रविवार, २९ डिसेंबर, २०२४

दीपस्तंभ साहित्य संमेलनात...

सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनात पार्थ पोळके यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर आणि डॉ. एन.डी. जत्राटकर.

सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनात निवृत्त न्या. अनिल वैद्य यांच्यासमवेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव कांबळे आणि डॉ. आलोक जत्राटकर


दुसऱ्या साहित्य संमेलनाचे विविध वृत्तपत्रांतील वार्तांकन




आजचा दिवस (रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४) सांगली येथे दुसऱ्या दीपस्तंभ साहित्य संमेलनामध्ये अतिशय अविस्मरणीय असा ठरला. आमचे मार्गदर्शक डॉ. जगन कराडे आणि त्यांच्या दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या सर्वच सहकाऱ्यांनी दीपस्तंभ साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर बाकी राखली नव्हती. या साहित्य संमेलनामध्ये आंबेडकरी समाजातील युवकांना एकविसाव्या शतकातील सामाजिक, आर्थिक विकासाच्या संधी या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मांडणी करण्याची संधी मला लाभली.

केवळ आंबेडकरी समाजातील युवकच नव्हे, तर एकूणच भारतीय युवकांचं नजीकच्या काळामध्ये शैक्षणिक आणि रोजगार या अनुषंगाने भवितव्य काय असेल, त्यांचं आपल्या भारताच्या पायाभरणीमध्ये, उभारणीमध्ये काय योगदान असेल, हा माझ्या नित्य चिंता आणि चिंतनाचाच विषय. त्या चिंतनाला भरीव स्वरूप देण्याचं, त्याची मांडणी करण्याची ही एक चालून आलेली संधी होती. त्यामुळं विचार करीत असताना मुळात भारतीय युवकांना नजीकच्या २५ वर्षांमध्ये डेमोग्राफिक डिव्हीडंडचा फार मोठ्या प्रमाणात लाभ उठवण्याची संधी आहे, या अनुषंगाने मांडणीची दिशा ठरवली. मग गेल्या पन्नासेक वर्षांमध्ये दक्षिण आशियाई विभागातील ज्या देशांनी डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या बळावर आपली प्रगती करून घेतलेली आहे, अशा देशांची उदाहरणे अभ्यासली. यामध्ये जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि थायलंड यांची उदाहरणे घेतली. या देशांनी, त्यांच्या देशामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड असताना त्याचा लाभ कशा पद्धतीने घेतला, ते पाहिले. आणि त्या अनुषंगानेच भारतामध्ये सुद्धा पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये साधारण २०५६ पर्यंतचा कालावधी असणार आहे. त्या काळामध्ये भारत या गोष्टीचा कसा लाभ घेऊ शकतो, भारतातील युवकांना प्रगतीची कितपत संधी आहे, हे या निमित्ताने अधोरेखित करता येऊ शकलं. मात्र हे करत असताना, या देशांनी जेव्हा त्यांच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा उठविला, तेव्हाचा काळ आणि आजची भारतासमोरील परिस्थिती यामध्ये ठळकपणे फरक करणारा एक फार महत्त्वाचा घटक आत्ता, आजघडीला आपल्यासमोर आहे. घटक म्हणा, आव्हान म्हणा, मात्र ते आपल्यासमोर आहे आणि ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता! भारतीय युवकांना या कालखंडात जी काही रोजगाराची, शिक्षणाची संधी मिळणार आहे, त्यासमोर एक भलं मोठं आव्हान आणि प्रश्नचिन्ह या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उभे राहिलेले आहे. या आव्हानाला भारत कसा सामोरा जातो, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी न जा,ता तिचा उपयोग करून आपल्या देशाची प्रगती कशी साधून घेता येईल, या दृष्टीने जोपर्यंत हा युवक विचार करणार नाही, तोपर्यंत ही प्रगती होईल किंवा नाही, अशी साशंकता या निमित्ताने उभी राहिलेली आहे. तर, या समग्र अंगानं या परिसंवादामध्ये मांडणी करता आली.

महत्त्वाचं म्हणजे आमचे मित्र कुलवीर कांबळे हे सहपरिसंवादक होते तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत पार्थ पोळके हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. पार्थ पोळके यांना मी अनेक कार्यक्रमांमध्ये ऐकले आहे, मात्र, या परिसंवादाच्या निमित्ताने प्रथमच त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. मी केलेली मांडणी ऐकून ते भयचकित झाले. अशा प्रकारची मांडणी आपण प्रथमच ऐकली आणि ती फार महत्त्वाची असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या भाषणाचे लेखात रुपांतर करण्याची जाहीर सूचनाही त्यांनी केली आणि आपण त्याचा पाठपुरावा करीत राहण्याची प्रेमळ धमकी सुद्धा दिली. आपण लिहीत, बोलत राहतो, हे सारे ठीकच, पण या निमित्ताने पोळके सरांसारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वासमवेत मंचावर बसता येणे, त्यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द मिळणे, यापेक्षा माझ्यासारख्या अभ्यासकाला आणखी दुसरे काय बरे हवे असते?

त्याखेरीज, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना ऐकावयास मिळणे, निवृत्त न्या. अनिल वैद्य यांचा परिचय होणे हे सुद्धा महत्त्वाचेच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा