रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

कृतज्ञ आठवांचा प्रवाहो!


 

'सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा' हे आपले ध्येयवेड्या जीवनप्रवास वर्णनपर पुस्तक भेट देताना डॉ. बाळासाहेब गोफणे.

डॉ. बी.एन. तथा बाळासाहेब गोफणे... माझ्या परिचयातील एक ज्येष्ठ उमदे व्यक्तीमत्त्व... खरे म्हणजे गोफणे सर हे माझ्या वडिलांच्या पिढीतील... स्वातंत्र्योत्तर कालखंडात जन्मलेली आणि शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही पहिली पिढी... शिक्षणासाठीच्या खस्ता त्यांनी आपापल्या परीनं खाल्लेल्या... संघर्ष रेटलेला... या संघर्षाच्या धुमीत तेजाळून निघालेले त्यांचे अनुकरणीय ज्ञानकर्तृत्व... अशी ही पिढी...

गोफणे सरांचा माझा परिचय हा मी शिवाजी विद्यापीठात सन २०१२ साली सहाय्यक कुलसचिव पदावर रूजू झाल्यानंतरचा... तत्कालीन कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी मी सर्वात शेवटी रुजू होणारा उमेदवार असूनही माझ्यासाठी जणू सभा व निवडणुका विभागाची जबाबदारी राखून ठेवलेली... या विभागामुळं संपूर्ण विद्यापीठाचंच नव्हे, तर विद्यापीठ परिक्षेत्राचंही कामकाज समजावून घेण्याची, निर्णय प्रक्रियेमध्ये प्रशासकीय अंगानं विशिष्ट भूमिका बजावण्याची संधीच जणू मला लाभलेली... विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा इत्यादींच्या बैठकांचं नियोजन, कामकाजाचे मिनिट्स, ठराव इत्यादी विहीत मुदतीत मार्गी लावण्याची जबाबदारी या विभागाकडं आहे. त्यावेळी डॉ. गोफणे सर हे विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून संपर्कात आले. एक अत्यंत गोड वाणीचे, मृदूभाषी, निर्मळ मनाचे आणि कर्तव्यतत्पर सदस्य म्हणून त्यांच्याबद्दल मला विशेष आदर वाटत असे. प्रत्येक बैठकीच्या वेळी आले की, हमखास विचारपूस करणारे आणि अन्य वेळी कधी काही कामानिमित्तानं विभागात आले तरी अनेक बाबी चिकित्सक आणि जिज्ञासापूर्ण पद्धतीनं जाणून घेणारे म्हणूनही त्यांच्याबद्दलचा आदर दुणावलेला. त्यांची मुदत संपली तरी, समाजमाध्यमांपासून ते प्रत्यक्ष कधीही आले तरी काही क्षण का असे ना, भेट घेऊन चौकशी केल्याखेरीज कधीही पुढे न जाणारे, असे गोफणे सर!

नुकतंच त्यांचं सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा: एक ध्येयवेडा प्रवास हे आत्मनिवेदनपर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच आवर्जून भेट घेऊन त्यांनी ते भेट दिलं. त्यांच्या सहृदयी स्वभावाला ते साजेसंच आहे. पुस्तक वाचून हातावेगळं केलं, तेव्हा गोफणे सरांच्या आयुष्यातील सकारात्मकतेचं, सहृदयतेचं गमक ध्यानी आलं. आईच्या ममतेसाठी आसुसलेलं कोवळं मन आजही त्यांच्याआत खोलवर कुठं तरी आहे. त्यामुळं भेटणाऱ्या प्रत्येकाविषयी एक माया, ममता, कणव अथवा वात्सल्य या भावना त्यांच्या हृदयातून ओसंडून वाहू लागतात. पुस्तक वाचताना पानोपानी त्याची प्रचिती येते. प्रस्तावनेत डॉ. रणधीर शिंदे म्हणतात, त्याप्रमाणं या निवेदनात व्यक्तीगत, सामाजिक, संस्थात्मक अंतर्विरोधाला अजिबात स्थान नसल्यानं त्याला एकरेषीयता प्राप्त झाली आहे. मात्र, याचं कारण त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनातच असल्यामुळं त्यांच्यातील सकारात्मक दृष्टीनं त्यावर मात केली आहे. डॉ. शिंदे यांचं म्हणणं खरंच आहे. गोफणे सरांना अडचणीत आणायचं म्हणून सुरवातीला अनुमोदक म्हणून सही देणाऱ्या आणि अगदी ऐनवेळी पाठिंबा मागं घेत असल्याचं पत्र देणाऱ्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाचं नाव न छापण्याचा विशालहृदयी दृष्टीकोन गोफणे सरांच्या या जीवनदृष्टीमुळंच त्यांच्यात आलेला आहे. अन्यथा, दुसरा एखादा ते नाव सहजी छापून गेला असता. नेमकं हेच गोफणे सरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

कृतज्ञतेनं ओथंबलेल्या आठवांचा प्रवाह असं एका वाक्यात त्यांच्या या आत्मनिवेदनाचं वर्णन मी करेन. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या विविध व्यक्तीमत्त्वांबद्दल केवळ अन् केवळ कृतज्ञताभाव बाळगणं आणि त्याचा आवर्जून निर्देश करणं, हा आजच्या काळात एक वस्तुपाठ म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्याचप्रमाणं आत्मनिवेदनामध्ये स्वशय येणं, स्व असणं हे अनिवार्यच असतं. मात्र, हा स्व मांडत असताना त्यामध्ये मीपणा डोकावणार नाही, मी लाऊड होणार नाही, याची दक्षता घेणं, तारेवरची कसरत असते. या दोहोंमध्ये एक धूसर, बारीक सीमारेषा असते. ती सांभाळणं भल्याभल्यांना जमत नाही. मात्र, स्वभावतःच कृतज्ञशील असलेल्या गोफणे सरांना मात्र ते सहजी जमलेलं आहे, असं पुस्तक वाचताना जाणवतं. या पुस्तकातील कन्टेन्टबद्दल मी लिहीणार नाही कारण गोफणे सरांनी अत्यंत सुबोध, ओघवत्या आणि रसाळ शब्दांमध्ये मांडलेला सीनेच्या वाळवंटापासून सुरू झालेला आणि पंचगंगेद्वारा प्रितीसंगमापर्यंत येऊन ठेपलेला ध्येयवेडा प्रवास मुळातूनच एकदा वाचनानुभवण्यासारखा आहे.

कोविड-१९ लॉकडाऊनच्या कालखंडात आपण सारेच बऱ्याच सहृदजनांना दुरावलो. मात्र, याच कालखंडानं गोफणे सरांसारख्यांना लिहीण्यासाठी अवधी मिळवून दिला आणि त्या काळात एक मार्गदर्शक, कृतज्ञताभावानं ओथंबलेली साहित्यकृती निर्माण होऊ शकली, हेही नाकारता येणार नाही. गोफणे सरांची ही भावगाथा आजच्या तरुणाईला स्वातंत्र्योत्तर पहिल्या पिढीचा संघर्ष सांगणारी तर आहेच, शिवाय, स्वतःमध्ये मूल्ये कशी रुजवून घ्यावीत, त्यांचा अंगिकार, प्रसार कसा करावा, याचेही धडे देणारी आहे. त्या दृष्टीने गोफणे सरांच्या या साहित्यकृतीकडे पाहायला हवे, तिचे स्वागत करायला हवे.

 

पुस्तकाचे नाव: सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा: एक ध्येयवेडा प्रवास

लेखक: डॉ. बाळासाहेब गोफणे

लेखकाचा संपर्क: ९४२२३८४०३५  

प्रकाशक: शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा, सोलापूर

पृष्ठसंख्या: २४०

किंमत: रु. ३००/-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा