(दै. सकाळच्या बेळगाव आवृत्तीमध्ये दि. १३ मे २००१ रोजी हंचिनाळ येथे आयोजित पाच दिवसीय संत संमेलनाच्या समारोप समारंभाची बातमी पान-१ वर प्रकाशित झाली. रात्री ९ वाजता हंचिनाळ येथून फॅक्सद्वारे ही बातमी पाठविण्यात आली.)
(आलोक जत्राटकर यांजकडून)
हंचिनाळ, ता. १२: सर्व प्रकारच्या विकारांवर विजय मिळविल्यास
मनुष्य संतपदाकडे वाटचाल करतो. केवळ संतांचे दर्शन नको, तर सर्वांनी संत होण्याकडे वाटचाल करावी. त्यासाठी तपश्चर्येची किंवा
शास्त्रज्ञानाची आवश्यकता नाही. संत होणे म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये पवित्र
प्रेमाची स्थापना करणे होय, असे प्रतिपादन सिद्धेश्वर महास्वामी
(ज्ञानयोगाश्रम, विजापूर) यांनी केले. येथे सुरू असलेल्या संत संमेलनाच्या समारोप
समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या विविध भागांतून सुमारे
५० हजार भक्तगण उपस्थित होते.
ते म्हणाले, "प्रेमामुळेच मनुष्याचे मन
पवित्र आणि भक्ती संपन्न होते. संत दर्शन करा; पण त्यापेक्षा संतसाधना महत्त्वाची आहे. त्यामुळे
तुम्हाला मनःशांती लाभेल आणि मोक्षाकडे वाटचाल कराल."
जगद्गुरू शिवरात्री देशीकेंद्र महास्वामी (संतूर संस्थान मठ, म्हैसूर) म्हणाले, "निरपेक्ष व
निष्कामबुद्धीने केलेली भक्ती भगवंताला प्रिय असते. भक्ती कोणत्या पद्धतीने केली,
यापेक्षा त्यामागील भावना महत्त्वाची असते. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी
आपापल्या पद्धतीने भक्ती केली. त्यांची भक्ती परमेश्वराने स्वीकारली."
ते म्हणाले, "इतर योगामध्ये साध्यासाठी
ठराविक मार्ग आहेत; पण भक्तीसाठी ठराविक मार्गाचे बंधन नाही.
देवाबद्दल मनात शंका न ठेवता भक्तांनी प्रार्थना केली पाहिजे. सत्ता, पैसा, जमीन यासाठी कोटी कोटी मेले; पण भगवंतासाठी व भक्तीसाठी एकही जण मेलेला नाही. निसर्गावर आपण
सातत्याने अत्याचार करतो. परंतु या कृतीतून आपण परमेश्वरालाच इजा करीत आहोत, ही भावना आपल्या मनालाही शिवत नाही, याबद्दल जोपर्यंत आपल्या मनात सहानुभूती निर्माण
होत नाही, तोपर्यंत आपली भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही."
ते पुढे म्हणाले, "अशिक्षितपणा सोडून लोकांनी
शिक्षणाच्या वाटा स्वीकारल्या पाहिजेत. यासाठी संतूर मठाद्वारे सुमारे २५० शिक्षण
संस्था कार्य करीत आहेत. गरिबांच्या मुलांना या शिक्षण संस्थांमध्ये
बारावीपर्यंतमोफत शिक्षणाची सोय केली आहे."
यावेळी ईश्वर स्वामींनी आयोजित केलेले संत संमेलन यशस्वी झाल्याचे
सांगून ते म्हणाले, "ईश्वर स्वामींच्या अनेक
वर्षांच्या प्रयत्नातून भक्ती योगाश्रम साकारला आहे. विजापूरच्या सिद्धेश्वर
महास्वामींच्या अखत्यारीतच ते तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे येथील कार्य
अखंडित सुरू राहील, यात शंकाच नाही. परिसरातील लोकांना भक्ती कशी असावी, हे सांगण्यासाठी त्यांनी पाचही दिवस भक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांवर
चर्चा घडवून आणली.
यावेळी सर्व उपस्थित स्वामींचे, भक्तांचे व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचे
आभार मानताना ईश्वर स्वामी म्हणाले, "मी भक्ती योगाश्रमामध्ये
सद्गुरूंच्या आदेशानुसार ज्ञान व भक्ती प्रसाराचे काम प्रामाणिकपणे करीत
राहीन."
यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रकाश आवाडे, राज्यमंत्री हसन मुश्रीफ, आमदार
विनय कोरे, संजय पाटील, रजनीताई मगदूम, कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आमदार काका पाटील आदी उपस्थित होते.