बुधवार, ६ एप्रिल, २००५

हवा करवीरची आणि बेळगावची सुद्धा...


दै. सकाळमध्ये 'हवा करवीरची' आणि 'हवा बेळगावची' या अत्यंत लोकप्रिय साप्ताहिक सदरांमध्ये वेळोवेळी विविध व्यंगात्मक विषयांवर टिप्पणी करण्याची संधी मिळाली. त्यातीलच काही लेखन किस्से माझ्य़ा ब्लॉगवाचकांसाठी येथे शेअर करीत आहे.

(हवा करवीरची, दि. ६ एप्रिल २००५)

गांधीनगरला जाताना...

एका कोल्हापूरवासी मित्राकडे बाहेरगावचा मित्र आला. त्याला नवे कपडे खरेदी करायचे होते. स्थानिक मित्रानं त्याला गांधीनगरचं नाव सुचविलं आणि त्याला घेऊन तो निघालाही. तावडे हॉटेलच्या नव्या पुलाखालून गांधीनगरच्या रस्त्याला मोटरसायकल लागली आणि त्या रस्त्यावरून जाता-जाता बाहेरगावच्या मित्राची चुळबूळ वाढलीय, हे स्थानिक मित्राच्या लक्षात आलं. त्यानं मित्राला अस्वस्थतेचं कारण विचारलं. त्यांवर काहीसं ओशाळतच मित्र उत्तरला, 'गड्या, आपल्याला शर्ट-पँट घ्यायचीय; आणि तुझ्या या गांधीनगरच्या रस्त्याला असलेल्या वीस जाहिरात बोडपैिकी पंधरा बोर्डावर नुसत्या चड्डी-बनियनच्या जाहिराती आणि उरलेल्या पाचवर साड्यांच्या. त्यामुळं गांधीनगर म्हणजे केवळ चड्डी-बनियन आणि साड्या मिळण्याचं ठिकाण असावं, अशी शंका आली, एवढंच!' हे ऐकल्यावर स्थानिक मित्राला हसू फुटलं आणि गांधीनगरमध्ये पोहोचल्यावर त्याच्या. मित्रालाही. कारण हवे तसेच कपडे त्याला मिळाले होते ना!
***


(हवा बेळगावची, दि. ३१ ऑगस्ट २००१)


आणि पांढरे कावळे टपकले...

प्रत्येक महिन्याचे शेवटचे पाच दिवस आणि सुरवातीचे पाच दिवस हे निपाणीमधील पोलिसांचे रस्त्यावर वाहने अडवून चेकिंग करण्याचे दिवस आहेत. कारण हे दिवस म्हणजे तसे 'कडकीचेच' असतात. निपाणीतील लोक म्हणूनच त्यांना टपून बसलेले कावळे असे म्हणतात. कालही एका मार्गावर असे बरेच 'कावळे' थांबलेले होते. रस्ताही मोक्याचाच म्हणजे महाराष्ट्रात जाणारा. त्यामुळे तिथे महाराष्ट्रात 'पासिंग' झालेल्या गाड्याही बऱ्याच सापडत होत्या. या चौकात मोठ्या गाड्यांच्या वाहनाचालकांसह दुचाकी वाहनचालकांनाही अडवण्यात येत होते. प्रत्येकाकडून दंड घेतलाच पाहिजे असेच त्यांचे धोरण दिसत होते. ज्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती, त्यांना दंड भरण्याशिवाय पर्यायच नव्हता. ज्यांच्याकडे परवाना होता पण रजिस्ट्रेशन बुक नव्हते, त्यांनाही दंड. ज्यांच्याकडे परवाना व रजिस्ट्रेशनच्या झेरॉक्स कॉपी होत्या त्यांच्याकडून ओरिजनल नसल्यामुळे दंड. ज्यांना पावसाची तमा न बाळगता खिशात परवाना आणि रजिस्ट्रेशन बुक ठेवले त्याची जीर्णावस्था होणे साहजिकच. अशा लोकांना कागदपत्रे व्यवस्थित ठेवली नाहीत म्हणून दंड म्हणजे एकूण काय त्या मार्गावरून दंड न देता जाणारा माणूस फारच नशीबवान. त्यातच उलट जाब विचारणाऱ्यांचीही वेगळी सोय जवळच्याच एका हॉटलेच्या मागे केली होती. काही छोटे कावळे तेथे होते, ते अशा व्यक्तींना 'प्रसाद' कमी करीत नव्हते. ही सर्व मोहीम एक 'उप' पदावरच्या डोमकावळ्याच्या देखरेखीखाली सुरू होती. काही लोकांनी धाडस करून त्यांना विचारले की ही मोहीम कशासंदर्भात आहे? त्यावर त्यांनी पटकन उत्तर दिले. आज आम्ही "दंडवसुली"ची मोहीम उघडली आहे. असे उत्तर देऊन ते गडबडले; पण बाण सुटलेला होता. उत्तर ऐकणाऱ्यावर मात्र आश्चर्य करण्याची वेळ आली.

***




उपदेशांचा परिणाम असाही...
एखादी अफवा किंवा पालकांचे अतिउपदेश लहान मुलांच्या मनावर आपला किती खोल ठसा उमटवतात, हे आपल्याला अनेक उदाहारणांनी सांगता येते. लहानपणी हटवादीपणा आणि रडारड टाळण्यासाठी मोठ्या व्यक्तींनी भूत, बागुलबुवा, राक्षस या संकल्पना तयार केल्या. त्यांच्या सावल्या आयुष्यभर आपल्या मानगुटीवर बसलेल्या असतातच. शिवाय आपणही हा वारसा पुढे चालूच ठेवत असतो. अशाच अफवेमुळे लहान मुले कशी भयभीत होतात, त्याचा हा तसा मजेशीर पण विचार केला तर गंभीरही, असा किस्सा !
काही दिवसांपूर्वी निपाणीत लहान मुले पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा पसरली. संपूर्ण शहरवासियांत तसेच शाळांना ज्यांची मुले जातात, अशा पालकवर्गांत तर भीतीचे वातावरण पसरले. साहजिकच मुलांवर विविध उपदेशांचे भडिमार होऊ लागले. उपदेश काय ? हे सविस्तर सांगण्याची गरजच नाही. कारण 'घरोघरी मातीच्या चुली (किंवा एल.पी.जी. सिलेंडर !)'
तर असे उपदेश सतत ऐकून मुलेही काहीशी भयभीत होणे साहजिकच. अशीच काही मुले शेजारच्या एका गावातून निपाणीला शाळेसाठी येत होती. तेवढ्यात एका मुलाच्या दफ्तरातून पट्टी रस्त्यावर पडली. चालण्याच्या नादात ते मुलांच्या लक्षात आले नाही. पण बाजार करून गावाकडे परत जाणाऱ्या एका खेडूताच्या ते लक्षात आले. तेव्हा त्याने वळून त्या पोरांना हाक मारली. 'अरे, पोरांनो हिकडे या. ह्ये बगा काय पडलं?' त्या पोरांनी मागे वळून पाहिले. आपल्याला एक अनोळखी माणूस बोलावतोय. त्याच्या खांद्यावर घोंगडी, एका हातात पिशवी आणि दुसऱ्या हातात काठी आहे. हे दृश्य त्या पोरांनी पाहिले आणि घरच्यांचे सारे उपदेश त्यांच्या बालमनात झरझर तरळले आणि एकाएकी त्यांनी शाळेच्या दिशेने जोरात पळायला सुरवात केली. खेडूत बिचारा हाक मारत राहिला आणि पोरं कधी नव्हे ती शाळेत लवकर पोचली. खेडूतानंही काही न समजून परत गावचा रस्ता धरला.
***

(हवा बेळगावची, दि. १४ सप्टेंबर २००१)


एकाला दोघांची येवस्था...


एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही त्याच्या नातेवाईकांच्या तसेच इतर संबंधितांच्या दृष्टीने करुण आणि दुःखी घटनाच. बेळगावमध्ये बऱ्याच तालुक्यात यावर्षी दुष्काळाचे सावट पडले आहे. अशा वेळी एखाद्याच्या मृत्यूच्या दुःखद प्रसंगीही विनोद कसा घडतो ते दर्शविणारी ही घटना.

एका ठिकाणी नुकतेच एका व्यक्तीचे निधन झाले. सर्व घरगुती सोपस्कार उरकल्यानंतर अंत्ययात्रेच्या तयारीला सुरवात झाली. काही नेहमीचे सराईत लोक त्यासाठी तयारच होते. अंत्यविधीचे सर्व साहित्य मिळाले; पण तिरडीसाठी गवताची एकच पेंढी मिळाली. त्यामुळे तिरडी बांधणाऱ्याला 'टेन्शन' आलं. त्यानं दोन-तीन जणांना वेगवेगळ्या ठिकाणी गवताच्या पेंढ्या आणण्यासाठी पिटाळलं. परिसरात दुष्काळ पडल्यामुळे गवताच्या पेंढ्या मिळणंही मुश्किल बनलं होतं. पेंढ्या आणण्यासाठी गेलेले दोघे हात हलवत परतले. त्यामुळे 'सराईताचं' टेन्शन आणखी वाढलं. आता तिसरा कधी येतोय याची वाट पाहणं सुरू होतं. एवढ्यात 'तिसरा' दिसला. त्याच्या सायकलीवर थोड्या का असेना पेंढ्या दुरुनच दिसल्यावर सराईताच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. तिसरा गडबडीत पुढे झाला. म्हणाला, "अण्णा, पाच-सहाच पेंढ्या मिळाल्या." अण्णाला जग जिंकल्याचा आनंद झाला आणि तो म्हणाला, "गड्या लई मोठं काम केलंस. तेवढ्या पेंढ्यांत एकाला दोघांची येवस्था करतो बघ." आता त्याचे हे उद्गार ऐकून उपस्थितांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच करा...
***

(हवा बेळगावची, दि. १९ ऑक्टोबर २००१)


आता पुरे...

काही लोक एखाद्या गोष्टीचा इतका अतिरेक करतात की, इतरांना त्यांना 'आता पुरे' असे सांगण्याची वेळ येते. असेच काहीसे निपाणीत घडले.
काही दिवसांपूर्वी येथे काही हौशी लोकांनी मराठी गायन स्पर्धांचे आयोजन केले. अशा गायन स्पर्धा निपाणीत वरचेवर आयोजित केल्या जातात. कधी त्या स्थानिक पातळीवर होतात तर कधी खुल्या स्वरूपात होतात. सांगायचा मुद्दा असा की, निपाणीत काही प्रस्थापित कलाकारही तयार झाले आहेत की, ज्यांनी व्यावसायिक पातळीवरही आपली गायनकला सिद्ध केलेली आहे. निपाणी परिसरातीलच नव्हे, तर सांगली, कोल्हापूर, बेळगावचे लोकही त्यांना व्यावसायिक कार्यक्रमांचे निमंत्रण देत असतात. असे हे (बुजुर्ग) कलाकार वर्षानुवर्षे अशा गायन स्पर्धांतून भाग घेतात आणि साहजिकच आपला अनुभव आणि संगीताचे ज्ञान या जोरावर पारितोषिकेही मिळवतात. सुरवातीला त्यांच्या संघर्षाच्या काळात जरी हे ठीक असले तरी आता इतके नाव मिळविल्यानंतर अजूनही हे कलाकार अशा स्पर्धांतून भाग घेतच आहेत आणि बक्षिसेही मिळवत आहेत.
परवाच्या गायन स्पर्धेतही असेच झाले. अगदी पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसापासून ते अपवाद वगळता उत्तेजनार्थपर्यंत सर्व बक्षिसे याच कलाकारांना मिळाली. त्यामुळे नाही म्हटले तरी नवीन स्पर्धकांवर अन्यायच झाला. स्पर्धा या नवीन 'टॅलेंट'चा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केल्या जातात; पण या प्रस्थापितांनी स्पर्धेच्या मूळ कल्पनेलाच धक्का दिला. त्यामुळे निपाणीत या कलाकारांबद्दल नाराजीच पसरली आहे. 'तुम्ही श्रेष्ठ आहातच. ते सिद्ध करण्याची आता गरज उरलेली नाही. मात्र नवीन लोकांना संधी आणि प्रोत्साहन देऊन, मार्गदर्शन करून तुम्ही आपले श्रेष्ठत्व सिद्ध करा. त्यांच्याशी स्पर्धा करून तुम्ही तुमचे मोठेपण गमावत चालला आहात. तेव्हा आता पुरे...' अशीच चर्चा या स्पर्धेसंदर्भात शहरात सुरू आहे.
***

'स्त्री हट्टा' तुझी कहाणी....
निपाणीत अशाच एका गायन स्पर्धेच्या संयोजकांना 'स्त्री हट्टा'चा महिमा किती अगाध आहे, याचे प्रत्यंतर आणून देणारा घडलेला हा किस्सा !
या स्पर्धेच्या संयोजकांत विविध वाद्य'वृंदा'त काम केलेल्या एक महिला सदस्य होत्या. जवळजवळ सर्व निपाणीकरांना परिचित असं त्यांचं व्यक्तिमत्त्व! त्यांचे पतीराजही त्यांच्या क्षेत्रात कधीही पराभूत न झालेले. तेही या संयोजन मंडळाशी संबंधित. 

तर सगळं संयोजन अगदी व्यवस्थित सुरू असताना अगदी शेवटच्या क्षणी मोठा पेचप्रसंग उभा राहिला. या संयोजक महिला ज्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा गाजवत होत्या, तेव्हापासूनची त्यांची एक कट्टर प्रतिस्पर्धी कलाकार आहे, तिनेही या स्पर्धेसाठी आपले नाव नोंदविले. इतर संयोजकांनी तिचे नाव नोंदवून घेतले. इथे पहिली ठिणगी पडली. त्यानंतर जेव्हा स्पर्धेसाठी लॉटरी पद्धतीने स्पर्धकांचे क्रम ठरविण्यात आले, त्यातही योगायोगाने या 'प्रतिस्पर्धी' कलाकाराला सुरवातीच्या काही क्रमांतच गायनाची संधी मिळाली, त्यामुळे या संयोजक महिलेचा मात्र मोठा जळफळाट झाला. तिला वाटले की इतर संयोजकांनी तिचा अपमान करण्यासाठीच तिच्या प्रतिस्पर्धकाला प्राधान्य दिले. ती तडक कार्यक्रमस्थळ सोडून निघून गेली. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपल्यानंतर इतर संयोजकांना याबाबत समजले. त्यानंतर मात्र या संयोजकांना त्या उभयतांची समजूत घालता घालता पुरेवाट झाली. पाय तेवढेच धरायचे बाकी राहिले. या 'स्त्रीहट्टा'मुळे संयोजकांना कार्यक्रम यशस्वी केल्याचा आनंद मात्र उपभोगता आला नाही.

***

हवा बेळगावची, दि. ९ नोव्हेंबर २००१)


प्राध्यापकांची वाटचाल

'प्राध्यापक' म्हटलं की सर्वसामान्यपणे पापभिरू, कुणाच्याही वाटेला स्वतःहून न जाणारा, मुद्दाम कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करणारा, समाजात 'बुद्धिजीवी' म्हणून मान असणारा किंवा तो तसा असावा, अशी समाजाची अपेक्षा असणारा डोळ्यासमोर उभा राहतो. आपल्या आचार-विचारांनी विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून भावी पिढी आदर्श व चारित्र्यसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न व परिश्रम करणारा तो प्राध्यापक. या प्राध्यापकाने सर्व समाज बंधने व्यवस्थित पाळली पाहिजेत आणि तसेच संस्कार विद्यार्थ्यांवर करावेत, अशीही त्यांच्याकडून अपेक्षा असते; परंतु निपाणीत एका 'विद्वान' प्राध्यापकांनी 'भौतिक' सुखाच्या मागे लागून बेकायदेशीर प्रकारांचा अवलंब करण्याचा प्रकार घडला.
झाले असे की, काही दिवसांपूर्वी निपाणीत अनधिकृत बांधकामांविरुद्ध नगरपालिकेने मोहीम हाती घेतली. ही बांधकामे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे ठरवून पालिकेच्या पथकाने शोध सुरू केला. पथकाला पहिल्या टप्प्यात येथील एका महाविद्यालयीन प्राध्यापकाच्या बांधकामासह एकूण सहा अनधिकृत बांधकामे आढळली. यावर हा तरुण रक्ताचा प्राध्यापक आपली चूक मान्य करून शांत बसला नाही तर बांधकाम हटवले जाऊ नये म्हणून त्याने जोरदार प्रयत्न चालवले. वैयक्तिक पातळीवरील प्रयत्नांबरोबरच राजकीय दबावतंत्रांचाही ते वापर करू लागले आहेत.
त्यांच्या या प्रयत्नाला यश येईल किंवा अपयश, हा भाग अलाहिदा; परंतु यानिमित्ताने शहरात मात्र चर्चेला उधाण आले आहे. एका प्राध्यापकाने अशाप्रकारे खालच्या पातळीवर उतरणे अत्यंत चुकीचे आहे. स्वतः अनधिकृतपणे वागणारे प्राध्यापक विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार? या चर्चेबरोबरच वाईट गोष्ट म्हणजे या प्राध्यापकाच्या एकूणच नोकरी, शिक्षण याबाबतीतही लोकांतून शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. त्यामुळे आता या प्राध्यापकांनी आपल्या एकूण वाटचालीवरच नजर टाकून आपली 'अनधिकृत' वाटचाल बंद करून 'अवघाचि' सुपंथ धरावा, एवढीच अपेक्षा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा