बुधवार, २६ डिसेंबर, २०१२

‘Annihilation of Caste’ची पंचाहत्तरी!




शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे नाताळच्या दिवशी एका महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. ’75 years of ‘Annihilation of Caste’- Tracing the Journey of Caste System in India ’ असा या दोन दिवसीय चर्चासत्राचा विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक १९३६ साली प्रकाशित झालं. भारतीय जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी कालातीत रसद पुरवणाऱ्या या पुस्तकाची पंचाहत्तरी आणि आजच्या काळातील त्याचं महत्त्व, उपयोजन या अनुषंगानं चर्चा घडवणं, हीच मुळात एक आगळी गोष्ट आहे. शिवछत्रपती आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या शिवाजी विद्यापीठाची या वारशाशी जुळलेली नाळ अधिक ठसठशीतपणे अधोरेखित करणारी अशी ही गोष्ट ठरली. एखाद्या पुस्तकाची पंचाहत्तरी साजरी करण्याचा हा उपक्रम एकमेव आणि अनोखा ठरला.
‘Annihilation of Caste’ हे खरं तर लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने आयोजित केलेल्या परिषदेसाठी डॉ. आंबेडकरांनी लिहीलेल भाषण होत. पण या भाषणामधील वेदशास्त्रांविषयीची बाबासाहेबांची मतं आयोजकांना न पटल्यानं त्यांनी ते मुद्दे वगळून भाषण करावं, अशी त्यांना सूचना केली. बाबासाहेबांनी भाषणातला स्वल्पविरामही बदलणार नाही, अशा शब्दांत त्यांची सूचना फेटाळून लावली. परिणामी, पुढं ती परिषद होऊ शकली नाही. परंतु, मोठ्या कष्टानं आणि अभ्यासाअंती तयार केलेलं हे अवघ्या ४४ पानांचं आणि २६ प्रकरणांचं पण अतिशय मुद्देसूद आणि आशयगर्भ मांडणी असलेलं भाषण आंबेडकरांनी पुस्तक रुपानं प्रसिद्ध केलं. वर्षभरात त्याची दुसरी आवृत्ती निघाली आणि आजतागायत त्याच्या असंख्य आवृत्त्या निघाल्या, तरीही मागणी कायम आहे. आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणांच्या संग्रहाला, खंडांना सर्वाधिक मागणी नेहमी असतेच, पण त्यातही त्यांच्या या पुस्तकाला अधिक मागणी असते. ‘Speech prepared but never delivered!’ अशा स्वरुपाच्या या भाषणाची ही लोकप्रियता विस्मयजनकच!
गेल्या ७५ वर्षांत सातत्यानं मागणी वाढतच असलेल्या या पुस्तकात असं काय आहे, आणि आजच्या काळात त्याचं काय महत्त्व आहे, याचा सर्वंकष उहापोह या दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्रात घेण्याचा आयोजकांचा मानस आहे. आणि अगदी उद्घाटन सत्रातच हा मानस अगदी रास्त आणि कालोचित असल्याची प्रचितीच प्रमुख वक्त्यांच्या भाषणांतून आली.
या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहण्यामागं माझे दोन हेतू होते. एक म्हणजे प्रा. गेल ऑम्वेट मॅडम यांची पुस्तकं मी वाचली होती, पण त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कधी आला नव्हता. एक अमेरिकन अभ्यासक भारतात येते काय, इथल्या दलित-उपेक्षितांच्या परिस्थितीचा, चळवळीचा अत्यंत शास्त्रशुद्ध मागोवा घेते काय आणि पुन्हा मायदेशी परत न जाता त्या चळवळींना डोळस कृतीशीलतेनं वाहून घेते काय, हीच मुळात माझ्या दृष्टीनं खूप कुतुहलाची गोष्ट होती. अशा कृतीशील विदुषीचे विचार ऐकणं, ही एक पर्वणीच होती. (सुटी असल्यानं ती साधता आली, हेही खरंच!) दुसरा हेतू म्हणजे प्रा. हरी नरके यांना बऱ्याच काळानंतर ऐकण्याची ही आणखी एक संधी होती. फुले-आंबेडकरी चळवळीचा एक कृतीशील अभ्यासक म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडं आदरानं पाहतो. फुले-आंबेडकरांचे अनेक अज्ञात पैलू अतिशय कौशल्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी प्रकाशझोतात आणले, हे त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे महाराष्ट्राला, नव्हे देशाला! (मराठी भाषेला उद्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर त्यामागेही हरी नरके सरांचा अभ्यास आणि व्यासंग आहे, ही गोष्टही लक्षात घ्यावी लागेल.) हे माझे दोन्ही हेतू यावेळी सफल झाले, हे सांगणे नकोच. पण याठिकाणी या दोन्ही वक्त्यांनी जी मनोगतं व्यक्त केली, ती केवळ तिथपुरती मर्यादित राहावीत, अशी नव्हती. म्हणून म्हटलं जेवढं ताजं ताजं लक्षात आहे, तेवढं आपल्या मित्र-मैत्रिणींशीही शेअर करावं. म्हणून हा लेखन प्रपंच!
तर, या कार्यक्रमात प्रा. गेल ऑम्वेट यांचं बीजभाषण झालं. आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी भारतातील एकूणच जातिनिर्मूलनाच्या चळवळींचा आढावा घेतलाच, पण विशेषतः मुळात जातिप्रथेची सुरवात कशी झाली, त्याचा आढावा घेतला. पाचव्या-सहाव्या शतकात बौद्ध धम्माचा वाढता प्रसार-प्रभाव रोखण्यासाठी ज्या काही हालचाली सुरू झाल्या, त्याचाच जातिप्रथा/वर्णव्यवस्था हा एक अतिशय तीव्रतर भाग असल्याचं त्यांनी सांगितलं. या कुप्रथेचे चटके संपूर्ण समाजव्यवस्थेला सोसावे लागले. त्यातून पुढं संतसंप्रदायानं, भक्तीपरंपरेनं शाब्दिक पातळीवर विरोध दर्शविला. पण तिथं कृतीशीलतेचा फारसा उद्भव झाल्याचं दिसत नाही. जोतीबा फुले यांनी मात्र स्वतःवर आणि सत्यावर विश्वास ठेवा, ही विचारसरणी स्वीकारत सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्यापासून जातिनिर्मूलनाच्या चळवळीला कृतीशीलतेचं खरं परिमाण लाभलं. बाबासाहेबांनी पुढं त्याला आणखी व्यापक स्वरुप प्राप्त करून दिलं. महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहावेळीच त्यांनी आपली ही भूमिका विषद केली. या तळ्याचं पाणी खूप पवित्र आहे, म्हणून आम्हाला ते प्यायचं नसून सर्व मानव एकसमान आहेत, हा समतेचा संदेश आम्हाला त्यातून द्यायचा आहे. अशी समाजबदलाची भूमिका आंबेडकरांनी मांडली होती. बौद्ध धम्माचा स्वीकार करत असतानाही जगाची, समाजाची पुनर्रचना, फेरमांडणी करण्याची उदात्त भूमिकाच त्यांनी स्वीकारली होती. पण आज नेमका त्या हेतूंनाच हरताळ फासण्याचं काम सर्वच पातळ्यांवर आणि दुर्दैवानं फुले-आंबेडकरांच्या अनुयायांकडूनच सुरू आहे. आज त्यांची नावं घेणं ही केवळ औपचारिकता बनली आहे. मी सवलती, अनुदानांच्या विरोधात नाही, पण सवलतींसाठीच त्यांचे नाव घेतले जातेय की काय, अशी शंका येण्याइतकी आजची परिस्थिती गंभीर आहे. परिणामी, कृतीशीलतेच्या पातळीवर मात्र फार मोठी पोकळी निर्माण झाल्याची दिसते, ही आजच्या समाजाची खरी शोकांतिका आहे. अशा शब्दांत गेल ऑम्वेट यांनी खंत व्यक्त केली.
यानंतर बोलताना प्रा. हरी नरके यांनी २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहेच, पण, या दिवशीच डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले तर याच दिवशी पहिला सत्यशोधकी (विना भटजी) विवाह संपन्न झाल्याचे सांगून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. नरके सरांनी ‘Annihilation of Caste’ हा ग्रंथ विलक्षण क्रांतीकारक असल्याचे सुरवातीलाच सांगितले. तसेच, तो लिहीत असताना डॉ. आंबेडकरांच्या तत्कालीन मनोवस्थेचेही विश्लेषण केले. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. हिंदू राहून जातिनिर्मूलन अशक्य आहे,या त्यांच्या बनलेल्या मताच्या पार्श्वभूमीवर सदर भाषणाचा विचार केला जाणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी जातिनिर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह, स्त्री-पुरूष समानता, उपलब्ध संसाधनांचे फेरवाटप, व्यापक शिक्षण-लोकशिक्षण आणि धर्मचिकित्सा (धर्मांतर) या पंचसूत्रीचा पुरस्कार केला होता. त्यांच्या अनुषंगाने प्रा. नरके यांनी आपल्या विचारांची मांडणी केलीच; पण ती करत असताना सन २०१२ मध्ये डॉ. आंबेडकरांनी या भाषणाचे फेरलेखन केले असते, तर त्यामध्ये कोणत्या मुद्यांचा समावेश केला असता, आणि मांडणी कशी केली असती, या दृष्टीकोनातूनही त्यांनी या भाषणाचे कालसुसंगत विश्लेषण केले.
बाबासाहेबांपूर्वी भारतीय जातिव्यवस्थेवर झालेल्या विद्वत्तापूर्ण अभ्यासाचा नरके सरांनी परामर्ष घेतला. या संपूर्ण लेखनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या पुस्तकाचे वेगळेपण सांगताना ते म्हणाले की, जातिव्यवस्था हे केवळ कामाचे वाटप असल्याचे तत्पूर्वीच्या अभ्यासकांचे म्हणणे होते. पण जातिव्यवस्था हे केवळ कामाचे नव्हे, तर काम करणाऱ्यांचे, श्रमिकांचेच वाटप होते, हे आंबेडकरांनी सर्व प्रथम ठासून सांगितले. आणि हे वाटप संपूर्णतः अशास्त्रीय आणि रानटीपणाचे आहे, असही सांगितल. ‘In India, Every Caste is an independent Nation’ असल्याचं आंबेडकर म्हणत. जातीपातींची भावना आपल्या समाजाच्या मनीमानसी इतकी खोलवर रुजली आहे की, आज देशात ४६३५ जाती आहेत. आणि त्यांच्यामध्ये केवळ स्वजातीपुरते पाहण्याची मानसिकता फोफावली आहे. परिणामी, देशात एकूणच सामाजिक अथवा राष्ट्रीय संघटनशक्तीचाच मोठा अभाव निर्माण झाला आहे. संपूर्णपणानं एकही काम आपण उभारू शकत नाही. वर्णव्यवस्थेच्या श्रेणीबद्ध असमानतेमुळं (Graded inequality) आणि वर्णांतर्गत कुठल्याही प्रकारच्या मोबिलिटीच्या अभावामुळं सामाजिक परिवर्तनशीलतेला खीळ बसली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे या व्यवस्थेचे लाभधारक आहेत. शूद्रातिशूद्रांसाठी हे लाभ नाहीत. या उतरंडीतल्या वरच्या घटकाशी लढा उभारताना तात्कालिक लाभासाठी खालच्यांची मोट बांधली जाते. तेवढ्यापुरते ते एक असल्याचा आव आणतात. बहुजन असं गोंडस नावही त्याला दिलं जातं. पण, हेतूसाध्यतेनंतर ही एकी टिकून राहात नाही, समतेची भावना तर नसतेच. त्यामुळं शूद्रातिशूद्रांची दिशाभूल करणारं बहुजन हे एक फार मोठं मिथक आहे. तशी एखादी गोष्ट आस्तित्वातच नाही, अशी परखड भूमिका नरके सरांनी मांडली.
सन २०१२मध्ये या पुस्तकाचे फेरलेखन करताना आंबेडकरांनी १९५२ नंतर देशात सुरू झालेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि कालौघात निर्माण झालेले विविध मार्केट फोर्सेस यांचा निश्चितपणे विचार केला असता, असे त्यांनी सांगितले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेची मेंबरशीप ही जन्माने मिळत असल्यानं हा धर्म कधीही मिशनरी बनू शकत नाही, त्यामुळं त्याच्या विस्ताराला मर्यादा आहेत. जातिव्यवस्थेच्या निकषावर केवळ लोकसंख्यावाढ हाच धर्मविस्ताराचा मार्ग ठरू शकतो. या उलट, जातिव्यवस्थेचा विच्छेद करायचा झाला, तर आंतरजातीय विवाह हाच उत्तम पर्याय! आंतरजातीय विवाहाखेरीज जातिव्यवस्थेला छेद देणे अशक्य आहे, असं बाबासाहेब प्रतिपादन करतात ते त्यामुळंच! पण, सध्या देशात एक कोटी विवाहांपैकी सुमारे 99 टक्के विवाह हे जातिअंतर्गतच होतात. उर्वरित एक टक्का आंतरजातीय होतात. त्यातही उच्च-आंतरजातीय हवा, एससी, एसटी, नवबौद्ध क्षमस्व या 'अपेक्षा' असतात. त्यामुळं प्रत्यक्षात या आंतरजातीय विवाहांचं देशातलं प्रमाण अत्यल्पच आहे. आपले विवाह ही सुद्धा जातिसंमेलनच ठरू लागलेली आहेत. त्यातही आजकाल ऑनर किलींग या गोंडस नावाखाली अशा जोडप्यांना मारण्याच्या प्रकाराचं उदात्तीकरण सुरू आहे, ते तर केवळ निषेधार्ह आहे. साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीला असं तिच्या बापानंच मारुन टाकलं, तर तिच्या आई, आजी मातीलाही गेल्या नाहीत. वर, मारलं, ते बरं झालं!’  असे त्यांचे उद्गार आपली जात्यंधताच स्पष्ट करत नाहीत काय?
आपला पुरोगामी विचारांचा तरुणही विवाहाचा विषय आला की, एकदम पारंपरिक बनून जातो. तेवढ्यापुरता तो आईबापाच्या शब्दाबाहेर जात नाही. आजकालच्या मॅट्रीमॉनियल्स जाहिराती हा तर जातिव्यवस्था बळकट करणाराच प्रकार आहे. (नरके सरांनी अशा जाहिरातींचा एक मोठा संचच सोबत आणलेला होता.) आंतरजातीय विवाहाची जाहिरात तिथं अभावानंच दिसते. दिसली तरी उच्च-आंतरजातीय असं त्यात स्पष्ट म्हटलेलं दिसतं. काही ठिकाणी तर कळस म्हणजे एससी, एसटी, नवबौद्ध क्षमस्व इतकी थेट टीप टाकलेली असते. भारतीय राज्यघटनेच्या सतराव्या कलमाचे हे उघड उघड उल्लंघन आहे. अस्पृश्यतेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा जाहिराती देणे, छापणे आणि वाचणे हा गुन्हा आहे आणि तो आपण घडू देत आहोत. याला काय म्हणावे?
खैरलांजीसारख्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमध्ये कोणावरी ॲट्रॉसिटी लागली नाही की सिद्ध झाली नाही, यासारखे दुर्दैव कोणते? नागपूरमध्ये डवरी-गोसावी समाजाच्या चौघा बहुरुप्यांना केवळ चोर असल्याच्या संशयावरुन लोकांनी दगडांनी ठेचून मारले, ही संवेदनहीनता काय सांगते? बरे, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जे रस्त्यावर उतरतात, तेही त्याच विशिष्ट जाती-जमातीतीलच का असतात? इतर जाती-धर्माचे लोक का त्यांत सामील होत नाहीत? मेलेली ती त्यांना माणसं वाटतच नाहीत का? याला कारण म्हणजे आपल्या संवेदना या जातिगत संवेदना आहेत. जातीबाहेरच्या माणसाविषयी आपल्याला काही वाटण्याचं कारणच नाही. कारण, एक माणूस म्हणून त्याचं मोल वाटण्याऐवजी तो आपल्या जातीचा कुठंय, हीच मानसिकता वरचढ झालेली दिसते.
आजच्या काळात निवडणूक व्यवस्था ही जातिव्यवस्था बळकट करणारी नवी व्यवस्था उदयास आली आहे. आपले राज्यकर्ते या जातिव्यवस्थेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. एका विशिष्ट दहशतवादाच्या आधारावर जातिव्यवस्था बळकट केली गेली आहे. त्यामुळं फॉर्म बदलला तरी जातिव्यवस्थेची मूळ चौकट आजही कायम आहे. जाती पाळणं, हे अनेक वरच्या जातींसाठी फायद्याचं असतं. ती नष्ट होऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. जातिव्यवस्थेला खतपाणी घालून आपली व्होटबँक मजबूत करण्यासाठी या अंतर्गत यंत्रणा प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या जातींची वेगवेगळी संमेलनं, साहित्य संमेलनं भरवणं हा सुद्धा जातीव्यवस्था बळकटीकरणाचाच कार्यक्रम आहे, असं नाइलाजानं म्हणावं लागतं. आणि या प्रयत्नांना राजसत्ता, माध्यमसत्ता आणि अर्थसत्ता खतपाणी घालत आहेत, फोफावण्यास मदत करीत आहेत. अशा प्रयत्नांना समाज बळी पडत आहे, हे अधिक वाईट आहे. समाज परिस्थितीशरण आणि परिवर्तन विरोधी बनत चालल्याचे ते द्योतक आहे.
घटनाकारांनी समता प्रस्थापना आणि शोषित, उपेक्षित, दुबळ्यांना ताकद देण्यासाठी आरक्षणाची कवचकुंडलं निर्माण केली. पण आज त्याचाही विपर्यास चालला आहे. प्रत्येकालाच आज मागासवर्गीय व्हायचं आहे. आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज आपला सत्ताधारी ज्या जातीतून आला आहे, तिथंच, त्याच जातीचं सर्वाधिक शोषण सुरू आहे, ही गोष्ट आपण ध्यानी घेणार आहोत की नाही? उपेक्षित भटक्या-विमुक्त, आदिवासींची आपण दखल घेणार आहोत की नाही?
आज आपल्या चळवळींमध्येही तीन प्रकारचे प्रवाह निर्माण झाले आहेत. पहिला विवेकवादी, मिशनरी वृत्तीच्या लोकांचा प्रवाह. अगदी ध्येयनिष्ठपणे, प्रामाणिकपणे त्यांनी आपापल्या परीनं काम चालवलं आहे. दुसरा आहे माथेफिरुंचा. कुठलाही सारासार विचार न करता अर्धवट माहितीवर, चिथावणीला बळी पडून कुठलीही टोकाची भूमिका घेण्यास तयार असणारा हा प्रवाह चळवळींसाठी खूप मारक आहे. तिसरा प्रवाह आहे पोपटपंची करणाऱ्यांचा! हे असे म्हणाले होते, ते तसे म्हणाले होते, असं सांगत फिरणाऱ्या या व्यक्ती स्वतः काहीच सांगत नाहीत, मात्र स्वतःचं महत्त्व मात्र त्यांनी खूप वाढवलेलं असतं. ब्राह्मण्याला नावं ठेवणाऱ्या या व्यक्ती स्वतःच शब्दप्रामाण्य आणि पोथीनिष्ठ असतात. त्यांचा फॉलोवर मोठा असला तरी तो टिकेलच याची शाश्वती नाही. पण, या प्रवृत्तींनी कृतीशील चळवळी मागं पडतात आणि पोपटपंचीच्या बळावर काही साध्य होऊ शकत नाही. त्यामुळं यांच्यापासूनही दूर राहिलेलंच उत्तम!
या संपूर्ण पार्श्वभूमीवर, ‘Annihilation of Caste’ या पुस्तकाची प्रस्तुतता अजिबात कमी होत नाही, तर ती प्रकर्षानं अधिक असल्याचं जाणवतं. फक्त आजच्या चौकटीमध्ये त्याच विचार केला जाणं अतिशय आवश्यक आहे.अशी रोखठोक भूमिका हरी नरके यांनी या प्रसंगी मांडली.

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

शांतिवन: विदर्भातली चैत्यभूमी





सध्या नागपूरला हिंवाळी अधिवेशन चालू आहे. गेल्या सहा वर्षांत मी प्रथमच या अधिवेशनाला उपस्थित नाहीय. त्यामुळं मित्रांचे, सहकाऱ्यांचे तिथून फोन येतायत आणि गत अधिवेशनांच्या आठवणी माझ्याही मनात येताहेत. या अधिवेशनांदरम्यान सुटीच्या काळात जवळपासच्या ठिकाणांना भेटी देण्याचा सर्वांचाच आवडीचा कार्यक्रम असतो. गेल्या वर्षी अशाच एका अतिशय अविस्मरणीय ठिकाणाला भेट देण्याचा योग मला आणि माझे ज्येष्ठ सहकारी पिटके गुरूजी यांना आला. हा योग जुळवून आणणारे नागपुरातले पत्रकार मित्र रवी गजभिये आणि कार्तिक लोखंडे यांच्याबरोबर उद्योजक संजय पाटील यांना त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो.
शांतिवन हे त्या ठिकाणाचं नाव! संजय पाटील हे त्याचे केअरटेकर!
नागपूरच्या झिरो माइल्सपासून साधारण १७ किलोमीटर अंतरावर चिचोली इथं सुमारे साडेअकरा एकरांचा शांत आणि रम्य परिसर म्हणजे शांतिवन’! भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचं संग्रहालय आणि त्यांचा अस्थिकलश असणारा स्तूप हे या शांतिवनाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दादर (मुंबई) इथल्या चैत्यभूमीनंतर केवळ या शांतिवनातच बाबासाहेबांचा अस्थिकलश आहे. त्या अर्थानं, शांतिवन ही विदर्भातली चैत्यभूमी आहे. म्हणूनच दीक्षाभूमीच्या बरोबरीनंच या ठिकाणाचं मला महत्त्व वाटतं.
स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून या देशामध्ये अलौकिक अशा लोकशाहीची प्रस्थापना करण्यामध्ये मोलाचा सहभाग उचलणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्तृत्व हा माझ्यासाठी सदैव आदर आणि अभिमानाचा विषय आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी ज्या पद्धतीनं आपली संपूर्ण कारकीर्द घडवली, तशा प्रकारे एखाद्याला अनुकूल परिस्थितीतूनही घडविता येईल की नाही, याची शंकाच आहे. बाबासाहेबांना घडविणारे त्यांचे वडील रामजी सुभेदार यांनी चाळीतल्या छोट्याशा खोलीत पहाटे उठवून त्यांना ज्या कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करायला लावला आणि ज्या प्रकाशाच्या जोरावर या महामानवानं कोट्यवधी जनतेच्या मनांत आणि घरांत ज्ञानदीप पेटवण्याचं काम केलं, तो कंदील इथल्या संग्रहामध्ये आहे. तो कंदील पाहताना किंवा इथली प्रत्येक वस्तू पाहताना बाबासाहेबांचा जीवनपट आपल्या नजरेसमोर उभा राहिल्याखेरीज राहात नाही.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दीक्षा सोहळ्याचे सूत्रधार वामनराव गोडबोले आणि बाबासाहेबांचे सेवक तथा खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्याकडील बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय स्थापन करण्याचे ठरविले. त्यांच्या या विचाराला माईसाहेब आंबेडकर यांचंही मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं. सर्वात मोलाचा त्याग आणि मदत जर कोणी केली असेल तर ती श्रीमती गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी! या उच्चवर्णीय कुणबी महिलेनं बाबासाहेबांच्या या स्मारकासाठी आपली साडेअकरा एकर जागा या प्रकल्पासाठी दि. २२ एप्रिल १९५७ रोजी दान दिली.
इतक्या सर्व लोकांच्या अथक परिश्रमातून शांतिवनात साकारलं गेलंय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालय! या संग्रहालयातली प्रत्येक वस्तू ही पाहणाऱ्याला त्यांच्या आस्तित्वाची जाणीव करून देते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूर इथं बाबासाहेबांनी ज्या बुद्धमूर्तीसमोर लीन होऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ती मूर्ती इथं आपल्याला त्या धम्मचक्रप्रवर्तनाची आठवण करून देते. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिलने बाबासाहेबांना प्रदान केलेले मूळ प्रमाणपत्रही इथं आहे. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील भारतीय संविधानाच्या मूळ स्वाक्षांकित प्रती इथं आहेतच शिवाय ग्रिव्हन्सेस ऑफ द शेड्यूल्ड कास्ट, कर्मा इन बुद्धिजम तसंच बुद्ध ॲन्ड हिज धम्म या पुस्तकांच्या मूळ स्वाक्षांकित प्रतीही इथं आहेत. बुद्ध ॲन्ड हिज धम्मपाहताना अंगावर शहारे येतात कारण ६ डिसेंबर १९५६ रोजी अंतिम श्वास घेण्यापूर्वी याच पुस्तकावर त्यांनी अखेरचा हात फिरवला होता. आंबेडकरांनी टाइप केलेले विविध शोधनिबंध इथं आहेतच, शिवाय ज्या टाइपरायटरवर त्यांनी भारतीय संविधान टाइप केले, तो रेमिंग्टन टाइपरायटरही इथं आहे. मजूरमंत्री म्हणून बाबासाहेबांनी कामगार व महिला वर्गाच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांप्रती कृतज्ञता म्हणून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनसह विविध कामगार संघटनांनी बाबासाहेबांना प्रदान केलेली मानपत्रंही इथं आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं आपल्या या विद्वान विद्यार्थ्याच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या विद्वत्तेचा सार्थ गौरव करणारं गौरवपत्र अर्पण केलं, ते गौरवपत्रही इथं पाहायला मिळतं.
बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व हे अतिशय उच्च अभिरुचीसंपन्न अशा प्रकारचं होतं. कला-संगीताची त्यांना उत्तम जाण होती. त्यांच्या आवडीच्या ग्रामोफोनच्या रेकॉर्ड्स त्याची साक्ष देतात. बर्मा, श्रीलंका आदी देशांतून उत्तमोत्तम पेंटिग्ज त्यांनी सोबत आणली. ती चित्रंही इथं आहेत.
वयाच्या ६५व्या वर्षी त्यांना चित्रकलेविषयी इतकी आवड निर्माण झाली की ते त्या वयातही चित्रकला शिकले. तथागत भगवान बुद्धाचं बाबासाहेबांनी तयार केलेलं पेन्सिल स्केच त्याची साक्ष पटवतं. बाबासाहेबांचा हा बुद्ध जगातल्या इतर बुद्धमूर्ती अथवा चित्रांसारखा डोळे मिटलेला नाही; तर, या बुद्धाचे डोळे उघडे आहेत. अशा प्रकारचं हे जगातलं एकमेव चित्र असावं. बुद्धाइतक्या डोळसपणे जगाकडं अन्य कुणी पाहिलं नसावं. त्याला थेट परिमाण देण्याचं काम बुद्धाकडं डोळसपणे पाहणाऱ्या महामानवाच्याच हातून झालं, यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती?
बागकामाची बाबासाहेबांना आवड होती. त्यांनी ज्या कोयत्या-खुरप्याने बागकाम केलं, ते सुद्धा इथं आहेत.
बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड वाचन-लेखन केलं. त्यांच्या विविध प्रकारच्या लेखण्या, शाईचे दौत, टाक, स्टँप, कंपासबॉक्स, पेन्सील सेट, मॅग्नीफाईंग ग्लासेस, टेबलटॉप नेमप्लेट इथं पाहता येते.
टापटीप आणि नीटनेटक्या पोषाखाच्या बाबतीतही बाबासाहेब अतिशय चोखंदळ असल्याचं त्यांच्या छायाचित्रांतून आपल्याला दिसतंच. बाबासाहेबांचा बॅरिस्टरीचा कोट, त्यांचे मेड इन लंडन शर्ट्स, कोट, ओव्हरकोट, टाय, पँट्स यांच्यासह झब्बे, विजारी, सॉक्स, कोटाची बटणे इथं आहेत. विविध प्रकारच्या टोप्याही बाबासाहेब आवडीनं वापरत असत. त्या सर्व टोप्याही इथं आहेत. प्रत्येक टोपी पाहिली की, त्या टोपीसह असलेलं त्यांचं छायाचित्र आपोआपच आपल्या नजरेसमोर तरळतं. बाबासाहेबांनी वापरलेली घड्याळं, त्यांचे वेगवेगळे चष्मे आणि त्यांच्या केसेस, ट्रीमिंग मशीन, अडकित्ता इतकंच नव्हे तर त्यांच्या इंजेक्शनच्या सिरिंज, शेव्हींग ब्रश आणि छत्री सुद्धा या संग्रहात आहे.
बाबासाहेब वाचीत बसत ती खुर्ची आणि पाय ठेवत ते स्टूलही इथं आहे. या स्टुलाशेजारी दुसरा स्टूल टाकून वामनराव बाबासाहेबांच्या पायाशी बसत, तेही स्टूल आहे. बाबासाहेबांच्या घरातला वातीचा स्टोव्हही इथं ठेवण्यात आलाय. त्यांच्या अनेक दुर्मिळ छायाचित्रांसह विविधवृत्त, सिद्धार्थ, रविवासरीय वृत्तांत आदी वृत्तपत्रांतील त्यांच्यासंदर्भातील बातम्यांबरोबरच महापरिनिर्वाणानंतर मराठा वृत्तपत्रांत आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या मृत्युलेखांचे अंकही या संग्रहात पाहता येऊ शकतात.
डॉ. आंबेडकरांचे वस्तू संग्रहालय हे शांतिवनाचे प्रमुख वैभव असले तरी केवळ तेवढेच वैशिष्ट्य नाही, हेही तितकेच खरे आहे. शांतिवनातील बुद्धविहार हा खरोखरीच मनाला शांती मिळवून देईल, असा आहे. प्रशांत, सस्मित बुद्धमूर्तीसमोर एखादा ध्यानाला बसला तर संपूर्ण जगाचं भान हरपून त्याला निश्चितपणे समाधान लाभेल. या विहाराची मोजमापं ही बुद्ध-आंबेडकरांच्या जीवनातील विविध सन आणि आकड्यांवर आधारित आहेत. 
वामनराव अखेरच्या क्षणापर्यंत याच परिसरात निवास करायचे. त्यांची शांतिकुटीही इथं पाह्यला मिळते. शांतिवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी इथं विश्रामगृह आहे. त्याशिवाय, इथं मुद्रणालयाबरोबरच नियोजित धम्म प्रचारक प्रशिक्षण केंद्रासाठीही (बुद्धिस्ट रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) जागा राखून ठेवण्यात आली आहे.
नावाप्रमाणंच शांतता हे शांतिवनाच्या संपूर्ण परिसराचंच वैशिष्ट्य आहे. गर्दी, कोलाहलाची सवय असलेल्या शहरातल्या विशेषतः मुंबईकरांसाठी तर ही शांतता अगदी अंगावर येण्याइतपत तीव्र भासू शकते. आपण शहरात राहून नेमकं काय गमावतो आहे, ते शांतिवनाला एकदा भेट दिल्याखेरीज नक्कीच समजणार नाही.

रविवार, ९ डिसेंबर, २०१२

जागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम


(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली विशेषांक यंदा 'जागतिकीकरण आणि कुटुंबव्यवस्था' या विषयाला वाहिलेला आहे. या वार्षिकामध्ये माझा प्रकाशित झालेला लेख ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे. 
- आलोक जत्राटकर)


जागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्याचा भारतीय कुटुंबव्यवस्थेवर परिणाम हा म्हटला तर दोन स्वतंत्र लेखांचा विषय किंवा एकाच विषयाची दोन अविभाज्य अंगे. जागतिकीकरणाच्या अनुषंगाने जेव्हा आपण खुल्या अर्थव्यवस्थेचा, आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, तेव्हापासूनच खरं तर देशातल्या जवळपास प्रत्येक घटकाला त्यानं आपल्या कवेत घेतलं किंबहुना, जागतिकीकरणाशी फटकून राहणं, ही केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळं, जागतिकीकरणाच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा एकदा त्याचा स्वीकार केल्यानंतर तदअनुषंगानं होणाऱ्या परिणामांना सामोरं जात असताना त्यांवर तोडगा काढण्यातच खरा शहाणपणा आहे, ही गोष्ट सुरवातीलाच मला या ठिकाणी स्पष्ट करावीशी वाटते.
जागतिकीकरणाचा खूप मोठा बाऊ त्याचा स्वीकार केल्यापासूनच केला जातो आहे; पण खरं तर आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी, अधिक चांगल्या, दर्जेदार वस्तू व सेवा मिळविण्यासाठी जेव्हापासून वस्तूविनिमयाच्या पद्धतीचा स्वीकार केला, तीच या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेची सुरवात होती, असं म्हणता येईल. हीच प्रक्रिया जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये प्रस्थापित होणं, हे जागतिकीकरण, असं थोडक्यात म्हणता येईल. गॅट (जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड ॲन्ड टेरिफ) करारानं किंवा डब्ल्यूटीओ (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) च्या स्थापनेनं या प्रक्रियेमधील अडथळे दूर होऊन तिला गती प्राप्त झाली, इतकंच. जागतिकीकरणाच्या स्वीकारामुळं देशांतर्गत समाजजीवन प्रभावित होणं स्वाभाविक होतं, आणि तसं ते झालंही. मात्र, खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्वीकारानंतर गेल्या २०-२२ वर्षांत सांस्कृतिक साम्राज्यवाद आणि अतिरेकी भांडवलशाही वर्चस्ववाद प्रस्थापित करण्याच्या दिशेनं झालेली वाटचाल ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाणारे प्रसारमाध्यमांचे क्षेत्रही जागतिकीकरणाच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवू शकले नाहीत. प्रसारमाध्यमे असा उल्लेख ज्यावेळी आपण करतो, त्यावेळी त्यात चित्रपट, इलेक्ट्रॉनिक, मुद्रित (print) या माध्यमांबरोबरच पारंपरिक (Traditional) माध्यमांबरोबरच इंटरनेटसारख्या नूतन आणि प्रभावी बनत चाललेल्या माध्यमाचाही समावेश गृहित धरला पाहिजे. तरच त्यासंदर्भातली चर्चा सर्वसमावेशक ठरेल. जागतिकीकरणानं या साऱ्या माध्यमांना एकमेकांची दखल घेणं भाग पाडलं. एक आंतरक्रियात्मक स्वरुप या माध्यमांना प्राप्त झालं. पण त्याचवेळी पारंपरिक जनमाध्यमांवर मात्र त्याचा विपरित परिणाम होऊन त्यांच्या आस्तित्वाचा प्रश्न एकीकडं उभा राहिला असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मात्र त्यांचं सादरीकरण वेगळ्या स्वरुपात सुरू झालं. ही बाब चांगली की वाईट हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा असला, तरी तसं झालंय, एवढं खरं.
पारंपरिक माध्यमांची अशी व्यथा असतानाच मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मात्र एकमेकांवर अधिक प्रभाव पडताना दिसू लागला. विशेषतः मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता अधिक वृद्धिंगत झाली. दूरचित्रवाणी वाहिनीवर एखादी बातमी पाहिल्यानंतर तिच्यासंदर्भातील अधिक तपशीलासाठी किंवा शहानिशा करण्यासाठी वृत्तपत्र पाहिली जाऊ लागली. त्याचप्रमाणे एखाद्या वृत्तपत्राच्या विशेष वृत्ताची दखल इलेक्ट्रॉनिक माध्यमांतूनही घेतली जाऊ लागली. प्रसारमाध्यमांमधील हे साहचर्य जसं निर्माण होण्यास सुरवातीच्या काळात मदत झाली, तिलाच आता वाहिन्यांच्या प्रचंड वाढलेल्या संख्येमुळं गळेकापू स्पर्धेचं आणि नितिमूल्यविरहित माहिती प्रसाराचं स्वरुप आलं. माहितीचा प्रस्फोट असं जरी या गोष्टीला संबोधलं गेले असलं तरी माहिती कमी आणि आवाज मोठा असंच तिचं स्वरुप आहे.
जागतिकीकरणाच्या माध्यमांवरील प्रभावाची सुरवातच मुळी दूरदर्शन आणि आकाशवाणी या सरकारी मालकीच्या माध्यमांपासून झाली. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणांना स्वायत्तता प्रदान करण्याच्या दृष्टीनं १९९० साली प्रसारभारती कायदा भारतीय संसदेत एकमतानं मंजूर करण्यात आला. स्वतंत्र ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करून ही दोन्ही माध्यमं त्या मंडळाकडं सोपवणं, असा हा कायदा होता. तथापि, प्रचंड गदारोळ आणि उलटसुलट चर्चेमुळं हा कायदा प्रत्यक्ष आस्तित्वात येण्यासाठी १९९७ साल उजाडावं लागलं. संपूर्णतया सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या या माध्यमांना थोडासा (खरोखरीच थोडासा!) मोकळा श्वास त्यामुळं घेता येऊ शकला आणि त्यांच्या विविधांगी कार्यक्रम निर्मितीचा तसंच विस्ताराचाही मार्ग मोकळा झाला. त्यामुळंच आजही देशातल्या सर्वसामान्य नागरिकांची माध्यमं म्हणून त्यांची ओळख टिकून आहे. आकाशवाणीचा आवाज तर जवळ जवळ शंभर टक्के जनतेपर्यंत पोहोचतो आहे.
सरकारी माध्यमांच्या संदर्भात हालचाली सुरू असतानाच विविध खाजगी केबल व उपग्रह वाहिन्या हळूहळू भारतात पाय पसरू लागल्या. त्यामुळं दूरचित्रवाणी या माध्यमामध्ये क्रांतीकारक स्वरुपाचे बदल होऊ लागले. आज अक्षरशः शेकडो वाहिन्यांचे जाळे भारतभरात पसरले आहे. सन २००३मध्ये भारतीय वृत्तपत्र क्षेत्रात २६ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. त्याचवेळी वृत्तविरहित माध्यमांमध्ये शंभर टक्के, एफएम रेडिओ वाहिन्यांमध्ये २० टक्के, जाहिरात व टीव्ही सॉफ्टवेअर क्षेत्रात सशर्त शंभर टक्के, केबल टीव्हीमध्ये ४९ टक्के तर डायरेक्ट टू होम सेवेमध्ये २० टक्के इतक्या परदेशी गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली. परिणामी, या सर्वच क्षेत्रांचा देशात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. या नंतरच्या काळात देशात ३५० हून अधिक एफएम रेडिओ वाहिन्या सुरू झाल्या, एवढं एकच उदाहरण त्यासाठी पुरेसं ठरेल.
या काळात जनमानसावर सर्वाधिक वर्चस्व जर कुठल्या माध्यमानं प्रस्थापित केलं असेल, तर ते दूरचित्रवाणीनं. किंबहुना, दूरचित्रवाणीच्या या तीव्र स्पर्धेमुळं चित्रपट क्षेत्राला आपलं आस्तित्व टिकविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव उपक्रमांचा स्वीकार व आविष्कार करून प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागले. पायरसीविरोधात आंदोलन उभं करावं लागलं. या नव्या प्रवाहाशी जुळवून न घेता आल्यामुळं कित्येक चित्रपटगृहांना टाळंही ठोकावं लागलं तर टुरिंग टॉकीजसारखं ग्रामीण भागातलं मनोरंजनाचं साधनही लोप पावलं.
 केवळ दूरदर्शन पाहण्याच्या काळात जे काही कार्यक्रम, मालिका सादर केल्या जात होत्या, त्यांचं निर्मितीमूल्य कदाचित साधारण स्वरुपाचं असेल, तथापि, त्यामागचे हेतू मात्र मूल्यवान होते. त्यांच्या निर्मितीमध्ये आत्मा होता, (त्यात निर्मितीमूल्यापेक्षा नीतिमूल्यांना अधिक स्थान होते.) म्हणूनच आजही केवळ त्या कार्यक्रमांची नावंच नव्हे, तर त्यांच्या कथावस्तू त्यांच्या पात्रांसह नजरेसमोर उभ्या राहतात. त्यांचं संग्राह्यमूल्य आजही अबाधित आहे. आज काळाच्या ओघात शेकडो वाहिन्या निर्माण झाल्या आहेत, त्यांवरुन हजारो कार्यक्रम सादर होतात, पण नेमका त्यातला आत्माच हरवल्यामुळं त्या अल्पायुषी ठरतात, स्मृतीशेष होतात.
 सादरीकरणाच्या बाबतीत पुढं बोलूच, पण माध्यमांवर जागतिकीकरणाचा एक सर्वात मोठा परिणाम जो झाला आहे, तो म्हणजे देशातल्या माध्यमांच्या मालकीतलं वैविध्य कमी होत चाललं आहे. हैदराबादच्या अडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया या संस्थेनं केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासाठी भारतीय प्रसारमाध्यमांवरील मालकीसंदर्भात सादर केलेल्या अहवालामध्ये उपरोक्त निरीक्षण नोंदवण्यात आलंय. राष्ट्रीय स्तरावरील हिंदी व इंग्रजी माध्यमांपेक्षा प्रादेशिक स्तरावरील माध्यमांच्या बाजारपेठेवर मोजक्याच मालकांचं वर्चस्व वेगानं वाढत चालल्याचं निरीक्षणही त्यात नोंद आहे. या मालकीचं स्वरुप एकमाध्यमी न राहाता बहुमाध्यमी होत चाललं असून अन्य उद्योगांमधील प्रस्थापित कंपन्याही या क्षेत्रामध्ये येण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. तस पाहायला गेलं, तर बहुमाध्यमी विस्तार ही प्रसारमाध्यमांच्या आस्तित्वासाठी आवश्यक असलेली आर्थिक गणितं जुळवण्यासाठीची ही एक अपरिहार्यता आहे. त्यातून प्रस्थापित माध्यमं अधिक प्रस्थापित होत जातात आणि इतरांचा या क्षेत्रातला प्रवेश अधिक अवघड होत जातो. किंवा प्रवेश झालाच तर टिकाव लागणं जिकीरीचं असतं. त्यामुळं आज देशात माध्यमांची संख्या प्रचंड दिसत असली तरी विस्तार, आर्थिक स्थैर्य आणि प्रभाव या निकषांवर विचार केला असता भारतीय माध्यम बाजारपेठेवर साधारण पस्तीस-चाळीस माध्यम समूहांचंच वर्चस्व असल्याचं दिसून येईल. स्टार, झी, टाइम्स, भास्कर, सन, इनाडू, इंडिया टुडे, लिव्हिंग मिडिया, टीव्ही-१८ नेटवर्क, आनंद बझार पत्रिका, सकाळ, मल्याळम मनोरमा अशी काही नावं वानगीदाखल देता येऊ शकतील.
 अन्य प्रस्थापित कंपन्याही आता माध्यम क्षेत्रात गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात रस घेत आहेत. कारण सध्या मिडिया सेक्टर हे गुंतवणुकीसाठी अतिशय हॉट सेक्टर असल्याचं मानलं जाऊ लागलं आहे. प्राइसवॉटरहाऊस-कूपरच्या अहवालानुसार, गतवर्षी या क्षेत्राचा बीएसई निर्देशांक सुमारे ४४ टक्क्यांनी वधारला. वृत्तपत्रं आणि दूरचित्रवाहिन्यांतील जाहिरांतींमधून मिळणाऱ्या महसूलवृद्धीत २० टक्के तर रेडिओ आणि इंटरनेटमधून ५० टक्के इतकी प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय दूरचित्रवाणी वार्षिक २४ टक्के इतक्या विक्रमी दरानं वृद्धिंगत होण्याचे अंदाज असतानाच डीटीएच आणि आयपीटीव्ही सेवांमुळं त्या वृद्धीला हातभारच लागणार असल्याचं चित्र आहे. इंटरनेट जाहिरातीची आजची भारतीय बाजारपेठच १०० कोटींच्या घरात आहे. यावरुन हे क्षेत्रही किती वाढणार आहे, याचा अंदाज येऊ शकेल. या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजची नेटवर्क-१८ व ईनाडूमधील गुंतवणूक अथवा बिर्ला समूहाची लिव्हिंग मिडिया (आजतक, हेडलाइन्स टुडे)मधील गुंतवणूक लक्षात घेता यामागील आर्थिक गणिताचा अंदाज येऊ शकेल.
 अशा पद्धतीनं पूर्णतः कमर्शियलायझेशनच्या मार्गाने निघालेल्या दूरचित्रवाणी या माध्यमाच्या बदलत्या स्वरुपाचा परिणाम भारतीय समाजजीवनावर पर्यायानं इथल्या कुटुंबव्यवस्थेवर निश्चितपणे होतो आहे. माहिती देणं, मार्गदर्शन/ प्रबोधन करणं, मतप्रदर्शन करणं/ जनमत घडवणं आणि मनोरंजन करणं अशी प्रमुख चार कार्ये जनमाध्यमांची म्हणून सांगितली जातात. तथापि, यातलं केवळ शेवटचंच (म्हणजे मनोरंजन) जणू आपलं काम, कर्तव्य आणि जबाबदारी आहे, अशा थाटात सध्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्या वावरताना दिसत आहेत. निखळ करमणुकीच्या नावाखाली ज्या कार्यक्रमांचा रतीब इथं दररोज घातला जातोय, तो पाहिला की त्यांच्यापासून होणाऱ्या परिणामांची कल्पना केली तरी सुद्धा चिंताजनक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
आज दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांचे अनेक प्रकार विकसित झाले आहेत. 24x7 वृत्तवाहिन्या, केवळ मनोरंनाला वाहिलेल्या वाहिन्या (यातल्या कित्येक, नव्हे बहुतेक स्वतःला कौटुंबिक म्हणवतात!), कार्टून, इन्फोटेनमेंट, संगीतविषयक व क्रीडाविषयक (तरुणवर्गात पॉप्युलर) असे काही ढोबळ मानानं सांगता येतील. यातल्या वृत्तवाहिन्या हा खरं तर सर्वाधिक जबाबदार घटक असायला हवा, किंबहुना तो आहेच. पण प्रत्यक्षात 24 तास बातम्यांचा रतीब घालून त्यांना आपली वाहिनी चालवायची असल्यानं आणि त्यातही जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यायचं असल्यानं मिळेल ती बातमी, असेल त्या स्वरुपात 'ब्रेकिंग न्यूज'च्या नावाखाली दर्शकांच्या तोंडावर फेकण्यासाठी त्यांच्यात अहमहमिका लागलेली असते. फार पूर्वी दूरदर्शनवर ब्रेकिंग न्यूजझळकली की तिचं गांभिर्य आणि महत्त्वही दर्शकांच्या लक्षात यायचं. अलीकडं टीव्ही स्क्रीनवर पळणाऱ्या दोन चार पट्ट्यांपैकी एक कायमस्वरुपी ब्रेकिंग न्यूजची असते. त्यामुळं त्याचं काय कपाळाचं गांभीर्य राहणार? आपल्या अतिउत्साही वृत्तवाहिन्यांना जबाबदारीची खरी जाणीव झाली ती 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस. (नव्हे हल्ल्याच्या थेट प्रक्षेपणाच्या दुष्परिणामानंतर!) त्यांच्या राऊंड द क्लॉक, रिअल टाइम रिपोर्टिंग आणि कव्हरेजमुळं पाकिस्तानात बसलेल्या हल्ल्याच्या रिमोट कंट्रोलर्सना बाहेरची सगळी माहिती विनासायास मिळत होती आणि ते कसाब आदी दहशतवाद्यांना सॅटेलाइट फोनवरुन पुढच्या सूचना देत होते. ही गोष्ट नेत्यांच्या आणि मीडियाच्या लक्षात आली, त्यावेळी खूप वेळ निघून गेला होता. अन्यथा, परिस्थितीवर खूप आधीच नियंत्रण मिळवता आलं असतं. पण, यातून एक गोष्ट झाली ती म्हणजे भारतीय मीडियामध्ये सेल्फ रेग्युलेशनच्या प्रक्रियेला सुरवात झाली, पण अद्याप ती बाल्यावस्थेत आहे. भारतासारख्या सव्वाशे कोटींच्या देशात माध्यमांना खूप मोठी जबाबदारी पार पाडायची असल्यानं या संदर्भात त्यांना खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. पण त्यासाठी पुढाकार घेणार कोण? हा प्रश्न वासून उभा आहे.
 वृत्तवाहिन्यांमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेली आणखी एक मोठी खोड किंवा जाणीवपूर्वक त्या करत असलेला प्रयत्न तो म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणल्याचा आभास निर्माण करत आपली मतं प्रेक्षकांवर लादण्याचा! प्रेक्षक निर्बुद्ध नाहीत. ते सुजाण आहेत, याकडे वृत्तवाहिन्या सोयीस्कर दुर्लक्ष करतात आणि आपली मतं त्यांच्यावर लादून राज्यकर्त्यांवर दबावतंत्राचा अवलंब करून आपले अंतस्थ हेतू साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला दिसतो. हे लक्षात आल्यामुळंच की काय, या वृत्तवाहिन्यांची विश्वासार्हता धोक्यात येताना दिसत्येय. त्याचवेळी केवळ दूरदर्शनच्या सातच्या, साडेआठच्या किंवा साडेनऊच्या बातम्या पाहून आपली माहितीची गरज भागविणारा एक वर्गही पुन्हा नव्यानं तयार होताना दिसतो आहे. विशेषतः कुटुंबातल्या कर्त्या पुरूषवर्गाचा कल असा बदलताना दिसतो आहे.
वृत्तवाहिन्यांमधून त्यांच्या दर्शकांचाच नव्हे, तर मालकांचाही रस कसा कमी होत चालला आहे, आणि मनोरंजन वाहिन्यांमध्ये असलेल्या अमाप पैशानं त्यांचं लक्ष वेधून घेतल्याचं अलिकडच्या काळातलं अगदी महत्त्वाचं उदाहरण म्हणजे स्टार समूहानं आनंद बझार पत्रिकेतून काढून घेतलेली भागीदारी. यामुळं स्टारच्या वृत्तवाहिन्यांची नावं एबीपी माझा, एबीपी न्यूज अशी झाली. यातून भविष्यातील आव्हानं आणि धोक्यांची जाणीव या क्षेत्रातील अन्य वाहिन्यांना झाली तरी पुष्कळ!
 नोकरी, स्पर्धा आणि करिअर आदी गोष्टींच्या मागं लागण्याचे दिवस असल्यानं आपल्या एकत्र कुटुंबांचं रुपांतर कधीच विभक्त कुटुंबामध्ये झालेलं आहे. यामुळं घरातल्या कर्त्या किंवा ज्येष्ठ व्यक्तीच्या हातातला रिमोट कंट्रोल बहुतांशी घरातल्या स्त्रीकडं आलेला दिसतो आणि टीव्हीचा रिमोट कंट्रोल तर घरातल्या छोट्यांच्या हातात. खास महिला प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून ज्या मालिका (महिला निर्मात्यांकडूनच!) तयार केल्या जाताहेत, त्या पाहता या भारतवर्षात प्रत्येक कुटुंबात केवळ एक महिला सहनशील आणि बाकीच्या सगळ्या पाताळयंत्री, धूर्त आणि कपटी असल्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि अशा मालिका दैनंदिन पाहणाऱ्या महिलावर्गाची संख्या प्रचंड आहे. संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ कुणाची बिशाद आहे का, त्या महिलांना टीव्हीपुढून उठ म्हणण्याची? (मग या वेळेमध्ये घरातला कर्ता पुरूष कुठेतरी अन्यत्र जाऊन "बसला", तर त्याला ती गृहिणी कारणीभूत आहे, असं मी म्हटलं तर चुकीचं ठरेल काय? गंमतीचा भाग सोडा, पण असंही कुठे होत असेलच की!) या मालिकांमध्ये या महिलांची इतकी भावनिक गुंतवणूक होण्याचं कारण काय, असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा कौटुंबिक पातळीवर कदाचित तिच्या होणाऱ्या घुसमटीला वाचा फोडत असेल (सत्तरच्या दशकातल्या अँग्री यंग मॅनप्रमाणं!). पण तिची अभिव्यक्तता इतकी विकृत आणि क्रूरपणाची असेल का?, असाही दुसरा प्रश्न मनात उभा राहतो. स्वतःला ती कोणत्या व्यक्तिरेखेमध्ये पाहात असेल, दुष्ट की सुष्ट! सुष्ट बाजूने तिचा कल असेल तर ती व्यक्तिरेखा आता बदला कशा पद्धतीनं घेते, हे पाहण्यात तिला रस असेल की सहनशील राहून इतरांमध्ये ती चांगला बदल कसा घडवते, हे पाहण्यात! मालिकेमधलं घर विस्कटतंय याची हळहळ तिच्या मनाला लागून राहते, पण आपल्या पायाखाली तेच जळतंय, याचं भानही सुटत चाललंय, याला काय म्हणावं?
 तरुण वर्गासाठीच्या वाहिन्यांवरच्या रिॲलिटी शोजनी तर अगदी हद्द केलीय. प्रेम म्हणजे फिजिकल इंटिमसी आणि प्रेमभंग म्हणजे पार्टनरची बेवफाई, इतका सरधोपट शारीरवादी दृष्टीकोन रुजवण्याला खतपाणी घालण्याचं काम या मालिका करताहेत. मेट्रो सिटीतला तरुण कदाचित ते स्वीकारेलही, पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यालाही, हे म्हणजेच प्रेम, असं वाटू लागलं असेल, तर याला जबाबदार कोण?
 घरातला टीनएजर हा सुद्धा या वृत्तवाहिन्यांचा आणखी एक टार्गेट ग्रुप! याच्यासाठीचे रिॲलिटी शोज म्हणजे डान्स आणि गाणंच फक्त जणू! जगात इतर 62 कला अद्याप आस्तित्वात आहेत याचं भानच हे कार्यक्रम त्या टीन्सना आणि त्यांच्या आईबापाला होऊ देत नाहीत. फक्त नाचगाणं या दोन गोष्टी येणं म्हणजे टॅलंट, असाही एक (गैर)समज जनमानसात रुजवण्यामध्ये या कार्यक्रमांचा मोठा हात आहे. त्यामुळं जे अशा कार्यक्रमांपर्यंत पोहोचतात, ते टॅलंटवाले ठरतात, जे पोहोचू शकत नाहीत, ते (त्यांच्या आईबापासह) मोठ्या न्यूनगंडानं पछाडले जातात आणि या मोहमयी वातावरणाच्या मागं पुनःपुन्हा धावत राहतात, निराश होतात. या गोष्टीतून मला जी भिती भेडसावते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टींत कुठंही सहभागी होत नसणारे, पण टीव्हीसमोर बसून अगदी सहजगत्या त्यांच्या भावविश्वाचा भाग बनून जाणारे प्रेक्षक टीन्स! देशाची ही प्रचंड अशी पोटॅन्शियल असलेली भावी पिढी एका फार मोठ्या 'पॅसिव्ह मोड'मध्येच राहणार की काय? केवळ समोर जे चाललंय, ते पाहात राहणं आणि तेवढ्यापुरतं रिॲक्ट होणं, यातून भारताची भावी पिढी कितपत कृतीशील आणि निर्णयक्षम राहील, असाही एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो.
 घरातल्या स्त्रीखालोखाल (जेव्हा ती स्वयंपाकघरात असते तेव्हा) टीव्हीचा रिमोट जर कुणाच्या हातात असेल तर ती म्हणजे घरातली बच्चे-कंपनी! पूर्वी कसं फक्त शनिवारी आणि रविवारी अर्धा, अर्धा तास मिकी-डोनाल्ड, स्पायडरमॅन नाही तर हि-मॅन असायचं! तेवढं पाहिलं की आठवडाभर पुन्हा कार्टून नाही. आता 24x7 चालणारे कार्टून चॅनल्स आहेत. भरपूर क्रिएटीव्हही आहेत, पण त्यात निरागसता किती राहिली आहे, हा कळीचा मुद्दा आहे. ही कार्टून चॅनल्सच त्या बालकाचं बाल्य हिरावून घेऊन त्याला अकाली प्रौढ बनण्यास भाग पाडताहेत की काय, असा प्रश्न, त्यातले संवाद ऐकले की पडतो. या कार्टून्सच्या प्रभावातून वेळीच या पिढीला बाहेर पडता आलं नाही तर फार मोठ्या भावनिक घोटाळ्यात ती सापडण्याची शक्यता संभवते. सारं जग हे असंच प्रतिक्रियात्मक आहे, असा त्यांचा समज दृढ होऊन ही मुलं पुढं 'सॅडिझम'ची बळी ठरून सॅडिस्ट बनतील की काय, अशी साधार भितीही मला वाटते.
 माध्यमांच्या जाहिरातदारांनी तर त्यांचे टार्गेट ग्रुप अत्यंत विचारपूर्वक फिक्स केले आहेत. युवक, महिला आणि लहान बालकं यांना डोळ्यासमोर ठेवून जाहिरातींची इतक्या पद्धतशीरपणे निर्मिती केली जाते की त्याला हा वर्ग बळी पडलाच पाहिजे. मला सांगा, मोठ्या मोटारीच्या किंवा बाइकच्या जाहिरातीत लहान मुलगा कशाला हवा? पण तो असतो. आणि आपल्या बाबाला ती मोटार किंवा बाईक घेण्यास फशी पाडतो. याचा परिणाम आपल्या घरातल्या मुलावर होतो. हा प्रयोग तो आपल्या बाबावर करून बघायला पाहतो. बनियनच्या जाहिरातीत स्त्री मॉडेल कशाला हवी? पण तीही असते. जेव्हा आपला तरुण बनियन घ्यायला दुकानात जातो, तेव्हा पहिल्यांदा तोच ब्रँड विचारायला विसरणार नाही, याची दक्षता जाहिरातदारानं घेतलेली असते. आजच्या पगारदार वर्गाला भविष्याची तरतूद म्हणून पेन्शनीनंतरचे आयुष्य आरामात घालवण्यासाठी फलाणा योजनेत पैसा गुंतवण्याचा "आपुलकीचा" सल्ला द्यायलाही हा जाहिरातदार विसरत नाही.
 एकूणच काय, सनसनाटीपणा निर्माण करून, पाश्चात्यांचं अंधानुकरण करून आणि गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करायला भाग पाडून आपली प्रसारमाध्यमं आपल्याच नागरिकांना चंगळवादाच्या दिशेनं खेचून घेऊन चालली आहेत. हा दर्शक हा त्यांच्या दृष्टीनं दर्शक राहिलेलाच नाहीय मुळी, तो आहे फक्त एक ग्राहक. इथं आपली खरेदी करण्याची क्षमता नव्हे, तर खर्च करण्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करणारी आणि त्याला हातभार लावणारी एक मोठी यंत्रणा कार्यरत झालेली आहे. शंभर कोटी लोकसंख्येचा भारत हा नजीकच्या काळात दहा हजार कोटींची ग्राहकपेठ होण्याच्या मार्गावर आहे, तो याच यंत्रणेच्या बळावर. या ग्राहकाला अत्यंत गोडीगुलाबीनं, त्याच्याही नकळत लुटण्याचं काम कधीच सुरू झालंय. पाहा, एखाद्या मॉलमध्ये आपण गेलो की आपल्या गरजेच्या नसलेल्या किमान दुप्पट किंमतीच्या वस्तू घेऊन घरी आलेलो असतो, पुन्हा डिस्काऊंट मिळाला म्हणून वर आनंदातही! भारतामध्ये या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये उच्च-मध्यमवर्ग अशा गोंडस नावाचा एक वर्ग निर्माण झाला आहे. तो स्वतःला मध्यमवर्गीय मानत नाही, तर उच्च वर्गीय त्याला आपल्यातला मानत नाहीत. पण त्याची धडपड ही उच्चवर्गात शिरण्याची आहे. या व्यवस्थेमध्ये मध्यमवर्गाची मोठी गोची होते आहे. त्यालाही वर सरकायचंय, पण फार मोठ्या वैचारिक आणि सांस्कृतिक कोलाहलामध्ये, गोंधळामध्ये त्याचा जीव गुदमरतोय. पण चंगळवादाला जोरदारपणे खतपाणी घालणाऱ्या भांडवलशाही व्यवस्थेचं पोषण अशाच प्रकारे आपल्या देशात होत राहिलं तर या देशात 'आहे रे' आणि 'नाही रे' असे दोनच वर्ग शिल्लक राहतील. मध्यमवर्गाचा नामोनिशाण राहणार नाही. याला केवळ माध्यमंच जबाबदार आहेत, असं अजिबात म्हणायचं नाही, पण त्याला त्यांचा हातभार आहेच, हे कसं नाकारता येईल?
इतकं सारं मी नकारात्मकच का लिहितोय, की मी जागतिकीकरणाचा, माध्यमांचा विरोधक आहे, असा प्रश्न वाचकांना पडण्याची शक्यता आहे. पण जागतिकीकरणाचा स्वीकार करून आपल्याला पुढं जायचंय, हे मी सुरवातीलाच स्पष्ट केलं आहे आणि माध्यमांच्या मी विरोधात नाही, कारण मी माध्यमांशी संबंधित एक जबाबदार घटक आहे. पण, त्यातल्या त्रुटी जाणवून देऊन आपली व्यवस्था अधिक सक्षम राहण्यासाठी प्रयत्न करणं, हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे. तेच बजावण्याचा मी प्रयत्न करतो आहे, इतकंच!
 आपली कुटुंबव्यवस्था ही एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्ततेकडं आणि तिथूनही पुढं एका आत्मप्रेमी, आत्मकेंद्रित टप्प्यावर येऊन उभी राहिली आहे. (त्यांचं आत्मभान मात्र हरपत चाललंय!) या जास्तीत जास्त चौघांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला स्वतःची 'स्पेस' हवी आहे. या भावनेचा आदर राखूनही ही कुटुंबव्यवस्था जपता येऊ शकते. पण प्रसारमाध्यमं त्या स्पेसवर अतिक्रमण करत आहेत. कुटुंबांतर्गत सुसंवादाचा अभाव हा एका नव्या विसंवादाला जन्म देतो आहे. त्यातून या कुटुंबव्यवस्थेचे धागे आणखीच विसविशित होण्याचा धोका संभवतो आहे. पण तसं होऊ न देणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे कारण रिमोट कंट्रोल तर आपल्याच हातात आहे. जीवनाच्या कुठल्या चॅनलचा आनंद लुटायचा, समाधानाचा ब्राइटनेस किती वाढवायचा, खर्चाचा कॉन्ट्रास्ट किती कमी करायचा, सुसंवादाचा व्हॉल्युम किती वाढवायचा, विसंवादाचा व्हॉल्युम किती कमी करायचा आणि टीव्ही कधी स्वीच ऑफ करायचा. सगळंच तर आपल्या हातात आहे. ‘प्रसारमाध्यमं आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही, एवढी मूलभूत जाणीव कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात आपण निर्माण करू शकलो, तरी खूप काही साध्य केल्यासारखं आहे. करा तर मग लाइफचा स्वीच ऑन आणि करा घरातल्या प्रत्येकाला रिचार्ज! आणि पाहा, जगातल्या कुठल्याही यंत्रणेत आपलं भारतीय कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य अजिबात असणार नाहीय.