रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद, तिचा शतकमहोत्सव आणि त्या निमित्तानं आलेली पुस्तकं...


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने माणगाव येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृतांच्या पहिल्या परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व उदयास आले. भारताच्या सामाजिक इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या घटनेला शंभर वर्षे यंदा पूर्ण झाली. या शतक महोत्सवावर कोरोनाचे सावट पडल्याने त्याच्या उत्सवीकरणावर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उत्साहाला मर्यादा पडल्या असल्या तरी डॉक्युमेंटेशनच्या अंगाने या वर्षभरात काही महत्त्वाचे कार्य झाले आहे. परिषदेला साठ वर्षे झाली, त्यावेळी म्हणजे सन १९८२मध्ये विशेष स्मरणिका काढण्यात आली, मात्र तिच्या मर्यादा आता पाहताना लक्षात येतात. त्या तुलनेत संपादक सन्मित्र अर्जुन देसाई, प्रा. गिरीष मोरे आदींनी माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने हाती घेतलेला तथ्यसंकलनाचा आणि इतिहासाचा वर्तमानाच्या अनुषंगाने वेध घेण्याचा प्रयत्न असणारा स्मारकग्रंथ हा अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. हे संपादनाचे काम प्रा. मोरे सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फार जीव लावून केले आहे. तो ग्रंथ पाहण्याची उत्सुकता खूप आहे.

दरम्यानच्या काळात या वर्षभरात काही महत्त्वाची पुस्तके माणगाव परिषदेच्या संदर्भाने वाचकांच्या भेटीला आलेली आहेत, त्यांची दखल घेणे आवश्यक वाटते. या मालिकेतील सर्वाधिक वेधक पुस्तक ठरले आहे, ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार-संपादक आयु. उत्तम कांबळे यांचे अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद होय. लोकवाङ्मय गृहाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात कांबळे सरांनी १८२० ते १९२० या शंभर वर्षांतील माणगाव परिषदेच्या पूर्वपिठिकेचा समग्र वेध घेतला आहे. कोणतीही क्रांतीकारी घटना किंवा एखाद्या क्रांतीकारकाचा, महापुरूषाचा जन्म ही काही आकस्मिक गोष्ट नसते, तर ते तत्कालीन समाजाचं, परिस्थितीचं अपत्य असतं. अशा घटनांच्या प्रसववेदना अनेक दिवस सुरू असतात. माणगाव परिषदेच्या जन्मकळाही शंभर वर्षं अगोदर अस्वस्थ शतकाच्या पोटात सुरू होत्या. बाबासाहेब काय, महाराज काय किंवा त्यांचे महागुरू महात्मा फुले काय, ही सारी त्या अस्वस्थ शतकाची, परिस्थितीची बंडखोर लेकरं आहेत. वैश्विक हालचालींशी त्यांनी नातं जोडलेलं आहे किंवा ते ओघानंच तयार झालेलं आहे. माणगाव परिषदेच्या शंभर वर्षं आधी म्हणजे १८२० म्हणजेच एकोणिसाव्या शतकापासून जग अधिक अस्वस्थ झालेलं आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ही अस्वस्थता दिसते. जगभर तिचे पडसाद उमटले. मानवमुक्ती, धर्मसुधारणा, समाज सुधारणा या क्षेत्रात तर या अस्वस्थतेची धग जास्तच पसरत होती. माणगाव परिषद हा त्या जगभरच्या अस्वस्थतेचा एक परिपाक आहे. पुढं येणाऱ्या भावी चळवळीसाठी, लढायांसाठी एक विषयपत्रिका आहे. आम्ही येतोय, आम्ही जागे होतोय, आम्ही लढतोय, असं निर्धारपूर्वक सांगणं आहे. व्यवस्थेला इशारा आणि हादरा आहे. धगधगते क्रांतीकारी विचार मुठीत घेऊन मुक्तीच्या प्रवासाकडे पाऊल टाकणं आहे. विचारांच्या जोरावर घडवून आणलेलं एक नवं युग होतं. आपण त्यास फुले, शाहू, आंबेडकरांचे युग म्हणतो. या पार्श्वभूमीवर झालेली माणगाव परिषद म्हणजे केवळ बहिष्कृतांचे एकत्रित येणं अगर शक्तीप्रदर्शन नव्हतं, तर तो एका मोठ्या परिवर्तनाचा प्रारंभ होता. या समग्र परिवर्तनाचा कॅनव्हास उत्तम कांबळे सरांनी या सुमारे २५० पानांच्या पुस्तकामध्ये चितारला आहे. मूलतत्त्ववाद हातपाय पसरत असल्याच्या काळात, प्रतिक्रांती उचल खात असल्याच्या काळात लिहीलेल्या या ग्रंथाद्वारे ज्यांच्या डोळ्यांवर जातींचे, गटांचे मोतीबिंदू वाढत आहेत, ते हलावेत, ही अपेक्षा कांबळे सरांनी व्यक्त केली आहे. माणगाव परिषद हा केवळ एक इव्हेंट नव्हता, तर शंभर वर्षांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि एका नव्या परिवर्तन पर्वाची सुरवात होती. हा सारा गाभा समजून घेण्यासाठी अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद वाचणे अगत्याचे ठरते.

मालिकेतील दुसरे पुस्तक म्हणजे डॉ. संभाजी बिरांजे संपादित छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र पत्रव्यवहार हे होय. मुंबईच्या राजरत्न ठोसर यांच्या विनिमय पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या अत्यंत मनोवेधक पुस्तकाची पहिली आवृत्ती अल्पावधीत संपली असून लवकरच याची दुसरी आवृत्ती वाचकांच्या भेटीसाठी येत आहे, यावरुनच या पुस्तकाने वाचकांना किती प्रभावित केले आहे, ते लक्षात येते. या पुस्तकाच्या आधी ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, सन्मित्र इंद्रजीत सावंत यांनी शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्या दरम्यानचा काही पत्रव्यवहार प्रकाशित केला. शाहूंचे समग्र वाङ्मय, गौरव ग्रंथ आणि पंचखंडात्मक चरित्र आदींमध्ये ती प्रकाशितही झाली आहेत. त्यापुढे जाऊन चिकित्सक संशोधकीय दृष्टीने डॉ. बिरांजे यांनी या संग्रहावर काम केले आहे. ज्येष्ठ आंबेडकरी अभ्यासक डॉ. विजय सुरवाडे यांच्या अत्यंत चिकित्सक नजरेखालून हे पुस्तक गेले आहेच, शिवाय, त्यांच्या व्यक्तीगत संग्रहातील आठ-नऊ पत्रे त्यांनी स्वतःहून यात समाविष्ट केली, ही मोठीच उपलब्धी आहे. महाराज आणि बाबासाहेब यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहवासाचा कालावधी अवघा अडीच ते तीन वर्षांइतका. मात्र, इतक्या अल्पावधीत सुद्धा त्यांच्यामध्ये जे सामाजिक सहोदराचे नातेसंबंध प्रस्थापित झाले, त्याने या देशाचा अवघा सामाजिक इतिहासाचा अवकाश व्यापला आहे. त्यांच्या पत्रव्यवहारामधून सामाजिक-राजकीय डिप्लोमसीचे, मैत्रीचे, एकमेकांप्रती आदरभावाचे, स्नेहाचे जे मनोज्ञ दर्शन घडते, ते अत्यंत अल्हाददायक आहे. या पत्रव्यवहाराव्यतिरिक्तही महाराज आणि बाबासाहेबांच्या तत्कालीन पूरक अशा अन्य पत्रव्यवहाराचाही यात परिशिष्टाद्वारे समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याची पार्श्वभूमी व पृष्ठभूमी यांचेही ज्ञान वाचकाला होते. त्याशिवाय, डॉ. बिरांजे यांनी संशोधक-अभ्यासकांसाठी अनेक संदर्भांची माहिती दिलेली आहे, ती वेगळीच. अत्यंत उत्तम संदर्भमूल्य असलेला हा समग्र पत्रव्यवहार वाचनीय, रंजक तर आहेच, पण त्याचे संग्रह्यमूल्यही वादातीत आहे.

तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते असलेले सन्मित्र सिद्धार्थ कांबळे यांची माणगाव परिषदेची शंभरी आणि आजचं सामाजिक वास्तव ही छोटेखानी पुस्तिका इतिहासाच्या खिडकीतून वर्तमानाचा वेध घेणारी आहे. वर्तमान सामाजिक परिस्थितीचे सजग भान देण्याचा प्रयत्न त्यात डोकावतो. ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांची प्रस्तावना लाभल्याने या पुस्तिकेचे मूल्य अधिकच वाढले आहे. जात्यंध व धर्मांध प्रवृत्तीचे वाढते प्राबल्य, समाजमानसातील वाढते अस्मिताकरण, ध्रुवीकरण आणि त्यातून समाजातील विविध घटकांमध्ये जाणीवपूर्वक दरी वाढविण्याचे सुरू असणारे प्रयत्न हाणून पाडण्याची गरज सिद्धार्थ व्यक्त करतात. महाराष्ट्र हा इतर कोणाचा नव्हे, तर फुले, शाहू, आंबेडकरांचा म्हणूनच ओळखला जातो. त्यांना अभिप्रेत असणारा जातिविहीन, अत्याचारविहीन, अंधश्रद्धाविहीन , द्वेषविहीन आणि प्रज्ञानी महाराष्ट्र घडविण्यासाठी मराठा, बौद्धांसह मुस्लीम, ख्रिश्चन, भटके-विमुक्त, आदिवासी, बौद्धेतर दलित, ओबीसी या सर्व समाजघटकांतील तरुण-तरूणींनी जाती-धर्मादी अस्मिता बाजूला ठेवून एकजूट होण्याची गरज अत्यंत कळकळीने त्यांनी यात व्यक्त केली आहे. तसे झाले नाही, तर धर्मांध शक्तींच्या हाती आपण स्वतःहून कोलीत दिल्यासारखेच आहे, याची जाणीव त्यांनी पानोपानी करून दिली आहे. माणगाव परिषदेची क्रांती तर खरीच, पण तिने दिलेला जातीय, धार्मिक सलोख्याचा संदेशही तितकाच महत्त्वाचा. ही जाणीव करून देण्याचे काम ही पुस्तिका करते.

माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित झालेली ही सर्व पुस्तके शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक सौहार्दाची महतीच नव्याने अधोरेखित करतात. माणगाव परिषदेच्या शंभरीनिमित्त पुढील शंभर वर्षांच्या प्रगतीचा आलेख मांडण्याऐवजी अद्यापही आपल्याला जातिनिर्मूलनासाठीचाच झगडा मांडावा लागतो आहे. जात्यंध शक्तींच्या विरोधातच ऊर्जा खर्च करावी लागते आहे. प्रतिगामी प्रवृत्तींना लगाम घालण्याऐवजी त्यांचे समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हे सारे आपल्या सामाजिक अधोगतीचे दर्शन घडविणारे आहे. या पार्श्वभूमीवर, ही पुस्तके पुनश्च एकदा आपल्याला आपल्या सच्च्या विचारधारेची आठवण करून देतात. आपले मार्गनिर्धारण करतात. अंधाराचे यात्रेकरू न होता आपण प्रकाशाच्या दिशेने चालत राहावयाचे आहे, हे पुनःपुन्हा सांगत राहतात. 

  

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

राजन गवस: समाजचिंतनाचा समृद्ध, खळाळता निर्झर!

 



आयुष्यात काही माणसांचं असणं, हे आपल्या आयुष्यालाही परीसाच्या स्पर्शाप्रमाणं सोनेरी बनवून टाकतं. त्यांचं अस्तित्व महत्त्वाचं असतंच, पण आपल्या अस्तित्वालाही ते काही अर्थ प्राप्त करून देतं, आयुष्याचं प्रयोजन देतं. डॉ. राजन गवस यांचं माझ्या आयुष्यातलं हे स्थान. तसं मी माझं कामाचं ठिकाण सोडून कामाव्यतिरिक्त अन्यत्र कुठं जाऊन बसण्याचे प्रसंग फारच कमी! पण, मराठी अधिविभागात गवस सर असतानाचा काळ त्याला अपवाद होता. भाषा भवनमध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या कव्हरेजच्या निमित्तानं गेलो की त्यांना भेटण्याची ओढ लागलेली असायची. कार्यक्रम संपला की, सरांच्या केबीनमध्ये घुसायचं. बसायचं. सरही प्रेमानं चहा पाजल्याखेरीज सोडायचे नाहीत. पण, हा फॉर्मेलिटीचा भाग सोडला, तर त्यांच्याकडून कान ओढून घेण्यासाठी म्हणूनच खरं तर मी त्यांच्या पुढ्यात बसलेलो असायचो. एक बापपणाचा अधिकार त्यांच्याकडं मी राखलाय म्हणा किंवा स्वभावतःच त्यांनी तो स्वतःकडं घेतलाय. पण, त्यांच्याकडून कान टोचून घेण्यात एक वेगळीच मजाय. उगीचंच मधाचं बोट लावणं वगैरे प्रकार इथं नाहीत. जे काही सांगायचं, ते सरळसोट, थेटपणानं. चुकलं तर चुकलं म्हणूनच सांगणार. बरोबर असेल तर फार कौतुक न करता, हे एक बरं केलंस असं सांगणार. आता हे म्हणजे तर प्रशस्तीपत्रकच असतं माझ्यासारख्यांसाठी.

प्रत्यक्ष समोर बसून असो वा सभेमध्ये, सरांना ऐकणं हा एक फार भारी अनुभव असतो. सर अत्यंत शांत चित्तानं, मध्येच एखादा प्रदीर्घ पॉझ घेऊन दाढीवर हलकासा हात फिरवून आपला मुद्दा तपशीलवार पटवून देतात. केवळ आवाजाच्या चढउतारावर सभेला खिळवून ठेवतात सर. त्यांना सभेत ऐकताना मला नेहमी एखाद्या खळाळत्या झऱ्याच्या काठी बसल्याचा फील येत राहतो. तो जसा शांत, निर्मळ आणि मनाला नादावून टाकणाऱ्या खळाळतेपणानं प्रवाहित राहतो, तसं सरांचं बोलणं! समाजाकडं, समाजातल्या शोषित, वंचित वर्गाकडं, त्यांच्या वेदनांकडं अत्यंत संवेदनशील नजरेनं पाहणारे, तितक्याच संवेदनशीलपणानं त्या वेदनांपासून कोसो दूर असणाऱ्या समाजापर्यंत त्या आपल्या लेखणीनं पोहोचवणारे सर हे आपल्या समाजाचे सच्चे संवेदनादूत आहेत. आपल्यातल्या जाणीवांना आवाहन करीत त्यांना जागं ठेवण्याचं काम सर करत असतात. माझ्यासारख्या हजारो जणांचे गवस सर हे एक हक्काचं प्रेरणास्रोत आहे. या स्रोताचा प्रेमवर्षाव आम्हावर पुढील अनेकानेक वर्षे होत राहो, हेच मागणं सरांकडे आजच्या वाढदिवसानिमित्ताने!

सर, आपलं हार्दिक अभिष्टचिंतन!

मसाले पान (कथा)

 (ज्येष्ठ सन्मित्र श्री. सुभाष सूर्यवंशी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही 'अक्षरभेट'चा दीपावली विशेषांक वाचकांना अत्यंत मेहनतीने सादर केला आणि दरवर्षीप्रमाणेच आम्हालाही त्यात स्थान दिले. या अंकासाठी यंदा एक कथा लिहीली. ती कथा माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'अक्षरभेट'च्या सौजन्याने येथे देत आहे. वाचकांना आवडेल, अशी आशा आहे.- आलोक जत्राटकर)




आयुष्य एखाद्या मसाले पानासारखं वाटतं मला. मसाले पानात कसं चुना, कात, सुपारी यांच्याबरोबर गुलकंद, केसर, सौंफ, टूटी फ्रुटी, नारळाचा कीस, वेलची, चेरी, गुंजीचा पाला आणि हे सारे मटेरियल पानात बांधून ठेवण्यासाठी वरुन दाबून घुसवलेली लवंग हे सारे पदार्थ मापात असले की मसाले पानाचा स्वाद वृद्धिंगत होतो. यातला एक जरी पदार्थ कमी अगर अधिक झाला की सारा मामला बिघडून जातो. म्हणजे समजा, चुना वाढला तर तिखटपणा वाढणार आणि गुलकंद प्रमाणापेक्षा जास्त झाला, तर उगीचच गुळमाट लागत राहणार. आयुष्यातही आपल्या साऱ्या भावभावना, विकार यांचं संतुलन हे फार महत्त्वाचंच. कोणत्याही एका भावनेचा वा विकाराचा अतिरेक झाला की, सारं काही बिघडलंच म्हणून समजा. एखाद्यानं उगीचच फार चांगलं असू नये की त्याच्या चांगुलपणाचाही त्रास व्हावा. टोकाचं वाईटही असू नये कारण त्याचा त्रास तर साऱ्यांनाच सोसावा लागावा.

माझ्या आयुष्याच्या सुरवातीच्या कालखंडातच मसाले पानानं हे तत्त्वज्ञान शिकवलं. आपसुक म्हणता येणार नाही कारण घडलेल्या त्या प्रसंगांत आपसुकता नव्हती तर माझा दोषच अधिक होता. दोषही हाच की मसाले पानाची ती गोड चव आवडायला लागली होती, नको त्या वयात. आणि त्या चवीचा आस्वाद घेण्याच्या नादात काही गैर गोष्टी घडून गेल्या हातून. आजही तो प्रसंग आठवला की गहिवरुन यायला होतं.

***

दुसरीत होतो. आईवडिलांनी शिक्षणासाठी आजोबांकडं- आण्णांकडं सांगलीत शिकायला ठेवलेलं होतं. सांगलीची राम मंदिराजवळची के.सी.सी. प्राथमिक शाळा ही माझी शाळा. सकाळी साडेसात ते दुपारी बारा अशी शाळेची वेळ असायची. दुपारनंतरचा वेळ आजी-आण्णा, मावशी, माझा लाडका कुत्रा जॉन यांच्या सान्निध्यात जायचा. दुपारी आणि संध्याकाळी आण्णांच्या वाचनाच्या वेळी त्यांच्या टेबलाच्या पायाशी बसून मी अभ्यास करायचो. आण्णांना पान खायची सवय होती. जेवल्यानंतर थोडी वामकुक्षी घेऊन ते उठून त्यांच्या या छोटेखानी अभ्यासिकेच्या टेबलावर येऊन बसायचे. तिच्या एका कोपऱ्यात पितळेचा चकचकीत पानाचा डबा असायचा. हा पानाचा डबा, त्याची छोटीशी कडी, त्याच्या आतले नजाकतदार कप्प्यांचे खण, त्या कप्यांमध्ये आपापल्या जागी विसावलेले कात, सुपारी, तंबाखू न् चुन्याची डबी, एका कप्प्यात लवंग अन् धारदार अडकित्ता आणि ते अलगद उचलल्यानंतर त्याखालचा पानाचा स्वतंत्र खण असा हा सारा देखणा पानाचा संसार. त्याचं आकर्षण वाटलं नसतं तरच नवल. आण्णा येऊन बसले की अलगद हा डबा उचलायचे. खालच्या खणातलं एक पान घ्यायचे. मग तितक्याच हळुवारपणे पानाच्या शिरा काढून त्याला अंगठ्याच्या नखानं हवा तितका चुना घेऊन लावायचे. दुसऱ्या बोटानं तो चुना, कात अन् तंबाखू मिसळून सगळ्या पानावर पसरायचे. मग सुपारी बारीक कातरून त्यावर टाकायचे. कधी वाटलं तर चवीसाठी एखादी लवंग टाकायचे. हे सारं मनासारखं जमलं की पान छान गुंडाळून तोंडात टाकायचे. खुर्चीच्या हातावर एक खादीचा गमछा-टाइप नॅपकीन असायचा. त्याला हात पुसला की आण्णा वाचनाची समाधी लावायला तयार. त्यांची बसण्याची जागा त्यांनी खिडकीशेजारीच मुद्दाम केलेली होती. वाचता वाचता त्या खिडकीतून पानाची पिंक वाचनसमाधी भंग न होऊ देता त्यांना टाकता यायची. पुढं एक-दीड तासानंतर आणखी एखादं पान तयार केलं की, साधारण तीन-एक तासांचं वाचनाचं त्यांचं वर्तुळ बरोब्बर पूर्ण व्हायचं. कधी कधी या डब्यातल्या लवंगेचा अन् क्वचित कतरी सुपारीचा लाभ मला मिळायचा. पण, मला हे दोन्ही दोन टोकाचे - एक तिखट अन् दुसरा एकदम सप्पक असे- हे स्वाद कधी आवडले नाहीत. पण, या सगळ्याचं मिश्रण असलेलं पान मात्र आण्णांच्या तोंडात कसं भारी रंगतं, याची मौज वाटायची. आण्णा दुसरं पान कधी लावायला घेतात, इकडं माझं लक्ष असायचं. कारण त्या पानाबरोबर माझ्या पहिल्या टप्प्यातल्या अभ्यासाची सुट्टी व्हायची. पुढचा काळ मी आमच्या अंगणात जॉनसोबत खेळायला किंवा झोपायला, असं काहीही करायला रिकामा असायचो. पुढचा अभ्यास मग आण्णा संध्याकाळी बाजारातून आल्यानंतर बाजाराचा हिशोब लिहीता लिहीता चालायचा, साधारण एक तासभर- साडेआठच्या भोंग्यापर्यंत. मग ती जेवणाची वेळ असे.

सांगलीचा बाजार शनिवारी भरतो. त्या दिवशी आण्णांची पानखरेदी, दोनेक महिन्यांतून एकदा चुना खरेदी वगैरे असायची. चुनकळी उकळून त्यापासून चुना तयार करून तो एका चिनीमातीच्या सुबक बरणीत भरून ठेवायची जबाबदारी आजीची असायची. आण्णांनी सुपारीसाठी एक मोठी मिलीट्री वॉटरबॅग ठेवली होती. या मेटॅलिक वॉटरबॅगला लष्करी हिरव्या रंगाचं कातडी कव्हर होतं. म्हणून ती मिलीट्री वॉटरबॅग. दोन लीटर पाणी बसेल इतकी मोठी होती. आण्णांच्या कॉटशेजारी टांगलेली असायची. बाजारातून आणलेल्या सुपाऱ्या एकेक करून त्या दिमाखदार वॉटरबॅगच्या तोंडातून एकेक टाकत त्यांचा तो मेटॅलिक टप टप बद्द असा आवाज ऐकायला मजा यायची. त्यामुळं आण्णा मलाच ते काम सांगायचे. दुसरं एक काम करण्याचा मी प्रयत्न करायचो, पण माझ्यानंतर मावशी किंवा आजी ते करायच्या. हे काम म्हणजे आणलेली ओली पानं पुसून रात्रभर ओळीनं वाळवत ठेवणं. शनिवारी रात्री जेवण झालं की आजी, आण्णा मांडीवर एकेक टॉवेल घेऊन बसत. पानांचा बिंडा सोडायचा, ती ओली खाऊची पानं एका ताटात पसरायची आणि दोघांनी दोन्ही बाजूंनी एकेक पान घ्यायचं, ते मांडीवरल्या टॉवेलला दोन्ही बाजूनं पुसायचं, कम्प्लीट कोरडं करायचं आणि खोलीच्या एका कोपऱ्यात ओळीनं आडवी उभी अशी एकेक लावायची, एकदम शिस्तशीर. ही पानं लावायचं कामही मी आनंदानं करायचो. शाळेत प्रार्थनेच्या वेळी शिक्षक जसं आम्हा मुलांना एका रांगेत शिस्तीनं उभं करायचे, तशा शिक्षकाच्या भूमिकेत मी तेव्हा असायचो. एकाही पानाला इकडं तिकडं होऊ द्यायचो नाही. एकदम डिसीप्लीन पाळायला लावायचो. सारी पानं अशी आडवी-उभी ओळीनं लावून झाली की लांबून त्यांच्याकडे पाहताना भारी वाटायचं. कस्लं भारी लावलंय आपण, असं वाटायचं. पण, मला ते पानं पुसण्याचंही काम हवं असायचं. खूपच हट्ट करायला लागलो की, द्यायचे आण्णा त्यांचा टॉवेल माझ्या मांडीवर अन् म्हणायचे पूस. त्यावर आजी भडकायची. म्हणायची, गुरूजी, नातवाला दिलंयसा खरं, पण नंतर पानं ओली राहिली न् खराब झाली तर परत आम्ही नाही हं ओरडा ऐकून घेणार तुमचा. आण्णा गालातल्या गालात हसायचे, म्हणायचे, हो, ते तर तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल खरं. आणि थोडा वेळानं मला त्या टॉवेलसकट त्यांच्या मांडीवर घ्यायचे आणि माझ्या मांडीवरच्या त्या टॉवेलला स्वतःच्या हातानं पानं पुसून ठेवायला सुरवात करायचे. ही वेळ आजीनं गालातल्या गालात हसण्याची असे. मग मी तसाच कधी तरी त्यांच्या मांडीवर जांभया देत आडवा होत असे.

आण्णांच्या पान खाण्याचं एक सुप्त आकर्षण मला होतं. वाटायचं, आण्णा पान खातात म्हणून तासंतास त्यांना वाचायचा, अभ्यासाचा मूड राहतो आणि आपण खात नाही म्हणून आपल्याला लगेच कंटाळा येतो. असंच काहीबाही वाटत राहायचं. त्यांना मी एकदा तसं विचारलंही. त्यावर हसून म्हणाले, वाचनाची मला आवड आहे, म्हणून मी तासंतास वाचू शकतो. पान हे निव्वळ एक जडलेलं व्यसन आहे. सोडता येत नाही, म्हणून जपलंय, इतकंच. कधी सुटेलही पुढे-मागे. मला त्यांचं बोलणं काही झेपायचं नाही. मग मी नुसतंच हं म्हणून खेळायला पळत असे.

या पान पुराणाचा पुढला अंक तेव्हा सुरू झाला, जेव्हा एका रविवारी दुपारच्या सामिष भोजनानंतर आण्णांनी मसाले पानं आणली. असायचं काय की, शनिवारी संध्याकाळी माझे आई-वडिल मला भेटायला यायचे. त्याचबरोबर रविवार हा गावोगावचे पाहुणे येण्याचाही दिवस असायचा. घरात इतकी मंडळी आली की, साहजिकच सामिष भोजनाचा बेत ठरायचा. त्यानंतर आण्णा ज्याला हवं त्याला साधं पान लावून द्यायचे किंवा पानाचा डबा फिरवायचे. मात्र, त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी आमच्या एका पाहुण्याला पाठवून घरातल्या महिला वर्गासाठी मसाले पानं आणवली. आईनं तिच्या वाट्याच्या पानातलं अर्धं मला भरवलं. सुरवातीला मी ते खायला नाखूष होतो. पण, जसं चावलं, आणि त्याचा तो मिठ्ठास गोडवा घशातून खाली उतरला की काय सांगावं! हे प्रकरण आण्णांच्या त्या डब्यातल्या पानापेक्षा वेगळं आणि जबरदस्त आकर्षक होतं. त्यातल्या गुलकंद, चेरी वगैरे प्रकारांची मोहिनीच पडली मला. तिथून पुढं जेव्हा कधी अशा जेवणावळी होत घरी, त्यानंतर हळूच मी आण्णांकडे मसाले पानाची मागणी करीत असे. पण, दरवेळीच ती फलद्रूप होत असे, असं मात्र नाही. कारण त्यावेळी साधं पान पानपट्टीत दहा-वीस पैशाला वगैरे तर मसाले पान आठ आण्याला पडत असे. त्यामुळं दरखेपी त्यापोटी इतका खर्च करणं परवडतही नसे. पण, असलं हिशोब लक्षात घेण्याचं माझं वय थोडंच होतं. कधी कधी मी हट्टाला पेटत असे अन् पाठीत आईचा अगर आजीचा रट्टा खाऊनच गप्प बसत असे.

एकदा आण्णांच्या समोरुन अभ्यासातून सुटका झाल्यानंतर मी जॉनसोबत अंगणात हुंदडत होतो, त्यावेळी समोरच्या वस्तीत राहणारा आमच्या वर्गातला विजय नावाचा मुलगा त्याच्या आईसोबत जाताना दिसला. मी त्याला हाक मारली. मला पाहताच तो आईला सोडून पळत आला. आमचं काही बोलणं होणार इतक्यात त्याची आईही मागून आली. मला पाहून माझ्या गालावरुन हात फिरवित स्वतःच्या कानशीलावर कडाकडा बोटं मोडत म्हणाली, गुरूजींचा नातू न्हवं का तू? विजू सांगतोय, वर्गात पैला लंबर हाय तुजा म्हनून. आता असल्या कौतुकावर कसं व्यक्त व्हावं, हेच ठाऊक नसल्यानं मी नुसता त्यांच्या कष्टानं रापलेल्या अन् ममतेनं ओसंडणाऱ्या चेहऱ्याकडं पाहात राहिलो. त्याच पुढं म्हणाल्या, आमचा विजू जरा कच्चा हाय अब्यासात. तुझ्याबरुबर पाठवू का अभ्यास करायला?’ मी म्हटलं, मी आण्णांना विचारुन उद्या सांगतो. असं बोलणं झालं अन् ती मायलेकरं निघालीत.

मी संध्याकाळी आण्णांना विचारलं. त्यांची काही हरकत नव्हती, पण आजीची थोडी कुरकूर चाललेली. गुरूजी, तिथलं पोरगं कशाला येऊ देतासा? उगीच संगतीनं ह्योच बिघडून जायचा. मला आजीच्या म्हणण्याचा रोख काही कळला नाही. पण, आण्णांनी दुपारी त्यांच्या वामकुक्षीच्या वेळेत एक तास त्याच्यासोबत अंगणात अभ्यास करायची परवानगी दिली. पण, फक्त अभ्यास करण्याचीच!

त्यावेळी माझे दोस्त असे नव्हते. वर्गात सचिन, जमीर असे काही एक-दोघे जण होते जवळचे, पण ते शाळेपुरतेच मर्यादित. शाळेबाहेर अगर घरात पुस्तकांच्या सान्निध्यातच माझा जास्त वेळ जायचा. कंटाळा आला की जॉन असेच उड्या मारायला, खेळायला. विजय हा माझ्या घरी येणारा तसा शाळेतला पहिलाच मित्र. त्याच्या घरचं, वस्तीतलं वातावरण काही अभ्यासाला फारसं पूरक किंवा पोषक नव्हतंच. त्याचे वडिल कुठं तरी वॉचमन आणि आई कुठल्याशा कारखान्यात का गिरणीत कामाला जायची. विजय दिवसभर एकटाच असायचा घरी. आमची शाळा सकाळची असल्यानं बारा वाजता घरी येऊन काही खाऊन जे हा घरातनं बाहेर पडायचा ते संध्याकाळी आई घरी येईपर्यंत गल्लीतल्या पोरांसोबत समोरच्या मैदानात खेळत राहायचा. घरी गेल्यावर पण आईला दाखवायला म्हणून पाटी-पुस्तक नुस्तं घेऊन बसायचा. केला तर केला, नाही तर नाही, असा त्याचा अभ्यास!

विजय माझ्याबरोबर जेव्हा अभ्यासाला येऊन बसू लागला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, याचा अभ्यास बराच नव्हे, तर खूप म्हणजे खूपच कच्चा आहे. कारण मी पाटीवर अक्षरं लिहू शकायचो, पाढे लिहू-म्हणू शकायचो. त्याला मात्र अद्याप अक्षरं किंवा अंकही लक्षात येत नव्हते. त्यामुळं त्या तासाभरात मी अभ्यास करण्यापेक्षा त्याच्याकडून याच गोष्टी गिरवून घ्यायचं ठरवलं. त्यालाही तो कंटाळायचा. मग आम्ही काहीबाही खेळून तास काढत असू. आण्णा उठले की, दप्तर घेऊन तो लगेच पळून जायचा आणि मी आण्णांच्या पायाशी बसून मग माझा अभ्यास सुरू करायचो.

एके दिवशी झालं असं की, शाळेतून येताना रस्त्यात मला आठ आणे सापडले. माझ्यासाठी खूपच मोठी रक्कम होती ती. मागं-पुढं असं कोणीच नव्हतं. उचलावे की न उचलावे, या द्वंद्वात अखेर मी ते उचलून खिशात टाकलं. घरी गेलो की आण्णांना देऊ, असा विचार केला होता. पण, आवरण्याच्या नादात विसरून गेलो आणि नाणं तसंच खिशात राहिलं. दुपारी विजय आला. खेळता खेळता माझ्या खिशातून ते नाणं पडलं. मी चमकलो. माझं लक्ष पटकन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या पानपट्टीकडं गेलं. दुपार असल्यानं पट्टीच्या मालकाखेरीज दुसरं कोणी नव्हतंही तिथं. मित्राला ट्रीट देणं, वगैरे विचार त्या क्षणी माझ्या मनी येणं शक्य नव्हतं. पण, विजयला मी विचारलं, विजय, पान खातो का रे?’ त्यावर तो पटकन उत्तरला, नाय ब्बा. मी त्याची समजूत काढत म्हटलं, अरे, गोड असतंय मस्त. खाऊ या. मी देतो की माझ्या पैशानं. असं म्हणून मी त्याला आठ आण्याची हकीकत सांगितली. यावर तो कसाबसा तयार झाला. मग मी त्याचं धाडस वाढवत म्हणालो, हे घे. जा, आण जा तिथनं. मसाले पान माग. तो माझ्याकडं टकामका बघतच राह्यला. त्यावर मी म्हटलं, अरे, मी गेलो आणि तेवढ्यात आण्णांनी हाक मारली तर काय करायचं? म्हणून तू जा. खरं तर, मला रस्ता क्रॉस करायची आणि पानपट्टीवाल्यापुढं जायची भीती वाटलेली कारण आण्णांना सारेच ओळखत असत. विजय मात्र सदा न कदा रस्त्यावरून इकडं तिकडं करत असायचा, त्यामुळं त्याला वाहतुकीची भीती वाटत नव्हती.

विजय हळूच गेला. मी मेंदीच्या कुंपणावरुन टाचा उंचावून पाहात होतो. विजयनं सांगितल्यानंतर पानपट्टीवाल्यानं त्याच्याकडं निरखून पाहिलं आणि पान लावून दिलं. विजयनं पैसे दिले. तो परत येत असताना मात्र पानपट्टीवाला पाठमोऱ्या विजयकडं पाहात होता. आणि त्याच्या खांद्यावरुन जणू काही माझ्याकडंच त्यानं नजर रोखली होती. माझ्या पोटात गोळा उठला. मी पटकन खाली झालो. विजय अंगणात आला. आम्ही दोघं एखादं युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात आमची अभ्यास करायची जागा असलेल्या पिंपळाखाली बसलो. पानपट्टीवाल्यानं कागदात बांधून दिलेल्या त्या पानावरील गुंडाळी हळूच सोडली. पानाचे दोन भाग करून आम्ही दोन मित्रांनी वाटून खाल्ले. विजयलाही ती चव आवडल्याचं त्यानं सांगितलं. आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं पान खाल्लं होतं.

आमचं दोघांचं दुपारचं हे अभ्यासाचं, खेळाचं सत्र असंच सुरू होतं. एक दिवस आम्हाला परत एकदा मसाले पानाची आठवण झाली. खूप दिवस झाले होते खाऊन. पण, प्रश्न पैशांचा होता? विजयकडं असण्याचा प्रश्न नव्हता अन् माझ्याकडंही नव्हते. पण, आता माझ्या मनभर मोह दाटला होता. जसं काही कधीच मसाले पान खाल्लं नव्हतं की पुढं मिळणारही नव्हतं, इतकी तीव्र इच्छा मनी दाटली. पण, त्या क्षणी तरी मी काही करू शकत नव्हतो.

विजय गेला, पण माझ्या डोक्यातून पानाचा विषय काही जात नव्हता. मी घरात गेलो. आण्णा उठून आवरत होते. माझ्यासमोर आण्णांचा खुंटीवर टांगलेला नेहरू शर्ट होता. यापूर्वी कधीही आला नाही, असा विचार प्रथमच माझ्या डोक्यात आला. आण्णा नेहरू शर्टाच्या बाजूच्या खिशात पैसे ठेवायचे. त्यात हात घालूनच भाजीवाल्यांना वगैरे ते पैसे द्यायचे. डोक्यात इतकं पान-पान झालं होतं की, मी त्या क्षणी पुढं होऊन त्या शर्टाच्या खिशात हात घातलाच. टाचा उंच करून कोपरापर्यंत हात त्या खिशात घातला. खाली काही सुट्टे पैसे हाताला लागले, पण त्याच्यावर असलेल्या कागदी नोटेवर माझा हात अडखळला. मी ती नोट बाहेर काढली. कोरी करकरीत पाच रुपयांची हिरवीगार, ट्रॅक्टरवाली नोट होती. आण्णा दररोजच्या बाजारातून आले की त्यांच्या डायरीत सारा हिशोब लिहायचे. शेजारी बसवून मलाही पाटीवर हिशोब करायला लावायचे. कुठून सुरवात केली त्यापासून ते काय काय घेतलं ते क्रमानं आठवून, सांगून त्याचा हिशोब करायला लावायचे. त्यामुळे रुपया आणि पैशाच्या हिशोबात मी बऱ्यापैकी तयार झालो होतो. पाच रुपयांत बक्कळ दहा मसाले पानं येऊ शकणार होती, हे त्यामुळं माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. केवढी चंगळ होणार होती माझी!

मागला-पुढला कोणताही विचार न करता मी ती नोट पटकन खिशात घातली. पण, नोट खिशात ठेवण्यात धोका होता. उद्या दुपारपर्यंत ती सांभाळण्याचं मोठं आव्हान होतं. मी पळत अंगणात गेलो. माझ्या पिंपळाच्या खोडात एक छोटीशी ढोली होती. तिच्यात मी ती नोट ठेवली. तिच्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून फरशीचा एक तुकडा ठेवला आणि घरात आलो.

घरात आलो खरा, पण एका विचित्र अस्वस्थतेनं माझ्या मनाचा ताबा घेतला. ते नेमकं काय होतं, हे सांगता येणार नाही, पण तसं त्यापूर्वी कधीच वाटलं नव्हतं.

आण्णा नेहमीप्रमाणे धोतर-नेहरू शर्ट चढवून पिशव्या घेऊन बाजारात गेले. दीडेक तासात ते बाजारातून आले तेच मुळी तणतणत! लक्षात घ्या, त्या काळी दीड दोन रुपयांत आठवड्याचा भाजीपाला सहजी येत असे. तेव्हा पाच रुपयांची किंमत किती असेल, करा अंदाज. आण्णा आले आणि त्यांनी सरळ आजी अन् मावशीला फैलावर घ्यायला सुरवात केली. आजच्या बाजारासाठी ठेवलेले माझ्या खिशातले पाच रुपये कोठे गेले, कुणी घेतले, अशी बरीच चौकशी केली. पण, कोणीच कबूल होई ना! उलट, आजीचंच टेन्शन वाढलं. घरात भर दिवसा चोरी झाली होती. आजीनं मला विचारलं, दुपारी तुम्ही अभ्यास करताना कोणी बाहेरचं आलं होतं का घरात?’ मी नाही, म्हणून सांगितलं. पुन्हा मावशी, आजी, आण्णांची चर्चा सुरू झाली. घरातलं वातावरणच बदलून गेलेलं. अखेरीस आजीनं एक खडा माझ्याकडं टाकलाच. विचारलं, अरे, तुझा तो दोस्त आला होता का घरात?’ यावर मी घाबरतच सांगितलं, नाही, आम्ही बाहेरच बसून अभ्यास केला आणि तो तिकडूनच गेला.

बाहेरचं वातावरण असं अस्वस्थ झालेलं असताना मी सुद्धा आतून अत्यवस्थ झालो. म्हटलं, काय करून बसलो हे आपण? आण्णा-आजीला किती त्रास होतोय आपल्यामुळं. पण, या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं, हे काही समजत नव्हतं. आण्णा तर आधी इतके भडकलेले आणि अस्वस्थ होते की त्या क्षणी त्यांच्यासमोर काही बोलण्याचं कुणाचंही धाडस होत नव्हतं, तिथं माझी काय कथा?

रात्रीची जेवणं कशीबशी झाली. मी आण्णांजवळ झोपायचो. त्यांच्या कुशीत शिरलो की रोज मला लगेच झोप लागायची. मात्र, ती रात्र फार वेगळी होती. आण्णांनी मला नेहमीप्रमाणं कुशीत घेतलं, मात्र त्या दिवशी मला काही केल्या झोप येईना. आपण चोरी केली आहे; आपण चोर आहोत. आपल्याला शिक्षा झाली पाहिजे, असा विचार एकीकडे मनात येत असतानाच दुसरीकडे यातून आता सहीसलामत बाहेर कसे पडावयाचे, आण्णांना त्यांचे पाच रुपये परत कसे द्यावयाचे, याचं विचारचक्रही डोक्यात सुरू होतं. आपल्यामुळं काही चूक नसताना आजीनं गरीब विजयवर पण संशय घेतला, ही गोष्टही मला खूप खटकली. विचार करकरून माझा मेंदू अखेर शिणला आणि तशीच कधी तरी झोप लागली.

दुसऱ्या दिवशी दुपारी मी शाळेतून घरी आलो. शिक्षक असलेली आजी तिच्या शाळेत गेलेली होती. आण्णांची देवपूजा झाली. त्यांना जेवायला वाढून मावशीही कॉलेजला गेली. आण्णा जेवून त्यांच्या जागेवर नेहमीप्रमाणे पेपर वाचायला बसले. त्यावेळी मला काय वाटलं, सांगता नाही येणार! मी पळत अंगणात गेलो, पिंपळाच्या ढोलीत ठेवलेली पाच रुपयांची नोट बाहेर काढली आणि ती घेऊन येऊन आण्णांसमोर उभा राहिलो. आण्णांना हाक मारली. आण्णा...

आण्णांनी माझ्याकडं प्रश्नार्थक पाहिलं. मी हातातली नोट पुढं करून म्हटलं, आण्णा, मला ही नोट खेळताना सापडली. कोणीतरी आपल्या पिंपळाच्या ढोलीत ठेवली होती.

आण्णांनी काही क्षण माझ्याकडं टक लावून पाहिलं. माझ्या हातातल्या नोटेकडं एक कटाक्ष टाकून म्हणाले, जा बाळा, माझ्या शर्टाच्या खिशात ठेवून दे ती.

मला आण्णांनी त्याविषयी आणखी काही विचारावं; काल आजीला, मावशीला जसे भडकून बोलले, तसं बोलावं; माझा अभ्यास घेताना जी लाल छडी घेऊन बसतात, त्या छडीनं त्यांनी मला मारावं. काहीही करून माझ्या चुकीची शिक्षा मला द्यावी. चोरी करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी, असं माझ्या मनानं घेतलं होतं. त्याची मानसिक तयारीही मी केली होती. पण, तसं काहीही न होता आण्णा मला ती नोट त्यांच्या खिशात ठेवायला सांगत होते. मी अवाक् होऊन तसाच उभा राहिलो. त्यावर आण्णांनी कातर स्वरात पुन्हा सांगितलं, बाळा, जा, ठेव जा. आणि ही गोष्ट तुझ्या आजीला, मावशीला तू सांगू नको बरं. मी सांगीन त्यांना कधी तरी सवडीनं. असं सांगत असतानाच त्यांच्या डोळ्यांतून त्यांच्याही नकळत अश्रूंचे दोन थेंब गालावर ओघळले. ते पाहून कालपासून रोखून धरलेली माझ्या हृदयातील कालवाकालवही बाहेर पडली आणि माझ्याही डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. पाचाची ती नोट तशीच हातात धरून मी त्यांच्याकडे धावलो. मला आपल्या मिठीत कवटाळून आण्णांनी माझ्या कपाळाचे प्रदीर्घ चुंबन घेत आपल्या अश्रूंनाही मोकळी वाट करून दिली.

***

आयुष्यात अभिनव अशा क्षमाशीलतेचा सर्वात मोठा पहिला धडा हा असा माझ्या आण्णांनी दिला मला. त्यांनी मला त्या क्षणी बदडून काढलं असतं तरी गैर ठरलं नसतं. त्यासाठी माझी तयारीही होती. पण, त्यानंतरच्या आयुष्यात मी तसा पुन्हा वागलोच नसतो, याची शाश्वती मात्र देता आली नसती. तथापि, या क्षणीचं त्यांचं वर्तन मी कुठल्याही अंगानं अपेक्षिलं नव्हतं. त्यांच्या या क्षमाशीलतेचा माझ्या आयुष्यावर दूरगामी परिणाम व संस्कार झाला. आयुष्याच्या सुरवातीच्या टप्प्यावर घडून आलेल्या या मसाले पान प्रकरणानं माझ्या मनावर बुद्धाच्या पंचशीलाचे संस्कार थेट कोरले. मसाले पानाचं आकर्षण तर त्याच क्षणी ओसरून गेलं. पण, आजही एखादे नवीन पुस्तक सोडले तर अन्य कोणत्याही गोष्टीचा मोह अगर लोभ मला सुटत नाही. काही वेळा निर्माण झालाच, तर त्यावर संयमाने मात करण्याची प्रेरणा मला हा प्रसंग देत राहतो. आजही जेव्हा आठवतो, तेव्हा पुढील ध्वनीतरंगच मनात उमटत राहतात -

आदिन्नादाणा वेरमणी। सिख्खापदम् समाधियामि।।

कामेसुमिच्छाचारा वेरमणी। सिख्खापदम् समाधियामि।।

मुस्सावादा वेरमणी। सिख्खापदम् समाधियामि।।

नाव... तिचं, माझं, तुमचं..!

 


मुलगी माझी लहान होती. तिच्या गॅदरिंगला गेलो होतो. मुलीचा परफॉर्मन्स खूपच देखणा झाला, तेव्हा सूत्रसंचालकानं तिला शेवटी पुन्हा स्टेजवर बोलावलं आणि नाव विचारलं. आधीच तिचा कलाविष्कार पाहून माझा ऊर अभिमानानं भरून आला होताच. पण, आता मुलीला पुन्हा बोलावून तिचं नाव विचारणं ही तर मोठीच गोष्ट होती. त्यातही माझा सुप्त स्वार्थ असा की, आता मुलगी तिचं संपूर्ण नाव सांगेल. मग, त्या खचाखच भरलेल्या सभागृहाला माझं नावही समजेल. पण लेकीनं या विचाराच्या ठिकऱ्या उडवल्या. सूत्रसंचालकानं दोन वेळा विचारुनही तिनं निरागसपणानं केवळ तिचं फर्स्टनेमच सांगितलं. मन खट्टू झालं. या पोरीला कोणीही नाव विचारलं की, पूर्ण नाव सांगायचं, असं आपण आपल्या संस्कारातनं शिकवलं होतं. मात्र, तिनं त्यावर पूर्ण बोळा फिरवल्यानं मन उदास झालं. पण काही क्षणच...

पुढचा परफॉर्मन्स सुरू झाला होता, पण बसल्या जागी माझं मन मात्र माझ्या त्या अपेक्षेची कारणमीमांसा करण्यात गुंतलं. खरं तर, मी मुलीला जन्म दिला. जन्म कसला? केवळ बीज तर दिलं. जन्माची सारी प्रक्रिया, कळा साऱ्या तर तिच्या आईनंच सोसलेल्या! पण, पुरूषसत्ताक समाजात मुलांच्या नावापुढं नाव लागतं ते मात्र केवळ बापाचं. आता काही मुलं आपल्या आईलाही बापाच्या बरोबरीचं स्थान आपल्या नावात देऊ लागलीत, हे खरं! पण, समाजाच्या दृष्टीनं बंड पुरोगामीच ती. मला मात्र लेकीनं एकदम ताळ्यावर आणलं. माझं नाव न घेऊन तिनं माझ्यावर थोर उपकारच केले, असं वाटायला लागलं. तिनं घेतलं असतं तर क्षणिक माझा स्वाभिमान कुरवाळला, गोंजारला, जपला गेला असता. पण, पाहा ना! तिला वाढविण्यात, पोसण्यात तिच्या आईचं माझ्यापेक्षाही किती तरी अधिक योगदान असतं. तिनं मात्र, माझं नाव पुकारलं जाण्यातच आनंद मानायचा, हे किती अन्यायकारक? आणखी एक म्हणजे, माझी मुलगी छान नाचते. आमची अवस्था मात्र अंगण वाकडे अशी. आता तिच्या नाचाचं श्रेय अगदी नावानं सुद्धा मी घेता कामा नये, अशी वस्तुस्थिती. ते श्रेय तिच्या गुरूंचं अन् तिचंच खरं तर! यात, मी मात्र मिरवून घ्यायचं, हे किती बरोबर?

त्यामुळं मुलीनं तिच्या लहानपणीच अजाणतेपणी का असे ना, तिचं नावानिशी स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित केलं, ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटली. आपण नेमकं चुकतो ते तिथंच. आपल्या आशाआकांक्षा, अपेक्षा जन्मापासून आपण नुसतं त्यांच्यावर लादायला सुरू करतो- गाढवावर ओझं लादावं तसं! असं करताना आपण त्या छोट्या जीवांचा विचारही करत नाही की, त्यांना काय हवंय? त्यांना काय वाटतंय? जन्म दिला म्हणजे जणू काही मालकच झालो आपण त्यांचे! आणि या गुलामांनी आपण म्हणू तसंच वागलं आणि केलं पाहिजे, हा शिरस्ता- शिस्त आणि संस्कार म्हणून आपण त्यांच्यावर बिंबवतो, लादतो. त्यांचं माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तीमत्त्व आहे, हे मान्यच करीत नाही आपण. त्यातून मग सारे प्रॉब्लेम सुरू होतात. पालक आणि मुलांच्यात दरी पडण्याचे, कुटुंबात विसंवाद वाढण्याचे एक कारण हे सुद्धा आहे. दहावी-बारावीला असणाऱ्या मुलांची घरं पाहिल्यावर समजतच नाही की परीक्षा त्यांची आहे की त्यांच्या आईबापांची? थ्री ईडियट्ससारख्या चित्रपटानं यावर खूप उत्तम भाष्य केलं आहे. कामयाब नहीं, काबिल बनो। कामियाबी झक मारके पिछे भागेगी। असं यशाचं सूत्र सांगतानाच समाजाच्या दबावापोटी पालकांच्या अपेक्षांचं ओझं मुलांच्या कोवळ्या मनावर लादल जातं आणि ते ओझं वागविण्याची क्षमता असो वा नसो, इच्छा असो वा नसो, त्यांना ते ओझं पेलण्यात आपण यशस्वी झाल्याचं सिद्ध करण्यासाठी जीवाच्या आकांतानं दमछाक करून घ्यावी लागते. हे सगळं काही नावासाठी- आईबापाच्या; नव्हे बापाच्याच! आईच्या आकांक्षा तर बापाच्या आकांक्षात लग्न झाल्यापासूनच समर्पयामि झालेल्या. या पुरूषी व्यवस्थेला तिच्या आकांक्षांशी काही देणंघेणं नव्हतंच कधी.

खूप वर्षांपूर्वी जेव्हा केवळ दूरदर्शन नामक एकच चॅनल संपूर्ण भारतभरात होतं, त्यावेळी मुलीचा गर्भ वाचविण्यासाठी प्रबोधन म्हणून एक जाहिरात केली जायची. त्यात आपल्या गर्भवती सुनेला वंशाला दिवा म्हणून मुलगाच व्हायला हवा, असं सांगणाऱ्या घरातल्या ज्येष्ठ सदस्याला त्या जाहिरातीतील पुरोगामी नायिका धाडसानं एक प्रश्न विचारते. बापू, आपके पिताजी का नाम क्या था?’ तो सांगतो. ती पुन्हा विचारते, उनके पिताजी का?’ तो तेही नाव पटकन सांगतो. ती पुन्हा उनके पिता का?’ तो सांगतो. ती उनके पिता का?’ तो थोडा डोक्याला ताण देतो, पण सांगतो. आता ती पुन्हा विचारते, और उनके पिता का?’ त्यावर बापू अधिकच विचारात पडतो. डोक्याला ताण देऊनही त्याला ते नाव काही आठवत नाही. यावर मग नायिका घाव घालते, जब आपको खुदको ही नहीं पता की आप किसका वंश चला रहे हो, तो फिर लडका हो या लडकी, क्या फर्क पडता है?” आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची टॅगलाईन पडद्यावर यायची, लडका हो या लडकी, दोनों एक समान।

पण, आजकाल हे सारं प्रबोधन मागं पडून पुन्हा काळाची चक्र उलटी फिरविण्याचं काम याच माध्यमांच्या आधारानं पद्धतशीरपणानं सुरू झालं आहे. मग, आत्मसन्मान बाजूला ठेवून नवऱ्याची प्रेयसी स्वीकारण्यापासून ते नवऱ्यासोबतच राहून आई कुठं काय करते!’ हा प्रश्न की उद्गार हे कळू न देण्याची तजवीजही त्यात केली जाते. मालिकेतला बापही मुलांना माझं नाव तुमच्या नावापुढं आहे, म्हणून तुम्ही आहात. माझ्याशिवाय तुम्ही सारे शून्य आहात, असं बेमुर्वतखोरपणानं सांगतो. आणि हे सारं आपण बिनडोकपणानं खपवून घेत चाललो आहोत. जणू या साऱ्याला आपली मूकसंमतीच असल्यासारखं चाललंय सारं.

अलिकडं आणखी एक ट्रेन्ड आलाय, तो चांगला की वाईट, यावर भाष्य करणार नाही- तो म्हणजे आई आणि बापाच्या नावातली काही आद्याक्षरं यांची भेसळ, सरमिसळ करून मुलामुलींची नावं ठेवण्याचा! आयांनी या काही अक्षरांसाठी आग्रही न राहता आता बापासोबत आपलं नावही मुलाच्या नावासमोर लावण्यासाठी खरं तर आग्रही व्हायला हवंय. पण, अशी आईबापाच्या नावातल्या अक्षरांची तोडजोड करून मुलांची अगम्य, निरर्थक नावं आता ऐकिवात येऊ लागली आहेत. वेगळ्या नावाचा आग्रह ठीकाय, पण अगदी काहीच्या काहीच नावं ठेवली जाऊ लागली आहेत. मध्यंतरी कोणी आपल्या मुलाचं नाव निर्वाण ठेवल्याचं वाचनात आलं. काय म्हणावं याला? जन्मल्या जन्मल्याच आपल्या लेकाला आयुष्यभरासाठी निर्वाणाला धाडणाऱ्या आईबापाला काय म्हणावं?

मुद्दा काय, तर लादणं नकोच आहे मुलांवर कुठल्याही प्रकारचं! माझ्या लेकीनं या नावाच्या ओझ्यातून तिची सुटका तर केलीच, पण माझीही सोडवणूक केली, हे जास्त महत्त्वाचंय. त्यामुळं ती स्वतंत्र अन् मुक्त तर आहेच, पण, मी सुद्धा तितकाच हलका झालोय. तुम्हीही व्हा ना... फार अवघड नाही... पाहा प्रयत्न करून... नक्की जमेल!