रविवार, १३ मे, २००१

हंचिनाळला पाच दिवसाच्या संत संमेलनाचा समारोप; हजारो भक्तगणांची उपस्थिती

'संत दर्शनापेक्षा संत होण्यासाठी वाटचाल करा'

(दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय संत संमेलनाच्या समारोप समारंभाची बातमी पान-१ वर प्रकाशित झाली. रात्री ९ वाजता हंचिनाळ येथून फॅक्सद्वारे ही बातमी पाठविण्यात आली.)

 


(आलोक जत्राटकर यांजकडून)

हंचिनाळ, ता. १२: सर्व प्रकारच्या विकारांवर विजय मिळविल्यास मनुष्य संतपदाकडे वाटचाल करतो. केवळ संतांचे दर्शन नको, तर सर्वांनी संत होण्याकडे वाटचाल करावी. त्यासाठी तपश्चर्येची किंवा शास्त्रज्ञानाची आवश्यकता नाही. संत होणे म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये पवित्र प्रेमाची स्थापना करणे होय, असे प्रतिपादन सिद्धेश्वर महास्वामी (ज्ञानयोगाश्रम, विजापूर) यांनी केले. येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या विविध भागांतून सुमारे ५० हजार भक्तगण उपस्थित होते.

ते म्हणाले, "प्रेमामुळेच मनुष्याचे मन पवित्र आणि भक्ती संपन्न होते. संत दर्शन करा; पण त्यापेक्षा संतसाधना महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल आणि मोक्षाकडे वाटचाल कराल."

जगद्‌गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (संतूर संस्थान मठ, म्हैसूर) म्हणाले, "निरपेक्ष व निष्कामबुद्धीने केलेली भक्ती भगवंताला प्रिय असते. भक्ती कोणत्या पद्धतीने केली, यापेक्षा त्यामागील भावना महत्त्वाची असते. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी आपापल्या पद्धतीने भक्ती केली. त्यांची भक्ती परमेश्वराने स्वीकारली."

ते म्हणाले, "इतर योगामध्ये साध्यासाठी ठराविक मार्ग आहेत; पण भक्तीसाठी ठराविक मार्गाचे बंधन नाही. देवाबद्दल मनात शंका न ठेवता भक्तांनी प्रार्थना केली पाहिजे. सत्ता, पैसा, जमीन यासाठी कोटी कोटी मेले; पण भगवंतासाठी व भक्तीसाठी एकही जण मेलेला नाही. निसर्गावर आपण सातत्याने अत्याचार करतो. परंतु या कृतीतून आपण परमेश्वरालाच इजा करीत आहोत, ही भावना आपल्या मनालाही शिवत नाही, याबद्दल जोपर्यंत आपल्या मनात सहानुभूती निर्माण होत नाही, तोपर्यंत आपली भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही."

ते पुढे म्हणाले, "अशिक्षितपणा सोडून लोकांनी शिक्षणाच्या वाटा स्वीकारल्या पाहिजेत. यासाठी संतूर मठाद्वारे सुमारे २५० शिक्षण संस्था कार्य करीत आहेत. गरिबांच्या मुलांना या शिक्षण संस्थांमध्ये बारावीपर्यंतमोफत शिक्षणाची सोय केली आहे."

यावेळी ईश्वर स्वामींनी आयोजित केलेले संत संमेलन यशस्वी झाल्याचे सांगून ते म्हणाले, "ईश्वर स्वामींच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नातून भक्ती योगाश्रम साकारला आहे. विजापूरच्या सिद्धेश्वर महास्वामींच्या अखत्यारीतच ते तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे येथील कार्य अखंडित सुरू राहील, यात शंकाच नाही. परिसरातील लोकांना भक्ती कशी असावी, हे सांगण्यासाठी त्यांनी पाचही दिवस भक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा घडवून आणली.

यावेळी सर्व उपस्थित स्वामींचे, भक्तांचे व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानताना ईश्वर स्वामी म्हणाले, "मी भक्ती योगाश्रमामध्ये सद्‌गुरूंच्या आदेशानुसार ज्ञान व भक्ती प्रसाराचे काम प्रामाणिकपणे करीत राहीन."

यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रकाश आवाडे, राज्यमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, संजय पाटील, रजनीताई मगदूम, कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आमदार काका पाटील आदी उपस्थित होते.

आत्मनिवेदन म्हणजे देव व भक्ती यांची एकरुपता: निर्मलानंद महास्वामींचे प्रतिपादन

 (दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी संत संमेलनाविषयी प्रसिद्ध झालेले वृत्त.)

 

 


हंचिनाळ, ता. १२ (बातमीदार) : 'आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता होय,' असे विचार निर्मलानंद महास्वामी यांनी व्यक्त केले.

येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या पाचव्या दिवशी आज पहिल्या सत्रात विविध संतांची 'आत्मनिवेदन व भक्ती' या विषयावर प्रवचने झाली. संमेलनात आज तिघा जणांना संन्यस्त जीवनाची दीक्षा देण्यात आली. यात एका सहा वर्षांच्या मुलाचा समावेश होता. आज सदाशिव महास्वामी (म्हैसूर), निर्मलानंद' महास्वामी (विजापूर), सेवानंद महाराज (भांदवले), विनयानंदजी महास्वामी (मौजे वडगाव), शिवगंगाधर स्वामी (शिंदगी) यांची प्रवचने झाली.

निर्मलानंद महास्वामी म्हणाले, "आत्मनिवेदन म्हणजे देव आणि भक्ती यांच्यातील एकरुपता. आत्मनिवेदन भक्तीमुळे देव व भक्त यांच्यात अंतर राहत नाही. ईश्वरस्वामी प्रतिगाडगे महाराज आहेत."

विनयानंद महाराज म्हणाले, "मनामध्ये निर्मल भावना ठेवून भक्ती केल्यास यश प्राप्ती होते. आसक्ती संपविण्यासाठी विवेक व वैराग्य यांची गरज असते. विवेक, वैराग्य, षड्संपत्ती, ममत्त्व या चार गोष्टी आत्मज्ञान संपादन करण्यास आवश्यक असतात. संकुचितपणा म्हणजे मृत्यू व व्यापकता म्हणजे जीवन."

सेवानंद महाराज म्हणाले, "भोगासाठी जीवन नाही, ते मुक्तीसाठी असते. अध्यात्माचा संबंध हा मनाशीच असतो. ग्रहण करणे याला जीवनात महत्त्व आहे. शरणागतीचा भाग म्हणजे नम्र जीवन. गुरुमंत्राच्या जपाने जीवन सफल होते."

सदाशिव महास्वामी म्हणाले, "भक्ती म्हणजे हृदयातील मधु भाव. अहंकारमुक्त केलेली भक्ती सर्वश्रेष्ठ असते. आत्मा-परमात्म्याला समर्पित करणे म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती होय."

शिवगंगाधर स्वामी म्हणाले, "मोक्षासाठी भक्ती गरजेची असते. आत्मियतेने केलेली भक्ती भगवंताला आवडते. भक्तीमुळे माणसाच्या आयुष्यात सन्मार्ग येण्यास मदत होते."

दरम्यान, शुक्रवारी रात्री उषा मंगेशकर यांचा 'रंग उषेचा' हा गीत-संगीताचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात उषा मंगेशकर यांचा प.पू. शिवरात्री देशीकेंद्र सुत्तूर संस्थान मठ म्हैसूर यांच्या हस्ते सत्कार झाला. बाळासाहेब देवनाळ यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन संजय दामले यांनी केले. उषा मंगेशकर यांनी गणेशवंदना करून कार्यक्रमाची सुरवात केली. यात त्यांनी माझी रेणुका माऊली..., 'मेंदीच्या पानावर.... 'ऐरणीच्या देवा..., 'पाऊस पहिला बरसून गेला... अशी भक्तिगीते व भावगीते सादर केली.

'शालू हिरवा पाचूनी मढवा... हे बहारदार गीतही सादर केले. 'ऐ मेरे वतन के लोगो...' या देशभक्तिपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राहुल देशपांडे व पुरुषोत्तम गोणावर यांनी त्यांना गायनात साथ केली. या कार्यक्रमाला सुमारे एक लाखाहून अधिक श्रोते उपस्थित होते. राजू जावळकर यांनी उत्कृष्ट ढोलकीवादन केले. जगद्‌गुरु ईश्वरानंदजी महास्वामी यांच्या हस्ते उषा मंगेशकर यांचा सत्कार झाला.

तिघांना दीक्षा

या कार्यक्रमात जगद्‌गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते ओंकार कृष्णा चौगुले (वय ६, रा. टाकवडे, ता. शिरोळ), सतीश रावसाहेब पाटील (वय ११, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ), शंकर कृष्णा आण्णा (वय २४, भक्ती योगाश्रम) यांना दीक्षा देण्यात आली आणि त्यांचे अनुक्रमे ओंकारानंद, सत्यानंद व धर्मानंद स्वामीजी असे नामकरण करण्यात आले. महास्वामीजींनी त्यांना कन्नडमधून दीक्षा व नियम-संहिता दिली.

बुधवार, ९ मे, २००१

‘पाच दिवसांच्या संत संमेलनास हंचिनाळ येथे उत्साहात प्रारंभ’

दीनदलितांचा उद्धार हेच भक्तीयोगाश्रमाचे उद्दिष्ट: ईश्वर स्वामी

 (दै. सकाळमध्ये रुजू होऊन महिना उलटण्यापूर्वीच हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय महा संत संमेलनाचे कव्हरेज करण्याची संधी मिळाली. दि. ९ मे २००१ रोजी दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीच्या पहिल्या पानावर प्रकाशित झालेले संत संमेलनाच्या उद्घाटनाचे वृत्त.)

 

चिकोडी तालुक्यातील हंचिनाळ येथील भक्तियोगाश्रमामध्ये मंगळवारी भरलेल्या संत संमेलनाचे उद्घाटन करताना शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी. शेजारी रुद्रपशुपती महास्वामीमहेशानंद ईश्वर महास्वामीअदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीपंचम शिवलिंगेश्वर महास्वामीसिद्धेश्वर महास्वामीजयदेव महास्वामीनीलकंठ महास्वामी आदी.






हंचिनाळ, ता. ८ (खास बातमीदार): गोरगरिबांना आश्रय देणे, मदत करणे हे हेतू मनात ठेवूनच भक्तीयोगाश्रमाचा भक्तिवृक्ष उभारला आहे. त्याची सावली पददलित जनतेला मिळावी, हीच माझी इच्छा आहे, असे प्रतिपादन हंचिनाळ भक्ती योगाश्रम मठाचे अधिपती महेशानंद ईश्वर स्वामी यांनी आज येथे केले. पाच दिवसांच्या सर्वधर्मीय संत संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते उपस्थित महास्वामींना आणि भक्तांना संबोधित करत होते. अध्यक्षस्थानी रूद्रपशुपती महास्वामी (कोळेकर मठ, मिरज) होते. ज्ञानयोगाश्रम, विजापूरचे सिद्धेश्वर महास्वामी यांची विशेष उपस्थिती होती.

ते म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी मल्लिकार्जुन महास्वामींनी या उजाड माळरानावर आश्रमाची स्थापना करून भक्तीचे रोपटे लावले. या पवित्र परिसराला एवढे विस्तृत स्वरूप आलेले पाहून कार्यपूर्तीचे समाधान लाभले. इथून पुढील वाटचालही ग्रामविकास, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षणप्रसार अशा सामाजिक, शैक्षणिक कार्याबरोबर सुरू राहील.

भक्ती सेवाश्रमाच्या नवीन वास्तूचे शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (सुत्तूर संस्थान मठ, म्हैसूर) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नऊला संतसंमेलनाचे उद्घाटन झाले. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी (सिद्धगिरी मठ, कणेरी) यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते; परंतु त्यांच्याच 'सूचनेनुसार हे उद्घाटनही शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रातील पहिल्या प्रवचनास सुरवात झाली. 'श्रवण भक्ती' या विषयावर योगानंद महास्वामी (रायरहेब्बळी); अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी (कणेरी), प्रभूदेव महास्वामी (रबकवी), सिद्राम देशीकेंद्र महास्वामी (देवकरे) यांची प्रवचने झाली.

योगानंद महास्वामी म्हणाले, "मानवी जीवन आनंदी बनविण्यासाठी भक्ती आवश्यक आहे, त्याखेरीज आत्मिक शक्ती वाढत नाही. मानवी जीवनात समतोल राखण्याचे काम भक्ती करते."

अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, "सर्व मानवी इंद्रियांत श्रवणेंद्रिय सर्वश्रेष्ठ आहे. जगतात जल व वायू प्रदूषणाप्रमाणेच भावप्रदूषण झाले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी श्रवण माध्यम गरजेचे आहे. श्रवण म्हणजे नुसते ऐकणे नव्हे, तर ऐकलेल्या गोष्टीमागील कार्यकारणभाव समजून घेणे होय. त्यासाठी श्रवणभक्ती आवश्यक आहे."

अध्यक्षीय भाषणात रूद्रपशुपती महास्वामी म्हणाले, "श्रवणभक्ती म्हणजे संतपूजा व देवपूजा. सामान्य जनांसाठी त्यांचा गुरु हाच संत आणि देव असतो. प्रत्येकाने गुरू केला पाहिजे. गुरुंची पूजा करावी आणि गुरुंची आज्ञा प्रमाण मानून आपले आचरण ठेवावे. ईश्वरस्वामींनी त्यांच्या गुरुची आज्ञा ऐकून कार्य केल्यामुळे आज या परिसरात भक्तीचा मळा फुललेला दिसतो."

संमेलनाच्या मंचावर रामानंद महास्वामी (बसवनाळ), नीलकंठ महास्वामी (म्हैसूर), मल्लय्या महास्वामी (घोडोरी), पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी (सिद्धसंस्थान मठ, निडसोशी), जयदेव महास्वामी (वनश्री मठ, गदग), विरूपाक्ष महास्वामी (गणीकोप्प), नंदीश्वर महास्वामी (विजापूर) यांचा तसेच इतर उपस्थित महास्वामींचा हंचिनाळ ग्रामस्थ आणि आयोजकांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला.

बसवलिंग महास्वामी (उगार) व सिद्धलिंग महास्वामी (म्हैसूर) यांनी स्वागतगीत म्हटले. उपस्थित महास्वामीचे स्वागत व परिचय श्रद्धानंद महास्वामी यांनी करून दिला. प्रास्ताविक सौम्या सुंकद (हुबळी) हिने केले. सूत्रसंचालन श्री. डोंगरे (एकसंबा) आणि अजित गणेशवाडीकर यांनी केले.

सौम्या सुंकदचे प्रास्ताविक

सौम्या सुंकद (वय १६) ही अकरावीत शिकणारी हुबळीची मुलगी. लहानपणीच तिला धार्मिक अभ्यासाची गोडी लागली. आजच्या संतसंमेलनात तिने प्रास्ताविकाची जबाबदारी पेलली. उपस्थित सर्व धर्मगुरूंसमोर तिने आत्मविश्वासाने व ओघवत्या भाषेत 'निस्वार्थ भक्तीतूनच परमार्थाचा मार्ग सापडतो,' हे विविध उदाहरणांनी सांगितले. तिचे 'प्रवचन तरंग' हे धार्मिक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. उपस्थित भक्तगण व संतमहंतांनी तिचे कौतुक केले.

क्षणचित्रे

·         सुमारे चार ते पाच एकर परिसरात भव्य शामियाना

·         मांगूर फाट्यापासून तसेच कोगनोळी फाट्यापासून फलक

·         भक्तगणांना प्रवचनाचा लाभ अखंडितपणे मिळावा, यासाठी संमेलन मंडपात ठिकठिकाणी क्लोज-सर्किट टी.व्ही.ची व्यवस्था

·         पाच दिवस भक्तगणांसाठी अखंड प्रसादाचे आयोजन

·         भक्तांच्या वर्दळीने मठाचा माळरान परिसर फुलून गेलेला

 

आजचा कार्यक्रम

·         सकाळी ८ ते ११ 'नामस्मरण भक्ती' प्रवचन

उपदेशक शिवानंद महास्वामी (हळींगळी), गुरुनाथ महास्वामी (संगधेरी), दयानंद महास्वामी (गदग), गोपालशरण एकंची.

·         दुपारी ४ ते रात्री ८ 'पादसेवन भक्ती' प्रवचन.

उपदेशक - कुमार निजगुण महास्वामी (चिकलवाड), अनदानेश्वर महास्वामी (म्हैसूर), सहजानंद महास्वामी (महालिंगापूर).

·         रात्री ८ वाजता ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांचा भक्ती व भावगीतांचा कार्यक्रम.