Western Maharashtra Flood लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Western Maharashtra Flood लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

माकडाचं घर..!










(सन्मित्र श्री. सुभाष सूर्यवंशी यांचा 'अक्षरभेट' हा दिवाळी विशेषांक हा जणू माझे हक्काचे लिहीण्याचे ठिकाण. त्यांनी हक्कानं विषय सांगून लेख मागायचा अन् मी तो द्यायचा, असं हे गेली कित्येक वर्षे चाललेलं आहे. यंदाही 'अक्षरभेट'साठी लिहीलंय. ते माझ्या वाचकांना सादर करतोय, आपल्याला आवडेल, या अपेक्षेसह अन् दिपावलीच्या शुभेच्छांसह! - डॉ. आलोक जत्राटकर)



दुसरी-तिसरीतली आपल्यातल्या बहुतेकांना माहिती असलेली एक गोष्ट... माकडाचं घर... एक माकड. अत्यंत स्वच्छंद. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारायच्या. मनसोक्त फळं खायची. मजा करायची. मस्त आनंदात राहायचं. हेच त्याचं जीवन. अशातच पावसाळा सुरू झाला. पावसात भिजून माकड चिंब झालं. पाऊसपाणी आणि बोचऱ्या वाऱ्यात थंडीनं काकडून गेलं. त्यानं ठरवलं. आता पावसाळा संपला की पहिल्यांदा आपण एक चांगलं घर बांधायचं. मग आपल्याला पावसाचा त्रास होणार नाही. पावसाळा संपला. ऊन पडलं. माकड पुन्हा आनंदानं या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत राहिलं. थोड्याच दिवसांत हिंवाळा सुरू झाला. थंडीचा कडाका वाढला, तसं माकड गारठलं. त्याचं फिरणंच काय, खाणंपिणंही जणू गोठलं. थंडीनं थरथर कापत एका झाडाच्या फांदीला बिलगून बसलेल्या माकडानं ठरवलं, आता काही नाही, एकदा का हा हिंवाळा संपला की पहिलं काम- घर बांधायचं. म्हणजे ऊबदार घरात थंडीची कटकटच होणार नाही. थोड्याच दिवसांत हिंवाळा सरला. फिरून ऊन पडू लागलं. माकड पुन्हा आनंदानं इकडून तिकडं उड्या मारत राहिलं. उन्हाळ्याच्या झळा हळूहळू वाढू लागल्या. माकडाला उन्हानं जीव नकोसा झाला. झाडांच्या फांदीवरही उन्हाचे चटके बसू लागले. तेव्हा त्यानं पुन्हा एकदा ठरवलं. ते काही नाही, उन्हाळा संपला की घर बांधायचंच. पण, अशा सर्व ऋतूंत ठरवून देखील शेवटपर्यंत माकडाचं घर काही बांधून झालं नाही.

आज ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे आपण माणसं जणू काही या माकडाचेच वंशज असल्याचा दाखला देण्यासाठीच जन्मलो आहोत, अशा रितीनं वागत आहोत, हे होय. माकडाच्या बाबतीत त्याच्या आळसामुळं का असे ना, फक्त एकच गोष्ट चांगली म्हणजे त्याला घर बांधता आलं नाही. तसं झालं असतं, तर माकड त्या घराच्या भोवतीच गुरफटलं असतं. त्याच्या गरजा वाढत गेल्या असत्या. त्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी माकडानं आजूबाजूच्या पर्यावरणावर डल्ला मारायला सुरू केला असता आणि एक दिवस ते पर्यावरण आणि त्या पर्यावरणाबरोबर ते स्वतःही नष्ट झालं असतं. महत्त्वाचं म्हणजे या साऱ्या धबडग्यात माकडाचा आनंद, त्याचा स्वच्छंदपणा हे सारं नष्ट झालं असतं. ते उड्या मारायलाही विसरलं असतं. असो!

अलिकडंच महाराष्ट्राच्या काही भागांत खूप मोठा महापूर आला. सन २००५, २०१९ आणि २०२१ या तीनही वर्षी आलेल्या महापुरांचा मी एक साक्षीदार. विशेषतः कोल्हापूरमध्ये या पुराची तीव्रता आणि वाढता प्रकोप यांचा अनुभव घेतलेला. सन २००५ साली आम्ही पुराच्या तीव्रतेचा दोष थोपला तो थेट कर्नाटकनं बांधलेल्या अलमट्टी धरणावर. तेथपासून ते अगदी सन २०१९पर्यंत इथल्या महापुरासाठी आम्ही त्याच्यावरच दोष टाकून आपली जबाबदारी मात्र झटकत होतो. कर्नाटक सरकारवर प्रादेशिक वादातून आमचा रोष होताच. त्यात भर पडली अलमट्टीची. हा रोष इतका होता की, त्या धरणाच्या पलिकडं कर्नाटक राज्यातही आपले भारतीय बंधू-भगिनी राहतात, याचं भान आपण कधीच बाळगलं नाही. आमच्या बाजूच्या नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे, यासाठी झगडताना पलिकडच्यांचा तो जीवनाचा अधिकार धोक्यात घालण्याबद्दल मात्र आम्हाला खंत वाटली नाही. सन २०१९मध्ये अलमट्टीतून सोडलेल्या पाण्यामुळे कर्नाटकातील किमान १६ ते १९ नागरिकांचा वाहून जाऊन मृत्यू झाला तर काही जण बेपत्ताही झाले. या गोष्टीचा आपल्याकडच्या किती लोकांना पत्ता होता? किती जणांना त्याची दखल घ्यावीशी वाटली अगर किती जणांना खंत वाटली? माझ्या मते, नाहीच वाटली.

यंदा सन २०२१च्या महापुराच्या वेळी मात्र आपल्या धरणांवरच्या अभियंत्यांनी धाडसी निर्णय घेऊन पावसाळ्यापूर्वी जादा पाणी सोडून अतिरिक्त पाऊस झाला, तरी धरणांतून लगोलग पाणी सोडण्याची वेळ येऊ नये, यासाठीचे नियोजन केल्यामुळे अलमट्टी धरणावर आजवर चालत आलेला ब्लेमगेम यंदाच्या महापूर काळात चालला नाही, किंबहुना, फोलच ठरला. काही अभ्यासकांशी चर्चा केली असता त्यांनीही यामध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले. इतक्या दूरवर अलमट्टीचे बॅकवॉटर मागे येऊ शकत नाही, हे त्यांनी ठामपणाने सांगितले. अवघ्या काही तासांत २० ते ५० सेंटीमीटर पाऊस झाल्याने पंचगंगा, कृष्णेच्या सर्वच उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे पाण्याचा फुगवटा ४५ ते ५५ फुटांच्याही वर गेला. अलमट्टीचा फुगा फुटला.

मग इतर कारणांचा शोध सुरू झाला. एक सापडलंही. राष्ट्रीय महामार्गावर बांधलेला बंधारावजा पूल हे पाणी साचण्याचं आणि हळू ओसरण्याचं कारण म्हणून पुढं आणलं गेलं. त्यात काही अंशी तथ्य आहे, मात्र पूर्णतः नाही. कारण केवळ पूलच नाही, तर मग रेड झोनमध्ये झालेली सर्वच बांधकामं त्यासाठी दोषी आहेत. अगदी २०१९च्या पुरानंतरही शहाणे न होता उलट अधिक गतीनं फर्निचरच्या भव्य शोरुम्सपासून ते मंगल कार्यालयांपर्यंत अनेक बांधकामं नदीपात्राच्या सभोवतीनं झाली. त्यामुळं एकट्या पुलावर जबाबदारी ढकलणं हेही चुकीचं.

या बाबतही तज्ज्ञांशी बोललो असताना त्यांनी कोल्हापूरपेक्षा नृसिंहवाडीची समुद्रसपाटीपासूनची उंची ही पाच मीटरनं कमी आहे. त्यामुळं तिकडं गुरुत्वाकर्षणानं पाण्याचा ओढा आहेच. मात्र, ज्या कोनामध्ये पंचगंगा कृष्णेला तिथं मिळते, त्या कोनामुळे पंचगंगेचे पाणी गतीने तिच्या प्रवाहात मिसळू शकत नाही. त्याचप्रमाणे कृष्णेमध्ये जर आधीच महापूर असेल, तर पंचगंगेचे पात्र तेथून मागेपर्यंत बॅकवॉटर साठवित जाते. त्याचा फटका शिरोळ परिसराला बसतो. यासाठीचा उपायही तज्ज्ञ सुचवितात, तो असा की एक अतिरिक्त चॅनल पंचगंगेमधून काढायचा आणि त्याद्वारे पंचगंगेचे अतिरिक्त पाणी कृष्णेच्या पात्रामध्ये अन्यत्र सोडावयाचे. म्हणजे पाणी फिरेलही आणि ते कृष्णेत समाविष्ट होईलही. मात्र, अतिरिक्त पावसाच्या वेळी मात्र त्यालाही मर्यादा पडतील.

आपल्या वर्तनाची मी माकडाच्या घराशी तुलना करतो आहे, याचे कारण म्हणजे या काळात आणखी काही भन्नाट अशास्त्रीय आणि अनैसर्गिक उपाययोजना पुढे चर्चेत आणल्या गेल्या. त्यामध्ये एक म्हणजे शहर परिसरात नदीपात्राला भिंत बांधायची आणि दुसरी म्हणजे नदीचा प्रवाह वळवायचा. या दोन्ही गोष्टी म्हणजे निसर्गाची अफाट क्षमता आणि मानवाची त्यापुढील मर्यादा यांचे आकलन अजिबातच न झाल्याची प्रचिती देणाऱ्या म्हणाव्या लागतील. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे आपले काही चुकलेच नाही आणि सारा दोष जणू काही निसर्गाचाच आहे, हा त्यामागे दडलेला सुप्त अहंभाव होय.

मुळात या सूचना करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलेलीच नाही, ती म्हणजे समपातळीत वाढत जाणे हा पाण्याचा नैसर्गिक स्थायीभाव आहे. भांड्यात पाणी ओतले जात असताना भांडे कमी-अधिक तिरके असले तरी पाणी त्याची समपातळी सोडत नाही, हा अनुभव आपल्याला आहेच. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी म्हणून नैसर्गिक तसेच मानवी नितीनियमांना धाब्यावर बसवित आपण नदीपात्रांच्या सभोवताली, त्याचप्रमाणे अगदी नदीपात्राच्या लगतही जिथे रेडझोन, ऑरेंज झोन घोषित केले आहेत, अशा ठिकाणीही केवळ पैशासाठी भव्य इमारती, संकुले उभ्या करण्यास परवानगी दिल्या. स्थानिक नेते, नगरसेवक आणि बिल्डर लॉबी यांच्या भ्रष्ट युतीने दणादण तिथे बांधकामे उभारली. लाखो रुपये घेऊन नागरिकांनी त्यात फ्लॅट खरेदी केले. अगदी २०१९मध्ये ज्या ओढ्याच्या पात्रामध्ये पाणी ओसंडून वाहात होते. तेथे पाणी ओसरताच भराव घालून, कॉलम टाकून एक भव्य संकुल उभे राहिले. वैशिष्ट्य म्हणजे ओढ्यातल्या त्या संकुलात फ्लॅट घेणारे ग्राहकही त्या बिल्डरला भेटले, ही आणखी एक चिंतेची आणि दुर्दैवाची बाब. २०२१मध्ये तिथल्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले, हे सांगायला नकोच. आपण बोलत होतो, ते पाण्याच्या समपातळीविषयी. अतिवृष्टीमुळे पाण्याचा फुगवटा वाढत जाईल, तसतसे ते आजूबाजूच्या शेती, रस्ते, घरे, रिकाम्या जागा अशा समस्त परिसरात त्याच समपातळीमध्ये पसरायला सुरवात करते. नदीपात्राची अधिकतम उंची ओलांडल्यानंतर त्या पातळीत बाजूला जितके पसरता येईल, तितके ते पसरत राहते आणि आपली पातळी कायम राखते. पाऊस कमी झाला आणि ओसरण्यास सुरवात झाली की आपली सिमेंट काँक्रिटची घरे या सर्वत्र पसरलेल्या पाण्याला अडवणाऱ्या बंधाऱ्यांचे अथवा भिंतींचे काम करतात. नदीपात्राला वेढून पसरलेल्या आपल्या नागरी वस्त्या ते पाणी रोखून धरतात. त्याला नदीपात्राकडे परतण्यास अटकाव करतात. त्यामुळे ते पाणी लवकर ओसरू शकत नाही. ही बाब आपल्याला माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. कारण पुन्हा तेच. भ्रष्टाचारामुळे उभारलेल्या या भिंतींची जबाबदारी कोण घेणार? पण, यांच्यातल्याच कोणाच्या सुपीक डोक्यातून नदीलाच भिंत घालण्याची कल्पना आली. ठीकाय. काही क्षण ही कल्पना मान्यही करू. पण, त्या भिंतीची उंची किती असेल? ५५ फूट, ६० फूट की आणखी उंच? आणि तिची लांबी? ती किती असेल? डोळ्यांसमोर चित्र आणा आपल्या परिसरातील कोणत्याही नदीचे. आणि मनातल्या मनात बांधा तिच्या दोन्ही बाजूला अशा उंच आणि लांब भिंती. भीषण चित्र येतं ना डोळ्यासमोर. आणि समजा, अतिवृष्टी अशी झाली की आपण बांधलेल्या भिंतीवरुनही पाणी ओसंडलं नागरी वस्तीत. तर ते पुन्हा नदीत जावं कसं? त्यावेळी आपल्या वस्त्यांची अवस्था काय होईल? या भिंतींच्याच आधारे झोपडपट्ट्या वाढण्याची साधार भितीही येते मनात. मुंबईत पाहा. वस्तीतून वाहणाऱ्या नाल्यांच्या बाजूनं बांधलेल्या भिंतींचीच एक बाजू करून तीन तीन मजली झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत तिथं. मग, आपल्या शहरात अशा ५० फुटी भिंतीचा आधार घेऊन साधारण पाच-सहा मजली झोपडपट्टी तर सहज ओळीनं उभी राहू शकते. हा पर्याय जलदीनं मागं पडला, हे एक बरं झालं.

नदीचा प्रवाह वळवण्याचा प्रस्ताव पुढं आणणाऱ्या बलरामांबद्दल तर काय बोलावं? जगभरात झालेल्या अशा प्रयत्नांना निसर्गानं कशा पद्धतीनं पाणी दाखवलं आहे, याची अनेक उदाहरणं आहेत. असा प्रस्ताव येतो, त्यावेळी आपण स्वतःला निसर्गापेक्षाही खूप बलवान समजतो आहोत आणि हा आपला गैरसमज निसर्ग एका फटकाऱ्यानिशी पाण्यात घालविण्यास सक्षम आहे, एवढं त्यांनी वेळीच लक्षात घ्यावं.

पावसामुळं कोसळणाऱ्या दरडी आणि त्यातून होणारी जिवित व वित्त हानी, हा आणखी एक चिंतेचा विषय. मात्र, माळीणसारखी प्रचंड दुर्घटना होऊनही आपण त्यापासून काहीच बोध घेत नाही. पुनःपुन्हा काय होणाराय, म्हणून अशा डोंगरांच्या पायथ्यांशी वस्त्या करून राहू लागतो आणि दुर्घटना घडली की शासनाला बोल लावीत राहतो. त्यांचं राजकारण करीत राहतो. आज या बाबतीत पूर्वराजकारण करण्याची गरज आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर प्रशासनाच्या माध्यमातून अशा वाड्या-वस्त्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसित करणं शक्य आहे. मात्र, ते होत नाही. नागरिकही आपली जागा सोडायला तयार होत नाहीत. उदाहरणच द्यायचं, तर कोल्हापूरशेजारच्या चिखली गावाचंच देता येईल. राजर्षी शाहू महाराजांनी तिथल्या जवळजवळ सर्वच कुटुंबांचं पुनर्वसन त्यांच्या राजपूतवाडी कॅम्पच्या परिसरात त्यांच्या काळातच केलं होतं. लोकांना जमिनी देऊन घरंही बांधण्यात आली. मात्र, नागरिकांचा मूळ घर आणि शेतीतला मोह काही सुटला नाही. सन २०१९च्या महापूर काळात इथल्या नागरिकांच्या सुटकेचा मोठा दबाव प्रशासनावर राहिला. सन २०२१मध्ये नागरिक पुराची शक्यता वाटताच स्वतःहून राजपूतवाडीच्या त्यांच्या सेकंड होममध्ये स्थलांतरित झाले. पण तिथे एकदा गणेशोत्सव साजरा केला की पुन्हा ते आपल्या इथल्या मूळ घरांकडे परततील. हे उदाहरण सांगायचं कारण म्हणजे पर्यायी व्यवस्था उपलब्ध असूनही इथल्या नागरिकांना मूळ जागेचा, जमिनीचा, घराचा मोह सुटत नाही, तर अशा दरडींच्या पायथ्याशी, डोंगरउतारांवर वाड्यावस्त्या थाटून राहणाऱ्या आणि अन्य कोणताही पर्याय नसलेल्या लोकांकडून ती अपेक्षा कशी बरे करावी? आपल्या प्रशासनासमोरची ही एक मोठी डोकेदुखी असणार आहे. माणूस शहाणा होऊन स्वतःहून जोपर्यंत अशा जागा सोडणार नाही आणि प्रशासन त्यांना योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणार नाही, तोपर्यंत माळीण, रायगडसारख्या दुर्घटना होतच राहणार.

या पद्धतीने डोंगरमाथ्यावरील विकासकामांच्या, बांधकामांच्या वाढलेल्या भारामुळे आणि त्यात अतिवृष्टीमुळे जमीन कमकुवत होऊन तसेच पायथ्याची जमीनही भुसभुशीत होऊन घसरण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. पूर्वी दुर्गम भागामध्ये असलेले हे प्रमाण आता पन्हाळ्यासारख्या किल्ल्यांच्या परिसरातही प्रचंड वाढले आहे. कडे कोसळू लागले आहेत, रस्ते खचू लागले आहेत. निसर्गाने दिलेले हे सारे संकेत आहेत. ते आपण समजून घ्यायला हवेत.

समतल, शहरी, गावठाण भागाच्या परिसरातील, नदीच्या परिसरातील शेतजमिनी एन.ए. करून तिथे एकीकडे प्लॉट पाडून त्यातून पैसा पैदा करायचा आणि दुसरीकडे डोंगरमाथ्यापासून ते पायथ्यापर्यंत मातीला घट्ट धरून ठेवून जमिनीची धूप रोखणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करून तेथे शेती करायची, या दोन्ही बाबी मानवी विकासाच्या दृष्टीने तात्कालिक पूरक वाटत असल्या दूरगामी मानवी अस्तित्वाला घातक आहेत, हे एव्हाना लक्षात येऊ लागले आहे. अतिवृष्टीमध्ये शेतीमुळे भुसभुशीत झालेले डोंगर शेतीसह वाहून जाऊ लागले आहेत. तर नदीकाठच्या एन.ए. प्लॉटमधील बांधकामे ही विकासाचे दुष्परिणाम सिद्ध करणारी ठिकाणे बनली आहेत.

खनिज उत्खनन हा त्याचा आणखी एक वेगळा पैलू. या उत्खननादरम्यान हव्यासापोटी मान्यतेपेक्षा अधिक केली जाणारी खोदाई, त्यासाठी वापरली जाणारी स्फोटके यांमुळे भूसंरचनेला मोठ्या प्रमाणात हादरे बसतात. ती उद्ध्वस्त होते. जमीन आत खोलवर पोखरली जाते. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, शिवाय भूस्खलनाचा धोका वाढतो. सातारा परिसरात दगड-वाळूच्या खाणी आहे. महामार्गावरून दिसणाऱ्या डोंगरांच्या दर्शनी बाजू तेवढ्या पोखरणाऱ्या उंदरांनी उभ्या ठेवल्या आहेत. मागील बाजूने संपूर्ण डोंगर संपवले आहेत. डोंगर संपवून ते थांबलेले नाहीत, आता तिथे खोदून जमिनीच्या पोटातही घुसले आहेत. पुढे या मार्गावर कधी काळी दुतर्फा किती तरी डोंगरांच्या रांगा होत्या, हे सांगूनही कोणाला पटणार नाही. त्यांच्या ठिकाणी केवळ मोठमोठे खड्डे आणि पाणी साचलेल्या खणीच काय त्या उरतील. हा हव्यास कोणता विकास घडविणार आहे, ठाऊक नाही.

मान्य आहे, निसर्गाचा समतोल बिघडला आहे. पण, तो कोणामुळे, हेही लक्षात घ्यायला हवे ना! पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागतिक स्तरावर जे जे करार करण्यात आले, त्या करारांमधून विकसित राष्ट्रांनी आपले अंग काढून घेण्यास सुरवात केली आहे. जागतिक तापमानवाढ, कार्बन क्रेडिट्स, हरितगृह वायू उत्सर्जनापासून ते अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरास प्राधान्य देण्यापर्यंत पर्यावरण रक्षणासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधूनही विकसित राष्ट्रे माघार घेत आहे. नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद वापर रोखून जगाला आगामी पर्यावरणीय संकटांपासून वाचविण्याच्या जबाबदारीपासूनही ते पलायन करीत आहेत. सारी जबाबदारी जणू काही विकसनशील राष्ट्रांचीच असल्यासारखे त्यांचे वर्तन सुरू झाले आहे. अंतिमतः हे सारे काही मानवी अस्तित्वाच्या मुळावरच उठणारे आहे, याची जाणीव जागतिक स्तरावरही दुर्लक्षिण्याचे प्रकार होत आहेत.

या साऱ्या बाबींमुळेच मला राहून राहून माकडाच्या घराची गोष्ट आठवत राहते. संकट आले की, तेवढ्यापुरते आक्रोश करायचा, त्यावर मात करण्यासाठीच्या उपायांची चर्चा करायची आणि संकट ओसरले की, पुन्हा व्यापक मानवी हित विसरून व्यक्तीगत स्वार्थ साधण्याच्या मागे लागायचे, हे वरचेवर, वारंवार दिसून येते आहे. किंबहुना, आपण इतिहासापासून धडे घेत नाही, म्हणूनच नेहमी आपल्या अस्तित्वासमोरची आव्हाने अधिकाधिक गडद होत जात आहेत. मानवी समुदाय म्हणून आपण एक आहोत, ही वसुंधरा जपणे, यावरील पर्यावरण जपणे, पर्यावरणातील अन्य पशु, पक्षी, कीटक, वनस्पती हे सारे आपले सहचर, सहोदर आहेत. बुद्धीच्या बळावर या साऱ्यांचे मोठेपण आपण स्वतःकडे घेतले खरे, पण आता खऱ्या अर्थाने त्या मोठेपणाचे भान ठेवून आपण त्यांच्याही अस्तित्वाची काळजी वाहिली पाहिजे. मात्र आपण ते आपल्या भौतिक सुखसोयींच्या, आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी बासनात गुंडाळून ठेवले आहे. स्वार्थापुढे सर्व हिताहिताचे आपल्याला विस्मरण होते किंबहुना आपण जाणीवपूर्वक त्या विसरून जातो. म्हणून माकडाचे घर हे दिवास्वप्नच राहते.


शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

आपत्कालीन परिस्थितीत पाळावी अशी सर्वसाधारण आचारसंहिता


(छायाचित्र सौजन्य: टीव्ही-९)

(छायाचित्र सौजन्य: द इंडियन एक्स्प्रेस)

(छायाचित्र सौजन्य: द हिंदू)

आपत्ती कालखंडातील सर्वसाधारण आचारसंहिता: (पश्चिम महाराष्ट्र महापूर स्थितीच्या अनुषंगाने)

मित्र हो, गेल्या अनेक वर्षांमध्ये शासकीय अधिकारी या नात्याने विशेषतः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात ११ जुलै २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटांपासून ते २१ जून २०१२ रोजी मंत्रालय जळीत प्रकरणापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये सक्रिय योगदान दिल्याच्या अनुभवावर आधारित पुढे मी काही बाबी मांडत आहे. आपत्तीच्या प्रसंगी काही मूलभूत दक्षता विविध स्तरांवरुन घेण्याची गरज असते. मी देत असलेली आचारसंहिता हीच आदर्श आहे किंवा असावी, असे म्हणणे नाही. त्यामध्ये आपणही आवश्यक तिथे भर घालू शकता. तथापि, ती अंमलात आणली, तर या स्थितीत अत्यंत संतुलितपणे काम करता येणे आणि संकटावर मात करून पुन्हा लवकर स्थिती पूर्वपदावर आणणे आपल्याला शक्य होईल. यामध्ये मी सद्यस्थितीत अनुभवलेल्या, पाहिलेल्या बाबींचा उल्लेख केला असला तरी, त्याला व्यक्तीगत न घेता, त्यांची दक्षता सध्याच्या अभूतपूर्व स्थितीत घेणे आवश्यक आहे, म्हणून केवळ त्यांचा उल्लेख आहे, हे सुरवातीलाच नमूद करतो.  

शासकीय व प्रशासकीय स्तरावरुन घ्यावयाची दक्षता-

·         सध्या स्थानिक प्रशासन मोठ्या गतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात सक्रिय आहे. उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामुग्री, स्थानिक यंत्रणा, अग्नीशमन कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी त्याचप्रमाणे राज्याचे पोलीस दल, शीघ्र कृती दल, एनडीआरएफ, लष्कर, नौदल आदी जिथून शक्य असेल तिथून कुमक मागवून या कामाला गती देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्वच प्रमुख शासकीय अधिकारी या आपत्तीचा सातत्याने आढावा घेत व्यवस्थापनाचे, मदतीचे काम करीत आहे.
·         मा. मुख्यमंत्री यांनी जमिनीवर न उतरताच हवाई पाहणी केली आणि निघून गेले, असे आरोप सुरू झाले. तथापि, मुख्यमंत्री महोदयांनी राजापुरात उतरून पूरग्रस्तांना बाहेर काढण्याच्या कामाला लागावे, हे मुळातच अभिप्रेत नाही. त्यांनी केलेल्या हवाई पाहणीमधून महापूर स्थितीची तीव्रता आणि गांभीर्य त्यांच्या लक्षात येणे महत्त्वाचे. कारण पूरस्थितीमधल्या व्यवस्थापनाच्या कामानंतर पुढे जे मदत व पुनर्वसनाचे अत्यंत महत्त्वाचे काम असते, त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरुन केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांसाठी आवश्यक तो मदतनिधी मिळविणे आणि त्याचे वितरण, संनियंत्रण करणे, राज्यभरातच उद्भवलेल्या प्रत्येक आपत्तीग्रस्तापर्यंत ती पोहोचविण्याचे राज्यस्तरीय नियोजन करणे आदी अत्यंत प्रमुख कामे राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री करतील.
·         एकदा मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर अन्य मंत्री, संत्री, विरोधी पक्षनेते यांनी प्रशासन बचाव व मदत कार्यात गुंतलेले असताना शक्यतो या भागाचे दौरे करू नयेत. त्यांच्या दौऱ्यांच्या, पत्रकार परिषदांचा अतिरिक्त ताण स्थानिक प्रशासनावर पडत असतो. मूळ कामावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे त्यांनी शक्यतो मुख्यालयातूनच सदर परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि तेथून स्थानिक प्रशासनाला लागणाऱ्या मदतीसाठीचे नियोजन करावे, हे अधिक योग्य ठरते.
·         सदर मंत्री अगर कोणाही वरिष्ठाने अशा आपत्तीच्या प्रसंगी व्यक्तीगत प्रसिद्धीचा मोह शक्यतो टाळावा. आपदग्रस्तांपर्यंत जाऊनच मदत करण्याचा आग्रह धरू नये. कारण यंत्रणेचे लक्ष त्यामुळे आपदग्रस्तांपेक्षा मा. मंत्री यांच्या सुरक्षेकडे लागून राहते. राज्याचे मंत्री म्हणून आपला जीव मोलाचा आहे. तो धोक्यात घालण्याची नक्कीच गरज नाही. आपद्ग्रस्तांपर्यंत पोहोचण्याची सध्या गरज नाही. मदत व पुनर्वसनासाठी आवश्यक पंचनामे आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई यासाठी पुढच्या टप्प्यात जरुर हिरीरीने मदत करावी.
·         संबंधित जिल्ह्याचे मा. पालकमंत्री हे राज्य शासनाचे नोडल मंत्री म्हणून सर्वांच्या वतीने स्थानिक पातळीवर परिस्थितीवर नजर ठेवून असतातच. प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबरोबर सदर परिस्थितीबाबत राज्य शासनाला अवगत करण्याचे कामही पालकमंत्री करीत असतात. त्यांनीच सर्व मंत्री आणि तत्सम अन्य व्यक्तींसाठी सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट म्हणून काम करावे. अन्य मंत्र्यांनीही त्यांच्याशीच संपर्कात राहावे.
·         स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पूरस्थितीत प्रत्यक्ष उतरून लोकांना मदत करताहेत, ही बाब उत्तमच आहे. मात्र, त्यांनीही शक्यतो व्यक्तीगत प्रसिद्धी किमान या प्रसंगी टाळावी. सर्वांनी पक्षभेद, मनभेद विसरून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात स्थानिक प्रशासनाला मदत करावी.
·         शासकीय व प्रशासकीय स्तरावरुन वेगवेगळी माहिती न प्रसृत करता स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेली अधिकृत माहिती दिवसातून टप्प्याटप्प्याने वितरित करावी, जेणे करून आपत्तीच्या स्थितीची नेमकी कल्पना लोकांना येऊ शकेल. यामध्ये सर्वच स्थानिक शासकीय आस्थापना, जसे की, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, महावितरण, जिल्हा परिषद आदी यंत्रणांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी (अगर परिस्थितीनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाशी अगर केंद्रीय प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोशी) समन्वय राखून त्यांच्या माध्यमातूनच सिंगल पॉईंट अधिकृत माहिती माध्यमांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवावी.

 प्रसारमाध्यमांनी घ्यावयाची दक्षता-


  • ·         प्रसारमाध्यम प्रतिनिधींची भूमिका आपत्तीच्या कालखंडात अत्यंतच नव्हे, सर्वात महत्त्वाची असते.
    ·         आपत्तीच्या काळात सर्वात मोठा अडथळा निर्माण होतो, तो म्हणजे अफवांचा! अफवांचे पेव फुटून आपत्तीच्या काळात नागरिकांमध्ये घबराट, अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरू शकते. याला सध्या समाजमाध्यमांची जोड मिळाल्याने अफवा वाऱ्यापेक्षाही अधिक वेगाने व्हायरल होतात. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून प्राप्त झालेली अधिकृत माहिती लोकांपर्यंत वेळीच पोहोचवून, त्याचप्रमाणे कोणतीही माहिती हाताशी आल्यानंतर तिची शहानिशा करून त्यानंतरच तिचे प्रसारण करणे अधिक योग्य ठरते.
    ·         एरव्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणे अभिप्रेत असलेल्या प्रसारमाध्यमांनी आपत्तीच्या प्रसंगी मात्र शासन, प्रशासन यांचा विस्तारित भाग म्हणून काम करावे. कारण अशा वेळी नागरिक अत्यंत सजगपणे प्रसारमाध्यमांतून काय माहिती दिली जात आहेत, त्यावर कधी नव्हे इतके लक्ष ठेवून असतात, विसंबलेले असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत अधिकृत आणि ताजी माहिती पोहोचविण्याच्या भूमिकेतून जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झालेले ताजे अपडेट्स रिलीज करावेत.
    ·         पत्रकार हा सुद्धा प्रथम माणूस आहे. आपत्तीच्या क्षणी कित्येक जण स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपले कर्तव्य बजावत आहेत, असतात. आपत्तीच्या काळात अडकलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावण्याला आपले हे माणूसपण आपल्याला प्रेरित करीत असते. मात्र, आपली ही धडपड आपल्या मूळ कामाच्या, तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याला अडथळा तर होणार नाही ना, याची दक्षताही घेणे गरजेचे आहे.
    ·         अशा आपत्तीच्या प्रसंगी प्रत्यक्ष ठिकाणावरच पोहोचून वार्तांकन करण्याचा सोस थोडा बाजूला ठेवायला हरकत नाही. अशा वेळी प्रसंगी काठावरची पत्रकारिता केली, तरी कोणी आपल्याला नावे ठेवणार नाही. (२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी अशा अतिउत्साही लाइव्ह कव्हरेजच्या नादात आपण इथून पाकिस्तानमध्ये बसलेल्या मास्टरमाईंडला सारी स्थिती लाइव्ह दाखवित राहिलो आणि तिथून त्यांना दहशतवाद्यांना सूचना देणे शक्य झाले, हे लक्षात यायला आपल्याला २४ तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला होता, हे लक्षात घेऊ या.) अंतर्गत व्यावसायिक स्पर्धा अशा आपत्तीच्या क्षणी बॅकसीटवर ठेवून द्यावी. कारण मुळातच स्थानिक प्रशासनाकडे उपलब्ध पाणबोटी वगैरे सामग्री मर्यादित असते. अशा पाणबोटींपैकी एक बोट जरी केवळ पत्रकारांसाठी राखीव ठेवावी लागली, तरी त्या मदतकार्यातील एक बोट त्या क्षणी कमी होते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपद्ग्रस्तांना सोडवून आणल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधावा. जीव धोक्यात घालून आणि प्रशासनाला अडचणीत आणून वार्तांकनाचा मोह आपण अशा प्रसंगी टाळला पाहिजे.
    ·         जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत प्राप्त झालेली अधिकृत माहितीच (किमान अशा प्रसंगी) लोकांपर्यंत पोहोचवावी.
    ·         एखादी विपर्यस्त अगर गंभीर माहिती हाती आली, तरी कोणत्याही परिस्थितीत तिची स्थानिक प्रशासनाकडून खातरजमा केल्याखेरीज ती रिलीज करू नये.
    ·         आपत्तीची स्थिती गंभीर आहे, हे एव्हाना साऱ्यांना ठाऊक झालेले असते. त्यामुळे सातत्याने मृतदेहांची छायाचित्रे अगर क्लिप्स दाखविणे टाळावे.
    ·         लोकांचे मनोधैर्य खच्ची होईल, अशा बातम्या कदाचित महत्त्वाच्या असल्या तरी त्या क्षणी त्या टाळाव्यात. त्यापेक्षा अशी माहिती प्रशासनाला देऊन त्या संदर्भात पावले उचलण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. तसेच, त्यांनी केलेल्या कार्यवाहीसह संबंधित माहिती द्यावी, जेणे करून नागरिकांना दिलासा मिळत राहील, त्यांचा आत्मविश्वास उंचावेल.
    ·         व्हॉट्सअपवरुन एखाद्या आपद्ग्रस्ताचा फॉरवर्डेड संदेश आला असेल, तर तो प्रसृत करण्याऐवजी प्रथम त्याची सुटका झाली आहे किंवा कसे, याबाबत स्थानिक प्रतिनिधीकडून लेटेस्ट माहिती घेऊन त्यानंतरच रिलीज करणे योग्य ठरते.

सर्वसामान्य नागरिक आणि मदतीसाठी धावून येणाऱ्या अशासकीय सेवाभावी व्यक्ती व संस्था-

  • ·         सर्वसामान्य नागरिकांची आपत्तीच्या क्षणी मोठी तारांबळ उडत असते. त्यांनी अशा वेळी स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्यासाठी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·         प्रशासनाने नागरिकांना आपापल्या घरीच राहण्याच्या सूचना दिलेल्या असतील; शाळा-महाविद्यालयांना सुट्या दिलेल्या असतील, तर आपत्तीच्या वेळी अशा सुट्या मौजमजेसाठी नव्हे, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी आहेत, हे लक्षात घ्या.
    ·         घरात रिकामे बसले असताना सातत्याने समाजमाध्यमांवर येत असलेले अपडेट्स आपण कोणतीही खातरजमा न करता फॉरवर्ड करीत राहतो. हे अतिशय गंभीर ठरते, अशा आपत्तीच्या प्रसंगी. यंत्रणेवरचा ताण आपण बसल्या जागी वाढवून ठेवतो. त्यामुळे समाजमाध्यमांवरून येणाऱ्या माहितीचा तुम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी वापर करा, मात्र अनावश्यक फॉरवर्ड्स पाठविण्याचा मोह किमान अशा प्रसंगी टाळा, आपल्या भावना कितीही प्रामाणिक आणि स्वागतार्ह असल्या तरी!
    ·         पुरामुळे घरातून, गावातून कोठेही जाता येत नाही, म्हणून केवळ पुराच्या ठिकाणी झुंबड करू नका. ते वर्षापर्यटनाचे ठिकाण निश्चितच नाही. आपल्या अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे आपल्या प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्यावरील ताण अनावश्यकरित्या वाढवून ठेवतो आहोत, याचे भान राखणे महत्त्वाचे असते. जे मनुष्यबळ अन्य कामात वापरता येऊ शकले असते, ते नागरिकांच्या अशा अतिउत्साहाला आवर घालण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे नागरिकांनी घरीच अगर आपल्या परिसरातच राहून परिस्थितीचा आढावा घेत राहाणे योग्य. प्रसारमाध्यमांतून प्रशासन वेळोवेळी आपल्याला आपत्तीच्या स्थितीबाबत अवगत करीत असते. त्यांवर लक्ष ठेवून राहा.
    ·         आपत्तीच्या क्षणी आपण आपल्या शहरातल्या, गावातल्या लोकांना मदत केली पाहिजे, ही भावना कोणाही सहृदय व्यक्तीच्या मनी जागणे स्वाभाविक आहे. विशेषतः तरुण त्यासाठी पुढे होऊन तत्परतेने मदतकार्यात सक्रिय होतात. यावेळी जाणकारांचे योग्य मार्गदर्शन घेण्याची गरज असते. योग्य त्या दक्षता घ्याव्यात. हाताशी दोरखंड वगैरे साधने बाळगावीत. अन्यथा मदतीला गेल्यानंतर आपणच त्या आपत्तीचे बळी ठरण्याची शक्यता वाढते.
    ·         शक्य तिथे स्थानिक प्रशासनाच्या गरजेनुसार आणि सूचनांनुसार बचावकार्य व आपत्ती व्यस्थापनाच्या कामात सहभाग घ्यावा. अशा प्रसंगी प्रशासनाला मनुष्यबळाची गरज असतेच. पण, त्यांच्याकडून पुरविण्यात आलेल्या साधनांचा, सुविधांचा वापर करून आपण मदतकार्यात सहभागी होणे अधिक योग्य ठरते. प्रशासनालाही आपली अत्यंत चांगली मदत होऊ शकते.
    ·         सेवाभावी व्यक्ती आणि संस्था यांची मदत व पुनर्वसनाच्या कामामधील भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. किंबहुना, आपत्तीमधून वाचविलेल्या लोकांना दिलाशाची, सहानुभूतीची त्याचप्रमाणे निवारा, अन्न व कपडेलत्त्याची गरज असते. या बाबींची पूर्तता सेवाभावी व्यक्ती व संस्था करीत असतात.
    ·         काही ठिकाणी तातडीने निवारा कॅम्प निर्माण केले जातात. नागरिकांना आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू होतो. प्रत्येक नागरिकालाच आपद्ग्रस्तांसाठी काही तरी करण्याची भावना असते. त्यातून प्रत्येक जण आपापल्या परीने या मदतीमध्ये आपला खारीचा वाटा उचलण्याचा आणि आपत्तीची तीव्रता कमी करण्याचा, आपल्या बंधू-भगिनींना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र, नेमक्या याच बाबीचे व्यवस्थापन योग्य रितीने झाले नाही, तर सारीच मदत व्यर्थ ठरते. या मदतीचेही कॅम्पनिहाय, तेथील व्यक्तीनिहाय योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
    ·         आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्माण केलेल्या सिंगल पॉईंट यंत्रणेशी सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी संपर्क साधावा. नेमक्या कोणत्या बाबींची गरज आहे, त्याची माहिती घेऊन अशा वस्तू अगर खाद्यपदार्थांची मदत करावी. शक्यतो, कोणत्याही प्रकारचा नाशवंत खाद्यपदार्थ देऊ नये. कोरडा खाऊ, बिस्कीटे आणि ती सुद्धा आवश्यकतेनुसार उपलब्ध करावीत.
    ·         आपत्तीचा क्षण हा अनेक नागरिकांना आपल्या घरातील जुनीपानी, फाटके कपडे दान देण्याचा सोहळा वाटत असतो. हे अत्यंत गैर आहे. आपत्तीच्या प्रसंगात सापडलेला आपला बांधव हा आपल्यासारखाच आहे, कोणी भिकारी नाही, याचे भान अशी मदत करताना ठेवले पाहिजे. अगदी नवेच कपडे द्यावेत, अशातला भाग नाही; मात्र, जे कपडे तुम्ही स्वतः वापरता आहात, वापरू शकता; जे कपडे तुमची मुलेबाळे घालू शकतात, अशाच प्रकारचे चांगले धुतलेले, स्वच्छ कपडे आपद्ग्रस्तांना द्यावेत. ते कपडे परिधान केल्यानंतर दात्याच्या प्रेमाची, मायेची ऊब त्याला मिळू द्या. अशा मदतीची घृणा न वाटता, अशा प्रसंगात सापडलेल्या नागरिकांना आपणही अशीच चांगल्या प्रकारे मदत केली पाहिजे, अशी कृतज्ञतेची भावना त्याच्या मनी जागृत व्हायला हवी.