(दि. १४ एप्रिल २००६ रोजी दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले विशेष वृत्त...)
कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिखाणासाठी ज्या पेनचा वापर केला, ते पेन भारतात राहणार की इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियममध्ये जाणार, याचा निर्णय पेनधारकांनी राज्य सरकारवर सोडला आहे.
डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी वापरलेला 'विल्सन पेन' सध्या अखिल भारतीय दलित पँथर चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरुण कांबळे यांच्याकडे आहे. 'राज्य सरकारला हा पेन हवा असेल तर डॉ. आंबेडकर यांचा पूर्ण आदर राखून मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव दयावे,' अशी त्यांची अपेक्षा आहे. या अपेक्षेमागील कारण स्पष्ट करताना डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर येथील लॉ कॉलेजचे प्राचार्य होते. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्यही होते. आधी आपण त्यांचा आदर राखला पाहिजे. सरकारला जर हा पेन हवा असेल तर त्यांनी तत्पूर्वी मुंबई विद्यापीठास त्यांचे नाव दयावे. ही मागणी मान्य झाली नाही तर ब्रिटिश म्युझियमकडे हा पेन सुपूर्द करण्याचा त्यांचा विचार आहे. त्या दिशेने त्यांची चर्चाही सुरू आहे. 'ब्रिटीश म्युझियममध्ये हा पेन शंभर टक्के सुरक्षित राहील, याची मला खात्री आहे.' असेही ते म्हणाले.
या पेनखेरीज त्यांच्याकडे गोलमेज परिषदेसाठी डॉ. आंबेडकरांनी नेलेली पर्स तसेच अन्य चीजवस्तूही आहेत; मात्र हा पेन सर्वाधिक मौल्यवान असल्याचे त्यांचे मत आहे.