सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

डिजिटल इंडिया व उच्च शिक्षण



(भारतीय विश्वविद्यालय संघ (ए.आय.यू.), नवी दिल्ली व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचा सविस्तर वृत्तांत...)
 
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आयोजित ए.आय.यू.च्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन करताना बिट्स पिलानीचे माजी संचालक प्रा. जी. रघुरामा. (डावीकडून) बेळगावच्या व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. एच. महेशप्पा, ए.आय.यू. चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.
उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील आधुनिक प्रवाहांची दखल घेत असतानाच सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी व समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने 'डिजिटल इंडिया व उच्च शिक्षण' या विषयावर शिवाजी विद्यापीठ व भारतीय विश्वविद्यालय संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय पश्चिम विभागीय कुलगुरू परिषद नुकतीच दि. २६ व २७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत पार पडली. या परिषदेचा सविस्तर कार्यवृत्तांत...
ज्ञानाच्या सृजनात्मकतेमध्ये आघाडीवर असणाऱ्या देशाचे भवितव्यच उज्ज्वल: प्रा. फुरकान कमर
ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर यांनी परिषदेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेस संबोधित केले. ते म्हणाले, उच्चशिक्षण संस्थांच्या संख्यात्मक पातळीवर भारतात जगातील सर्वाधिक शिक्षण संस्था आहेत. अमेरिका व युरोपमध्ये जिथे केवळ पाच-पाच हजार विद्यापीठे आहेत, तिथे भारतात ८०० विद्यापीठे आणि ४० हजारहून अधिक महाविद्यालये आहेत. भारतातील विद्यार्थी संख्या तीन कोटींच्या घरात आहे. चीननंतर आज आपला विद्यार्थ्यांच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २२ ते २३ टक्क्यांच्या घरात आहे. हा आकडा किमान ३० ते ३५ टक्क्यांच्या घरात नेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्याचबरोबर रोजगार संधीच्या बाबतीतही मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यामध्येही मोठी तफावत आहे. ही आव्हाने पेलण्यासाठी उच्चशिक्षणाच्या पातळीवर धोरणात्मक दिशादर्शन करण्याचा प्रयत्न ए.आय.यू. करीत आहे. ए.आय.यू.तर्फे विभागीय तसेच मध्यवर्ती स्तरावर देशाच्या शैक्षणिक धोरणांसंदर्भात तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातील नवनवीन आधुनिक प्रवाहांचा वेध घेऊन त्यांचा भारतीय शिक्षण पद्धतीत समावेश करण्याच्या अनुषंगाने कुलगुरू परिषदांचे आयोजन करण्यात येते. या परिषदांमधील विचारमंथनातून निघणाऱ्या निष्कर्षांचा सविस्तर अहवाल तयार केला जातो. तो केंद्र सरकारला सादर करण्यात येतो. पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचा मध्यवर्ती विषय 'डिजिटल इंडिया ॲन्ड हायर एज्युकेशन' असा असून केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया' आणि 'स्कील इंडिया' या धोरणांचा उच्च शिक्षणात समावेश आणि या धोरणांना पूरक उच्च शिक्षण पद्धतीचा विकास या अनुषंगाने विचारविमर्श करण्यात येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी परिषदेबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या या परिषदेस राजस्थान, गुजरात, गोवा व महाराष्ट्रातील विद्यापीठांचे साधारण तीस कुलगुरू उपस्थित राहणार आहेत. देशाच्या विविध भागांतील कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठास भेट द्यावी आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या शैक्षणिक, संशोधकीय कार्याची त्यांना माहिती व्हावी, हा या परिषदेचे यजमानपद स्वीकारण्यामागील प्रमुख हेतू आहे. या परिषदेचे उद्घाटन उद्या सकाळी ९.३० वाजता बिट्स पिलानीचे माजी संचालक व के.के. बिर्ला गोवा कॅम्पसचे प्राध्यापक जी. रघुरामा यांच्या हस्ते करण्यात येईल. ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर अध्यक्षस्थानी असतील, तर बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा प्रमुख उपस्थित असतील. कार्यक्रमात ए.आय.यू.च्या 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय परिषदेत चार चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये 'मेक इन इंडिया फॉर डिजिटल पॅराडाइम', 'सेक्टर स्कील्स इनिशिएटीव्ह्ज अंडर डिजिटल इंडिया', 'डिजिटल इंडिया ॲन्ड हायर एज्युकेशन: रोल ऑफ कॉर्पोरेट सेक्टर''आयसीटी बेस्ड फ्युचरिस्टीक टेक्नॉलॉजी ॲन्ड पोटॅन्शियल रोल ऑफ इंडिया इन हॉरिझॉन २०२०' या विषयांवर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ए.आय.यू.चे सहसचिव सॅम्पसन डेव्हीड,  सहसचिव डॉ. वीणा भल्ला, 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, अवर सचिव प्रदीप कुमार, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. आर.के. कामत, डॉ. निशा मुडे-पवार उपस्थित होते.
'डिजिटल इंडिया'ला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्चशिक्षण क्षेत्रातच - प्रा. रघुरामा

कोल्हापूर: ए.आय.यू.च्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या निमित्ताने 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या विशेषांकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे, 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, ए.आय.यू. चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर, बेळगावच्या व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. एच. महेशप्पा, बिट्स पिलानीचे माजी संचालक प्रा. जी. रघुरामा.
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'डिजिटल इंडिया' अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्चशिक्षण क्षेत्रातच आहे, असे प्रतिपादन 'बिट्स पिलानी'चे माजी संचालक व गोव्याच्या के.के. बिर्ला कॅम्पसचे प्रा. जी. रघुरामा यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ व भारतीय विश्वविद्यालय संघ (ए.आय.यू.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटक या नात्याने 'डिजिटल इंडिया व उच्चशिक्षण' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर होते. बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा प्रमुख उपस्थित होते.
Prof. G. Raghurama
डिजिटल इंडिया अभियानाच्या यशस्वितेमध्ये आर्थिक व पायाभूत तांत्रिक बाबींचा अडथळा असला तरी भारताच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून त्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहण्याची गरज असल्याचे सांगून प्रा. रघुरामा म्हणाले, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण क्रांती यांमुळे सुविधांचा होणारा गतिमान विकास या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण क्षेत्रात अनेकानेक उपयुक्त व्यासपीठे निर्माण होत आहेत. त्यांचे लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यापीठांसह सर्व शिक्षण संस्थांनी तत्परतेने प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठे डिजिटल इंडिया अभियानामध्ये व्यापक सहभाग नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे त्याचे लाभही घेऊ शकतात. डिजिटल इंडिया अभियानातील डिजिटल लॉकर सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे ऑनलाइन प्रमाणपत्रे, पदवी कशा प्रकारे प्रदान करता येऊ शकतील, याचा विचार करता येईल. ऑनलाइन परीक्षा, असेसमेंट, प्रवेश प्रक्रिया, सुपर फॅकल्टी किंवा मॅसिव्ह ऑनलाइन अभ्यासक्रम त्याचप्रमाणे नवनिर्मिती व उद्योजकता प्रशिक्षण व कौशल्य विकास आदींबाबतही या अभियानाचा चांगला वापर करवून घेता येऊ शकतो. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी समाजमाध्यमांचा उपयुक्त वापर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अद्ययावत अभ्यासक्रम निर्मिती यांच्यासाठीही ऑनलाइन व्यासपीठांचा प्रभावी वापर करता येईल. ऑनलाइन माध्यमांमुळे आता विद्यापीठांनी अधिक स्वतंत्र, स्वायत्त व गतिमान होण्याची वेळ आली आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्वांनी केवळ 'प्रो-भारत' किंवा 'प्रो-इंडिया' विचारसरणी अवलंबण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. फुरकान कमर म्हणाले की, उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात डिजिटल इंडिया अभियानाच्या माध्यमातून देशाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. सातत्याने होणारे बदल स्वीकारणे, त्यांना सामोरे जाणे आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याची प्रमुख जबाबदारी विद्यापीठांवर आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी जगाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात उलट चित्र दिसते. हे चित्र नव तंत्रज्ञानाच्या आधारावर बदलण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील जास्तीत जास्त तरुणांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सद्यस्थितीत विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये प्रचंड लवचिकता आणण्याची गरज आहे. स्वतःच्या वेळेनुसार व गरजेनुसार ऑनलाइन स्वरुपात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना शिक्षकांवर त्यांचे शंका निरसन करण्यासाठी तयार राहण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे शिक्षकांनीही नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्यावरील अतिरिक्त भार कमी करून नव अध्यापन तंत्रांचा अंगिकार केला पाहिजे. संशोधन व नवनिर्मितीच्या नवसंकल्पनांना आविष्कृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षाला पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेच्या निमित्ताने ए.आय.यू.चे साप्ताहिक 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी आभार मानले. यावेळी शहीद दिनानिमित्त शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले; तर, संविधान दिनानिमित्त प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. प्रा. सोहन तिवडे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या चार राज्यांतील कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींसह ए.आय.यू.चे सहसचिव सॅम्पसन डेव्हीड, सहसचिव वीणा भल्ला, 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभाग प्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह विविध अधिविभागप्रमुख, प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवस पहिला
डिजिटल साधनसुविधांमुळे परीक्षा पद्धतीत क्रांतीकारक बदल शक्य - डॉ. एच. महेशप्पा
Dr. H. Maheshappa
ऑनलाइन व डिजिटल साधनसुविधांच्या सहाय्याने विद्यापीठीय परीक्षा पद्धतीत क्रांतीकारक बदल घडवून आणता येऊ शकतात, असे प्रतिपादन बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाचे (व्ही.टी.यू.) कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा यांनी केले. ए.आय.यू.च्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेत पहिल्या सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. एन.के. गोयल होते.
व्ही.टी.यू.ने गेल्या दोन वर्षांत परीक्षा पद्धतीत नवतंत्रज्ञानाच्या आधारावर अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. याची दखल घेऊन सन २०१३मध्ये त्यांना देशातील सर्वाधिक नवनिर्माणकर्ते विद्यापीठ म्हणून गौरविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या यशस्वी प्रयोगांची माहिती देताना कुलगुरू डॉ. महेशप्पा म्हणाले, परीक्षा यंत्रणा हा विद्यापीठीय यंत्रणेमधील सर्वात महत्त्वाचा व विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय आहे कारण त्यांच्या भवितव्याची दिशा येथील मूल्यमापनावर अवलंबून असते. विद्यापीठावर परीक्षा सुरळीत घेण्याचा आणि वेळेत निकाल लावण्याचे सर्वात महत्त्वाचे आव्हान असते. या ठिकाणी ऑनलाइन व डिजिटल साधन सुविधांचा वापर करून विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच वेळेची, श्रमाची तसेच कागदाचीही बचत करणे शक्य आहे. प्रश्नपत्रिकांचे सुरक्षितरित्या ऑनलाइन वाटप करण्याबरोबरच उत्तरपत्रिकांची डिजिटल तपासणी करणेही शक्य आहे. व्ही.टी.यू.मध्ये या पद्धतीने परीक्षा घेऊन केवळ २१ दिवसांत निकाल लावणे शक्य असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन संलग्नता प्रक्रियाही पूर्णतः ऑनलाइन करता येऊ शकते. पीएच.डी. सह विविध परीक्षांतर्गत शोधनिबंध व शोधप्रबंधांच्या बाबतीत वाङ्मयचौर्य तपासणे व रोखणेही ऑनलाइन पद्धतीने शक्य आहे. तसेच ई-रिसोर्स म्हणजे ऑनलाइनरित्या विविध माहिती स्रोतांचे एकत्रीकरण करून ते संशोधकांना व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येणेही शक्य आहे.
कौशल्याधारित अभ्यासक्रमांची कळीची भूमिका: युधिष्ठिर यादव
Yudhisther Yadav
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात नॅसकॉम (मुंबई)च्या सेक्टर स्कील कौन्सिलचे प्रादेशिक प्रमुख युधिष्ठिर यादव यांनी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योग व्यवसायांत असलेल्या संधींची आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुंबई येथील डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी व बायोइन्फॉर्मेटिक्सच्या प्रा. देबजानी दासगुप्ता सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.
'सेक्टर स्कील्स इनिशिएटीव्ह्ज अंडर डिजिटल इंडिया' या विषयावर बोलताना श्री. यादव म्हणाले, सद्यस्थितीत माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योगांत सर्वाधिक मनुष्यबळ रोजगारात सामावून घेतले जाते आहे. सध्या भारतात या उद्योगांची उलाढाल २२५ अब्ज डॉलरच्या घरात असून सन २०२०पर्यंत ती ३०० अब्ज डॉलरच्या घरात जाणार आहे. तसेच सध्या साडेतीन दशलक्ष विद्यार्थी या क्षेत्रात सामावून घेतले जात आहे, ही संख्या सहा टक्के दराने वाढते आहे. केवळ देशातल्या टॉप-२० कंपन्यांमध्येच त्यातले १.२५ दशलक्ष लोक कार्यरत आहेत. यावरुन या क्षेत्राची व्याप्ती लक्षात येईल. यामुळे विद्यापीठांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण विविध तांत्रिक व सॉफ्ट स्कील्स असलेल्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पदवीधारक विद्यार्थ्यांच्या तुलनेत रोजगार मिळण्याची संधी अधिक आहे. कौशल्याधारित अभ्यासक्रम हा सध्याच्या काळात कळीचा मुद्दा ठरणार आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञानाचे लाभ पोहोचविण्यासाठी 'नॅसकॉम' सातत्याने प्रयत्नशील असून इंडस्ट्री-रेडी व जॉब-रेडी अभ्यासक्रम अशा दोहोंच्या बाबतीत माहिती तंत्रज्ञान उद्योग व शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्यास, सहकार्य करण्यास सर्वतोपरी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आऊटकम बेड्स एज्युकेशन ठरणार महत्त्वाचे: प्रा.डी.एच. राव
Prof. D.H. Rao
तिसऱ्या सत्रात बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे प्रा. डी.एच. राव यांनी 'आयसीटी आऊटकम बेस्ड एज्युकेशन' या विषयावर मार्गदर्शन केले. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए.एम. महाजन अध्यक्षस्थानी होते.
शिक्षककेंद्री ते विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धतींना जोडणारा दुवा म्हणजे आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) असल्याचे सांगून प्रा. राव म्हणाले, यामध्ये ई-आर-आर-सी मॉडेल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे मॉडेल म्हणजे इलिमिनेट-रिड्युस-रेज-क्रिएट असे आहे. विद्यार्थ्यांमधील उदासीनता दूर करणे, पारंपरिक शिक्षण पद्धतीत नवतंत्रज्ञानाचा अंगिकार करून त्यातील पारंपरिकता कमी करणे, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, संवाद, समस्या सोडविण्याची क्षमता व चिकित्सक विचारसरणीचा विकास करणे आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करणे यासाठी विद्यापीठीय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांत अधिक अभ्यास करण्याची, त्या अभ्यासाचे उपयोजन करण्याची आणि विविधांगी कौशल्ये आत्मसात करण्याची क्षमता विकसित करणे हे आधुनिक शिक्षण पद्धतीचे ध्येय असले पाहिजे. त्यासाठी आऊटकम बेस्ड शिक्षण पद्धती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
दिवस दुसरा
बॉश कंपनीचे सादरीकरण
Smt. Sumita Ramesh & Sriram S.
कुलगुरू परिषदेत दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात बॉश या मल्टिनॅशनल कंपनीच्या वतीने श्रीमती सुमिता रमेश व श्रीराम एस. यांनी सादरीकरण केले. शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्या सहकार्य वृद्धीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बॉश कंपनीतर्फे विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये चालविलेल्या अभ्यासक्रमांची माहितीही त्यांनी दिली. टेलर-मेड अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कंपन्यांना आवश्यक असणारे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते. त्यामुळे असे व्यावसायिक अभ्यासक्रम बी.व्होक. व टेक्विपच्या माध्यमातून विद्यापीठांतून राबविले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आयसीटी प्रणाली शिक्षकाला पर्यायी नव्हे; पूरकच! - 'सी-डॅक'चे सहसंचालक महेश कुलकर्णी
Mahesh Kulkarni
आयसीटी बेस्ड शिक्षण प्रणाली शिक्षकाला कधीही पर्याय ठरू शकत नाही; तर, अधिक पूरकच ठरेल, असे प्रतिपादन सी-डॅकचे सहसंचालक 'डब्ल्यू-थ्री-सी इंडिया'चे कंट्री मॅनेजर महेश कुलकर्णी यांनी केले. पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. एस.एम. सोनी होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले, माहिती संवाद तंत्रज्ञानाधारित साधने व सुविधा या अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रवाही करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांच्या मुळे शिक्षकाचे महत्त्व कमी होत नाही. उलट माहितीचा ओघ विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत असल्यामुळे शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्यांना अधिक प्रगल्भ बनविण्याची जबाबदारी शिक्षकच यथार्थपणे पार पाडू शकतात.
श्री. कुलकर्णी यांनी आपल्या सादरीकरणा दरम्यान भविष्यातील शैक्षणिक साधनांची व्याप्ती स्पष्ट केली. ते म्हणाले, ई-बुक्स, ई-पब सारख्या इंटरॅक्टीव्ह माध्यमांबरोबरच वेब व टीव्ही बेस्ड लर्निंग, टी-गव्हर्नन्स यांचा वापर शिक्षण पद्धतीत अनिवार्य आहे. आपल्याकडे गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची कमी नाही. त्यांना संशोधनासाठी आणि त्यापेक्षाही पेटंट मिळवून देणाऱ्या संशोधनासाठी प्रेरित करण्याची गरज आहे. आपल्या विद्यापीठांतून भरीव संशोधन सुरू आहे. मात्र पाश्चात्य देशांच्या तुलनेत पेटंटिंगच्या बाबतीत आपण मागे पडतो. ही उणीव भविष्यात भरून काढण्याची गरज आहे.
भविष्यात शिक्षण पद्धतीवर प्रभाव टाकतील अशा अभिनव क्षेत्रांची माहितीही त्यांनी आपल्या व्हीजन-२०३५च्या माध्यमातून दिली. यामध्ये थ्री-डी प्रिंटीग, प्लास्मॉनिक्स, फोटोनिक्स, सिमँटेक वेब, सिंथेटिक बायॉलॉजी, सोलार टेक्नॉलॉजीज, स्मार्ट फॅब्रिक्स, क्वांटम कम्प्युटिंग, रिअल टाइम स्पीच टू स्पीच ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजी, ऑप्टो-जेनेटिक्स, ॲडव्हान्स्ड जिनॉमिक्स, बायो-मिमॅटिक्स, नेचर इन्स्पायर्ड रोबोटिक्स इत्यादी अनेक नवीन शाखांचा उदय माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे होतो आहे. त्याला पूरक व पोषक अशा प्रकारचे कुशल मनुष्यबळ विद्यापीठीय स्तरावर विकसित करण्याची गरज आहे. ऑनलाइन कम्प्युटिंगच्या क्षेत्रात नैसर्गिक भाषा प्रोसेसिंग (एन.एल.पी.) हे भविष्य आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, सायबर सिक्युरिटी, डाटा जनरेशन व मेंटेनन्स यांसारख्या आव्हानांवर मात करून आपल्याला या नवतंत्रज्ञानासह पुढे जाण्याची जाणीवही त्यांनी करून दिली.
समारोप सत्र:
देशाला धोरणात्मक दिशा देण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रातील धुरिणांवर - प्रा. फुरकान कमर
Prof. Furqan Qamar
देशाला धोरणात्मक दिशा देण्याची आणि केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्याचे उत्तरदायित्व शिक्षण क्षेत्रातील धुरिणांवर आहे, असे प्रतिपादन भारतीय विश्वविद्यालय संघाचे (ए.आय.यू.) सरचिटणीस प्रा. फुरकान कमर यांनी केले. शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दोन दिवसीय पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
      परिषदेतील चर्चासत्रांत कुलगुरूंचा सहभाग उत्साहवर्धक होता आणि त्यांमध्ये अत्यंत उच्च दर्जाची चर्चा झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रा. कमर म्हणाले, समाजात काही चुकीचे घडू लागले तर, त्यासाठी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले जाते. त्यामुळे योग्य शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कुलगुरू हे केवळ विद्यापीठाचेच प्रमुख असतात, असे नव्हे; तर, त्यांच्या उच्च विद्याविभूषिततेमुळे समाजाचे दिग्दर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आपले विद्यापीठ, आपली महाविद्यालये यांच्या पलिकडे जाऊन आपल्यावरील व्यापक सामाजिक जबाबदाऱ्या निभावण्यात आपण सर्वांच्या पुढे असले पाहिजे. देशाच्या विकासाला धोरणात्मक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उच्चशिक्षण क्षेत्रावरच आहे.
    दरम्यान, सदर पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या अहवालातील शिफारशींवर विचारविमर्श होऊन त्या पुढे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच ए.आय.यू.ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणंद येथील सरदार पटेल विद्यापीठात ५ ते ७ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
 अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ए.आय.यू. आणि उपस्थित कुलगुरूंना विद्यापीठात या परिषदेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले, सदर परिषदेत अतिशय उत्तम चर्चा झाली. त्यातील निष्कर्षही खूप सकारात्मक आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात ए.आय.यू. ने 'स्मार्ट युनिव्हर्सिटी' या विषयावर परिषद आयोजित करावी. कारण विद्यापीठे स्मार्ट झाली, तरच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीसारख्या योजना यशस्वी होण्यास चालना मिळेल.
विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक तथा परिषदेचे नोडल ऑफिसर डॉ. डी.आर. मोरे यांनी दोनदिवसीय परिषदेतील चर्चासत्रांचा आढावा घेऊन अहवाल वाचन केले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते सदर अहवाल प्रा. कमर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. एस.एम. सोनी आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एच. पवार यांनी या परिषदेत झालेल्या चर्चासत्रांबद्दल प्रातिनिधिक प्रतिक्रिया नोंदविल्या. प्रा. आर.के कामत यांनी सत्र संचालन केले. यावेळी ए.आय.यू.च्या वतीने सहसचिव सॅम्पसन डेव्हीड यांनी तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शिवकालीन युद्धकला पाहून भारावले पाहुणे!
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात आज सायंकाळी सादर झालेली शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके पाहून आज देशाच्या विविध ठिकाणांहून आलेले कुलगुरू अक्षरशः भारावले. कुलगुरू परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या सत्र समाप्तीनंतर सायंकाळी पाहुण्यांसाठी कोल्हापूरची अस्मिता असलेल्या शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. स्व. वस्ताद ठोंबरे ग्रुपने ही प्रात्यक्षिके सादर केली. चार वर्षांच्या बालक-बालिकांपासून ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असणारी ही प्रात्यक्षिके पाहून सारेच पाहुणे मंत्रमुग्ध झाले. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी फिरविणे यांच्यासह अनेक थरारक प्रात्यक्षिके कित्येकदा काळजाचा ठोकाही चुकला. सुमारे दीड तासांच्या या प्रात्यक्षिकांनंतर सर्व सादरकर्त्या कलाकारांवर पाहुण्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तसेच कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते स्मृतिचिन्हे देऊन त्यांना सन्मानितही करण्यात आले.
कुलगुरूंचा सन्मान कोल्हापुरी फेट्यांनी!
Vice Chancellors from Rajsthan, Gujrat, Maharashtra & Goa wearing Kolhapuri Phetas at Shivaji University, Kolhapur in front of the statue of Chh. Shivaji Maharaj.
या प्रात्यक्षिकांना उपस्थित राहिलेले ए.आय.यू.चे पदाधिकारी, कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींना कोल्हापुरी फेटा बांधण्यात आला. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आवर्जून कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन केले. तसेच, यावेळी प्रत्येक कुलगुरूंचा विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिवपुतळ्यासमोरील उद्यानात फेट्यांसह फोटो काढून घेण्याचा मोह पाहुण्यांना आवरता आला नाही. शिवाजी विद्यापीठाचा परिसर प्रेमात पडावा असा आहे आणि प्रांगणातील शिवपुतळा देशप्रेमाने भारावून टाकणारा आहे, अशी प्रतिक्रियाही पाहुण्यांनी व्यक्त केली.

२ टिप्पण्या: