मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

संवेदनशील माध्यमकर्मीचे जाणिवासमृद्ध लेखन

('दै. सकाळ'च्या साप्ताहिक 'सप्तरंग' या रविवार विशेष पुरवणीमध्ये 'समाज आणि माध्यमं' व 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकांविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी लिहीलेला परिचयपर लेख...)



शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि लेखक, वक्ते डॉ. आलोक जत्राटकर यांची ‘समाज आणि माध्यमं’ आणि ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ ही दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. एका संवेदनशील आणि जबाबदार माध्यमकर्मीने केलेले अत्यंत जाणिवासमृद्ध आणि समाजभान विस्तारणारे असे हे लेखन आहे. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’चा शोध व वेध, त्यांचे समस्यासूचन आणि निराकरण यामध्ये त्यांना स्वारस्य आहे. या जाणिवांतूनच ही दोन्ही पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. या पुस्तकांना अनुक्रमे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत, यावरून या दोन्ही पुस्तकांचा दर्जा लक्षात यावा.

डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा मुक्तचिंतनपर लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची पानोपानी आठवण केलेली आहे. विविध विषयांवरील लेख असले तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा त्यांत आहेत. लेखांमधील व्यक्तिगत संदर्भ व्यापक सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.

संग्रहातील पहिल्याच लेखात ते निपाणी या शहराबद्दल, त्याने दिलेल्या संस्काराबद्दल ते आत्मीयतेने लिहितात. ‘आई माझा गुरू’ या भावस्पर्शी लेखात दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे. ‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. या सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच जपावे, असे त्यांना वाटते. डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. यातील लेखांना सजग चिंतनाची बैठक आहे.

डॉ. जत्राटकर यांनी लिहिलेले 'समाज आणि माध्यमं' हे आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे पुस्तक आहे. विविध समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे हाताळतो. भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देणारे आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक आहे.

माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे. मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया अॅडिक्ट होत चाललेल्या समाजाने विशेषतः तरुणांनी हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला हवे. दुभंगलेली माणसे, कुटुंबे, समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. एका दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यम वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने वर्णन केलेले आहे. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते. पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य केले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे लेख अवश्य वाचले पाहिजेत. बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि जबाबदारपणे लिहिले आहे. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, महिला, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांनीच हे पुस्तक वाचायलाच हवे.

१.      ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे

लेखक- डॉ. आलोक जत्राटकर

भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे- १२६

किंमत- रु. २५०/-

 

२.      समाज आणि माध्यमं

लेखक- डॉ. आलोक जत्राटकर

अक्षर दालन, कोल्हापूर

पृष्ठे- १८४

किंमत- रु. ३००/-


 

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

ब्लॅक व्हाईट अन ग्रे’: सामाजिक समावेशनाबाबत जबाबदार भाष्य करणारा लेखसंग्रह

( ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ पुस्तकाविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची प्रतिक्रिया...)



डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा चिंतनपर लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांच्या नावातच ‘लोक’ हा शब्द आहे आणि त्यांच्या सहवासातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण ‘लोक’ आहेत. शिवाय, ते संवेदनशील आणि जबाबदार पत्रकार असल्यामुळे त्यांच्या डोक्यात ‘लोक’ म्हणजे ‘people and their problems’ नेहमीच असतात. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’च्या शोधात, त्यांच्या समस्यांमध्ये आलोकना स्वारस्य आहे. 

डॉ. आलोक यांच्या या संग्रहात, पहिल्याच लेखात ते निपाणी या आपल्या शहराबद्दल मनापासून लिहिताहेत. सजग जाणीवांचं हे गाव आलोक यांच्या जाणिवा जागृत करणारं गाव आहे. अनेक प्रकारच्या लढ्यांचे केंद्र असलेले गाव, तेथील लढवय्ये लोक, त्यांना भेटलेले आणि त्यांना प्रभावित करणारे शिक्षक, त्यांच्या आठवणी या सर्व गोष्टी आत्मीयतेने या लेखात त्यांनी मांडल्या आहेत. 

सांगलीच्या राजवाड्यातील शाळेतील शिक्षिका आणि पुढे कागलच्या राजाच्या शाळेत दाखल झालेल्या आलोक यांच्या आई, त्यांचे इंग्रजीचे अध्यापन, इंग्रजी साहित्याचा अभ्यास आणि विस्तृत वाचन या सर्वांमुळे ‘मी कसा घडलो’ याचे कृतज्ञतापूर्वक वर्णन ‘आई माझा गुरू’ या भावस्पर्शी लेखात आहेत. लेखन, वाचन, वक्तृत्व या सर्वच गोष्टींचे धडे आईने त्यांना कसे दिले, याची संपूर्ण हृद्य माहिती ते या लेखात मांडतात. दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे. 

डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची पानोपानी आठवण केलेली आहे. लेखसंग्रह अनेक विषयांवरील लेखांचा असला तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा या लेखांना आहेत. या सर्व लेखांना व्यक्तिगत संदर्भ असला तरी तो सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.

डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. लेखसंग्रहातील अनेक लेखांना चिंतनाची बैठक आहे. पत्रकारितेतून कधीकधी डोकावणारा उतावीळपणा, प्रचारकी स्वरूप आलोक यांनी या लेखसंग्रहात येऊ दिलेले नाही.

‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. त्यांना या सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच असावे, असे वाटते. Coloured life and Colourful life यावरचे रंगभाष्य या लेखात आहे. या लेखसंग्रहात अनेक व्यक्ती आलेल्या आहेत. नात्यांमधील भावबंध आहेत; पण, एकूणच लेखसंग्रह सामाजिक समावेशकता, विवेक, विचार, संवेदनशीलता या गोष्टी ठळकपणे अधोरेखित करणारा आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात जबाबदारीने वावरलेले डॉ. आलोक आणि आता विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी असलेले डॉ. आलोक या भूमिकांमुळे हा लेखसंग्रह जबाबदार माणसाने, अत्यंत जबाबदारीने, महत्त्वाच्या विषयांवर गांभीर्याने भाष्य करणारा असा लिहिलेला आहे.


बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कार

ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट

अनुप जत्राटकर ग्रामीण प्रश्न हाताळणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

 

ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते 'कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक' म्हणून पुरस्कार स्वीकारताना 'गाभ' चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर. शेजारी प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर.



प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते 'कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट' पुरस्कार स्वीकारताना 'गाभ' चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे. शेजारी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल.



(पुरस्कार प्रदान सोहळ्याची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या गाभ या चित्रपटाने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले.

गाभ या चित्रपटाला कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार प्राप्त झाले. वरळी (मुंबई) येथे काल (दि. ५) रात्री झालेल्या दिमाखदार सोहळ्यात दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

गाभ चित्रपटाला ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट चित्रपटांसह अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट दिग्दर्शक या गटातही नामांकन मिळाले होते. त्याचप्रमाणे प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक या गटात अनुप जत्राटकर यांना आणि प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्री या गटात अभिनेत्री सायली बांदकर हिलाही नामांकन मिळाले होते. तथापि, चित्रपटाला कै. दादा कोंडके यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटासाठीचा आणि कै. अनंत माने यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकासाठीचा, असे दोन महत्त्वाचे विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

कोल्हापुरी योगायोग

सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार ज्यांच्या नावे आहे, ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कै. अनंत माने कोल्हापूरचे, मंचावर पुरस्कार वितरण करण्यासाठी उपस्थित प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हेही कोल्हापूरचे आणि गाभ या चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे हेही कोल्हापूरचे! असा त्रिवेणी संगम या पुरस्काराच्या निमित्ताने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जमून आला.