सोमवार, २० मार्च, २०२३

नितळ-६: कुछ तो लोग कहेंगे...!

 


('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

माणूस हा समाजशील प्राणी खराच; पण, त्याच्यामध्ये ही समाजशीलता इतकी भिनलेली आहे की त्याच्या प्रत्येक कृतीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाची प्रेरणा अथवा दबाव असतो. गंमतीचा भाग म्हणजे कृतीवर जसा हा प्रभाव असतो, तसाच किंवा त्यापेक्षाही अधिक एखादी कृती न करण्यामागे असतो. म्हणजे पाहा ना, एखादी साध्यात साधी कृती करण्याचा विचार जरी आपल्या मनात आला, तरी त्याच वेळेला लोक काय म्हणतील?’ हा विचार आपल्या मनी ठाकतो. आणि शेकडा ९९ वेळा आपण मनात आलेला कृतीशील विचार कोणत्याही कृतीविना पाठीवर टाकून रिकामे होतो. कदाचित एक चांगलं काम आपल्या हातून होता होता मागं पडतं किंवा राहूनही जातं. लोकांनी काही म्हणू नये, या दृष्टीनं आपलं जीवनाचं रहाटगाडगं मग आपण फिरवित राहतो.

सौरऊर्जेच्या प्रचारासाठी दशकभराच्या भारतभ्रमण यात्रेवर असलेल्या चेतन सोळंकी यांची अलिकडेच भेट घेतली. ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीनं त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये सध्या सुरू असलेली उर्जेची अनाठायी उधळण आणि बचत करण्यासाठी छोटे-छोटे उपाय त्यांनी सुचविले. बोलता बोलता ते म्हणाले की, आपण प्रत्येकाने घरगुती पातळीवर कपड्यांना इस्त्री न करता ते वापरले तरी आपण खूप बचत करू शकतो कारण इस्त्री जवळपास १००० वॅट वीज खाते. त्यांनी रेफ्रिजरेटर, गीझर वगैरे साधनांचाही वापर सहज टाळता येऊ शकतो, हे सांगितलं. यातल्या फ्रीज, गीझर यांसाठी कौटुंबिक संमती मिळवणं तत्काळ शक्य नव्हतं; मात्र, व्यक्तीगत स्तरावर स्वतः इस्त्री न केलेले कपडे वापरणं सहजशक्य आहे. म्हणून मी तिथून सुरवात करण्याचा निर्णय घेतला. अगदी शाळेत असतानाही स्वच्छ धुतलेला युनिफॉर्म कुठे दर वेळी इस्त्री केला जात होता? धुतलेला ड्रेस रात्री छान घडी घालून उशाखाली किंवा अंथरूणाखाली ठेवला की सकाळी कडक नसली तरी चांगली दिसेल अशी इस्त्री झालेली असे. त्यामुळे मी धुतलेला शर्ट इस्त्री न करता चढवला अंगावर बाहेर पडताना. त्यावेळी बायकोचा पहिला प्रश्न हाच होता की, लोक काय म्हणतील?’ मी उत्तरलो, कोणी काही म्हणणार नाही, पण म्हणालं तर मी सांगेन ना!’ यावर तिचा तिरपा कटाक्ष पाठीवर घेऊन मी घरातून बाहेर पडलो.

पाहा ना, एक साधारण कृती, जिच्यामुळं कोणाला कसलाही त्रास होणार नाही की अन्य कोणाचंही जीवन कोणत्याही प्रकारे प्रभावित होण्याचं कारण नाही, अशा वेळीही जर लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाचा सामना करावा लागत असेल, तर लाखो, कोट्यवधी लोकांचं जीवन प्रभावित करण्यासाठी हयात वेचणाऱ्या लोकांना किती वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागत असेल? आधी व्यक्तीगत स्तरावर विचार आणि स्वीकार, यानंतर पुढे कुटुंब, नातेवाईक, स्थानिक भोवताल आणि त्यानंतर मग इतर समाजघटक असा त्या विचाराचा विस्तार व स्वीकार वाढविण्यासाठी कोण झगडा समाजप्रवर्तकांना, प्रबोधकांना करावा लागत असेल, याचा आपण कधी विचारच करीत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्याच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे इंग्लंडमधील विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतले. उरलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी परत जायचे म्हणून त्यांनी अनेक प्रकारची कामे केली. शिकवण्या घेतल्या, गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केले,शेवटी सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली. या समग्र काळामध्ये ते प्रचंड काटकसर करून पै न पै साठवित होते. यामध्ये माता रमाबाईंना ते अतिशय नेमकी रक्कम दरमहा खर्चाला देत. अगदी काडेपेटीच्या प्रत्येक काडीचाही हिशोब त्यात असे. बाबासाहेब परदेशी असतानाही या माऊलीने कोणतीही तक्रार न करता लोकांच्या घरची कामे करून आपला निर्वाह चालविला. आणि बाबासाहेब उच्चशिक्षित होऊन परतले, आता तरी आपल्यामागचे शुक्लकाष्ठ संपेल, या आशेवर असणाऱ्या रमाबाईंचे सांसारिक कष्ट कमी झाले नाहीत. उलट ही काटकसर करावी लागली. मात्र, त्यांनी बाबासाहेबांच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी हे कष्ट विनातक्रार सोसले. एवढ्या प्रकांडपंडिताची बायको, पणलोक काय म्हणतील?’ म्हणून त्यांनी कष्टत्याग केला नाही. उलट आरोग्याच्या अनेकविध तक्रारी असूनही अजिबात कुरकूर न करता त्यांनी साऱ्या झळा सोसल्या, म्हणूनच बाबासाहेबांच्या उत्कर्षामध्ये आणि असामान्यत्वामध्ये रमाबाईंच्या साधेपणाचा, सामान्यत्वाचा वाटा जगन्मान्य ठरला. महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई यांचा संघर्ष तर लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाला अजिबातच थारा न देण्यामध्ये आणि त्या पलिकडला आहे.

राजर्षी शाहू महाराजांचाही इथे दाखला देता येईल. राजर्षींनी ज्या कालखंडात त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीला हात घातला, प्रतिगामित्व ठासून भरलेल्या त्या काळात समाजमानसावर रुढी, परंपरांचा पगडा मोठा होता. राजर्षींनी स्वतःपुरत्या साऱ्या भेदभावांना तिलांजली दिलेली होती. त्यांनी आपल्या धार्मिकतेला तिलांजली दिलेली नव्हती, पण कोणताही धर्म विषमतेला थारा देत नाही, याविषयी त्यांची धारणा पक्की होती. आणि माणसा-माणसांत भेद मानणं, हा अधर्म आहे, याविषयी तर त्यांची खात्रीच होती. मात्र, ही मानसिकता राजघराण्यातल्या सर्वांचीच असेल, असे कसे म्हणता येईल? आपण केवळ या अंगाने विचार केला, तरी डोक्याला मुंग्या येतील की राजर्षींना मग त्या स्तरावर किती टोकाचा संघर्ष करावा लागला असेल. जितके मोठे कार्य तितका हा झगडा मोठाच. मात्र, त्यावरही मात करून अथवा घरचे काय म्हणतील?’ वा लोक काय म्हणतील?’ याची फारशी फिकीर न करता महाराजांनी आपलं सामाजिक कार्य जोमानं सुरूच ठेवलं आणि एक राजा म्हणून ते लोकांच्या गळीही उतरवलं. म्हणून तर ते 'लोकराजा' उपाधीला पात्र ठरले.

म्हणजे एखादं व्यापक, समाजहितैषि कार्य हाती घ्यायचं, तर झगडा मोठा आहेच. पण, छोट्या-छोट्या प्रभावहीन बाबींसाठी सुद्धा लोक काय म्हणतील?’ हा अडथळा ओलांडणं अथवा झुगारून पुढं जाणं, ही फार महत्त्वाची, कसोटीची पहिली पायरी आहे. मुळात आपण आपल्या सामान्यत्वाच्या कक्षांमधून बाहेर पडून थोड्याफार तरी असामान्यत्वाच्या दिशेनं जाणार की नाही, याचा निर्णय, या प्रश्नाचं तुम्ही काय काय उत्तर देता, यावरच अवलंबून असतं. बापलेक आणि गाढवाची गोष्ट आपणा सर्वांना माहिती असूनही अकारण या प्रश्नाच्या बेड्या आपल्या पायबंद बनून राहणार असतील, तर आपण आपल्या सामान्यत्वाच्या कक्षेतून कधी बाहेरच पडणार नाही. लोगों का काम है कहना...यारों, समझो!


मंगळवार, १४ मार्च, २०२३

नितळ-५: ‘डि-कास्ट’ व्हावं कसं?


('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेतील पुढील भाग माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)

अमेरिकेतील सिएटल प्रांतात नुकताच जातीच्या आधारावर कोणत्याही भेदभावाला प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्वात आला. जी अमेरिका आजपावेतो केवळ रंग वा वर्ण आणि वंश या दोनच आधारांवरील भेदभावासाठी ओळखली जात होती, तिथं आता जातही ठळकपणे अधोरेखित झाली आहे. ही जात आणि तिच्या अनुषंगाने येणारा भेदभाव हा स्वाभाविकपणाने दक्षिण आशिया आणि प्रामुख्याने भारतामधून तिथे गेला आहे, हे स्पष्ट आहे. भारतीय मागासवर्गीय समाजातील तरुणांची हा कायदा आणण्यामध्ये आणि त्याची गरज पटवून देण्यामध्ये कळीची भूमिका राहिली आहे.

इथे विचार करण्यासारखा प्रमुख मुद्दा असा आहे की, अत्यंत आधुनिक अशा माहिती तंत्रज्ञानाच्या आणि फायनान्ससारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी आधुनिक युवा भारतीय अमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीमध्ये मोठ्या संख्येने गेले आहेत. त्यांची एक पिढी या आधुनिकतेसाठी तिथे आता खपली आहे, ज्यातून जागतिक माहिती तंत्रज्ञान युग साकार झाले. त्यामध्ये भारतातील अनुसूचित जाती-जमातीमधील युवा वर्गही त्यांना आरक्षणामुळे प्राप्त झालेल्या शिक्षणाच्या संधी आणि त्यांची गुणवत्ता या बळावर येथपर्यंत पोहोचला. मात्र, ज्या अमेरिकेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य व समता या लोकशाही मूल्यांचा साक्षात्कार झाला, त्या अमेरिकेच्या भूमीवरही भारतीय नागरिक त्यांची जातवर्चस्ववादी भावना घेऊन वावरत आहेत आणि तेथेही त्यांनी आपल्या जातीय भेदभावाचे रंग पसरविले आहेत, ज्याचा फटका या मागासवर्गातून पुढे गेलेल्या युवा पिढीला बसला आहे. म्हणूनच अमेरिकेतील एका प्रांताला आता या जातीय भेदभावाच्या विरोधात कायदा करावा लागला आहे, हे स्पष्टच आहे. इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानामुळे जग हे एक खेडे झाले आहे, हे विधान आतापर्यंत जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये सकारात्मक पद्धतीने घेतले जात होते. पण, आता या ग्लोबल खेड्याने भारतीय खेड्यांमधील धार्मिक-जातीय भेदभावाची भावनाही आत्मसात केली आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.

अमेरिकेमधील या चित्राची मीमांसा करीत असताना आपण आपल्या गिरहबानमध्येही डोकावून पाहायला हरकत नसावी. आरक्षणाच्या धोरणाची चिकित्सा करीत असताना आता वरिष्ठ वर्ण अथवा जातींतील नागरिक इतके निष्ठूर होऊ पाहात आहेत की, संबंधित अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी आदी बांधवांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय प्रगतीसाठी आरक्षणाची अद्याप गरज आहे, ही बाब लक्षात न घेता जणू काही हे आरक्षण वरिष्ठ, अभिजन, प्रगत वर्गाच्या मुळावर उठले आहे, अशा प्रकारची वातावरणनिर्मिती करून काही घटक येथील समाजस्वास्थ्याला धोका पोहोचवू पाहात आहेत. भारतीय राज्यघटनाकारांनी मोठ्या विचारांती आरक्षणाचे तत्त्व स्वीकारले आहे. त्यामध्ये लवचिकताही ठेवली आहे. मात्र, मनाला वेदना तेव्हा होते, जेव्हा एखादा विद्यार्थी मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देऊ नये, असे धडधडीत निवेदन शासकीय व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना देतो आणि ते अधिकारीही अशी निवेदने कॅमेऱ्याकडे तोंड करून हसतमुखाने स्वीकारतात. एखाद्या मागासवर्गीयाने गुणवत्तेच्या बळावर खुल्या गटातून एखादी जागा मिळविली, तर जणू आमची जागा याने गिळंकृत केली, अशा गुन्हेगाराच्या भावनेने त्याच्याकडे पाहिले जाते. ही बाब तर चुकीचीच आहे, मात्र, एखाद्या खुल्या जागेसाठी गुणवत्तेच्या बळावर पात्र असणाऱ्या मागासवर्गीयाला केवळ त्याच्या जातीय आरक्षणामुळे संधी नाकारली जाणे, हे तर त्याहूनही वाईट आहे. खुला वर्ग हा सर्वांसाठी खुला आहे, या तत्त्वाला येथे हरताळ फासला जातो. मुळात आरक्षणातून बाहेर पडण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, हे व्यवस्थेतील आणि समाजातील विविध घटक लक्षात घेणार नाहीत, तोपर्यंत आपण या जातमानसिकतेमधून बाहेर पडणार नाही. अनुसूचित जाती-जमातीतील एका पिढीने आरक्षण घेऊन आपला शैक्षणिक, सामाजिक-आर्थिक विकास साधून घेतल्यानंतर त्याच्या पुढील पिढीने त्या जातीय आरक्षणातून बाहेर पडून खुल्या प्रवर्गामधून आपली कारकीर्द घडवावी; अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या आरक्षणातून बाहेर पडून खुल्या प्रवर्गामध्ये यावे आणि टप्प्याटप्प्याने आरक्षणाची गरज संपुष्टात आणावी, हे आरक्षणाचे मूलतत्त्व आहे. यामध्ये एक बाब अध्याहृत ही सुद्धा आहे की समाजातील वरिष्ठ, अभिजन वर्गानेही दोन पावले पुढे येऊन या वंचित समाजघटकांच्या प्रगतीसाठी त्यांना हात द्यावा.

छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये शंभर वर्षांपूर्वी केलेल्या भाषणामध्ये जपानमधील सामुराई या अभिजन वर्गाचे उदाहरण दिले होते. त्यांनी स्वतः पुढे होऊन त्यांना लाभलेले जन्मजात सामाजिक उच्चस्थान सोडून दिलेले होते आणि समाजातील खालच्या स्तरातील नागरिकांना बरोबरीचे स्थान प्रदान केले होते. हा सामुराईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतीय समाजात विषमता निर्मूलनाचा कार्यक्रम राबवून समता प्रस्थापनेच्या दिशेने वाटचाल करावी, असे महाराजांना अभिप्रेत होते.

तथापि, आज आपण याच्या नेमकी विरुद्ध दिशा पकडलेली आहे. आरक्षणाचा लाभ घेणारे जणू काही आपले हितशत्रू असून त्यामुळेच आपल्या असणाऱ्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत, अशा प्रकारचे आभासी भय पसरविले जाऊन आरक्षणाचा लाभ घेऊन या समाजात थोडेफार बरोबरीचे स्थान मिळवू इच्छिणाऱ्या समाजघटकांचा दुस्वास केला जातो आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे आपल्या समस्यांवर आरक्षण हाच जणू काही प्रभावी उपाय आहे, अशी आभासी भावना सामाजिक- आर्थिक दृष्ट्या उच्च घटकांमध्ये पसरवून त्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी प्रेरित केले जात आहे. खरे तर, अधिकारांवर गंडांतराचा केवळ आभास निर्माण केला जाऊन राजकीयदृष्ट्या लाभ प्राप्त करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. मात्र, ही बाब संबंधितांच्या लक्षात येऊ न देता त्यांच्या भावनांचा बेमालूमपणे आपले स्वार्थ साधून घेण्यासाठी फायदा उठविला जातो.

या साऱ्या गदारोळात गोची त्यांची होते, ज्यांना खरोखरीच या जातीच्या दलदलीमधून बाहेर पडावयाचे आहे. आजकाल अनेक विचारी लोक स्वतःला जातीच्या ओळखीतून बाहेर काढू पाहताहेत. खऱ्या अर्थाने ते डि-कास्ट होऊ पाहताहेत. पण, हे असं डि-कास्ट होणंही त्यांच्यासाठी तितकंसं सहजशक्य नाही. भारतीय समाजामध्ये जातजाणीवा इतक्या खोलवर रुजल्या गेलेल्या आहेत की, एखाद्याची जात समजल्याखेरीज ते स्वतःला त्याच्याशी कोणत्याही प्रकारे रिलेट करू शकत नाहीत. एखाद्याच्या नावावरुन, आडनावावरुन, त्याच्या मित्रपरिवारावरुन, त्याच्या गावावरुन, त्याच्या पत्त्यावरुन असं कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याची खरी ओळख करवून घेतल्याखेरीज आपल्याला चैन पडत नाही. म्हणजे जात नाकारणं अथवा जातीच्या ओळखीतून स्वतःला बाहेर काढणं, किंवा बाहेर पडणं, हे सुद्धा आज या देशात एखाद्याच्या हातात नाही; तर ते कार्ड सुद्धा या समाजानं स्वतःच्याच हाती ठेवलं आहे. आणि हा समाज या जातजाणीवांमधून देशाला इतक्या सहजासहजी त्यातून बाहेर पडू देणार नाही, हे वास्तवही आता अधिक ठसठशीतपणे सामोरं आलं आहे कारण ते आता ग्लोबल झालंय...


रविवार, ५ मार्च, २०२३

डॉ. बाळकृष्ण, ‘शिवाजी द ग्रेट’ आणि शिवाजी विद्यापीठ

डॉ. बाळकृष्ण

'शिवाजी द ग्रेट' महाग्रंथाचे मुखपृष्ठ


महाराष्ट्री अगर मराठी नसूनही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिरविला, असे शिवचरित्राचे महान संशोधक डॉ. बाळकृष्ण यांनी अस्सल इंग्रजी, फ्रेंच, डच व पोर्तुगीज साधनस्रोतांचा वापर करून ‘शिवाजी द ग्रेट’ या महाग्रंथाचे लेखन केले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने चारेक वर्षांपूर्वी मूळ चौखंडी महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी त्याचे संपादन केले होते. उद्या (दि. ६ मार्च २०२३ रोजी) या महाग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महान शिवाजी’ या द्विखंडीय महाग्रंथाचे ज्येष्ठ पत्रकार-संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते प्रकाशन होते आहे. ही फार मोलाची गोष्ट आहे. या मराठी आवृत्तीचे संपादनही डॉ. जयसिंगराव पवार सरांनीच केले असून वसंत आपटे यांनी अनुवाद केला आहे.

स्वराज्य- तेही मावळ्यांचे आणि मावळ्यांसाठीचे, स्थापन करण्यासाठी शिवरायांनी ज्या पद्धतीने समाजातल्या सर्व स्तरांतल्या घटकांना सोबत घेतले आणि त्यांना एका ध्येयाने प्रेरित करून अक्षरशः त्यांच्याकडून ते कार्य करून घेतले, त्याला तोड नाही. केवळ स्त्रियांचाच नव्हे, तर पर्यावरणाचा आणि निसर्गाचा सन्मान हे सुद्धा शिवछत्रपतींच्या राज्याचे अंगभूत वैशिष्ट्य होते. त्यांचा हाच वारसा शंभूराजांनीही समर्थपणे पुढे चालविला. 

शिवछत्रपतींचे मोठेपण हे त्या काळाची गरज असलेल्या राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये, धोरणी गनिमी लढाई तंत्रामध्ये जसे होते, तसेच ते त्यांच्या या सामाजिक जाणिवेमध्येही होते. किंबहुना, राज्याभिषेकानंतर रायगडावरील सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वीच जनतेच्या हृदय सिंहासनावर ते त्यापूर्वीच विराजमान झालेले होते. त्याला त्यांची संवेदनशीलता, चारित्र्यसंपन्नता आणि सामाजिक जाणीव कारणीभूत होती. 

शिवरायांच्या या समग्र जीवनपटाचा अत्यंत भारावून टाकणारा, रोमहर्षक इतिहास डॉ. बाळकृष्णांनी या महाग्रंथाच्या रुपाने साकारला आहे. १९३२ ते १९४० या कालखंडात म्हणजे आयुष्याच्या अंतिम पर्वात या चरित्राचे लेखन केले. डॉ. बाळकृष्ण मूळचे पंजाब प्रांतातले होते, आर्यसमाजाच्या विचारसरणीने भारावलेले होते आणि त्यामुळेच त्यांनी इथल्या राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारले आणि तेव्हापासून ते या भूमीचेच होऊन गेले. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्यावर शिवचरित्राचा प्रचंड प्रभाव पडला आणि तेव्हाच त्यांनी समग्र शिवचरित्र साकारण्याचे ठरविले होते. शिवरायांच्या समकाळातील डच भाषेतील संदर्भ वापरून लिहिण्यात आलेले हे एकमेव चरित्र आहे. डच साधने मिळवून शिवचरित्रात मोलाची भर घालणारे ते पहिले इतिहासकार आहेत. हेच या चरित्राचे वेगळेपण आणि प्रमुख वैशिष्ट्य आहे. डॉ. बाळकृष्णांची ते लिहिण्याची कळकळ इतकी तीव्र होती की, शरीरात प्रचंड ताप असतानाही रात्री-अपरात्री उठून ते लिहायला बसत. १९४०मध्ये अखेरचा खंड लिहून त्यांनी पूर्ण केला आणि त्यानंतर अगदी अल्पावधीत त्यांचे निधन झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी हा आपला संकल्प पूर्ण केलेला होता. 

डॉ. बाळकृष्ण यांचे दुसरे एक अत्यंत महत्त्वाचे स्वप्न होते, ते म्हणजे शिवाजी विद्यापीठाची स्थापना. शाहू महाराजांच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांत करवीरमध्ये रुजू झाल्यानंतर छत्रपती राजाराम आणि डॉ. बाळकृष्ण या दोघांनी मिळून शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने त्यांनी आखणीही करायला सुरवात केली होती. 

डॉ. बाळकृष्णांनी त्या काळात या विद्यापीठाचे स्वरुप कसे असायला हवे, त्याची योजनाही करून ठेवलेली होती. ही योजना अशी- “कोल्हापूरच्या पूर्वेस दीड मैलावर पुना-बेंगलोर रस्त्याच्या समीप राजाराम तलावानजीक निसर्ग वलयांकित अशी जवळजवळ दीडशे एकर जमीन यासाठी राखून ठेवून तेथे राजाराम कॉलेजच्या आर्ट्स व सायन्सच्या शाखा, लॉ कॉलेज, टीचर्स कॉलेज, ओब्रायन टेक्निकल स्कूल व शेतकी शाळा या संस्था तेथे न्यावयाच्या. यालाच पुढे व्हेटर्नरी व मेडिकल कॉलेजची जोड द्यावयाची. वरील सध्याची कॉलेजे निरनिराळ्या विषयांची भर घालून वाढविता येण्यासारखी आहेत, ती वाढवावयाची. उदाहरणार्थ, राधानगरी येथील हायड्रो-इलेक्ट्रीक स्कीम व अल्युमिनिअमचा कारखाना सुरू झाल्यावर येथील सायन्स कॉलेजमध्ये खनिज वस्तूशास्त्र (मिनरॉलॉजी) व भूगर्भशास्त्र (जिऑलॉजी) हे विषय शिकविले जावेत. हे विषय शिकविण्यासाठी व तेथील विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून घेण्यासाठी अंशतः आर्थिक झीज सोसण्यात वरील कारखान्यांच्या चालकांना आनंदच वाटेल. हायड्र-इलेक्ट्रीक स्कीम सुरू होताच इलेक्ट्रीक इंजिनिअरिंगचा कोर्स सुरू करता येईल. अल्युमिनिअम व हायड्रो-इलेक्ट्रीक स्कीममुळे उत्पन्न होणाऱ्या विजेच्या सहाय्याने कोल्हापुरात इतर धंद्यांची वाढ होऊन रेल्वेची वाढ होईल, त्यासाठी मॅकेनिकल इंजिनिअर्सची जरुरी भासेल; म्हणून, तीही शाखा उघडावी लागेल. उद्योगधंद्यांचा वाढीमुळे कमर्शियल स्कूल उघडणे सोयीस्कर होईल, तसेच कोल्हापूर हे संगीत-चित्र-नाट्य-चित्रपट या कलांचे माहेरघर असल्यामुळे त्या कलांचे शिक्षण देण्यासाठी एकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स सुद्धा स्थान करावी लागेल. कोल्हापूरची मल्लविद्येबद्दलची बरीच ख्याती असल्यामुळे लष्करी शिक्षणाच्या खालोखाल शास्त्रशुद्ध शारीरिक शिक्षण जितक्या तरुण-तरुणींस देता येईल, तितक्यांना मिळायला हवे. १) शारीरिक शिक्षण व मल्लविद्या आणि २) लष्करी शिक्षण यांच्या दोन शाळा उघडाव्या लागतील. या सर्व कॉलेजांची वसतिगृहे एकाच ठिकाणी बांधली गेली तर, बनारस हिंदू विश्वविद्यालयाप्रमाणे कोल्हापूर शिवाजी विश्वविद्यालयास स्वरुप येईल.” 

डॉ. बाळकृष्णांच्या या योजनेनुसार, छत्रपती राजाराम महाराजांनी आपला सक्रिय पाठिंबाही जाहीर केला होता. एवढेच नव्हे तर, महाराजांनी या नियोजित युनिव्हर्सिटीसाठी टेंबलाई मंदिराच्या परिसरात एक स्वतंत्र जागाही दिली होती. त्याही पुढे जाऊन त्यांनी युनिव्हर्सिटीच्या खर्चासाठी सात लक्ष रुपयांचे अनुदानही मंजूर केले होते.

डॉ. बाळकृष्ण यांची शिवाजी विद्यापीठाची कल्पना पाहताना त्यांच्या द्रष्टेपणाविषयी अचंबा वाटल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या स्वप्नातील शिवाजी विद्यापीठाच्या जागेचे स्थान व आजच्या शिवाजी विद्यापीठाच्या जागेचे स्थान एकच असावे, हा केवढा विलक्षण योगायोग आहे, असे म्हणण्याऐवजी तो डॉक्टरांच्या द्रष्टेपणातील प्रतिभेचा सुंदर आविष्कारच समजला पाहिजे. खरोखरच आजच्या शिवाजी विद्यापीठाचे आद्य संकल्पक डॉ. बाळकृष्ण असून, शिवाजी विद्यापीठ हेच त्यांचे खरेखुरे स्मारक आहे, असे म्हणता येईल. 

छत्रपती राजाराम महाराज असोत की बाळकृष्ण, या दोघांनी आणि त्यानंतरच्या काळातील विद्यापीठाच्या संकल्पकांनीही या विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी युनिव्हर्सिटी’ असावे, असले पाहिजे, असे म्हणून तेच नाव त्यांच्या लेखनात, बोलण्यात वापरले आहे. या माध्यमातून शिवछत्रपतींचे नाव देशविदेशांतील लोकांच्या ओठी यावे, त्या निमित्ताने शिवरायांच्या कर्तृत्वाची माहिती सर्वदूर व्हावी, म्हणून या विद्यापीठाचे नाव हे शिवाजी विद्यापीठ असावे, असा त्यांचा आग्रह होता आणि त्यानुसारच या विद्यापीठाचे नामकरण ‘शिवाजी विद्यापीठ’ असे करण्यात आले. डॉ. बाळकृष्णांचे हे दुसरे स्वप्न मात्र, त्यांच्या निधनानंतर सुमारे २२ वर्षांनी प्रत्यक्षात आले. मात्र, या विद्यापीठाचा पाया हा त्यांच्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळेच रचला गेला, याची कृतज्ञ जाणीव आपण सदैव मनी बाळगली पाहिजे.


सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

नितळ-४: तू, तुम आणि आप...

 



('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेतील पुढील भाग माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)


सोशल मीडियावर हरक्षणी काही ना काही घडामोड सुरू असते आणि तिचे पडसादही तत्काळ उमटत राहतात. यातली गंमत म्हणजे घटना किती महत्त्वाची, यापेक्षा तिचे पडसाद किती मोठे, यावर त्या घटनेचं महत्त्व अवलंबून असण्याचा हा सारा माहौल आहे. काही दिवसांपूर्वीचीच ही गोष्ट. नवी दिल्लीच्या प्रतिभा नामक एका महिलेनं मुंबईतला माणूस हा एखाद्या अनोळखीशी हिंदीत बोलताना तू किंवा तुम असं संबोधतो; आप म्हणत नाही, हे नॉट एक्सेप्टेबल असल्याचं म्हटलं. यावरुन मुंबईतल्या माणसांना बोलण्याची तहजीब नाही, अशा सुरावरुन सुरू झालेलं बोलणं, अखेरीस मुंबईतल्या बहुभाषिक आणि विशेषतः मराठीबहुल नागरिकांच्या प्रभावामुळं इथली बंबैय्या बोली विकसित झाली असून त्यातून हे घडतं, इथपर्यंत पोहोचला. खरं तर बोली भाषेवरुन आणि ती सुद्धा मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन मेट्रो शहरातल्या नागरिकांची तहजीब काढण्याची खरंच गरज नव्हती. पण, ती काढली गेली. गंमतीचा भाग म्हणजे या पोस्टकर्त्या प्रतिभा दहा वर्षांपूर्वी मुंबईत आल्या होत्या, तेव्हाच्या अनुभवावरुन त्यांनी दहा वर्षांनंतर हे ट्विट केलं आणि वाद सुरू झाला. तिलाही हे इतकं काही होईल, असं अपेक्षित नव्हतं. पण, शेवटी खुलं माध्यम आहे हे...

हे सारे ट्विट्स वाचताना एक किस्सा आठवला तो शरद पवारांचा... पवार साहेब संरक्षणमंत्री म्हणून प्रथमच संसदेत गेले, तेव्हाचा असावा. त्यावेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळातील प्रथेप्रमाणे संसदेच्या सभागृहातही बोलताना त्यांनी अध्यक्षांना अध्यक्ष महाराज म्हणून संबोधलं. असं दोन-तीनदा झाल्यानंतर सभागृहात चुळबूळ सुरू झाली. अध्यक्षांनी त्यांना समजावलं की, हिंदीमध्ये खानसाम्याला महाराज म्हणतात. त्यामुळं आपण महोदय असं संबोधावं. पवार साहेबांसारख्या नेत्याने ही बाब खूप गांभीर्याने घेतली. त्यांनी हिंदी भाषेच्या तज्ज्ञाकडून ती भाषा तिच्या वैशिष्ट्यांसह आत्मसात केली. त्यानंतर आजतागायत त्यांच्या बाबतीत संसदेत तसा अनुभव पुन्हा आला नाही. उलट पवार साहेब जेव्हा बोलायला उभे राहतात, तेव्हा सर्वच नेते त्यांचे बोलणे कान देऊन गांभीर्यपूर्वक ऐकतात, असा अनुभव आहे.

मुंबईत मराठी भाषिक नागरिक बहुसंख्य आहेत. तिथे त्यांच्या हिंदीवर मराठीचा पगडा हा असावयाचाच. आईलाही अगं, तू गं करणाऱ्या मराठी माणसाच्या मनात आईबद्दल आदरभाव नसतो, असं कोण म्हणेल? तसंच तो तुम्ही आणितुम्हाला यांच्याऐवजी तुम असं म्हणतो. इथं आप म्हणायचं असतं, हे त्याच्या गावीही नसतं. कारण बोली भाषेत तो आपण माझ्या घरी यावे, असं न म्हणता तुम्ही या नं माझ्या घरी असं म्हणतो. त्या सांगण्यानं त्याचं अगत्य अजिबात कमी होत नाही. मुळात विविध भाषिकांचं जिथं सम्मीलन होत असतं, तिथं त्यांच्या भाषेचा एकमेकांवर प्रभाव हा अगदी सहजस्वाभाविक असतो.

आता उत्तर भारतीय हिंदी भाषिकांनी मुंबईतलं आपलं मराठी बोलणं कसं भ्रष्ट केलंय, याची काही उदाहरणं इथं देतो. उल्हासनगरला साडी खरेदीसाठी गेलेल्या कल्याणमधल्या महिला त्या दुकानदाराला भय्या, ही वाली नको, ती वाली साडी दाखवा, असं सहज म्हणतात. आता हे वाली प्रकरण मराठीत कुठंच येत नाही (रामायणाखेरीज!). मग आलं कुठून? तर त्याचा उगम हा हिंदीतल्या भय्या, वो वाली साडी दिखानामध्ये असतं. मुंबईतल्या मराठी घरातल्या आईनं हाक मारल्यानंतर तिच्या मुलीकडून आले असं प्रत्युत्तर न येता आली असं मिळतं. याचं मूळही हिंदीतल्या आयीमध्ये आहे. मी तिकडे गेली, मी इकडे आली हे त्याचेच उदाहरण.

दुसरं म्हणजे मुंबईत कोणी काही म्हणत नाही; तर, जो तो बोलतो. म्हणजे मी त्याला म्हणालो, अगर मी तिला म्हणाले असं फारच क्वचित कानी येईल. त्याऐवजी मी बोल्लो, मी बोल्ली हे सर्रास ऐकू येणार आणि त्यात कोणाला काही गैर वाटतही नाही. हे सुद्धा मैं उसको बोला अगर मैं बोली या हिंदीतूनच आलेलं आहे.

सांप्रतचा लेखक हा काही भाषातज्ज्ञ वगैरे अजिबातच नाही. पण, आजूबाजूला जे भाषिक व्यवहार सुरू आहेत, त्याचा मूक निरीक्षक आहे. मात्र, ही उदाहरणे द्यायचं कारणच असं की, सहजीवनातून भाषेचा विकास होत असतो. विविध भाषांचा एकमेकींवर प्रभाव हा पडत असतोच. त्यातूनच भाषेची समृद्धी होत असते. दरवर्षी जगातील अनेक देशांमधील निवडक शब्दांची भर इंग्रजी भाषेत पडत असते. भर पडते असं म्हणण्यापेक्षा इंग्रजी अशा शेकडो शब्दांचा दरवर्षी स्वीकार करून अधिकाधिक समृद्ध-संपन्न होत चालली आहे, असे म्हणावे लागेल. आपली कढी-चपाती सुद्धा त्या भाषेने आत्मसात केली आहे. हिंदी भाषा सुद्धा तशीच अत्यंत लवचिक आहे. फार खळखळ न करता विविध शब्दांमध्ये मोजके फेरबदल करून ते ती स्वीकारते. भाषेची लवचिकता जितकी अधिक, तितकी ती प्रवाही आणि चिरकाल टिकाऊ बनत जाते. भाषिक ताठरता आपल्याला परवडणारी नाही.

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये गेल्या ५० वर्षांत देशातील २२० भाषांचा अस्त झाला आहे. त्यांनी आपल्या सर्वेक्षणात ७८० भारतीय भाषांचा शोध घेतला. त्यापैकी ६०० भाषा धोक्यात असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. त्यात भटक्या समाजाची, किनारपट्टीवरील आणि आदिवासी समाजाची भाषा अधिक धोक्यात आहे. युनेस्कोच्या अस्तंगत होत चाललेल्या भाषांसंदर्भातील अहवालानुसार, १९५० पासून जगातील २३० भाषा नामशेष झाल्या आहेत. २००१मध्ये त्यांनी ९०० भाषा नामशेष होण्याचा धोका वर्तविला होता, तो आकडा २०१७मध्ये २४६४पर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यातही भारतीय भाषांची संख्या लक्षणीय होती. बोली भाषांना हा धोका अधिक भेडसावतो. जगभरात बोलल्या जाणाऱ्या ७१३९ भाषांपैकी ३०१८ भाषा (४२ टक्के) धोक्यात आहेत.

ही भाषेची संख्याशास्त्रीय चर्चा करण्याचे कारण म्हणजे आपल्या बोली जपणे, आपल्या सर्वच भाषा समृद्ध करणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आज जगाच्या पाठीवर काही भाषा बोलणारे अवघे एक-दोन लोक राहिले आहेत. ती भाषा त्यांच्याबरोबरच संपणार आहे. किती वेदनादायी आहे हे! आणि विविधतेमध्ये एकता हेच आमच्या देशाचे सौंदर्य असे म्हणताना आपण एखाद्या शब्दयोजनेमागील सहजभाव समजून न घेता थेट त्यावरुन गदारोळ उठवतो, हे त्याहून वेदनादायी नव्हे काय?


गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

‘बिग डाटा’चं करायचं काय?




('दै. पुण्यनगरी'च्या कोल्हापूर आवृत्तीचा आज दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी २०वा वर्धापनदिन... या निमित्ताने 'इंटरनेट क्रांतीची पंचपदी' ही फाईव्ह-जी युगाचा वेध घेणारी विशेष पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला लेख खास माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे. - डॉ. आलोक जत्राटकर)


बिग डाटा हे मानवी इतिहासातील पुढचं पाऊल खरंच, पण... पण डाटाची उपलब्धता ही आपली समस्या नाही, तर त्याला (बिग डाटा) समजून घेणं, हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे.– नोआम चॉम्स्की

नोआम चॉम्स्की हे आजच्या काळातील एक महान चिंतनशील विश्लेषक. त्यांनी अमेरिकेतील एमआयटी येथे झालेल्या एन्गेजिंग डाटा या विषयावरील परिषदेमध्ये उपरोक्त उद्गार काढले आहेत, जे आज आपण फाईव्ह-जीच्या युगात प्रविष्ट करीत असताना मानवी समुदायाला तंतोतंत लागू पडणारे आहेत.

आजकाल डाटा एव्हरीव्हेअर अशी परिस्थिती आहे. आपला अखिल भोवताल डाटाने व्याप्त आहे. बिग डाटा उपलब्ध आहे, तो आपल्याला पूर्णतया एक्सेसिबल आहे. त्याचा वापर आपण मानवी समुदायाच्या भल्यासाठी निश्चितपणानं करू शकतो. मात्र, चॉम्स्की यांनी याच परिषदेमध्ये आणखी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणतात- कोणतीही राजसत्ता असो की गुगल, अॅमेझॉनसारखी अर्थसत्ता, त्या या काळात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून लोकांवर नियंत्रण ठेवणं, आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं आणि ते अधिकाधिक मजबूत करत नेणं, यासाठी त्याचा निश्चितपणानं वापर करतील.

बिग डाटा समजून घ्यायचं तर आपल्याला एका भव्य अशा ग्रंथालयाचं उदाहरण घेता येईल. या ग्रंथालयातील ग्रंथांमध्ये ज्ञानाचा प्रचंड साठा आहे. मात्र, जर आपल्याला नेमकी कोणती माहिती हवी आहे, याविषयीच जर आपण अनभिज्ञ असू अगर संभ्रमित असू, तर सभोवताली असणारा प्रचंड ज्ञानसाठाही तिथं निरुपयोगी ठरेल. नेमकी हीच गोष्ट आपली डाटा वापराच्या बाबतीत होते आहे.

आज फाईव्ह-जी डाटावहन तंत्रज्ञान येत असताना त्याच्या क्षमतांची जाहिरात कशा पद्धतीनं केली जाते, हे पाहिलं तरी वरील गोष्ट स्पष्ट होईल. फाईव्ह-जीची डाटावहन क्षमता ही साधारण २० जीबी प्रति सेकंद इतकी आहे. आता हे स्पष्ट करताना असं सांगितलं जातं की, ८-के (साधारण ३५ मेगापिक्सल) रिझॉल्युशनचा चित्रपट तुम्ही एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल किंवा ४-के क्षमतेचे चार चित्रपट किंवा फुल्ल-एचडी क्षमतेचे आठ चित्रपट एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल.

१९८०च्या दशकापासून आपण माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे एकेक टप्पे सर करीत आज फाईव्ह-जी तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. त्यामध्ये पहिल्या पिढीत (१९८०) अॅनालॉग आवाज तंत्रज्ञान, दुसऱ्या पिढीत (१९९०) डिजीटल आवाजाचं तंत्रज्ञान (सीडीएमए), तिसऱ्या पिढीत (२०००) मोबाईल डाटावहन (सीडीएमए-२०००), चौथ्या पिढीत (२०१०) मोबाईल ब्रॉडबँड तंत्रज्ञान (४-जी एलटीई) आणि आता पाचव्या पिढीतील तंत्रज्ञान या सर्वांपेक्षा डाटावहनाची प्रचंड गतिमानता घेऊन अवतरले आहे. चॉम्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे राजसत्ता आणि भांडवलदार नफेखोर अर्थसत्ता त्यांच्या स्वार्थासाठी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेणार आहेतच. किंबहुना, फोर-जी आणि फाईव्ह-जीच्या सीमारेषेवर असतानाच आपण त्याचा अनुभव घेतो आहोत.

या काळात व्हिडिओ स्ट्रिमिंग व गेमिंग या क्षेत्रांतील कंपन्या आणि अॅप्सनी आपला खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला आहे. मनोरंजनाच्या नावाखाली लोकांना, विशेषतः नव्या तरुण पिढीला अक्षरशः वेठीला धरले आहे म्हणावे, अशा पद्धतीचे जाळे त्यांनी आपल्यावर टाकले आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण त्या जाळ्यात कमीअधिक अडकलेला आहे. सर्जनशीलतेला कमी आणि लिपसिंक व मिमिकींगला अधिक प्राधान्य देत रिल्स तयार करण्याच्या सुविधा प्रदान करीत त्यामध्ये या पिढीला गुरफटून टाकले आहे. खरे तर, तंत्रज्ञानाने माणसाच्या सर्जनशीलतेला अधिकाधिक संधी देऊन त्याच्या सर्वंकष विकासामध्ये योगदान द्यावे, अशी अपेक्षा करणे रास्त आहे. मात्र, प्रत्यक्षात माहिती तंत्रज्ञानाची क्रांती हे माणसाचे जगणे सुलभ करण्याच्या नादामध्ये त्याच्या बुद्धिमत्तेलाच आव्हान देते आहे की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

पूर्वी जेव्हा टेलिफोनचे आगमन झाले होते, तेव्हा प्रत्येक माणूस किमान शंभर ते दीडशे फोन नंबर लक्षात ठेवू शकत असे. आज मोबाईलच्या जमान्यामध्ये स्वतःच्या कुटुंबियांचा नंबरही लक्षात ठेवण्याची गरज भासेनाशी झालेली आहे. हेच इतर बाबतीतही होऊ लागले आहे. आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे युग सुरू झालेले आहे. क्षणोक्षणी सभोवताली निर्माण होणाऱ्या आपल्या डाटाचे प्रोसेसिंग हे ए.आय. तंत्रज्ञान करू लागले आहे. भांडवलदार कंपन्यांच्या नफ्यासाठी त्याचा वापर करून घेतला जातो आहे. तुम्ही-आम्ही आज व्यक्ती अगर माणसे न राहता त्यांच्या दृष्टीने डाटाचे तुकडे आहोत. माणसापेक्षा त्याच्या डाटाला आणि त्या डाटाच्या माध्यमातून त्याच्या क्रयशक्तीला मोठे महत्त्व आलेले आहे. माणसाच्या माहितीच्या खरेदी-विक्रीचा हा जमाना आहे. आणि ऑनलाईन माहिती देवाणघेवाणीच्या या जमान्यात आपल्या स्मार्टफोनमध्ये जितकी म्हणून अॅप्लीकेशन्स असतील, त्या सर्वांकडे आपल्या फोनमधील सर्वच प्रकारची माहिती जसे की, फोन नंबर, फोटो, व्हिडिओ आणि लोकेशन इत्यादी वापरण्याचे अधिकार देऊन टाकलेले असतात. म्हणजेच आपण एखादे अॅप्लीकेशन वापरण्यासाठी म्हणून डाऊन लोड करतो. ते आपण किती वापरतो, माहीत नाही; पण, संबंधित अॅप्लीकेशन निर्माता मात्र आपली माहिती हरघडी वापरत असतो, ती त्याच्या फायद्यासाठी. महत्त्वाचे म्हणजे आपण विविध पेमेंट अॅप्स वापरतो, त्या अॅप्सना आपली समग्र आर्थिक स्थिती आपण माहिती करून देत असतो. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉम अॅप्सना आपल्या खरेदी-विक्रीच्या सवयी, आवडी-निवडी माहिती असतात. त्यानुसार आपल्याला विविध प्रकारच्या खरेदीला उद्युक्त करणाऱ्या, गरज नसतानाही भरीला पाडणाऱ्या जाहिराती आपल्यासमोर सातत्याने सादर केल्या जातात. आपल्या खिशातील पैसा हा जणू काही या भांडवलदार कंपन्यांचे अर्थकारण खेळते राहण्यासाठीच आहे की काय, असे वाटायला लावणारी परिस्थिती हे आजचे वास्तव आहे.

मानवी बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे. मात्र, याच बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या ए.आय. तंत्रज्ञानाने आता त्या बुद्धीचाच जणू काही कमीत कमी वापर व्हावा, असे चॅट-जीपीटीसारखे तंत्रज्ञान विकसित केले आहे. माहितीच्या महाजालामध्ये प्रचंड असा डाटा आहे. त्याचा वापर करून एखादा लेख, एखादी कविता तयार करून तुमच्यासमोर सादर करण्याची क्षमता या चॅट-जीपीटी तंत्रज्ञानात आहे. बिग डाटामध्ये क्राऊल करून त्यातून आपण सांगितलेल्या विषयाला अनुरुप असे माहितीचे कैक तुकडे एकत्र जुळवून असा एक लेख आपल्यासमोर सादर होतो, हे आजचे वास्तव आहे. मानवाची सर्जनशीलता त्यात नाही, मात्र सर्जनशील माणसांनी यापूर्वी निर्माण केलेलीच माहिती जुळवून नव्याने सादर करण्याची गतिमानता मात्र त्यामध्ये आहे. हेही मानवी सर्नशीलतेला एक प्रकारचे आव्हानच आहे. आपण विचार, चिंतन, मनन करून एखादा लेख लिहावयाचा की तंत्रज्ञानाच्या या गतिमान वारुवर स्वार होऊन बनचुके व्हायचे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. यातल्या दुसऱ्या प्रकाराचा लाभ घेणारेच अधिक असतील, हे वेगळे सांगावे लागणार नाही. साधे गुगल ट्रान्सलेट आले, तर आपण आपली अनुवादाची क्षमता आणि त्यायोगे आपले भाषाप्रभुत्व गमावायला सुरवात केली आहे. बिग डाटा आणि आणि तो वाहून नेणारी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाची गतिमानता ही अशा प्रकारे आपल्या सर्जनशीलतेला आव्हान निर्माण करू पाहते आहे.

बिट डाटामुळे आपल्यासमोर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न सामोरा ठाकला आहे, तो आहे विश्लेषणाचा! आपल्या सभोवताली प्रचंड अशी माहिती आहे. आणि हरक्षणाला ती वाढतेच आहे. अशा वेळी त्या माहितीचे योग्य विश्लेषण करून त्यातून काही एक ठोस निष्कर्ष काढणे, ही जवळपास अशक्यप्राय बाब बनून राहते. परिणामी, त्या डाटामधून ठोस असे काही आपल्या हाती लागण्याची शक्यता उणावते. पूर्वी अगदी कमी, प्रमाणबद्ध डाटा हाती असायचा, मात्र त्याचे विश्लेषण करणे आणि काहीएक निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य असायचे. आज मात्र बिग डाटाच्या नादात त्याच्या विश्लेषणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. त्या अर्थाने बिग डाटा हा आपल्यासाठी जवळपास नो डाटा म्हणजे असून नसल्यासारखाच आहे. हे या बिग डाटाचे आजचे एक अपरिहार्य वास्तव आहे. ते आपण समजून घ्यायला हवे. बिग डाटाला तितक्या मोठ्या प्रमाणात विश्लेषित करणे ही अशक्यप्राय बाब असल्याने त्याचे सॅम्पलिंग आणि मग विश्लेषण करण्याच्या पद्धती विकसित करणे ही आजघडीची गरज आहे. अन्यथा महाप्रचंड माहितीचा महाजाल सभोवताली असूनही जर त्या माहितीचा योग्य विनियोग करण्यापासून आपण अनभिज्ञ राहणार असू, तर कोष्ट्याच्या जाळ्यात सापडलेल्या सावजापेक्षा आपली अवस्था वेगळी असणार नाही. आपल्याला फाईव्ह-जीसारख्या तंत्रज्ञानाची कितीही गतिमानता लाभली, तरीही त्या गतीमुळे आपण त्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटूनच जात राहू आणि त्या महाजालात आपण इतरच कोणाचे भक्ष्य झालेले असू, हे निश्चित!


मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

नितळ-३ एक चेहरे पे कईं चेहरे...

    (मुंबई येथील 'फ्री प्रेस जर्नल' समूहाच्या 'दै. नव-शक्ति'मध्ये लिहीत असलेल्या 'नितळ' या मालिकेअंतर्गत मंगळवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रकाशित झालेला भाग माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे 'नव-शक्ति'च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करतो आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

गेल्या पंधरवड्यात व्याख्यानाची तीन-चार निमंत्रणं होती. विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यातलं एक व्याख्यान संपवून घरी परतलो. पत्नी-मुलांसमवेत चहा घेत असताना गंमतीनं बायकोला म्हणालो, या गतीनं व्याख्यानं देत सुटलो तर लोक मला विचारवंत वगैरेच ठरवून टाकतील. त्यावर बायको तिच्या स्पष्टवक्त्या स्वभावाला साजेसं उत्तरली, काही गरज नाही विचारवंत वगैरे म्हणवून घेण्याची. तुम्ही मूळ समाजभान असणारे पत्रकार आहात, तसेच राहा. आणि विचारवंत होण्यासाठी जो पल्ला आवश्यक असतो, तो गाठण्यासाठी तुम्हाला अजून खूप कष्ट करावे लागणार आहेत.

गार्डन गार्डन होऊ पाहणारं माझं मन बायकोच्या या फारच स्पष्ट बोलण्यानं आतून थोडंसं खट्टू झालं, पण क्षणभरच. पुढच्या क्षणी तिच्याविषयी अभिमानच दाटून आला मनी. म्हटलं, यार अशी आपले पाय कायम जमिनीवर टिकवून ठेवणारी जीवनसंगिनी आपल्याला लाभली, यापेक्षा आणखी दुसरं काय हवंय? पण, यातूनच मग पुढची विचारशृंखला मनात सुरू झाली. खरंच, आपण जगात वावरताना आपल्या चेहऱ्यावर असे कितीक मुखवटे लावून वावरत असतो. त्या मुखवट्यांच्या मांदियाळीमध्ये आपण आपला मूळ चेहराच जणू हरवून बसलेलो असतो. सुरवात माझ्यापासूनच केली. बायकोनं माझ्यातला पत्रकार मान्य केला होता, हे तर तिच्या बोलण्यातून आलंच. पण, मी तो तरी किती खरा? आणि मी आयुष्यात फुलटाईम पत्रकार म्हणून तरी किती राहू शकतो. पत्रकाराचाही मुखवटा जर मी उतरवला, तर त्याखालचा माझा चेहरा कोणता? आणि पुन्हा मग अगदी उगमाकडं गेलो. मी जन्मलो, तेव्हा मी काय कोणी पत्रकार म्हणून थोडाच जन्मलो होतो? माणसाचं एक पिल्लू म्हणून जन्माला आलो होतो. पुढं जसजसा मोठा होत गेलो वयानं, त्यात ज्ञानकणांचीही भर पडत गेली. पुढं आयुष्याच्या एका वळणावर चरितार्थासाठी काही काम करणं आलं आणि त्यातून मग मी नोकरीधंदा करू लागलो. तेव्हा ही वेगवेगळ्या पदांची पुटं माझ्या नावाच्या मागं चिकटू लागली. त्यांचेच मुखवटे मग चेहऱ्यावर चढवून मी तोच म्हणून वावरू लागलो. असली चेहरा कहीं खोता चला गया। हा असली चेहरा असतो माणूस असण्याचा. पण, नेमकं तेवढंच मागे पडत जातं आणि आपण कोणीच्या कोण म्हणूनच जगातला आपला वावर सुरू ठेवतो. मरतानाही आपण माणूस म्हणून कमीच आणि त्या मुखवट्यांचे म्हणूनच अधिक आपली ओळख मागे ठेवून जातो. मात्र, ही ओळख तेव्हाच चिरस्मरणीय बनते, जेव्हा कोणी म्हणतो, एक चांगला माणूस गेला!

जेव्हा आपल्या नावामागील वा पुढील पद, पदनाम राहात नाही आणि तरीही लोक तुमच्याभोवती जमत असतील, तर तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं आयुष्यात काही तरी मिळवलं, असं म्हणता येतं. सत्ता अगर पैसा या अशा गोष्टी असतात की, त्या असणाऱ्यांच्या भोवती गुळाला मुंगळे जसे, तशी भक्तांची मांदियाळी नित्य असते. मात्र, या गोष्टी जर काही कारणानं दुरावल्या, तर स्वार्थ साधण्यासाठी भोवतीनं गोळा झालेले हे लोलुप मुंगळे सर्वात आधी तुमच्यापासून दूर जातात. हे इथं काही नवीन सांगितलं जातंय, अशातला भाग नाही. हे सर्वांनाच माहिती आहे. अगदी सत्तेत बसलेल्यांपासून ते पैशांच्या राशीत खेळणाऱ्यांनाही! मात्र, त्यांनाही या मुंगळ्यांचा सोस सोडवत नाही. त्यांचा हव्यास भागवित असताना स्वतःचाही मद गोंजारून घेताना त्यांना आनंद लाभत असतो. त्यांना माहिती असतं, ही सारी आपल्या या मुखवट्याचीच कमाल आहे. त्यामुळं ते कायमस्वरुपी या मुखवट्यांना जीवापाड जपत राहतात. कोणी सुहृदानं, हितचिंतकानं त्याची जाणीव करून दिली तर ते त्यांना आवडत नाही. या दिखावटी मुखवट्यावर, जगण्यावर एखादा सूक्ष्म ओरखडाही त्यांना सहन होत नाही. या भुलभुलैय्यामध्ये त्यांचं सारं जगणंच हरवून गेलेलं असतं किंवा आपण ज्या पद्धतीनं जगतो आहोत, ते कचकडी जगणंच त्यांना खरं वाटू लागतं. आपल्या आभासी दुनियेतून त्यांना बाहेर येववंत नाही. यांचा गोंधळ तेव्हा उडतो, जेव्हा परिधान केलेले हे मुखवटे काही कारणानं फाटतात किंवा फाडले जातात. त्यांना या जगण्याची सवयच नसते. त्यांचं असणं, दिसणं आणि दाखवणं या साऱ्याच बाबींत महदअंतर असतं. हे अंतर काही वेळा संपुष्टात येतं आणि ती खरी कसोटीची वेळ असते. त्या कसोटीस जो उतरला, तो जिंकला; जो नाही, तो संपला.

जगात जगत असताना माणसाला या मुखवट्यांची गरज का भासावी, याचा सूक्ष्मपणानं विचार केला, तर आपल्या मनीमानसी रुजलेल्या स्तरित मानसिकतेला जबाबदार धरावं लागतं. जगामध्ये धर्म, जात, वर्ण, वंश, प्रांत, भाषा, वेश आदी अनेक कारणांवरुन माणसं परस्परांशी भेदभाव बाळगून राहतात. त्यामध्येही आपण कोणाच्या तरी खाली आहोत, यापेक्षा आपण या उतरंडीमध्ये कोणाच्या तरी वर आहोत, या अहंकार माणसाला सुखावणारा असतो. सत्ता, पैसा, उच्चवर्ण या गोष्टी माणसाला या उतरंडीच्या सर्वाधिक वरच्या स्तरामध्ये नेऊन ठेवतात. आणि खालच्या स्तरांतील लोकांनाही या वरच्यांची तळी उचलण्यामध्ये, अगदी त्यांच्या लाथा खाण्यामध्ये सुद्धा कोण समाधान लाभत असते. वरच्या स्तरांतल्या लोकांची जशी ही उच्चवर्णीय मानसिकता घातक असते, त्याहूनही घातक ही गुलामगिरीची मानसिकता अधिक भयावह आणि समाजाला विषमतेच्या खाईत लोटणारी असते. अशा स्तरित मानसिकतेच्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारे स्वातंत्र्य, समता अगर बंधुतेची भावना रुजू शकत नाही. किंबहुना, रुजू दिली जात नाही. कारण यामध्ये वरिष्ठ उच्चस्तरीय लोकांचे स्वार्थ दडलेले असतात. समता, समानता ही मूल्ये माणुसकीची आहेत, मात्र त्यातून एकत्वाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते, जी या उच्चस्तरीयांच्या स्वार्थाआड येणारी असते. त्यामुळेच राहणीमानाच्या विविध आभासी संकल्पनांचे गारूड पसरवून त्यामध्ये खालच्या स्तरांनाही अडकविण्याचा चंग बांधला जातो. वरच्या स्तरांतल्या मुखवट्यांचे अनुकरण करत असेच एकावर एक अनेक मुखवटे चढवून प्रत्येकजण फिरताना दिसतो. सोयीस्कररित्या वापरतही असतो. जो एखादा मुखवट्याविना वावरण्याचा प्रयत्न करतो, तो अडचणीचा असतो प्रस्थापित व्यवस्थेच्या. कारण तो माणूस असतो.