(सोलापूरच्या दै. संचारच्या सर्व आवृत्त्यांच्या पहिल्या पानावर दि. ८ जुलै २००० रोजी ठळकपणाने बायलाइन प्रकाशित झालेली माझी बातमी.)
(आलोक जत्राटकर)
कोल्हापूर, दि. ७: निपाणी आणि परिसरातील नागरिकांसाठी सीमाप्रश्न हाअत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. येथील मराठी भाषिकांनी या भागाचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे म्हणून प्रयत्न चालविले आहे. परंतु आजतागायत हा प्रश्न सोडविण्याऐवजी या प्रश्नाचे राजकीय भांडवल अधिक प्रमाणात झाल्याचे दिसते.
या पार्श्वभूमीवर सामान्यजनांनी आपल्यापरीने सीमाप्रश्नासाठी योगदान देणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकीच एक असणारे रामचंद्र धोंडीबा परीट (दिवाणजी) हे सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासमोर पानपट्टीचा गाडा चालवतात. 'सीमाप्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आहे.
रामचंद्र परीट मूळचे निपाणीचे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. सातवीनंतर त्यांना शालेय शिक्षणाला रामराम ठोकून दिवाणजीची नोकरी पत्करावी लागली. विनोबांच्या भूदान चळवळीची कर्नाटकातील सभा आटोपताच त्यांच्या महाराष्ट्रात प्रवेशावेळी कन्नडमधून भाषणे झाली, त्याला मोठा विरोध झाला. त्यामध्ये अनेकांनी विविध प्रतिज्ञा करून आपल्या मराठी अस्मितेचा रंग दाखवला. अंगावर वस्त्र परिधान न करण्याची, दाढी व केस न कापण्याची अशा प्रतिज्ञा केल्या. त्याच प्रसंगी रामचंद्र परीट यांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानुसार, आजतागायत ते अनवाणी राहिले आहेत. त्यांच्या या महाराष्ट्रनिष्ठेला 'दै. संचार'चा सलाम!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा