१७७५) ब्रिटीश सरकारने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतीय ग्रंथांची सूची तयार केली. त्यानुसार त्यांना सुमारे दहा हजार संस्कृत ग्रंथांची हस्तलिखिते आढळून आल्याची नोंद आहे.

जर्मन पंडित मॅक्समुल्लर याने संस्कृत भाषा जर्मनीशी जोडण्यात फार मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या मते, आज कदाचित संस्कृत मृत भाषा असली तरी भारतातील आजच्या सर्व आर्य व द्रविड भाषांचा जन्म व प्राण संस्कृत हाच आहे. मॅक्समुल्लरचे हे विधान महत्त्वाचे आहे. पंडित नेहरूसुद्धा म्हणाले होते की, भारताची सर्वात मोठी दौलत कोणती, सर्वात मोलाचा वारसा कोणता, असे जर कोणी मला विचारले तर मी ठामपणे उत्तर देईन की, ते आहे संस्कृत भाषा आणि वाङ्मय.

संस्कृत पत्रकारिता:

 इयम् आकाशवाणी। संप्रति वार्ताः श्रुयन्ताम्। प्रवाचकः बलदेवानन्दसागरः।

सन १९७४ पासून आकाशवाणीवरुन आपल्या सर्वांची सकाळ संस्कृतमय करीत असलेल्या डॉ. बलदेवानन्नद सागर यांनी संस्कृत पत्रकारितेच्या इतिहासाचा अतिशय उत्तम वेध घेतला आहे.

दि. १ जून १८६६ रोजी काशीहून प्रकाशित झालेले काशीविद्या सुधानिधीः अगर पण्डितपत्रिका हे पहिले संस्कृत वृत्तपत्र होय. सव्हर्नमेंट संस्कृत महाविद्यालयाच्या मार्फत ते प्रकाशित करण्यात येत असे. १८६७ मध्ये काशीहूनच क्रमनंदिनी वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाले. मात्र या दोन्ही वृत्तपत्रांतून प्काचीन संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन करीत असत. आजच्या वृत्तपत्रासारखे त्यांचे स्वरुप नव्हते. त्यामुळे सन १८७२मध्ये लाहोरहून प्रकाशित होऊ लागलेले हृषीकेश भट्टाचार्य यांचे विद्योदयः हे त्या अर्थाने पहिले संस्कृत वृत्तपत्र ठरते. त्यानंतर लगेचच पाटणा (बिहार) येथून विद्यार्थी हे वृत्तपत्र १८८० पासून निघू लागले.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत अनेक संस्कृत पत्रिका निघाल्या. राष्ट्रीय आंदोलनाच्या दृष्टीने त्यातील संस्कृत चंद्रिका आणि सहृदया या दोन पत्रिकांचे स्थान महत्त्वाचे आहे. ही दोन्ही पत्रे कलकत्त्याहून प्रकाशित होत.

याठिकाणी आपणा कोल्हापूरकरांच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची बाब अशी की, संस्कृत चंद्रिका ही पत्रिका कलकत्त्यानंतर थेट कोल्हापुरातून प्रकाशित होऊ लागली आणि त्याचे संपादक होते अप्पाशास्त्री सदाशिवशास्त्री राशिवडेकर.

हे नाव वाचल्यानंतर मी आनंदाने उडालोच. कोणी द्विवेदी, त्रिवेदी असते, तर मन साशंक झाले असते. पण थेट राशिवडेकर आडनावामुळे माणूस पक्का कोल्हापूरचाच, याची खात्री पटते. या अप्पाशास्त्रींच्या संपादकत्वाखाली संस्कृतचंद्रिकेने खूप मोठी लोकप्रियता मिळविली. अप्पाशास्त्री यातून प्रखर राजकीय लेख लिहीत असत. त्यामुळे ब्रिटीशांच्या जेलमध्ये त्यांचे सातत्याने जाणे-येणे सुरू असायचे.

या अप्पाशास्त्रींची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता २ नोव्हेंबर १८७३ ते २५ ऑक्टोबर १९१३ असा त्यांचा जीवनकाल असल्याचे समजले. संस्कृतचंद्रिकेच्या बरोबरीनेच त्यांनी सनृतवादिनी या वृत्तपत्राचेही प्रकाशन केल्याचा उल्लेख आढळतो. हिंदी पत्रकारितेत महावीर प्रसाद द्विवेदी यांनी जे काम केले, त्या तोडीचे काम संस्कृत पत्रकारितेत अप्पाशास्त्रींनी केल्याचे गौरवपूर्ण उल्लेख आढळतात. क्रांतदर्शी कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. ऋतुचित्रम् या त्यांच्या कवितेची तुलना ऋतुसंहाराशी केली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या पञ्जरबद्धाः शुकः,वल्लभविलापः, मल्लिकाकुसुमम् या कविताही चिरस्मरणीय असल्याचा उल्लेख आढळतो.

स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडात आनंदपत्रिका (१९२३), गीर्वाण (१९२४), शारदा (१९२४), श्रीः (१९३१), उषा (१९३४), संस्कृत-ग्रंथमाला (१९३६), भारतश्रीः (१९४०) आदी नियतकालिके प्रकाशित झाली. कानपूरहून श्री. केदारनाथ शर्मा यांचे मासिक संस्कृत-रत्नाकरः (१९३८) आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे त्रैमासिक गंगानाथ झा रिसर्च जर्नल (१९४१) इत्यादी प्रकाशित होऊ लागली.

स्वातंत्र्योत्तर कालखंडातही ब्राह्मणमहासंमेलनम् (१९४८), गुरूकुलपत्रिका (१९४८), भारती (१९५०), संस्कृत-भवितव्यम् (१९५२), दिव्यज्योतिः (१९५६), शारदा (१९५९), विश्व संस्कृतम् (१९६३), संविद् (१९६५), गाण्डीवम् (१९६६), सुप्रभातम् (१९७६), संस्कृतश्रीः (१९७६), प्रभातम् (१९८०), लोकसंस्कृतम् (१९८३), व्रजगन्धा (१९८८), श्यामला (१९८९) इत्यादी वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली.

१९७० साली संस्कृत पत्रकारितेच्या क्षेत्रात ऐतिहासिक घटना घडली. म्हैसूरचे संस्कृत विद्वान, गीर्वाणवाणीभूषण पंडित के.एन. वरदराजय्याचार्य यांनी सुधर्मा हे संस्कृत दैनिक सुरू केले. आज अनेक आव्हानांचा सामना करीत सुधर्मा सुवर्णमहोत्सवाच्या टप्प्यावर आहे. त्याची ऑनलाईन आवृत्तीही आज उपलब्ध आहे.

आजघडीला या एकमेव संस्कृत दैनिकाचा खप २००० ते ३००० प्रतींच्या घरात आहे. संस्कृत शिकविणाऱ्या संस्था आणि व्यक्तींपुरताच हा खप मर्यादित आहे. इतरही जर्नलसदृष प्रकाशने, नियतकालिकेही साधारण दीडशेच्या घरात आहेत. मात्र त्यांचा खपही मर्यादित आहे.

तुम्हाला हे ऐकून सुखद आश्चर्याचा धक्का बसेल की, पॉण्डिचेरीहून डॉ. सम्पदानन्द मिश्र हे www.divyavanee.in या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून संस्कृत कार्यक्रमांचे २४X७ ऑनलाईन प्रसारण करीत आहेत. तिरुअनंतरपुरम् येथील जनम् या मल्याळम् वाहिनीवर २ ऑक्टोबर २०१५ पासून १५ मिनिटांचा वेळ संस्कृत बातम्यांसाठी राखून ठेवण्यास सुरवात केली आहे. आमचे नाशिकचे मित्र आणि ऑनलाईन डिक्शनरीकार सुनील खांडबहाले त्यांच्या पोर्टलवरुन ऑनलाईन संस्कृत कम्युनिटी रेडिओ चालवितात.

या पार्श्वभूमीवर, आज सर्व संस्कृतप्रेमींसमोर आव्हान आहे ते या भाषेच्या प्रसाराचे व संवर्धनाचे! एके काळी ज्ञानभाषा असणारी संस्कृत ही तिच्या अभिजाततेसाठी ओळखली जात असे. भाषा वृद्धिंगत व्हायची असेल तर ती ज्ञानभाषा, प्रमाणभाषा आणि बोलीभाषा या त्रिस्तरापैकी किमान एका स्तरावर अविचल असली पाहिजे. आज संस्कृत पूर्ण सक्षम असूनही यापैकी कुठेही नाही, याचे कारण म्हणजे आपण शालेय अभ्यासक्रमात तिची केवळ गुणांशी घातलेली सांगड होय. दहावी, बारावीपर्यंत गुण मिळवून देणारा विषय म्हणून तो अभ्यासात घेणे आणि स्कोअरिंग झाले की सोडून देणे, यापायी गुणाढ्य संस्कृतचे नुकसान झाले आहे. आता तर मराठी विषयालाही तसे भारंभार गुण पडताहेत (नव्हे, दिले जाताहेत!)

त्याऐवजी संस्कृमधील प्रचंड ज्ञानभांडाराचे मार्केटिंग करण्याची आज खरी गरज आहे. संस्कृत ही केवळ मार्कांची भाषा नसून तीच खऱ्या अर्थाने गुणसंस्काराची भाषा आहे, हे आपण नव्या पिढीवर बिंबवायला हवे. ऋग्वेदातल्या ऋचा या द्विअर्थी अगर अनेकार्थी आहेत. असे अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. त्या ग्रंथांच्या संदर्भात सखोल अशा अभ्यासाची, चिंतनाची आणि संशोधनाची गरज आहे. त्यासाठी नव्या पिढीला संस्कृतमधल्या करिअर संधींची माहिती देऊन या संशोधनाकडे वळण्यास प्रवृत्त करायला हवे. मात्र, आपल्यापेक्षा जर्मनीमध्ये संस्कृतच्या अनुषंगाने प्रचंड असे संशोधन सुरू आहे.

आपल्याकडे असे व्हावयाचे असल्यास आपण संस्कृतची सर्वप्रथम रिच्युऍलिझममधून सोडवणूक केली पाहिजे. देववाणी, देवभाषा असे कानावर सारखे पडत असल्यामुळे ते तर देवाचे, त्यात आपला काय संबंध?’ असा सर्वसामान्यांचा सूर असतो. तो स्वाभाविकही आहे. पूर्वी या ज्ञानसंचितापासून आपणच हेतुपुरस्सर बहुजनांना या भाषेपासून दूर ठेवले. त्यामुळे त्यांना तिच्याविषयी आपलेपणा वाटत नाही. हा दुरावा कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. संस्कृतला देवभाषा म्हणणे याचा संबंध प्युरिटीशी अर्थात पावित्र्याशी, शुद्धतेशी आहे. ध्वनीची, वाणीची शुद्धता आणि त्यायोगे मनाची शुद्धता इथे अभिप्रेत आहे, हे आपल्याला नव्याने लोकांपर्यंत नेले पाहिजे.

बहुजनांनी, विशेषतः शूद्रातिशूद्रांनी संस्कृत ऐकणे, वाचणे, बोलणे महापाप समजले जायचे. आता तसे मानण्याचे काहीच प्रयोजन नाही. पण, संस्कृतला आता ब्राह्मणांची भाषा म्हणून सुडाचा सामना करावा लागतोय का, हेही पाहावे लागेल. या गुंत्यातून संस्कृतची सोडवणूक आपल्याला करावी लागेल.

संस्कृत उच्चारांमुळे ही भाषा अवघड आहे, असा समज पसरला आहे. पण, मूलभूत व्याकरण, शब्दसंपदा यांच्या बळावर ती समजून घेणे, अवगत करणे काहीच अवघड नाही. संस्कृत ही सोपी- अतिशय सोपी भाषा आहे, हे लोकांना नव्याने पटवून द्यावे लागेल. लोकांना ती आपली वाटली पाहिजे, या दृष्टीने व्यापक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे.

आजच्या पिढीशी त्यांच्या संवाद साधनांच्या माध्यमातून आपण संवाद साधायला हवा. त्यासाठी समाजमाध्यमांचा मुबलक वापर करायला हवा. एकीकडे संगणकासाठी सर्वाधिक सोपी, सरल भाषा म्हणून संस्कृतचा गौरव करीत असताना आजही गुगलने त्यांच्या ट्रान्सलेटर अॅपमध्ये संस्कृत भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. त्यासाठीही व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे.

एकूणातच संस्कृतला तिचे मूळ वैभव परत मिळवून द्यावयाचे असेल तर, आपल्याला तिची अभिजनवादी मानसिकतेमधून प्रयत्नपूर्वक सुटका करून बहुजनवादी बनविण्यासाठी पराकाष्ठा करण्याची आजघडीला नितांत गरज निर्माण झाली आहे.

अलिकडेच प्रख्यात विचारवंत व ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयी यांचे संस्कृतविषयी अत्यंत परखड मत प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणतात, संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात भाषा आहेत. त्यांचे ज्ञान असलेले खूप कमी लोक भारतात आहेत. या भाषांच्या बाबतीत विद्वत्तेच्या अभावाचे मोठे संकट आहे. या भाषांचे विश्वसनीय स्रोत हळूहळू कमी होत आहेत, पण विदेशात अधिक प्रमाणात आहेत.

संस्कृतला स्तुती, चापलुसी, अंधभक्तीची भाषा बनविले जात आहे. ते अज्ञानी आहेत किंवा संस्कृतमधील निर्भयतेचा स्वीकार करू इच्छित नाहीत. संस्कृतमध्ये जेवढी निर्भयता, जिज्ञासा, ज्ञानाच्या विविधतेचा स्वीकार आहे, तो अनेक भाषांमध्ये नाही. वेद वैदिक संस्कृतमध्ये लिहीण्यात आले. संस्कृतची बौद्धिक परंपरा शास्त्रार्थाची होती. नवा विचार मांडण्यासाठी तुम्हाला इतिहास सांगावा लागतो. त्यानंतरच नवी विचारसरणी आणावी लागते. तिला चरणस्पर्शी भाषा करणे हा अन्याय आहे.

मित्र हो, इतर ठिकाणी देव बसवून कोणत्याही कार्याची सुरवात होते. संस्कृतची सुरवात मात्र देव शब्द चालवण्यापासून होते. इतकी व्हायब्रन्सी ज्या भाषेत आहे, त्या भाषेवर प्रेम करणारे आपणासारखे जाणते आहेत, तोपर्यंत ही प्रातःस्मरणीय भाषा टिकणार आहेच. आपण सारे मिळून तिच्या संवर्धनासाठी कृतीशील प्रयत्न करण्यासाठी प्रतिबद्ध होऊ या!

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

माझे वैचारिक मार्गदर्शक प्रा. हरी नरके

 

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या 'निखळ: जागर संवेदनांचा' या ललितलेख संग्रहाच्या प्रकाशन समारंभास प्रा. हरी नरके प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संग्रहित छायाचित्र. 

प्रा. हरी नरके यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर

(ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे बुधवार, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी अकाली निधन झाले. हा आमच्यावर खूप मोठा दुःखाचा आघात आहे. या निमित्ताने नरके सरांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख सन्मित्र मोहसीन मुल्ला यांनी लिहवून घेऊन 'पुढारी ऑनलाईन'वर प्रकाशित केला. हा लेख दै. पुढारीच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

आयुष्यात असे काही प्रसंग येतात की जे तुम्हाला स्तब्ध, निःशब्द करून टाकतात. कालचा, ९ ऑगस्टचा दिवस माझ्या आयुष्यात असाच उगवलेला. ऑगस्ट क्रांतीदिनाच्या भरगच्च कार्यक्रमांचे वार्तांकन करण्याचे मनात नियोजन करीत घरातून बाहेर पडलो; तेवढ्यात दिनेश कुडचे याचा हरी नरके सर गेल्याचा तीन शब्दांचा संदेश प्राप्त झाला. सुन्न झालो. त्याच अवस्थेत ऑफिसमध्ये पोहोचलो. आमच्या कॉमन मित्रांपैकी एखाद्याला फोन करून वृत्ताची शहानिशा करावी, असंही वाटेना. तोवर सर्वच माध्यमांतून हे भयावह वृत्त खरे असल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे कार्यालयीन कामांचा यांत्रिकपणे निपटारा करीत असताना दुसरीकडे सरांच्या आठवांचा कल्लोळ मनात उसळलेला होता. सरांविषयी लिहावं, असे काही माध्यमकर्मी मित्रमंडळींचे फोनही आले, पण रात्री घरी परतल्यानंतरही सरांच्या आठवणींनी मनात इतकी प्रचंड गर्दी केली की काय लिहावं अन् काय नको, अशी अवस्था होऊन गेली. मनातला कोलाहल वाढलेलाच होता. अस्वस्थता मनभर पसरलेलीच होती. अशाच अवस्थेत रात्री उशीरा कधी तरी झोप लागली.

हरी नरके सरांचं माझ्या आयुष्यात वैचारिक मार्गदर्शकाचं स्थान होतं. माझ्याच काय, एकूणच महाराष्ट्राचेही ते वैचारिक दिग्दर्शक होते. आम्हा दोघांमधील संवाद हा अत्यंत कम्फर्टेबल असायचा. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला वैचारिक आणि संशोधकीय अधिष्ठानाच्या बळावर पुढे घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी अंगिकारलेलं होतं आणि अत्यंत निष्ठापूर्वक त्यांनी ही धुरा त्यांच्या खांद्यावर अखेरच्या क्षणापर्यंत वाहिली. ५६ पुस्तकांबरोबरच त्यांच्या अगणित दैनंदिन पोस्टमधून त्यांचा हा संशोधकीय विचारवंताचा पैलू अत्यंत झळाळून आपल्यासमोर सिद्ध झालेला आहे.

सरांची व्याख्यानं ऐकणं आणि त्यांना बोलताना पाहणं, हा एक समृद्ध करणारा आनंदानुभव असायचा. सुरवातीला श्रोता म्हणूनच मी त्यांच्याशी जोडला गेलेलो होतो. मुळातच सर एक पट्टीचे वक्ते असल्यानं समोरच्या श्रोत्यांना खिळवून कसं ठेवायचं, याची उत्तम हातोटी त्यांना साधलेली होती. सातत्यपूर्ण वाचनामुळं त्यांच्याकडं विविध विषयांच्या संदर्भांची खाण असायची. या संदर्भांची आपल्या भाषणामध्ये पखरण करताना श्रोत्यांना ते बोजड न वाटता सहजपणानं लक्षात राहतील, अशा पद्धतीनं त्यांची पेरणी ते करत. भाषणात आक्रमकता असायची, पण ती मुद्द्यांवाटे सामोरी यायची. कित्येकदा टोकदार उपरोधानं समोरच्याला ते आत्मपरीक्षणाला भाग पाडत. त्यावेळी मंद हसत, डोळे बारीक करून हळूच मिचकावण्याची त्यांची शैलीही लाजवाब असायची. अशा वेळी त्यांच्या गालावर पडणारी खळी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला लोभसपणा प्राप्त करून द्यायची. श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या मित्रपरिवाराचं नाव घेऊन संबोधण्याची त्यांची स्टाईलही युनिक होती.

प्रांजळपणा आणि परखडपणा या परस्परविरोधी गुणांचाही अत्यंत संतुलित संगम त्यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये होता. लोकांशी बोलताना कोणताही अभिनिवेश ते बोळगत नसत. साधेपणाने आणि आपुलकीने मिठ्ठास बोलत ते समोरच्याला आपलेसे करीत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाबतीत कोणी वस्तुनिष्ठता सोडू लागला की अत्यंत कठोरपणाने ते त्यांचे मुद्दे खोडून काढत. टेल्कोतील नोकरी सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवर आल्यानंतर पहिले वेतन २७ महिन्यांनी मिळाले आणि दुसरे आणखी वर्षभराने, हे त्यांनी त्यांच्या संपादकीय टिपणीत स्पष्टपणे नोंदविले. वसंत मून गेले, तेव्हा त्यांचेही दोन वर्षांचे वेतन थकलेले होते, हेही त्यांनी परखडपणे लिहीले. अशा परिस्थितीतही आपल्या कुटुंबियांनी आपल्याला सांभाळून घेतले, याची प्रांजळ नोंदही त्यांनी त्यात केली.

फुले-शाहू-आंबेडकरांचे अनेक संदर्भ त्यांना मुखोद्गत असत. त्यांची स्मरणशक्ती अचाट होती. मी वेळोवेळी काही शंका अगर संदर्भांच्या अनुषंगानं त्यांना फोन करीत असे. त्यावेळी ते संदर्भांची मालिका त्याच फोनवर सांगायला चालू करत. पाहून ठेवतो, थोड्या वेळानं फोन कर,’ वगैरे कधीच त्यांनी सांगितलं नाही. त्या अर्थानं फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा ते चालताबोलता कोश होते, हे मी माझ्या अनुभवातून ठामपणानं सांगू शकतो. मंत्रालयात असतानाच्या काळात कधी काही शेअरिंग करायचं असलं की त्यांचं बॅरेक्समधलं कार्यालय हे माझं आनंदनिधान असायचं. वेळ मिळाला की तिथं जाऊन नरके सरांशी गप्पा मारणं आणि त्या गप्पांतून आपसूक मिळणारे नवीन वाचनासाठीचे संदर्भ, फुले-आंबेडकरांच्या कार्याच्या त्यांच्या संशोधनातून सामोरी आलेली नवी माहिती, त्यांचं नवीन लिखाण अशा अनेक बाबींवर चर्चा होत. माझ्या पीएच.डी. संशोधनादरम्यान तर माझी सर्वाधिक चर्चा ही नरके सरांशीच होत होती. त्यातून आमच्या वयातलं अंतर पार होऊनही एक आगळं मैत्र आमच्यात जोडलं गेलं. त्यामध्ये माझ्यापेक्षा त्यांचं प्रेम, आपुलकी आणि सौजन्य यांचा वाटा अधिक होता. विशेष म्हणजे हे मैत्र मी कोल्हापुरात आल्यानंतर सुद्धा अबाधित राहिलं. त्यांचा कोल्हापूर दौरा असला की, संबंधित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि उतरण्याचं ठिकाण याची माहिती ते आवर्जून पाठवायचे. त्यांचं व्याख्यान शक्यतो मी कधी चुकवायचो नाही कारण दरवेळच्या भाषणातून काही नवे संदर्भ निश्चितपणानं मिळायचे. अगदीच शक्य नाही झालं तर सकाळच्या अगर संध्याकाळच्या सत्रात आम्ही भेटायचो. छान गप्पा व्हायच्या, शक्य असल्यास आम्ही एकत्र नाश्ता अथवा भोजन घ्यायचो. वेळ असेल तर घरी जायचो. त्यांचं आतिथ्य करायला माझ्या पत्नीलाही आवडायचं कारण ताटातला अन्नाचा कण अन् कण टिपून खाऊन तृप्त होणारा हा एक समाधानी माणूस होता. त्या एकेका दाण्यासाठी आपला समाज कसा आसुसलेला असायचा आणि आज तो मिळत असताना त्याप्रती कृतज्ञभाव बाळगणं आवश्यक आहे, ही आम्हा दोघांचीही धारणा असल्यानं हा कौटुंबिक जिव्हाळाही सरांनी खूप आत्मियतेनं जपला. या व्यक्तीगत जिव्हाळ्यातूनच माझ्या पहिल्या निखळ: जागर संवेदनांच्या या ललितसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिलेच, शिवाय, माझ्याविषयी आणि पुस्तकाविषयीही अगदी भरभरून बोलले. त्यांचे हे शब्दच आता सोबत राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी माझा आतेभाऊ नितीन याच्या हातचा तांबडा-पांढरा चाखलेला होता. त्याचे ते चाहतेच बनले होते. अगदी अलिकडेही एकदा त्यांनी त्याची आठवण काढली होती.

सरांच्या अखेरच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी माझ्या लेकीसह मी त्यांची भेट घेतली. स्विनीची अतिशय ममत्वानं चौकशी करीत त्यांनी तिला तोंडभरून आशीर्वाद दिले. गप्पांच्या दरम्यान त्यांच्या समग्र आजारपणाविषयी आणि उपचारांविषयी ते सांगत होते. चेहऱ्यावरील आणि अंगावरील सूज लपत नव्हती, पण ती किती तरी कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. जीभेवर मणामणाचं ओझं असल्याप्रमाणं ती उचलली जात नव्हती. हे ऐकताना तर अंगावर काटाच उभा राहिला. आताही बोलताना जीभेमुळं त्यांचा आवाज थोडा बदलला होता, पण लोकांचं प्रेम आणि आग्रह यामुळं आपलं सारं आजारपण बाजूला ठेवून ते व्याख्यानाला उभे राहात असत. आम्ही त्यावेळी पोहे खात होतो. सर म्हणाले, आलोक, तुला हे जितके तिखट किंवा खारट लागताहेत ना, त्याच्या किमान चौपटीने अधिक त्या चवी मला झोंबतात. म्हणजे त्यांच्या अगदी खाण्यावरही अशा प्रकारचे निर्बंध आले होते. उष्टे राखायचे नाही, म्हणून घेतानाच ते कमी अन्न घेत असत. यानंतर मात्र एकदा-दोनदा फोनवर बोलणं होऊन प्रकृतीची विचारपूस झाली, त्यापलिकडं भेट नाही. आणि सर असे अचानक निघून जातील आणि त्यांच्यावर स्मृतीलेख लिहीण्याची वेळ येईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण, तसं झालंय खरं.

सरांविषयी किती लिहावं... भेटल्यावर प्रेमानं हात हातात घेऊन चौकशी करणं, कधी आठवण आली की मिस्ड कॉल करणं (बैठकीत वगैरे असल्यास डिस्टर्ब नको म्हणून), फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा नॉनसेन्स खपवून न घेणं आणि त्याचा हिरीरीनं सप्रमाण प्रतिवाद करणं, ट्रोलधाडींना तोडीस तोड प्रत्युत्तर देणं, आरोग्य कितीही बिघडलेलं असलं तरी सातत्यानं लिहीत राहणं, लोकांना चांगल्या कार्यास प्रेरित करीत राहणं अशा एक ना अनेक गोष्टी आठवताहेत. त्यांच्या जाण्यानं एका ज्येष्ठ सहृदयी सन्मित्राला मुकल्याची भावना मनात दाटून राहिली आहे.

नरके सर कुटुंबवत्सल होते. आमच्या समानधर्मींच्या संमेलनामध्ये ते आदरणीय संगीता वहिनींना आणि प्रमितीला आवर्जून घेऊन यायचे. या दोघींविषयीही अपार प्रेम व वात्सल्यानं त्यांचं हृदय ओथंबलेलं असायचं. प्रमिती अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःच्या बळावर यशाचा एकेक टप्पा सर करीत चालली आहे, त्याचं आणि त्याहूनही अधिक तिच्या प्रयोगशीलतेचं कोण अप्रूप त्यांना असायचं. प्रमितीही आमच्या घरात पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही तिघं राहतो, असं सांगत वडिलांच्या पुस्तकप्रेमाचं अभिमानानं कौतुक करायची. या तिघांचं एक वेगळं विश्व होतं. त्या विश्वाचा एक कोन सरांच्या रुपानं लोपला आहे, ही त्यांची फार मोठी हानी आहे. आमच्याच आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही. त्यांच्या तरी कशी निघावी? त्यांना सावरण्याचं बळ लाभो, एवढीच भावना या क्षणी मनात आहे.

मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करवून देणं, फुले-आंबेडकरी चळवळींचं लोकशाही प्रस्थापनेसाठीचं महत्त्व सातत्यानं अधोरेखित करीत राहणं, ओबीसी समाजामध्ये जनजागृतीसह प्रबोधनाचं कार्य गतिमान करणं आणि भारतीय समाजाची जडणघडण संविधानाला अभिप्रेत अशी समताधिष्ठित करणं, ही आद्यकर्तव्यं घेऊन नरके सर मिशनरी भावनेतून अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. त्यांची ही अंगिकृत कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहणं, हीच हरी नरके यांच्या कार्याप्रती खरी आदरांजली ठरेल.


(पुढारी ऑनलाईनवर प्रकाशित लेखाची लिंक अशी- आंबेडकरी चळवळीला पुढे नेणारे लेखक हरपले | पुढारी (pudhari.news))

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

बाबासाहेबांच्या समग्र चळवळींचे नेटके दस्तावेजीकरण

 (डॉ. भगवान माने यांच्या नूतन पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख दै. लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये आज, रविवार दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आला. हा लेख दै. लोकमतच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)




शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे माजी प्राध्यापक तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे माजी संचालक डॉ. भगवान माने लिखित व संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचा अन्वयार्थ: साऊथबरो कमिशन ते धम्मचक्र प्रवर्तन हे एक महत्त्वाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात सन १९१९पासून ते १९५६ पर्यंत सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी केलेल्या चळवळींचे समग्र दस्तावेजीकरण करण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.

बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या सर्व चळवळींच्या मुळाशी सामाजिक-आर्थिक आणि राजकीय समता प्रस्थापनेचे तत्त्व होते. अगदी धम्मक्रांतीच्या मुळाशीही सामाजिक-राजकीय परिवर्तन साध्यतेचा हेतू होता. विषमता हाच स्थायीभाव असलेल्या भारतीय समाजाला लोकशाही मूल्यांचा परिचय करून देऊन मूल्याधारित समता व सामाजिक न्यायासाठी आग्रही चळवळींचे बीजारोपण खऱ्या अर्थाने या भूमीमध्ये बाबासाहेबांनी केले. साऊथबरो फ्रॅंचाईज कमिशनसमोरील साक्षीपासूनच बाबासाहेबांचा हा मूल्याग्रह प्रकर्षाने सामोरा येत राहतो. तो पुढे टप्प्याटप्प्ने अधिकाधिक टोकदार होत गेलेला आहे. सायमन कमिशनसमोरील साक्षीपासून पुढे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, महाडचा सत्याग्रह, अंबादेवी मंदिर सत्याग्रह, मनुस्मृती दहन, पर्वती मंदिर सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, तीनही गोलमेज परिषदांतील कामगिरी, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना आणि धम्मचक्र प्रवर्तन या चळवळींचा सर्वंकष आढावा घेऊन त्यांचा अन्वयार्थ समजावून देण्याचा प्रयत्न येथे दिसतो. त्याच बरोबर त्यांच्या प्रस्तुततेच्या अनुषंगानेही चर्चा केली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भांडवली विकासाचे आधुनिकीकरणाचे नेहरू प्रारूप आपण स्वीकारले. त्यामध्ये समाजवादाचा विचार अभिप्रेत होता. सन १९९२पासून नवीन आर्थिक धोरणाचे पर्व सुरू झाले. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणामुळे बेरोजगारी, खाजगी उद्योगधंदे, राखीव जागांच्या विरोधी धोरण, गरीब, वंचित वर्गाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. दलित पँथरने नुकतीच पन्नाशी पूर्ण केली, परंतु त्या अगोदरच धगधगत्या चळवळीचा ऱ्हास झाला. मार्क्सवादी आणि गांधीवादी चळवळी आंबेडकरी चळवळीत दुही निर्माण करतात आणि मूळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बुद्धांच्या विचारात संभ्रम निर्माण करतात. याचा बोध आंबेडकरी चळवळींच्या अन्वयार्थातून घेतला पाहिजे. नव्या संरचनेत बाबासाहेबांच्या विचारधारेवरील चळवळी गतिमान केल्या पाहिजेत आणि आंबेडकरी चळवळी गटाचे ऐक्य ही काळाची गरज आहे.असे नेमके विश्लेषण डॉ. माने यांनी केले आहे.

बाबासाहेबांनी केलेल्या चळवळी या विद्यार्थ्यांसह चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभ्यासपूरक आहेत. त्यासाठी त्यांचे संकलन केले आहे. वेगळे काही केलेले नाही, असे डॉ. माने प्रांजळपणे सांगतात. तथापि, बाबासाहेबांचे जीवनकार्य, त्यांच्या चळवळी यांचा कालसुसंगत अन्वयार्थ लावत असतानाच त्यांच्या प्रस्तुतता सातत्याने अधोरेखित करीत राहणे, ही आजघडीची महत्त्वाची गरज आहे. हे अधोरेखन सदर पुस्तक पुन्हा नव्याने करते, म्हणूनच त्याची नोंद आवश्यक ठरते.

 

पुस्तकाचे नाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचा अन्वयार्थ: साऊथबरो कमिशन ते धम्मचक्र प्रवर्तन

लेखन व संपादन     : प्रा. डॉ. भगवान माने

प्रकाशन             : रुपी पब्लिकेशन्स प्रा.लि., गडहिंग्लज

पृष्ठसंख्या         : २२४

किंमत               : रु. २५०/-