बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

स्विनीचे आई-बाबा जत्रेत हरवतात तेव्हाची गोष्ट...

 






माणसाच्या आयुष्यात काही स्मृती अशा असतात की त्या पुढे आयुष्यात कधीही आठवू नयेत, असे वाटत असते; मात्र, प्रत्यक्षात त्या आठवणी कधीही न विसरण्यासारख्या असतात. या स्मृती चांगल्या, गोड असतील तर हरकत नसते; मात्र त्या आठवू नयेत, असे वाटण्याचेही कारण नसते. कटु आठवणी मात्र कधी अचानक सामोऱ्या आल्या, तर पुनःपुन्हा अंगावर शहारे आल्याखेरीज राहात नाहीत. आज गुगलनेही १३ वर्षांपूर्वीचा असाच एक क्षण माझ्यासमोर आणून टाकला. गुगलने फक्त फोटो समोर ठेवले. आमच्या स्मृती त्याला माहिती असण्याचे कारण नव्हते.

तर, १३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी झाले होते ते असे की, तेव्हा मी कल्याणमध्ये राहात होतो. मुलगी स्विनी तीन वर्षांची होती आणि सम्यक वर्षाच्याही आतला. आज जशी कोल्हापूरमध्ये लंडन ब्रिजची प्रतिकृती असणारी फेअर आली आहे, तशीच त्यावेळी कल्याणच्या बैलबाजार मैदानावर ताज महालची भव्य प्रतिकृती असणारी फेअर आली होती. आता आग्र्याला नेऊन ताजमहाल दाखविण्यापेक्षा शहरात आपसूक दाखल झालेला ताजमहाल दाखवायचा म्हणून बायको-मुलांना तेथे घेऊन गेलो. खरोखरीच भव्य अशी ती प्रतिकृती होती. अगदी तिला फेरफटका मारुन तिच्या गवाक्षात बसून फोटो काढण्याइतकी. त्यामुळे आम्ही तेथे मनसोक्त बसून गप्पा मारुन पुढे फेअरमध्ये दाखल झालो. स्विनीला तिथला उंच उंच गोलाकार भिरभिरणारा लाइटिंगवाला आकाशपाळणा दुरूनच खुणावत होता. तो होता एकदम दुसऱ्या टोकाला. तिला तर तिथे जाईपर्यंत दम निघत नव्हता. वाटेत आम्ही आइसक्रीम वगैरे खात फेअरमधल्या दुकानांत वस्तू पाहात पुढे पुढे निघालो होतो.

मध्येच विविध खेळांचे स्टॉल सुरू झाले. तिथे थोडा टाइमपास करायचं ठरवलं. एके ठिकाणी रायफल शूटिंगवर काही वस्तू भेट मिळत होत्या. एक तर रायफल शूटिंग हा माझा आवडता खेळ आणि त्यातही त्यावर भेटवस्तू मिळणार म्हटल्यावर लगोलग तिथं पोहोचलो. तोवर स्टॉलवर फारशी गर्दी नव्हती. सर्व नेम लागले की भेट मिळणार होती. ते अवघे दहा शॉट मारण्यापुरताच मी स्विनीचा हात सोडलेला. सम्यक दीपाच्या काखेत कांगारु बॅगमध्ये होता. माझं होईपर्यंत त्या स्टॉलवर इतकी गर्दी जमली की विचारू नका. माझी नेमबाजी पक्की झाली आणि तिथं आम्हाला एक टी-सेट भेट मिळाला. दुकानचालकाकडून तो ताब्यात घेऊन इकडं तिकडं पाहतो तर काय, स्विनी कुठेच दिसेना. काळजाचा ठोका चुकणं, म्हणजे काय, हे त्या वेळेला आयुष्यात पहिल्यांदा समजलं. बायकोला तर रडूच कोसळलं. तिला सावरावं की लेकीला शोधावं, अशी माझी अवस्था झालेली. त्यावेळी मोबाईलही एकच होता आमच्याकडं. त्यामुळं दीपाला आणि सम्यकला तिथंच एका बाजूला थांबायला सांगितलं.

आता लेकीला शोधयचं कुठं आणि कसं?, असा प्रश्न माझ्यासमोर ठाकलेला. तेव्हा वाटलं की, आकाश पाळण्याकडं तर गेली नसेल? मी लिटरली वेड्यासारखा त्या प्रचंड गर्दीतनं वाट काढत, इकडं तिकडं बघत त्या दिशेनं पळायला सुरवात केली. कडेपर्यंत जाऊन पाहून आलो. लेकीचा कुठेही थांगपत्ता नाही. दिसणारा प्रत्येक चेहरा संशयास्पद, अपहरणकर्ता वाटायला लागला. मनात सगळ्या वाईटात वाईट विचारांचा कल्लोळ माजला. आता मी पुन्हा उलट्या दिशेनं म्हणजे फेअरच्या एंन्ट्री-एक्झिट गेटच्या दिशेनं पळायला सुरवात केली. वाटेत पुन्हा रडत उभ्या असलेल्या बायकोला कोरडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तिच्याभोवती काही सांत्वन करणाऱ्या महिलाही आता गोळा झालेल्या.

मी गेटपर्यंत पोहोचलो, तरीही कुठेच काही पत्ता लागेना! मी हताश होऊन जागेवर थिजून उभा राहिलो. तेव्हा कुठे माझे बराच वेळ सुरू असलेल्या उद्घोषणेकडे लक्ष गेले. एक दोन-तीन वर्षांची मुलगी सापडली असून कोणाचे मूल हरवले असल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याबाबत आवाहन केले जात होते. मी इकडेतिकडे पाहिले. थोड्या अंतरावर पोलीस नियंत्रण कक्ष होता. परिसरात खासगी सिक्युरिटी गार्ड्ससह पोलीस प्रशासनाकडूनही बंदोबस्त तैनात होता. मी नियंत्रण कक्षाकडे पोहोचलो, तेव्हा एक पोलीसकाका स्विनीला कडेवर घेऊन उभे होते. पोर रडत होती, तिला ते शांत करण्याचा प्रयत्न करत होते. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय असू शकतं, हेही तेव्हाच समजलं मला.  माझा जीव तर थेट बॅरलमध्येच पडला लेकीला बघून. डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहायला लागलं. मला पाहताच स्विनीनं त्या पोलीसकाकांकडून थेट माझ्याकडं झेपच घेतली. पाच मिनिटं आम्ही दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारुन रडत राहिलो. पोलीसकाकाही स्तब्ध झाले. त्यांनाही थोडं गहिवरुन आलं असावं.

थोड्या वेळानं स्विनीनं तिच्या बोबड्या बोलात विचारलं, बाबा, तुमी कुटं हरवला होता? आई कुटाय?’ तिच्या प्रश्नानं मला हसू फुटलं. मनावरचं दडपण हलकं झालं. तेव्हा ते पोलीसकाकाही म्हणाले, अहो, ही आम्हाला भेटल्यापासून माझे आई-बाबा हरवलेत, असं सांगून रडतेय. मी त्यांना ती कशी भेटली, हे विचारलं. तेव्हा हे बाळ चुकून एका काका-काकूंच्या पाठीमागे रडत चाललं होतं. तेव्हा त्यांनी तिला नाव वगैरे विचारलं तर रडण्यामुळं त्यांना काही समजेना. तेव्हा त्यांनी तिला पोलीस नियंत्रण कक्षात आणून सोडल्याचं सांगितलं. तेव्हापासून गेली १५-२० मिनिटं आम्ही उद्घोषणा करतो आहोत, असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना मनापासून धन्यवाद म्हटलं. ते नसते आणि कोणी तरी चुकून मुलीला बाहेर घेऊन गेलं असतं, तर काय झालं असतं, कुठे शोधलं असतं मी?, असा प्रश्न मी स्वगतच विचारला. पण, त्यांनी मात्र आम्ही येथे अत्यंत दक्ष असून गेटमधून कोणीही असा आमच्या नजरेतून सुटून जाऊ शकणार नाही, असं सांगितलं.

आता पुढं, जेव्हा मी स्विनीला तिच्या आईकडं घेऊन गेलो, तेव्हाचा आलम काय शब्दांत सांगायला हवा? शेवटी, स्विनीला तिचे हरवलेले आई-बाबा सापडले होते. प्रकरणाचा शेवट गोड झालेला. नाही तर सोबतचे फोटो किती कटु आठवांचे स्मरण करून देणारे ठरले असते, कल्पना करवत नाही...

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

गारगोटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत आणि सुहृदांच्या सान्निध्यात...

गारगोटी येथील श्री शाहू ग्रंथालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत व्याख्यान देताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर श्री. वसंत देसाई

गारगोटी येथे श्री शाहू ग्रंथालयात महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन प्रसंगी डॉ. डी. के. पाटील,  वसंत देसाई, अनिता भोईटे, मिलींद प्रधान आणि डॉ. अस्मिता प्रधान आदी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी शामराव देसाई, वसंत देसाई, टी.बी. पाटील यांच्यासमवेत

दै. सकाळमधील कार्यक्रमाचे वार्तांकन

लाडक्या चव्हाण कुटुंबियांसमवेत अस्मादिक आणि डॉ. यादव सर.

प्रधान दांपत्याने त्यांच्या घरी पुष्पगुच्छ, अनुबोधचा ताजा अंक आणि डॉ. प्रधान मॅडम यांचे पुस्तक देऊन स्वागत केले.


साधारणपणे महिनाभरापूर्वी गुरूवर्य डॉ. राजन गवस सरांचा फोन आला, ‘गारगोटीच्या श्री शाहू ग्रंथालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत तुम्हाला यायचंय... विषय आणि दिवस सांगा.गवस सरांचा फोन म्हणजे आदेशच तो. त्यानुसार मग कालच्या रविवारी या व्याख्यानमालेत तरुणांचे भवितव्य आणि वास्तवया विषयावर व्याख्यान दिलं. आजच्या तरुणाईचा समकाळाच्या आणि भविष्याच्या अनुषंगानं मी जो विचार करतो आहे, त्याचंच सारस्वरुप मांडलं श्रोत्यांसमोर.

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या श्री शाहू वाचनालयानं गेली २८ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालविलेली आहे. अनेक दिग्गज वक्त्यांनी यामध्ये व्याख्यानं दिलेली आहेत. यंदाही ज्येष्ठ संपादक डॉ. श्रीराम पवार, डॉ. दीपक पवार यांच्या बरोबरीने मला बोलण्याची संधी लाभली, यासाठी खरे तर गवस सरांना धन्यवादच द्यायला हवेत. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाल्याचे श्रोत्यांच्या व्याख्यानानंतरच्या भेटीमध्ये स्पष्ट झालेच. त्याशिवाय, व्याख्यानमालेचे प्रणेते माजी आमदार बजरंग देसाई अण्णा यांनी पहिल्या रांगेत बसून अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकलं आणि शेवटी खूप महत्त्वाचा विषय वेगळ्या पद्धतीनं मांडलात’, असं सांगून समाधान व्यक्त केलं, ही बाब महत्त्वाची. त्याखेरीज प्राचार्य सुभाष देसाई, शामराव देसाई, वसंत देसाई, आमची लाडकी दीक्षा आणि तिचे वडील, मित्रवर्य अनुबोधकार मिलींद प्रधान आणि डॉ. सौ. अस्मिता प्रधान मॅडम, डॉ. डी.के. पाटील यांनीही व्याख्यानाला आत्मियतेने उपस्थिती दर्शविली. त्याशिवाय, महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती आणि त्यांनी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकणे हे सुद्धा या व्याख्यानमालेचे वेगळेपण म्हणून नोंदविण्याजोगे. असे क्षण व्याख्यात्यांच्या आयुष्यात अलिकडे दुर्मिळच, म्हणून त्यांची नोंद अगत्याची. ग्रंथपाल प्रवीण गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले नेटके आयोजन हे सुद्धा दखलपात्र.

व्याख्यानानंतर प्रधान सरांच्या घरचे चहापान हे जितके अगत्याचे; तितकेच या दिवसाचा माझ्या लाडक्या चव्हाण दांपत्याच्या सहवासात दिवसाचा झालेला समारोपही संस्मरणीय. डॉ. जयश्री चव्हाण आणि डॉ. राजीव चव्हाण हे दांपत्य म्हणजे त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाखेरीजही सामाजिक-सांस्कृतिक कार्यामुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनात लक्षवेधक ठरलेले. बंधू अनुप यांच्यामुळे परिचय झालेल्या या दांपत्याशी त्यांच्या या कार्यामुळे माझा कधी अकृत्रिम स्नेह जडला, हे लक्षातही आले नाही. जयश्री मॅडमशी तर थोरल्या भगिनीप्रमाणे नाते जुळलेले. त्यामुळे गारगोटीमध्ये जाणे आणि त्यांना न भेटणे, अशक्यातीलच बाब. तशात डॉक्टर साहेबांनी त्यांच्या स्टाफच्या कुटुंबियांसाठी नजीकच्या पाली येथील एका निसर्गरम्य ठिकाणी छानशी मेजवानी आयोजित केलेली. यादव सरांसह या सर्व विस्तारित परिवारासमवेत त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि स्नेहभोजन करण्याची संधी या निमित्ताने लाभली. जयश्री मॅडमसमवेत खूपच छान गप्पा झाल्या. खूप दिवसांनी पोटभरून बोलता आले, हे या गारगोटी भेटीचे महत्त्वाचे फलित...