रविवार, ३० जून, २०१९

मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है...





('दै. सकाळ'च्या निपाणी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. ३० जून २०१९ रोजी 'नातं मातीशी' या विषयावर विशेषांक प्रकाशित करण्यात आला. मित्रवर्य संजय साळुंखे याच्या आग्रहामुळं या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.- आलोक जत्राटकर)

निपाणी... लहानपणापासून म्हणजे अगदी कळता झालो तेव्हापासून निपाणीच्या स्टँडमध्ये येण्यासाठी बस काटकोनात वळायची आणि स्टँडच्या प्रवेशद्वारावरचीनिपाणी अशी भली मोठी मरुन रंगातली वळणदार कोरलेली मराठी अक्षरं मनाचा वेध घ्यायची... खूप काही सूचित करायची... विशेषतः त्यांत ओतप्रोत भरलेली मराठी अस्मिता ओसंडून वाहायची... अलिकडंच झालेल्या स्टँडच्या नूतनीकरणात अनेक जुन्या गोष्टींबरोबर ही मराठी अक्षरं आणि त्याबरोबर त्या अनेक गोष्टी लुप्त झाल्या आहेत. काळाच्या ओघात अशा गोष्टी घडणार, घडत राहणार!
एक गाव म्हणून प्रत्येक ठिकाणाचं स्वतःचं असं एक व्यक्तीमत्त्व असतं. निपाणीचंही आहे. शहर नव्हे, पण अगदी खेडंही नाही, असं हे स्वरुप. अनेक खेड्यांच्या मध्यवर्ती, कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचं पहिलं महत्त्वाचं गाव. त्यामुळं सीमाप्रश्नाच्या चळवळीमध्येही मराठी भाषकांच्या अस्मितेला सातत्यानं जागृत राखणारं, आत्मभान देणारं, अत्यंत व्हायब्रंट आणि सजग जाणीवांचं गाव. तंबाखूचं अमाप पीक असल्यामुळं तंबाखू उत्पादक, विडी कामगार, शेतमजूर, तंबाखू व्यापारी आणि विडी कारखान्यांचं गाव. कामगार असल्यामुळं कामगार चळवळ आणि नेत्यांचाही गाव. सौंदत्तीच्या रस्त्यावर असल्यामुळं देवदासी आणि जोगत्यांचाही गाव. मध्यवर्ती ठिकाणामुळंच चालत आलेली बाजारपेठेची मक्तेदारी. विशेषतः कापड व्यापार. लग्नाचा बस्ता असो की किरकोळ कापड, साडी खरेदी; पंचक्रोशीची इथल्या चंडुलाल शेटजीच्या दुकानाला सर्वाधिक पसंती. एकीकडं आचार्य अत्रेंच्या तो मी नव्हेचमधल्या लखोबा लोखंडे या तंबाखू व्यापाऱ्याचं गाव म्हणून साहित्यिक-सांस्कृतिक परीघात फेमस झालेल्या शोषक निपाणीची काळोखी बाजू अनिल अवचटांच्या अंधेरनगरी निपाणीमधून बाहेर आली. त्या शोषणातून तंबाखू कामगार महिलांच्या मुक्ततेसाठी आणि न्यायासाठी झगडा मांडणाऱ्या सुभाष जोशींसारख्या लढवय्याची ही निपाणी. गिरणीतल्या पिठावरच्या रेघोट्यांनाही सक्षम साहित्यिक अजरामरत्व प्राप्त करून देणाऱ्या महादेव मोरेंचीही ही निपाणी. विविध क्षेत्रांत कर्तबगारी सिद्ध केलेल्यांचा हा गाव.
कष्टकरी कामगार वर्गाचा वावर असल्यानं इथल्या खाद्यसंस्कृतीवर त्याचं पडलेलं प्रतिबिंब जाणवण्याइतकं. सकाळी कामावर जाण्यासाठी स्टँडवर उतरलेल्या कामगार वर्गाचं पोट भरावं म्हणून सांगावकरांच्या कल्पकतेमधून सुरू झालेली चपाती-भाजी हा आता वर्ल्ड फेमस इन निपाणी असा खाद्यपदार्थ. संध्याकाळी कांदाभजी, मिरची भजी आणि भडंग. सकाळची पुरीभाजी, शाममधली डोसा-आंबोळी आणि पापडी,वैष्णवमधला कुंदा व खवा पेढे हे या खाद्यसंस्कृतीचं पुढं झालेलं एक्स्टेंशन. एसटी स्टँडवरचं वैभव आणि आराम डायनिंग आणि जुन्या मोटार स्टँडवरच्या प्रभातसारख्या काही घरगुती खानावळींमधल्या इथल्या सामिश भोजनाला अस्सल गावरानपणाचा ठसका होता. आता या साऱ्याच बाबतीत एक प्रकारचं कॉस्मोपण आल्यामुळं सगळीकडं आता सगळेच पदार्थ मिळतात. भजीच्या गाड्यांपेक्षाही भेळ, चायनीज भेळ आणि चिकन ६५च्या गाड्यांनी आता सारंच अधिक्रमित केलंय. काळाच्या ओघात हे होणार, हे मान्य केल्यानंतरही निपाणीची सामिश भोजन परंपरा मात्र कुठं तरी अस्तंगत झाल्यासारखी वाटतेय. गेल्या काही वर्षात हे प्रकर्षानं जाणवतंय. जागतिकीकरणाबरोबर देशातल्या इतर कोणत्याही शहराप्रमाणं निपाणीनंही आपली कूस बदललीय. तिचं व्यक्तीमत्त्व पालटलंय. पण, म्हणून तिचं अंगभूत सौंदर्य मात्र कमी झालेलं नाही. तंबाखू व्यापारी पेठेची ओळख मागं पडून आता सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांचं गाव म्हणून नव्यानं ओळख निर्माण झालीय निपाणीची. संपूर्ण गावात एकेकाळी केवळ दोन रिक्षा होत्या, आता रिक्षा व्यवसाय हा जणू इथला एक प्रतिष्ठेचा व्यवसाय बनून गेलाय, इतक्या रिक्षा झाल्यात गावात. नव्या-जुन्याचं फ्युजन आता प्रकर्षानं जाणवतंय.
या पार्श्वभूमीवर, निपाणीचं माझंपण हे माझ्यासाठी माझ्या वडिलांची कर्मभूमी म्हणून खूप मोलाचं आहे. खरं तर गेल्या वीसेक वर्षांत माझ्या कर्मभूमी म्हणून मुंबई आणि विशेषतः कोल्हापूरविषयी माझ्या मनात खूप वेगळं स्थान आहे; पण, निपाणीबाबतचा जिव्हाळाही तितकाच अनोखा आहे. माझ्या व्यक्तीगत आयुष्यात या शहराचं स्थान महत्त्वाचंय याचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वाधिक महत्त्वाचा टीनएजला कालखंड मी इथं घालवला. शिक्षणापासून ते पहिल्या नोकरीपर्यंतचा कालखंड इथंच गेला. कोणाच्याही आयुष्यात हा काळ अविस्मरणीयच असतो. अपवाद माझाही नाही. इथल्या कैक गोष्टींनी मी कधी भारावलोय, तर कधी रागावलोय. आयुष्यातल्या काही कटु आठवणी मला इथंच मिळाल्या, तर आयुष्याचं सर्वात मोठं संचित असणारं खरं मैत्र मला इथंच लाभलं. पहिलं प्रेम इथंच लाभलं आणि प्रेमभंगाचं शल्यही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला उत्कटपणानं सामोरं जायला मला या गावानंच शिकवलं. अपयश पचवून यशाला भिडण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायला शिकवणारंही हेच गाव आहे.
निपाणीशी निगडित माझ्या आठवणी जागवत जागवत मी इतका मागं गेलो, ते थेट अशोकनगरातल्या गुमठाणावरांच्या माडीवर जेव्हा आम्ही भाड्यानं राहात होतो तिथंवर. मी साधारण दोनेक वर्षांचा असेन, पण त्या वयातलाही एक प्रसंग मला प्रकर्षानं आठवतोय, तो म्हणजे या घरात माझ्या हाताच्या बोटाला मोठ्या काळ्या मुंगळ्यानं दंश केला होता आणि मी प्रचंड रडलो होतो. त्यानंतरच्या कालखंडात जगातल्या तमाम काळ्या मुंगळ्यांवर मी सूड उगवत सुटलो होतो. त्या एका मुंगळ्यापायी मी त्यांच्या कित्येक पुढच्या पिढ्यांची कत्तल केली होती. जेव्हा थोडं समजू उमजू लागलं, तेव्हा हे सत्र थांबलं. आज माझ्या मुलांना मी कीडामुंग्यांनाही जीव असतो, हे तत्त्वज्ञान सांगत असतो. त्यामागं पुन्हा आपल्या हातून असं कृत्य होऊ नये, ही भावना असते. अशोकनगरचाच उल्लेख निघालाय म्हणून सांगतो, अगदी लहानपणापासून ते अगदी टीवाय होईपर्यंत याच पेठेतल्या दुकांनातून बाबा आमच्यासाठी कपडे घेत- खरं तर कापड घेत आणि लगेच पी. काजम काकांच्या कडे ते शिवायला टाकत. पुढे शिकायला बाहेर पडल्यानंतर कापड घेऊन ड्रेस शिवून घेतला, घातला; पण, त्या शिवण्याला काजम काकांची सर काही आल्यासारखी वाटेना आणि तिथून पुढं हे कपडे घेणं थांबलं आणि आता उक्ते कपडे घालतानाही या गोष्टी मी मिस करतोच.
पुढं आईच्या नोकरीच्या निमित्तानं कागलला शिफ्ट झालो. माझं काही शिक्षण आजोळी सांगलीत आणि कागलला झालं. दरम्यान बाबांनी श्रीनगरमध्ये जागा घेतली. आणि ते थोडेसे संभ्रमात असत की घर निपाणीत बांधावं की, कागलमध्ये जागा घेऊन बांधावं. मला काही फारसं कळत असण्याचं कारण नव्हतं, पण ते जेव्हाही कधी विषय काढत, तेव्हा मी निपाणीतच घर बांधण्याचा आग्रह धरीत असे. का, याचं कारण आजही सांगता येणार नाही. पण, निपाणीबद्दल काही तरी वेगळी ओढ होती, एवढं मात्र खरं.
माझे वडील नोकरी करायचे, ते देवचंद कॉलेज आणि देवचंद शेटजी यांच्याबद्दल माझ्या मनात त्या वयातही अपार आदर आणि अभिमान होता. आजही आहे. त्या काळात सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय उभं करावं असं वाटणं आणि ते जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षणासाठी ओळखलं जावं, या तळमळीतून शेटजींनी ते उभारलं, याचं मला भारी अप्रूप होतं. शेटजी गेले, तो दिवस माझ्या आयुष्यातला एक नितांत दुःखाचा दिवस होता. पुढं याच संस्थेच्या मोहनलाल दोशी विद्यालयात आणि याच महाविद्यालयात मला शिक्षण घेता आलं, ही बाबही महत्त्वाची.
माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुरूंची तर फौजच या गावानं मला प्रदान केली. जीएनके सर, आरएनके सर, जेपीके मॅडम, पी.के. जोशी सर, चौगुले सर, पाटील सर, परीट सर, पंगू सर, रानडे सर, चिले सर- नावं तरी किती घ्यावीत. थेट शिकविणाऱ्यांखेरीज ज्यांचा विशेष प्रभाव पडला, त्यामध्ये अच्युत माने, जे.डी. कांबळे, सुभाष जोशी, उल्हास वराळे, ए.जी. जोशी, विठ्ठल घाटगे, एन.एस. काझी, दिवाकर असे बाहेरच्यांसाठी प्राध्यापक, विचारवंत पण माझ्यासाठी काका असणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे. माझं व्यक्तीमत्त्व घडण्यामध्ये यांचा वाटा किती महत्त्वाचा आहे, हे शब्दांत सांगणं कठीण आहे.
कागलमध्ये पाचवी-सहावीत असताना ज्युदो शिकत होतो. त्यावेळी दिवाळीच्या सुटीत निपाणीच्या रोटरी क्लबनं देवचंद कॉलेजमध्येच आठवडाभराचा रायला कॅम्प आयोजित केला होता. आयुष्यात पहिल्यांदा असा घराबाहेर राहिलो, तो निपाणीत. या आठवड्यानं माझ्या व्यक्तीमत्त्व विकासात पायाभूत भूमिका बजावली. प्राचार्य डॉ. एम.जे. कशाळीकर यांचं सान्निध्य आणि डॉ. सुहास शहा यांचं आयुष्यभराचं प्रेम लाभण्याची ही सुरवात होती. आयुष्यातलं पहिलं उत्स्फूर्त भाषण, ग्रुप डिस्कशन वगैरे अनेक बाबी पहिल्यांदा इथंच पाहिल्या, त्यात सहभागी झालो. कॅम्पमधला सर्वात लहान पार्टीसिपंट असल्यानं साऱ्यांचं लक्ष माझ्याकडं असे. प्रचंड आत्मविश्वास या कॅम्पनं माझ्यात ओतला.
पुढं इथल्या श्रीनगरमध्ये घर बांधल्यानंतर मी मोहनलाल दोशी विद्यालयात नववीत प्रवेश घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी रानडे सरांच्या केदारबरोबर शाळेअगोदर जीएनके सरांच्या ट्यूशनमध्ये गेलो. माझ्या आयुष्यात तोपर्यंत मी कोणत्याही ट्यूशनला गेलो नव्हतो. मी अटेंड केलेली ही आयुष्यातली एकमेव ट्यूशन. पण, त्यामुळं जीएनकेंसारखा एक भारी विज्ञान शिक्षक मला लाभला. माझ्या मैत्रीच्या परीघ विस्ताराची ती सुरवात होती. ही ट्यूशन आणि शाळा यांच्यामुळं श्रीनिवास व्हनुंगरे, माधव कुलकर्णी, निशांत जाधव, सुभाष शिंत्रे, सिद्धार्थ शहा, अनुप शहा असे कितीतरी मित्र मिळाले. वर्गात (स्व.) प्रशांत आंबोलेसारखा जबरदस्त मित्र मिळाला. मोहनलाल दोशी विद्यालयातल्या प्रत्येक शिक्षकाचं मला इतकं प्रेम लाभलं की विचारू नका. मी नववीत हिंदी-संस्कृत घेतलं. हिंदीच्या वाळवे मॅडम तर अप्रतिमच शिकवायच्या. पण, कागलमध्ये आठवीत संस्कृत नव्हतं. त्यामुळं जेपीके मॅडमनी मला त्यांच्या घरी बोलावून नववीच्या पहिल्या दोन महिन्यांत माझ्याकडून आठवीचं संस्कृत करून घेतलं आणि नववीचं संस्कृत शिकण्यास मी लायक झालो. कोणत्याही मोबदल्याविना शिकविणाऱ्या जेपीके मॅडमचं ऋण कोणत्या शब्दांत व्यक्त करावं? त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळंच पुढं बारावीपर्यंत संस्कृत शिकण्याचा आत्मविश्वास तर आलाच, पण आरएनके सरांसारखा उत्तम शिक्षकही लाभला. जेपीके मॅडमनी कथाकथन, नाटक अशा अनेक गोष्टींत भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं. शाळेत पी.के. जोशी सरांच्या प्रशंसेला पात्र व्हायचं म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती. मात्र, सरांचं मला जे अकृत्रिम प्रेम लाभलं, ते शब्दांत सांगणं कठीणाय. सरांनी त्यांचं प्रेम शब्दांतून कधीच व्यक्त केलं नाही, पण ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, असं मात्र नाही. माझं जर्नल लिहीणं त्यांना आवडायचं. वर्गातल्या बाकीच्यांना आणि मला तेवढा शेरा, यातूनच काय ते समजायचं. सारा वर्ग जळायचा. माझी व्हॉलीबॉलची सर्व्हीस सरांना खूप आवडायची. तुकडीबरोबर झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात मी एक जोरदार ड्रॉप मारून गोल नोंदविला तेव्हा सरांनी वा रे पठ्ठ्या म्हणत समोरच्या बाजूला मारलेली उडी मी आजही विसरू शकत नाही. म्हणून माझं एमजेसीचा लघुशोधप्रबंध मी कागलचे ढोले गुरूजी आणि पी.के. जोशी सर यांना संयुक्तपणे अर्पण केला. चौगुले सरही माझ्यावर खूप प्रेम करणारे. माझ्या प्रगतीकडं जाणीवपूर्वक लक्ष देणारे. पुढं मी निपाणीत जेव्हा निपाणी दर्शन ही पहिली केबल न्यूज सेवा सुरू केली, तेव्हा त्या काळात खिशातून पाचशे रुपये काढून मला बक्षीस देणारे चौगुले सर. त्यांचं हे प्रेम कसं विसरता येईल?
नववीत असतानाच इथल्या बुलियन कॉम्प्युटर या खाजगी संस्थेत संगणकाशी ओळख झाली. बेसिक, कोबॉल, फोरट्रॅन या भाषा शिकलो. प्रिया शहा ही त्यावेळी माझी तिथली सहाध्यायी होती. पुढं अप्टेकमधून संगणकाची पदविका घेतली, तेव्हा या क्षेत्रात आवड निर्माण होण्यासाठी बोरगावे मॅडम आणि चेतन नागांवकर यांनी माझ्यावर खूप परिश्रम घेतले आहेत.
पुढं देवचंद कॉलेजमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आणि माझ्या गुरूंचा अन् मित्रांचा परीघ आणखी विस्तारला. विरेंद्र बाऊचकर, भालचंद्र काकडे, दिलीप पाटील, अश्विन उपाध्ये, मनिषा कलाजे, सुषमा चव्हाण, मृणालिनी चव्हाण, सुलेखा सुगते हा लाइफटाइम ग्रुप इथंच जमला.
शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोलापूरच्या दैनिक संचारसाठी बेळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी निपाणीतून काम पाहू लागलो. पहिलं ऑफिशियल वार्तांकन मी निपाणीतूनच केलं, ते बामसेफच्या परिषदेचं. तिथून मग माझी पत्रकारितेमधली कारकीर्द सुरू झाली. उमेश शिरगुप्पे, पिटू शांडगे, संजय साळुंखे या मित्रांच्या साथीनं निपाणी दर्शनया निपाणीतल्या पहिल्या केबल न्यूज सेवेचा प्रारंभ केला. या सेवेचा पहिला संस्थापक-संपादक म्हणून मी काम पाहिलं. निपाणी दर्शनमुळं इथल्या सर्व क्षेत्रांतल्या लोकांशी वन टू वन संपर्क प्रस्थापित होऊ शकला. मात्र, चारेक महिन्यांतच सकाळमध्ये उपसंपादक म्हणून निवड झाल्यानं मी पुढील करिअरसाठी इथून बाहेर पडलो. मात्र, जितका दूर जात गेलो, तितकं हे गाव हृदयात खूप आत आत शिरत गेलं. बाहेरगावी असताना कधीही मी आजारी पडलो, काही दुखलं खुपलं, तर मला हटकून निपाणीची आठवण येते. अशा वेळी मी हमखास इथंच येतो. इथं येताक्षणी माझं निम्मं आजारपण निघून जातं. उरलेलं काम पाटील डॉक्टरांचं इंजेक्शन करतं. वेदनेच्या प्रसंगी आपल्याला आठवतात ती आपली माणसं, आपला गाव. त्या अर्थानं निपाणी हे माझं वेदनाशामक आहे, माझं रि-एनर्जायझर आहे. मी जिथं फिरतो, तिथं सीमावासियांच्या वेदनेचा हुंकार म्हणून वावरतो. हा हुंकार माझा स्थायीभाव आहे. कर्नाटकाकडून मी भाषिक परप्रांतीय आहे, तर महाराष्ट्राकडून भौगोलिक परप्रांतीय. निपाणीला लाभलेली उपरेपणाची ही भळभळती वेदना माझ्यात खूप खोलवर जिवंत आहे. म्हणूनच निपाणीशी माझं नातं अधोरेखित करताना नीलेश मिस्राच्या पुढील ओळी आठवतात -
बात बेबात पे अपनी ही बात कहता है,
मेरे अंदर मेरा छोटा सा शहर रहता है।


‘सर, फ्यामिली हय क्या?...’

(प्रतिकात्मक छायाचित्र)



काही दिवसांपूर्वी माझे वडिल आणि भाऊ यांच्यासह एका ढाब्यावर जेवायला गेलो होतो. आत आणि बाहेर असे दोन हॉल होते. उन्हाळ्याचे, उष्म्याचे दिवस असल्याने आम्ही बाहेरच्या, तुलनेत बऱ्यापैकी हवेशीर अशा त्या हॉलमधला एक खिडकीकडेचा टेबल निवडला आणि बसलो. काही वेळात वेटर आला. त्यानं विचारलं, सर, फ्यामिली हय क्या?’ आम्ही एकमेकांकडं पाहिलं आणि होय, म्हणून त्याला सांगितलं. थोड्या वेळात तो पुन्हा पाण्याचे ग्लास घेऊन आला आणि पुन्हा एकदा त्यानं तोच प्रश्न विचारला, सर, फ्यामिली हय क्या?’ आम्ही परत त्याला होय म्हणून सांगितलं. त्यावर तो अस्वस्थपणे इकडं तिकडं पाहू लागला. त्याच्या अस्वस्थतेचं कारण एव्हाना आमच्याही लक्षात आलेलं. आम्ही बसलो होतो तो हॉल फॅमिलीसाठी राखीव होता. आजूबाजूच्या दोनेक टेबलांवर त्याला अभिप्रेत असलेल्या फ्यामिली बसलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्यात एखाद-दुसरी महिला होती.
वेटरनं त्याच अस्वस्थतेत आम्हाला सांगितलं, सर, आप अंदर बैठिए। ये फ्यामिली रुम हय। आमच्याही लक्षात आलं की, आपल्याला आता आतल्या रुममध्ये बसायला लागणार. त्यापूर्वी हे प्रकरण कुठवर जातंय, ते पाहण्यासाठी मी त्याला म्हटलं, हम भी फ्यामिली हय। ये मेरे पिताजी हय और ये मेरा सगा भाई। चाहे तो हमारे आयडी देख लो। त्यावर त्याला काय बोलायचं सुचलं नाही. तो थेट गेला आणि त्याच्या मालकालाच घेऊन आला. मालकालाही मी तेच सांगितलं.
त्यावर मालक म्हणाला, सर, आपको बैठने दूँगा, तो बाकी लोग भी शराब पीकर आएँगे और यहाँ बैठने की माँग करेंगे।
पुन्हा मी म्हणालो, एक तो हम फॅमिली है, और ना ही हमने शराब पी रख्खी है। तो हमें यहाँ बैठने का पूरा हक है। और समझो मै शराब पी के किसी गैर महिला को साथ ले आया, जो मेरी कोई रिश्तेदार या फॅमिली नहीं है, तो आप क्या करोगे? मुझे यहाँ बैठने दोगे की नहीं?’
या माझ्या प्रश्नावर मालक अत्यवस्थच झाला. त्याला काय उत्तर द्यावं सुचेना. म्हणाला, सर, प्लीज बात को समझिए। मैं आपको अंदर बैठने की रिक्वेस्ट करता हूँ। त्याची ती हतबलता पाहून आम्हाला मौज वाटली आणि आम्ही आतल्या जनरल रुममध्ये शिफ्ट झालो, जिथे आमच्या आधीपासून असलेले काही शराब पिए हुए दोस्त लोग बटर चिकनवर ताव मारत होते. आम्हालाही भूक लागली असल्यानं आम्ही हा सवाल-जवाब लांबविता येणं शक्य असूनही, न वाढविता आत जाऊन बसलो. जेवणाची ऑर्डर दिली.
ऑर्डर येईपर्यंत आम्हा तिघांना आता हा एक ताजा आणि वेगळा विषय स्टार्टर म्हणून मिळाला होता. आमचे बंधुराज जरा जास्तच भडकलेले. फ्यामिलीचे शेंडेफळ असल्यानं त्यांचा तो अधिकारच होता. पण, त्यांची समजूत घालता घालता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, भारतीय समाजात स्त्रीशिवाय कोणतेही कुटुंब पूर्ण होत नाही, किंबहुना त्याला कुटुंब- फॅमिली म्हणताच येणार नाही, हा केवढा मोठा संदेश या हॉटेल-रेस्टॉरंट्सनी त्यांच्या या कृतीमधून दिला आहे. मात्र, एखाद्या कुटुंबात काही कारणानं स्त्री नसेल, तर त्या उर्वरित पुरूष कुटुंबाला ही हॉटेल कुटुंबाचा दर्जा देणारच नाहीत का? त्यांना फॅमिली म्हणून स्वीकारणारच नाहीत का? हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला.
पूर्वीच्या काळी मुळात कोणी हाटेलात जात नसे. एक तर पैशाच्या काटकसरीची सवय आणि हॉटेलात जाऊन खाणे म्हणजे पैशाचा माज आणि उधळपट्टी, अशी असलेली एक ठाम समजूत. पण काळ बदलला तसा कधी गरज म्हणून तर कधी खास प्रसंग साजरे करण्यासाठी क्वचित हॉटेलात जाण्यास कुटुंबाला मुभा मिळू लागली. मग अशा कधीतरी बाहेर पडलेल्या आणि कधीतरीच हॉटेलात आलेल्या कुटुंबाला थोडेसे मोकळेपण आणि काहीशी प्रायव्हसी म्हणून हॉटेलांनी त्यांच्या एका भिंतीला पार्टीशने घालून, पडदे लावून फॅमिली रुमची सुविधा निर्माण केली. तेव्हाच्या काळात ती सोय होती. पुढच्या काळात या सोयीचा, प्रायव्हसीचा आधार घेऊन गैरप्रकार करण्याचे प्रकारही सुरू झाले. पण, ते अपवाद आणि तसली कुप्रसिद्ध हॉटेले वगळता फॅमिली रुम ही खरेच एक चांगली सोय होती. आताच्या हर दिन दिवाली.. म्हणून साजरा करण्याच्या कालखंडात हॉटेल ही बाब नवीन राहिलेली नाही; तर अगदी नित्याची झाली आहे. उलट, मॉल, मल्टिप्लेक्स आणि मल्टीस्टार (तीन तारांकित आणि पुढची) हॉटेल या तीन ठिकाणी भेट देणारे लोक हे गरज म्हणून कमी आणि स्टेटस सिम्बॉल म्हणून मिरविण्यासाठी अधिक जात असल्याचे तिथे गेल्यानंतर सहजी लक्षात येते. आताशा मोठ्या हॉटेलांमधून फॅमिली रुम बऱ्यापैकी हद्दपार झाल्या आहेत. त्याला आता मल्टिक्युझीन रेस्टो-बारचे स्वरुप आलेले आहे. कोठेही पडदे नाहीत की पार्टीशन. पाठीला पाठ लावून असलेल्या टेबल खुर्च्यांवर बसलेल्या या लोकांमध्ये एक अप्रत्यक्ष पडदा असतोच- परस्परांच्या स्टेटसबद्दल परस्परांच्या मनातील उच्चनीचपणाच्या भावनेचा! प्रत्येकजण आपापल्या टेबलवर बसून कॉकटेल-मॉकटेलचे घुटके आपल्या फॅमिलीसहित एन्जॉय करताना दिसतो. इतर जगाशी (म्हणजे शेजारच्या अगर मागच्या टेबलवरील फॅमिलीशी) त्यांना काहीएक देणे नसते.
त्या ढाब्याच्या फ्यामिली रुमच्या चर्चेच्या निमित्ताने, आजच्या काळात आता गे, लेस्बियन अगर ट्रान्सजेंडर व्यक्ती हॉटेलमध्ये आल्या, तर त्यांच्याबाबत ही हॉटेल्स काय भूमिका घेतील? लेस्बियनांना मिळेल फॅमिली रुम; पण गे अगर ट्रान्सजेंडर्सचं काय? त्यांच्याबद्दल ही हॉटेल सहानुभूतीनं विचार करणार की नाही? त्यांचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तीमत्त्व आणि प्रायव्हसीची गरज मान्य करणार की नाही? अशा अनेक मुद्यांना आम्ही स्पर्श केला. सर्वात महत्त्वाचा मुद्दा अचानक स्ट्राईक झाला, तो म्हणजे भारतीय समाजाच्या स्त्रियांबाबतच्या दांभिक मानसिकतेचा! एकीकडे स्त्रीशिवाय कुटुंब अपूर्ण असल्याची भावना निर्माण करीत असताना दुसरीकडे त्या कुटुंबात मात्र प्रत्यक्षात तिचे स्थान काय आणि कसे असते, ते कसे असायला हवे, याबाबत मात्र आपला समाज सातत्याने मौन बाळगून असतो. स्त्री ही आज कितीही सबला, सक्षम वगैरे झाल्याचे ढिंढोरे आपण पिटत असलो तरी आपल्या दृष्टीने तिचे कमोडिटीपण, तिची उपभोग्यता आपण हरघडी, हरक्षणी अधोरेखित करीत असतो. माध्यमांतल्या जाहिरातींपासून ते प्रत्यक्ष पदोपदी तिच्या शरीरावर सुरू असलेला नजरांचा बलात्कार आणि यातून तिच्यावर गुदरणारा विनयभंगाचा आणि बलात्काराचा प्रसंग अशा अनेकांगांनी समाज, समाजातील घटक तिचे शोषण करीत असतात. घराबाहेर ही परिस्थिती तर घरातही कौटुंबिक स्थान दुय्यमच. ज्या घरात अगदी पुरूषच नाही, अशाच वेळी फक्त कर्तेपणा स्त्री आपल्याकडे घेते. खंबीरपणे घर चालविते. मुलांना चांगलं शिकवून सवरुन मोठं करते, कमवतं करते आणि मग एका क्षणी तिचा मोठा झालेला मुलगा केवळ पुरूषीपणाच्या बळावर तिचं दुय्यमत्व पुन्हा तिच्या पदरात टाकतो.
एक गोष्ट आपण मान्य करायला हवी की, स्त्रीशिवाय खरोखरीच आपण, आपलं कुटुंब अपूर्ण असतो. कुटुंबाचं पूर्णत्व म्हणजे स्त्री आहे; मात्र, त्या पूर्णत्वाला खऱ्या अर्थानं संपूर्णत्व बहाल करण्यात मात्र आपण व्यवस्था म्हणून खूपच कमी पडलो आहोत, पडतो आहोत, याचा आपण कधी तरी विचार करणार की नाही? हॉटेलवाला पोऱ्या भलेही अजाणतेपणी या पूर्णत्वाचा आग्रह धरत असेल; आपण तो जाणतेपणाने धरायला काय हरकत आहे?

शाहू- आंबेडकर स्नेहबंध: मर्मबंधातली ठेव

माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज. (हे छायाचित्र प्रतिकात्मक आहे, अस्सल नाही.)

(राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने सन्मित्र प्रकाश लिंगनूरकर यांच्या साप्ताहिक 'वार्ता-सम्राट'च्या  दि. २६ जून २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या विशेषांकासाठी लिहीलेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.)

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर ही त्रयी म्हणजे या देशामध्ये समता प्रस्थापनेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. फुले आणि राजर्षींची भेट झालेली नसली तरी त्यांच्या सत्यशोधकी कार्याचा वसा आणि वारसा मात्र महाराजांनी अत्यंत सजगपणे पुढे चालविला. मात्र, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या उभय नेत्यांच्या परस्पर स्नेहभावाचा मी चाहता आहे. या दोघांच्या मोजक्या गाठीभेटी आणि त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार यातून त्यांच्या स्नेहबंधाची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही. त्याचप्रमाणे यंदा माणगाव परिषदेचा शतकमहोत्सव साजरा केला जात असताना राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहबंधांना उजाळा मिळणे, ही एक स्वाभाविक बाब आहे. राजर्षींच्या अकाली जाण्याने बाबासाहेबांचा प्रचंड मोठा आधार नाहीसा झाला तरी राजर्षींचे कार्य पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून देशभरात चिरंतन करण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले.
बडोदा संस्थानच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने विलायतेतील विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतलेल्या बाबासाहेबांनी तो पूर्ण करण्यासाठी पुंजी साठवावी म्हणून सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकी पत्करली होती. शिक्षण पूर्ण केल्याखेरीज सामाजिक अगर राजकीय जीवनात प्रविष्ट न होण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र, साऊथबरो कमिशनसमोर अस्पृश्यांच्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या संबंधाने जर बाजू मांडली नाही, तर या समाजाचे घोर नुकसान होण्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले. त्यातून त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये द महार या नावाने त्यांची बाजू मांडणारा लेख लिहीला. त्याचप्रमाणे थेट व्हॉइसरॉय कार्यालयाशी पत्रव्यवहार करून कमिशनसमोर साक्ष नोंदविण्यासाठी आपली निवड करवून घेतली. बाबासाहेबांचा टाइम्स ऑफ इंडियामधील लेख राजर्षींच्या वाचनात आलेला होता. त्या लेखाने ते प्रभावितही झालेले होते. आपले विश्वासू दत्तोबा पोवार यांच्याकडून त्यांनी बाबासाहेबांची माहिती मिळविली. महार समाजातील एक युवक विलायतेला जाऊन उच्चविद्याविभूषित होतो, ही बाबच मुळी राजर्षींना अभिमानास्पद वाटली. आपण अंगिकारलेल्या कार्याला अशीच फळे येण्याची स्वप्ने ते पाहात असत. दत्तोबांना सांगून त्यांनी बाबासाहेबांना भेटीला बोलावले. तोपर्यंत भारतातील संस्थानिकांबद्दल, त्यांच्या लहरी वर्तणुकीबद्दल बाबासाहेबांच्या मनात एक प्रकारची अढी होती. मात्र, राजर्षींच्या पहिल्या भेटीतच ती गळून पडली. परळच्या चाळीत आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांच्या या भेटी झाल्या. अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी बाबासाहेबांना वृत्तपत्राची निकड जाणवू लागलेली होती. ती त्यांनी राजर्षींना बोलून दाखविली. त्यांचा हा विचार पसंत पडून राजर्षींनी लगोलग त्यांना अडीच हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. राजर्षींच्या या मदतीमधूनच ३१ जानेवारी १९२० पासून मूकनायक प्रकाशित होण्यास सुरवात झाली. सरकारी नोकरीत असल्याने बाबासाहेबांचे त्यावर नाव नव्हते. पांडुरंग भटकर यांचे नाव संपादक म्हणून लागले. मात्र, अग्रलेखासह बहुतांश लेखन बाबासाहेबच करीत असत.
याच वेळी कागल संस्थानातल्या माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरविण्याचे नियोजन दत्तोबा पोवारांसह निंगाप्पा ऐदाळे वगैरे मंडळी करीत होती. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांना निमंत्रण देण्यात आले. २० व २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथे झालेली ही परिषद अनेकार्थांनी ऐतिहासिक स्वरुपाची ठरली. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याच्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या या पहिल्या परिषदेस राजर्षींची उपस्थिती आणि त्यांचे भाषण फार महत्त्वपूर्ण ठरले. शिकारीहून परत जाता जाता या परिषदेस उपस्थित राहात असल्याचे राजर्षींनी दर्शविले असले, तरी त्यामागे त्यांचे धोरणीपण अधोरेखित होते. अस्पृश्य समाजाला आंबेडकरांच्या रुपाने त्यांच्यातीलच नेता लाभला असून भविष्यात ते या देशाचे पुढारी होतील, असे भाकितच राजर्षींनी वर्तविले. त्याचबरोबर परिषदेनंतर त्यांना रजपूतवाडीच्या कँपवर भोजनाचे निमंत्रणही दिले. या परिषदेत झालेल्या इतर ठरावांबरोबरच शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करण्याचा ठरावही करण्यात आला.
माणगाव परिषदेनंतर दोनच महिन्यांत नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षींनी स्वीकारले. माणगाव परिषद ही जणू या नागपूर परिषदेची बीजपरिषद होती. आक्कासाहेबांची प्रकृती खालावल्यामुळे या परिषदेला राजर्षी उपस्थित राहतील की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना पाठविलेले पत्र हृदयास भिडणारे आहे. या पत्रात बाबासाहेबांनी म्हटले की, नागपूरच्या परिषदेस हुजुरांचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होणे अटळ आहे. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी आपला आधार व टेकू नाही मिळाला, तर काय उपयोग. घरी अपत्य आजारी असताना आपणास सभेस गळ घालणे हे कठोरपणाचेच लक्षण. पण काय करावे? आक्कासाहेबांप्रमाणे आम्ही आपली लेकरे नव्हे काय? आपल्याशिवाय आमचा कोण वाली आहे? आम्ही कालपर्यंत किती आजारी आहोत, हे आपणास सांगायला नको. आमचा परामर्ष यावेळी आपण घेतलाच पाहिजे. नाही तर आपल्यावर बोल नाही, रुसवा राहील. म्हणून माझी सविनय प्रार्थना आहे की, अन्य सर्व गोष्टींकडे काणाडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान मंडित करून या आपल्या लडिवाळ अस्पृश्य लेकास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर त्यांची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना वर काढणे अशक्य होईल. बाबासाहेबांचे हे शब्द वाचून राजर्षींच्या हृदयाला पाझर फुटला नसता तरच नवल. ते नागपूर परिषदेला उपस्थित राहिले आणि त्यांनी देशभरातून आलेल्या अस्पृश्य बांधवांना प्रेमभराने संबोधितही केले. श्रीपतराव शिंदे यांनी महाराजांचे भाषण वाचून दाखविले. त्यात महाराजांनी जातिनिर्मूलनामध्ये शिक्षण, रोटीव्यवहार आणि बेटीव्यवहाराचे महत्त्व सांगितले. त्याशिवाय जातिनिर्मूलनाचे आणखी एक महत्त्वाचे सूत्र सांगताना महाराज म्हणतात की, लग्नकार्यात निरर्थक पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षणासारख्या उपयुक्त कामाकडे तो लागला पाहिजे. ज्याप्रमाणे जपानमधील उच्चवर्णीय सामुराई यांनी पुढाकार घेऊन जसा तेथील जातिभेद संपवला, त्याचप्रमाणे येथील उच्चवर्णीयांची जातिभेद निर्मूलनातली भूमिका महत्त्वाची आहे. खालील जातींनी आपली सुधारणा करून, दर्जा वाढवून घेण्याचा व वरील पायऱ्यांवर चढण्याचा प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे. आणि वरील जातींनीही जरुर तर काही पायऱ्या खाली येऊन त्यांना हात देऊन वर घेतले पाहिजे. असे झाले म्हणजे सुरळीतपणे व सलोख्याने हे जातिभेद मोडण्याचे बिकट काम सिद्धीस जाण्याचा संभव आहे. आम्हासारख्या मराठ्यांना सुद्धा जात मोडून एकी करण्यास भाग पाडले पाहिजे, अशी भावना महाराजांनी व्यक्त केली. या परिषदेतही महाराजांचा जन्मदिन उत्सवासारखा साजरा करण्याचा ठराव झाला.
याच कालावधीत बाबासाहेबांनी राजर्षींना लिहीलेल्या एका पत्रात २६ जूनचा आपला वाढदिवस सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मूकनायकचा विशेषांक प्रकाशित करण्याचा मानस आहे. असे महाराजांना कळविले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे दरबारकडून उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही केली होती. बाबासाहेबांचे हे पत्र म्हणजे राजर्षींच्या जन्मतारखेचा एक अस्सल पुरावा आहे, यात शंका नाही.
नागपूर परिषदेनंतर बाबासाहेब महाराजांच्या मदतीनेच उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. यावेळी माझी भगिनी रमाबाईला मी कोल्हापूरला तिच्या माहेरी घेऊन जातो, असे भावोद्गार महाराजांनी काढले होते. बाबासाहेबांना त्यांनी त्यांचे मित्र सर अल्फ्रेड पीज यांच्यासाठी बाबासाहेबांचा गौरवपूर्ण परिचय करून देणारे व गरज भासल्यास त्यांना मदत करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले होते.
बाबासाहेब तिकडे असताना इकडे टिळकांनी महार ही गुन्हेगार जमात असल्याचे उद्गार काढले होते. त्याचप्रमाणे त्यांनी जमविलेल्या सार्वजनिक फंडातील गैरव्यवहाराचे प्रकरणही त्यावेळी चर्चेत आले होते. या दोन प्रकरणांमध्ये टिळकांवर दिवाणी अगर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करता येईल का, याविषयी इंग्लंडमधील मे. लिटल् आणि कंपनीकडे चौकशी करावी, असे पत्रही राजर्षींनी बाबासाहेबांना लिहीले होते. त्यावर अशा खटल्यातून त्रासाखेरीज काहीच निष्पन्न होणार नाही, असे बाबासाहेबांनी महाराजांना कळविले. त्यावर, महाराज पुन्हा त्यांना पत्र पाठवून सांगतात की, अशी केस दाखल करा. बाकी काही नाही झाले तरी, त्यामुळे ही केस कोणी दाखल केली, याची चर्चा होईल आणि तुम्ही साऱ्या इंग्लंडास माहिती व्हाल.
बाबासाहेब इंग्लंडमधील घडामोडींची फर्स्ट हँड माहिती पत्राद्वारे महाराजांना अवगत करीत असत. माँटेग्यू यांच्याशी झालेल्या भेटी आणि त्यातून मुंबई प्रांतिक विधिमंडळात त्यांनी दिलेली सदस्यपदाची ऑफर याविषयीही बाबासाहेब कळवितात. इंग्लंडमधील मजूर पक्षाशीही संवाद प्रस्थापित करीत असल्याचे त्यांनी कळविल्याचे दिसते.
४ सप्टेंबर १९२१चे बाबासाहेबांनी महाराजांना पाठविलेले पत्रही असेच हृदयाला भिडणारे आहे. या पत्रात त्यांनी महाराजांकडे दोनशे पौंडांच्या कर्जाची मागणी केली आहे. चलनाचे दर वाढल्यामुळे माझी लॉ ची फी १०० पौंड आणि भारतात परतण्यासाठी म्हणून १०० पौंड असे दोनशे पौंडांचे कर्ज द्यावे. ते परतल्यानंतर व्याजासह परतफेड करेन, असे बाबासाहेब कळवितात. याच पत्राच्या अखेरीस तुमची आम्हाला नितांत गरज आहे. कारण भारतात उदयास येऊ घातलेल्या सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण महान आधारस्तंभ (Pillar of the great movement towards social democracy)आहात, असे गौरवोद्गार बाबासाहेबांनी काढले आहेत. राजर्षींच्या समग्र कार्याचे एका वाक्यात यथोचित मूल्यमापन करणारे असे हे बाबासाहेबांचे उद्गार आहेत.
६ मे १९२२ रोजी महाराजांचे निधन झाल्याची वार्ता समजताच बाबासाहेबांचे हृदय विदीर्ण झाले. अत्यंत दुःखी आणि उद्विग्नावस्थेत त्यांनी राजाराम महाराजांना सांत्वनाची तार पाठविली. त्यामध्ये महाराजांच्या निधनाने व्यक्तीगत पातळीवर माझी अपरिमित हानी झाली आहेच, पण अस्पृश्य समाजाने आपला महान तारणहार गमावला, अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.
महाराजांच्या निधनानंतरही राजाराम महाराज, कोल्हापूर संस्थान यांच्याशी बाबासाहेबांचा स्नेह राहिला, तरी शाहू महाराजांइतकी जवळीक मात्र त्यात प्रस्थापित होऊ शकली नव्हती. महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूर दरबारच्या दिवाणांना आर्थिक मदतीची विनंती करण्यासाठी लिहीलेल्या पत्रात बाबासाहेब लिहीतात की, शाहू महाराज हयात असते तर आपल्याकडे मदतीसाठी याचना करण्याची वेळ आली नसती. पण, आपले नवीन महाराजही शाहू महाराजांसारखेच कृपाळू आहेत. त्यामुळे आमची निकड त्यांच्या कानी घालून काही मदत देता आली, तर पाहावे, असे बाबासाहेब लिहीतात. महाराजांच्या जाण्याने हा फरक निश्चितपणे पडला होता. बाबासाहेबांचा अर्धपुतळा त्यांच्या हयातीमध्येच कोल्हापूरच्या बिंदू चौकात बसविण्यात आला, हा नगरीने त्यांच्या कार्याला केलेला मानाचा मुजरा आहे.
बाबासाहेब महाराजांना माय डियर महाराजासाहेब असे संबोधन लिहीत, तर महाराज त्यांना माय डियर डॉ. आंबेडकर असे लिहीत. एका पत्रात मात्र महाराजांनी बाबासाहेबांना लोकमान्य डॉ. आंबेडकर असे संबोधले आहे. महाराजांच्या लेखी डॉ. आंबेडकर हे सच्चे लोकमान्य व्यक्तीमत्त्व होते. पुढे बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराजांना अभिप्रेत असणारे आपले लोकमान्यत्व सिद्ध केले.

(लेखक फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे अभ्यासक आहेत.)