शनिवार, १९ फेब्रुवारी, २०११

अजिंठा टुरिस्ट कॉम्प्लेक्स


जपान बँक फॉर इंटरनॅशनल कॉ-ऑपरेशन (जेबीआयसी) या बँकेच्या मदतीने अजिंठा येथे पर्यटनाच्या वृध्दीसाठी व पर्यटकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प टुरिस्ट कॉम्प्लेक्सच्या रुपाने साकार होत आहे. या प्रकल्पाविषयी...

बौध्द धर्म... इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भगवान बुध्दाने शांती, करूणा, अहिंसेचा दाखविलेला मार्ग... भारताने जगाला दिलेली एक महान देणगी... आज व्हिएतनाम, जपान, श्रीलंका, नेपाळ, तिबेट, भूतान, दक्षिण कोरिया, तैवान, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, चीन अशा अनेक देशांनी या मार्गाचा अंगिकार केला... जगभरात बुध्दाचे अनुयायी 33 कोटीच्या घरात आहेत... पण मधल्या काळात उद्गात्या भारतातच बौध्द धर्माने अस्ताचल पाहिला... मुस्लीम चढाया, हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन... कारणे काही असोत, बौध्द धर्माची पीछेहाट झाली. धर्माचा प्रसार कमी झाला तरी एके काळी अत्यंत भरभराट पाहिलेल्या या धर्माच्या भिक्षूंनी, अनुयायांनी, प्रचारकांनी धर्मप्रसारासाठी केलेले प्रयत्न आजही साहित्य, चित्रे, कलाकृती वा भग्नावशेषांच्या रुपात का असेना पाहता येतात... या धर्माच्या तत्कालीन लोकप्रियतेची जाणीव आपल्याला नक्कीच होते. या धर्माचा अमूल्य ठेवा आपल्या महाराष्ट्रात अजिंठा, वेरुळ, घारापुरी, औरंगाबाद येथे लेण्यांच्या स्वरुपात उभा आहे.
अजिंठा हा तर केवळ देशातीलच नव्हे तर जागतिक दर्जाचा प्राचीन वारसा असल्याचे युनेस्कोनेही जाहीर केले आहे. अशा या ठिकाणाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील बौध्द अनुयायी अत्यंत भाविकतेने येत असतात. त्यामध्ये जपानी अनुयायांची संख्याही लक्षणीय असते. जपानच्या जपान बँक फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन (जेबीआयसी) या बँकेने अजिंठा-वेरुळचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व जाणूनच त्याच्या जतनासाठी पुढाकार घेतला आणि भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयास 7331 दशलक्ष येन इतक्या खर्चाचा प्रस्तावही सादर केला. हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांना एक्झिक्युटीव्ह एजन्सी नेमण्यात आले. जेबीआयसीमार्फत देण्यात येणारा काही निधी पुरातत्त्व खात्याकडेही जतनाच्या कार्यासाठी देण्यात आला असून अन्य निधीच्या माध्यमातून अजिंठयानजीक अजिंठा टुरिस्ट कॉम्प्लेक्स व व्हिजिटर सेंटर साकार करण्यात येत आहे.
अजिंठयाच्या पायथ्याशी टी-जंक्शन येथे सध्या एल ऍन्ड टी कंपनीतर्फे भव्यदिव्य असे टुरिस्ट कॉम्प्लेक्स उभे राहात आहे. सुमारे 56 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे स्वरुप अत्यंत भव्य, देखणे व आकर्षक असे आहे. पाच म्युझियम, चार गुहांच्या प्रतिकृती, सायक्लोरामा, ऍंम्फी थिएटर, स्टडी सेंटर, रेस्टॉरंट अशा अनेक अभिनव गोष्टींचा या प्रकल्पात समावेश आहे. सुमारे 45 हजार चौरस मीटरच्या लँडस्केप जागेवर 15 हजार चौरस मीटरवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. सुमारे 55 हजार घनमीटर इतका दगड खोदल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाचा ढाचा उभा राहिला असून लवकरच काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पातील सायक्लोरामा ही एक अभिनव अशी संकल्पना आहे. यामध्ये एक दुमजली घुमटाकार इमारत आहे. त्या घुमटावर भगवान बुध्दाच्या चरित्रातील प्रसंग, जातक कथा, अजिंठा-वेरुळच्या गुहांची माहिती, भारतीय कला-संस्कृती आदी विविध विषयांबाबत अत्याधुनिक ऑडिओव्हिज्युअल तंत्रज्ञानाच्या साह्याने सातत्याने प्रदर्शन केले जाणार आहे. ते पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना बसण्यासाठीही आरामदायी आसनव्यवस्था असेल.
अजिंठा येथील गुहा क्र.1, 2, 16 व 17 या चार गुहांच्या प्रतिकृती हा तर या प्रकल्पाच्या ठळक आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. या गुहांचे अंतर्गत व बाह्य स्वरुप, त्यांची रचना, बुध्दमूर्तींसह अन्य शिल्पाकृती, चित्रकृती, ध्यानगृह, निद्रागृह आदी सर्व गोष्टी अगदी हुबेहुब साकारण्यात येणार आहेत. या गुहांतील खांबांवर हेडफोन बसविण्यात आलेले असतील. त्याठिकाणी जगातल्या प्रत्येक प्रमुख भाषेत तत्कालीन इतिहास व माहिती ऐकविण्याची व्यवस्था करण्यात येईल. पाच संग्रहालयांत बौध्द तसेच अन्य पुरातन भारतीय साहित्य, कला आदींची माहिती देणारे विभाग असतील. गॅलरी, एक्झिबिशन सेंटर, मल्टिमिडिया ऑडिटोरिया, गाईड पोस्ट, कल्चरल प्लाझा आदींचा यामध्ये समावेश आहे. देशी परदेशी अभ्यासकांना तेथे संशोधन करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. खुल्या ऍम्फी थिएटरमध्येही संध्याकाळच्या वेळी विविध मनोरंजनाचे व स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम करता येतील.
याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी एक प्रशस्त रेस्टॉरंट, शॉपिंग कोर्ट, बैठक व्यवस्थेसह सज्ज कॉरिडॉर, उद्यान, ऍडल्ट्स व किड्स ओरिएंटेशन, एस्केलेटर, लिफ्ट्स अशा सुविधा असतील. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या कॉरिडॉरमध्ये विविध सुविधा पुरविणाऱ्या दुकानांसाठी गाळयांचीही व्यवस्था आहे. या संपूर्ण बांधकामाला प्राचीन काळाच्या बांधकामाचा लूक देण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात गुहांचे डिझाईन, पेंटिंग आदी जिकीरीची कामे करण्यात येणार आहेत. या केंद्राच्या रुपाने अजिंठयाच्या पायथ्याशी एक आकर्षक पर्यटनस्थळ साकार होत आहे, एवढे निश्चित!

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

अनमोल अजिंठा


प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून साऱ्या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...

कोणत्याही गोष्टीची एक वेळ यावी लागते, असं म्हणतात. त्यावर विश्वास बसावा, अशी माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट म्हणजे माझी अजिंठा लेण्यांना भेट. बी.एस्सी. एफ. वाय.च्या सहलीपासून म्हणजे साधारण 1995पासून एप्रिल 2008पर्यंत अशा सुमारे तेरा वर्षांच्या काळात अजिंठा-वेरूळ लेण्यांना भेट देता येईल, अशा अनेक संधी माझ्याकडे चालून येत होत्या. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणानं योग जुळून येत नव्हता. या काळात औरंगाबादलाही कितीतरी वेळा गेलो पण परिसरातील प्राचीन कला-संस्कृतीच्या या अनमोल खजिन्याचं दर्शन मी घेऊ शकलेलो नव्हतो. मात्र लोकराज्य पर्यटन विशेषांकाच्या निमित्तानं ही बहुप्रतिक्षित व बहुप्रलंबित संधी मी घेण्याचं ठरवलं. याला आणखीही एक महत्त्वाचं कारण होतं ते हे की अजिंठयाला मी प्रथमच जाणार असल्यानं तिथल्या सर्वच गोष्टी माझ्यासाठी नवीन असणार होत्या, तिथल्या प्रत्येक गोष्टीचं मला अप्रूप असणार होतं आणि या दृष्टीनंच मी तिथल्या प्रत्येक कलाकृतीकडं पाहू शकणार होतो, तिचा आस्वाद घेऊ शकणार होतो आणि जमेल तितकं, जमेल तसं वाचकांना सांगू शकणार होतो. माझ्या दृष्टीनं ही जमेची बाजू होती.

या अजिंठा भेटीच्या निमित्तानं आणखीही एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे अजिंठयाला जोडून नेहमीच वेरूळचं नाव येत असल्यानं (अजिंठा-वेरूळ असं) अत्यंत धावपळीत या ठिकाणांना भेट देऊन जाणाऱ्या बहुतेक व्यक्तींच्या मनात या दोन्ही लेण्यांबद्दल संभ्रम आढळतो. औरंगाबादला गेलेल्या माझ्या काही मित्रांनी अजिंठयापेक्षा तुलनेत जवळ असलेल्या वेरूळ लेण्या पाहिल्या होत्या. मी अजिंठयाला जातोय असं समजल्यावर त्यांनी मला कैलास लेण्यांपासून अन्य काही लेण्यांमध्ये छायाचित्र काढण्यासारखं काय काय आहे, याची माहिती दिली होती. साहजिकच ती माझ्या (निदान आता तरी) उपयोगाची नव्हती. अजिंठयाची माहिती काढत असताना ही गोष्ट माझ्या लक्षात आली, तेव्हाच मी ठरवलं की यावेळी आपण फक्त अजिंठा एके अजिंठाच पाहायचा. वेरूळ फिर कभी देखा जाए।

युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत 1982मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून 107 किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे 76 मीटर उंचावरील घोडयाच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठयाच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठयापर्यंतच्या दोन-अडीच तासांच्या प्रवासात मी प्रत्येक डोंगराकडे पाहायचो, कुठे एखादी लेणी दिसत्येय का म्हणून. पण अजिंठयाच्या कर्त्या-करवित्यांनी माझी पूर्ण निराशा केली. टी- जंक्शनपासून अजिंठयाच्या डोंगरावर एमटीडीसीच्या एसी-बसने गेलो तरी एखादा कोरीव दगडही दिसला नाही. तिथून काँक्रीटच्या बांधीव रस्त्यावरुन वर चढून गेलो अन् एका क्षणात साऱ्या लेण्या दृष्टीपथात आल्या. त्याच जागी कित्येक वेळ उभा राहून ते शेकडो वर्षांपूर्वीचं देखणं कोरीव रुप मी मनात साठवत राहिलो आणि थोडया वेळानं कॅमेऱ्यात. त्याक्षणी मी ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन यालाही शतश: धन्यवाद दिले कारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं या परिसरात आला असताना त्याला इथल्या 10व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौध्द लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 500 ते 600 अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं मला खरंच कौतुक वाटलं. बौध्द भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागीरांनी इतक्या कलात्मक, देखण्या शिल्पाकृती कोरल्या कशा असतील, याचंच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. आधी गुहेचा खडबडीत पृष्ठभाग कोरून त्यावर चिखलाचे प्लास्टर, पुन्हा त्यावर चुन्याचा पातळ थर देऊन त्यावर कलाकारांनी आपली चित्रकला प्रदर्शित केली आहे. शिल्पावर चुन्याचं प्लास्टर केल्याचं दिसतं. चिखलाच्या प्लास्टरमध्ये स्थानिक चिकणमाती, कर्नाटक किंवा तमिळनाडूत मिळणारी ग्रॅनाइटची बारीक पूड, विविध झाडांच्या बिया व तंतूंचं मिश्रण असतं. अंधाऱ्या गुहांत त्यांनी प्रकाशयोजनाही अत्यंत कल्पकतेनं केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरुन कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्यानं सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुहांमध्ये काम करण्यात आलं.
या तीस लेण्यांपैकी 9, 10, 19, 26 व 29 या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या विहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बौध्द धर्माच्या हीनयानपंथाच्या काळात झाली. यामध्ये 9, 10 या चैत्यगृहांसह 12, 13 व 15 अ या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यांच्यातील ढोबळ फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासारख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात. इथल्या काही गुहांमध्ये स्तुपावर बुध्दप्रतिमा कोरल्याचे दिसते, यावरुन त्या ठराविक काळात हीनयान व महायानपंथीयांच्या विचारसरणीचा संगम झाल्याचे दिसते. तर 19 क्रमांकाच्या गुहेमध्ये महायानांनी स्तुपालाच बुध्दप्रतिमेमध्ये प्रवर्तित केल्याचे दिसते. त्यामुळे बुध्दप्रतिमेच्या दोहो बाजूंना नेहमी दिसणारे पद्मपाणि व वज्रपाणि केवळ या प्रतिमेच्याच बाजूला दिसत नाहीत. कारण स्तुपासाठी आधीच दगड कोरल्याने त्यांच्यासाठी जागाच उरलेली नाही.
बुध्दाच्या जन्मकथेपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या कथांचा प्रवास दर गुहेगणिक इथं उलगडत जातो. त्याला जोड मिळते ती जातकातील सुरस कथांची. इथलं प्रत्येक चित्र-शिल्प आपल्याशी बोलतं, काही सांगू पाहतं. गरज असते ती आपण थोडा वेळ देण्याची. आपण जितकं पाहू तितकं त्यातलं नाविन्य प्रतित होत जातं. अप्रतिम शिल्पांबरोबरच शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांत रंगविलेली चित्रं आजही तितकीच टवटवीत आहेत. आधुनिक तर इतकी की त्रिमितीय आणि चौमितीय आभास निर्माण करण्याची क्षमता या चित्रांत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या गुहेतील पद्मपाणि. या चित्राच्या समोर उभं राहिलं की त्याचे दोन्ही खांदे एका रेषेत दिसतात. तेच चित्र डावीकडून पाहिलं की पद्मपाणिचा डावा खांदा वर उचलल्यासारखा आणि उजवीकडून पाहिलं की उजवा खांदा वर उचलल्यासारखा दिसतो. त्याची मानही त्याच प्रमाणात अधो वा उर्ध्व झाल्यासारखी वाटते. हा त्रिमितीय आभास चित्रात नाही तर ज्याठिकाणी आपण उभे राहतो, त्या अंतरावर अवलंबून असल्याचं दिसतं. हाच आभास 26 व्या गुहेतील बालकाच्या बाबतीतही आढळतो. कोठूनही पाहिलं तरी ते आपल्याकडे पाहात असल्याचा आभास होतो.
पहिल्या गुहेतील भगवान बुध्दाची मूर्तीही अशीच आश्चर्यजनक त्रिमितीय आभास देणारी. या मूर्तीवर उजवीकडून प्रकाश टाकला तर तिच्या चेहऱ्यावर कष्टी भाव दिसतात- जगातील दु:ख पाहून जणू भगवंत दु:खी झाले आहेत. डावीकडून प्रकाश टाकला तर याच चेहऱ्यावर समाधानाचे प्रसन्न भाव दिसतात- दु:खाचे मूळ आणि निर्वाणप्राप्तीचा मार्ग सापडल्याचा जणू हा आनंद आहे. समोरुन प्रकाश टाकला असता चेहऱ्यावर एकदम शांत, ध्यानस्थ भाव दिसतात. एकाच मूर्तीत त्रिमितीचं असं अन्य उदाहरण सापडणं दुर्मिळच.
याच गुहेतील उधळलेला बैल हा चौमितीचं उत्कृष्ट उदाहरण. ही चौथी मिती असते आपल्या दृष्टीकोनाची. सुरवातीला चित्राकडे पाहिलं तर काही विशेष असं न वाटणारं. पण जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही कोठूनही पाहा, तो आपल्यामागे धावतोय, असं वाटेल. त्यानंतर त्या चित्राकडे पाहिलं असता तसंच वाटतं. याठिकाणी एक सांगावसं वाटतं ते म्हणजे 14-15 व्या शतकात मायकेल एंजेलोनं चित्रकलेत द्विमितीचा आभास निर्माण केला आणि तो महान ठरला. त्याच्याही आधी आठशे वर्षे अशा कलाकृती निर्माण करणारे ते अज्ञात कलाकार किती महान असतील!
पद्मपाणिखेरीज फ्लाइंग अप्सरा, फ्लाइंग इंद्रा, अवलोकितेश्वर, कुबेर अशा जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती इथं जागोजागी आढळतात. तत्कालीन आधुनिक व फॅशनेबल राहणीमानाचं चित्रणही याठिकाणी आहे. यामध्ये दोनमजली, तीनमजली घरं आहेत. त्यामध्ये सोफासेट आहे, गॅलरी आहे. वाऱ्याच्या झुळुकीसरशी फडफडणाऱ्या मांडवाप्रमाणं भासणारं इथल्या काही लेण्यांचं छत आहे. वस्त्रप्रावरणं आणि आभुषणांची तर या चित्रांतून पखरणच आहे. राजकुमारीच्या सौंदर्यप्रसाधनाचा प्रसंग याठिकाणी आहे. तिच्या मेकअप बॉक्समध्ये असलेल्या सामग्रीपुढे आजच्या तरुणींचा मेकअप किटही फिका पडेल. लिपस्टीकची 'फॅशन' व 'पॅशन' त्या काळातही असल्याचं दिसतंच, त्यातही केवळ खालच्या एका ओठालाच लिपस्टीक लावण्याची फॅशन या चित्रांतून दृगोच्चर होते. आभुषणांच्या बाबतीतही तो काळ अत्यंत समृध्द व पुढारलेला असाच दिसतो आणि वस्त्रांच्या बाबतीतही मिनी-मिडीपासून मॅक्सी- साडीपर्यंत अशी व्हरायटी दिसते. आज आपल्याकडे साहेबाच्या पोशाखावरुन ज्या रंगाची पँट, त्या रंगाचे मोजे घालावेत, असा संकेत रूढ झालाय, पण इथल्या चित्रांवरुन त्या काळात ज्या रंगाचा फेटा, त्या रंगाचे मोजे घालावेत, इतकी पोषाखी टापटीप सांभाळल्याचं दिसतं. बहुरंगी, बहुआयामी मानवी प्रवृत्तीचं दर्शन इथल्या विविध जातक कथा घडवतातच, त्याचबरोबर कलियुगाविषयी भाष्य करायलाही इथली शिल्पं कमी पडत नाहीत. पत्नीचे पाय चेपणारा पती हे शिल्प याचंच द्योतक.
बौध्द लेणी असल्यामुळे साहजिकच भगवान बुध्दांच्या हजारो मूर्ती येथे पाहावयास मिळतात. अगदी सव्वा इंची मूर्तीपासून ते महापरिनिर्वाणावस्थेतील 24 फुटी बुध्द मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या अन् बारकाईनं पाहिलं तर एकमेकांपेक्षा भिन्न अशा आहेत. केवळ एका संपूर्ण दिवसातच अजिंठयाविषयी सांगण्या-बोलण्यासारखं इतकं काही मला मिळालं की कितीही लिहीलं तरी शब्द तोकडे पडतील. संध्याकाळी परतताना वाटत होतं की अजूनही या शिल्पचित्रांकडून पुष्कळ काही समजून घ्यायचं, पाहायचं राहून गेलंय. माझी रितेपणाची ही भावना लिहीताना अजिंठयाला भेट देऊ इच्छिणाऱ्यांना मला एकच सांगायचंय, ते म्हणजे अजिंठा हा आपला अमूल्य ठेवा आहे, तेव्हा तो पाह्यला जाताना मोठया आदरानं गेलं पाहिजे. पुन्हा तिथं काही कोरणं, कचरा करणं म्हणजे त्या कलाकारांचा व कलाकृतींचा अपमानच. जेव्हा वर चढून जाल तेव्हा दमलेल्या अवस्थेत कोणत्याही गुहेत जाऊ नका, कारण आपल्या जोराच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारी आर्द्रताही या चित्रांना घातक ठरू शकते. या शिल्प-चित्रांना जपण्यासाठी, जोपासण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी जिवाचे रान करत आहेत. या कामगिरीत आपणही असा हातभार नको का लावायला?

--

अजिंठा येथील गुहांची यादी

पहिला टप्पा : ख्रिस्तपूर्व दुसरे शतक ते ख्रिस्तपूर्व पहिले शतक लेणी क्र. 9 व 10 : चैत्यगृह लेणी क्र. 12, 13 व 15 अ : विहार
दुसरा टप्पा : इसवी सन 5 ते 6वे शतक लेणी क्र. 19, 26, 29 : चैत्यगृह लेणी क्र. 1 ते 7, 11, 14 ते 18, 20 ते 25, 27 व 28 : विहार
अपूर्ण लेणी : 3, 5, 8, 23 ते 25, 28 व 2
--
कसे जावे अजिंठयाला?
मुंबई- अजिंठा अंतर : जळगावमार्गे 491 कि.मी., मनमाडमार्गे 487 कि.मी. व पुणेमार्गे 499 कि.मी.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने औरंगाबाद व जळगाव येथून साध्या व लक्झरी गाडयांची सोय, अन्य खाजगी टूर ऑपरेटर कंपन्यांतर्फेही मुबलक वाहन सुविधा उपलब्ध.
नजीकचे रेल्वे स्थानक : मध्य रेल्वेचे जळगाव स्थानक (58 कि.मी.), औरंगाबाद (107 कि.मी.)
नजीकचे विमानतळ : औरंगाबाद 108 कि.मी.
राहण्याची सुविधा : अजिंठा, फर्दापूर तसेच औरंगाबाद येथे एमटीडीसीची पर्यटक निवासस्थाने व हॉटेल्स आहेत. औरंगाबाद येथे आयटीडीसीचेही निवासस्थान. त्याखेरीज औरंगाबाद, जळगाव येथे अनेक खाजगी हॉटेल्स, लॉज उपलब्ध.

रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

मनाची मशागत

उत्क्रांतीनंतरच्या कालखंडात मानवाच्या प्रगतीची सुरवात ही खऱ्या अर्थानं शेतीपासून झाली. सुरक्षिततेसाठी टोळया करून राहणाऱ्या मानवानं उपजिविकेसाठी शेती करण्यास प्रारंभ केला आणि एका वेगळया संस्कृतीची मूळ या पृथ्वीतलावर रुजली. मातीची मशागत करत मानवानं तेथपासून आजतागायत आपल्या प्रगतीचा विस्तार केला. पुढं त्याला औद्योगिकीकरणाची, माहिती तंत्रज्ञान क्रांतीची जोड मिळत गेली असली तरी या सर्व प्रगतीचा मूळ पाया हा शेतीकरणात होता, किंबहुना आजही मानवी जीवनाचा प्रमुख पाया हा शेतीच आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
जमिनीची मशागत करण्याचा शोध लावण्यामागं मानवाची विचारशक्ती ही खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. विचार करण्याची, आपल्या भावभावना वेगवेगळया माध्यमांतून व्यक्त करण्याची, अभिव्यक्त होण्याची शक्ती मानवाला लाभली. त्याचा प्रगत होत जाणारा, अधिकाधिक विचारक्षम होत जाणारा मेंदू हा त्यामागं आहे. या विचारशक्तीच्या, मन:शक्तीच्या बळावर माणसानं साऱ्या पृथ्वीवर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. इतर प्राण्यांना एकतर त्यानं आपला गुलाम केलं किंवा त्यांची निवासस्थानं असलेली अरण्यं प्रगतीच्या नावाखाली गिळंकृत करून त्यांच्या आस्तित्वालाच धक्का पोहोचवला. कित्येक वनस्पती-प्राण्यांच्या स्पेसीज त्यानं आजपर्यंत नष्ट करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
मानवाचं मन हे एक असं प्रकरण आहे की सातत्यानं ते आपल्या प्रगतीसाठी (की स्वार्थासाठी?) सातत्यानं वेगवेगळया क्लृप्त्या शोधण्यात मग्न असतं. मानवी जीवनाच्या इतिहासाच्या सुरवातीपासून पाहिलं तर असं लक्षात येईल की मातीची मशागत सुरू होण्यापूर्वी मानवाच्या मनाच्या मशागतीला सुरवात झाली होती. ही प्रक्रिया आजतागायत अखंडितपणे सुरू आहे. मानवाच्या सो कॉल्ड प्रगतीला त्यानं केलेली मनाची मशागतच पूर्णत: कारणीभूत ठरली आहे. काहीवेळा ही मशागत चुकीच्या मार्गानं गेली आणि मानवी इतिहासाला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडून गेल्या आणि जिथं उत्तम मशागत झाली त्यावेळी अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टी मानवी इतिहासात नोंदल्या गेल्या.
म्हणजेच लौकिकार्थानं मानवी संस्कृतीची सुरवात ही मातीच्या मशागतीपासून सुरू झाली, असं आपण ढोबळ मानानं मानत असलो तरी त्यापूर्वी त्याच्या मनाच्या मशागतीपासूनच, त्याच्या विचार करण्याच्या शक्तीमधूनच त्याच्या पुढील वाटचालीचा मार्ग मानव शोधत गेला, चोखाळत गेला, असं म्हणता येईल.
मानवाच्या या प्रगतीला विज्ञानाच्या विविध शोधांनी नवे आयाम प्राप्त करून दिले. औद्योगिकीकरणानं तर त्याच्या आकांक्षांना भरारी मारण्यासाठी नवे पंख दिले. कष्ट करून जीवनाची वाटचाल साध्यासरळ पध्दतीनं करणाऱ्या मानवाला औद्योगिकीकरणानं कमी कष्टात भरपूर सुखं मिळविण्याचा राजमार्ग दाखवला. त्या मार्गानं वेगवान वाटचाल करणाऱ्या मानवानं मग इकडंतिकडं न पाहता केवळ भौतिक सुखांची पाठ धरली. लाइफस्टाइल अधिकाधिक उच्च दर्जाची करण्याकडं त्याचा कल वाढला, अधिकाधिक भौतिक सोयीसुविधा आणि साधनांच्या तो मागं लागला. मानवाला या दिखावटी, कचकडयाच्या दुनियादारीचा मोठा मोह पडला आहे. विवध माध्यमांमधून हीच लाइफस्टाइल खरी आणि योग्य म्हणून या महागडया लाइफस्टाइलचं प्रचंड स्तोम माजवत मार्केटिंग सुरू आहे. या गोष्टी पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या अथवा परवडणाऱ्या आणि न परवडणाऱ्या अशा सर्व प्रकारचे लोक तिचा स्वीकार करत आहेत. स्वीकार न करणारे लोकही तिला प्रतिकार अथवा प्रतिवाद करू शकत नाहीत, इतकी तिचा भुरळ समाजमनावर पडली आहे. अशा गोष्टींच्या मागं लागत असताना मानवतावाद किंवा माणुसकी मात्र मागं पडू लागली आहे, ही खेदाची बाब आहे.
मानवी मन काळाबरोबर प्रगत आणि प्रगल्भ होत गेलं असलं तरी आज या प्रगल्भतेलाही संकुचिततेची एक काळी किनार लाभताना दिसत आहे. माणूस भौतिक अर्थानं कितीही मोठा होत गेला तरी मनानं मात्र आक्रसत असलेला दिसतो आहे. आजचा जमाना शहरीकरणाचा आहे, मात्र शहरात माणसं वाढत चालली असली तरी या शहरांतून माणुसकी मात्र हद्दपार होत चाललेली दिसते. जागतिकीकरणानं या शहरी माणसाला लाइफस्टाइलच्या एका अभेद्य चक्रव्यूहात असं काही बांधून टाकलं आहे की तो अखंडितपणे फिरत राहिला तरी तो भेदणं त्याला शक्य होत नाही. या लाइफस्टाइलच्या नादाता आणि स्वत:च्या व्यापात तो इतका गुंतून गेला आहे की स्वत:चा शेजारी कोण, हेही त्याला माहित नसतं. माहिती तंत्रज्ञानानं जगात मोठी क्रांती झाली. मार्शल मॅक्लुहानच्या म्हणण्यानुसार सारं जग एक खेडं बनलं. सारं जग जवळ आलं, मात्र आपला शेजारी मात्र दुरावला. आता हे दुरावणं शेजाऱ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही तर मोबाईल क्रांतीनं त्याच्याही पुढची मजल मारली आहे. घरातल्या माणसांतही आज संवाद राहिलेला नाही. मोबाईल कंपन्यांना पैसे देऊन त्यावरून एकमेकांशी तासंतास गप्पा मारणारी मंडळी समोरासमोर आल्यावर हाय-हॅलो च्या पलीकडं सरकू शकत नाहीत, ही या माहिती क्रांतीच्या युगातली सर्वात खेदजनक अशी बाब आहे.
सर्व प्रकारच्या नात्यांना आपण हाताच्या अंतरावर ठेवता ठेवता काही किलोमीटरपर्यंत नेऊन ठेवतो आहोत. कोणालाही कोणाविषयी ऍटेचमेंट राहिली नाही. नात्यांचे बंध-अनुबंध सुटे होत चालले आहेत. एकत्र कुटुंबं तर आता टीव्हीवरच्या मालिकांपुरतीच आणि ती सुध्दा एकमेकांविषयी द्वेषभाव जोपासण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहेत. सर्वच नातीगोती आपण व्यावहारिक पातळीवर नेऊन ठेवली आहेत. आईबापाचं नातंही त्याला अपवाद राहिलेलं नाही. आईबाप जे करतात, ते त्यांचं कर्तव्य असतं. मुलं जन्माला घातली तर ही कर्तव्यं त्यांनी पार पाडायलाच हवीत, अशी भावना आजच्या मुलामुलींमध्ये बळावत चाललेली दिसते. आईवडलांविषयी एवढी कृतज्ञता असेल, तर अन्य नात्यांच्या विषयी बोलायलाच नको? निस्वार्थ मैत्र तर हल्ली पाहायलाच मिळत नाही. मिळालेल्या मोकळिकीला स्वैराचाराचं आणि पुढं व्यभिचाराचं रुप येताना दिसतं आहे. आणि त्याचंही कुणाला काही वाटेनासं झालंय, इतका कोरडेपणा सर्वत्र निर्माण होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर लोकांचा कल देवाकडं वाढू लागलाय, ही चांगली बाब आहे, असं म्हणावं तर त्यातही भक्तीपेक्षा स्वार्थाचाच अधिक वास येतो. धकाधकीच्या जीवनातली वाढती असुरक्षितता ही त्याला सर्वाधिक कारणीभूत असल्याचं दिसतं. गरीबाला जिथं पोट भरण्यासाठी पोटोबाच्या मागं धावावं लागतं, तिथं पोटं भरलेल्या, करू भागलेल्या लोकांनी अशा लोकांनाही आपल्याबरोबर या देवाच्या भजनी लावण्याचा उद्योग चालवलाय. या जाळयात सारेच सापडू लागलेत. प्रसारमाध्यमंही अशा प्रवृत्तींचं उदात्तीकरण करू लागली आहेत. त्यामुळं डोळे झाकून अशा लोकांचं अनुकरण करणाऱ्याचं प्रमाणही वाढीस लागलं आहे.
अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी आपली डोकी गहाण ठेवली आहेत की काय, असा प्रश्न भेडसावू लागला आहे. माणसानं सुरवातीच्या टप्प्यापासून आपल्या मनाची जी मशागत केली होती, ती मनाची जमीन क्षारपड होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दुसऱ्यांच्या चकचकीत मानसिक गुलामगिरीच्या मॉलमधला माल उसना घेण्यापेक्षा आपल्या मनाच्या जमिनीवर सातत्यानं विचार करून जितकं मिळेल तितकं पीक आपण घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. व्यक्तीगत पातळीवर ही प्रक्रिया सुरू झाली तरच तिला एखादेवेळेस सामूहिक, सामाजिक शक्तीचं स्वरुप प्राप्त होईल. अन्यथा ज्या चाकोरी मोडत, उध्वस्त करत आपण वाटचाल करत इथवर आलो आहोत, पुन्हा त्या चाकोरीमध्ये बांधून टाकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवाच्या सर्वच पातळीवरील प्रगतीच्या वाटा त्यामुळं अधिक व्यापक होतीलच शिवाय त्या वाटचालीला एक ठोस असं अधिष्ठान प्राप्त होईल.
माती हाच शेतीचा जीव की प्राण. पण माणसाच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्तीमुळं मातीचा कस कमी होत चालला आहे आणि मातीशी नातं सांगमारी माणसंही कमी होत चालली आहेत. मातीचा कस आणि तिच्याशी इमान कायम राखण्याचं मोठं आव्हान आपल्यापुढं आहे. हावरटपणामुळं मातीचा कस जसा कमी होत आहे, तशी नातीसुध्दा दुरावत चालली आहेत. मातीचं आणि नात्यांचं सारखंच आहे. अधिकारांविषयी आपण फार जागरूकता दाखवतो; कर्तव्यांना मात्र सोयीस्कररित्या विसरतो. जमिनीतून वारेमाप पीक घेताना तिला योग्य त्या प्रमाणात आणि योग्य ते घटकही परत द्यावे लागतात. पण आपण ते देत नाही. तसंच नात्यांच्या व्यवहारात आपण फक्त अधिकार जाणतो, कर्तव्यच विसरतो. हीच सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून आता दोन्ही ठिकाणी नव्यानं खतपाणी आणि मशागतीची आवश्यकता आहे.