मंगळवार, २९ मार्च, २०२२

“तथागत”: बुद्धाला भेटण्याचा, भेटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न

 







तथागत भगवान बुद्ध यांचं तत्त्वज्ञान अखिल सृष्टीच्या मूलगामी अस्तित्वशोधातून जन्माला आलेलं. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील जीवनप्रवासाचं चिंतन करणारं. मानवी जीवनाचाच नव्हे, तर सृष्टीचा हा प्रवास कसा सुखकर, आनंदमयी होईल, या दृष्टीने समग्र जगण्याचं भान देणारं आणि हे जगणं आणि मरणं या दोन्ही गोष्टी सुंदर करणं, या भोवती आणि यासाठी हे तत्त्वज्ञान माणसाला प्रेरित करणारं. त्याच्या आगे आणि मागे जे काही दृष्टीच्या आणि महत्त्वाचं म्हणजे अनुभूतीच्या पलिकडलं आहे, त्याविषयी तथागत मौन बाळगतात. त्या मौनातून अनुभूतीहीन बाबींमधील फोलपण दर्शवितात. विज्ञानवाद हा बुद्धतत्त्वज्ञानाचा गाभा आहे, तो त्यामुळंच. कारण ज्याची अनुभूती घेता येते, त्याच तथ्यांना विज्ञानात स्थान असतं. बुद्धाच्या तत्त्वज्ञानातही अनुभूतीचं तेच स्थान आहे. त्याचप्रमाणं बुद्ध आपल्या तत्त्वज्ञानालाही काळानुरुप बदलण्याचं स्वातंत्र बहाल करतो- मात्र ती सुद्धा या वैज्ञानिक मार्गांनीच. हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य.

जीवनात दुःख आहे, त्या दुःखावर मात करता येणे शक्य आहे आणि ते दुःख निर्माण होऊ नये, यासाठीही प्रयत्न करता येणे शक्य आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांपासून दूर राहणे त्यासाठी आवश्यकच आणि पंचशील व अष्टांगमार्ग हे त्यासाठीचे प्रमुख मार्ग. अहिंसा, अचौर्य, अव्यभिचार, सत्यवदन आणि अपेयपान त्याग हे पंचशील, तर सम्यकदृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक जिविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधि हे अष्टांग. या मूलभूत गोष्टींचा अंगिकार केल्यास मनुष्याचे जीवन सुखी आणि आनंदी होऊन जाईल.

बुद्ध तत्त्वज्ञानाचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे नुकतीच लेखक, कवी समर यांची तथागतही बुद्धजीवनावरील एक नितांतसुंदर कादंबरी वाचून पूर्ण झाली. विशी-पंचविशीच्या आतबाहेरच्या एका तरुण संवेदनशील लेखकाला बुद्धाच्या चरित्राला भेटावंसं वाटणं आणि त्यापुढे जाऊन त्याचं सहजसोप्या भाषेत निरुपण करावं, अशा पद्धतीनं बुद्ध मांडावासा वाटणं, हीच बाब मुळी माझ्यासाठी अत्यंत आनंदाची अन् अभिमानाची आहे. आजची पिढी बुद्धाचा साकल्यानं विचार करू पाहते आहे, त्याला भेटू पाहते आहे, त्याच्यापासून काही घेऊ आणि समाजाला देऊ पाहते आहे, ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे ही वर्णनात्मक स्वरुपाची कादंबरी नाही, तर प्रथमपुरूषी निवेदनाच्या स्वरुपात ती साकारलेली आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत म्हटलं तर ही गोष्ट सोपी आणि म्हटलं तर त्याहून अवघड आहे. कारण प्रथमपुरूषी निवेदनाचे जसे लाभ आहेत, तशा मर्यादाही आहेत. पौराणिक कथापुरूषांच्या बाबतीत निवेदन लेखकाच्या कल्पनांप्रमाणे फुलविता येऊ शकते. बुद्धासारख्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेच्या संदर्भात मात्र अत्यंत चिकित्सकपणानं वाक्यरचना करावी लागते. त्याच्या तत्त्वज्ञानाचे उपयुक्त आकलन करवून घेणे ही त्यासाठीची पूर्वअट आहे. आणि या बाबतीत समर पूर्णांशाने यशस्वी ठरलेले आहेत. दुसरी महत्त्वाची बाब असते ती म्हणजे अशा बाबतीत लेखक संदर्भसाधने कोणती वापरतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्मयांसह अनेक अधिकृत संदर्भसाधनांचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करीत ही कादंबरी साकारली आहे. बुद्धाच्या धम्माचे आधुनिक स्वरुप जगाला दाखवून देणाऱ्या बाबासाहेबांनाच सदर कादंबरी लेखकाने अर्पण केली आहे. तथागतांनी मानवी मनाचा, अस्तित्वाचा आणि वैश्विक दुःखाचा सखोल अभ्यास करून एक मनुष्यनिष्ठ तत्त्वज्ञान मांडलं. हा प्रवास अद्भुत आहे. तो ऐकून, वाचून त्याबाबत लिहीण्याचा मोह कुणालाही होईल. तसा मलाही झाला. त्यातूनच तथागतकादंबरी साकार झाली’, अशी भूमिका लेखकाने मांडली आहे. मात्र, बुद्धाविषयी लिहीण्याची प्रेरणा त्या तत्त्वज्ञानाच्या ताकदीइतकीच लेखकाच्या संवेदनशीलतेमधूनही आलेली आहे, हे मात्र आवर्जून सांगावंसं वाटतं. तथागतांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर सामाजिक क्रांतीही केली. ते केवळ उपदेश करीत बसले नाहीत, तर त्यांनी समाजही बदलला. तथागतांच्या या क्रांतीकारी कार्याचं प्रतिबिंब उमटविण्यामध्ये ही कादंबरी निश्चितपणे यशस्वी झालेली आहे. त्यासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचं मार्गदर्शनही समर यांनी घेतलेलं आहे. स्वतःच्या साहित्यकृतीला वाचकांना सादर करण्यापूर्वी सर्व कसोट्यांवर ती जास्तीतजास्त निर्दोष करण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. कादंबरी या फॉर्मचा आधार घेत असताना वास्तवाशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणं, ही फार महत्त्वाची बाब आहे. मला सर्वाधिक भावली ती हीच गोष्ट.

आत्मनिवेदनपर शैलीत साकारलेली तथागतही सुमारे ५०२ पृष्ठांची कादंबरी आहे. यामध्ये स्वतः बुद्ध सिद्धार्थ, बोधिसत्त्व सिद्धार्थ, गौतम बुद्ध आणि तथागत या चार विविध अवस्थांमध्ये संवाद साधतात. त्यांच्याखेरीज पत्नी यशोधरा, पिता शुद्धोधन, ब्रह्म सहंपती, शिष्य सारिपुत्त आणि शिष्या भिक्खुणी खेमा अशा सहा जणांच्या तोंडून बुद्धचरित्राचे विविध टप्पे अतिशय अलगद उलगडत जाते. या पात्रनियोजनातून सुद्धा कादंबरीकाराच्या कौशल्याची आणि दांडग्या अभ्यासाची प्रचिती येते. अत्यंत विचारपूर्वक ही योजना केलेली आहे. त्यासाठी समर यांना दाद द्यावीशी वाटते. त्याशिवाय ज्या ओघवत्या शब्दांमध्ये बुद्धाच्या तोंडून त्याचे तत्त्वज्ञान स्रवते, मला वाटते, अलिकडच्या काळात इतक्या सोप्या भाषेत बुद्ध तत्त्वज्ञान आलेलेच नाही. तत्कालीन पाली या लोकभाषेत ते लोकांना कसे भिडले, भावले असावे, हे लेखकाच्या साध्या सोप्या मराठीतून समजते. अन्यथा, सहजसोप्या बुद्धाला अवघड करून सांगणारे विद्वतजनच भोवतालात अधिक दिसतात. या मध्यस्थांमुळे बुद्ध लोकांना अवघड वाटतो. त्यापेक्षा लोकांनी बुद्धाला थेट भेटणे कधीही चांगले. ते किती योग्य आहे, हे सदरची कादंबरी वाचताना जाणवल्याखेरीज राहात नाही. सध्याच्या कोलाहलयुक्त भोवतालात आजची पिढी किती असोशीने बुद्धाला भेटू पाहते आहे, किंबहुना, बुद्धाला भेटत राहणे, त्याच्यापासून प्रेरित होत राहणे किती अगत्याचे आहे, याचे अधोरेखन तथागतही कादंबरी करते. यात बुद्धाचे जीवनचरित्र, बुद्धाचे कार्य आहेच, पण त्यापलिकडे त्याची सार्वकालिक प्रस्तुतताही दृगोच्चर होते. हेच या कादंबरीचे आणि कादंबरीकाराचे योगदान आहे.

सृजनशील चिन्मय...

तथागतया कादंबरीविषयी लिहीले, मात्र आता कादंबरीकाराविषयी कौतुकाचे चार बोल लिहीणे मला अगत्याचे वाटते. समरऊर्फ चिन्मय मोघे हा माझे सहकारी, सन्मित्र किरण मोघे यांचा चिरंजीव. मोघे सरांच्या दोनही मुलांच्या लहानपणापासूनच्या जडणघडणीचा मी एक साक्षीदार. कला क्षेत्राशी बालपणापासून जोडलेली ही मुलं या आईबापानं आणि हो, आजीच्या संस्कारानंही तितक्याच संवेदनशीलतेनं घडवली आहेत. त्यांच्यातलं सामाजिक भान आणि कला-साहित्य-सांस्कृतिक व्यवहारांप्रती सजगता ही मूल्ये त्यातूनच रुजलेली आहे. समर तर अगदी टीनएजपासून लिहीतो आहे. कविता, नाटक, कथा, कादंबऱ्या असा त्याचा वावर सुरू आहे. वास्तवाकडं अतिशय संवेदनशीलतेनं पाहात असताना भूतकाळाकडंही चिकित्सकपणानं पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन फार महत्त्वाचा आहे. त्यामुळंच संगीत नाटक ही परंपरा पौराणिक गोष्टींवर अधिक पोसली गेली असताना त्याला मात्र सम्राट चंद्रगुप्ताच्या व्यक्तीरेखेवर आधारित संगीत चंद्रप्रियाहे संगीत नाटक लिहावंसं वाटतं. यात शास्त्रीय संगीतावर आधारित बारा नाट्यपदं आणि भावगीतांचा समावेश आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रही हाक मारतं आणि त्यातूनच विविध १९ वृत्तांमधलं ६५० पृष्ठांचं महाकाव्य शिवप्रतापतो अवघ्या सोळाव्या वर्षी साकारतो, तेही अवघ्या ५० दिवसांत. या मराठी महाकाव्यात ३००० श्लोक, दहा पर्व आणि शंभर सर्ग आहेत. ही या सृजनशील तरुण कवीची ताकद आहे. त्यापुढं जाऊन आजच्या काळात हिटलर पुन्हा अवतरला तर काय…? हा प्रश्न घेऊन १९७०: रिटर्न ऑफ एडॉल्फ हिटलरही इंग्रजी कादंबरी सुद्धा त्यानं लिहीलीय. आता तो लक्ष्मणाच्या ऊर्मिलेच्या वनवासाचं चिंतन करतो आहे. ती सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मीही त्या प्रतीक्षेत आहे. चिन्मय, तुझं भविष्य उज्ज्वल आहेच, हे मी सांगण्याची खरं तर आवश्यकताच नाही. मात्र, तुझ्यासारख्या संवेदनशील तरुणाच्या हातून या देशाचं भवितव्यही उजळत राहील, याची खात्री आहे. तुझी सर्जनशील अभिव्यक्ती अशीच सकारात्मक दिशेनं फुलत राहो, त्यातून अशा अनेकानेक साहित्यकृती निर्माण होवोत, यासाठी अनेकानेक शुभेच्छा!

---

तथागत

लेखक: समर

प्रकाशक: समर प्रकाशन, पुणे

पृष्ठे: ५०२

मूल्य: रु. ५००/-

(अमेझॉनवर उपलब्ध)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा