गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

बाबूराव बागुल यांच्या साहित्यात माणसांना जोडण्याचे सामर्थ्य: प्रा. जी.के. ऐनापुरे

 

साहित्यिक बाबूराव बागुल विचारमंचतर्फे कोल्हापूर येथे ज्येष्ठ समीक्षक प्रा. जी.के. ऐनापुरे यांना पहिला 'बाबूराव बागुल स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे आणि प्रा. शोभा बागुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शेजारी प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार.

बाबूराव बागुल पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रा. जी.के. ऐनापुरे. मंचावर (डावीकडून) प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे आणि प्रा. शोभा बागुल.

बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांच्या संपादित 'सूर्याचे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे. मंचावर (डावीकडून) प्रा. नितीश सावंत, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, प्रा. जी.के. ऐनापुरे, प्रा. शोभा बागुल, डॉ. आलोक जत्राटकर.

बागुल यांच्या असंग्रहित कथांचे संपादित सूर्याचे सांगाती प्रकाशित

कोल्हापूर, दि. २४ फेब्रुवारी: माणसांना जोडण्याचे नैसर्गिक सामर्थ्य बाबूराव बागुल यांच्या साहित्यामध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. जी.के. ऐनापुरे यांनी काल येथे केले.

साहित्यिक बाबूराव बागुल विचारमंच, नाशिक आणि कोल्हापूर येथील बाबूराव बागुल साहित्यप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने बागुल यांच्या असंग्रहित कथांच्या संपादित सूर्याचे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक उत्तम कांबळे होते, तर प्रा. शोभा बागुल प्रमुख उपस्थित होत्या.

प्रा. ऐनापुरे म्हणाले, बाबूराव बागुल म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाण्याचे तिकीट नैसर्गिकरित्या असणारे अर्थात माणसांना, त्यांच्या माणूसपणाला परस्परांशी जोडण्याचे सामर्थ्य असणारे साहित्यिक होते. बागुलांची कथा ही चळवळीच्या दबावाखाली लिहीलेली नाही, तर तिच्यात मानवी स्वातंत्र्यासाठीचा एक स्वतंत्र असा हुंकार होता. बागुलांच्या विस्थापित असण्याचा परिणाम त्यांच्या समग्र साहित्यव्यवहारावर दिसून येतो. त्यात अंतर्भूत सूत्र अगदी पक्के होते. त्याचप्रमाणे मार्क्सवादाचे व आंबेडकरवादाचे नेमके आकलन असल्यामुळेच बागुलांचे साहित्य मध्यवर्ती प्रवाहाला जाऊन थेट भिडते.

हा पुस्तक प्रकाशन समारंभ म्हणजे बाबूराव बागुल यांना मरणोत्तर वाहिलेली उच्च दर्जाची आदरांजली असल्याचे सांगून उत्तम कांबळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, या निमित्ताने बागुलांच्या असंग्रहित कथांचे संकलन-संपादन झाले आहे. याचप्रमाणे त्यांच्या असंग्रहित कविता, कादंबऱ्या, अन्य लेखन, भाषणे आदी साहित्याचेही संपादन व्हावे आणि अंतिमतः त्यांचे समग्र साहित्य एकत्रित प्रकाशित होण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक-राजकीय दबाव निर्माण होण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. बाबूरावांच्या साहित्याला उत्तम दर्जाचा समीक्षक लाभला असता, तर त्यांचे साहित्य केव्हाच वैश्विक झाले असते, इतका त्याचा दर्जा उच्च स्वरुपाचा होता, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महान साहित्यिकाच्या साहित्याचे संपादन कशा पद्धतीने करायला हवे, याचा उत्तम वस्तुपाठ या संग्रहाच्या निमित्ताने प्रा. ऐनापुरे यांनी निर्माण केला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी बागुल यांच्या कन्या प्रा. शोभा बागुल यांनी बागुलांची वेदाआधी तू होतास ही कविता सादर केली, त्याचप्रमाणे आपल्याला वडिलांकडून आईचे वात्सल्य कसे लाभले, याच्या आठवणीही सांगितल्या.

या कार्यक्रमात प्रा. जी.के. ऐनापुरे यांना पहिला बाबूराव बागुल स्मृती पुरस्कार प्रा. बागुल आणि श्री. कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी स्वागत केले, डॉ. नितीश सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. दुर्योधन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. आलोक जत्राटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. रविंद्र श्रावस्ती, संजय पाटोळे, शिवाजी पाटील, डॉ. विनोद कांबळे, डॉ. सर्जेराव पद्माकर, डॉ. संभाजी बिरांजे, सिद्धार्थ कांबळे, दादासाहेब तांदळे आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा