रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

आम्ही तो येरागबाळे...

 

संत तुकाराम (प्रातिनिधिक छायाचित्र)


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होतो. त्यावेळी गांधीजींच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने बोलताना बोलून गेलो की, महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान जितके सोपे वाटते, तितकेच ते अंगिकारण्यास अवघड आहे. गांधी तत्त्वज्ञान आचरणात आणणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. याचे कारण म्हणजे आपल्या सर्वांभोवती चढलेली भौतिकवादाची, चंगळवादाची पुटे होय. जोवर आपण ती दूर करीत नाही, तोवर गांधींची सत्य, अहिंसा आणि मानवतावादी मूल्ये यांपासून आपण दूरच राहू... असे मला समजलेल्या गांधींबाबत मी बोलून गेलो. कार्यक्रम झाला. उत्तमच झाला.

रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास साताऱ्याहून एका अॅकॅडेमिशियन व्यक्तीचा फोन आला. इतक्या उशीरा फोन केला म्हटल्यावर त्यांनी मोठ्या कष्टानेच माझा क्रमांक शोधला असावा. त्यांनी बोलायला सुरवात केली. म्हणाले, सर, कार्यक्रम चांगला झाला. मात्र, इतक्या मोठ्या अॅकॅडेमिक कार्यक्रमात तुम्ही अत्यंत नॉन-अॅकॅडेमिक शब्द वापरलात. विशेषतः गांधीजींच्या संदर्भात हा शब्द वापरल्याने तो अधिक खटकला. तुम्हाला कदाचित दिवसभरातही अनेकांचे फोन आले असतील त्यासाठी. पण म्हटले आपणही सांगायला हवे, म्हणून फोन केला.

इकडे त्याच्या शब्दागणिक माझी हवा टाइट होत चाललेली. फोन तर इतर कोणाचाही नव्हता आलेला. सध्याचा काळ काही बोलण्या-लिहीण्यासाठी अत्यंत बेकार स्वरुपाचा आहे. कोणाच्या भावना कुठे दुखावल्या जातील अन् कोणाच्या अस्मितांना कधी धक्का पोहोचेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे नाही म्हटलं तरी मी टेन्शनमध्ये येत चाललो होतोच. मी विचारलं, अहो, कोणता शब्द, ते तरी सांगा. त्यावर महोदय उत्तरले, येरागबाळा हा शब्द तुम्ही वापरलात, हे काही योग्य केले नाहीत. विद्यापीठासारख्या अॅकॅडेमिक व्यासपीठावरुन असा नॉन-अॅकॅडेमिक शब्द वापरला जाणेच मुळात आक्षेपार्ह आहे. मनात म्हटलं, बाप रे! आता या शब्दाचा वापर ज्या संदर्भात केला आहे, ते लक्षात न घेता या महोदयांची गाडी या शब्दावरच अडून बसलेली आहे. आजकाल असा ट्रेन्डच झालाय म्हणा. एखाद्या वाक्याचा मागील पुढील संदर्भ काढून टाकायचा आणि आपल्याला हव्या त्या संदर्भानं तो पेश करायचा की झालं. आपली ठरविलेला मोहीम यशस्वी होते. इथे मात्र यांचा रोख तसा थेट नव्हता. नसला तरी त्यांनी फोन करून सांगण्याची भूमिका मला आजच्या भोवतालात स्वागतार्ह वाटली. म्हणून मग त्यांचं निरसन करायचं ठरवलं. सुरवातीला उद्धृत केलेलं वाक्य आठवून मी पुन्हा त्यांना सांगितलं. आणि मग म्हणालो, येरागबाळा हा काही नॉन-अॅकॅडेमिक अथवा असंसदीय शब्द आहे, असं म्हणता येणार नाही. संत तुकोबारायांनी योजलेला शब्द आहे तो. पर्यायी इंग्रजीत सांगायचं तर, गांधी तत्त्वज्ञानावर बोलणं आणि त्याहूनही ते आचरणात आणायचं म्हणजे कोणाही टॉम, डिक वा हॅरीचं काम नाहीये ते! हिंदीमध्ये आपण त्यांना लल्लू-पंजू असंही म्हणतो. मी त्यांना असं बरंच काही सांगत राहिलो. त्यांचं समाधान झालं की नाही, त्यांनी समाधान मानून घेतलं की नाही, माहीत नाही. पण, या शब्दाच्या नॉन-अॅकॅडेमित्वात मात्र मी गुरफटला गेलो.

कोणत्याही विद्यापीठात न शिकलेले तुकोबाराया हे स्वतःच एक संतपीठाचे महान विद्यापीठ बनून राहिले आहेत. त्यांच्यावर, त्यांच्या गाथेतील शब्दावर नॉन-अॅकॅडेमित्वाचा आरोप करणाऱ्या तथाकथित अॅकॅडेमिशियन्सच्या तुकाराम शिकवायच्या अधिकारावरचंच प्रश्नचिन्ह वाटलं ते मला. अनुभवाशिवाय बोलणाऱ्यांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेताना संत तुकारामांनी म्हटले आहे की,

नका दंतकथा येथे सांगू कोणी।

कोरडे ते मानी बोल कोण।।

अनुभव येथे व्हावा शिष्टाचार।

न चलती चार आम्हांपुढे।।

निवडी वेगळे क्षीर आणि पाणी।

राजहंस दोन्ही वेगळाली।।

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे।

येरागबाळाचे काय काम।।

अर्थात, कोणत्याही विषयातले (विशेषतः अध्यात्मातील) तुम्हाला काहीही कळत नसताना आपल्याला खूपच कळते, असा आव आणून त्यासंदर्भात कपोलकल्पित कथा रचून लोकांना सांगणारे वाचाळवीर खूप असतात. त्यांना फटकारताना तुकोबाराय म्हणतात की, तुम्ही मंडळी, येथे लोकांना दंतकथा सांगत बसू नका. अनुभवविरहित असे ते आपले बोलणे कोण बरे ऐकत बसेल? अनुभव असेल तरच बोलावे, हाच शिष्टाचार बनला पाहिजे. अन्यथा अनुभवाविना बोलणाऱ्यांची आमच्यापुढे काही खैर नाही.

राजहंस जसा पाण्यात मिसळलेले दूध पाण्यापासून वेगळे काढून पितो, त्याप्रमाणे अनुभवी व्यक्ती भल्याबुऱ्याचा विवेकाने विचार, निवाडा करतात. असा राजहंसीय नीरक्षीरविवेक करण्यासाठी असा जातीचाच (अर्थात अनुभवी) व्यक्ती लागतो. ते कोणाही येरागबाळ्याचे काम नाही.

आता साक्षात संत तुकारामांनीच अधिकृत केलेल्या या शब्दाला अशैक्षणिक, असंसदीय मानावे तरी कसे बरे? त्यानंतरच्या गेल्या शेकडो वर्षांत तुकारामांचा हा शब्दप्रयोग अनेक संत, साहित्यिक, पत्रकार, लेखकांनी आपापल्या लेखनामध्ये आवर्जून वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्येष्ठ अभिनेते नीळू फुले यांनी येरागबाळ्याचे काम नोहे या शीर्षकाच्या नाटकातूनच मराठी रंगभूमीवर तसेच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते, हेही लक्षात घ्यावे लागेल. खरे तर तुकारामांचे लेखन हा सार्वकालिक संदर्भाचा प्रमुख स्रोत आहे, असे म्हणता येईल इतका सुवचनांचा, शब्दप्रयोगांचा, वाक्प्रचार, म्हणींचे त्यात उपयोजन आहे.

तुकारामांचा विषय येथे ताणवण्याचे कारण नाही, मात्र हे सारे विवेचन यासाठीच की आपली शैक्षणिक आणि अशैक्षणिकत्वाची समज खुरटत, खुंटत चालली आहे का, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. आपण आपली समज विवेकापेक्षा सध्या भोवतालात सुरू असलेल्या गदारोळाच्या दावणीला बांधू लागलो आहोत का, याचा विचार करण्याचीही नितांत गरज निर्माण झाली आहे. अन्यथा अॅकॅडेमिक्सभोवती आधीच घोंघावू लागलेले मळभ अधिकच दाट होऊन काळोख वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.

 

 

 

कृतज्ञ आठवांचा प्रवाहो!


 

'सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा' हे आपले ध्येयवेड्या जीवनप्रवास वर्णनपर पुस्तक भेट देताना डॉ. बाळासाहेब गोफणे.

डॉ. बी.एन. तथा बाळासाहेब गोफणे... माझ्या परिचयातील एक ज्येष्ठ उमदे व्यक्तीमत्त्व... खरे म्हणजे गोफणे सर हे माझ्या वडिलांच्या पिढीतील... स्वातंत्र्योत्तर कालखंडात जन्मलेली आणि शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही पहिली पिढी... शिक्षणासाठीच्या खस्ता त्यांनी आपापल्या परीनं खाल्लेल्या... संघर्ष रेटलेला... या संघर्षाच्या धुमीत तेजाळून निघालेले त्यांचे अनुकरणीय ज्ञानकर्तृत्व... अशी ही पिढी...

गोफणे सरांचा माझा परिचय हा मी शिवाजी विद्यापीठात सन २०१२ साली सहाय्यक कुलसचिव पदावर रूजू झाल्यानंतरचा... तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी मी सर्वात शेवटी रुजू होणारा उमेदवार असूनही माझ्यासाठी जणू सभा व निवडणुका विभागाची जबाबदारी राखून ठेवलेली... या विभागामुळं संपूर्ण विद्यापीठाचंच नव्हे, तर विद्यापीठ परिक्षेत्राचंही कामकाज समजावून घेण्याची, निर्णय प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अंगानं विशिष्ट भूमिका बजावण्याची संधीच जणू मला लाभलेली... विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा इत्यादींच्या बैठकांचं नियोजन, कामकाजाचे मिनिट्स, ठराव इत्यादी विहीत मुदतीत मार्गी लावण्याची जबाबदारी या विभागाकडं आहे. त्यावेळी डॉ. गोफणे सर हे विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून संपर्कात आले. एक अत्यंत गोड वाणीचे, मृदूभाषी, निर्मळ मनाचे आणि कर्तव्यतत्पर सदस्य म्हणून त्यांच्याबद्दल मला विशेष आदर वाटत असे. प्रत्येक बैठकीच्या वेळी आले की, हमखास विचारपूस करणारे आणि अन्य वेळी कधी काही कामानिमित्तानं विभागात आले तरी अनेक बाबी चिकित्सक आणि जिज्ञासापूर्ण पद्धतीनं जाणून घेणारे म्हणूनही त्यांच्याबद्दलचा आदर दुणावलेला. त्यांची मुदत संपली तरी, समाजमाध्यमांपासून ते प्रत्यक्ष कधीही आले तरी काही क्षण का असे ना, भेट घेऊन चौकशी केल्याखेरीज कधीही पुढे न जाणारे, असे गोफणे सर!

नुकतंच त्यांचं सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा: एक ध्येयवेडा प्रवास हे आत्मनिवेदनपर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच आवर्जून भेट घेऊन त्यांनी ते भेट दिलं. त्यांच्या सहृदयी स्वभावाला ते साजेसंच आहे. पुस्तक वाचून हातावेगळं केलं, तेव्हा गोफणे सरांच्या आयुष्यातील सकारात्मकतेचं, सहृदयतेचं गमक ध्यानी आलं. आईच्या ममतेसाठी आसुसलेलं कोवळं मन आजही त्यांच्याआत खोलवर कुठं तरी आहे. त्यामुळं भेटणाऱ्या प्रत्येकाविषयी एक माया, ममता, कणव अथवा वात्सल्य या भावना त्यांच्या हृदयातून ओसंडून वाहू लागतात. पुस्तक वाचताना पानोपानी त्याची प्रचिती येते. प्रस्तावनेत डॉ. रणधीर शिंदे म्हणतात, त्याप्रमाणं या निवेदनात व्यक्तीगत, सामाजिक, संस्थात्मक अंतर्विरोधाला अजिबात स्थान नसल्यानं त्याला एकरेषीयता प्राप्त झाली आहे. मात्र, याचं कारण त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनातच असल्यामुळं त्यांच्यातील सकारात्मक दृष्टीनं त्यावर मात केली आहे. डॉ. शिंदे यांचं म्हणणं खरंच आहे. गोफणे सरांना अडचणीत आणायचं म्हणून सुरवातीला अनुमोदक म्हणून सही देणाऱ्या आणि अगदी ऐनवेळी पाठिंबा मागं घेत असल्याचं पत्र देणाऱ्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाचं नाव न छापण्याचा विशालहृदयी दृष्टीकोन गोफणे सरांच्या या जीवनदृष्टीमुळंच त्यांच्यात आलेला आहे. अन्यथा, दुसरा एखादा ते नाव सहजी छापून गेला असता. नेमकं हेच गोफणे सरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

कृतज्ञतेनं ओथंबलेल्या आठवांचा प्रवाह असं एका वाक्यात त्यांच्या या आत्मनिवेदनाचं वर्णन मी करेन. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या विविध व्यक्तीमत्त्वांबद्दल केवळ अन् केवळ कृतज्ञताभाव बाळगणं आणि त्याचा आवर्जून निर्देश करणं, हा आजच्या काळात एक वस्तुपाठ म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्याचप्रमाणं आत्मनिवेदनामध्ये स्वशय येणं, स्व असणं हे अनिवार्यच असतं. मात्र, हा स्व मांडत असताना त्यामध्ये मीपणा डोकावणार नाही, मी लाऊड होणार नाही, याची दक्षता घेणं, तारेवरची कसरत असते. या दोहोंमध्ये एक धूसर, बारीक सीमारेषा असते. ती सांभाळणं भल्याभल्यांना जमत नाही. मात्र, स्वभावतःच कृतज्ञशील असलेल्या गोफणे सरांना मात्र ते सहजी जमलेलं आहे, असं पुस्तक वाचताना जाणवतं. या पुस्तकातील कन्टेन्टबद्दल मी लिहीणार नाही कारण गोफणे सरांनी अत्यंत सुबोध, ओघवत्या आणि रसाळ शब्दांमध्ये मांडलेला सीनेच्या वाळवंटापासून सुरू झालेला आणि पंचगंगेद्वारा प्रितीसंगमापर्यंत येऊन ठेपलेला ध्येयवेडा प्रवास मुळातूनच एकदा वाचनानुभवण्यासारखा आहे.

कोविड-१९ लॉकडाऊनच्या कालखंडात आपण सारेच बऱ्याच सहृदजनांना दुरावलो. मात्र, याच कालखंडानं गोफणे सरांसारख्यांना लिहीण्यासाठी अवधी मिळवून दिला आणि त्या काळात एक मार्गदर्शक, कृतज्ञताभावानं ओथंबलेली साहित्यकृती निर्माण होऊ शकली, हेही नाकारता येणार नाही. गोफणे सरांची ही भावगाथा आजच्या तरुणाईला स्वातंत्र्योत्तर पहिल्या पिढीचा संघर्ष सांगणारी तर आहेच, शिवाय, स्वतःमध्ये मूल्ये कशी रुजवून घ्यावीत, त्यांचा अंगिकार, प्रसार कसा करावा, याचेही धडे देणारी आहे. त्या दृष्टीने गोफणे सरांच्या या साहित्यकृतीकडे पाहायला हवे, तिचे स्वागत करायला हवे.

 

पुस्तकाचे नाव: सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा: एक ध्येयवेडा प्रवास

लेखक: डॉ. बाळासाहेब गोफणे

लेखकाचा संपर्क: ९४२२३८४०३५  

प्रकाशक: शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा, सोलापूर

पृष्ठसंख्या: २४०

किंमत: रु. ३००/-