शुक्रवार, २६ एप्रिल, २००२

'टायटॅनिक'चे भविष्य वर्तविणारी गूढ कादंबरी...

( दि. २६ एप्रिल २००२ रोजी दै. सकाळच्या लक्षवेधी पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला विशेष लेख.)




टायटॅनिक लायनर... जगात आजपर्यंत बांधण्यात आलेले सर्वांत मोठे जहाज... आठशे फूट लांब, तीन हजार लोकांना वाहून नेण्याची क्षमता असणारे हे जहाज हिमनगावर आपटले आणि बुडाले. पुरेशा जीवरक्षक बोटींअभावी त्यातील हजारो प्रवासीही बुडाले. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. १९१२ मध्ये घडलेल्या या दुर्दैवी अपघातास या आठवड्यात ९० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु ही दुर्घटना घडेपर्यंत किंवा त्यानंतरही आजतागायत बऱ्याच लोकांना एक गोष्ट माहीत नाही की, ही दुर्घटना घडण्याच्या १४ वर्षे आधीच या घटनेचे भाकित विस्मयजनकरीत्या वर्तविण्यात आले होते... तेही एका पुस्तकाच्या माध्यमातून...
मॉर्गन रॉबर्ट्सन हा कोणी एखादा भविष्यवेत्ता नव्हता किंवा धर्मोपदेशकही नव्हता. बऱ्यापैकी पार्श्वभूमी असणारा तो एक अमेरिकन खलाशी होता, ज्याने आपल्या तुटपुंज्या शिक्षणाच्या आधारावर मोठ्या लेखकाचा आव आणला होता. आयुष्यभरात एखादेही ध्येय साध्य करणे त्याला शक्य झाले नाही. त्याने लिहिलेले अवघे ९६ पानी पुस्तक, ज्याला कादंबरी म्हणणेही धाडसाचे ठरावे, ते साहित्यिकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. सरधोपट मागनि त्याने हिमनगाशी टक्कर झाल्यानंतर एका बोटीवरील प्रवाशांचा मृत्यूशी मुकाबला मांडला आहे. तरीही याच कारणांमुळे त्याने योगायोगाने मांडलेले कथानक मात्र विस्मयकारक आणि लक्षवेधी ठरले आहे.

खऱ्याखुऱ्या मोठ्या बोटीचे नाव टायटॅनिक होते, तर १८९८ मध्ये रॉबर्ट्सनने त्याच्या कथेतील जहाजाचे नाव 'टायटन' ठेवले होते. ८८२ फूट लांबीची टायटॅनिक मानवी हातांनी तयार केलेली आजपर्यंतची सर्वात मोठी बोट होती, तर रॉबर्ट्सनची टायटन ८०० फूट लांब होती. टायटॅनिक ६६ हजार टनांचे वजन वाहू शकत होती, तर टायटनची क्षमता ७० हजार टनांची होती. दोन्ही जहाजांची क्षमता तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची होती. खऱ्या टायटॅनिकमधून दोन हजार लोक प्रवास करत होते, तर, रॉबर्ट्सनच्या काल्पनिक टायटनवरही दोन हजारच प्रवासी होते. दोन्ही जहाजांना प्रत्येकी तीन प्रोपेलर्स होती आणि दोन्ही जहाजे कमाल २४ नॉटस् म्हणजे ताशी तीस मैल वेगाने अंतर काटू शकत. रॉबर्ट्सनचे टायटन सुद्धा कधीही बुडणार नाही, असेच बनविले होते. 'मानवाने आपल्या अवगत ज्ञानाचा, व्यावसायिकतेचा पुरेपूर वापर करून ही बुडू न शकणारी, नष्ट न होऊ शकणारी बोट बनविली होती, केवळ कायद्यांचे पालन म्हणून ती सोबत काही जीवरक्षक बोटी न्यायची,' असे रॉबर्ट्सनने आपल्या टायटनचे वर्णन केले आहे, जे टायटॅनिकच्या निर्मात्यांच्या मताशी तंतोतंत साधर्म्य दाखविते.

टायटॅनिकच्या हिमनगाशी धडकेपेक्षा रॉबर्ट्सनने त्याच्या कथेत ही धडक अधिक नाट्यमयरित्या घडविली आहे. धडकेनंतर टायटनची मागील बाजू हवेत उचलली जाते, मग ती एका बाजूला कलंडून बुडते. योगायोगाने टायटॅनिकची मागची बाजू अखेरच्या क्षणी प्रोपेलर्ससह हवेत उचलली गेली होती आगि त्यानंतर तिचा समुद्राच्या तळाकडे वेगाने प्रवास झाला. रॉबर्ट्सनच्या कथेतील इतरही काही प्रसंग प्रत्यक्ष घटनेशी अविश्वसनीयरीत्या साधर्म्य दाखवितात. त्याच्या टायटनची हिमनगाशी धडक मध्यरात्री बाराच्या सुमारास होते. टायटॅनिकची त्यापूर्वी केवळ वीस मिनिटे आधी म्हणजे ११ वाजून ४० मिनिटांनी झाली होती.

रॉबर्ट्सनच्या जहाजात पाणी शिरण्यास अटकाव करण्यासाठी १९ मजबूत भिंती होत्या, टायटॅनिकमध्ये त्यांची संख्या १५ होती. रॉबर्ट्सनचे टायटनही टायटॅनिकप्रमाणेच एप्रिलमध्ये बुडाले. प्रत्यक्ष घटनेच्या सुमारे चौदा वर्षे आधीच ही कादंबरी लिहीणाऱ्या रॉबर्ट्सनने, दुर्घटनेतून बचावलेल्या आपल्या कथेतील पात्रांना न्यूयॉर्कच्या धक्क्यावर सुखरूप पोचविले. टायटॅनिक दुर्घटनेतून वाचलेले ७०५ प्रवासी सुद्धा न्यूयॉर्कच्या बंदरावरच सोडण्यात आले होते. रॉबर्ट्सनच्या टायटन दुर्घटनेची बातमी देण्यासाठी न्यूयॉर्कमधील वृत्तपत्रांनी जादा आवृत्त्या छापल्या होत्या. हे टायटॅनिक दुर्घटनेच्या बाबतीत खरोखरच घडले. त्यात न्यूयॉर्क टाइम्सने मोठी बाजी मारली होती. कारण त्याचे संपादक कार व्हॅन अँडा यांनी एकूण रचनेचा अभ्यास करून टायटॅनिक प्रवासाला निघण्यापूर्वीच ते अधिक काळ पाण्यावर तरंगू शकणार नाही, असे भाकित वर्तविले होते.
या साधर्म्याखेरीज रॉबर्ट्सनच्या कथेत काही विरोधाभासही होता. कथेतील हिमनग दाट धुक्यामुळे दिसू शकला नव्हता. तर, टायटॅनिकच्या धडकेवेळी समुद्र शांत होता, तसेच वातावरणही स्वच्छ होते. त्याच्या कथेतील मुख्य पात्र एक 'मेयर' होता. हा मेयर मोडकेतोडके इंग्रजी बोलत आणि विचित्र वागत असे. प्रत्यक्ष टायटॅनिकवर इसा डॉर स्ट्राऊस यांच्यासारखे दिलदार लोक होते. स्ट्राऊस दांपत्याने जीवरक्षक बोटीवर लहान मुले व महिलांना चढवण्यास प्राधान्य दिले. ते दोघे मात्र जहाजाबरोबरच बुडाले,
रॉबर्ट्सनने अत्यंत ओबडधोबडपणे ही कथा लिहिलेली आहे. १८९८ मध्ये एम. एफ. मॅन्सफिल्ड यांच्या न्यूयॉर्क हाऊसने 'फ्युटीलिटी' नावाचे हे पुस्तक प्रकाशित केले. १९१२ ला टायटॅनिक दुर्घटनेनंतर न्यूयॉर्कच्या मॅक्युलर आणि मेट्रोपॉलिटन या मासिकांनी त्याचे पुनर्मुद्रण केले. त्यावेळी रॉबर्ट्सन जिवंत होता. या घटनेनंतर त्याची बऱ्यापैकी मिळकतही झाली. त्यानंतर तीन वर्षांनी मार्च १९१५ मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी तो मरण पावला. मात्र त्याने अखेरपर्यंत 'फ्युटीलिटी'चे कथानक कसे सुचले किंवा त्यामागील प्रेरणा याबद्दल अवाक्षरानेही माहिती दिली नाही. 'द टायटॅनिक कॉन्स्पिरसी' या पुस्तकात लेखक रॉबिन गार्डिनर आणि कॅन व्हॅन डरवॅट यांनी रॉबर्ट्सनचा 'एक हौशी गूढवादी' असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे.

बुधवार, ६ मार्च, २००२

मागणी रास्त, पण....

('दै. सकाळ'च्या बेळगाव आवृत्तीमध्ये 'चर्चा' या साप्ताहिक सदरामध्ये बुधवार, दि. ६ मार्च २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे फेरसादर करीत आहे.)




निपाणीतील दिवेकर कॉलनीतील वेश्यांचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांनी गेले काही दिवस चर्चेत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे वेश्यांमध्ये एडस्बाबत जागृतीसाठी कार्यरत असलेल्या संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेच्या श्रीमती मीना शेषू येथे वेश्यांच्या बैठका घेऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत, अशी चर्चा एका वर्तुळात सुरू आहे. यातील गंभीर बाब अशी की, पोलिस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनीही श्रीमती शेषूंना सहकार्य करणे तर दूरच; उलट त्या आणि त्यांचे सहकारी पत्रकार नील पाटे यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधले. याशिवाय वेश्या या 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असेही उद्‌गार एका पोलिस अधिकाऱ्याने काढले. हीच सर्वात आक्षेपार्ह बाब आहे. हा विषय गुंतागुंतीचा अनेक पदरी असल्याचे झालेल्या घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे श्रीमती शेषू यांनी सुरवातीच्या काळात स्वतःच्या घरी वेश्यांच्या बैठका घेतल्या, हे विसरता येणार नाही. एका महिलेने अशा पद्धतीने काम करणे हीच आजही अत्यंत वेगळी वाटणारी तरीही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधणे म्हणजे त्यांच्या कामाचा आणि त्यातील मानसिक, भावनिक गुंतवणुकीचा तो अपमानच म्हटला पाहिजे.
दुसरी बाब म्हणजे पोलिस अधिकाऱ्याने वेश्यांना 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असे म्हणणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. या महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या उद्‌गारांतून स्पष्ट होतो. पोलिस ठाण्याच्या पाठीमागच्या भिंतीला लागून असलेल्या दिवेकर वस्तीत वेश्या व्यवसाय वर्षानुवर्षे का सुरू राहिला, याचे उत्तर त्यांच्या उद्‌गारांमागील प्रवृत्तीत आहे.
सुरवातीपासूनच पोलिसांनी येथील वेश्यांविरुद्ध कारवाई करून दबाव आणला असता तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे दिवेकर वस्तीतील नागरिकांनीच दबाव आणून आतापर्यंत येथे वेश्यावस्ती वाढू दिलेली नाही. श्रीमती शेषू यांनी येथे येऊन आपल्या संस्थेची शाखा उघडल्यानंतर त्या नागरिकांना परत येथे वेश्यावस्ती वाढण्याचे भय वाटते आहे, हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल किंवा त्यांना श्रीमती शेषू यांच्या कार्याची पुरेशी माहिती नसावी. या नागरिकांच्या भावनांचा काही नगरसेवकांनी फायदा उठवून त्यांना चिथावले आणि येथील वेश्या व्यवसाय बंद करावा म्हणून मोर्चा काढला. त्यांची मागणी अगदी रास्त आहे; पण, त्यांनी श्रीमती शेषू वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप करणे पूर्णतः चुकीचे आहे.
मुळात एखाद्याच्या प्रोत्साहनामुळे वेश्या व्यवसाय वाढतो, असे म्हणणेच चुकीचे आहे. किंबहुना वेश्या व्यवसाय संबंधितांनी स्वेच्छेने स्वीकारला असे कधीही होत नाही. वेश्या निर्माण होण्यास समाजच कारणीभूत असतो. निपाणी जर इतकी स्वच्छ होती, येथील सगळेच नागरिक इतके चारित्र्यसंपन्न होते, तर येथे वेश्यावस्ती निर्माण झालीच कशी, हा प्रश्न या पार्श्वभूमीवर ठळकपणे सामोरा येतो. त्याला उत्तर आहे ?
त्या महिलांच्या समस्या जाणून घ्यायला एक महिला पुढे सरसावते, त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविते, त्यांना आपलेपणाने वागविते. यामुळे या वेश्यांनाही त्यांच्याबाबत आत्मीयता वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच त्या त्यांच्याकडे येतात. इतर समाजाने त्यांना ओरबाडण्याखेरीज दुसरे काय केले आहे?
साधारण एक वर्षांपूर्वी वेश्यांची राष्ट्रीय परिषदही झाली. त्यावेळी देशभरातून हजारो वेश्या राजधानीत एकत्र आल्या होत्या, याचीही आठवण येथे द्यायलाच हवी.
पूर्वापार दुर्लक्षित असलेल्या या समाजघटकाच्या समस्यांकडे गांभीयनि कोणीही पाहत नाही. यासाठीच त्यांना संघटित करून एडस् तसेच इतर समस्यांबाबत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी काम करणाऱ्या श्रीमती शेखूंसारख्या सेवाभावी व्यक्तींना किमान उपद्रव देऊ नये, ही जबाबदारी ओळखण्याचे भान आपल्याला कधी येणार हा प्रश्न आहे.
याबाबत येथील स्थानिक सेवाभावी सामाजिक संस्थांनीही मौन का बाळगले आहे, हे समजायलाही मार्ग नाही. वेश्याव्यवसाय बंद करण्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांनी व नागरिकांनी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, केवळ या वेश्यांना येथून हाकलून देऊन चालणार नाही. कारण त्या इतरत्र जाऊन पुन्हा तोच व्यवसाय करणार! यावर उपाय म्हणजे त्यांना पर्यायी व्यवसाय उपलब्ध करून निर्वाहाचा दुसरा मार्ग निवडण्यासाठी प्रोत्साहन व सहाय्य देणे, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःची मानसिकता आधी बदलायला हवी.
केवळ कर्नाटकातील वेश्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर देवदासी प्रथेचा याला प्रचंड मोठा हातभार आहे. पुण्या-मुंबईमध्येसुद्धा या देवदासीच अधिकांशरित्या भोगदासी झालेल्या आहेत. याबरोबरच गरिबी, अज्ञान आणि सामाजिक परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायाकडे महिला-मुली वळताना दिसतात.
वेश्या व्यवसायाच्या निर्मूलनासाठी आपण प्रत्यक्ष जरी काही करत नसलो तरी कार्यकर्त्यांना सहकार्य करू शकतो. तेही शक्य नसेल तर त्यांना त्रास देऊन खच्चीकरण करणे तरी थांबवावे. त्यांना शांतचित्ताने आपले काम करू द्यावे. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरेल. तेवढा विवेक आता आपण दाखवायलाच हवा !

मंगळवार, ८ जानेवारी, २००२

विद्याकरच्या रूपाने चेन्नईत 'फादर तेरेसा'

(दै. सकाळच्या लक्षवेधी पुरवणीमध्ये दि. ८ जानेवारी २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा विशेष लेख ब्लॉगवाचकांसाठी...)

 



काही माणसांचा जन्मच दुसऱ्यावर प्रेम करणे, माया देणे, दुःखावर फुंकर घालणे, यासाठीच झालेला असतो की काय, असे त्यांचे जीवितकार्य पाहून वाटते. मदर तेरेसा त्याचे मूर्तिमंत प्रतीक. चेन्नई येथील विद्याकर यांचे कार्यही मदर यांच्या कामाशी किती तरी साधर्म्य दाखविणारे आहे. जणू ते चेन्नईतील दीन-दुःखितांचे 'फादर' तेरेसाच आहेत.

अद्याप पन्नाशीही न गाठलेल्या विद्याकर यांनी गेल्या अठरा वर्षांत समाजाने नाकारलेल्या सुमारे अठराशे लोकांसाठी मायेचे, आपुलकीचे नंदनवन उभारले आहे. त्यांच्या या प्रचंड परिवारात नवजात अर्भके, हरवलेली, टाकून दिलेली मुले, घराबाहेर काढलेली माणसे ते मृत्युपंथाला लागलेल्या आजारी वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. मोठी आर्थिक अडचण असूनही त्यांच्याकडे येणाऱ्या कोणाही गरजवंताला त्यांचा दरवाजा कधीही बंद नसतो. अशा व्यक्तीने त्यांना एक दूरध्वनी जरी केला तरी काही वेळातच ते त्याच्यासमोर हजर असतात. या लोकांसाठी त्यांनी चेन्नईबाहेर एका प्रशस्त, शांत आवारात निवासस्थान उभारले आहे. तेथेच ते आसपासच्या खेडेगावातील मुलांसाठी शाळाही चालवितात.

या सर्व गोष्टी विद्याकर यांच्या हातून घडत आहेत, याचे बरेचसे मूळ त्यांच्या लहानपणात रुजलेले आहे. १९५३ ला म्हैसूरजवळच्या कोल्लीगल खेड्यात जन्मलेल्या विद्याकर यांचे आई-वडील त्यांच्यांवर सतत रुष्ट असत. ज्यावेळी काहीच समजत नव्हते, अशा वयात आपल्या आई-वडिलांना आपण नको आहोत, एवढे त्यांना समजले, 'का' ते समजायचे, ते वय नव्हते. त्यामुळे ते बराचसा वेळ घराबाहेर घालवित. रस्त्यावर भटकणे, शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करणे अशी कामे करीत, जेणेकरून स्वतःला समाधान मिळेल, असे ते पाहत होते.

१९६७ मध्ये म्हैसूरमधील एका अपघाताने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. रस्त्यावरून जात असताना त्यांनी प्रथमच एक अपघात पाहिला. मोटारीमध्ये एक मनुष्य गंभीर जखमी होता. त्या माणसाला रुग्णालयाच्या गाडीतून नेल्यानंतर बघ्यांची गर्दी आपोआप ओसरली. विद्याकर मात्र त्या गाडीमागे पळत सुटले. त्यानंतर रुग्णालयात त्या माणसाची दोन आठवडे शुश्रूषा केली. मद्रासमध्ये वाहनांचे सुटे भाग विक्रेते असणाऱ्या त्या रामकृष्णन यांच्याशी भाषेची अडचण असूनही प्रेमाचे धागे जुळले. १९८३ पर्यंत, रामकृष्णन यांच्या मृत्यूपर्यंत हे संबंध अतूटच राहिले.

ते रामकृष्णन यांच्याकडे मद्रासला गेले, त्यांनी मानसोपचार, समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी, कायद्याची पदवी घेतली, मनोरुग्ण आणि कुष्ठरोग रुग्णालयात तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. इतर काही व्यवसाय करण्याचा विचारही त्यांना कधी शिवला नाही. त्यांनी रामकृष्णन यांच्या दुकानासमोर आपल्या 'उदवुम करंगल' संस्थेचा फलक लावला. या तमिळ शब्दांचा अर्थ 'मदतीचे हात' असा आहे. अशा पद्धतीने त्यांच्या कामाचा व्याप वाढतच गेला आणि विद्याकर चेन्नईतील दीनदुबळ्यांचे 'मसीहा' ठरले.

विद्याकर यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे अनंत आर्थिक अडचणी असूनही त्यांना कोणतीही शासकीय मदत वा निधी मिळालेला नाही. संपूर्णपणे वैयक्तिक दात्यांकडून आलेली मदतच त्यांच्या संस्थेला साहयभूत ठरली. चांगली गोष्ट म्हणजे या दात्यांत भारतीयांचे प्रमाण मोठे आहे. किमान शंभर रुग्णांची सोय असणारे रुग्णालय बांधणे; तसेच कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, मनोरुग्ण या सर्वांचीच आपल्या कुटुंबात अधिक चांगली सोय करणे, ही विद्याकर यांची आता तळमळ आहे.