बुधवार, २९ जुलै, २०२०

... तरच जिवंत तुम्ही!



हृदयात घेऊनि अस्वस्थता
चालत असाल तुम्ही,
तरच जिवंत तुम्ही।।

नजरेत असतील स्वप्नांच्या
चमकत्या विजा तुमच्या,
तरच जिवंत तुम्ही।।

हवेच्या झुळुकांसम
स्वतंत्र राहा,
महाप्रचंड सागरासम
लाटांमध्ये वाहा,
हर क्षणाला भिडा, भेटा,
फैलावुनी बाहु तुमचे,
प्रत्येक क्षण, प्रत्येक दृष्य
अनुभवू द्या तुमच्या नजरेला।
या नजरेत तुमच्या
असतील नवलाईच्या छटा,
तरच जिवंत तुम्ही।।

हृदयात घेऊनि अस्वस्थता,
चालत असाल तुम्ही,
तरच जिवंत तुम्ही।।



मूळ कविता- जावेद अख्तर

अनुवाद- आलोक ‘प्रियदर्शन’

पँथर जिंदा है..!

(पँथर ज.वि. पवार यांची दोन भागांची विशेष युट्यूब मुलाखत...)

सन १९७२ च्या २९ मे रोजी दलित पँथर या महाराष्ट्रात सामाजिक समता प्रस्थापनेसाठी आग्रही असणाऱ्या संघर्षशील दलित युवकांच्या संघटनेची स्थापना झाली. नामदेव ढसाळ आणि ज.वि. पवार यांनी मुंबईच्या रस्त्यावर चालत बोलत जात असतानाच या जहाल संघटनेच्या स्थापनेचे सुतोवाच केले. या स्थापनेला पार्श्वभूमी होती ती १९७० साली संसदेत सादर झालेल्या पेरुमल अहवालाची... या अहवालात दलितांवर देशभरात सुरू असलेल्या अन्याय, अत्याचारांचं विदारक प्रतिबिंब उमटलेलं होतं... अहवालात या अत्याचारांचे जे आकडे होते, त्यापेक्षा प्रत्यक्षात दसपटीनं गावोगावी दलितांवर अत्याचार होत होते... महिलांची विटंबना होत होती... १४ मे १९७२ रोजी परभणी जिल्ह्यातल्या ब्राह्मणगावात सार्वजनिक विहीरीवर पाणी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून दोन दलित महिलांची बाभळीच्या काट्यांचे फटके मारत गावातून नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या या युवकांनी पँथरची स्थापना करीत प्रतिकाराला सज्ज होण्याची तयारी चालविली.

१९७२ सालातील जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने दलित पँथरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. एक तर ९ जुलै रोजी दलित पँथरची पहिली जाहीर सभा मुंबईत झाली आणि त्यांनी आपल्या अंगिकृत कार्याचा उद्घोष केला... ऑगस्टमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात असताना साधनेच्या विशेषांकात राजा ढाले यांचा काळा स्वातंत्र्यदिन हा लेख छापून आला. प्रतीकाच्या अवमानासाठी ३०० रुपयांचा दंड आणि माता-भगिनींच्या पातळाला हात घालणाऱ्याला ५० रुपये दंड? प्रतीकांच्या अपमानाचं दुःख मोठं की त्या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांचं?” असा खडा सवाल राजाभाऊंनी त्यात उपस्थित केला. पुढे वरळी-नायगावची मोठी दंगल झाली. पोलीसांकडून आंदोलकांवर मोठे अत्याचार झाले. पँथरचे नेते जखमी झाले, त्यांना पोलीसांनी उचलले. भय्यासाहेब आंबेडकरांच्या आवाहनानंतर ती शांतही झाली. पँथर तिच्या उद्देशामुळे देशभरात फोफावली. फुटीचे ग्रहण तिलाही लागले अन् देशातली एक महत्त्वाची चळवळ १९७७ साली- अवघ्या पाच वर्षांतच फुटली; पण थांबली नाही. त्या पाच वर्षांच्या काळात या चळवळीने ते केले, जे त्यापूर्वीच्या २५ वर्षांतच होणे अभिप्रेत होते. मूळच्या पँथरच्या असलेल्या संघर्षशील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विविध मार्गांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. या देशातल्या तरुणांच्या मनामनांत आणि हृदयात जोपर्यंत बाबासाहेब आहेत, तोपर्यंत हा पँथर मरणार नाही, तो जिंदाच आहे.

या चळवळीने देशाला नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि. पवार, अविनाश महातेकर, अरुण कांबळे, दयानंद म्हस्के, के.बी. गमरे, गंगाधर गाडे, भाई संगारे, रामदास आठवले, उमाकांत रणधीर, एस. एम. अंधेरीकर, अरविंद निकाळजे, दादाभाऊ साळवे, रतनकुमार पाटलीपुत्र, सी.रा. जाधव, भालचंद्र मुणगेकर अशा अनेक उमद्या तरुणांची फळी दिली.

यंदा पँथरच्या स्थापनेला ४८ वर्षे होताहेत आणि पँथर ज. वि. पवार यांनी सुद्धा १५ जुलैला ७७ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने दलित पँथरची स्थापना, वाटचाल, फूट आणि आजची परिस्थिती या अनुषंगाने पँथर ज.वि. पवार यांच्याशीच संवाद साधून त्यांच्याकडूनच दलित पँथरविषयी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही दोन भागांची सविस्तर विशेष मुलाखत येथे आपणा सर्वांसाठी सादर करीत आहे. आपणाला ती आवडेल, असा विश्वास आहे.




मंगळवार, १४ जुलै, २०२०

‘यळगूड’ अन् मी...


'यळगूड'ची दूध उत्पादने


सहकार बेकरी उत्पादने


काही अनुषंगानं आज सर्फिंग करता करता यळगूडच्या श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेचा आज ५३वा वर्धापन दिन असल्याचं समजलं. या उत्पादनांचा मी नकळत्या वयापासून चाहता आणि कळत्या वयात ग्राहक बनलो असल्यानं या संघाच्या उत्पादनांशी एक खाद्यरसिक म्हणून अगदी लहानपणापासूनचं नातंय. त्या आठवणी मनात जाग्या झाल्या, म्हणून शेअर करतोय इतकंच...

दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात सुमारे ५३ वर्षांपूर्वी यळगूड दूध संघानं सहकाराचं वारं आणलं आणि आपल्या वाटचालीनं सहकारी चळवळीबद्दल विश्वास आणि आपुलकी रुजविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. संस्थापक वसंतराव तात्यासाहेब मोहिते, सुजीतसिंह मोहिते यांचा त्यात महत्त्वाचा वाटा आहे. 

आज जरी इचलकरंजी-कागल रस्ता झाला असला तरी यळगूडला जायचं तर वाट वाकडी करूनच जावं लागतं. मग सुमारे ५० वर्षांपूर्वी जिथं कोल्हापूरचं स्वरुपच एखाद्या खेड्यासारखं होतं, तिथं यळगूडची काय अवस्था असेल? इथलं दळणवळण किती मागास अवस्थेत असंल? त्यातही १९६५चा कालखंड म्हणजे तर अत्यंत टंचाईचा. भारताच्या पंतप्रधानांनी लोकांना एक वेळचं खाऊन राहावं आणि जवानांना अन्न पुरवठा करावा, असा संदेश जनतेला दिलेला. अन्नधान्याच्या अशा टंचाईचा सामना करीत त्यातून देश सावरत असताना, वाटचाल करत असताना दूध व्यावसायिकांची सहकारी संस्था स्थापन करणं हा विचार खरं तर त्या काळात आत्मघातकीच ठरायचा. मात्र, संस्थापकांचा दुर्दम्य आत्मविश्वास, त्यांना साथ देणारे सहकारी, परिसरातील दूध उत्पादक शेतकरी या साऱ्यांच्या बळावरच हा संघ उभा राहिला. आजवरची वाटचाल यशस्वीपणे करू शकला.


आज या क्षेत्रात स्पर्धा मोठी वाढलीय, परिसरातच अनेक तुल्यबळ, तगडे प्रतिस्पर्धीही ठाकले आहेत. मात्र परिसरातील तरुण उद्योजकांना व्यवसाय करण्याची प्रेरणा देणारा हा संघच आहे. म्हणूनच या विभागातून वेगवेगळे दूध संघ आणि बेकरी उत्पादक मोठ्या आत्मविश्वासाने पुढं येताना दिसताहेत. आज जर हे
 तरुण यशस्वी होताना दिसताहेत, तर त्याचं कारणही यळगूड संस्थेनं केलेल्या भक्कम पायाभरणीमध्येच आहे. ही संस्था जर कुठे कोलमडताना, अडखळताना दिसली असती, तर या नव्या संस्थाही परिसरात उदयाला आल्या असत्या का, याविषयी शंका वाटते. त्यामुळे श्री हनुमान सहकारी दूध संस्था ही यळगूड पंचक्रोशीची भाग्यविधाती आहे.

माझ्या माहितीप्रमाणे यळ्ळम्हणजे कन्नडमधील सात आणि गूड म्हणजे टेकड्या. अर्थात सात टेकड्यांनी वेढलेले गाव, असं हे यळगूड. एकीकडं पंचगंगा आणि दुसरीकडे दूधगंगा अशा दोन नद्या आणि या सप्तटेकड्या अशा भौगोलिक परिस्थितीमुळे हा परिसर संपन्न आहे, हे खरंच. पण, त्याला प्रगतीची दिशा दिली ती इथल्या शेतकरी बांधवांच्या श्रम करण्याच्या वृत्तीनंच. शेतीबरोबरच कृषीपूरक व्यवसायाच्या बाबतीतही या परिसरातील शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने अथक योगदान दिलं आहे, आजही देत आहेत, त्यामुळंच यळगूडसारखे प्रकल्प दिमाखात उभे राहिले, हेही तितकंच खरं.

वसंतराव मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथलं ग्रामदैवत असलेल्या हनुमानाच्या मंदिरात १४ जुलै १९६७मध्ये या सहकारी उद्योगाची स्थापना केली. संस्थेच्या लोगोमध्येही मोठा घट तोंडाला लावून दूध प्राशन करणारा हनुमान प्रतिष्ठापित करण्यात आला. जसा त्याचा घट रिता होत नाही, तसा या संस्थेच्या यशाचा आलेखही कधी खाली येणार नाही, असं जणू हा लोगो सूचित करीत राहतो. सहकार असं छापलेले आणि सुरवातीच्या काळात पिवळ्या आणि गडद निळ्या रंगाच्या कागदामध्ये बांधलेली संस्थेची बेकरी उत्पादनं - विशेषतः गोड, चेरीवाला ब्रेड हा त्या काळात घरोघरी इतका प्रिय झालेला होता की स्पर्धक बेकरी उत्पादक किंवा स्थानिक बेकरी उत्पादकही तशाच डिझाईनच्या कागदातून आपली उत्पादने विकायला ठेवू लागले होते. निदान सहकार समजून तरी लोक आपली उत्पादनं घेतील, अशी त्यांची भावना असावी. आमचे अनेक अशिक्षित पै-पाहुणे स्टँडवरुन येताना यळगूडचाच समजून काळ्या-पिवळ्या कागदातला डुप्लीकेट ब्रेड घेऊन येत असत. अशातलाच एक शिळा ब्रेड खाऊन फूड पॉईझनिंगही झालं होतं लहानपणी मला. (आजही काही काही गावांच्या आठवडी बाजारात पारले-जी बिस्कीटांच्या रॅपरची डुप्लीकेट बघायला मिळते.) इतकी लोकप्रियता या समूहाच्या वाट्याला आली. तीच गोष्ट यळगूडच्या चौरसाकृती नानकटाईची- ज्यावर केशरी- लाल रंगाचा गोड वर्ख असायचा. आम्ही लहान मुलं आधी त्याखालची मिठाई संपवित असू आणि सगळ्यात शेवटी हा गुळगुळीत गोड वर्ख खात असू. पुढे अनेक उत्पादकांनी या उत्पादनाचीही नक्कल करण्याचा प्रयत्न केला. पण, ती चव त्यात आणणं मात्र त्यांना जमलं नाही. अगदी खारी-बटरचेही अनेक प्रकार यळगूडनं आणले आणि यशस्वी केले. मला वाटतं, बिस्कीटे, बेकरी उत्पादनांच्या बाबतीत जी प्रयोगशीलता आणि कल्पकता त्या काळात या समूहानं दाखविलेली होती, तितकी आजतागायत अन्य कोणत्याही समूहानं दाखविल्याचं दिसत नाही. आज यळगूडची नक्कल असणारी अनेक उत्पादनं बाजारात आहेत आणि ती चांगली खपताहेत सुद्धा!

मिरजेला दूध पुरवठा करून त्यातून उरलेल्या दुधापासून बेकरी उत्पादनं करण्यास १९७२मध्ये यळगूडनं सुरवात केली. मिल्क ब्रेड ही संकल्पनाही त्यातनंच उदयाला आली. त्या काळात केवळ दुधाचा अपव्यय टाळणे हा हेतू असला तरी, पुढे दूध उत्पादनांपेक्षाही अधिक लौकिक, लोकप्रियता व प्रतिष्ठा या समुहाला बेकरी उत्पादनांनीच मिळवून दिली, हे मान्य करावे लागेल.

यळगूडच्या संदर्भात आणखी एक किस्सा आठवतोय, तो म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येक बसस्टँडवर यळगूडच्या दूध आणि बेकरी उत्पादनांचा स्टॉल हमखास असायचा. तो इतका फेमस असायचा की स्थानिक असो, अगर येणारा पाहुणा, या प्रत्येकासाठी तो एक महत्त्वाच्या लँडमार्कची भूमिका बजावायचा. कोल्हापूरच्या स्टँडवर आजही हा स्टॉल मोठ्या दिमाखात उभा आहे. अत्यंत हक्कानं इथं बेकरी उत्पादनं घेणारे लोक जसे आहेत, तसेच कधीही दूध न पिणाऱ्या व्यक्तीलाही इथल्या सुगंधी दुधाची चव पुनःपुन्हा चाखावीशी वाटते, असे लोकही आहेत. यळगूडची उत्पादनं ही अशा प्रकारे इथल्या लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग बनलेली आहेत. या संघानं परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासाला असाच हातभार लावत राहावं, याच या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सदिच्छा!


बुधवार, ८ जुलै, २०२०

एक ‘राजगृह’ माझंही असावं...


 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ५० हजार ग्रंथसंपदेसाठी बांधलेल्या 'राजगृह' या ऐतिहासिक वास्तूवर काही कंटकांनी दि. ७ जुलै २०२० रोजी दगड भिरकावून तेथे नासधूस केली. या घटनेचा निषेध करीत असताना मनात उमटलेली प्रतिक्रिया...)

आश्चर्य अजिबातच वाटलं नाही मला...

ना खंत वाटली... ना खेद दाटला...

राग येऊन दातओठ खावेसेही नाही वाटले...

कारण...

त्या दगड भिरकावणाऱ्या हातांनी,

अनपेक्षित असे काहीच केले नव्हते...

हां... केले असेल ते इतकेच...

की प्रत्यक्ष कृती केली!

अप्रत्यक्षपणे रोज कणाकणाने,

तीळातीळाने, कुणाच्याही नकळत...

माझ्या बाबाला बदनाम करण्याचे काम

सुरूच तर आहे गेली कित्येक वर्षे...

त्याच्या हयातीतही ते करीतच होते...

त्यांच्या माघारी तर काय?...

रानच मोकळे सारे...

कुठे पुतळ्याला चप्पल घाल...

कधी काळे फास...

तर कधी घाव घालून मोडतोड...

कसला हा निलाजरा भ्याडपणा...!

अरे, हा बाप माझा...

उभा राहिला छाती ताणून,

ताठ मानेने, भीमगर्जना करीत...

इथल्या नीच जातीभेदाच्या विरोधात...

फक्त न् फक्त शब्दांचे अस्त्र वापरीत...

पुस्तकांची रसद उभारीत...!

दिलंय त्यानंच तुम्हाला संविधान...

त्यातल्या स्वातंत्र्याच्या मूल्यासकट...

ज्याचा उपयोग तुम्ही त्याच्यावरच

दगड भिरकावण्यासाठी करताय...

पण, लक्षात ठेवा...

तुमच्यानं ते कदापि होणार नाही...

हातात कुठलंही शस्त्र असलं तरी...

रिकाम्या डोक्यांनी कधीच कुठलं काम होत नसतं...

चांगलंही अन् वाईटही...!

आमच्या बापानं...

ज्यानं पुस्तकांसाठी घर बांधायचा संस्कार दिलाय

इथल्या मुला-मुलाला...

त्या बापाची पोरं आहोत आम्ही...

जी स्वप्नं पाहतात राजगृहाची...

एक 'राजगृह' माझंही असावं म्हणून...

ज्यात असेल जागा खास...

त्याच्या पुस्तकांसाठी...

आणि असेल त्याचं एक जग...

त्याचं अन् त्याच्या बापाचं...

जे मिळून ठरवतील भवितव्य या देशाचं...

जो घडेल तुम्ही भिरकावलेल्या दगडांतूनच...

फासलेल्या डांबरातूनच... घातलेल्या घावातूनच...

कारण...

ही प्रत्येक गोष्ट जाणीव करून देते...

आम्हाला आमच्या आस्तित्वाची...

उरलेल्या लढाईची...

समता संघर्षाची...!!!

 

-    आलोक प्रियदर्शन

 


कोविड, ऑनलाईन शिक्षण आणि आरोग्य



('दै. सकाळ'च्या बेळगाव आवृत्तीचा वर्धापन दिन नुकताच (दि. ३० जून) झाला. या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

कोविड-१९ तथा कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरली. त्याचे अनेक परिणाम-दुष्परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत. लाखो लोकांचे मृत्यू, तितकेच पॉझिटिव्ह रुग्ण निर्माण झाल्याने जगाचे जगण्याचे, एकमेकांशी जोडले जाण्याची स्वाभाविकता या साऱ्याच बाबी अभूतपूर्व स्वरुपाच्या बदलल्या आहेत. आपले जगणे आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, राहणार नाही. जगण्याला अनेक मर्यादा पडलेल्या आहेत, प्रादुर्भावाच्या भीतीच्या सावटाखाली येथून पुढले आयुष्य जाणार आहे. कधीपर्यंत? कोणीही सांगू शकत नाही.

साऱ्याच क्षेत्रांवर कोविड-१९ साथीचा परिणाम झालेला आहे, शिक्षणाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मानवाचा हौशी स्वभाव येथेही दिसून आला. ऑनलाईन शिक्षण आणि एकमेकांशी ऑनलाईन जोडले जाण्याचा आपण इतका अट्टाहास मांडला की, एरव्ही ज्या एप्रिल-मे मध्ये आपली मुलं सुटीचा आनंद घेत असतात, त्या कालखंडात ऑनलाइन शिक्षणाच्या प्रकारांना अक्षरशः ऊत आला. अगदी वात येईपर्यंत जो तो उठतो आणि ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली गोंधळ घालायला सुरवात करतो, असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून आले. हे गैर आहे, असे माझे म्हणणे मुळीच नाही; मात्र, त्यामध्ये प्रोफेशनॅलिझमचा अभाव आणि ऑनलाईन माध्यमांची ताकद आणि मर्यादा यांचे भान न बाळगता काही तरी वेगळे करण्याची हौस भागवून घेण्याची प्रवृत्तीच अधिक दिसून आली, अगदी शिक्षकांमध्ये सुद्धा! अगदी एखाद-दुसरेच ऑनलाईन व्यासपीठ असे दिसून आले, जिथे खरोखरीच या माध्यमाचे गांभीर्य ओळखून शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येत होते.

या ठिकाणी आपण ऑनलाईन माध्यमांद्वारे मुलांना शिक्षण देत असताना अनेक गोष्टींचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि सरते शेवटी विद्यार्थी यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यातही ऑनलाईन माध्यमाद्वारे जेव्हा शिक्षण देण्याचा पर्याय आपण निवडतो, तेव्हा त्यामध्ये गुंतलेले माहिती तंत्रज्ञान आणि त्यासाठीची आर्थिक क्षमता ही विद्यार्थी-पालकांमध्ये आहे का, याचा विचारही खूप महत्त्वाचा ठरतो. भारतामध्ये अद्यापही अनेक घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर आहेत, ज्यांच्या मूलभूत गरजा अद्यापही भागविणे आपल्याला शक्य झालेले नाही. पोटाला चिमटा घेऊन जो घटक आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून शाळेत घालतो, त्या घटकाला ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या स्वतंत्र टॅब, लॅपटॉप, पीसी, मोबाईल, इंटरनेट कनेक्शन, डाटा चार्जेस, त्या साधनांसाठी अव्याहत आवश्यक वीजपुरवठा आणि मुलांना ती साधने घेऊन शिकण्यासाठी शांत, निवांत असा घरातला त्याचा हक्काचा एक कोपरा इत्यादी गोष्टींची पूर्तता आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंबाला शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे नकारात्मक आहे. शासन तरी या साधन सुविधा या कुटुंबांना देण्यास सक्षम अगर तत्पर आहे का? याचेही उत्तर सकारात्मक असू शकत नाही. कारण बेरोजगार झालेल्या नागरिकांच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न मिटविण्यासाठीच शासन यंत्रणेला लॉकडाऊनच्या कालखंडात किती परिश्रम करावे लागले आहेत, याचे आपण सारेच साक्षीदार आहोत. म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साधन सुविधांची पूर्तता करणे, ही विद्यार्थ्यांची प्राथमिक गरज आहे, त्याची पूर्तता आपण कशी करणार, त्यावर ऑनलाइन शिक्षणाचे लाभार्थी कोण असणार, हे अवलंबून आहे. समाजामध्ये आज मोठा डिजीटल डिव्हाईड आहेच, त्याची व्याप्ती यामुळे अधिकच वाढणार आहे.

दुसरे, हे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था, आपले शिक्षक कितपत समर्थ आहेत, याचेही अवलोकन आणि विश्लेषण आवश्यक आहे. मोबाईलसमोर बसणे आणि एकतर्फी शिकवित सुटणे, असा ऑनलाइन शिक्षणाचा अर्थ नाही. एखादा विषय घेऊन मल्टीमीडिया साधनांचा वापर करीत त्याला आकृती, आलेख, चित्रे, ऑडिओव्हिज्युअल्स अशा अनेक बाबींची जोड देत विषय व आशय विश्लेषण करून विषय सोपा करून समजावून सांगणे, या माध्यमाला अभिप्रेत आहे. पण, ती जाणीव अगदी मोजक्या खाजगी व्यावसायिक संस्था सोडल्या तर आपल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेला झालेली आहे, असे सध्या तरी दिसत नाही. ऑनलाईन-ऑनलाईनचा गजर करीत तातडीने विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून घेणे आणि आपले अर्थकारण साधणे, असेच चित्र सध्या तरी सर्वत्र आहे. येथे आपल्या वंचित घटकांचा विचार होताना दिसत नाही. त्यामुळे पुनश्च एकदा शिक्षणाअभावी मोठी सामाजिक-आर्थिक दरी निर्माण करण्याच्या टोकाला आपण समाजाला घेऊन जाणार आहोत का, अशी शंका निर्माण होते.

या माध्यमाच्या सशक्त बाजूंची जाणीव आपल्या शिक्षकांना तरी कितपत झालेली आहे, हाही एक प्रश्नच आहे. ऑनलाईनमध्ये शिकविणे म्हणजे घरात संगणकाच्या अगर मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर बसून बडबड करणे, असे नक्कीच नाही. विद्यार्थ्यांना विषय सोपा करून समजावून देण्यासाठी ज्या विविध प्रकारचे सादरीकरणाचे शैक्षणिक मटेरिअल निर्माण करणे अभिप्रेत आहे, त्यावर कोणीही कष्ट घेण्याच्या मानसिकतेत आहे, असे जाणवत नाही. ऑनलाईन माध्यमाद्वारे संवाद साधत असताना आपण कसे प्रेझेंटेबल असावे, याचे मूलभूत भानही कित्येकांना आहे, असे दिसत नसताना उपरोक्त अपेक्षांची पूर्ती त्यांच्याकडून परिश्रमपूर्वक होईल, याची अपेक्षा बाळगणे सध्या तरी मोठाच भ्रमनिरास करणारे ठरेल. आपले शिक्षक ऑनलाईन माध्यमाद्वारा शिक्षण देण्यास तयार आहेत, असे चित्र सध्या तरी नाही.

सरते शेवटी विद्यार्थी या घटकाचा विचार करू या. बालक गटातील विद्यार्थी, ज्यांच्यासाठी मोबाईल अगर पीसी हे साधन गेम खेळण्याचे आहे. त्या पलिकडे त्या साधनाचा वापर त्याला माहिती आहे, अगर त्याचे पालक त्याला माहिती करून देतात, असे वास्तव नाही. त्यामुळे काल जसा गेम खेळत होतो, तसेच शिक्षण आहे, असे वाटून त्या मुलास शिक्षणाचे गांभीर्य पटविणे अवघड बनते. येथे शिक्षणाच्या सुरवातीलाच त्याचा खेळखंडोबाच होण्याची शक्यता अधिक. प्रत्यक्ष शिक्षण आणि व्हर्चुअल शिक्षण यातील फरक पूर्वप्राथमिक व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना पटवून देणे, जाणवून देणे आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबविणे या बाबतीत पालकांची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. सहशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जे सामाजीकरण होते, त्याला मुकल्याने अनेक कौटुंबिक व सामाजिक तोट्यांना या मुलांना सामोरे जावे लागेल. अनेक मनोकायिक विकारांना मुलांना सामोरे जावे लागू शकते. सध्याच्या स्थितीत ऑनलाईन शिक्षण हे सोयीचे माध्यम असले तरी त्यासाठी आवश्यक सुविधा साधनांच्या अभावी मुलांच्या मनात वंचिततेची भावना निर्माण होऊ शकते. इंटरनेट व अन्य साधनांच्या वापरामुळे मुलांचा त्यावरील वेळ वाढेल. त्याचे परिणाम मुलांचे वर्तन व मानसिकता यांवर होण्याची दाट शक्यता आहे. शिक्षणाखेरीज अन्य अशैक्षणिक बाबी, अॅप्लिकेशन्स, समाजमाध्यमांचे विविध प्लॅटफॉर्म यासाठी सदर साधनांचा वापर अधिक केला जाण्याची शक्यता अधिक निर्माण होईल. इंटरनेटसह या साधनांचा मर्यादेपेक्षा अधिक वापर हा चुकीचाच आहे; मात्र तसे झाल्यास मुलांच्या झोपेपासून ते अनेक मनोशारीरिक समस्या निर्माण होतील. ऑनलाईन शिक्षणासाठी स्वयंशिस्त हा कळीचा मुद्दा आहे, पण त्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांमध्येच त्याविषयीची जागृती असणे आवश्यक आहे. शाळेत विद्यार्थी त्यांच्या मित्रांसोबत असतात, त्यामुळे त्यांचे सामाजीकरण सहज आणि नैसर्गिकरित्या होते. त्यातून त्यांच्या सामाजिक जाणिवा सुद्धा समृद्ध होण्यास मदत होते. ऑनलाईन शिक्षणामुळे हे सामाजीकरण धोक्यात येऊन मुले एकलकोंडी अधिक होतील, त्यांच्यामध्ये मानसिक आजार निर्माण होण्याची, समाजामध्ये मिसळण्यास भीती वाटण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे हे नवे माध्यम अत्यंत सजगपणे वापरण्याचे ज्ञान व भान शिक्षक, पालक व विद्यार्थी या घटकांमध्ये येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटवरील आभासी जगतामध्ये मुलांची फसवणूक होणे, त्यांचा छळ, शोषण आदी घटनांचे प्रमाण वाढण्याची, बालकांविषयीच्या सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे, ती निराळीच.

या ठिकाणी उपरोक्त बाबींची चर्चा करीत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ऑनलाईन शिक्षणाला विरोध करून उपयोगाचे नाही. ती एक महत्त्वाची शिक्षण प्रणाली आहे. मात्र कालपर्यंत केवळ उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात पूरक शिक्षणासाठीचे उपयुक्त माध्यम म्हणून कार्यरत असणारे ऑनलाईन शिक्षण आज शिक्षणाच्या सर्व स्तरांतले वास्तव म्हणून सामोरे आले आहे. कोविड-१९च्या साथीने त्याला पूरक अगर पर्यायी शिक्षणप्रणाली म्हणून नव्हे, तर शिक्षणाचे प्रमुख माध्यम म्हणूनच आपल्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे त्याविषयी सजगता, प्रबोधन, विद्यार्थी-शिक्षकांवरील त्याचे भलेबुरे परिणाम आणि त्यातून सर्वंकष सामाजिक-शैक्षणिक समानता प्रस्थापनेच्या मार्गातील अडथळे आदी अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण केले आहेत. ऑनलाईन शिक्षणाला आता नकार देता येणार नाहीच, पण त्यातून निर्माण झालेल्या या विविधांगी समस्यांना आपण कसे सामोरे जातो, त्यांवर कशी मात करतो आणि त्यायोगे सर्व समाजघटकांना सोबत कसे घेऊन जातो, यावर त्याचे दूरगामी परिणाम अवलंबून आहेत.


गुरू अन् आत्मविश्वास प्रदाता अधिविभाग


टीम बीजेसी: बीजेसीच्या मौखिक परीक्षा झाल्यानंतर अखेरच्या दिवशी शशिकांत मुळ्ये सरांनी काढलेले छायाचित्र. यात डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. ओमप्रकाश कलमे, जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांच्यासमवेत आम्ही विद्यार्थी. 

जगन्नाथ पाटील सरांसमवेत दिल्ली-आग्रा अभ्यास सहलीदरम्यान ताजमहालसमोर टीम बीजेसी.

हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीला भेट देणारी आमची एमजेसीची पहिलीच बॅच.


(शिवाजी विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने या विभागातील सन १९९८ ते २००० या दोन वर्षांच्या शैक्षणिक कालावधीतील आठवणींना दिलेला उजाळा...)

शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाचा माजी विद्यार्थी म्हणून जेव्हा मी विचार करू लागतो की, या विभागाने मला नेमके काय दिले? तेव्हा उत्तरादाखल दोन बाबी प्रकर्षाने माझ्यासमोर येतात, त्या म्हणजे डॉ. अशोक चौसाळकर यांच्यासारखा गुरू आणि आत्मविश्वास होय.

वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागात प्रवेश घेण्याबाबत चौकशीसाठी आलेल्या दिवसापासून तत्कालीन अधिविभागप्रमुख डॉ. चौसाळकर सरांचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की आजही तो तसूभर सुद्धा कमी झालेला नाही. त्यांच्याविषयी मी संधी मिळेल तेव्हा विविध व्यासपीठांवरुन लिहीले आहेच. सरांचे सहकार्य, तत्पर मार्गदर्शन, ताज्या विषयांबाबत सर्वंकष संदर्भ गोळा करून त्यांची मुद्देसूद मांडणी करण्याची हातोटी या साऱ्या बाबींचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. माझ्या पीएच.डी.च्या विषय निवडीपासून ते ती पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मला लाभलेले मार्गदर्शन किती मौलिक स्वरुपाचे आहे, हे शब्दांत मांडणे कठीण आहे. डॉ. ओमप्रकाश कलमे यांची संज्ञापनशास्त्र शिकविण्याची हातोटी, डॉ. निशा मुडे-पवार यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पत्रकारितेचा अभ्यास करण्याची जागृत झालेली प्रेरणा, डॉ. जगन्नाथ पाटील आणि दयानंद कांबळे यांच्या सान्निध्यात ब्रॉडकास्ट जर्नालिझमशी झालेला परिचय, आदरणीय गोविंद पानसरे यांच्याकडून राज्यघटनेचे कलम १९-१ (अ) सलग आठवडाभर शिकण्याचा आनंद, शशिकांत मुळ्ये यांनी छायाचित्रण कलेशी करून दिलेली ओळख व करून घेतलेल्या विविध असाईनमेंट्स या आणि अशा कित्येक बाबी या विभागानं आम्हाला दिल्या. माजी अधिविभाग प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांच्या ऋजू स्वभावाचा तर मी चाहताच आहे. पीएच.डी.चे ते माझे मार्गदर्शक. त्यांचा अथक लकडा माझ्यामागे नसता तर कदाचित माझ्या हातून हे संशोधन पूर्ण झाले असते की नाही, याविषयी माझा मलाच संदेह वाटतो. याखेरीज ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, डॉ. कविता गगराणी, वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा स्नेह सुद्धा याच कालावधीत लाभला. पत्रकारितेत कार्यरत अनेक संपादक, पत्रकार यांचा परिचय सुद्धा याच कालावधीत झाला. त्यामुळे स्थानिक पत्रकारितेशी एक प्रकारची जवळीक व आत्मियता निर्माण झाली.

बीजेसीमध्ये असताना जगन्नाथ पाटील यांच्यासमवेत केलेली दिल्ली-मुंबई अभ्यास सहल आणि एमजेसीमध्ये डॉ. निशा मुडे यांच्यासमवेत केलेली तिरुपती-हैदराबादची अभ्यास सहल या अत्यंत अविस्मरणीय ठरल्या. त्या सहलींच्या आठवणी आजही जागविताना खूप छान वाटते. या सहलीमुळेच हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीविषयी आपल्या परिसरातला पहिला माहितीपर लेख सकाळच्या कलारंजन पुरवणीसाठी मला लिहीता आला, ही सुद्धा एक नोंद घेण्यासारखी बाब आहे. शिकत असतानाच त्यावेळचा टीव्ही सुपरस्टार शेखर सुमन आणि अतुल परचुरे यांची मुलाखत घेता आली. त्यांना अनुक्रमे सकाळच्या कला-रंजन आणि लोकमतच्या चित्रगंधा या पुरवण्यांमध्ये उत्तम स्थानही लाभले, या माझ्या विद्यार्थी दशेतल्या छापून आलेल्या महत्त्वाच्या लेखांच्या आठवणी मला आजही खूप प्रेरणा देतात.

या कालावधीत जोडल्या गेलेल्या मैत्राविषयी लिहावयाचे, तर त्यासाठी वेगळे पुस्तकच लिहावे लागेल; इतके हरहुन्नरी, तऱ्हेतऱ्हेचे पण जीवापाड प्रेम करणारे मित्र-मैत्रिणी मला लाभले. आज एकमेकांपासून कदाचित दूर असलो तरी आमचा स्नेह, प्रेम कायम आहे. जेव्हा एकमेकांची आठवण होते, एकमेकांना गरज असते, तेव्हा आम्ही एकत्र असतो. ही या विभागाचीच देण होय.

हे गुरूंचं देणं आणि मैत्राचं लेणं, जसं विभागानं मला दिलं, तसंच माझ्या आयुष्यामध्ये पत्रकारिता आणि जनसंपर्काच्या क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत काम करण्याचा आत्मविश्वास इथल्या शिक्षणानं माझ्यात पेरला, हे मी प्रांजळपणाने सांगू इच्छितो. विभागाच्या अभ्यास सहलींव्यतिरिक्त विविध सेमिनारमधील सादरीकरणे, गटचर्चा, मान्यवर पत्रकार, संपादकांची विशेष व्याख्याने, विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या आयोजनातील सक्रिय सहभाग, त्यांचे वृत्तलेखन, विद्यापीठाबाहेरीलही व्याख्याने-कार्यक्रमांना उपस्थिती, माध्यमविद्या व संज्ञापक यांच्यासाठीचे लेखन व संपादन, छायाचित्रण कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, डॉक्युमेंटरी निर्मिती, लघुशोधप्रबंध लेखन आदी विविध बाबींमुळे कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळेच गेल्या साधारण वीस वर्षांमध्ये केबल न्यूज निर्माता, सकाळसारख्या दैनिकात उपसंपादक, महाराष्ट्र शासनात सहाय्यक संचालक (माहिती), लोकराज्यचा सहसंपादक, शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलचा संस्थापक-सहसंपादक, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात व्यवस्थापक (जनसंपर्क), जिल्हा माहिती अधिकारी, सहाय्यक कुलसचिव अशा विविध पदांवर मला यशस्वीपणे काम करता आले. व्यक्तीगत जनसंपर्क, शासकीय जनसंपर्क आणि संस्थात्मक जनसंपर्क अशा जनसंपर्काच्या विविध आघाड्यांवर काम करता आले. या सर्व ठिकाणी काम करीत असताना अनुभवाचे उत्तम संचित गोळा करता आले.

विभागाने प्रदान केलेला हाच आत्मविश्वास नव्या पिढ्यांमध्ये पेरण्याचे काम शक्य होईल, तितके मी आता करीत असतो. नवी पिढी प्रचंड गतिमान आहे, हुशार आहे, सजग आहे, महत्त्वाचे म्हणजे तिला माहिती तंत्रज्ञानाचे पंख लाभले आहेत. या पंखांच्या सहाय्याने भरारी घेत असताना त्यांची दिशा योग्य राहील, याची दक्षता आपल्यासारख्या असंख्य माजी विद्यार्थ्यांची आहे, अशी माझी भावना आहे. त्यातही पत्रकारिता आणि जनसंपर्काचे क्षेत्र इतके सर्वव्यापी आहे की आपल्या विभागाचा विद्यार्थी जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या शहरात, करिअरच्या क्षेत्रात आणि शासकीय विभागांतही असल्याचे दिसते. या साऱ्यांच्या अनुभवाचा लाभ अधिविभागाने आपल्या प्रत्येक बॅचला मिळवून दिला पाहिजे. दरवर्षी माजी विद्यार्थ्यांमधले काही जणांनी जरी येऊन आपले अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले, तरी त्यातून आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा सापडण्यास ते मार्गदर्शक ठरेल, असे वाटते.