बुधवार, ६ मार्च, २००२

मागणी रास्त, पण....

('दै. सकाळ'च्या बेळगाव आवृत्तीमध्ये 'चर्चा' या साप्ताहिक सदरामध्ये बुधवार, दि. ६ मार्च २००२ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी येथे फेरसादर करीत आहे.)




निपाणीतील दिवेकर कॉलनीतील वेश्यांचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांनी गेले काही दिवस चर्चेत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे वेश्यांमध्ये एडस्बाबत जागृतीसाठी कार्यरत असलेल्या संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेच्या श्रीमती मीना शेषू येथे वेश्यांच्या बैठका घेऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत, अशी चर्चा एका वर्तुळात सुरू आहे. यातील गंभीर बाब अशी की, पोलिस खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनीही श्रीमती शेषूंना सहकार्य करणे तर दूरच; उलट त्या आणि त्यांचे सहकारी पत्रकार नील पाटे यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधले. याशिवाय वेश्या या 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असेही उद्‌गार एका पोलिस अधिकाऱ्याने काढले. हीच सर्वात आक्षेपार्ह बाब आहे. हा विषय गुंतागुंतीचा अनेक पदरी असल्याचे झालेल्या घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे श्रीमती शेषू यांनी सुरवातीच्या काळात स्वतःच्या घरी वेश्यांच्या बैठका घेतल्या, हे विसरता येणार नाही. एका महिलेने अशा पद्धतीने काम करणे हीच आजही अत्यंत वेगळी वाटणारी तरीही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना वेश्यांचे 'एजंट' संबोधणे म्हणजे त्यांच्या कामाचा आणि त्यातील मानसिक, भावनिक गुंतवणुकीचा तो अपमानच म्हटला पाहिजे.
दुसरी बाब म्हणजे पोलिस अधिकाऱ्याने वेश्यांना 'नॉर्मल सिटीझन' नाहीत, असे म्हणणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. या महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या उद्‌गारांतून स्पष्ट होतो. पोलिस ठाण्याच्या पाठीमागच्या भिंतीला लागून असलेल्या दिवेकर वस्तीत वेश्या व्यवसाय वर्षानुवर्षे का सुरू राहिला, याचे उत्तर त्यांच्या उद्‌गारांमागील प्रवृत्तीत आहे.
सुरवातीपासूनच पोलिसांनी येथील वेश्यांविरुद्ध कारवाई करून दबाव आणला असता तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता. नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे दिवेकर वस्तीतील नागरिकांनीच दबाव आणून आतापर्यंत येथे वेश्यावस्ती वाढू दिलेली नाही. श्रीमती शेषू यांनी येथे येऊन आपल्या संस्थेची शाखा उघडल्यानंतर त्या नागरिकांना परत येथे वेश्यावस्ती वाढण्याचे भय वाटते आहे, हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल किंवा त्यांना श्रीमती शेषू यांच्या कार्याची पुरेशी माहिती नसावी. या नागरिकांच्या भावनांचा काही नगरसेवकांनी फायदा उठवून त्यांना चिथावले आणि येथील वेश्या व्यवसाय बंद करावा म्हणून मोर्चा काढला. त्यांची मागणी अगदी रास्त आहे; पण, त्यांनी श्रीमती शेषू वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप करणे पूर्णतः चुकीचे आहे.
मुळात एखाद्याच्या प्रोत्साहनामुळे वेश्या व्यवसाय वाढतो, असे म्हणणेच चुकीचे आहे. किंबहुना वेश्या व्यवसाय संबंधितांनी स्वेच्छेने स्वीकारला असे कधीही होत नाही. वेश्या निर्माण होण्यास समाजच कारणीभूत असतो. निपाणी जर इतकी स्वच्छ होती, येथील सगळेच नागरिक इतके चारित्र्यसंपन्न होते, तर येथे वेश्यावस्ती निर्माण झालीच कशी, हा प्रश्न या पार्श्वभूमीवर ठळकपणे सामोरा येतो. त्याला उत्तर आहे ?
त्या महिलांच्या समस्या जाणून घ्यायला एक महिला पुढे सरसावते, त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविते, त्यांना आपलेपणाने वागविते. यामुळे या वेश्यांनाही त्यांच्याबाबत आत्मीयता वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच त्या त्यांच्याकडे येतात. इतर समाजाने त्यांना ओरबाडण्याखेरीज दुसरे काय केले आहे?
साधारण एक वर्षांपूर्वी वेश्यांची राष्ट्रीय परिषदही झाली. त्यावेळी देशभरातून हजारो वेश्या राजधानीत एकत्र आल्या होत्या, याचीही आठवण येथे द्यायलाच हवी.
पूर्वापार दुर्लक्षित असलेल्या या समाजघटकाच्या समस्यांकडे गांभीयनि कोणीही पाहत नाही. यासाठीच त्यांना संघटित करून एडस् तसेच इतर समस्यांबाबत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी काम करणाऱ्या श्रीमती शेखूंसारख्या सेवाभावी व्यक्तींना किमान उपद्रव देऊ नये, ही जबाबदारी ओळखण्याचे भान आपल्याला कधी येणार हा प्रश्न आहे.
याबाबत येथील स्थानिक सेवाभावी सामाजिक संस्थांनीही मौन का बाळगले आहे, हे समजायलाही मार्ग नाही. वेश्याव्यवसाय बंद करण्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांनी व नागरिकांनी आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, केवळ या वेश्यांना येथून हाकलून देऊन चालणार नाही. कारण त्या इतरत्र जाऊन पुन्हा तोच व्यवसाय करणार! यावर उपाय म्हणजे त्यांना पर्यायी व्यवसाय उपलब्ध करून निर्वाहाचा दुसरा मार्ग निवडण्यासाठी प्रोत्साहन व सहाय्य देणे, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःची मानसिकता आधी बदलायला हवी.
केवळ कर्नाटकातील वेश्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर देवदासी प्रथेचा याला प्रचंड मोठा हातभार आहे. पुण्या-मुंबईमध्येसुद्धा या देवदासीच अधिकांशरित्या भोगदासी झालेल्या आहेत. याबरोबरच गरिबी, अज्ञान आणि सामाजिक परिस्थितीमुळे वेश्या व्यवसायाकडे महिला-मुली वळताना दिसतात.
वेश्या व्यवसायाच्या निर्मूलनासाठी आपण प्रत्यक्ष जरी काही करत नसलो तरी कार्यकर्त्यांना सहकार्य करू शकतो. तेही शक्य नसेल तर त्यांना त्रास देऊन खच्चीकरण करणे तरी थांबवावे. त्यांना शांतचित्ताने आपले काम करू द्यावे. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरेल. तेवढा विवेक आता आपण दाखवायलाच हवा !