गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

संस्कृत भाषा आणि संस्कृत पत्रकारिता

भारतातील एकमेव संस्कृत दैनिक 'सुधर्मा'

(देशभरात आज संस्कृत भाषा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने या भाषेविषयी आणि संस्कृत पत्रकारितेविषयी संक्षिप्त माहिती देणारा लेख माझ्या वाचकांसाठी सादर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर) 

संस्कृत भाषा, तिचे वैभव आणि संवर्धन या दृष्टीने सदर लेखामध्ये काही चिंतन करण्याचा प्रयत्न आहे. संस्कृत भाषेच्या अनुषंगाने या भाषेशी मला जोडणाऱ्या माझ्या तमाम गुरूंना कृतज्ञतापूर्वक नमन करण्याची संधी घेणे उचित आहे. त्या निमित्ताने संस्कृत भाषेसाठी माझ्या गुरूंनी घेतलेल्या कष्टांची जाणीवही आपल्याला होईल.

माझा संस्कृत शिक्षणाचा पहिला श्लोक-

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः

निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा

हा शिकविला तो कागलच्या मुजुमदार मॅडमनी!

आयु. पुष्पा मुजुमदार मॅडम या निपाणीच्या देवचंद महाविद्यालयात प्राध्यापक होत्या आणि त्या कागलमध्ये राहायच्या. त्यांनी सायंकाळच्या सत्रात कागलमध्ये त्यांच्या घरी गावातील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांना मोफत संस्कृत सुभाषिते शिकविण्याचे ठरविले. तेव्हा मी पाचवीत होतो. आम्ही साधारण तीसेक मुलं-मुली रोज सायंकाळी मुजुमदार वाड्यात जमायचो. साधारण तासभर वर्ग चालायचा. दररोज पाच सुभाषिते त्यांच्या अर्थांसह पाठ करायची. तीनेक महिने त्यांनी हा वर्ग घेतला. त्या काळात संपूर्ण सुभाषितमाला मला पाठ झालेली.

यातूनच मग प्रेरणा जागृत झाली आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रि-एलिमेंटरी संस्कृत परीक्षेला बसलो. त्यावेळीही कागलच्याच सुधा कुलकर्णी यांच्याकडे अभ्यासाला जायचो. सुधाबाई अत्यंत प्रेमाने शिकवायच्या. ही परीक्षा देखील मी उत्तीर्ण झालो.

पुढं नववीला निपाणीच्या मोहनलाल दोशी विद्यालयात प्रवेश घेतला. तिथं संस्कृत विषय आठवीपासून होता. पण माझ्या पूर्वीच्या कागलच्या यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये संस्कृत विषय नसल्याने माझा हिंदी विषय होता. इथे संस्कृत आहे म्हटल्यावर पूर्ण शंभर गुणांचे संस्कृत शिकायची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. पण मागील वर्षी काहीच न शिकल्याने हिंदी-संस्कृत असा प्रत्येकी ५० गुणांचा जोडविषय घेतला.

माझी ही संस्कृतची ओढ लक्षात आल्याने तिथे संस्कृत शिकविणाऱ्या जेपीके तथा ज्योती प्रकाश कुलकर्णी मॅडमनी माझे आठवीचे संस्कृत करवून घेण्याचे ठरविले. रोज सायंकाळी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जायचो. स्वयंपाकपाणी करता करता त्यांनी मला मोफत संस्कृत शिकविले, व्याकरणाचा पाया पक्का करून घेतला. दोनेक महिन्यांत त्यांनी मला इतरांच्या बरोबरीने आणून ठेवले. पुढेही दहावीपर्यंत आम्ही किती तरी मुलं त्यांच्या घरी शिकायला जायचो. पण, मॅडमनी कधी आमच्याकडून एक पैसाही शुल्क घेतले नाही. इतक्या निरलसपणाने त्यांनी संस्कृत भाषेची सेवा केली.

पुढं देवचंद महाविद्यालयात मात्र मी बारावीपर्यंत पूर्ण संस्कृत (१०० गुण) विषय घेतला. आर.एन. कुलकर्णी नावाचा बापमाणूस आम्हाला शिकवायचा. अत्यंत प्रेमळ न् अत्यंत प्रांजळ अशा आरएनके सरांमुळे संस्कृतमधले विविध प्रकारचे चांगले साहित्य वाचायला मी प्रवृत्त झालो. संस्कृतमुळे माणसामध्ये किती पराकोटीची सुसंस्कृतता येऊ शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझे हे गुरू. या सर्व गुरूंना या निमित्ताने मनापासून अभिवादन करणे अगत्याचे आहे.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्।।

हा अनुष्ठुभ छंदातला श्लोक आहे आणि याचे संस्कृतमधील महत्त्व मी जाणकारांना सांगण्याचे खरे तर कारण नाही. प्रणयात मग्न झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीतील नराला पारधी मारतो आणि क्रौंच मादीची शोकविव्हलता पाहून महर्षी वाल्मिकींच्या तोंडून सर्वप्रथम उमटलेली ही सौंदर्यशाली शापवाणी- हे दुष्टा, तू प्रेमाराधनेत मग्न झालेल्या क्रौंचाला मारलं आहेस. जा, तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही आणि वियोगाचं दुःख तुलाही झेलावं लागेल.

या शापवाणीचे पुढे काय झाले असेल ते असो; पण, या भारताला एक महाकवी मात्र त्या काळी मिळाला होता. त्यानंतरच वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. त्यातील बहुतांश रचना या अनुष्ठुभ छंदातीलच आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

रामायणाबरोबरच महाभारत हे महाकाव्यही याच दृष्टीने महत्त्वाचे. व्यासोच्छिष्टम् जगत्सर्वम् असे त्याचे सार्थ वर्णन केले जाते. ही केवळ कौरव-पांडवांच्या जय-पराजयाची गाथा नाही; तर, एकूणच मानवी प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, प्रकृती याचे सर्वंकष सार महाभारतात आहे. इथे नाही, ते कुठेच नाही, ही महाभारताची महती आजच्या कलियुगालाही लागू पडेल अशीच.

व्यासांनी अवघ्या ८८०० श्लोकांचे जय नावाचे काव्य रचले. त्यात त्यांचा शिष्य वैशंपायनाने जनमेजयाच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल सांगितलेल्या कथा, वृत्तांतांची भर घातल्याने ते २४ हजार श्लोकांपर्यंत विस्तारले. भारतवंशाची गोष्ट म्हणून त्याला भारत नाव मिळाले. पुढे सौतीने नैमिषारण्यात चाललेल्या यज्ञसत्रादरम्यान ही कथा ऐकविताना त्यात कालानुरुप काही गोष्टींची भर घातली आणि कथा एक लक्ष श्लोकांची झाली. ही सविस्तर भारत कथा म्हणजेच महाभारत होय. कृष्णधवलबरोबरच करड्या रंगांतील विविध व्यक्तींचे, पात्रांचे यथार्थ चित्रण हे महाभारताचे वैशिष्ट्य. आजही भारतातील हिंदीसह अनेक चित्रपटांच्या कथा या रामायण, महाभारतापासून प्रेरित असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

संस्कृतचे प्राचीनत्व:

संस्कृत ही आर्यांबरोबर भारतात आली असे मानल्यास, तत्पूर्वी द्रविड भाषाकुलातील भाषा इथे अस्तित्वात होत्याच. अशा १६१ भाषा आहेत. या स्थानिक भाषिकांशी आदानप्रदान व्यवहार करण्यासाठी निवडक लोकांना आर्यांनी संस्कृत शिकविले. हे ज्ञानी लोक परस्परांशी भाषाव्यवहार करू लागले. म्हणजे व्यवहारात लोकांची भाषा बोलीभाषाच राहिली आणि संस्कृत ही त्या लोकसमूहांना जोडणारी ज्ञानभाषा म्हणून अखिल भारतीय भाषा बनली.

वेदांपासून पुराणांपर्यंतच्या सर्व वैदिक धर्मग्रंथांची भाषा संस्कृत होती. वैदिक धर्माविरुद्ध बंड करून उदयास आलेल्या बौद्ध व जैन धर्मांनी धर्मग्रंथ व धर्मप्रसार यांसाठी अनुक्रमे पाली व अर्धमागधी या लोकभाषांचा स्वीकार व अंगिकार केला. मात्र, पुढे पहिल्या शतकापासून बौद्ध धर्मातील महायान पंथाने संस्कृतचा स्वीकार केला. अश्वघोषाने बुद्धचरितम् हे पुस्तक संस्कृतमध्ये लिहीले. त्रिपिटकासह अनेक बौद्ध ग्रंथांचे संस्कृतमध्ये भाषांतर झाले. जैनांनीही धर्मग्रंथासाठी संस्कृत स्वीकारले. तत्त्वार्थसूत्र हा त्यांचा संस्कृत ग्रंथ सुप्रसिद्ध आहे.

भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी युरोपीय पंडितांनीही संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. जर्मन पंडितांनी अनेक संस्कृत ग्रंथांची जर्मन भाषांतरे केली. पाणिनीच्या व्याकरणाचेही इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंचमध्ये भाषांतर झाले. वॉरन हेस्टींग यांच्या काळापासून संस्कृत ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे सुरू झाली. यातला पहिला भाषांतरित ग्रंथ म्हणजे भगवद्गीता होय. (१७७५) ब्रिटीश सरकारने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतीय ग्रंथांची सूची तयार केली. त्यानुसार त्यांना सुमारे दहा हजार संस्कृत ग्रंथांची हस्तलिखिते आढळून आल्याची नोंद आहे.

जर्मन पंडित मॅक्समुल्लर याने संस्कृत भाषा जर्मनीशी जोडण्यात फार मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या मते, आज कदाचित संस्कृत मृत भाषा असली तरी भारतातील आजच्या सर्व आर्य व द्रविड भाषांचा जन्म व प्राण संस्कृत हाच आहे. मॅक्समुल्लरचे हे विधान महत्त्वाचे आहे. पंडित नेहरूसुद्धा म्हणाले होते की, भारताची सर्वात मोठी दौलत कोणती, सर्वात मोलाचा वारसा कोणता, असे जर कोणी मला विचारले तर मी ठामपणे उत्तर देईन की, ते आहे संस्कृत भाषा आणि वाङ्मय.

संस्कृत पत्रकारिता:

 इयम् आकाशवाणी। संप्रति वार्ताः श्रुयन्ताम्। प्रवाचकः बलदेवानन्दसागरः।

सन १९७४ पासून आकाशवाणीवरुन आपल्या सर्वांची सकाळ संस्कृतमय करीत असलेल्या डॉ. बलदेवानन्नद सागर यांनी संस्कृत पत्रकारितेच्या इतिहासाचा अतिशय उत्तम वेध घेतला आहे.

दि. १ जून १८६६ रोजी काशीहून प्रकाशित झालेले काशीविद्या सुधानिधीः अगर पण्डितपत्रिका हे पहिले संस्कृत वृत्तपत्र होय. सव्हर्नमेंट संस्कृत महाविद्यालयाच्या मार्फत ते प्रकाशित करण्यात येत असे. १८६७ मध्ये काशीहूनच क्रमनंदिनी वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाले. मात्र या दोन्ही वृत्तपत्रांतून प्काचीन संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन करीत असत. आजच्या वृत्तपत्रासारखे त्यांचे स्वरुप नव्हते. त्यामुळे सन १८७२मध्ये लाहोरहून प्रकाशित होऊ लागलेले हृषीकेश भट्टाचार्य यांचे विद्योदयः हे त्या अर्थाने पहिले संस्कृत वृत्तपत्र ठरते. त्यानंतर लगेचच पाटणा (बिहार) येथून विद्यार्थी हे वृत्तपत्र १८८० पासून निघू लागले.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत अनेक संस्कृत पत्रिका निघाल्या. राष्ट्रीय आंदोलनाच्या दृष्टीने त्यातील संस्कृत चंद्रिका आणि सहृदया या दोन पत्रिकांचे स्थान महत्त्वाचे आहे. ही दोन्ही पत्रे कलकत्त्याहून प्रकाशित होत.

याठिकाणी आपणा कोल्हापूरकरांच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची बाब अशी की, संस्कृत चंद्रिका ही पत्रिका कलकत्त्यानंतर थेट कोल्हापुरातून प्रकाशित होऊ लागली आणि त्याचे संपादक होते अप्पाशास्त्री सदाशिवशास्त्री राशिवडेकर.

हे नाव वाचल्यानंतर मी आनंदाने उडालोच. कोणी द्विवेदी, त्रिवेदी असते, तर मन साशंक झाले असते. पण थेट राशिवडेकर आडनावामुळे माणूस पक्का कोल्हापूरचाच, याची खात्री पटते. या अप्पाशास्त्रींच्या संपादकत्वाखाली संस्कृतचंद्रिकेने खूप मोठी लोकप्रियता मिळविली. अप्पाशास्त्री यातून प्रखर राजकीय लेख लिहीत असत. त्यामुळे ब्रिटीशांच्या जेलमध्ये त्यांचे सातत्याने जाणे-येणे सुरू असायचे.

या अप्पाशास्त्रींची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता २ नोव्हेंबर १८७३ ते २५ ऑक्टोबर १९१३ असा त्यांचा जीवनकाल असल्याचे समजले. संस्कृतचंद्रिकेच्या बरोबरीनेच त्यांनी सनृतवादिनी या वृत्तपत्राचेही प्रकाशन केल्याचा उल्लेख आढळतो. हिंदी पत्रकारितेत महावीर प्रसाद द्विवेदी यांनी जे काम केले, त्या तोडीचे काम संस्कृत पत्रकारितेत अप्पाशास्त्रींनी केल्याचे गौरवपूर्ण उल्लेख आढळतात. क्रांतदर्शी कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. ऋतुचित्रम् या त्यांच्या कवितेची तुलना ऋतुसंहाराशी केली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या पञ्जरबद्धाः शुकः,वल्लभविलापः, मल्लिकाकुसुमम् या कविताही चिरस्मरणीय असल्याचा उल्लेख आढळतो.

स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडात आनंदपत्रिका (१९२३), गीर्वाण (१९२४), शारदा (१९२४), श्रीः (१९३१), उषा (१९३४), संस्कृत-ग्रंथमाला (१९३६), भारतश्रीः (१९४०) आदी नियतकालिके प्रकाशित झाली. कानपूरहून श्री. केदारनाथ शर्मा यांचे मासिक संस्कृत-रत्नाकरः (१९३८) आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे त्रैमासिक गंगानाथ झा रिसर्च जर्नल (१९४१) इत्यादी प्रकाशित होऊ लागली.

स्वातंत्र्योत्तर कालखंडातही ब्राह्मणमहासंमेलनम् (१९४८), गुरूकुलपत्रिका (१९४८), भारती (१९५०), संस्कृत-भवितव्यम् (१९५२), दिव्यज्योतिः (१९५६), शारदा (१९५९), विश्व संस्कृतम् (१९६३), संविद् (१९६५), गाण्डीवम् (१९६६), सुप्रभातम् (१९७६), संस्कृतश्रीः (१९७६), प्रभातम् (१९८०), लोकसंस्कृतम् (१९८३), व्रजगन्धा (१९८८), श्यामला (१९८९) इत्यादी वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली.

१९७० साली संस्कृत पत्रकारितेच्या क्षेत्रात ऐतिहासिक घटना घडली. म्हैसूरचे संस्कृत विद्वान, गीर्वाणवाणीभूषण पंडित के.एन. वरदराजय्याचार्य यांनी सुधर्मा हे संस्कृत दैनिक सुरू केले. आज अनेक आव्हानांचा सामना करीत सुधर्मा सुवर्णमहोत्सवाच्या टप्प्यावर आहे. त्याची ऑनलाईन आवृत्तीही आज उपलब्ध आहे.

आजघडीला या एकमेव संस्कृत दैनिकाचा खप २००० ते ३००० प्रतींच्या घरात आहे. संस्कृत शिकविणाऱ्या संस्था आणि व्यक्तींपुरताच हा खप मर्यादित आहे. इतरही जर्नलसदृष प्रकाशने, नियतकालिकेही साधारण दीडशेच्या घरात आहेत. मात्र त्यांचा खपही मर्यादित आहे.

तुम्हाला हे ऐकून सुखद आश्चर्याचा धक्का बसेल की, पॉण्डिचेरीहून डॉ. सम्पदानन्द मिश्र हे www.divyavanee.in या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून संस्कृत कार्यक्रमांचे २४X७ ऑनलाईन प्रसारण करीत आहेत. तिरुअनंतरपुरम् येथील जनम् या मल्याळम् वाहिनीवर २ ऑक्टोबर २०१५ पासून १५ मिनिटांचा वेळ संस्कृत बातम्यांसाठी राखून ठेवण्यास सुरवात केली आहे. आमचे नाशिकचे मित्र आणि ऑनलाईन डिक्शनरीकार सुनील खांडबहाले त्यांच्या पोर्टलवरुन ऑनलाईन संस्कृत कम्युनिटी रेडिओ चालवितात.

या पार्श्वभूमीवर, आज सर्व संस्कृतप्रेमींसमोर आव्हान आहे ते या भाषेच्या प्रसाराचे व संवर्धनाचे! एके काळी ज्ञानभाषा असणारी संस्कृत ही तिच्या अभिजाततेसाठी ओळखली जात असे. भाषा वृद्धिंगत व्हायची असेल तर ती ज्ञानभाषा, प्रमाणभाषा आणि बोलीभाषा या त्रिस्तरापैकी किमान एका स्तरावर अविचल असली पाहिजे. आज संस्कृत पूर्ण सक्षम असूनही यापैकी कुठेही नाही, याचे कारण म्हणजे आपण शालेय अभ्यासक्रमात तिची केवळ गुणांशी घातलेली सांगड होय. दहावी, बारावीपर्यंत गुण मिळवून देणारा विषय म्हणून तो अभ्यासात घेणे आणि स्कोअरिंग झाले की सोडून देणे, यापायी गुणाढ्य संस्कृतचे नुकसान झाले आहे. आता तर मराठी विषयालाही तसे भारंभार गुण पडताहेत (नव्हे, दिले जाताहेत!)

त्याऐवजी संस्कृमधील प्रचंड ज्ञानभांडाराचे मार्केटिंग करण्याची आज खरी गरज आहे. संस्कृत ही केवळ मार्कांची भाषा नसून तीच खऱ्या अर्थाने गुणसंस्काराची भाषा आहे, हे आपण नव्या पिढीवर बिंबवायला हवे. ऋग्वेदातल्या ऋचा या द्विअर्थी अगर अनेकार्थी आहेत. असे अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. त्या ग्रंथांच्या संदर्भात सखोल अशा अभ्यासाची, चिंतनाची आणि संशोधनाची गरज आहे. त्यासाठी नव्या पिढीला संस्कृतमधल्या करिअर संधींची माहिती देऊन या संशोधनाकडे वळण्यास प्रवृत्त करायला हवे. मात्र, आपल्यापेक्षा जर्मनीमध्ये संस्कृतच्या अनुषंगाने प्रचंड असे संशोधन सुरू आहे.

आपल्याकडे असे व्हावयाचे असल्यास आपण संस्कृतची सर्वप्रथम रिच्युऍलिझममधून सोडवणूक केली पाहिजे. देववाणी, देवभाषा असे कानावर सारखे पडत असल्यामुळे ते तर देवाचे, त्यात आपला काय संबंध?’ असा सर्वसामान्यांचा सूर असतो. तो स्वाभाविकही आहे. पूर्वी या ज्ञानसंचितापासून आपणच हेतुपुरस्सर बहुजनांना या भाषेपासून दूर ठेवले. त्यामुळे त्यांना तिच्याविषयी आपलेपणा वाटत नाही. हा दुरावा कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. संस्कृतला देवभाषा म्हणणे याचा संबंध प्युरिटीशी अर्थात पावित्र्याशी, शुद्धतेशी आहे. ध्वनीची, वाणीची शुद्धता आणि त्यायोगे मनाची शुद्धता इथे अभिप्रेत आहे, हे आपल्याला नव्याने लोकांपर्यंत नेले पाहिजे.

बहुजनांनी, विशेषतः शूद्रातिशूद्रांनी संस्कृत ऐकणे, वाचणे, बोलणे महापाप समजले जायचे. आता तसे मानण्याचे काहीच प्रयोजन नाही. पण, संस्कृतला आता ब्राह्मणांची भाषा म्हणून सुडाचा सामना करावा लागतोय का, हेही पाहावे लागेल. या गुंत्यातून संस्कृतची सोडवणूक आपल्याला करावी लागेल.

संस्कृत उच्चारांमुळे ही भाषा अवघड आहे, असा समज पसरला आहे. पण, मूलभूत व्याकरण, शब्दसंपदा यांच्या बळावर ती समजून घेणे, अवगत करणे काहीच अवघड नाही. संस्कृत ही सोपी- अतिशय सोपी भाषा आहे, हे लोकांना नव्याने पटवून द्यावे लागेल. लोकांना ती आपली वाटली पाहिजे, या दृष्टीने व्यापक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे.

आजच्या पिढीशी त्यांच्या संवाद साधनांच्या माध्यमातून आपण संवाद साधायला हवा. त्यासाठी समाजमाध्यमांचा मुबलक वापर करायला हवा. एकीकडे संगणकासाठी सर्वाधिक सोपी, सरल भाषा म्हणून संस्कृतचा गौरव करीत असताना आजही गुगलने त्यांच्या ट्रान्सलेटर अॅपमध्ये संस्कृत भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. त्यासाठीही व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे.

एकूणातच संस्कृतला तिचे मूळ वैभव परत मिळवून द्यावयाचे असेल तर, आपल्याला तिची अभिजनवादी मानसिकतेमधून प्रयत्नपूर्वक सुटका करून बहुजनवादी बनविण्यासाठी पराकाष्ठा करण्याची आजघडीला नितांत गरज निर्माण झाली आहे.

अलिकडेच प्रख्यात विचारवंत व ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयी यांचे संस्कृतविषयी अत्यंत परखड मत प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणतात, संस्कृत, पाली, प्राकृत या अभिजात भाषा आहेत. त्यांचे ज्ञान असलेले खूप कमी लोक भारतात आहेत. या भाषांच्या बाबतीत विद्वत्तेच्या अभावाचे मोठे संकट आहे. या भाषांचे विश्वसनीय स्रोत हळूहळू कमी होत आहेत, पण विदेशात अधिक प्रमाणात आहेत.

संस्कृतला स्तुती, चापलुसी, अंधभक्तीची भाषा बनविले जात आहे. ते अज्ञानी आहेत किंवा संस्कृतमधील निर्भयतेचा स्वीकार करू इच्छित नाहीत. संस्कृतमध्ये जेवढी निर्भयता, जिज्ञासा, ज्ञानाच्या विविधतेचा स्वीकार आहे, तो अनेक भाषांमध्ये नाही. वेद वैदिक संस्कृतमध्ये लिहीण्यात आले. संस्कृतची बौद्धिक परंपरा शास्त्रार्थाची होती. नवा विचार मांडण्यासाठी तुम्हाला इतिहास सांगावा लागतो. त्यानंतरच नवी विचारसरणी आणावी लागते. तिला चरणस्पर्शी भाषा करणे हा अन्याय आहे.

मित्र हो, इतर ठिकाणी देव बसवून कोणत्याही कार्याची सुरवात होते. संस्कृतची सुरवात मात्र देव शब्द चालवण्यापासून होते. इतकी व्हायब्रन्सी ज्या भाषेत आहे, त्या भाषेवर प्रेम करणारे आपणासारखे जाणते आहेत, तोपर्यंत ही प्रातःस्मरणीय भाषा टिकणार आहेच. आपण सारे मिळून तिच्या संवर्धनासाठी कृतीशील प्रयत्न करण्यासाठी प्रतिबद्ध होऊ या!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा