सोमवार, ३ फेब्रुवारी, २००३

एका यशोगाथेचा शोकान्त!

(भारतीय अंतराळवीर कल्पना चावला हिचा गेल्या १ फेब्रुवारी २००३ रोजी अंतराळ स्थानकाहून परत येत असताना अवकाशातच दुर्दैवी अंत झाला. या प्रसंगी तिच्या संदर्भात लिहीलेला लिहीलेला एक लेख सोमवार, दि. ३ फेब्रुवारी २००३ रोजी 'युवा सकाळ'च्या पहिल्या पानावर महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाला. तो माझ्या वाचकांसाठी येथे देत आहे.)

कल्पना चावला


कल्पना चावला ! एकदा अवकाशात जाऊन आली, तेव्हाच ती तिच्या कुटुंबीयांबरोबरच अखिल भारतवासीयांच्या कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय बनली. त्यामुळे तिची दुसऱ्या अवकाश संशोधन मोहिमेसाठी निवड होणं हा तर तिच्या आई-वडिलांना, चुलत भावंडांसाठी अत्युच्य आनंदाचा क्षण असणे स्वाभाविक होते. मात्र शनिवारी तिच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या कुटुंबीयांना डोळ्यांदेखत जळणारे कोलंबिया अवकाशयान हतबलपणे पाहव्याखेरीज काहीच करता आले नाही. एका साहसी यशोगाथेचा कल्पनाच्या रूपाने शोकांत झाला, मात्र तरीही कित्येक भारतीय तरुणींना साहसाची प्रेरणा देणाऱ्या कल्पनाने या घटनेतूनही जाता जाता तिच्या ठायी असलेल्या प्रचंड साहसी वृत्तीची प्रचितीच जणू दिली.

गेल्या वर्षीच्या मध्यापासूनच ही अवकाश मोहीम तांत्रिक कारणांनी पुढे ढकलत ढकलत अखेर जानेवारीत पूर्णत्वाला गेली..
कल्पनाच्या कुटुंबीयांनाही याची कल्पना होती. कल्पनाला या मोहिमेसाठी शुभेच्छा देण्यासाठी तिचे आई-वडील, दोन थोरल्या बहिणी, तिची चुलत भावंडे अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेत गेले होते. गेल्या शनिवारी सकाळी केनेडी अवकाश केंद्रात कल्पनाचे स्वागत करण्यासाठी हे सर्व जण उपस्थित होते. यान उतरण्याला जास्तीत जास्त एक ते दीड तास अवधी उरला असतानाच परतीच्या मार्गावरच त्याचा स्फोट आणि अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय कन्येच्या मृतदेहाची राखही अवकाशात विखुरली.
कल्पनाच्या कुटुंबीयांना तिच्या कामगिरीचा अभिमान असण्याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे अवकाशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आर्थिक बळ तिच्या कुटुंबात नव्हते. १९४७ च्या फाळणीवेळी पाकिस्तानातून तिचे वडील दंगलीत कसाबसा जीव बचावत कर्नालला आले होते. कर्नालच्या रेल्वेस्थानकावर भुईमुगाच्या शेंगा विकून त्यांनी आपले कुटुंब स्थिरस्थावर केले. या पार्श्वभूमीवर न डगमगता आपले स्वप्न हे दिवास्वप्न न ठरू देता तिने जिद्दीने त्याच्या पूर्तीचा ध्यास घेतला आणि परिस्थितीला नमवीत आपले उद्दिष्ट साध्य केले.
आपल्या धाकट्या बहिणीबद्दल बोलताना कल्पनाची मोठी बहीण सुनीता चौधरी यांना शब्द पुरत नाहीत. 'भेटींदरम्यान तसेच फोनवरून आपल्या प्रकल्पांविषयी आणि मोहिमांबद्दल सांगताना कल्पना अगदी भारावून जायची. आपल्या कामगिरीचा सार्थ अभिमान तिला होता,' असे त्या सांगतात. सुनीता यांचे पतीही पायलट होते आणि त्यांचा मुंबईत एका विमान अपघातात मृत्यू झाला, हे उदाहरण देऊन सुनीता कल्पनाला नेहमी सावधगिरीचा सल्ला द्यायची.
'नासा'त अंतराळवीर म्हणून निवड होण्यापूर्वी ती पती ज्याँ पेरी, जे ब्रिटिश फ्लाइट इन्स्ट्रक्टर आहेत, यांच्यासोबत भारतात दोन वेळा येऊन गेली, पेरी यांच्याही कुटुंबाचा इतिहास कल्पनाच्या कुटुंबाशी मिळताजुळता आहे. त्यांचे वडील ज्यू असल्यामुळे हिटलरच्या छळाची झळ त्यांना बसली होती. यामुळेच परकीय असूनही पेरी यांच्याबाबत कल्पनाच्या सर्वच कुटुंबीयांना आत्मियता आहे.
अमेरिकेला आता जाण्यामागे तिच्या घरच्यांचा तिला भारतात घेऊन येण्याचा हेतू होता. भारतातील ज्या हजारो तरुण-तरुणींचे ती प्रेरणास्थान बनली आहे; त्या सर्वांना तिच्या कामगिरीची वर्णने तिच्याच तोंडून त्यांना ऐकवायची होती. आपले ध्येय साध्य करण्यात आलेल्या अडचणींशी तिने कसा मुकाबला केला, तसेच जगभरातल्या अगणित नागरिकांसाठी अजून विमानप्रवासही स्वप्नवत असताना, एकदा नव्हे तर दोनदा अवकाश फेरीनंतर तिच्या भावना त्या सर्वापर्यंत पोहोचवायच्या होत्या. मात्र, आता ते सारेच तिच्यासोबत इतिहासगर्भात लोपले आहे. मागे उरल्या आहेत, त्या तिच्या पराक्रमी मोहिमेच्या आठवणी. त्या आपण जपून ठेवू या. पुढील पिढ्यांना सांगू या. त्यातूनच अवकाशाची स्वप्ने पाहणाऱ्या नव्या 'कल्पना' घडविण्याला प्रोत्साहन देऊ या. हेच तर कल्पनाच्या हौतात्म्याचे आणि यशोगाथेचे सांगणे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा