मंगळवार, ८ जानेवारी, २००२

विद्याकरच्या रूपाने चेन्नईत 'फादर तेरेसा'

(दै. सकाळच्या लक्षवेधी पुरवणीमध्ये दि. ८ जानेवारी २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा विशेष लेख ब्लॉगवाचकांसाठी...)

 



काही माणसांचा जन्मच दुसऱ्यावर प्रेम करणे, माया देणे, दुःखावर फुंकर घालणे, यासाठीच झालेला असतो की काय, असे त्यांचे जीवितकार्य पाहून वाटते. मदर तेरेसा त्याचे मूर्तिमंत प्रतीक. चेन्नई येथील विद्याकर यांचे कार्यही मदर यांच्या कामाशी किती तरी साधर्म्य दाखविणारे आहे. जणू ते चेन्नईतील दीन-दुःखितांचे 'फादर' तेरेसाच आहेत.

अद्याप पन्नाशीही न गाठलेल्या विद्याकर यांनी गेल्या अठरा वर्षांत समाजाने नाकारलेल्या सुमारे अठराशे लोकांसाठी मायेचे, आपुलकीचे नंदनवन उभारले आहे. त्यांच्या या प्रचंड परिवारात नवजात अर्भके, हरवलेली, टाकून दिलेली मुले, घराबाहेर काढलेली माणसे ते मृत्युपंथाला लागलेल्या आजारी वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. मोठी आर्थिक अडचण असूनही त्यांच्याकडे येणाऱ्या कोणाही गरजवंताला त्यांचा दरवाजा कधीही बंद नसतो. अशा व्यक्तीने त्यांना एक दूरध्वनी जरी केला तरी काही वेळातच ते त्याच्यासमोर हजर असतात. या लोकांसाठी त्यांनी चेन्नईबाहेर एका प्रशस्त, शांत आवारात निवासस्थान उभारले आहे. तेथेच ते आसपासच्या खेडेगावातील मुलांसाठी शाळाही चालवितात.

या सर्व गोष्टी विद्याकर यांच्या हातून घडत आहेत, याचे बरेचसे मूळ त्यांच्या लहानपणात रुजलेले आहे. १९५३ ला म्हैसूरजवळच्या कोल्लीगल खेड्यात जन्मलेल्या विद्याकर यांचे आई-वडील त्यांच्यांवर सतत रुष्ट असत. ज्यावेळी काहीच समजत नव्हते, अशा वयात आपल्या आई-वडिलांना आपण नको आहोत, एवढे त्यांना समजले, 'का' ते समजायचे, ते वय नव्हते. त्यामुळे ते बराचसा वेळ घराबाहेर घालवित. रस्त्यावर भटकणे, शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करणे अशी कामे करीत, जेणेकरून स्वतःला समाधान मिळेल, असे ते पाहत होते.

१९६७ मध्ये म्हैसूरमधील एका अपघाताने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. रस्त्यावरून जात असताना त्यांनी प्रथमच एक अपघात पाहिला. मोटारीमध्ये एक मनुष्य गंभीर जखमी होता. त्या माणसाला रुग्णालयाच्या गाडीतून नेल्यानंतर बघ्यांची गर्दी आपोआप ओसरली. विद्याकर मात्र त्या गाडीमागे पळत सुटले. त्यानंतर रुग्णालयात त्या माणसाची दोन आठवडे शुश्रूषा केली. मद्रासमध्ये वाहनांचे सुटे भाग विक्रेते असणाऱ्या त्या रामकृष्णन यांच्याशी भाषेची अडचण असूनही प्रेमाचे धागे जुळले. १९८३ पर्यंत, रामकृष्णन यांच्या मृत्यूपर्यंत हे संबंध अतूटच राहिले.

ते रामकृष्णन यांच्याकडे मद्रासला गेले, त्यांनी मानसोपचार, समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी, कायद्याची पदवी घेतली, मनोरुग्ण आणि कुष्ठरोग रुग्णालयात तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. इतर काही व्यवसाय करण्याचा विचारही त्यांना कधी शिवला नाही. त्यांनी रामकृष्णन यांच्या दुकानासमोर आपल्या 'उदवुम करंगल' संस्थेचा फलक लावला. या तमिळ शब्दांचा अर्थ 'मदतीचे हात' असा आहे. अशा पद्धतीने त्यांच्या कामाचा व्याप वाढतच गेला आणि विद्याकर चेन्नईतील दीनदुबळ्यांचे 'मसीहा' ठरले.

विद्याकर यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे अनंत आर्थिक अडचणी असूनही त्यांना कोणतीही शासकीय मदत वा निधी मिळालेला नाही. संपूर्णपणे वैयक्तिक दात्यांकडून आलेली मदतच त्यांच्या संस्थेला साहयभूत ठरली. चांगली गोष्ट म्हणजे या दात्यांत भारतीयांचे प्रमाण मोठे आहे. किमान शंभर रुग्णांची सोय असणारे रुग्णालय बांधणे; तसेच कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, मनोरुग्ण या सर्वांचीच आपल्या कुटुंबात अधिक चांगली सोय करणे, ही विद्याकर यांची आता तळमळ आहे.