शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

'शाहूपूर्व आणि शाहूकालीन वर्तमानपत्रे': कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीचा मौलिक वेध



शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक आणि माझे मित्र डॉ. शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या 'शाहूपूर्व आणि शाहूकालीन वर्तमानपत्रे' या एका अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचे उद्या शनिवारी, दि. ५ एप्रिल २०२५ रोजी विद्यापीठात प्रकाशन होते आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारितेमध्ये एक सजग आणि जाणिवा समृद्ध पत्रकार-संपादक म्हणून मोठा लौकिक प्राप्त केला आहे असे, 'दि हिंदू' या राष्ट्रीय वृत्तपत्राचे सीनियर डेप्युटी एडिटर आणि आमचे मित्र डॉ. राधेश्याम जाधव यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, ही आणखी एक आनंदाची आणि अभिमानाची बाब! 'शाहूकालीन पत्रकारितेची मूल्यमीमांसा' या विषयावर राधेश्याम बोलणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असणार आहेत.
डॉ. शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये माध्यमांचा इतिहास, लेखनकलेचा विकास, भारतातील प्रसारमाध्यमांचा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारितेचा उदय आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कालखंडापर्यंत झालेला या पत्रकारितेचा प्रवास असा एक सर्वंकष आढावा घेण्याचा महत्त्वपूर्ण संशोधकीय प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. डॉ. जाधव यांनी पुस्तकाची मांडणी करीत असताना कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराज यांचा कालखंड हा केंद्रस्थानी ठेवला आहे. तथापि, यामध्ये केवळ पत्रकारितेचा इतिहास आहे, असे नव्हे; तर, त्या समकाळामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचाही समर्पक आणि विषयोचित वेध जाधव यांनी घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूरचा प्राचीन आणि मध्ययुगीन काळ, कोल्हापूरमधली एजंटांची कारकीर्द, कोल्हापूरच्या अल्पवयीन राजांचा कालखंड, छत्रपती घराण्याचा थोडक्यात इतिहास, कोल्हापूर प्रकरण या नावाने गाजलेले चौथ्या शिवाजी महाराजांची दुर्दैवी कारकीर्द, राजर्षी शाहू पूर्व आणि शाहूकालीन स्थिती आदी महत्त्वाच्या घटनांचा विशेष संदर्भ घेत घेत कोल्हापूरमध्ये विकसित होत गेलेली पत्रकारितेची परंपरा, त्याचप्रमाणे संबंधित वृत्तपत्रांमध्ये कोल्हापूरचे उमटलेले प्रतिबिंब, त्यांनी हाताळलेले विविधांगी विषय यांचाही अतिशय उचित वेध या पुस्तकामध्ये डॉ जाधव यांनी घेतलेला आहे. ठिकठिकाणी आवश्यक तेथे योग्य संदर्भ त्यांनी दिल्यामुळे या पुस्तकाचे संशोधन आणि संदर्भ मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लेखनास विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. त्यासाठी डॉ. जाधव यांनी राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनालय कार्यालयासह शिवाजी विद्यापीठाचे बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आदी ठिकाणी उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांचा योग्य वापर केलेला आहे. पुस्तक वाचत असताना पानोपानी डॉ. जाधव यांनी लेखनासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव होते. महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या अनुषंगाने अनेक प्रकारची नवी माहिती प्रथमच या पुस्तकाच्या माध्यमातून सामोरी येत आहे, हे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे केवळ पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे; तर इतिहासाचे अभ्यासक, माध्यम संशोधक, शाहू पूर्व आणि शाहूकालीन वर्तमान पत्रांविषयी किंवा त्या काळातील वृत्तपत्रसृष्टीविषयी ज्यांना जाणून घ्यायचे आहे, अशा सर्वच घटकांसाठी जाधव यांचे हे पुस्तक माईलस्टोन ठरणार आहे. यासाठी घेतलेल्या परिश्रमांबद्दल मित्र म्हणून शिवाजीरावांचे अभिनंदन करणे हे माझे कर्तव्य तर आहेच; पण एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज त्यांनी अभ्यासकांसाठी निर्माण केला, याबद्दल त्यांना धन्यवाद देणेही मला अगत्याचे वाटते. या पुढील काळातही त्यांच्याकडून अशाच मौलिक, दर्जेदार साहित्याची निर्मिती होत राहील, यांची मला खात्री आहे. उद्याच्या प्रकाशन समारंभासाठी अनेकानेक शुभेच्छा!
मी उपस्थित राहणार आहेच; ज्यांना शक्य आहे त्यांनीही यावे!!

"कोण नामदेव ढसाळ?"

पुस्तकाचे मुखपृष्ठ


डॉ. रणधीर शिंदे


काही दिवसांपूर्वी नामदेव ढसाळ यांच्यासंदर्भातील चित्रपट सेंन्सॉरसाठी जेव्हा सेंन्सॉर मंडळापुढे आला, त्यावेळी सेंन्सॉर मंडळाच्या एका सदस्याने "कोण नामदेव ढसाळ?" असा प्रश्न विचारला आणि राज्यामध्ये मोठा गहजब उडाला.
सत्तरच्या दशकामध्ये केवळ राज्यातच नव्हे; तर देशभरात दलित पॅंथरच्या माध्यमातून आपल्या सामाजिक चळवळीच्या कार्याचा मोठा ठसा निर्माण करणाऱ्यांमध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे या पॅंथर चळवळीचे नेतृत्व करण्यामध्ये आघाडीवर असणाऱ्यांत नामदेव ढसाळ यांचे नाव आघाडीवर होते. प्रज्ञावंत राजा ढाले, ज. वि. पवार यांच्याबरोबरीने दलित पॅंथर चळवळीला तिची ओळख, अधिष्ठान आणि दिशा प्राप्त करून देण्यामध्ये नामदेव ढसाळ यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण ठरले.
रस्त्यावरची लढाई करण्यामध्ये जसे ढसाळ आघाडीवर होते, त्याचप्रमाणे साहित्यिक सांस्कृतिक चळवळ करण्यात, घडविण्यात; विशेषतः दलित, शोषित आणि वंचित वर्गाला साहित्याच्या वर्तुळामध्ये प्रकर्षाने इंट्रोड्यूस करण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते म्हणजे ढसाळांनी! त्यांच्या 'गोलपिठा'नं मराठी साहित्य विश्वाला अस्वस्थ करून सोडलं. मोठी खळबळ उडवली. आजवर कधीही साहित्याच्या परिघावर दूर दूरपर्यंत स्थान न मिळालेली माणसं, त्यांचं दुःख, त्यांचं दैन्य, त्यांचा आक्रोश आणि त्यांचे शोषण या साऱ्याच गोष्टींना गोलपिठानं साहित्याच्या मुख्य प्रवाहात ठसठशीत स्थान प्राप्त करून दिलं. विशेष म्हणजे आजवर मराठी साहित्यानं कधीही ऐकली, बोलली नाही आणि स्वीकारली सुद्धा नव्हती, अशी त्यांची भाषा सुद्धा ढसाळांनी मोठ्या आक्रमकतेने मांडली. त्या भाषेलाही तिचं स्थान, तिचा उद्गार आणि सन्मान प्राप्त करून दिला. ही फार मोठी कामगिरी आहे त्यांची! त्यानंतर मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, तुही यत्ता कंची, गांडू बगीचा, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे अशा एकापाठोपाठ एक आलेल्या कवितासंग्रहांनी मराठी साहित्य विश्वाला एका अनोख्या आणि दुर्लक्षित विश्वाचा परिचय करून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कवितांचा संग्रह असणारा 'तुझे बोट धरून चाललो आहे मी' हा फार महत्त्वाचा कवितासंग्रह सुद्धा ढसाळांनी लिहिला. अशा या चौफेर सामाजिक, साहित्यिक कामगिरी बजावणाऱ्या नामदेव ढसाळांविषयी 'कोण नामदेव ढसाळ?' असे विचारण्याचे धाडस किंवा अनभिज्ञता सेन्सॉर बोर्डाचा सदस्य करू शकतो, अगर दाखवू शकतो याचं कारण म्हणजे ढसाळ यांना या समाजाने कधीही मुख्य प्रवाहातील साहित्यिक अगर कार्यकर्ता म्हणून स्वीकारले नाही, हेच होय.
खरं म्हणजे ढसाळांची साहित्यिक प्रतिभा ही कोणत्याही जागतिक दर्जाच्या कवीला साजेशी आहे आणि त्याची प्रचिती त्यांनी त्यांच्या हरेक साहित्यिक कृतीमधून दिलेली आहे. तथापि जातीच्याच चष्म्यातून आणि तथाकथित अभिजनवादी साहित्यिक नजरेतूनच साऱ्या साहित्यिकांचे परीक्षण, समीक्षण, निरीक्षण आणि परिशीलन करण्याची सवय लागलेले भारतीय साहित्यिक वर्तुळ आणि त्यांच्याच नजरेतून समग्र साहित्य व्यवहाराकडे पाहण्याची सवय लागलेले वाचक सुद्धा ढसाळांच्या या उपेक्षेला कारणीभूत आहेत. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 'समग्र नामदेव ढसाळ' असे ढसाळांच्या साहित्याचे दोन संपादित खंड प्रकाशित केले असले, तरी त्यांच्या साहित्यकृतींच्या पलीकडे ढसाळ यांचे जीवन व कार्य नेमके कशा स्वरूपाचे होते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या साहित्यिक वाटचालीची, त्यांच्या सामाजिक कार्याची जडणघडण कशा पद्धतीने झाली, हे सांगणारे पुस्तक मात्र आले नव्हते. नामदेव ढसाळांची पुस्तके आली; मात्र त्यांच्याविषयी पुस्तकांची साहित्यिक वर्तुळामधील असणारी वानवा लक्षात घेऊन भारतीय साहित्य अकादमीने 'भारतीय साहित्याचे निर्माते' या मालिकेअंतर्गत नामदेव ढसाळ यांच्याविषयीचे एक सर्वंकष चरित्रकार्यात्मक पुस्तक आणले आहे. महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचे लेखन आमचे सन्मित्र, मराठी साहित्याचे एक महत्त्वाचे समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.
डॉ. शिंदे यांनी अवघ्या १०० पृष्ठांच्या या पुस्तकामध्ये नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाटचालीची अतिशय थोडक्यात पण साद्यंत मांडणी करण्याचा, वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यामध्ये नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि कार्य, ढसाळांचे कविताविश्व, त्यांचे कादंबरी लेखन, त्यांचे गद्य लेखन अशा सर्वच पैलूंचा अत्यंत साकल्याने वेध घेतला आहे. १९७० च्या दशकापासून ते एकविसाव्या शतकाचे पहिले दशक या साधारण अर्धशतकीय वाटचालीच्या कालावधीत ढसाळांनी जी काही चळवळ केली, जे काही साहित्यिक योगदान दिले, त्याचा वेध डॉ. शिंदे यांनी या पुस्तकामध्ये घेतलेला आहे; आणि 'कोण नामदेव ढसाळ?' हे ज्यांना खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे आहे, अशा सर्वच साहित्यिक अभावग्रस्तांसाठी आणि जिज्ञासूंसाठीही डॉ. शिंदे यांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरणारे आहे. ढसाळ यांच्या प्रज्ञेची विलक्षण झेप, त्यांच्या काव्यशैलीतील कमालीची विविधता, त्यांच्या कविता आणि साहित्यामध्ये आढळणारा विविध प्रकारच्या बोलींचा नवा सहजाविष्कार, कवितेचा खुला रूपबंध आणि त्या कवितेला त्यांनी प्रदान केलेली लवचिकता, त्यांच्या कवितेमधील प्रसरणशीलता या सर्वांचाच अतिशय महत्त्वपूर्ण आणि नेमका वेध डॉ शिंदे यांनी या पुस्तकामध्ये घेतला आहे. ढसाळांची कविता ही भारतीय काव्य परंपरेतील एक श्रेष्ठ कविता असल्याचे त्यांनी यामध्ये दाखवून दिले आहे. ढसाळ यांच्या कवितेने परंपरेकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. मराठी साहित्यविश्वासमोर सर्वहारा वर्गाचे दुःख आणि शोषणाची अस्वस्थ चित्रे त्यांनी आपल्या साहित्यातून रेखाटली, प्रदर्शित केली. आंबेडकरी जीवनदृष्टी, चिंतनशीलता, काव्यात्मता, विद्रोही काव्य भाषा, दीर्घ कविता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृतज्ञतापूर्ण गुणगान आणि मनोगत कविता ही वैशिष्ट्ये सुद्धा ढसाळ यांच्या कवितेमधून आढळतात, असे शिंदे दाखवून देतात. एकूणच जात आणि वर्ण जाणिवांचा सखोल आणि सर्वांगीण आविष्कार घडविणारे, स्त्रीविषयक उन्नत भावाची चित्रे रेखाटणारे, नर-नारीच्या समतेची आणि विश्वबंधुतेची प्रचिती देणारे त्याचप्रमाणे वंचित आणि आंबेडकरी समूहाच्या अपरिचित अनुभव प्रदेशाचे निर्भीड चित्र रेखाटणारे ढसाळ हे त्यांच्या साहित्यातून मानवतावादाचा विशाल आणि व्यापक पट मांडताना दिसतात, असे सुस्पष्ट निरीक्षणही डॉ. शिंदे नोंदवितात. विषमतेविरुद्धची जाणीव ढसाळ यांनी आपल्या साहित्यामधून सातत्याने प्रकट केली आणि या जाणिवांचे टोकदारपणे प्रदर्शन करण्यातही कोठे उणेपण येऊ दिले नाही. सातत्याने शोषित, वंचितांच्या वेदनांचा हुंकार ते अखेरच्या क्षणापर्यंत भरत राहिले. सारे काही समष्टीसाठी असे मांडत असताना सुद्धा या जाणीवांना त्यांनी कधीही बोथट होऊ दिले नाही, हे ढसाळ यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. हे वैशिष्ट्य अधोरेखित करणारे करण्याचे काम डॉ. शिंदे यांचे हे पुस्तक करते. त्यामुळे "कोण नामदेव ढसाळ?" असा प्रश्न पुन:पुन्हा सामोरे आणणाऱ्या आणि ज्यांच्यासमोर असा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे, अशा सर्वांसाठीच त्या प्रश्नाचे उत्तर देणारे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे डॉ. रणधीर शिंदे यांचे "भारतीय साहित्याचे निर्माते - नामदेव ढसाळ" हे पुस्तक होय.