रविवार, २९ डिसेंबर, २०२४

दीपस्तंभ साहित्य संमेलनात...

सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनात पार्थ पोळके यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर आणि डॉ. एन.डी. जत्राटकर.

सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनात निवृत्त न्या. अनिल वैद्य यांच्यासमवेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव कांबळे आणि डॉ. आलोक जत्राटकर


दुसऱ्या साहित्य संमेलनाचे विविध वृत्तपत्रांतील वार्तांकन




आजचा दिवस (रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४) सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनामध्ये अतिशय अविस्मरणीय असा ठरला. आमचे मार्गदर्शक डॉ. जगन कराडे आणि त्यांच्या दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या सर्वच सहकाऱ्यांनी दीपस्तंभ साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर बाकी राखली नव्हती. या साहित्य संमेलनामध्ये आंबेडकरी समाजातील युवकांना एकविसाव्या शतकातील सामाजिक, आर्थिक विकासाच्या संधी या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मांडणी करण्याची संधी मला लाभली.

केवळ आंबेडकरी समाजातील युवकच नव्हे, तर एकूणच भारतीय युवकांचं नजीकच्या काळामध्ये शैक्षणिक आणि रोजगार या अनुषंगाने भवितव्य काय असेल, त्यांचं आपल्या भारताच्या पायाभरणीमध्ये, उभारणीमध्ये काय योगदान असेल, हा माझ्या नित्य चिंता आणि चिंतनाचाच विषय. त्या चिंतनाला भरीव स्वरूप देण्याचं, त्याची मांडणी करण्याची ही एक चालून आलेली संधी होती. त्यामुळं विचार करीत असताना मुळात भारतीय युवकांना नजीकच्या २५ वर्षांमध्ये डेमोग्राफिक डिव्हीडंडचा फार मोठ्या प्रमाणात लाभ उठवण्याची संधी आहे, या अनुषंगाने मांडणीची दिशा ठरवली. मग गेल्या पन्नासेक वर्षांमध्ये दक्षिण आशियाई विभागातील ज्या देशांनी डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या बळावर आपली प्रगती करून घेतलेली आहे, अशा देशांची उदाहरणे अभ्यासली. यामध्ये जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि थायलंड यांची उदाहरणे घेतली. या देशांनी, त्यांच्या देशामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड असताना त्याचा लाभ कशा पद्धतीने घेतला, ते पाहिले. आणि त्या अनुषंगानेच भारतामध्ये सुद्धा पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये साधारण २०५६ पर्यंतचा कालावधी असणार आहे. त्या काळामध्ये भारत या गोष्टीचा कसा लाभ घेऊ शकतो, भारतातील युवकांना प्रगतीची कितपत संधी आहे, हे या निमित्ताने अधोरेखित करता येऊ शकलं. मात्र हे करत असताना, या देशांनी जेव्हा त्यांच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा उठविला, तेव्हाचा काळ आणि आजची भारतासमोरील परिस्थिती यामध्ये ठळकपणे फरक करणारा एक फार महत्त्वाचा घटक आत्ता, आजघडीला आपल्यासमोर आहे. घटक म्हणा, आव्हान म्हणा, मात्र ते आपल्यासमोर आहे आणि ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता! भारतीय युवकांना या कालखंडात जी काही रोजगाराची, शिक्षणाची संधी मिळणार आहे, त्यासमोर एक भलं मोठं आव्हान आणि प्रश्नचिन्ह या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उभे राहिलेले आहे. या आव्हानाला भारत कसा सामोरा जातो, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी न जा,ता तिचा उपयोग करून आपल्या देशाची प्रगती कशी साधून घेता येईल, या दृष्टीने जोपर्यंत हा युवक विचार करणार नाही, तोपर्यंत ही प्रगती होईल किंवा नाही, अशी साशंकता या निमित्ताने उभी राहिलेली आहे. तर, या समग्र अंगानं या परिसंवादामध्ये मांडणी करता आली.

महत्त्वाचं म्हणजे आमचे मित्र कुलवीर कांबळे हे सहपरिसंवादक होते तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत पार्थ पोळके हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. पार्थ पोळके यांना मी अनेक कार्यक्रमांमध्ये ऐकले आहे, मात्र, या परिसंवादाच्या निमित्ताने प्रथमच त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. मी केलेली मांडणी ऐकून ते भयचकित झाले. अशा प्रकारची मांडणी आपण प्रथमच ऐकली आणि ती फार महत्त्वाची असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या भाषणाचे लेखात रुपांतर करण्याची जाहीर सूचनाही त्यांनी केली आणि आपण त्याचा पाठपुरावा करीत राहण्याची प्रेमळ धमकी सुद्धा दिली. आपण लिहीत, बोलत राहतो, हे सारे ठीकच, पण या निमित्ताने पोळके सरांसारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वासमवेत मंचावर बसता येणे, त्यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द मिळणे, यापेक्षा माझ्यासारख्या अभ्यासकाला आणखी दुसरे काय बरे हवे असते?

त्याखेरीज, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना ऐकावयास मिळणे, निवृत्त न्या. अनिल वैद्य यांचा परिचय होणे हे सुद्धा महत्त्वाचेच!

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

आळंदीच्या 'रिंगणा'त!

आळंदी येथे रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, संपादक सचिन परब, भागवत महाराज साळुंके, सुप्रसिद्ध लेखक, कवी यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर


डॉ. आलोक जत्राटकर यांना आपली पुस्तके भेट देताना आळंदीचे भागवत महाराज साळुंके

रिंगण वक्तृत्व स्पर्धेचा देखणा मंच

डुडूळगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारी रिंगण वक्तृत्व स्पर्धकांच्या स्वागतासाठी उभारलेली स्वागत कमान

डुडूळगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारी रिंगण वक्तृत्व स्पर्धकांचे स्पर्धास्थळी असे रेड कार्पेट स्वागत होते.





आळंदी येथे काल, रविवारी (दि. १५ डिसेंबर) रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणासाठी उपस्थित राहिलो. सन्मित्र सचिन परब यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे केवळ संत विचार, संत साहित्य याला वाहिलेली अशी ही राज्यातील कदाचित एकमेव वक्तृत्व स्पर्धा असेल.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहणे ही खरं तर कस पाहणारी अशी गोष्ट होती. याचं कारण असं की, मुळात मी तसा काही संत साहित्याचा विशेष अभ्यासक वगैरे नाही; वाचक आहे. मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले स्पर्धक अतिशय तयारीनिशी आलेले असतात आणि आपल्याला जे काही संतांचं वाङ्मय माहिती आहे, त्या पलीकडे सुद्धा आजच्या कंटेम्पररी विषयांच्या अनुषंगाने संत विचारांचे महत्त्व, वेगळेपण आणि प्रस्तुतता या अनुषंगाने ही मुलं अशी काही मांडणी करतात की ऐकत राहावं. म्हणूनच मी म्हटलं की स्पर्धकांपेक्षाही परीक्षकांचा कस पाहणारी ही स्पर्धा होती. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजघडीला राज्यभरामध्ये जेवढेही वक्तृत्व स्पर्धेमधील दिग्गज असे स्पर्धक आहेत, ते जवळजवळ सगळेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. इतक्या तयारीच्या मुलांचं परीक्षण करणे हा आणखी एक वेगळा असा कस बघणारा भाग होता.
ही स्पर्धा उत्तम पद्धतीने आयोजित केली जातेच कारण परब सर अर्थात रिंगण प्रकाशन, मुंबई आणि आळंदीतल्या डुडूळगाव इथले श्री गजानन महाराज शिक्षण प्रसार मंडळ, ओतूर यांच्या शरदचंद्र पवार कला, वाणिज्य महाविद्यालय यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये, तिच्या देखणेपणामध्ये कुठेही काही कसर राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतलेली होती. त्यामुळे अत्यंत नेटके आयोजन आणि एकूणच वातावरणनिर्मिती यामुळे स्पर्धा ही प्रेक्षणीय सुद्धा झाली. म्हणजे श्रवणीय असण्याबरोबरच प्रेक्षणीयता आणि अनुभूतीशीलता हाही यामधील फार महत्त्वाचा भाग होता. येणाऱ्या स्पर्धकांच्या चहापानापासून ते दुपारचे जेवण आणि संध्याकाळच्या चहापानापर्यंत सगळी व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आलेली होती. राज्यभरातून दीडशेहून अधिक स्पर्धकांची नोंदणी आणि ८० हून अधिक स्पर्धकांचा प्रत्यक्ष सहभाग हे या स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. माझे सहपरीक्षक भागवत महाराज साळुंके यांच्याशीही या निमित्ताने नवस्नेह प्रस्थापित झाला. त्यांनी त्यांचे पुस्तक आणि दिवाळी अंक अत्यंत प्रेमपूर्वक मला भेट दिले. आळंदीमध्ये एक नवे जिव्हाळ्याचे ठिकाण मिळाले. सोबत प्रवीण, वैभव अशी पुणे वक्तृत्व वाद मंडळाची मित्रमंडळी या देखण्या आयोजनाचे नेपथ्य सांभाळायला होतीच. त्यांचा सहवास ही सुद्धा माझ्यासाठी सदैव हवीहवीशीच बाब असते.
या स्पर्धेचा समारोप समारंभ सुद्धा अप्रतिम अविस्मरणीय असा झाला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी सुप्रसिद्ध लेखक, कवी अरविंद जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एरवी अरविंद जगताप यांना आपण शब्दांमधून वाचतो; पण प्रत्यक्ष ऐकत असताना जगताप सरांना त्यांच्या पॉझेसमधून ऐकणं हा सुद्धा एक अविस्मरणीय असा अनुभव होता, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यांच्या दोन शब्दांमधला, मुद्दामहून थोडा अधिक लांबवलेला पॉझ हा विक्रम गोखलेंपेक्षा सुद्धा अधिक उत्तम आणि दमदारपणे अनेक गोष्टी ध्वनीत करत होता. सलाम आहे या माणसाला! अरविंद जगताप यांना अशा पद्धतीने ऐकणं हा सुद्धा एक आगळ्या वक्तृत्वाचा पथदर्शी नमुनाच ठरला.
या स्पर्धेच्या निमित्ताने मला देहूला जाता आलं, तुकोबारायांचं दर्शन घेता आलं, आळंदीमध्ये माऊलींचे दर्शन घेता आलं आणि त्या दर्शनाबरोबर आमच्या या दैवतांना नवबडव्यांनी कसे घेरले आहे किंवा पुढे आणखी ही पकड कशी मजबूत होत जाणार आहे, याचं सुद्धा एक दर्शन या निमित्ताने घडलं. हे होतच राहणार आहे. त्याला आपण काही करू शकत नाही, याचेही एक वेगळे शल्य मनाला बोचत राहिले. अतिशय बेमालून पद्धतीने हा सगळा पगडा बहुजनांच्या डोक्यावर बसविण्यात येत आहे. म्हणजे ज्या गोष्टींच्या विरोधात तुकोबांनी बंड पुकारले, ज्ञानराजांनी समाधी घेतली, तीच व्यवस्था त्यांच्याभोवतीचे आपले पाश घट्ट करत असताना दिसते आणि त्याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना, भाविकांना वेगळ्या पद्धतीने हा भागवत धर्म सांगण्याचे एक वेगळेच षडयंत्र या निमित्ताने पाहता आले. हे होत राहणार, त्याला पर्याय नाही. पुढच्या वेळी मी जाईन त्यावेळी कदाचित यापेक्षाही अधिक वेगळे चित्र मला दिसू शकेल; मात्र सध्या जे दिसलं ते असं!
रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने या सगळ्याच गोष्टींचा दर्शन घेण्याची संधी मिळाली. मित्रवर्य सचिन परब आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दोन दिवस घालवता आले, याचा एक वेगळा आनंद आहे. त्याचबरोबर राज्यभरातले जे तयारीचे स्पर्धक होते, त्यांना ऐकणं, प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळाली, ही त्यातली जमेची बाजू. त्या दृष्टीनेही रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

लीडरशीप मॅटर्स...

(छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सव समारंभात साक्षात मा. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडून जाहीर कौतुकोद्गार)

(शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची रंजक माहिती)



(छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची माहिती देणारी रील)


माहितीपुस्तिकेचे मुखपृष्ठ


शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडून विशेष प्रशंसापत्र

शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बजावलेल्या कामगिरीबद्दल डॉ. आलोक जत्राटकर यांना प्रशंसापत्र प्रदान करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. वैभव ढेरे.

सहकाऱ्यांकडूनही कौतुक: शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देताना सौ. विभा अंत्रेडी. सोबत (डावीकडून) डॉ. वैभव ढेरे, धैर्यशील यादव, अभिजीत रेडेकर, सौ. अनुष्का कदम आणि गजानन पळसे






शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा सुवर्णमहोत्सव नुकताच ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२४ रोजी विद्यापीठ प्रशासनासह समस्त विद्यापीठप्रेमींनी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा केला. विद्यापीठानं या पुतळ्याचे शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या सर्व म्हणजे नऊ मुलींना त्यांच्या कुटुंबियांसह सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचा शाल, श्रीफळ आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन सत्कारही केला. या कार्यक्रमात या पुतळ्याची समग्र माहिती देणारी सुवर्णमहोत्सव विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची पुस्तिका, पुतळ्याविषयीचे रील आणि माहितीपट हे मी तयार केले आणि ते इथं माझ्या वॉलवर शेअरही केले आहेत. हे मी केलं, हे सांगण्यासाठी लिहीत नाहीय; तर, ते करण्यासाठी पाठीवर हात ठेवणाऱ्या वरिष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा आहे. पुतळ्याची माहितीपुस्तिका अगर माहितीचा फलक उभारण्याची संकल्पना मा. कुलगुरूंशी चर्चा करताना मला सुचली नक्कीच होती, मात्र या कल्पनेला उचलून धरीत पाठिंबा देणारं नेतृत्व त्यांच्या ठायी असल्यामुळं या गोष्टी तडीस जाऊ शकल्या. माहिती संकलन, संपादन या सर्व बाबींचं स्वातंत्र्य आणि मोकळीक त्यांच्याकडून लाभली. त्यामुळंच कागदावर कुठेही कसलाही आदेश नसताना केवळ शिवछत्रपतींवरील निष्ठा आणि प्रांगणातील त्यांच्या पुतळ्याविषयी असणारं ममत्व या दोन बाबींमुळं पुतळा सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम अगदी यथासांग आणि देखणेपणानं पार पडला. साऱ्यांचा उत्साह आणि मनासारख्या घडून आलेल्या सर्व गोष्टी यामुळं एक आगळं समाधान लाभलेलं होतंच. तशात मा. कुलगुरूंनी या कार्यक्रमात या साऱ्या करण्याचं जाहीर कौतुक केलं, ही बाब आनंददायी खरीच, पण संकोचून टाकणारी अधिक होती. कुलगुरू म्हणूनच नव्हे, पण डॉ. शिर्के सरांचा स्वभाव हा मुळी थेट आणि प्रांजळ आहे. त्या निर्मळपणातूनच त्यांचं हे सहजकौतुक माझ्या वाट्याला आलं. त्यामुळं उपस्थितांनीही सरांनी घेतलेल्या नोंदीवरून अभिनंदन केलं. फुलटाईम इलेक्शन ड्युटी असतानाही कार्यालयीन काम सांभाळून त्या पलिकडं केवळ प्रेमभावनेतून केलेल्या कामाचं इतकं कौतुक वाट्याला येणं हीच सुखावून टाकणारी बाब होती खरं तर... पण... काल सायंकाळी ऑफिस अवर संपता संपता मा. कुलगुरू सरांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून मा. प्र-कुलगुरू, कुलसचिव, डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. वैभव ढेरे या सन्मित्रांच्या साक्षीनं अभिनंदनाचं पत्र देऊन पुनश्च एकदा कौतुकाचा वर्षाव केला की ज्यानं गहिवरुनच आलं. अजिबातच अपेक्षा नव्हती अशी काही, मात्र सरांनी ते घडवून आणलं. निरपेक्षभावानं केलेल्या कार्याची ती वरिष्ठांनी दिलेली महत्त्वाची पोचपावतीच जणू. या गौरवाबद्दल या साऱ्यांप्रती पुनश्च एकवार जाहीर कृतज्ञता व्यक्त करून हा गौरवही पुन्हा महाराजांच्या चरणी अर्पण करतो.
आज त्यापुढची कडी माझ्या तमाम सहकाऱ्यांनी जोडली. (डॉ. ढेरेच त्यामागे असणार, याची खात्री आहेच). या सर्व मंडळींनी आज एकत्र येऊन शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन अभिनंदनप्रेमाचा इतका वर्षाव केला की त्यानं भारावून गेलो. एकीकडं कामावरील प्रेमाचं कौतुक करत असतानाच जबाबदारीची जाणीवही मनी दृढतर होण्यामध्येच या साऱ्याचं रुपांतर झालेलं आहे. अंगिकृत कामाशी आजवर कधी प्रतारणा केली नाही, येथून पुढंही होऊ देणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो... बाकी आपणा सर्वांचं प्रेम हे असंच अखंडित राहो... चांगलं काम करण्याची, सकारात्मकता अबाधित राहण्याची प्रेरणा त्यातून मिळत राहो, हीच काय ती अपेक्षा!
आमचा 'हक्काचा माणूस' मित्रवर्य जगदीश गुरव यांनी कुलगुरू महोदयांच्या कौतुकोद्गाराचा व्हिडिओ अतिशय प्रेमानं पाठवला, त्यांनाही धन्यवाद देणे अगत्याचे आहे.