रविवार, १५ जून, २०१४

'महान्यूज' आणि मी

('लोकराज्य'मधील लेख)

(प्रिय वाचक हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात असताना 'महान्यूज' या वेबपोर्टलच्या निर्मितीमधील माझा सहभाग आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहेच. पण आता तेथून बाहेर पडून खूप पुढे गेल्यानंतरही शासनामध्ये आपल्या या जुन्या सहकाऱ्याची आठवण व्हावी, असे क्षण दुर्मिळच. पण, माझ्या आयुष्यात ते आले. महान्यूजला उत्कृष्ट ई-प्रशासनासाठीचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. या निमित्ताने आदरणीय मनिषा म्हैसकर मॅडम (आय.ए.एस.) आणि 'टीम महान्यूज'ने अगदी आवर्जून मला 'महान्यूज आणि मी' या विषयावर लिहावयास लावून ते दि. ६ मे २०१४ रोजी 'महान्यूज'वर 'वाचावे असे काही' या सदरामध्ये प्रकाशित केले. माझ्यासाठी हा निखळ पुनर्प्रत्ययाचा आनंद होता. मागील महिन्यात मी तो आपल्यासमवेत या ब्लॉगवर शेअर केला आहेच. मात्र, त्याहून आनंदाचा आणि आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे हाच लेख माझ्या टीम लोकराज्यनेही जून २०१४ च्या अंकात संपादित स्वरुपात प्रकाशित केला. हा लेखही आपणासाठी लोकराज्यच्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'महान्यूज' या वेबपोर्टलचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर झाले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांसमवेत महान्यूज टीम (डावीकडून) मयुरा देशपांडे-पाटोदकर, आलोक जत्राटकर, डॉ. गणेश मुळे, राज्यमंत्री श्री. राजेंद्र शिंगणे, मनिषा पाटणकर-म्हैसकर (आयएएस), वर्षा आंधळे, संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर, अंजू कांबळे आदी.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या तत्कालीन महासंचालक मनिषा पाटणकर-म्हैसकर आणि संचालक श्रद्धा बेलसरे यांच्यासोबत ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये टीम महान्यूज. यामध्ये (डावीकडून) वर्षा आंधळे, मयुरा देशपांडे-पाटोदकर, प्रमोद धोंगडे, नंदू वाघमारे, डॉ. गणेश मुळे, किरण मोघे, आलोक जत्राटकर, अंजू कांबळे आदी.








माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विविध माध्यमांद्वारे राज्यातील नागरिकांशी थेट संवाद साधत असते. आजघडीला विभागाचे महान्यूज हे वेब पोर्टल अतिशय लोकप्रिय झाले आहे. या पोर्टलची निर्मितीप्रक्रिया रंजक आणि प्रेरणादायी आहे. महान्यूजच्या सुरुवातीच्या काळाविषयी टीमचे सदस्य आलोक जत्राटकर आपले अनुभव सांगत आहेत...

 

'महान्यूज आणि मी' या विषयावर लेख देण्यासंदर्भात फोन आला आणि त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एका ध्यासपर्वाच्या स्मृतींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. 'महान्यूज' या वेबपोर्टलची निर्मिती ही जितकी महत्त्वाकांक्षी योजना होती, तितकीच ती निर्मिती प्रक्रिया खूप जिकिरीची आणि तरीसुद्धा एक समृद्ध अनुभव देणारी होती. त्यामागं तत्कालीन महासंचालक आणि आताच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची तळमळ आणि सक्रिय मार्गदर्शनाचा वाटा आहे.

'महान्यूज' या वेबपोर्टलची संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि दि. १९ सप्टेंबर २००८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांच्या हस्ते या पोर्टलचे लोकार्पण होणार होतं. या काळात म्हैसकर मॅडमनी विभागाचा चेहरामोहरा पालटण्याचा ध्यास घेतला होता. ब्लॅक अॅन्ड व्हाईट

त्याचं समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत झालेलं होतं. या यशानं प्रेरित होऊन 'ऊर्दू लोकराज्य'चंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. मुद्रित माध्यमांमध्ये अशी मोहोर उमटवीत असतानाच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आकाशवाणीवरील 'दिलखुलास' आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील 'जय महाराष्ट्र' हे कार्यक्रम लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करत होते. इंटरनेटवर वेबपोर्टल तयार करून राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिक वाचकांशी जोडण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनी होती. त्यातून त्यांनी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांमधून डॉ. गणेश मुळे यांची टीम लीडर म्हणून तर त्यांच्या जोडीला डॉ. किरण मोघे, मनीषा पिंगळे आणि तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी मयुरा देशपांडे,

अरविंद जक्कल आणि आर्टिस्ट सुनील कुंभेरे यांची निवड केली होती. ही टीम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कामालाही लागली होती. काम प्रचंड होतं. राज्यभरातून दररोज यशकथांच्या अक्षरशः शेकडो इ-मेल्स प्राप्त होत होत्या. त्यामुळं त्यातील मजकूर डाऊनलोड करून घेणं आणि त्यांचं विभागनिहाय, विषयनिहाय सॉर्टिंग करणं ही जबाबदारी प्रामुख्यानं मी, मोघे सर आणि पिंगळे मॅडम यांच्यावर होती. बेलसरे मॅडम, मुळे सर हे प्रशासकीय तर देशपांडे मॅडम, जक्कल आणि तांत्रिक सल्लागार संजीव लाटकर हे तांत्रिक बाजू सांभाळत होते.

अनेक चर्चा, बैठकांमधून 'महान्यूज' मध्ये सुरवातीलाच एकूण तेरा सदरं आणि त्या दिवशीच्या राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या पाच बातम्या असाव्यात, असं नियोजन होतं. सदरांमध्ये महाइव्हेंट, ई-बातम्या, साक्षात्कार (मुलाखती), महासंस्कृती, शलाका, तारांकित (यशकथा), चौकटीबाहेर, आलेख (शासकीय योजनांची तपशीलवार माहिती), फर्स्ट पर्सन, गॅलरी (छायाचित्रे), महाऑप (रोजगार संधी), हॅलो (वाचक प्रतिक्रिया), लोकराज्य (कर्टन रेझर), दिलखुलास व जय महाराष्ट्र (मुलाखतींचे शब्दांकन) यांचा समावेश होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सदरं आम्हाला रोजच्या रोज अपलोड करावयाची होती- अगदी रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीसुद्धा!

ऑनलाइन मिडियावरील मजकुरासाठीची महत्त्वाची पूर्वअट म्हणजे तो शॉर्ट बट स्वीट आणि क्रिस्पी असला पाहिजे. वाचकाला जास्त स्क्रोल न करावे लागता संपूर्ण स्टोरी आशयासह समजली पाहिजे. या आणि आणखी व्यवधानांसाठी डॉ. मुळे यांनी एक स्टाइलबुक तयार केलं. त्यामुळं कन्टेन्टच्या आमच्या टीमवर जबाबदारी होती ती प्रत्येक स्टोरीला शॉर्ट पण आशयसंपन्न बनवण्याची, लाटकर सरांनी डमी साइट आमच्या हवाली केली. त्यावर काम सुरू झालं. साइटमधल्या त्रुटी जशा लक्षात येतील, तशा आम्ही आमच्या तांत्रिक टीमला आणि वरिष्ठांना सांगत होतो. त्यावर काम केलं जात होतं. ऑफिसमध्ये दररोज दिवसातून तीनवेळा आमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन व्हायचं ते बेलसरे मॅडमच्या केबीनमध्ये. पहिलं सकाळी कार्यालयात आल्या आल्या-त्यात दिवसभराचं नियोजन केलं जायचं. दुपारी तीनच्या बैठकीत त्या नियोजनाचा फॉलोअप आणि स्टेटस पाहिला जायचा. आवश्यक तिथं अॅडिशन, डिलीशन व्हायचं आणि संध्याकाळी पाचच्या बैठकीत मजकुरावर अंतिम हात फिरवला जायचा.

उद्घाटनासाठी वेगळं काय करता येईल, यावर विचारमंथन सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी फ्लॅशमध्ये एक प्रोग्राम तयार करून मुख्यमंत्र्यांनी माऊस क्लिक करताच अगदी चौघडे, ढोलताशांच्या गजरासह (हे सारं व्हर्चुअलच!) एक महाद्वार उघडते आणि त्यातून महान्यूजचा लोगो सामोरा येतो आणि लगेच पोर्टलचे होम पेज उघडते, अशी कल्पना मांडली. महासंचालकांनी ती उचलून धरली.

या उ‌द्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांना पोर्टलबद्दल लाइव्ह प्रेझेंटेशन देण्याचे ठरले होते. त्यासाठी नॅरेशनला म्हैसकर मॅडम आणि प्रेझेंटेशनच्या लॅपटॉपवर मी बसावे, असे ठरले होते. या ठिकाणीही मॅडमच्या क्राइसिस मॅनेजमेंटच्या व्यवधानाची प्रचिती आली. समजा, पोर्टल ऐनवेळी ऑनलाइन उघडले नाही, तर प्लॅन ए, बी आणि सी अशी तयारी करण्यात आली. उद्घाटनाच्या दिवशी क्रीम कलरच्या ड्रेसकोडमध्ये महान्यूज टीम 'वर्षा' बंगल्यावर पोहोचली. उद्घाटन समारंभझोकात पार पडला. मुख्यमंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले आणि त्याच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. मग राजभवनवर तत्कालीन राज्यपाल एस.सी. जमीर आणि मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही प्रेझेंटेशन देण्यात आले. राज्यपालांनी त्यावेळी एक मार्मिक प्रश्न उपस्थित केला होता, 'या तुमच्या उपक्रमाचा माझ्या चंद्रपुरातल्या आदिवासी बांधवांना काय लाभहोणार?' त्यावर म्हैसकर मॅडमनीही खूप प्रभावी उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, 'सर, आम्ही त्यांच्यासाठीच्या साऱ्या योजनांची माहिती या पोर्टलवर देणार आहोत, जेणेकरून त्याठिकाणी कार्यरत असलेल्या शासकीय, अशासकीय व्यक्ती, संस्थांना त्यांची माहिती होईल आणि सरकारी दफ्तरातून त्यासंदर्भात थेट मदत मिळवून देता येईल किंवा काम करता येईल. भविष्यात त्यांच्यापर्यंत सहज पोहोचण्याचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय असेल. तंत्रज्ञानाचे लाभतिथपर्यंत पोहोचविण्यासाठीच हा उपक्रम आम्ही आरंभला आहे.' आज त्यांच्या या विधानाची प्रचिती आपल्याला येते आहेच.

उद्घाटन झालं, पण आता महान्यूज टीमची जबाबदारी वाढली होती. पहिल्या तीन दिवसांतच दहा हजारांहून अधिक हिट्स पोर्टलला मिळाल्या. यावरून लोकांचं पोर्टलवर बारकाईनं लक्ष आहे, हे दिसत होतं.

दरम्यानच्या काळात म्हैसकर मॅडम मुंबई महानगरपालिकेत गेल्या. माझीदेखील बदली झाली. आज ई-प्रशासनाच्या सुवर्ण पुरस्काराची मोहोर महान्यूज टीमच्या कामगिरीवर उमटली आहे. यावेळी पुन्हा म्हैसकर मॅडमच माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव आहेत, ही सुद्धा योगायोगाची गोष्ट. त्यामुळंही महान्यूज टीमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला असल्यास नवल नाही. महान्यूज टीमच्या कामगिरीचा मला निरतिशय अभिमान आहे. सुवर्ण पुरस्कार प्राप्त महान्यूजच्या पायोनिअर टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला काम करता आलं, अशी अभिमानाची भावना मनी दाटून येते आहे. शेवटी आपलं लेकरू ते आपलंच, हेच खरं!

महान्यूजचा सन्मान

'लोकराज्य'चं संपूर्ण फोर कलर 'न्यू लूक लोकराज्य'मध्ये रूपांतर झालेलं होतं आणि महान्यूजला विविध संस्थांनी पुरस्कार देऊन उत्कृष्ट कामाची पावती दिली आहे. त्यामध्ये राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणारा शासकीय वेब पोर्टल प्रवर्गातील प्रथम पुरस्कार आणि माहिती-तंत्रज्ञान विभागातर्फे देण्यात येणारा शासकीय संकेतस्थळासाठीचा गोल्ड पुरस्कार यांचा समावेश होतो. राष्ट्रीय पातळीवर मानाचा समजल्या जाणाऱ्या मंधन पुरस्काराच्या अंतिम फेरीपर्यंत महान्यूजने मजल मारली होती.

माहिती खात्यात गुणात्मक बदल

माहिती व जनसंपर्क विभागाने मोठ्या जिद्दीने व चिकाटीने 'महान्यूज' हा उपक्रम साकारला. त्यामुळे मी सर्वप्रथम या विभागाचे अभिनंदन करतो. गेल्या दोन टर्ममध्ये माहिती विभागाच्या चांगल्या कामाचा मी गुणात्मक फरक अनुभवतो आहे. महान्यूजमधून आता शासन निर्णय सरळ लोकांपर्यंत जाणार आहेत. हे वेब पोर्टल मराठीतून आहे हे विशेष. हल्ली मराठीवर खूप चर्चा होते. जगभरातले समस्त मराठीजन यामुळे महाराष्ट्राशी जोडले जातील. या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो.

-    विलासराव देशमुख, मुख्यमंत्री ('लोकराज्य' ऑक्टोबर २००८ मधून)

जिल्हावार बातम्या महत्त्वाच्या

राज्य शासन विविध क्षेत्रात खूप चांगले काम करीत आहे. अनेक क्षेत्रात महाराष्ट्र हे देशपातळीवर पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. शासनाचे हे काम नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याने न्यूज पोर्टल हा महत्त्वाचा विषय आहे. जिल्ह्यांच्या बातम्यांसाठी मी हे पोर्टल पाहतो. सर्वांनी ते आवश्य पहावे. महान्यूजचे मोबाईल अॅप हे देखील बदलत्या काळातील महत्त्वाचे पाऊल आहे.

- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

 

मंगळवार, ३ जून, २०१४

विद्यार्थीहितदक्ष शिक्षक-प्रशासक : डॉ. बी.एम. हिर्डेकर






(शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.बी.एम. हिर्डेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त 'दै. सकाळ'मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख...)
शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर सर आज (दि. ३१ मे २०१४) सेवानिवृत्त होत आहेत. एक अतिशय संवेदनशील, सहृदयी आणि विद्यार्थीहिताविषयी तळमळ असणारा एक मूळचा हाडाचा शिक्षक आणि कायद्याचे उत्तम ज्ञान असणारा, व्यासंगी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
हिर्डेकर सरांची कारकीर्द कोणालाही हेवा वाटावी अशी त्यांनी मोठ्या कष्टानं आणि प्रयत्नपूर्वक घडविली आहे. एक चढती कमान त्यांच्या कारकीर्दीला लाभलेली आहे. माध्यमिक शिक्षक म्हणून रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विविध शाळांत काम करत असतानाच त्यांनी उच्चशिक्षण घेणेही सुरूच ठेवले. त्यातून ते एम.ए., एम.एड. झाले. पुढे त्यांनी आवडीखातर आणि खरे तर प्रशासकीय सेवेला पूरक म्हणून एल.एल.बी. सुद्धा केले. शिक्षणशास्त्रात ते पीएच. डी. झाले. बरोबरीने त्यांची कारकीर्दही वळणे घेत राहिली. विविध महाविद्यालयांत इंग्रजी विषयाचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सुमारे पंधरा वर्षे काम केले. रहिमतपूरच्या एस.एम. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्यपदही त्यांनी दोन वर्षे भूषविले. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरही आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला. शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द बहरात असतानाच त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या उपकुलसचिव पदी निवड झाली. आपल्या शैक्षणिक अनुभवाचा पुरेपूर वापर करीत त्यांनी प्रशासकीय कारकीर्दही शिक्षण क्षेत्राच्या उत्थानासाठी जाणीवपूर्वक समर्पित केली. त्यांच्या प्रत्येक उक्ती आणि कृतीला कायदेशीर अभ्यासाची जोड देण्याचे कौशल्यही त्यांनी जाणीवपूर्वक विकसित केले. त्यामुळे विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये एखाद्या संवेदनशील किंवा किचकट विषयावर त्यांचे मत विचारात घेतले जाऊ लागले. आपल्या या कौशल्याचा त्यांनी सदोदित विद्यापीठ प्रशासनाच्या भल्यासाठी वापर केला, हे महत्त्वाचे!
विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदी त्यांची ५ ऑगस्ट २००८ रोजी नियुक्ती झाली, तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी या पदाचा विद्यार्थी हितासाठीच वापर करण्याचा मंत्र आणि तंत्र स्वतःच्या आणि आणि परीक्षा विभागातील सर्व सहकाऱ्यांच्या मनावरही बिंबवले. मॅन्युअल ते डिजिटल असा परीक्षा विभागाचा प्रवास त्यांच्याच कारकीर्दीत यशस्वीपणे झाला. आधुनिक संगणक, डिजिटल यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर करून परीक्षा पद्धतीमध्ये अधिकाधिक लवचिकता आणण्याचे श्रेय निःसंशयपणे डॉ. हिर्डेकर यांना द्यावे लागेल. या सर्व गोष्टी करीत असताना विद्यार्थी हिताला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य राहिले. स्टुडंट फ्रेंडली एक्झाम हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. हॉरिझॉन्टल मोबिलिटीच्या आधारावर विद्यार्थ्यांची अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांची समकक्षता निश्चिती करण्याबरोबरच  एनएसएस कॅम्पमुळे परीक्षेला मुकणारे विद्यार्थी किंवा मध्यंतरी झालेले ऊसदराचे आंदोलन यामुळे परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय हिर्डेकर सरांनी घेतला. सहृदय भावनेतून अशी परीक्षा घेण्याचा प्रकार एकमेवाद्वितियच म्हणावा लागेल.
विद्यापीठाच्या जवळपास ९० टक्के परीक्षांचे निकाल तीस दिवसांच्या आत तर ९ टक्के परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाने सातत्य राखले आहे. उर्वरित १ टक्का निकाल ५० दिवसांत लावले जातात. याबद्दल प्रत्यक्ष राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांनीही विद्यापीठाचे विशेष अभिनंदन केले आहे. यामध्येही हिर्डेकर सरांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
वर्षभरात विद्यापीठाच्या सुमारे ५०० परीक्षा, त्यांच्या ५००० प्रश्नपत्रिका आणि त्या अनुषंगाने साऱ्या यंत्रणेची रचना, उभारणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी परीक्षा विभागाची यंत्रणा सक्षमपणे राबवताना वेळोवेळी मानसिक तणावाखाली येणाऱ्या आपल्या स्टाफला सांभाळून धीर देऊन चांगल्या कामासाठी उद्युक्त करण्याचे सरांचे कौशल्यही वादातीत आहे. विभागातला साधारण दीडशे जणांचा स्टाफ निम्म्यावर आला असताना आणि परीक्षा व विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक वाढत असतानाही कामगिरीत सातत्य राखण्यात त्यांना यश आले आहे.
ऑनलाइन हॉलतिकीट व ऑनलाइन अर्ज स्वीकृती, प्रश्नपत्रिका सेट तयार करताना कोड पद्धतीचा अवलंब, सन १९६५ पासूनच्या सर्व गुणपत्रिकांचे डिजिटायझेशन आणि एसआरपीडी (सिक्युअर्ड रिमोट पेपर डिस्ट्रीब्युशन) सॉफ्टवेअरची यशस्वी अंमलबजावणी हे डॉ. हिर्डेकर सरांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरावेत. प्रश्नपत्रिकांचे सेट तयार करत असताना संबंधित प्राध्यापकांखेरीज ते अन्य कोणीही पाहात नाही, अगदी परीक्षा नियंत्रक, कुलसचिव किंवा कुलगुरू सुद्धा! तीन सेटपैकी एक रँडम पद्धतीने निवडून, त्याला वेळापत्रकानुसार विशिष्ट कोड देऊन तो छपाईला दिला जातो. तेथून त्या कोडनुसार पॅकेजिंग होऊन थेट परीक्षा केंद्रनिहाय वितरित केले जातात. इतकी गोपनीयता या सर्व यंत्रणेमध्ये बाळगली जाते. त्यातूनही प्रश्नपत्रिकेत चुका झाल्यास संबंधित प्राध्यापकांना परीक्षा प्रमाद समितीकडून खुलासा विचारला जातो.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी जुन्या गुणपत्रिका हव्या असतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अगदी पहिल्या वर्षाच्या परीक्षेपासूनच्या म्हणजे सन १९६५ पासूनच्या सर्व गुणपत्रिकांचे डिजिटायझेशन ही सरांच्या कारकीर्दीतली खूप मोठी उपलब्धी आहे. स्टुडंट फॅसिलीटी सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदी एका दिवसात डुप्लीकेट गुणपत्रिका उपलब्ध करून देता येणे त्यामुळे शक्य झाले आहे. ऑनलाइन रिव्हॅल्युएशन ॲप्लीकेशनच्या सोयीचाही विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.
एसआरपीडी (सिक्युअर्ड रिमोट पेपर डिस्ट्रीब्युशन) सॉफ्टवेअरची अंमलबजावणी हा सुद्धा हिर्डेकर सरांच्या कारकीर्दीतला महत्त्वाचा पैलू आहे. अभियांत्रिकी आणि फार्मसी विषयाच्या परीक्षा सध्या या पद्धतीने घेण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरद्वारे अगदी गोपनीयरित्या व सुरक्षित पद्धतीने एक पेपर रँडमली सिलेक्ट होऊन डाऊनलोडसाठी उपलब्ध होतो. आणि परीक्षा पद्धतीची गोपनीयता जपण्याबरोबरच यंत्रणा राबविण्यावरील ताणही कमी करण्यात यामुळे यश आले आहे. या तंत्रज्ञानालाही शिक्षक-विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभतो आहे. या यंत्रणेच्या अंमलबजावणीत शिवाजी विद्यापीठ राज्यात अग्रेसर आहे. आणि त्यात सरांचा मोलाचा वाटा आहे.
या संपूर्ण शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्दीखेरीज हिर्डेकर सरांचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे सामाजिक भान आणि व्यापक लोकसंग्रह! शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे कार्य ते करीत आहेत. आपल्या व्याख्यानांतून त्यांनी सदैव पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला आहे. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी आजवर त्यांनी कितीतरी व्याख्याने दिली आहेत. आधुनिक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या तळमळीतून त्यांनी हे कार्य चालविले आहे. या त्यांच्या कार्यातून विविध क्षेत्रांतील लोकांशी ते जोडले गेले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काय करता येईल, याचा सकारात्मक विचार करण्याच्या, सदैव सहकार्य करण्यास तयार असण्याच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे त्यांची विद्यार्थीप्रियताही मोठी आहे.
असे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आज केवळ सेवेतून निवृत्त होत असले तरी यापुढील काळात सामाजिक कार्यामध्ये अधिक जोमाने गतिमान होईल, असा विश्वास आहे. त्यांच्या भावी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!