शनिवार, १३ एप्रिल, २०२४

पाकशास्त्रनिपुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आजवर त्यांच्या अलक्षित अशा पाककलानिपुणतेच्या कौशल्याबद्दल या विशेष लेखामध्ये माहिती देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खानपानविषयक विशेष आवडीनिवडींचीही या लेखात चर्चा करण्यात आली आहे. मात्र, त्यावरुन कोणी त्यांच्याविषयी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. बाबासाहेबांना आपल्या समाजबांधवांच्या दैन्यावस्थेची पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये असताना अगर इतरवेळीही त्यांनी खाण्यापिण्याची कधीही मौज केली नाही. किंबहुना, भाजीभाकरी, चटणीभाकर हे त्यांचे आवडीचे पदार्थ होते. ते आपल्या समाजबांधवांसमवेत, सहकाऱ्यांसमवेत आनंदाने त्यांच्यात बसून ते खात असत. हा लेख म्हणजे त्यांच्या पाककलाविषयक कौशल्यावर प्रकाशझोत टाकण्याचा केवळ प्रयत्नमात्र आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात अस्पृश्यतेचे चटके सोसले आणि त्यासोबत येणारे सारे दैन्य, अपेष्टा त्यांच्या वाट्यालाही आल्या. या सर्व विपरितावर मात करीत त्यातून त्यांनी आपल्या जीवनाची, कारकीर्दीची वाट प्रशस्त केली. अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाचे ते धनी होत. आयुष्यामध्ये असा कोणताही विषय नसेल ज्याचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले नाही. पाककला हा विषय सुद्धा त्यांनी वर्ज्य मानला नाही, तर त्याचेही ज्ञान त्यांना होते. त्यांच्या संग्रहात जगभरातील पाककलेवरील पुस्तके तर होतीच, मात्र, त्यापुढे जाऊन स्वतः उत्तम स्वयंपाक करण्यापर्यंत त्यांनी ही कला आत्मसात केलेली होती. इतकेच नव्हे, तर जेव्हाही कधी वेळ मिळेल, तेव्हा स्वतःच्या हाताने बनवून इतरांना खिलवण्याचा आनंदही ते घेत असत. एक समाधान त्यातून त्यांना लाभत असे.

खरे तर विद्यार्थीदशेमध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यता आणि गरीबी पराकोटीची पाहिली, सोसली. मात्र, वडील रामजी सकपाळ यांच्या प्रेरणेतून अभ्यासाच्या बाबतीत अजिबात कुचराई केली नाही. प्रसंगी पोटाला चिमटा काढून त्यांनी आपले लक्ष्य शिक्षणावर केंद्रित केले. मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यानंतर केळुस्कर गुरूजींच्या मध्यस्थीने बाबासाहेबांना उच्चशिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांनी दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यामुळे ३ जानेवारी १९०८ रोजी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रिव्हियसच्या वर्गात प्रवेश घेतला. स्कॉलरशीपमुळे वाढलेल्या जबाबदारीची जाणीव बाळगून भीमराव शिकत होते. त्याच वेळी त्यांचे पर्शियनचे शिक्षक कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झालेले होते. त्यांनी आपली खोली बाबासाहेबांना अभ्यासासाठी दिलेली होती. या खोलीत बाबासाहेब सकाळी सातला येऊन अभ्यासाला बसत. कोर्टात काम करण्यासाठी डबक चाळीच्या आसपासचा एक गृहस्थ ९ वाजता घरून निघत असे. बाबासाहेबांसाठी घरचे लोक त्याच्यासोबत जेवण पाठवित असत. हे जेवण म्हणजे बाजरीच्या दोन भाकरी आणि बोंबलाची चटणी असे. तो गृहस्थ बाबासाहेबांना जेवण देऊन पुढे आपल्या कामाला जाई. दहाच्या आसपास बाबासाहेब जेवण घेत आणि दीड वाजता वर्गात जाऊन बसत. दोनेक वर्षे असाच नित्यक्रम चालला.

विद्यार्थीदशेत गरजेच्या वेळी पोट भरण्यासाठी उपयोगी पडलेल्या बोंबलाच्या चटणीविषयी बाबासाहेबांच्या मनात खूप प्रेम होते. हा पदार्थ पुढे आयुष्यभर त्यांच्या आवडत्या पदार्थांमध्ये उच्च स्थानी राहिला. बाबासाहेबांच्या खाद्यसवयींच्या बद्दल माईसाहेबांनी त्यांच्या चरित्रात काही नोंदी केल्या आहेत. बाबासाहेब इंग्लंड, अमेरिकेत राहिल्याने तेथील काही आवडलेल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या होत्या. त्यांना बेड टी घेण्याची सवय होती. चहा घेता घेता ते सकाळची वर्तमानपत्रे चाळत असत. चहा पिऊन झाल्यानंतर ते योगासने, व्यायाम करीत. रक्ताभिसरण व मज्जातंतूंना तरतरीसाठी मॉलिश करवून घेत. आंघोळ आटोपून ते साडेआठ, नऊच्या सुमारास न्याहरीसाठी टेबलवर उपस्थित राहात. ताजे आणि गरम-गरम पदार्थ त्यांना आवडत असत.

बाबासाहेबांच्या न्याहरीत पहिला पॉरिज कोर्स असे. पॉरिज म्हणजे उकळलेले ओट्स. या उकळलेल्या ओट्स दुधात चांगल्या रितीने मिसळला की पॉरिज कोर्स तयार होत असे. आपल्या पेज किंवा कांजीसारखाच हा पदार्थ. कधी कधी बाबासाहेब कॉर्न फ्लेक्सही घेत. अंड्याचे विविध पदार्थही त्यांना न्याहरीला आवडत. बॉईल्ड एग, हाफ फ्राय, ऑम्लेट, भुर्जी, स्क्रॅम्बल्ड एग असे पदार्थ माईसाहेब त्यांना आलटून पालटून देत. अंड्यासोबत ते गरम टोस्ट बटर लावून घेत. निरनिराळ्या प्रकारचे जॅम त्यांना आवडत. अंडी-टोस्ट झाल्यावर ते कॉफी घेत. सकाळची न्याहरी हाच त्यांचा मुख्य आहार असल्याप्रमाणे होता. दुपारी ते जास्त जेवत नसत.

बाबासाहेबांना क्रॉकरीचीही फार आवड होती. नाश्त्यासाठी, चहासाठी, कॉफीसाठी, जेवणासाठी अशा निरनिराळ्या क्रॉकरीचे सेट त्यांनी आणवले होते. ज्या त्या गोष्टीसाठी, ज्या त्या प्रकारची क्रॉकरी वापरली पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी क्रॉकरी ते वापरायला सांगत. 

बाबासाहेबांचे दुपारचे जेवण खूपच कमी असे. गव्हाच्या पिठाचे दोन लहान फुलके आणि थोडासा भात ते खात. जेवणात त्यांना मांसाहार आवडे. ते अगदीच थोडं खात, पण पदार्थांत त्यांना विविधता आवडे. मटणाच्या प्रकारांत रोस्ट मटण त्यांना विशेष आवडे. पाश्चिमात्य पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ त्यांना अधिक आवडत. रोस्ट मटण, कोल्ड मटण, विशेष पद्धतीचे सूप, पुडिंग्ज, बेक्ड पदार्थ त्यांना आवडत. कलकत्त्याची हिलसा मासळी त्यांना फार आवडे. डी.जी. जाधव हे त्यावेळी कलकत्त्याला मजूर आयुक्त होते. त्यांच्याकडून ते बर्फात घालून हिसला फिश विमानाने पार्सलने मागवत असत. कोळंबी फ्राय आणि तळलेले पॉपलेटही त्यांना आवडत. कोंबडीच्या मटणाचे चिकन फ्राय, चिकन करी, तंदुरी चिकन असे प्रकारही ते आवडीने खात. जेवणात मांसाहारी पदार्थ लागत असला तरी एक ते दोन तुकडेच ते घेत असत. दिवसभराचे काम आटोपून थकल्यानंतर रात्री मात्र मोजकेच अन्न घेऊन ते पुन्हा उशीरापर्यंत वाचन, लेखन करीत बसत.

बाबासाहेबांची ही आवड केवळ खाण्यापुरतीच मर्यादित होती, असे मात्र नाही. ते स्वतः उत्तम स्वयंपाक करीत असल्याची उदाहरणं खुद्द माईसाहेब आणि बळवंतराव वराळे यांनी आपापल्या आठवणींमध्ये दिली आहेत. बळवंतराव १९५०मध्ये बाबासाहेबांना भेटायला प्रथमच दिल्लीला आले. त्यावेळी बाबासाहेब वेळात वेळ काढून त्यांना दिल्ली आणि परिसराची सैर घडवित. एकदा त्यांनी ओखला येथे सहलीसाठी जाण्याचा कार्यक्रम आखला. दिल्लीपासून सात किलोमीटरवर असलेल्या ओखला इथं यमुना नदीला बंधारा घालून आधुनिक पद्धतीचे उद्यान तयार केले होते. तिथे एक सरकारी गेस्ट हाऊस होते. तिकडे जायचे ठरले. सोबत बाबासाहेबांचे पर्सनल सेक्रेटरी मेसी आणि त्यांच्या पत्नी, असिस्टंट सेक्रेटरी पिल्ले, डॉ. मालवणकर, बाबासाहेबांचे एक नामवंत पत्रकार मित्र श्रीकृष्ण आणि माईसाहेब अशी मंडळी होती. स्वयंपाकाचे साहित्यही सोबत घेण्यात आले होते.

ओखल्याला पोहोचल्यानंतर सर्वांनी चहा घेतला आणि स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. त्यावेळी स्वतःच स्वयंपाक करण्याचा बाबासाहेबांनी आग्रह धरला आणि स्वयंपाकाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. सोबत आणलेल्या दोन्ही शेगड्या आणि साहित्य जवळ घेतले. कोंबडीसाठी, बिर्याणीसाठी, सुक्या मटणासाठी वेगवेगळा मसाला वाटायच्या सूचना नोकरांना केल्या. ‘मसाला इतका बारीक आणि लोण्यासारखा मऊशार व्हायला हवा की डोळ्यात घातला तरी जाणवायला नको,’ असं त्यांनी माईसाहेबांना सांगितलं. सगळा स्वयंपाक हळूहळू त्यांनी तयार करवून घेतला. कोंबडीचे कालवण, सुके मटण, बिर्याणी, वांगी-बटाट्याची भाजी असे पदार्थ त्यांनी तयार केले. कालवण तयार होत असताना बाबासाहेब स्वतःच्या हातात चिमटा घेऊन भांड्यावरील झाकण वरचे वर उघडत असत. चमच्याने कालवण आपल्य. तळहातावर घेऊन जिभेने ते चाटून बघत. त्याप्रमाणे त्या कालवणात काय हवे-नको ते पाहात. त्या वेळी स्वयंपाक करीत असतानाचे बाबासाहेबांचे ते चित्र पाहण्यासारखे होते, असं बळवंतराव लिहीतात. कालवणात मीठ, मिरची, हळद, जिरे, खोबरे, आले असे सर्व पदार्थ त्यांनी अगदी प्रमाणात घातले. कालवण बरोबर झाले आहे किंवा नाही, हे बळवंतरावांनाही पाहण्यास ते सांगत. “चांगला स्वादिष्ट स्वयंपाक तयार करणे ही देखील एक कलाच आहे. ती लहानपणापासून मला अवगत आहे. माझी आई वारल्यानंतर आम्ही आमच्या आत्येला, बहिणीला स्वयंपाकात मदत करीत असू. म्हणूनच मला ही कला अवगत झाली आहे. स्वतःचा संवयंपाक स्वतः करणे यात कोणत्याही प्रकारचा कमीपणा नाही,” असं त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं. 

यावेळी तोंडी लावण्यासाठी ओल्या मिरच्या आणि खोबऱ्याची चटणीही त्यांनी वाटून घेतली. मदत करण्यास उत्सुक असलेल्या माईसाहेबांना देखील त्यांनी कशालाही हात लावू दिला नाही. उलट, “पाहा, तुम्हा स्त्रियांना देखील असा स्वयंपाक करता येईल का, अशी शंका वाटते,” असं माईसाहेबांना चिडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वांनीच जेवत असताना बाबासाहेबांच्या पाककलेची मनापासून तारीफ केली. बाबासाहेबांचे पत्रकार मित्र श्रीकृष्ण तर आश्चर्यचकितच झाले. “तुमच्या हातचा स्वयंपाक जेवल्याने मी आज खरोखरीच धन्य झालो,” असे उद्गार त्यांनी काढले. इतरांच्या मनात देखील बाबासाहेबांविषयी तीच भावना जागली होती.

स्वतः स्वयंपाक करून इतरांना जेवू घालण्यात बाबासाहेबांना एक प्रकारचा विलक्षण आनंद मिळत असे. केवळ बळवंतरावांनाच नव्हे, तर त्यांचे सुपुत्र भालचंद्र यांनाही त्यांनी आपल्या हातचे जेवण खाऊ घातले. त्याचा किस्सा स्वतः भालचंद्र वराळे यांनीच कथन केला आहे. बळवंतराव आणि भालचंद्र हे औरंमगाबादेत छावणी येथे राहात असताना बाबासाहेब काहीच अंतरावरील कुकरी हाऊसमध्ये राहात होते. कॉलेजचा आणि झोपण्याचा वेळ सोडला तर भालचंद्र इतर वेळी बाबासाहेबांजवळच असत. त्यांच्यासोबतच जेवत. त्यावेळी बाबासाहेबांच्या असे लक्षात आले की, भालचंद्र यांना मांसाहार आवडत नाही. तेव्हा त्यांना गोड पदार्थ आवडत असावेत, असा कयास बाबासाहेबांनी लावला. तो बरोबर होता. तेव्हा भालचंद्रना ते म्हणाले, “येत्या रविवारी मी तुला स्वतः खीर करून खायला देईन.” त्यावेळी बाबासाहेब नुकतेच रंगूनला जागतिक बौद्ध परिषदेसाठी जाऊन आले होते. तेथे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या खास भोजन समारंभात ब्रह्मदेशाची खास अशी गोड खीर होती. ती त्यांना खूपच आवडल्याने ती कोणत्या पद्धतीने केली, त्यात काय काय घातले, याची बाबासाहेबांनी माहिती घेतली. तशीच खीर करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार रविवारी आवरुन सकाळी सकाळीच ते स्वयंपाकघरात दाखल झाले. दूधवाल्याकडून दोन शेर दूध जादाचे घेतले होते. नोकर सुदामाला बाहेर काढून स्वतः बाबासाहेब एका फोल्डींग खुर्चीवर हाफ शर्ट व लुंगी गुंडाळून बसले होते. समोर शेगडीवर दुधाचे पातेले, आजूबाजूला साखर, किसमिस, काजू आणि इतर अनेक पदार्थ होते. बाबासाहेब हातातल्या पळीने दूध हलवित होते.  भालचंद्रना पाहून म्हणाले, ‘अरे आलास. ये. पाहा तुझ्यासाठी मी खीर करीत आहे.’ बाबासाहेबांसारखा महापुरूष आपल्यासाठी खीर करीत असल्याचे पाहून भालचंद्र ओशाळल्यागत झाले. ते म्हणाले, “बाबा, आपण निष्कारण त्रास करून घेताहात. आपण स्वतः हे करण्याऐवजी सुदामाला सांगितले असते, तर त्याने केले असते.” त्यावर बाबासाहेब म्हणाले, “अरे, मला तुला ही खीर करून खाऊ घालायची होती. तेव्हा मी सुदामाला कशाला सांगेन?” त्यानंतर बाबासाहेबांनी माईसाहेबांसह सर्वांना ही खीर खाऊ घातली. ती खीर प्रमाणापेक्षा अधिक गोड झाली होती, मात्र साक्षात बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेली असल्याने भालचंद्रनी दोन वाट्या खीर खाल्ली.

ज्या विषयाला हात घालावयाचे, त्यात प्रावीण्य मिळवायचे, अशा प्रकारचा विद्यार्थीबाणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये होता. पाककलेसारख्या कौशल्याधिष्ठित शास्त्रामध्येही त्यांनी असे प्रयोगशील नैपुण्य प्राप्त केले होते. जेव्हा कधी वेळ मिळेल, त्या वेळी आपले आप्तजन, मित्र परिवार यांना विविध प्रकारचे पदार्थ करून घालण्यामध्ये त्यांना आगळे समाधान लाभत असे. या महामानवाचे वेगळेपण अधोरेखित करणारी ही बाब आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा