सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

आळंदीच्या 'रिंगणा'त!

आळंदी येथे रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, संपादक सचिन परब, भागवत महाराज साळुंके, सुप्रसिद्ध लेखक, कवी यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर


डॉ. आलोक जत्राटकर यांना आपली पुस्तके भेट देताना आळंदीचे भागवत महाराज साळुंके

रिंगण वक्तृत्व स्पर्धेचा देखणा मंच

डुडूळगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारी रिंगण वक्तृत्व स्पर्धकांच्या स्वागतासाठी उभारलेली स्वागत कमान

डुडूळगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारी रिंगण वक्तृत्व स्पर्धकांचे स्पर्धास्थळी असे रेड कार्पेट स्वागत होते.





आळंदी येथे काल, रविवारी (दि. १५ डिसेंबर) रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणासाठी उपस्थित राहिलो. सन्मित्र सचिन परब यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे केवळ संत विचार, संत साहित्य याला वाहिलेली अशी ही राज्यातील कदाचित एकमेव वक्तृत्व स्पर्धा असेल.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहणे ही खरं तर कस पाहणारी अशी गोष्ट होती. याचं कारण असं की, मुळात मी तसा काही संत साहित्याचा विशेष अभ्यासक वगैरे नाही; वाचक आहे. मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले स्पर्धक अतिशय तयारीनिशी आलेले असतात आणि आपल्याला जे काही संतांचं वाङ्मय माहिती आहे, त्या पलीकडे सुद्धा आजच्या कंटेम्पररी विषयांच्या अनुषंगाने संत विचारांचे महत्त्व, वेगळेपण आणि प्रस्तुतता या अनुषंगाने ही मुलं अशी काही मांडणी करतात की ऐकत राहावं. म्हणूनच मी म्हटलं की स्पर्धकांपेक्षाही परीक्षकांचा कस पाहणारी ही स्पर्धा होती. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजघडीला राज्यभरामध्ये जेवढेही वक्तृत्व स्पर्धेमधील दिग्गज असे स्पर्धक आहेत, ते जवळजवळ सगळेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. इतक्या तयारीच्या मुलांचं परीक्षण करणे हा आणखी एक वेगळा असा कस बघणारा भाग होता.
ही स्पर्धा उत्तम पद्धतीने आयोजित केली जातेच कारण परब सर अर्थात रिंगण प्रकाशन, मुंबई आणि आळंदीतल्या डुडूळगाव इथले श्री गजानन महाराज शिक्षण प्रसार मंडळ, ओतूर यांच्या शरदचंद्र पवार कला, वाणिज्य महाविद्यालय यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये, तिच्या देखणेपणामध्ये कुठेही काही कसर राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतलेली होती. त्यामुळे अत्यंत नेटके आयोजन आणि एकूणच वातावरणनिर्मिती यामुळे स्पर्धा ही प्रेक्षणीय सुद्धा झाली. म्हणजे श्रवणीय असण्याबरोबरच प्रेक्षणीयता आणि अनुभूतीशीलता हाही यामधील फार महत्त्वाचा भाग होता. येणाऱ्या स्पर्धकांच्या चहापानापासून ते दुपारचे जेवण आणि संध्याकाळच्या चहापानापर्यंत सगळी व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आलेली होती. राज्यभरातून दीडशेहून अधिक स्पर्धकांची नोंदणी आणि ८० हून अधिक स्पर्धकांचा प्रत्यक्ष सहभाग हे या स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. माझे सहपरीक्षक भागवत महाराज साळुंके यांच्याशीही या निमित्ताने नवस्नेह प्रस्थापित झाला. त्यांनी त्यांचे पुस्तक आणि दिवाळी अंक अत्यंत प्रेमपूर्वक मला भेट दिले. आळंदीमध्ये एक नवे जिव्हाळ्याचे ठिकाण मिळाले. सोबत प्रवीण, वैभव अशी पुणे वक्तृत्व वाद मंडळाची मित्रमंडळी या देखण्या आयोजनाचे नेपथ्य सांभाळायला होतीच. त्यांचा सहवास ही सुद्धा माझ्यासाठी सदैव हवीहवीशीच बाब असते.
या स्पर्धेचा समारोप समारंभ सुद्धा अप्रतिम अविस्मरणीय असा झाला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी सुप्रसिद्ध लेखक, कवी अरविंद जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एरवी अरविंद जगताप यांना आपण शब्दांमधून वाचतो; पण प्रत्यक्ष ऐकत असताना जगताप सरांना त्यांच्या पॉझेसमधून ऐकणं हा सुद्धा एक अविस्मरणीय असा अनुभव होता, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यांच्या दोन शब्दांमधला, मुद्दामहून थोडा अधिक लांबवलेला पॉझ हा विक्रम गोखलेंपेक्षा सुद्धा अधिक उत्तम आणि दमदारपणे अनेक गोष्टी ध्वनीत करत होता. सलाम आहे या माणसाला! अरविंद जगताप यांना अशा पद्धतीने ऐकणं हा सुद्धा एक आगळ्या वक्तृत्वाचा पथदर्शी नमुनाच ठरला.
या स्पर्धेच्या निमित्ताने मला देहूला जाता आलं, तुकोबारायांचं दर्शन घेता आलं, आळंदीमध्ये माऊलींचे दर्शन घेता आलं आणि त्या दर्शनाबरोबर आमच्या या दैवतांना नवबडव्यांनी कसे घेरले आहे किंवा पुढे आणखी ही पकड कशी मजबूत होत जाणार आहे, याचं सुद्धा एक दर्शन या निमित्ताने घडलं. हे होतच राहणार आहे. त्याला आपण काही करू शकत नाही, याचेही एक वेगळे शल्य मनाला बोचत राहिले. अतिशय बेमालून पद्धतीने हा सगळा पगडा बहुजनांच्या डोक्यावर बसविण्यात येत आहे. म्हणजे ज्या गोष्टींच्या विरोधात तुकोबांनी बंड पुकारले, ज्ञानराजांनी समाधी घेतली, तीच व्यवस्था त्यांच्याभोवतीचे आपले पाश घट्ट करत असताना दिसते आणि त्याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना, भाविकांना वेगळ्या पद्धतीने हा भागवत धर्म सांगण्याचे एक वेगळेच षडयंत्र या निमित्ताने पाहता आले. हे होत राहणार, त्याला पर्याय नाही. पुढच्या वेळी मी जाईन त्यावेळी कदाचित यापेक्षाही अधिक वेगळे चित्र मला दिसू शकेल; मात्र सध्या जे दिसलं ते असं!
रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने या सगळ्याच गोष्टींचा दर्शन घेण्याची संधी मिळाली. मित्रवर्य सचिन परब आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दोन दिवस घालवता आले, याचा एक वेगळा आनंद आहे. त्याचबरोबर राज्यभरातले जे तयारीचे स्पर्धक होते, त्यांना ऐकणं, प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळाली, ही त्यातली जमेची बाजू. त्या दृष्टीनेही रिंगण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा