मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

ग.गो., पुढारी, बाळासाहेब अन् शिवाजी विद्यापीठ

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव    (छाया. http://knowyourtown.co.in/ सौजन्याने)


कोल्हापूर येथून प्रकाशित होणारे महाराष्ट्रातील आघाडीचे दैनिक पुढारीचे ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव हे आज (दि. ५ नोव्हेंबर २०१९) अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्रकारितेमधील कारकीर्दीचाही सुवर्णमहोत्सव साजरा होतो आहे. या निमित्ताने आदरणीय बाळासाहेबांना मनःपूर्वस शुभेच्छा...


सन १९३७मध्ये साप्ताहिकाच्या रुपात आणि त्यानंतर जानेवारी १९३९ पासून दैनिकाच्या रुपात सुरू झालेल्या दैनिक पुढारीने गेल्या ७५ वर्षांहून अधिक वाटचालीत स्थानिक, ग्रामीण पातळीवरील वृत्तपत्रापासून ते राज्यातील अग्रगण्य दैनिक होण्यापर्यंत केलेली वाटचाल स्तिमित करणारी आहे. या यशस्वी वाटचालीस पद्मश्री डॉ. गणपतराव गोविंदराव तथा .गो. जाधव आणि त्यानंतरच्या कालखंडात पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेब जाधव यांची अपूर्व ध्येयनिष्ठा कारणीभूत आहे.
आदरणीय .गो. जाधव यांना भास्करराव जाधव, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आदी सत्यशोधक विचारवंत, पत्रकर्त्यांचा सहवास लाभला. त्याच बरोबरीने अच्युतराव कोल्हटकर, मामा वरेरकर, मो.. रांगणेकर या जाणत्या मंडळींच्याही सहवासात वावरण्याचे भाग्य त्यांना लाभले. परिणामी, त्यांच्या सामाजिक जाणीवा विस्तारित झाल्या, जीवनाच्या चिंतनकक्षा विशाल बनल्या. दीनदलित, शोषित, उपेक्षित, श्रमिक यांच्या समस्यांनी ते अस्वस्थ बनले. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भूमिगत पद्धतीने स्वयंसेवकांना गुप्त निरोप पोहोचविण्याची जोखीम त्यांनी पार पाडलेली होती. कराडे मतवाड येथील मीठाच्या सत्याग्रहादरम्यान महात्मा गांधीजींची भेट घेऊन त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे भाग्यही त्यांना लाभले. राजकीय चळवळीत योगदान त्यांनी दिले असले तरी त्यांचा खरा पिंड तत्त्वनिष्ठ समाजचिंतकाचा होता. त्यामुळे युवक सभा भरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला आपल्या परीने पाठिंबा देण्याचे धारिष्ट्य ते दाखवू शकले. ग.गो. जाधव यांनी आणखी एक महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य केले, ते म्हणजे राष्ट्रीय प्रवाहापासून दूर असलेल्या ब्राह्मणेतर चळवळीला समाजाला त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणून सोडले.
.गो. जाधव यांच्या पत्रकारितेला आणि उपक्रमांना नेहमीच विधायक सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान होते. त्याच्याशी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कधीही प्रतारणा केली नाही. किंबहुना, आपली सामाजिक जाणीवेची तळमळ आपल्या पुढील पिढीमध्येही त्यांनी अगदी यशस्वीपणे पेरली. त्यामुळेचपुढारीच्या यशाचा वटवृक्ष या सातत्याने बहरत आणि वृद्धिंगत होत राहिला आहे.
.गो. जाधव यांचे शिवाजी विद्यापीठावर थोर उपकार आहेत. कारण शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या संदर्भातील नांदी घडवून आणण्याचे कार्य त्यांनी सन १९३३मध्येच केले होते. छत्रपती राजाराम महाराज यांच्या वाढदिवशी .गो. जाधव यांच्या 'सेवक' या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्या अंकात डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण लेख लिहीला होता. त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम शिवाजी विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने सूतोवाच केले होते.
त्यानंतर ग.गो. जाधव यांनी 'पुढारी'ची मुहूर्तमेढ रोवली. या नव्या दैनिकाच्या व्यासपीठावरुनही त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचा ध्यास सोडला नाही. किंबहुना, त्यासाठी जनमत संघटित करण्यामध्ये, समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळविण्यामध्ये आणि राज्यकर्त्यांना या विद्यापीठ स्थापनेचे मोल पटवून देण्याच्या कामी .गो. जाधव यांनी 'पुढारी'च्या व्यासपीठाचा पुरेपूर वापर केला. विद्यापीठ स्थापनेच्या प्रक्रियेदरम्यानही सी.रा. तावडे आदी समित्यांवरही त्यांनी जबाबदारपूर्वक काम केले. त्या माध्यमातून विद्यापीठासाठी आवश्यक पूरक व्यवस्थांची निर्मिती, जमीन अधिग्रहण, विविध विभागांची प्रस्थापना, सक्षम कुलगुरूंच्या नियुक्तीचे हिरीरीने समर्थन आदी अनेक निर्णयप्रक्रियांत सहभाग घेतला. ते तडीस नेण्यासाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक दबाव निर्माण केला.
Dr. Pratapsinh Jadhav
.गो. जाधव यांचे हे सामाजिक भान आणि विद्यापीठाविषयीची आत्मियता ही पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव तथा बाळासाहेबांमध्येही आपसूकच झिरपली आहे. जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेऊन, त्यासंदर्भात व्यापक सामाजिक हिताची भूमिका घेऊन लढा उभारण्याचे काम त्यांनी केले आहे. अंबाबाईच्या मंदिरात दलितांना प्रवेशासाठीची चळवळ हे त्यांच्या जबाबदार सामाजिक जाणिवेचे महत्त्वाचे लक्षण आहे, असे मला वाटते.
पत्रकारितेच्या क्षेत्रात आजचे युग हे मालक-संपादकांचे आहे. तथापि, बाळासाहेबांनी मात्र आजही एक लोकपत्रकार, लोकसंपादक म्हणून आपली प्रतिमा जपली आहे. त्या प्रतिमेला लोकांच्या प्रेमाचे वलय लाभले आहे. पुढारीचे स्थानिक लोकचळवळींना सातत्याने पाठबळ लाभते. या पाठपुराव्याच्या बळावर परिसराच्या हिताचा एखादा महत्त्वाचा निर्णय झाल्यानंतर अभिनंदनासाठी संपादकाच्या दारी रीघ लागावी, असे दुर्मिळातले दुर्मिळ चित्र कोल्हापुरात पुढारीच्या रुपाने पाहायला मिळते.
बाळासाहेबांनी ऊस, दूध, तंबाखू आदी उत्पादनांच्या संदर्भातील आंदोलनांना व्यासपीठ आणि पर्यायाने लोकसहभाग मिळवून देण्याचे काम केले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या संदर्भातही विशिष्ट भूमिका घेऊन आंदोलनातली धग कायम राखली आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये ललित कला विभाग स्थापन व्हावा, यासाठी 'पुढारी'कारांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
बाळासाहेबांनी पुढारीची वृद्धी आणि विस्तारही अत्यंत धाडसीपणाने केला आहे. काळाची पावले ओळखून, प्रसंगी कर्ज काढून त्यांनी पुढारीचा विस्तार केला. आधुनिक नवतंत्रज्ञानाची कास धरत असताना थेट जर्मनीहून छपाई यंत्रणा मागविणारा हा अवलिया संपादक आहे. त्यांनी पुढारीचे स्वतःचे असे वितरणाचे तंत्र विकसित केले. टॅक्सीच्या माध्यमातूनगाव तिथे पुढारीअसा उपक्रम राबवून दैनिकाचा पाया प्रचंड प्रमाणावर विस्तारित करण्यात आणि भक्कम करण्यात त्यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. आजघडीला तर ग्रामीण बागाबरोबरच राज्याच्या मेट्रो शहरांतही पुढारीच्या खपाचा आकडा वाढतो आहे, याचे श्रेय बाळासाहेबांच्या कौशल्यपूर्ण नियोजनाला व्यवस्थापनाला द्यावे लागेल.
वृत्तपत्र कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात 'पुढारी' आपली विशिष्ट भूमिका घेऊन उतरला आहेच. पण, जिथे 'पुढारी' जात नाही, अशा ठिकाणीही त्यांनी आपल्या राष्ट्रीय कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक उभारले आहे, ते सीयाचीन येथील रुग्णालयाच्या रुपाने! सुमारे दोन कोटी रुपयांचा मदत पुनर्वसन निधी उभारून सीयाचीनसारख्या उत्तुंग थंडीच्या ठिकाणी राष्ट्रसेवा बजावत असलेल्या भारतीय जवानांसाठी हे रुग्णालय उभारून पुढारीकारांनी या मातृभूमीचे आणि तिचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या रुग्णालयाचा लाभ आता स्थानिक नागरिकांनाही होतो आहे, ही अभिमानाची बाब आहे.
दैनिक पुढारीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोल्हापुरातले तत्कालीन एकमेव बहुजनवादी दैनिक म्हणून प्रचंड नावारुपास आले. ग्रामीण भागाच्या विकासाची आस आणि दीनदलितांच्या उद्धाराचा ध्यास घेतलेल्या पुढारीने गेल्या ८० वर्षांत आधुनिक पत्रकारितेसाठी असणारे इतर सर्व तंत्रज्ञानात्मक, विकासात्मक बदल स्वीकारले; मात्र, या दोन ध्येयांपासून कधीही फारकत घेतली नाही. सत्यशोधक चळवळीचा आत्मा जोपासत असताना समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरिती यांच्यावर कठोरपणे कोरडे ओढायला पुढारीने कमी केले नाही. त्यामुळेच पुढारीला जनमानसात इतके आपुलकीचे स्थान निर्माण झाले की, स्थानिक स्तरावर वर्तमानपत्राला 'पुढारी' हा पर्यायी शब्द रुढ झाला. 'तुमच्या घरी कुठला 'पुढारी' येतो?' असं सहजपणे एखाद्याकडून विचारणा केली जाते, इतकी त्याची मूळं खोलवर रुजली आहेत. या दैनिकाशी लोकांचे सवयीचे आणि आत्मियतेचे नाते जोडले गेले आहे.
डॉ. योगेश जाधव यांच्या रुपाने पुढारीकारांची पुढची पिढीही जोमदारपणाने पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत झाली आहे. व्यवस्थापकीय संपादक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी सुद्धा अनेक नवनवीन उपक्रम राबविण्याला आणि प्रयोगशीलतेला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचे फलित स्वरुप म्हणूनही पुढारीचा वारु राज्यभरात चौखूर उधळतो आहे. काळाची पावले ओळखून पुढारीने ऑनलाइन आवृत्तीसह स्वतःचे टोमॅटो ही एफएम वाहिनी सुद्धा कोल्हापूरकरांच्या सेवेत सादर केली आहे. या दोन्ही उपक्रमांना स्थानिकांसह जगभरातून मोठा प्रतिसाद लाभतो आहे.
या अमृतमहोत्सवी कालखंडातच शिवाजी विद्यापीठाची वर्षांपूर्वी कोल्हापुरात स्थापना झाली. विद्यापीठाशी 'पुढारी'चे एक अतूट प्रकारचे नाते आहे. या भावबंधातूनच विद्यापीठातर्फे पद्मश्री (कै.) डॉ. .गो. जाधव स्मृती व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित करण्यात येते. या व्याख्यानमालेसाठी पुढारीचा पद्मश्री डॉ. .गो. जाधव ट्रस्ट अगदी आपलेपणाने, उत्स्फूर्तपणे घरचा कार्यक्रम असल्यासारखे सर्व प्रकारचे सहकार्य रीत असतो. या व्याख्यानमालेच्या आयोजनात कोणतीही उणीव राहता कामा नये, यासाठी विद्यापीठास सर्वतोपरी सहकार्य करीत असतात. केवळ या व्याख्यानमालेपुरतेच नव्हे, तर वेळोवेळी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना, उपक्रमांना पुढारी परिवाराचे सदोदित सहकार्य लाभत असते.
त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठात पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव यांच्या स्मरणार्थ अध्यासन व्हावे, यासाठी देखील स्वतः बाळासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा आणि सहकार्य केले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागात पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव अध्यासन स्थापन करण्यात आले. अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन जर्नालिझम या विषयामधील पदविका अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला असून या अभ्यासक्रमाची पहिली बॅचही बाहेर पडली आहे. शिवाजी विद्यापीठ आणि पुढारी यांचे साहचर्य पुढारीकारांच्या प्रेमामुळे इतक्या वर्षांत सातत्याने वृद्धिंगत झाले आहे.
बाळासाहेबांच्या अमृतमहोत्सवानिमित्त व्यक्तीगत पातळीवर तसेच शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने सुद्धा त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन आणि दीर्घोयुरारोग्य लाभावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा!

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

माझा फोटोग्राफीचा गुरू हरपला...!


मुळ्ये कुटुंबियांसमवेत आमची बीजेसीची फोटोग्राफीची बॅच. यात प्रज्ञा कलमे, जितेंद्र पोवार, विजय जाधव (पार्टनर), सचिन बनछोडे, समाधान पोरे, संजय साळुंखे, निशिकांत तोडकर, संदीप तेंडोलकर, रफिक मुल्ला, संजय उपाध्ये आणि संजय चव्हाण आहेत.

शशिकांत मुळ्ये सरांसमवेत केलेली दाजीपूरच्या अभयारण्याची अविस्मरणीय सफर.

शशिकांत मुळ्ये सरांसमवेत केलेली दाजीपूरच्या अभयारण्याची अविस्मरणीय सफर.

बीजेसीच्या आमच्या बॅचमसेवत (डावीकडून) डॉ. जगन्नाथ पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, श्री. दशरथ पारेकर, डॉ. ओमप्रकाश कलमे आणि श्री. शशिकांत मुळ्ये. समोर सरांची छोटी सोनू दिसत आहे.

बरोब्बर एकवीस वर्षांपूर्वीची गोष्ट... शिवाजी विद्यापीठात बीजेसी करत असतानाची... विद्यापीठात सध्या आता जिथं गांधी अभ्यास केंद्राचा वर्ग चालतो, ती खोली त्यावेळी आमच्या जर्नालिझमची सेमिनार रुम होती. गेस्ट लेक्चर्स, प्रेझेंटेशन्स, सेमिनार, व्हायव्हा वगैरे त्या खोलीत होत. तिथं जमायला ओमप्रकाश कलमे सरांनी सांगितलेलं. कारण माहिती नव्हतं.. थोड्या वेळात कलमे सर एका उंचापुऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन वर्गात दाखल झाले. पाहता क्षणीच नजरेत भरणारं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे मोठ्ठे डोळे. इतके मोठे की गांधीजींसारख्या गोल फ्रेमच्या त्यांच्या चष्म्यातून बाहेर येतील की काय, असे वाटावे.. पण मोठ्ठे असूनही त्या डोळ्यांत रुक्ष बटबटीतपणा नव्हता. एक प्रकारचं स्नेहाळ मार्दव त्यांत होतं. चेहऱ्यावर सदैव विलसणाऱ्या स्मितहास्यामुळं एक प्रकारची प्रसन्नता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर होती. कलमे सरांनी ओळख करून दिली, हे शशिकांत मुळ्ये. प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. मुंबईहून काही कारणानिमित्त कोल्हापुरात दाखल झाले आहेत. ते आपल्याला फोटोग्राफी हा विषय शिकवतील. आपल्याकडे फोटोग्राफी ऑप्शनला असला तरी आधुनिक युगात तिचं महत्त्व समजावून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी या विषयाची निवड करावी, वगैरे वगैरे सरांनी सांगितलं.
शशिकांत मुळ्ये सरांच्या दर्शनाचा तो आमचा पहिला दिवस होता. त्यानंतर फोटोग्राफीविषयी, आपल्या कामाविषयी मुळ्ये सरांनी आम्हाला माहिती दिली. त्यातून त्यांनी अनेक कंपन्यांसाठी विशेषतः एचएमव्हीसाठी कॅसेट कव्हर्स केल्याचं समजलं. अनेक उद्योगांसाठी इंडस्ट्रीयल फोटोग्राफी केल्याचंही समजलं. त्यांचे काही फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर या मोठ्या डोळ्यांमधली नजरही किती कलात्मक अन् तीक्ष्ण आहे, याची आम्हाला खात्रीच पटली. आमच्यातल्या निम्म्या विद्यार्थ्यांनी फोटोग्राफी विषय ठेवायचं, तत्क्षणी ठरवून टाकलं. सरांच्या वक्तृत्वानं आणि कार्यानं सर्वाधिक भारावलेल्यांत मी, निशिकांत (तोडकर) आणि समाधान (पोरे) होतो. पुढं आम्ही सरांचे आल्लोक, निशी आणि सॅम झालो.
एवढं सगळं असताना मग सर मुंबई सोडून कोल्हापुरात का बरं आले असतील, असा प्रश्न आम्हाला पडलेला; पहिल्या भेटीतच तसं विचारणं थोडं अगोचरपणाचंच होतं, पण त्या वयात तो घडून गेला; तथापि, सरांनी अत्यंत प्रांजळपणानं त्यामागची कथा सांगितली आणि त्यामुळं तर मी त्यांच्या प्रेमात पडलो. सरांना ट्रेकिंगचा भारी नाद होता. हिमालयावर सरांनी दोन वेळा चढाई केली, नयनरम्य फोटोग्राफीही केली. मात्र, दुसऱ्या वेळी त्यांना स्नो बाईट झाला आणि त्यांचा पाय वाचविण्यासाठी मांडीतील हाडाच्या जागी स्टीलचा रॉड घालावा लागला होता. त्यामुळं धावपळ कमी करावी लागणार होती. म्हणून सरांनी सासूरवाडीचं ठिकाण असलेल्या कोल्हापूरची निवड स्थायिक होण्यासाठी केली होती. पुढच्या व्याख्यानावेळी आम्ही सरांना त्यांच्या हिमालय स्वारीतील छायाचित्रांचीच माहिती द्यायला लावली. जवळजवळ दोन तास सरांनी आम्हाला हिमालयाची सचित्र सफरच जणू घडविली. ते स्वतःही तल्लीन झालेले आणि आम्हीही.
असा आमचा फोटोग्राफीचा हिमालयीन विषयप्रवेश झाला. सरांचं शिकवणंही रुटिन, रटाळ नव्हतं. अनुभव शेअर करीत, फोटोग्राफीच्या गंमतीजंमती, दिग्गज फोटोग्राफर्सच्या यशकथा सांगत, त्यांनी आम्हाला फोटोमागच्या दुनियेची सफर घडवायला सुरवात केली. बेटर फोटोग्राफी सरांमुळंच आमच्या आयुष्यात आलं. सर शिकवत होते, तेव्हा अद्याप डिजिटल फोटोग्राफीची सुरवात झालेली नव्हती. रोल कॅमेऱ्यांचा, एसएलआरचा तो जमाना होता. बाजारात कोडॅकचा हँडी केबी-१० नुकताच दाखल झालेला, असा तो कालखंड. तेव्हा मुळ्ये सरांनी आम्हाला डिजिटलच्या पाऊलखुणांची माहिती दिलेली होती. सर्व फोटोग्राफर्ससाठी महत्त्वाचा आणि मोलाचा ठरेल, असा संदेश त्यांनी त्यावेळी आम्हाला देऊन ठेवला. ते सांगत, फोटोग्राफीत इन्स्ट्रुमेंट महत्त्वाचे असतेच. नाही, असे नाही. मात्र, इन्स्ट्रुमेंटच महत्त्वाचे असते, असे मात्र नाही. तुमच्या हातात जगातला सर्वात भारी, महागडा कॅमेरा आहे, मात्र फोटो काढण्यासाठी लागणारी नजर तुमच्याकडे नसेल, तर सारेच व्यर्थ आहे. त्यामुळे त्या काळात केबी-१०, कॅननसारखे साधे कॅमेरे हाती घेऊन फोटो काढण्याचे प्रयोग आम्ही केले, पण त्याचवेळी सेकंडहँड का असेना, पण एसएलआर (सिंगल लेन्स रिफ्लेक्स) कॅमेरा घेण्याचं धाडसही सरांनी आमच्यात निर्माण केलं. कॅमेऱ्यात रोल असा कौशल्यानं लोड करता यायला हवा की, ३६च्या रोलमध्ये ३८ ते ४० फ्रेम्स एक्स्पोज व्हायला हव्यात आणि या प्रत्येक रोलमध्ये तुमचा किमान एक तरी बेस्ट, वेगळा फोटो असायला हवा. हळूहळू ही संख्या जितकी वाढत जाईल, तितके तुम्ही उत्तम छायाचित्रकार व्हाल. आजही हातातल्या मोबाईलमध्ये जरी एखादा फोटो घेतला आणि तो उत्तम आला, तर सरांच्या या वाक्यांची आठवण झाल्याखेरीज राहात नाही.
सरांनी फोटोग्राफीसंदर्भातील इतक्या असाइनमेंट आमच्याकडून करवून घेतल्या की आमचा कॉन्फिडन्स खूपच वाढला. इतका की, मी आणि समाधाननं एसएलआर घेऊन मुक्त छायाचित्रकार म्हणून कामही करायला सुरवात केली. विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन असो की एखाद्या वसतिगृहातल्या मित्राचा रिसर्च एक्सपिरीमेंट, अशा ऑर्डरी मिळायला सुरवात झाली. कमाई सुरू झाली. त्यामुळं माझा पहिला शिक्का जो तयार केला, तो फोटोग्राफर अँड जर्नालिस्ट असा होता, हे अभिमानपूर्वक नमूद करावंसं वाटतं. त्याला मुळ्ये सरांचं मार्गदर्शनच कारणीभूत होतं.
क्लासरुमबरोबरच क्लासरुमबाहेरही सरांचं शिकवणं सुरूच असायचं. आम्ही बीजेसीच्या फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी सरांसोबत दाजीपूरच्या अभयारण्यात फोटोग्राफीसाठी जंगल सफारी केली. जंगल कसं वाचावं, पाहावं, हे आम्हाला सांगणारा हा पहिला माणूस होता. एवढंच नाही, आमच्या मनावर परंपरेनं लादलेली काही जळमटं होती, ती काढून टाकायलाही सरच कारणीभूत होते. उदाहरणच सांगायचं तर, न्यूड किंवा नग्न म्हणजे काही तरी चुकीचं, वाईट, ओंगळ अशी आपली सार्वत्रिक सामाजिक मानसिकता करून देण्यात आलेली असते. सरांनी आमच्या मनातली ही किल्मिषं अगदी हळूवारपणानं दूर केली. नग्नतेकडं केवळ अश्लील म्हणून न पाहता त्यातलं सौंदर्य, ते टिपण्यामागील छायाचित्रकाराची नजर, भूमिका हे समजून घ्यायला शिकवलं. ते सांगताना मग केवळ छायाचित्रांपुरतं मर्यादित न राहता लिओनार्दो, राजा रविवर्म्यासारख्या महान चित्रकर्मींची नव्यानं पुनर्भेट घडविली. त्या दोन वर्षांत सरांबरोबर आम्ही उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पाहिले. चित्रपटांतल्या छायाचित्रणाबद्दलही सर भरभरून बोलत, माहिती देत असत. आम्हाला खऱ्या अर्थानं एन्-रिच करणारा हा शिक्षक होता.
सरांसोबतचा स्नेह हा केवळ त्यांच्यापुरता मर्यादित न राहता त्यांच्या घरापर्यंत विस्तारला होता. मॅडमही त्यांच्यासारख्याच स्वभावानं मृदू आणि बोलायला गोड. आणि छोटुकली सोनू (चैत्राली) तर काय, आम्हा सर्वांचीच लाडकी झालेली.
अभिनेता अतुल परचुरे हा सरांचा जवळचा नातेवाईक. तो एकदा खाजगी भेटीवर आला असताना (सरांना माझं चित्रपट प्रेम ठाऊक असल्यानं) त्यांनी आवर्जून माझी अन् त्याची भेट घडवून आणली. त्यावेळी अतुलची मी घेतलेली मुलाखत लोकमतच्या चित्रगंधा पुरवणीत प्रसिद्ध झाली.
पुढं आम्ही सारे कामानिमित्तानं इकडं-तिकडं झालो. मी सकाळमध्ये उपसंपादक म्हणून रुजू झालो. लग्न झालं. त्यानंतर कोल्हापुरात अगदी लकीली सरांच्या अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅटच मला भाड्यानं मिळाला. त्यामुळं केवळ माझ्यापुरता असणारा मुळ्ये कुटुंबाचा स्नेह माझ्या पत्नीलाही लाभला. नाईट ड्युटीला जात असताना तिला जणू तिच्या आईवडिलांची सोबत आहे, असं समजून मी निर्धास्तपणानं ड्युटीला जात असे. सर आम्हाला हनिमून कपल म्हणून संबोधत. म्हणायचे, या वयात जितका क्वालिटी टाईम एकमेकांसाठी द्याल, तितकं ते पुढं महत्त्वाचं ठरतं. नंतर तुम्ही मुलाबाळांसह साऱ्यांना वेळ द्याल, पण एकमेकांसाठी किती वेळ द्याल, सांगता यायचं नाही. त्यावेळी मला त्यांच्या सांगण्याची मौज वाटायची, पण आता त्यातलं मर्म उमगतंय... त्यांचं सांगणं एकदम अनुभवसिद्ध होतं. पुढं सहा महिन्यांतच मी नोकरीनिमित्तानं मुंबईला शिफ्ट झालो. सरांशी अधून-मधून बोलणं व्हायचं. त्यांनी काही वाचलं, कधी आठवण झाली की, स्वतःहून फोन करायचे. काही नवीन सांगायचे, काही नवीन विचारायचे. सरांमुळेच ज्यांच्या कामाची माहिती झाली, त्या गोपाळ बोधे सरांशी झालेला परिचय ही माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना होती. त्याच दिवशी सरांना फोन करून त्यांना या भेटीविषयी सांगितल्याखेरीज मला राहावलं नाही. खूष झाले ते!
काही वर्षांपूर्वी मॅडमचं असंच अचानकपणानं निधन झालं. सरांसाठी, सोनूसाठी, आमच्यासाठी हा मोठा अनपेक्षित धक्का होता. त्या त्रिकोणी कुटुंबाचं एकमेकांशी असलेलं बाँडिंग ज्यांना ठाऊकाय, त्यांनाच हा महत्त्वाचा कोन हरपल्याचं विलक्षण दुःख लक्षात येईल. सर त्यातून सावरायचा प्रयत्न करीत राहिले, ते फक्त सोनूसाठी. तिच्यासाठी ते पुण्याला शिफ्ट झाले. तिथल्या चांगल्या कॉलेजात सोनू शिकू लागली. तिच्या शैक्षणिक प्रगतीच्या वार्ता ते शेअर करीत असत. व्हॉट्सअप हे त्यांनी त्यासाठी चांगल्या पद्धतीनं वापरायला सुरवात केलेली. मधल्या काळात त्यांनाही थोडासा विस्मरणाचा त्रास सुरू झाला, पण तो मर्यादित होता. आणि गेल्या तीन ऑक्टोबरला पहाटे त्यांचंही अचानकपणे निधन झालं. त्रिकोणाचे दोन कोन हरपले आहेत आणि सोनू नामक बिंदूला पुन्हा नव्यानं आपल्या आयुष्याची भूमिती साधण्यासाठी, जुळविण्यासाठी बळ गोळा करायचंय, संघर्षरत व्हायचंय.
मुळ्ये सरांचं अकाली जाणं हे माझ्यासाठीच नव्हे, तर आमच्या संपूर्ण बॅचसाठी प्रचंड क्लेषकारक आहे. त्यांच्याविषयी जेव्हा विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की, या माणसानं आम्हाला केवळ फोटोग्राफी शिकवली, असं नाही, तर आयुष्य जगावं कसं, किती रसरशीतपणानं जीवनातील विविध अभिव्यक्तींचा आस्वाद घेता येऊ शकतो, हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं. कधी आनंदात, तर कधी एकटेपणात ते त्यांची लाडकी सतार घेऊन बसायचे. सर असेच एकदा तल्लीन होऊन सतार वाजवत असताना त्यांचा एकमेव श्रोता होण्याची संधी मला लाभलीय. त्यांना बसल्या जागी इथंही बक्कळ पैसा कमावता आला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. क्वालिटी टाईम देऊन सुपरफाईन काम हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आपल्या वेळेवर आपल्या कुटुंबाचाही हक्क आहे, हे त्यांच्या सदैव स्मरणात असायचं. सकाळी घरातून बाहेर पडताना इतक्या वाजेपर्यंत येतो म्हणून सांगितलं, की त्या वेळेत घरी पोहोचणारच. आजकाल सारे नातेसंबंध मागे टोकून पैशांच्या मागे धावणारी मंडळी पाहिली की मुळ्ये सरांसारख्या माणसाचं वेगळेपण प्रकर्षानं जाणवायला लागतं. खूप पैसा, प्रचंड प्रसिद्धी त्यांना सहजी मिळविता आली असती, पण त्यांनी जगण्याचं खरं रहस्य ओळखलं होतं. जेवढंही आयुष्य ते जगले, क्वालिटीनं जगले.
आता मॅडम नाहीत... सरही नाहीत... या दोघांनी इतकं अकाली जाणं अपेक्षित नसतानाही ते घडलंय... वस्तुस्थिती स्वीकारावीच लागेल... पण या दोघांच्या प्रेमाची छत्रछाया लाडक्या सोनूवर सदैव राहील, याची खात्री आहे... मिस् यू सो मच मुळ्ये सररेस्ट इन पीस!


रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

‘विनर, विनर; चिकन डिनर!’




‘विनर, विनर; चिकन डिनर!’ ही आरोळी आज आपल्या भोवतालच्या अनेक युवा तरुणांच्या भावविश्वाला, मेंदूला विळखा घालून बधीर करून सोडते आहे. प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंड असं जीभेला जडशीळ असं नाव घेतलं तर कदाचित कोणाच्याच लक्षात येणार नाही; पण पबजी (PUBG) असं म्हटलं की लग्गेच लक्षात येईल. या पबजीनं केवळ आपल्याच देशात नव्हे, तर संपूर्ण जगभरात मोठा गहजब माजविला आहे. गेल्या आठवड्यात, नव्हे अगदी पाचच दिवसांपूर्वी बेळगावमधल्या एका २१ वर्षांच्या तरुणानं सारखं पबजी खेळत जाऊ नकोस, असं सांगणाऱ्या आणि सशस्त्र सैनिक दलातून निवृत्त असलेल्या आपल्या बापाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. रात्रभर गेम खेळणाऱ्या या मुलानं सकाळी सकाळी आपल्या गेम खेळू नको, असं सांगणाऱ्या बापाचं शीर कोयत्यानं धडावेगळं केलं आणि पायही तोडला. काल कोल्हापूर परिसरातल्याच एका गावातल्या तरुणावर पबजी खेळल्यानं मनोरुग्ण होण्याची वेळ आली. उपचारासाठी दाखल केल्यानंतरही तेथून तो हळूच पळूनही गेला.
काही दिवसांपूर्वी एका मुलाला आईनं उद्या दहावीच्या परीक्षेचा पेपर आहे, पबजी खेळू नको, असं सांगितलं, तर त्या मुलानं आत्महत्याच केली. दुसरीकडं एकानं याच कारणासाठी बहिणीच्या नियोजित पतीवरच हल्ला केला. एका ठिकाणी सलग आठ आठ तास मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला बेशुद्ध झाल्यानं उपचारांसाठी दाखल करण्याची वेळ आली होती. तर आणखी एका तरुणाची बोटं गेम खेळताना मोबाईल ज्या पोझिशनमध्ये धरतात, तशीच वाकडीच्या वाकडीच राहिली होती.
दोनेक वर्षांपूर्वी ब्लूव्हेल गेम तयार करून अनेक तरुणांना शारिरीक-मानसिक इजा करून घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि अगदी उंचावरुन उडी मारुन आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कंपनीचंच पबजी हे सुद्धा अपत्य आहे. रुथलेस किलींग, अंदाधुंद गोळीबार, त्यातून उन्मादी विजय आणि मग चिकन डिनर असं एका वाक्यात वर्णन करता येत असलं तरी ते तितकं सरळसोपं नाही.
या गेमच्या विळख्यात टीनेजर्स ते नुकतीच त्यातून पुढं सरकलेली तरुणाई अडकलीय. त्यातून निर्माण होणाऱ्या मनोविकृतीचे दुष्परिणाम आपल्याला आता लक्षणीय स्वरुपात दिसू लागले आहेत. या गेमवर बंदी घाला, अशी सरधोपट मागणी करता येणं शक्य आहे. पण, त्याचा काही उपयोग होणार नाही. ब्लूव्हेलवर बंदी घातल्यानंतरच पबजी पुढं आलंय. आणखीही फ्री फायरसारख्या गेम्स आहेत आणि त्यात आपली मुलं गुंतत चाललीयत- प्रमाणाबाहेर...
मित्रांनो, इथं पुन्हा मी आपली जबाबदारी अधोरेखित करतो. गेम्सवर बंदी घालण्यापेक्षा त्या खेळणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या मनावर परिणाम होण्यापूर्वीच आपण सावध करू या, त्यातून बाहेर काढू या... माझे जे तरुण मित्र अशा गेम्स खेळत असतील, त्यांनी त्यापासून दूर व्हावं... प्रयत्न करा, निश्चित जमेल... ज्या मित्र-मैत्रिणींची मुलं-मुली सतत तुमचा मोबाईल घेऊन आतल्या खोलीत बसत असतील, त्यांना मोबाईलपासून प्रयत्नपूर्वक दूर करा... याचा अर्थ लगेच टीव्हीच्या पडद्यासमोर बसवा, असा मात्र नाही. त्यांना काही क्रिएटीव्ह चॅलेंजिस द्या... जे मित्र-मैत्रिणी, आपलं लहानगं कसं मोबाईल अनलॉक करून युट्यूबवर जाऊन त्याला हवा असणारा व्हिडिओ लावतंय, याचं कौतुक करत असतील, किंवा मोबाईलवर अमूक एक व्हिडिओ लावल्याशिवाय जेवण भरवूनच घेत नाही, असं कौतुकानं सांगत असतील, त्यांनी वेळीच सावध व्हावं... तुम्ही भविष्यातला मनोरुग्ण घडवताय, एवढं लक्षात घ्या...
थोडक्यात, आयुष्याचाच गेम करणाऱ्या अशा गेम्सना तुमच्या अगर तुमच्या मुलांच्या आयुष्यात थारा देऊ नका, एवढंच माझं कळकळीचं सांगणं!