गुरुवार, २० जानेवारी, २०२२

प्रागतिक मुक्ततावादी राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता: डॉ. सूरज येंगडे

Dr. Suraj Yengade



मूळचे महाराष्ट्रातील आणि सध्या अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथील संशोधक डॉ. सूरज येंगडे या वर्षी 'लोकसत्ते'त चतु:सूत्र सदरात लिहीणार आहेत. दोन वर्षांपूर्वी हा तरूण संशोधक भारतात आला असताना शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राने माणगाव परिषद शतकमहोत्सवी व्याख्यानमालेंतर्गत  त्यांचे  व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी त्याकामी पुढाकार घेतलेला. यावेळी सूरज यांच्याशी संवाद साधण्याची, ऐकण्याची संधी लाभलेली. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्लीजंट आहेच, अन् ते आपली मतं, आपलं संशोधन संयतपणानं मात्र ठोसपणानं मांडतात. त्यांची केशभूषा भारतातील एका सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची आठवण देते, मात्र ते तेवढंच. त्याखालच्या डोक्यातले विचार हे १८० अंशांनी वेगळे आहेत.

सूरज यांनी त्यावेळी राष्ट्रवादाच्या अनुषंगाने बाबासाहेबांची आणि समकाळाची मांडणी केली होती.

 "सध्याचा आपला राष्ट्रवाद हा द्वेषाधारित असून त्याने आपला बुद्धीप्रामाण्यवाद आंधळा करून सोडला आहे," असे स्पष्ट मत त्यांनी नोंदविले होते. 

 "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय समाज हा हजारो जातीजातींत विभागला गेला आहे. त्या अंतर्गत आणखी पोटजाती आहेत. इथली प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक नागरिक हा ज्याच्या त्याच्या जातीय-राष्ट्राशी प्रामाणिक आणि बांधील राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. या प्रत्येक पोटजातीत जिचा तिचा राष्ट्रवाद आहे. ही बाब एखाद्या स्फोटकापेक्षा कमी नाही. म्हणून खऱ्या राष्ट्रवादाच्या प्रस्थापनेसाठी प्रथमतः हा जातीजातींमधील, पोटजातींमधील भेद संपूर्णतः नष्ट करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपला राष्ट्रवाद हा परस्पर द्वेषाबरोबरच क्रिकेट-राष्ट्रवाद आहे. यामुळे खेळामध्ये अभिप्रेत असलेल्या खिलाडूवृत्तीला हरताळ फासला जातो आणि अखिलाडू राष्ट्रवाद हा खरा राष्ट्रवाद पुढे आणला जातो. अंबानी, अदानी, मल्ल्या असले धनिक लोक आपल्या राष्ट्रवादाची भूमिका व दिशा ठरवितात. तो देशाचा राष्ट्रवाद म्हणून पुढे केला जातो. कष्टकरी, मजूर, महिला, शोषित, वंचित यांचा राष्ट्रवाद हा आपला कधीच होत नाही. त्याचबरोबर जुन्या काळात संस्कृतीच्या नावाखाली झालेल्या चुकीच्या, समाजविघातक गोष्टींचे नव्याने पुनरुज्जीवन आणि त्यांची बहुजनांच्या पाठिंब्यावरच पुनर्प्रस्थापना करून सांस्कृतिक राष्ट्रवाद या गोंडस नावाखाली थोपविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राष्ट्रवादाचा पुरस्कारच करावयाचा असेल तर तो आर्थिक राष्ट्रवादाचा केला पाहिजे." असे मत सूरज यांनी मांडले होते. 

राष्ट्रवाद या संकल्पनेच्या उगमाविषयी त्यांची मांडणीही चिंतनप्रवण करणारी आहे. ते सांगतात, "राष्ट्रवाद ही संकल्पना समूहवादातून पुढे आलेली आहे. पूर्वीच्या काळी माणूस छोट्या छोट्या समूहांतून राहायचा. त्यामुळे साहजिकच तिथे असुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात असायची. या असुरक्षिततेमधून त्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन देणारा त्यांचा म्होरक्या असायचा. त्याच्याप्रती त्यांना वारंवार उद्घोष व जयजयकार करून आपली निष्ठा प्रदर्शित करावी लागायची. त्यातून त्या राजाचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर तयार होत असत. पुढे आपले वर्चस्व टिकविण्यासाठी वेगवेगळे कायदे करून समाजघटकांवरील आपले नियंत्रण व वर्चस्व अबाधित राखण्याचा हे वरिष्ठ घटक प्रयत्न करीत. मनुस्मृती आणि तत्सदृश कायद्यांनी कनिष्ठ समाजघटकांवर असे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या बळावर त्यांनी हजारो वर्षे आपली सत्ता त्यांच्यावर गाजविली. भारतातील विषमतेचे मूळ या सामाजिक कारणांमध्येच दडलेले आहे. हीच असुरक्षिततेची भीती व दहशत आजच्या राष्ट्रवादातही प्रतिबिंबित झालेली दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादाला भावनिक व मानसिक स्तरावरील दुधारी तलवार म्हणत. राष्ट्रवादासाठी तुम्हाला एक बाह्यशक्ती आणि तिची भिती यांची गरज असते. भीती नसेल तर राष्ट्रवादाचीही गरज नाही, असे ते म्हणत. खरे तर आजच्या युगात अशी भीती नसेल तर आपण उत्तम ग्लोबल सिटीझन होऊन जाऊ; मुक्त, स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरू शकू. मात्र, जागतिकीकरणाने आपल्याला जगाशी उन्मुक्तपणे जोडले, हा सकारात्मक आणि आर्थिक बाबतीत दुय्यमत्व लादले, हा नकारात्मक, असे परिणाम आपल्यावर झाले. या काळात अशा प्रकारचे राष्ट्रवादी होणे आपल्याला परवडणारे नाही. राष्ट्रवाद हवाच असेल तर तो प्रागतिक मुक्ततावादी असायला हवा, महिला सबलीकरणाचा आग्रह धरणारा राष्ट्रवाद असायला हवा, मध्ययुगीन, पुराणमतवादी संकल्पनांतून बाहेर कढून भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने घेऊन जाणारा राष्ट्रवाद हवा, भावनिक आणि मानसिक असुरक्षिततेमधून बाहेर काढणारा राष्ट्रवाद हवा, कोणाला वाचविणारा अगर कोणाला बदनाम करणारा नव्हे, तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या मार्गाने जाणारा राष्ट्रवाद हवा." हेही आवर्जून सांगायला सूरज विसरत नाहीत. 

म्हणूनच डॉ. सूरज येंगडे यांना "वाचायला" मी उत्सुक आहे... आपणही जरूर वाचा...

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

लोकशाही बचावासाठी “मशाल मोर्चा” काढणारे नामांतर सत्याग्रहातील

‘सात भारतीय’

 

औरंगाबाद येथे 'लोकशाही बचाव मशाल मोर्चा' घेऊन निघालेले (डावीकडून) प्रा. दयानंद माने, प्रा. शंकरराव गुंडे, प्रा. एन.डी. जत्राटकर, प्रा. उल्हास वराळे, प्रा. अच्युत माने, प्रा. सुभाष जोशी आणि प्रा. नरेंद्र कुकडे. (दै. इंडियन एक्स्प्रेस, दि. ६ डिसेंबर १९७९)

(छायाचित्र सौ. दै. महाराष्ट्र टाइम्स, दि. ६ डिसेंबर १९७९)







 

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दि. १४ जानेवारी १९९४ रोजी झाला. मात्र, त्याचे बीज रुजवले गेले होते, दि. २७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळात! आंबेडकरी समतावादी विचारांच्या लढवय्यांनी नामांतरासाठी सोळा वर्षांचा अभूतपूर्व लढा दिला, लाठ्याकाढ्या झेलल्या, गावोगावी, वस्त्यावस्त्यांतून अन्याय, अत्याचार, अपेष्टा सोसल्या, तेव्हा कुठे नामविस्तार झाला. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराला यंदा २७ वर्षे होत असतानाच या नामांतरासाठी सीमाभागातून धावून जाणाऱ्या आणि लोकशाही बचाव मशाल मोर्चा काढून लोकशाहीची पताका सन्मानानं मिरविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा निपाणी येथे आज गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये माझे वडील डॉ. एन.डी. जत्राटकर यांचाही समावेश आहे. त्या निमित्ताने...

---

औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर प्रश्नाच्या झळा न बसलेली, न अनुभवलेली अशी आजची पिढी आहे. या नामांतरासाठी सामाजिक न्यायाची चाड असणाऱ्या समताग्रही अशा एका अखंड पिढीने सुमारे सोळा वर्षे अथक आंदोलन चालविले आणि अखेरीस नामविस्तार झाला. ही नामांतराची चळवळ म्हणजे केवळ नामबदलाची अथवा नामप्रदानाची चळवळ राहिली नव्हती, तर तिला एक तात्विक अधिष्ठान प्राप्त होऊन ते समतेच्या लढ्याचे अंग बनलेले होते. म्हणून मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नामांतर फक्त शाब्दीक बदलाचे नसून समतेच्या लढ्याचे रणशिंग ठरले.

केवळ नामांतर होण्याने समता प्रस्थापित होणार होती, असे नव्हते. तथापि, नामांतराच्या निर्णयानंतर उसळलेल्या दंगलींमधून आणि दलितांवरील सवर्णांकडून सुरू झालेल्या अत्याचारामधून आपण दलित वर्गाला समतेने वागविणार की नाही, लोकशाही पद्धतीने न्याय देणार की नाही, असे मूलभूत प्रश्न निर्माण झाले होते. नामांतर झाले नाही, तर दलितांकरिता येथे समता नाही, असे दुष्ट समीकरण निर्माण होण्याची दाट शक्यता राज्यात निर्माण झालेली होती. म्हणून नामांतर हे समतेच्या सर्वांगीण लढ्याचे कृतीशील पर्व बनले होते. नामांतराला समतेचा आशय प्राप्त होऊन ते ते महाराष्ट्रातील समता संग्रामाचे प्रतीक बनले होते.

स्वातंत्र्यलढ्यात मिठाच्या सत्याग्रहाला मोठे महत्व प्राप्त झालेले होते. एक मूठ मीठ उचलल्यामुळे ब्रिटीश साम्राज्यशाही कोसळून पडणार नव्हती. पण साम्राज्यशाहीविरुद्धची आक्रमकता त्यातून स्पष्ट होत होती; म्हणून त्याचे महत्व होते. समतेच्या संघर्षात नामांतराचे नेमके असेच स्थान राहिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महात्मा गांधी, विनोबा भावे, वि.दा. सावरकर, साने गुरुजी यांनीही वेळोवेळी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. या चळवळी केवळ देवदर्शनासाठी नव्हत्या. त्यासाठी वेगळी मंदिरेही दलितांना बांधता आली असती. मात्र, मूळ मुद्दा होता तो समतेचा. ज्या प्रमाणे मंदिरात ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, जैन आदी उच्चवणियांना प्रवेशाचा अधिकार आहे, त्यांच्या बरोबरीने दलितांनाही तो अधिकार असला पाहिजे, असा मूलभूत समतेचा विचार त्यात होता. जातीवरून प्रवेश बंदी नको, ह्या समतेच्या तत्त्वावर मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आधारलेला होता. नामांतर हे सुद्धा केवळ नाव बदलण्यापुरते मर्यादित न राहता समतेच्या लढ्याचे प्रेरणास्थान बनले होते.

त्यातही राज्यासह देशभरात विविध विद्यापीठांना महापुरूषांची नावे सहजरित्या दिली आणि स्वीकारली गेली असताना त्याच तत्वावर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर लोकशाही पद्धतीचा अवलंब करून केले जात असताना त्याला विरोध होण्याचे खरे तर काहीच कारण नव्हते. मग मराठवाडा विद्यापीठाच्या बाबतीत असे का घडले? विरोधकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व न पाहता केवळ त्यांची जात पाहिल्यानेच हा विरोध झाला, हे त्यानंतरच्या घडामोडींतून सहज लक्षात येते. विषमतावादी प्रवृत्तींनी उचल खाल्ल्यामुळेच त्याला विरोधासाठी आंबेडकरप्रेमी समतावादी सरसावले होते. नामांतराचा संबंध हा असा थेट सामाजिक न्यायाशी आणि समतेच्या मूल्याशी थेटपणाने निगडीत होता.

खरे तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास मिळणे हा मराठवाड्याचा गौरवच होता, परंतु प्रतिक्रियावाद्यांनी यासाठी जी प्रचंड खळखळ करून हीन सनातन व संकुचित वृत्तीचे जे दर्शन घडविले, ते खेदजनक होते.

मराठवाडा विद्यापीठास डॉ. आंबेडकर यांचे नाव देणे अत्यंत औचित्यपूर्ण होते. मराठवाड्यात शिक्षणाची गंगा आणण्याबरोबरच विकासाची गंगा आणण्याचे महान कार्यही त्यांनी केले आहे. १९५० साली औरंगाबादेतील पहिले मिलींद महाविद्यालय त्यांनी काढले. जिथे एकही महाविद्यालय नव्हते, अशा ठिकाणी ते त्यांनी काढले होते. शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरील समाजातील विद्यार्थी उच्चशिक्षणाच्या प्रवाहात त्यामुळे सामील होऊ शकले. १९५० साली या महाविद्यालयात दलित विद्यार्थ्यांची संख्या अवघी दोन होती. मात्र, सन १९७७ मध्ये मराठवाडा विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे ७५ हजार विद्यार्थ्यांत दलित, वंचित, शोषित समाजातील विद्यार्थ्यांची संख्या २२ हजारांच्या घरात गेलेली होती. याखेरीज, मराठवाडयातील रस्त्यांची उभारणी, रेल्वेची बांधणी, औरंगाबादेत कॅन्टोनमेंटची स्थापना, खुलताबादचे विश्रामधाम, पाणी योजना इत्यादी विकासाची कामे डॉ. आंबेडकर यांनी साकार केलेली होती. अशा प्रकारे मराठवाड्याला त्याच्या क्षमतेची आणि अस्मितेची जाणीव ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी करून दिलेली आहे, असे म्हणता येते.

नामांतराच्या निर्णयालाही एक इतिहास आहे. दि. २७ मार्च १९७७ रोजी महाडच्या मुक्तिसंग्रामाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने या महान क्रांतिकारक चळवळीला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे झालेल्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे आली. महाराष्ट्रातून आणि मराठवाडयातूनही या मागणीचे स्वागत झाले. पुरोगामी नागरिक, संस्था यांनी त्याला पाठिंबा दिला. मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेने व कार्यकारिणीने एकमताने ठराव करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव म्हणजे मराठवाडयाचा गौरव असे अभिमानाने सांगितले. पुलोद शासनाने विधानसभा व विधानपरिषद या ठिकाणी हा प्रस्ताव एकमुखाने मान्य करून त्यावर दि. २७ जुलै १९७८ रोजी शासकीय शिक्कामोर्तबही केले.

तथापि, हा ठराव जाहीर होताच मराठवाड्यात अभूतपूर्व अशा दंगली पेटल्या. या दंगलीत सरळ सरळ दोन तट पडले. एका बाजूला चातुवर्ण्यवादी, सनातनी, जातीयवादी तर दुसऱ्या बाजूला हजारो वर्षे पिचलेला परंतु बाबासाहेबांमुळे स्वाभिमान जागृत झालेला समाज होता. या दंगलीत नवबौद्ध, मातंग, महारांची घरे जाळण्यात आली. त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्यात आले, त्यांना ठार मारण्यात आले. त्यांच्यासोबत असणाऱ्या, त्यांच्याविषयी सहानुभूती असणाऱ्या सवर्णांनाही दंगलीची झळ पोहोचली. पोचीराम कांबळे याचा पाठलाग करून दगडाने ठेचून खून करण्यात आला. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरचा खून करणे अशा कित्येक अमानुष घटना या काळात घडल्या.

बाबासाहेबांनी जागृत केलेली दलितांची अस्मिता चिरडून टाकण्याचे पद्धतशीर प्रयत्न या काळात झाले. दलितांवरील अन्याय, अत्याचाराची परिसीमा या काळाने पाहिली. या संदर्भातली आकडेवारी खूप बोलकी आहे. मराठवाड्यातील आपदग्रस्त गावांची संख्या ३३०, कुटुंबांची संख्या २४०० आणि जळालेल्या तसेच लुटमारीने उद्ध्वस्त झालेल्या घरांची संख्या १७२५ होती. अवघ्या १५ दिवसांच्या दंगलीची झळ १५,२५० लागली. या अत्याचाराची कारणे ही नामांतरासारख्या प्रासंगिक घटनांत नसतात, तर हजारो वर्षे इथे मनीमानसी रुजलेल्या विषमतावादी सांस्कृतिक जीवनामध्ये असतात.

या दंगलीमुळे शासनालाही नमती भूमिका घ्यावी लागली. नामांतराचा निर्णय न लादता सामोपचाराने, सर्वसंमतीने निर्णय घेऊ, अशी भूमिका जाहीर करावी लागली. प्रत्यक्षात नामांतराचा निर्णय हा योग्य पद्धतीने आणि सर्वसंमतीनेच झालेला होता, हा भाग अलाहिदा! मात्र, शासनाच्या या भूमिकेने अन्यायाची तीव्रता वाढल्याची भावना सर्वदूर निर्माण झाली. मराठवाड्यातील नामांतरवादी जनतेला आपल्या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याची जाणी एकीकडे झाली, तर दुसरीकडे काही नामांतरविरोधी लोकांनीही आपल्या भूमिकेत बदल केला. यामुळे एक प्रकारचे सर्वसमावेशक नैतिक व वैचारिक अधिष्ठान या चळवळीला प्राप्त झाले.

डॉ. बाबा आढाव यांच्यासारख्या विचारवंतांनी प्रत्यक्ष मराठवाड्यात जाऊन तेथील दंगलींचे भीषण चित्रच देशासमोर आणले. परिणामी, महाराष्ट्रातील लोकमतही जागृत होऊ लागले. त्याच सुमारास २० मार्च १९७९ रोजी 'विषमता निर्मूलन समितीतर्फे लातूरला फार मोठे शिबीर घेण्यात आले. त्यात दलित, आदिवासी श्रमिक यांची एकजूट करून समतावादी चळवळीचा ध्वज पुढे नेण्यासाठी नामांतराचे आव्हान स्वीकारण्याचे ठरले. २२ जुलै १९७९ रोजी औरंगाबाद येथे नामांतरवादी कृती समितीच्या सर्वसमावेशक बैठकीत शासनाने हा प्रश्न नोव्हेंबरपूर्वी सोडविला नाही, तर बाबासाहेबांच्या महानिर्वाणदिनी म्हणजे ६ डिसेंबर १९७९ रोजी सविनय कायदेभंग करावा आणि विद्यापीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अशी पाटी लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या सत्याग्रहाचे महत्त्व महाराष्ट्रातील नागरिकांना कळावे म्हणून राज्यभरातून ६ डिसेंबरला औरंगाबादला येण्यासाठी "लाँग मार्च" काढण्याचाही निर्णय घेण्यात आला. चीनच्या माओची प्रेरणा या लाँग मार्चमागे होती. लाँग मार्च हे मराठवाड्याबाहेरील लोकांचे मराठवाड्यावरील आक्रमण नव्हे, तर ती एक समता दिंडी होती आणि ते या देशातील समताग्रही नागरिकच होते.

समितीच्या या निर्णयाला प्रतिसाद म्हणून निपाणीच्या देवचंद महाविद्यालयातील प्रा. नरेंद्र कुकडे, प्रा. सुभाष जोशी, प्रा. अच्युत माने, प्रा. उल्हास वराळे, प्रा. एन.डी. जत्राटकर, प्रा. दयानंद माने आणि प्रा. शंकरराव गुंडे या सात जणांनी समकाळातील सामाजिक न्यायासाठी चाललेल्या या ऐतिहासिक परिवर्तनवादी चळवळीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. केवळ कार्यकर्ते म्हणूनच नव्हे, तर अभ्यासक, सामाजिक संशोधक म्हणूनही तेथील घडामोडींचा अभ्यास करणे, विश्लेषण करणे हा हेतूही त्यांनी उरी बाळगला होता.

दरम्यान, राज्यभरातून लाँग मार्चसाठी प्रचंड प्रतिसाद लाभत होता आणि त्यांना प्रतिरोधही वाढत होता. बाबा आढाव, जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील लाँग मार्च अडविण्यात आले. सत्याग्रहींना ठिकठिकाणी अटक करून स्थानबद्ध करून ठेवण्यात आले.

त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन या सात प्राध्यापकांनी दोन वेगवेगळे गट करून दोन विविध मार्गांनी औरंगाबादकडे कूच केले. रेल्वे स्टेशनवर प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. मनमाड ते औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरात कोणाचीही शंका आली की पोलीस त्याला अडवून ठेवत, अटक करीत; मग तो सत्याग्रही असो, अगर नसो! एखादी रेल्वे स्टेशनात दाखल झाली रे झाली की दोन्ही बाजूंनी पोलीस तिला घेरावच घालत. बस स्टँडवर मात्र तुलनेत कमी बंदोबस्त होता. हे सात सत्याग्रही बस स्टँडवर उतरून औरंगाबाद शहरात शिरले, तेव्हा तेव्हा औरंगाबादला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे त्यांना दिसले. पोलीसांच्या जाळीदार निळ्या वायरलेस असलेल्या जीप्स रस्त्यावरून भरधाव फिरत होत्या. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी पोलीस दंडुके घेऊन उभे होते. पोलीस मुख्यालयासमोर अशा गाड्या आणि रिझर्व्ह पोलीस फोर्सचा प्रचंड ताफाच तयार होता.

या वेळी नेमका नरेंद्र कुकडे सरांचा हात अपघातामुळं फ्रॅक्चर झालेला. तो पाहून पोलीसांनी त्यांना हटकलेच. कहाँ से आये हो, हाथ कैसे टुटा वगैरे चौकश्या त्यांनी केल्याच. पण, सरांनी काहीबाही सांगून वेळ निभावून नेली. मिलींद महाविद्यालय अथवा आंबेडकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तर या फेऱ्यातून सुटका नव्हतीच, पण परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही अडवून ठेवले जाई. अगदी कोण्या पाहुण्याने दलित वस्तीची विचारणा जरी केली, तरी त्याला अटक केले जात असे. अशा प्रकारे वातावरण तप्त झालेले.

अशा १४४ कलम लावून लोकशाहीचे प्राथमिक अधिकारही काढून घेतलेल्या या परिस्थितीमध्ये माहिती मिळणार तरी कशी?

नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या या समस्त विरोधकांचा, दमनशाहीचा विरोध म्हणून तीव्र प्रतिक्रिया उमटविली पाहिजे, असा निर्णय या सात जणांनी घेतला. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि दडपशाही थांबविण्यासाठी लोकशाही बचाव मशाल मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे त्यांनी ठरविले. त्या दृष्टीने ते कामाला लागले. क्रांती चौकात कृती समितीचे सदस्य सुभाष लोमटे आणि हिवराळे हे उपोषणाला बसले होते. त्यांना भेटण्यासही पोलीसांनी मज्जाव केला होता. मात्र, त्यातूनही त्यांची या लोकांनी भेट घेतली. नामांतरवादी कृती समितीचे अध्यक्ष प्राचार्य म.भि. चिटणीस यांची त्यांच्या घरी भेट घेतली. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सात प्राध्यापक असल्याचे समजताच त्यांना अत्यंत आनंद झाला. हा प्रश्न सामाजिक समतेशी कसा निगडित आहे, याचे त्यांनी सविस्तर विवेचन केले आणि यांच्या मशाल मोर्चास पाठिंबा दिला. डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. बापूराव जगताप यांचीही भेट घेऊन मार्गदर्शन व पाठिंबा मिळविला. मिलींद महाविद्यालयाच्या वास्तूचे दर्शन घेतले.

त्यांनी नीलम हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. देशभरातले विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तिथे भेटले. ६ डिसेंबरच्या मोर्चाच्या वार्तांकनासाठी ते औरंगाबादेत ठाण मांडून बसलेले होते. अगदी ब्रिटन, जर्मनीपासूनच्या वार्ताहरांचा त्यात समावेश होता. लोकशाही बचाव मशाल मोर्चाची संकल्पना त्यांनाही पटली.

ठरल्यानुसार मूळ मोर्चाच्या आधी दोन दिवस अर्थात ४ डिसेंबर १९७९ रोजी क्रांती चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार घालून लोकशाही बचावाचे प्रतीक म्हणून मशाल पेटवून हाती धरली. कुकडे सरांचा एक हात जायबंदी आणि दुसऱ्या हातात लोकशाही बचावाची मशाल हा नजाराच अत्यंत आवेशपूर्ण होता. कुकडे सर म्हणजे नितीमानतेचे शिखर. हयातभर प्राध्यापकांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या या माणसानं तत्त्वांशी, मूल्यांशी कधीही तडजोड आणि प्रतारणा केली नाही. अशा माणसाच्या नेतृत्वाखाली हेसर्व प्राध्यापक लोकशाही बचावच्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने चालू लागले. समस्त औरंगाबादचे लक्ष या मोर्चाने वेधून घेतले. मोठा जमाव गोळा झाला. बरेचजण मोर्चासमवेत चालू लागले. साधारण दोनेक किलोमीटर मोर्चा गेला असेल, तोवरच एक पोलीस व्हॅन थेट रस्त्यात आडवी घालूनच मोर्चा अडविण्यात आला. जमावाला हाकलण्यात आले. या सातही प्राध्यापकांना अटक करण्यात आली. लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चा काढणाऱ्या प्राध्यापकांवर १३५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन रात्री मॅजिस्ट्रेटसमोर सादर करण्यात आले. त्यांनी १० डिसेंबरपर्यंत रिमांड घेऊन त्यांची रवानगी तुरुंगात केली.

हर्सुल सेंट्र जेलचे सात दरवाजे पार करून हे सत्याग्रही तुरुंगात आले. वॉर्ड क्रमांक ७मध्ये त्यांना ठेवण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ शेकडो सत्याग्रहींचे लोंढे तुरुंगात दाखल होतच होते. त्यामुळे तेथेही दररोज सत्याग्रहींच्या बैठका, सभा घेण्याचे सत्र त्यांनी सुरूच ठेवले. त्यांच्या ओळखी, प्रबोधन, पुढील कार्यक्रमाची आखणी वगैरे बाबी तेथेही या धडपड्या प्राध्यापकांनी केल्या. समाजशास्त्रज्ञ असलेल्या माझ्या वडिलांनी अर्थात, डॉ. एन.डी. जत्राटकरांनी तुरुंगात विविध शिक्षा भोगत असलेल्या सुमारे दीडशे ते दोनशे जणांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या हकीकतींमधून गुन्हेगारांचे जग त्यांनी जगासमोर आणले. तुरुंगातून सुटून आल्यानंतर दै. पुढारीच्या रविवार पुरवणीमध्ये (दि. ३० डिसेंबर १९७९) त्यांनी सलग दोन आठवडे गुन्हेगारांचे जग याच विषयावर प्रदीर्घ लेख लिहीला.

तुरुंगातून सुटून परतल्यानंतर नामांतर विषयाची सविस्तर आग्रही मांडणी करणारी ३५ पृष्ठांची नामांतर: समता संघर्षाचे नवे पर्व ही पुस्तिकाही प्रकाशित केली. या पुस्तिकेच्या माध्यमातून नामांतराच्या लढ्याची ही कहाणी आणि त्यातील या ध्येयनिष्ठ प्राध्यापकांचे योगदान समाजासमोर आले. पुढेही ते सन १९९४ पर्यंत नामांतर होईपर्यंत या लढ्याची प्रेरणा म्हणून सक्रिय काम करीत राहिले आणि आज आम्ही त्यांच्याकडे त्या इतिहासाचे कृतीशील साक्षीदार म्हणून अभिमानाने पाहतो आहोत. नामांतरासाठी सुरू असलेल्या लोकलढ्यातील लोकशाही पर्यायाने नागरिकांच्या सांविधानिक अधिकार व मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी धोका पत्करूनही खांद्यावर घेणाऱ्या या सात भारतीयांच्या या महत्त्वपूर्ण कार्याला मनःपूर्वक सलाम!

 

संदर्भ: १. नामांतर: समता संघर्षाचे नवे पर्व

२. डॉ. एन.डी. जत्राटकर यांची मुलाखत (दि. १८ जानेवारी २०२२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधरपंत टिळक यांचे मैत्र

 



“‘लोकमान्य ही पदवी टिळक घराण्यातील कोणास शोभून दिसली असती तर ती श्रीधरपंतांसच होय. सख्ख्या भावापेक्षाही माझा त्यांच्याशी जिव्हाळा होता, असे उद्गार साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले ते श्रीधरपंत बळवंत टिळक यांच्याविषयी होय. श्रीधरपंत हे बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र. बाबासाहेबांच्या समाज समता संघाची शाखा पुण्यात उघडून तिचे कार्यालय थेट गायकवाड वाड्यात उघडणाऱ्या आणि तेथे चातुर्वर्ण्यविध्वंसक समाज समता संघ असा फलक लावणारे श्रीधरपंत हे पुत्र जरी टिळकांचे असले, तरी त्यांनी वारसा चालविला आगरकरांचा आणि मैत्र संपादले डॉ. आंबेडकरांचे! बाबासाहेबांवर आणि त्यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यावर त्यांची निरतिशय श्रद्धा होती. प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता आणि सार्वजनिक, सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. गायकवाड वाड्यातील गणपती उत्सवात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला, ही त्या काळातील किती कृतीशील क्रांतीकारकता होती. केसरीमधील ट्रस्टींसमवेतच्या वादाला कंटाळून त्यांनी वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी (२५ मे १९२८) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अवघे तीन तास आधी त्यांनी तसे बाबासाहेबांना पत्राद्वारे कळविले, यातूनच त्यांचे बाबासाहेबांवरील प्रेम दिसून येते. श्रीधरपंत आणि डॉ. आंबेडकर यांच्या याच स्नेहबंधाला उजाळा देऊन आजच्या पिढीपर्यंत श्रीधरपंतांचे कार्य पोहोचविणे, यासाठीच हा लेखनप्रपंच.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ सप्टेंबर १९२७ साली समाज समता संघाची स्थापना केली. समता तत्त्वावर आधारित हिंदू समाज निर्मिती करणे हे या संघाचे ध्येय ठरविण्यात आले होते. संघाच्या कार्यकारिणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता सर्व पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ सवर्ण समाजातील होते. कार्यकारिणी अशी: अध्यक्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उपाध्यक्ष: डॉ. आर. एन. भाईंदर (एमबीबीएस), देवराव वि. नाईक, संपादक- ब्राह्मण-ब्राह्मणेतर, सेक्रेटरी: १) एस. एस. गुप्ते, बीएसस्सी, २) बी.व्ही. प्रधान, बीए (ऑनर्स), खजिनदार: आर. डी. कवळी, बीए, कार्यकारी मंडळ: १) एफ. डी. डिसिल्व्हा, बीए, २) व्ही. आर. घोनकर, बीए. ३) डी. विठ्ठलराव प्रधान, ४) पी. पी. ताम्हाणे, बीए. ५) आर. जी. प्रतापगिरी, बीए (ऑनर्स), ६) जे. पी. मुळे, ७) एन. व्ही. खांडके, ऑडिटर्स: १) डी. बी. सुभेदार, एसीआरए २) आर. एम. कर्णिक, बीए.

समाज समता संघाची उद्दिष्टे मूलभूत मानवी अधिकारांना केंद्रवर्ती मानणारी होती. सर्व मनुष्य प्राणी समानाधिकारी असून स्वत:तील मनुष्यत्वाच्या विकासाठी कारणीभूत होणाऱ्या साधनांवर, सवलतींवर व संधींवर त्या प्रत्येकाचा समान हक्क असतो, असा या संघाचा विश्वास आहे. समतेचा हक्क हा पवित्र, अबाधित व अभेद्य आहे. हा हक्क जन्मसिद्ध व वर्ण, जात व स्त्री-पुरुष भेदातीत आहे. सामाजिक समता अस्तित्वात आल्याशिवाय समाजाचा सामुदायिक जीवनक्रम सुरळीत चालणे अशक्य आहे. समाजाच्या सुरळीत व सुसंघटित आयुष्यक्रमाला बाधक होणारे सर्व विचार, आचार (कार्ये) व संस्था ही सारी समाज समानत्वाच्या विरुद्ध आहेत, अशी या संघाची निर्देशपूर्वक घोषणा आहे. सर्व त्या उपायांनी वरील तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचा या संघाचा संकल्प आहे, अशी उद्दिष्टे घेऊन समाज समता संघ अस्तित्वात आलेला होता. बा. न. घोरपडे, यांनी समताच्या पहिल्याच अंकात या संघाची ध्येयधोरणे स्पष्ट करताना म्हटले होते की, "हिंदूसभेच्या भित्र्या व लपंडावी धोरणाचा आता खऱ्या जनतेला वीट आला आहे. सहभोजने, मिश्रविवाह (अनुलोम- प्रतिलोम) इत्यादी प्रत्यक्ष उपायांनी हिंदू समाजाची आजची चातुर्वर्ण्यमूलक व्यवस्था उलथून पाडून समतेच्या पायावर त्याची नवी उभारणी व संघटना करण्याचे अवघड पण अनिवार्य काम समाज समता संघासमोर आहे. सुदैवाने संघाला डॉ. आंबेडकरांसारखे विद्वान व धीरोदात्त कर्णधार लाभले आहेत. समता क्रांतीवादी तरुण आपल्या झेंड्याभोवती गोळा करण्याचे सामर्थ्य व आकर्षकत्व त्यांचे ठायी खास आहे.

या ध्येयधोरणांच्या पूर्तीसाठी संघाच्या समस्त कार्यकारिणीने एकदिलाने आपल्या कार्यास प्रारंभ केला होता. त्यासाठी प्रसंगी यातील अनेकांना त्यांच्या समाजाकडून त्रास सोसावा लागला. काहींना तर त्यांच्या ध्येयनिष्ठेचे फलित म्हणून वाळीतही टाकण्यात आले. मात्र, त्यांनी अंगिकृत कार्यास अंतर दिले नाही.

सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अत्यंत सनातन व कर्मठ असणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांचे १९ मार्च १८९६ रोजी जन्मलेले श्रीधर बळवंत टिळक यांना मात्र सामाजिक सुधारणांविषयी तीव्र आस होती. श्रीधरपंत आणि त्यांचे बंधू रामचंद्र यांचा आणि केसरी ट्रस्टी यांचा वाद कोर्टात सुरू होता. केसच्या कामासाठी मुंबईला आले की, ते बाबासाहेबांना भेटल्याखेरीज पुण्याला परत जात नसत. बाबासाहेबांनी आपली केस घ्यावी, अशी त्यांची खूप इच्छा होती. मात्र, बाबासाहेबांनी एकूण परिस्थितीचा विचार करून केस घेण्यास नकार दिला. बाबासाहेब कधी पुण्याला गेले की त्यांना गायकवाड वाड्यातील आपल्या घरी घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करीत. मात्र, माझ्या येण्यामुळे आपणास उगाच त्रास होईल, असे सांगून बाबासाहेब त्यांना परत पाठवित असत.

श्रीधरपंतांचा सामाजिक चळवळीकडे खूपच ओढा होता. समाज समता संघाची शाखा पुण्याला सुरू करावी आणि संघाची कचेरी आपल्या घरी असावी, असे ते बाबासाहेबांना बोलून दाखवत. तुमच्या केसचा निकाल लागल्यानंतर तुम्ही संघाच्या चळवळीत भाग घ्या, असा सल्ला त्यांना बाबासाहेबांनी दिलेला. तो त्यांनी स्वीकारला.

त्यानुसार, ८ एप्रिल १९२८ रोजी समाज समता संघाच्या पुणे शाखेचे उद्घाटन ठरले. खास या समारंभासाठी ७ एप्रिलच्या रात्रीच्या गाडीने डॉ. आंबेडकर, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, द.वि. प्रधान, कद्रेकर, शिवतरकर, भंडारे, भा.वि. प्रधान आदी मंडळी पुण्याला दाखल झाली. गायकवाड वाड्यातील श्रीधरपंतांच्या घरीच त्यांचा मुक्काम होता. रात्री संघस्थापना, सहभोजन आदी कार्यक्रम झाले. श्रीधरपंतांच्या पत्नी सौ. शांताबाई यांनी दोन ब्राह्मण स्त्रियांच्या सहाय्याने सहभोजनासाठीचा स्वयंपाक केला. पंतांनी स्वतः पंगतीला पाने मांडली, जेवण वाढले आणि सर्वांना विडे दिले. स्वयंपाक चालू असताना पंतांच्या घरातील विजेचे दिवे बंद पडले, तेव्हा त्यांनी मेणबत्त्या, कंदील, गॅसच्या बत्त्या घरात पेटवून सर्व समारंभ अत्यंत उत्साहाने पार पाडला. ही तपशीलवार नोंद भा.वि. प्रधान यांनी दुनिया वृत्तपत्रातील लेखामध्ये दिली आहे.

श्रीधरपंतांच्या सामाजिक कळकळीविषयीची एक ठळक नोंद सत्यशोधक पक्षाचे धुरीण दिनकरराव जवळकर यांनी केली आहे. ते म्हणतात, जेव्हा टिळक बंधूंनी गायकवाड वाड्यातील गणपतीपुढे अस्पृश्यांचा मेळा नेण्याचे ठरविले, त्या वेळचा प्रसंग अजून आमच्या दृष्टीसमोर दिसत आहे. श्रीधरपंतांनी अस्पृश्य मेळा नेण्याचा निर्धार केला होता. एक दिवस दुपारी आम्हाकडे जेध्यांच्याकडून सारखी बोलावण्यावर बोलावणी येऊ लागली. आम्हाला कारण काहीच कळे ना. जेधे यांच्याकडे जाऊन पाहतो तो तेथे आमची वाट पाहात श्रीधरपंत बसलेले! जेधे मेन्शनमध्ये जवळकरांची वाट पाहात टिळकांचा मुलगा बसला आहे, असे वाक्य जर त्यापूर्वी कोणी उच्चारले असते तर त्याला लोकांनी वेड्यात काढले असते. परंतु, यावेळी श्रीधरपंत-टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत-ब्राह्मणेतर तत्त्वावर, सत्यशोधक चळवळीवर प्रेम करणारे बनले होते. अस्पृश्य मेळा वाड्यात नेण्याचा त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला. त्याचवेळी जेध्यांच्या मारुती देवळातही तोच मेळा आम्ही आत घेऊ, असे श्री. जेधे यांनी कबूल केले. या वेळेपासूनच श्रीधरपंतांच्या खऱ्या सार्वजनिक आयुष्याची सुरवात आहे. यानंतर त्यांनी अत्यंत धैर्याने अस्पृश्योद्धाराच्या चळवळीकडे आपले लक्ष घातले. समाज समता संघाची पुण्यात स्थापना करून आपल्या वाड्यात सहभोजन घडविले.

यानंतर पुढच्याच महिन्यात २५ मे १९२८ रोजी श्रीधरपंतांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भांबुर्डा स्टेशनानजीक पूना मेलखाली झोकून देऊन आत्महत्या केली.

श्रीधरपंतांच्या आत्महत्येचा वृत्तांत केसरीच्या २९ मे १९२८ रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाला. त्यात असे म्हटले होते की, ... श्रीधरपंतांच्या पत्नीने विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशा अर्थाच्या बातम्या शहरात पसरल्या आहेत, पण त्या अगदी निराधार आहेत. त्याचप्रमाणे श्रीधरपंतांच्या आत्महत्येच्या कारणासंबंधाने वाटेल ते तर्क करण्यात येत आहेत. केवळ ऐकीव गोष्टींवरुन लोकांनी तर्क करू नयेत... त्यांचा स्वभाव विनोदी, स्पष्टोक्तिप्रिय, मनमोकळा आणि बराच भावनाप्रधान होता. यामुळे कोणताही खाजगी अगर सार्वजनिक विषय डोक्यात भरला अगर मनाने घेतला म्हणजे त्यावाचून दुसरे काही त्यांना सुचत नसे... त्यांची मते व कार्यपद्धती कोणास सर्वस्वी मान्य नसली तरी त्यांच्या तडफदार लेखनशैलीची वाखाणणी त्यांच्या विरोधी मताचेही लोक करीत असत. आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणेच्या कार्यास त्यांनी प्रारंभही केला होता. अशा स्थितीत त्यांनी एकाएकी इहलोकीच्या आयुष्यास कंटाळून प्राणहत्या करण्यास प्रवृत्त व्हावे, हे अकल्पित दैवदुर्विलसित होय...

अस्पृश्यांच्या समाज समता संघाच्या चळवळीशी श्रीधरांनी संबंध ठेवला म्हणून त्यांना पश्चाताप झाला, म्हणून त्यांनी आत्महत्या केली, अशा प्रकारच्या कंड्या पिकविण्याचे प्रयत्न त्यावेळी पुण्यात झाले. त्याचा प्रतिवाद श्रीधरपंतांचे वडिलबंधू श्री. रामचंद्र टिळक यांनी स्वतःच केला. ज्ञानप्रकाशला दिलेल्या मुलाखतीत रामभाऊ म्हणाले, पुण्यामुंबईतील काही प्रतिष्ठित पण खोडसाळ वृत्तपत्रकारांनी माझ्या बंधूंच्या आत्महत्येसंबंधात ज्या काही बेजबाबदार हकीकती प्रसिद्ध केल्या आहेत, त्याबद्दल मला आश्चर्य वाटते. त्याचा तीव्र निषेध आणि इन्कार करणे माझे कर्तव्य आहे. समाज समता संघ स्थापन केल्याचा पश्चाताप म्हणून श्रीधरपंतांनी आत्महत्या केली, असे म्हणणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. तो संघ स्थापन केल्याबद्दल त्यांना कधीही पश्चाताप वाटला नाही. उलटपक्षी, तो स्थापन झाल्या दिवसापासून त्यांना एक प्रकारचे समाधान वाटत होते. इतकेच नव्हे, तर सातारा, नगर, नाशिक, वगैरे ठिकाणी त्या संघाच्या शाखा स्थापन करण्याच्या खटपटीत ते होते. हा निर्धार त्यांनी माझ्याजवळ व रा. पां.ना. राजभोज वगैरे मित्रमंडळींजवळ कित्येक वेळा बोलूनही दाखविला होता. अशा स्थितीत त्यांच्या आत्महत्येचा संबंध समाज समता संघाच्या स्थापनेशी लावणे यासारखा अप्रयोजकपणा दुसरा कोणताच नाही, असे म्हटले तरी चालेल...

श्रीधरपंतांनी आत्महत्येच्या दिवशीच रा.का. तटणीस आणि डॉ. आंबेडकर यांना पत्रे लिहीली होती. बाबासाहेबांना लिहीलेले हे पत्र अत्यंत हृद्य स्वरुपाचे आहे. त्यात श्रीधरपंतांनी म्हटले होते, हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वी बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल. आपल्या समाज समता संघाचे अंगिकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता, याबद्दल मला फार संतोष वाटतो. आपले प्रयत्नांस परमेश्वर यश देईल, याची खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्,त सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळींस माझा सप्रेम नमस्कार सांगावा. कळावे, लोभ असावा, ही विनंती. आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक (२५-५-२८)

श्रीधरपंतांच्या हृदयद्रावक मृत्यूनंतर समाज समता संघातर्फे दुखवटा सभेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचा एक तेजस्वी कार्यकर्ता, तरुण समाजक्रांतिवीर मृत्युमुखी पडला!' असा ध्वनी या सभेत उमटला. सभेला केशवराव ठाकरे, वरेरकर, पी. आर. लेले, देवराव नाईक, सीतारामपंत बोले, जोगळेकर, आचार्य फासे, प्रधान बंधू, श्री. कवळी, खांडके, कद्रेकर, जाधव, उत्तमराव कदम, गोपीनाथ प्रधान, सौ. मनोरमाबाई प्रधान वगैरे मंडळी उपस्थित होती. अस्पृश्य बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.

सभेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, (कै.) श्रीधरपंतांचा व माझा संबंध सख्ख्या भावापेक्षा अधिक जिव्हाळ्याचा होता. समाज समता संघाशी त्यांचा संबंध जुळून आल्यापासून त्यांच्याविषयी मला विशेष आपलेपणा वाटत असे. त्यांनी सामाजिक सुधारणेच्या कार्याला गती देण्याची जी धडाडी दाखविली, तिची किंमत मला अधिक श्रेष्ठ प्रतीची वाटू लागली होती. जुने लोक, जुनी परंपरा आज बाजूला ठेवून आणि दूरवर विचार करून पाहिले, आजच्या नवीन नवमतवादी पिढीचा विचार केला तर त्यात कै. श्रीधरपंत मोठ्या लोकमान्यतेस पात्र होते, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही. समाज समता संघाच्या चळवळीला मुद्दाम जाणूनबुजून जे एक प्रकारचे निष्कारण छळावे, असे हीन वृत्तीचे वातावरण हिंदुस्थानात उत्पन्न होत होते, त्याला टक्करच म्हणून की काय श्रीधरपंतांनी समाज समता संघाची शाखा प्रत्यक्ष आपल्या घरी लोकमान्यांच्या गायकवाड वाड्यात स्थापन करून जे अलौकिक धैर्य दाखविले ते खरोखर कौतुकास्पद होते.' बाबासाहेबांनी यावेळी श्रीधरपंतांचे अखेरचे पत्रही वाचून दाखविले.

याखेरीज श्रीधरपंतांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणारा एक विस्तृत लेख २ जून १९२८ रोजीच्या दुनिया वृत्तपत्राच्या अंकात लिहीला. तो असा-

(कै.) श्रीधर बळवंत टिळक

लेखक- डॉ. भीमराव आंबेडकर

 

मी ता. २६ मे ला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेकरिता गेलो होतो. आदल्या दिवशी मी जेव्हा मुंबईहून निघालो, त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही, याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्यात आत्महत्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे, असा ध्वनी उमटण्यासारखे काहीच नव्हते. दुपारी फार ऊन असल्यामुळे रा. लबाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी ६ वाजता सुरू झाली. सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे सभेचे काम फार उत्साहाने चालले होते. हिंदू महासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे, या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली, यामुळेच मला थोडा धक्का बसला. वाचून पाहतो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो, त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र श्री. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी. मी अगदी गांगरून गेलो. आधी हे खरेच वाटेना. परंतु ही तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो. गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपण आरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला, हे जाणून माझे मन उद्विग्न झाले. श्रीधरपंतांना कोणी तरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा, असा माझा प्रबल तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे कारण हेच की दुसरे कोणते, हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल, असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. टाइम्स हातात घेतो, तोच श्रीधरपंतांच्या हातचे मरणापूर्वी तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा टाइम्स टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आत्महत्या हेच मरणाचे कारण होय, हे अगदी स्पष्ट झाले.

मग तर अगदीच कष्टी झालो. श्रीधरपंताला मी थोडासा दोषही दिला. आत्महत्या हा मरणाचा एक भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्या घडली ती कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंतांची आत्महत्या मोठी हृदयद्रावक होती, असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य केसरी कंपूशी भांडण्यात जाणार, आपल्याला विधायक काम करण्यास अवसर राहणार नाही, यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्या करणे बरे, असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतावर यावी, यासारखी अनिष्ट गोष्ट ती कोणती? माझ्या मते श्रीधरपंतांना केसरीत जागा मिळाली असती, तर हा घोर प्रसंग आलाच नसता. केसरी पत्रात आपणास जागा मिळावी, ही एक त्यांची महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती केसरी गेला, त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकारांची फेड या दृष्टीने केसरीच्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणूनच नव्हे, तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता. राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते- जहाल, सुताळ आणि बेताल या सर्वांच्या पेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने केसरीला काही धोका नव्हता. असे असताना त्यांना केसरीत जागा मिळाली नाही, याचे मला राहून राहून मोठेच आश्चर्य वाटते. केसरीत जागा मिळाली असती, तरीही केसरी कंपूचा भांड लागून जे व्हायचे ते झालेच असते, असे काही लोक म्हणतील. कसेही असो! एवढी गोष्ट खास की, निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे जर ते असते, तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्ट डीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज जे केसरीचे ट्रस्टी म्हणून वावरत आहेत, त्यांना तसे वावरता आले नसते. केसरी कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे, याची आठवण केसरी कंपूला असती, तर किती बरे झाले असते.

श्रीधरपंतांचा मृत्यू हा खरोखरच दैवदुर्विपाकाचा एक मासला आहे. मनुष्यमात्राच्या आयुष्याच्या पूर्ततेस अवश्य असलेली सामग्री (कै.) श्रीधरपंतांच्या भाग्याने त्यांच्या उशास ठेवलेली होती. साधनसामग्रीचा उपयोग करण्याइतकी बुद्धिमत्ताही त्यांना होती. सार्वजनिक कामाची कळकळ व एखादी गोष्ट तडीस नेण्यास अवश्य असणारी धडाडी या दोन्ही गोष्टी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या होत्या. त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ असल्यामुळे जनतेला वश करून घेण्यात त्यांना अवधी लागला नसता. अशा सर्वतोपरी पुढारीपणास लायक असलेल्या तरुणाचा अंत झालेला पाहून कोणास खेद होणार नाही?

सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांचा जहालपणा सर्वांनाच माहीत आहे. समता संघाच्या कार्यावर त्यांनी किती भर दिला होता, हे त्यांच्या पत्रावरून उघड होत आहेच. समता संघाच्या स्थापनेचा पश्चात्ताप होऊन आत्महत्या केली, अशा मूर्खपणाच्या वल्गना करणाऱ्या भालाकाराने आपला शहाणपणा आटोपता घ्यावा, हे बरे. समता संघाच्या कार्याला त्यांना किती अंतिम स्वरूप द्यावयाचे होते, हे त्यांनी आपल्या गायकवाड वाड्यावर नुसते 'समाज समता संघ' असे नाव न देता 'चातुर्वर्ण्य विध्वंसक समाज समता संघ' हे नाव दिले, यावरून सिद्ध होत आहे. आपल्या वडिलांची समाजकार्य वगळण्यात चुकी झाली, हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले, यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. त्यांना स्पष्टपणे कळून आले होते की, अर्धशतक राजकारणाचा अट्टाहास करूनही त्याच्या फलश्रुतीच्या आड जर कोणती एखादी गोष्ट आली असेल तर समाजकारणाचा अभाव हीच होय. या समजुतीप्रमाणे त्यांचा उद्योगही चालला होता. तो उद्योग किती धडाडीचा होता, हे कोणासही सांगण्याचे कारण नाही.

हल्लीच्या काळी महाराष्ट्रातील तरुणांत श्रीधरपंतांच्या तोडीचा तरुण सापडणे अत्यंत कठीण आहे. तरुण महाराष्ट्र परिषदेत जिभल्या पाजळणारे तरुण कोणीकडे आणि आमचे श्रीधरपंत कोणीकडे? ठरावांची रेलचेल करून गिरीकंदरी लपून बसणाऱ्या तरुणांतील भेकड तरुण ते नव्हते. त्यांचा निश्चय, जोम व कर्तबगारी ही सारी अवर्णनीय होती. ते जगले असते, तर महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण्याचे महान कार्य त्यांनी तडीस नेले असते. याचमुळे श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी मला थोडा राग येतो. सामाजिक सुधारणेच्या अंगीकृत कार्यात आपणास केवढे स्थित्यंतर घडवून आणता येईल, याची त्यांना यथार्थ कल्पना असावयास पाहिजे होती व त्या कार्यासाठी तरी निदान त्यांनी जगावयास पाहिजे होते. नुसत्या जगण्यात हशील नाही हे तत्त्व मलाही मान्य आहे. परंतु सफल जीवन स्वार्थासाठी नाही, तरी परार्थासाठी साठवलेच पाहिजे. श्रीधरपंतांना याचा विसर पडला.

मला त्यांच्यासंबंधी काय वाटते, हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे, यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. (कै.) श्रीधरपंत टिळक एका ब्राह्मण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव. त्यांचे वडील लो. टिळक यांना १९१९ साली जेव्हा मी मूकनायक पत्र चालवीत असे त्यावेळी, दर अंकात जरी नसले तरी अंकाआड, शिव्याशापांची लाखोली वाहत असे. ब्राह्मण्याशी अहर्निश झगडणाऱ्या माझ्यासारख्या अस्पृश्य जातीतील एका व्यक्तीने ब्राह्मण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दुःखित व्हावे, हा योगायोग तर त्याच्याहीपेक्षा विशेष विलक्षण आहे, हे कोणीही कबूल करील. परंतु हा योगायोगच श्रीधरपंतांच्या मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे. कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती, तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे- हिंदुस्थानावरील मोठीच आपत्ती आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छु माणसास कबूल करणे भाग आहे.'

अस्पृश्यता निवारणादी समाज सुधारक कार्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या श्रीधरपंतांकडून किती अपेक्षा होत्या, त्यांच्याविषयी किती ममत्व होते, हे या लेखामधून किती प्रत्ययकारकतेने दिसून येते. केवळ एवढ्यावरच न थांबता समाज समता संघाच्या समता या मुखपत्राचा प्रकाशन दिन हा श्रीधरपंतांच्या स्मृती जपण्यासाठी म्हणून शुक्रवार ठरविण्यात आला कारण याच दिवशी ते कालवश झाले. तसा खुलासा समतेच्या पहिल्या अंकात आठव्या पानावर श्रीधरपंतांच्या छायाचित्रासह छापण्यात आला होता. त्या छायाचित्राच्या डाव्या बाजूला श्रीधरपंतांनी बाबासाहेबांना पाठविलेले अखेरचे पत्र त्यांच्या हस्ताक्षरातच छापले होते.

असे होते या दोन महान व्यक्तीमत्त्वांचे मैत्र अन् एकमेकांप्रती जिव्हाळा!

 

(संदर्भ:- खैरमोडे, चां.भ., डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, सुगावा प्रकाशन, पुणे (तिसरी आवृत्ती, जुलै २००३))